मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बडवा (९)

राजघराणं · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
भाग १ - http://www.misalpav.com/node/20503 भाग २ - http://www.misalpav.com/node/20510 भाग ३ - http://www.misalpav.com/node/20520 भाग ४ - http://www.misalpav.com/node/20532 भाग ५ - http://www.misalpav.com/node/20541 भाग ६ - http://www.misalpav.com/node/20603 भाग ७ - http://www.misalpav.com/node/20892 भाग ८ - http://www.misalpav.com/node/21028 ( पूर्वसूत्रः . त्या उकळत्या रक्तात, रक्ताच्या नात्यात हिंदुत्व आहे. हिंदुचे बंधुत्व म्हणजे हिंदुत्व ! " "मग काय म्हणाला राजवीर ?" पेग भरत विनोद ने विचारले. ) पेग तिसरा '' राजवीर फार नेमकं बोलतो. हिंदूनी एक व्हायला कुणाचीच अडकाठी नाही, पण हिंदुत्वाचा वटवृक्ष जर वाढायचा असेल तर त्यावरची सनातनी बांडगुळं भवानी तलवारीनी छाटावी लागतील म्हणाला तो. ठीकय. पण त्यावर जास्तीची मल्लीनाथी करत म्हणाला, पण त्यासाठी हिंदू आणी मुस्लीमात अविश्वास तयार करायची काहीच गरज नाही. तसं करू नका तुम्ही लोक". शिंदेनी राजवीरची भाषा ऐकवली. ग्लास टेबलावर आदळत विनोद म्हणाला "आईच्या गावात गेला विश्वास." शिंदेनी खांद्यावरची शाल काढून सोफ्याच्या पाठीवर टाकली. स्कॉचचा एक हलका सिप मारला आणी डोळे बारीक करत विनोद कडे पहात, स्मितहास्य करत ते म्हणाले " कसा जाईल आइच्या गावात ? पानिपतात पूर्वीच मेला नाही का तो ? मग मी राजवीरला ९२ च्या दंगलीवेळची एक गोष्ट सांगीतली. बेळगावाचा आमदार होतो मी तेंव्हा. भल्या पहाटे एक कार्यकर्ता माझ्याकडे आला म्हणाला बडी मशीदीत मुस्लीमांनी शस्त्र लपवलियत. मग पहाटेच्या नमाजाच्या वेळेलाच दोनशे कार्यकर्ते घेउन धडकलो मशीदीत. सरळ आत घुसलो. मला पाहून सारी मुसलमानं भीतीने चळाचळा कापत उभी होती. सगळी मशीद शोधली. तपासली. एकही शस्त्र न्हवतं. मग दुसरा कार्यकर्ता बोलला इथे नाही सर ...अल निर्मा मशीदीत पेट्रोल बाँम्ब आहेत. मग आम्ही तीही मशीद तपासली. तिथंही काही मिळालं नाही. त्यादिवशी बेळगावातल्या तब्बल पंधरा मशीदी तपासल्या आम्ही. एकाही मशीदीत काडी मिळाली नाहीत. तलवारी आणी पेट्रोल बाँम्ब सोडाच. पोपट झाला माझा तेंव्हा. पण आजही कुणी मला मशीदीत शस्त्र लपवल्याची टीप दिली तर मी तपासायला जाईनच तिथं. कारण काय ? अविश्वास ! अविश्वास आहे आपल्या देशात मुसलमानांबद्द्ल. मशीदीत शस्त्र लपवल्याची बातमी कोणालाही खरीच वाटेल. पण प्रश्न असा आहे की का नाही बसत विश्वास अल्पसंख्यांवर? पाकिस्तानातल्या हिंदूनी मंदिरात शस्त्र लपवल्याची टीप तिथल्या मुसलमानाना कुणी दिली तर ? काय प्रतिक्रीया असेल त्यांची ? दाताड विचकटून हसतील ते पाकडे ! आता कळलं का नाही बसत विश्वास ..... त्यांची वागणूक, आचार आणी अनुभवच असे आहेत की विश्वास ठेवूच शकत नाही मी." " मग मी राजवीरला म्हणालो तुला पोपटाची गोष्ट महितीय का ? एक सुंदर राजकन्या असते. एका राजकुमाराचं तिच्यावर फारफार प्रेम असतं. एकदा एक दुष्ट राक्षस त्या राजकन्येला पळवून नेतो. मग राजकुमार काय करणार ? झक्कत जातो लढायला राक्षसाशी. पहिल्यांदा राक्षसाचा हात छाटतो. लगेच दुसरा हात उगवतो. पाय उडवल्यावर नवीन पाय उगवतो. मुंडकं कापल्यावर नवं मुंडकं उगवतं. आता राजकुमाराला प्रश्न पडतो की याला मारायचा कसा? मग त्याला तिथं एक पोपट दिसतो. पोपट. हिरवागार. लाल चुटुक चोचीचा. राजकुमार त्या पोपटाची मान पिरगाळतो. राक्षस आचके विचके देत जमनीवर धाडकन पडतो. जीभ बाहेर लटकते त्याची. कारण राक्षसाचे प्राण त्या पोपटात असतात........ महाराजांनी त्यांच्या वाघनखानी अफझलखान उभा फाडला. पण संसदेवर हल्ला करणारा भडवा..... अफझलगुरू अजून जिवंत आहे. एक अफझल फाडला तरी दुसरा तयार होतोच.... ह्या अफझुल्ल्यांचे प्राण कशात आहेत ? त्यांच्या पोपटाची मान पिरगाळल्याशिवाय हे अफझल सत्र थांबणार नाही. तो ईस्लामी धार्मीक शिकवणुकीचा पोपट आहे. जिहादचा पोपट छाटला पाहिजे. हिंदू म्हणून ताठ मानेन या देशात जगणे. हा माझा हक्क आहे. और मै कीसी आने वाली पीढीओंके लिये नही लढ रहा. मुझे मेरा हक चाहिये. और वो भी अभी. इसी वक्त. " विनोदनी एका दमात ग्लास संपवला. त्याच्या आशा पल्लवित, चित्तवृत्ती उल्हासित झाल्या होत्या. अधिरपणे त्याने विचारल. "मग काय ठरलं नियतीच्या लग्नाचं ?" " काय होणार ? लटकतोय अजून प्रश्न. पण राजकारण वेगळं आणी रक्तसंबंध वेगळे. हे त्यालाही कळतं. आणी मलाही.पुढच्या बैठकीत गाडी सरकेल पुढे. ठरवून टाकू लग्न. " विनोदच डोक गरगरू लागलं होतं. डोळे मिटले की की समोर वर्तूळं दिसायची. त्यात नाचती नियती तरळायची. तीन पेगनंतर भीडही थोडी चेपली त्याची. ग्लासच्या तळात बघत तो म्हणाला " .....सर नाझरीनशी लग्न नाय करायच मला. लग्न म्हणजे काय खेळय ? माझा खेळ नका मांडू. माझ्या पुर्‍या आयुश्याचा प्रश्न आहे हा." शिंदेनी ग्लास संपवला. नशा चढू लागली होती. नशा दारूची. नशा राजकारणाची. नशा सत्ताकारणाची. नशा इतिहासाची.नशा भूतकाळाची. नशा स्वतःचीच. छातीवर हात आपटत ते म्हणाले " हा मी. मी मल्हारराव केशवराव शिंदे. कोण आहे माहित आहे ? गरीब शेतकर्‍याचा पोरगा. आजचा आमदार. ४० कोटींचा मालक. बेळगावातल्या हिंदूंचा त्राता. आणी तुझा भाग्यविधाता. का आहे? कारण स्वतःच्या खाजगी जीवनाच तेरावं घालूनच राजकारणात उतरलो मी. तुझ्या आयुश्याचा प्रश्न नाही हा...... हा हिंदूच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. हा देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे. तान्हाजी, बाजी, मुरारबाजीने स्वतः खाजागी आयुश्य फाट्यावर मारल म्हणून तू बडवा राहिलास. नाहीतर सय्यदांचा भडवा बनून नमाज पढतास." डाव्या हाताने सोफ्याचा आधार घेत शिंदे पुढे कलले. ग्लास टेबलावर आदळत म्हणाले " भर पेग" पेग चौथा शिंदेनी पुन्हा ग्लास उचलला त्यातले बर्फाचे खडे स्कॉच मधे गोल - गोल फिरवले. " हे चक्र तोडलं पाहीजे. आता बस्स झालं. अब हिंदू मार नही खायेगा. तुम्ही पन्नास माराल तर आम्ही पाच हजार मारू. तुम्ही एक पोरगी बाटवाल तर आम्ही शंभर पोरीना शुद्ध करू. दुसरी भाषा समजत नाय भाड्याना. हे युद्ध आहे. त्यासाठी रणचंडी बळी मागते आहे. तुझ्या वैयक्तीक खाजगी जीवनाचा बळी. कवीता आहे ना ती ... जिवा,तान्हाजी, बाजी, मुरारबाजीवरची.... सेतुनिर्माण.... देहाचा पूल " पूर्वीच्या इतिहासाचे उलटता पान एखादे; फुरफुरती अमुचे बाहू - जरी गुलाम झालो बंदे । स्वर्णीम पृश्ठ गतकालके पढतेही कंपित हृदय, प्रस्फूर्त बाहुद्वय | समशेर मुठीत न आज - लेखणीचे करतो धंदे; जी नसानसातुन बिजली तेंव्हा सदा सळसळली जो नस नस मे थी दौडी बि़जली हमारी रगोंमे हतवीर्य आज वह विद्युत हतवीर्य आज ती झाली म्हणुनी हे जिणे कुत्र्याचे की देणे हे नशिबाचे ? हे नशीब अमुचे म्हणुनी वीरांची नसे भाषा; ते स्वत:च्याच रक्ताने लिहिति लेख नशिबाचा ॥" ग्लास उंचावत विनोद उभा राहिला. कविता म्हणू लागला "उचलून विडा दरबारी सरदार विजापुर वाला; पुनवडीवरी चालून यावयास शीघ्र निघाला । पोचला शिवापुरी ऐसे जासूद वदे शिवबाला...... वृत्त हे ऐकती कान, तो वळवी अपुली मान, तो उभे राहिले भाले, शत्रू रक्ताला तान्हेले जय भवानिचा गरजुनी धावले शिवाजी राजे घेउनी जिवाचे दोस्त तीनशे मावळे सर्जे पोचले छावणीजवळ ते काळ कांबळीवाले. खानाचा चूर कराया आतूर अंतरी झाले देखिले निखार्‍यांनी तो खंदक ते रसरसलेले पडले भयंकर कोडे विझवाया जवळ न ओढे" आता विनोदच्या उघड्या डोळ्याना वर्तुळं वर्तुळं दिसू लागली होती. तिरमिरत तो बोलू लागला " सर म्ह्टलं तर कविता काल्पनीक आहे. म्हटलं तर जिवा,तान्हाजी, बाजी, मुरारबाजीवरची... रूपक कविता..म्हटलं तर भूतकाळ. भूतकाळ अनिश्चित असतो. इतिहास हा अंदाज असतो. मी गडकरी शिवबाचा....खानाची ती हिरवी छावणी. त्या भोवती खणलेला खंदक. खंदकात निखारे. पेटते निखारे. पल्याड जावून माजलेले बोकड चिरायचेत. त्यांच्या रक्तासाठी भाले तहानलेत. पण पेटत्या निखार्‍यावरून आत कस जायच ? विझवायला जवळ ओढे न्हवते. स्वराज्या भोवती अशाच अडचणींचे निखारे होते. पण मावळे लेचेपेचे न्हवते. " एका हाताने सोफ्याचा आधार घेउन विनोद उभा होता. थोर विचारवंताचा - वक्त्याचा आव आणत त्याने उजवा हात उंचावला होता. ग्लास खाली ठेवत शिंदे उठले. पुढची कविता म्हणू लागले " कल्पना स्पर्शली चित्ता जो तोच पटाइत चित्ता ठाकूनी पुढे सगळ्यांच्या जाहला शिवजी वदता - जाणार काय माघारा ? सरकार काय हे पुसता ? ऐका तर माझे आता - जी तयार हुकुमाकरता खंदकावरी जरी कोण आपुले देह टाकून मज देइल पूल करून ? " "अंगारो की शयन बनेगी कुसुमसज्जा वीरो अपने तन से सेतुनिर्माण है करना" विनोदनं आपला वर नेलेला हात झोकात खाली आणला. चुटकी वाजवून त्वेषानं तो म्हणाला - " निघताच शब्द बाहेर जन निजले त्यावर चार त्यांचिया शरिरावरूनी छावणीत सगळे घुसले गळे शत्रूचे चिरले रक्त ते भाले प्याले" इतक्यात उगवला अरुण तो गुलाल उधळी वरून अरुणोदय बस तभी हुआ केसरिया रंग छाया स्वाधीनता का भगवा आस्मान मे लहराया " रणचंडी व्यक्तीस्वातंत्र्याचा बळी घेत होती.नशा चढत होती. दारूची. युद्धाची. ....अनिश्चित भूतकाळाची. काल्पनीक इतिहासाची. ताम्रसुरा प्यालेला नभातला दैत्य माजला. राजकारणाचा राक्षस जास्वंद चुरगाळत होता. सत्ताकारणाचा सैतान नसानसात भिनत होता. मोगरा पिचत होता. धडपडत विनोद टेबलाजवळ आला शिंदेकडे पहात म्हणाला " माजी आमदारसाहेब .... भावी खासदाराचा पेग भरा " पेग पाचवा (क्रमशः)

वाचने 4375 वाचनखूण प्रतिक्रिया 13

किसन शिंदे 22/03/2012 - 04:34
८ आणि ९ भाग एकत्रच वाचले. जसजसे पेग भरले जातायत तसतसे कथेतही रंग भरू लागलेत. पण एक विनंती आहे, एवढी चांगली कथा आहे तिला फार जास्त ताणु नका.

हम्मम्म.... आहे फ्लो आहे...कंटिन्यु झालाय... नशा चढलीये,त्यामुळे सगळी प्रतिक्रीया... पार्टी संपल्यावर देणार... येऊ दे पुढचा पेग...उशीर झाला,तर रसं'भंग होइल... :-)

कथा एकसुरी होत आहे. पहिल्या दोन भागांसारखी वेगवान व वळण असलेली कथा वाचायला आवडेल. अजून वेगळी कथेला वेगळी वळणे द्यायची नसतील तर कथेचा वेग फक्त कायम राखा ही विनंती.