हा पुस्तक परिचय आहे. परिक्षण करण्याइतपत अक्कल मला नाही. जे आवडलं ते लोकांना सांगावं हाच फक्त उद्देश.
१९९३ मधे, अमेरिकेतल्या मोंटाना राज्यात राहणारा एक धाडसी गिर्यारोहक "ग्रेग मॉर्टेन्सन", के-२ हे जगातलं दुसर्या नंबरचं उंच पण अतिशय अवघड असं शिखर सर करण्यात अपयशी ठरतो. पाकिस्तानातल्या (पाक्-व्याप्त काश्मिरमधल्या) ईशान्येला असलेली हिमालयातली काराकोरम पर्वतरांग म्हणजे जगातल्या अत्युच्य अशा साठ पर्वतशिखरांचं माहेरघर, पाकिस्तान व चीन मधे असलेली नैसर्गिक हद्द. शरिराने श्रमलेल्या आणि अयशस्वी चढाईमुळे पूर्णपणे मानसिकरित्या खचलेल्या अवस्थेत ग्रेग मॉर्टेन्सन बेस कॅंपची आणि पर्यायाने बाकिच्या जगाची वाट चुकून कित्येक तास भरकटत एका गावात शिरतो. गावातली लोकं त्याची काळजी घेतात. परतताना मॉर्टेन्सन त्यांना, त्याच्या अवाक्याबाहेरचं, वचन देतो, "मी परत येइन आणि तुमच्या गावात एक शाळा बांधेन".
अवक्याबाहेरचं वचन ह्यासाठी की मॉर्टेन्सनकडे त्यावेळी स्वतः राहायला घरही नसतं. अशा उनाड फिरणार्या आणि आपल्या गाडीत झोपणार्या मॉर्टेन्सनला ह्या प्रंसंगामुळे जगायला नवं कारण मिळतं. जवळ असलेलं नसलेलं सगळं विकून आणि नविन देणगीदारांना गाठून शाळेसाठी पैसे जमा करतो. आणि पुन्हा कोर्फेला परतुन तो आपलं वचन पूर्ण करतो. पण त्याचं कार्य इथेच संपत नाही. उलट इथे त्याच्या कार्याची सुरुवात होते. आज जवळ जवळ एक दशकभर चाललेल्या, तालिबान आणि अल्-कायदा सारखी अत्यंत कट्टरपंथियांचं आश्रयस्थान समजला जाणार्या प्रदेशात राहून विशेषतः मुलींसाठी शाळा बांधण्याच्या त्याच्या अथक परिश्रमांची ही गोष्ट आहे.
एकिकडे जग दहशतवाद्यांची पाळंमुळं खोदुन काढण्यासाठी युध्द करत आहे.तर हा जगावेगळा शिपाई गरिबी आणि अडाणिपणा ही, दहशतवादामागील मूळ कारणं दूर करतो आहे. मुलं आणि मुलींना एकाच प्रकारे गैर-उग्रवादी (शब्द सुचवा) (nonextremist) शिक्षण देत आहे.
हे करताना मॉर्टेन्सन यांना स्वतः अपहरण आणि असंख्य हल्ल्यांना तोंड द्यावं लागलं. भडकलेल्या इमाम व मुल्लांनी त्यांच्या विरुद्ध काढलेले फतवे तसंच अमेरिकेविरुद्ध गद्दार ठरवून त्यांना दिलेल्या धमक्या यांची तर गणतीच करायला नको. असं असूनही त्यांनी "सेंट्रल आशिया इन्स्टिट्युटचं" स्वप्न साकार केलं. ह्या अंतर्गत ५५ शाळा ईशान्य पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या दुर्गम आणि गरीब भागात बांधल्या आणि त्या व्यवस्थित चालू राहतील याची व्यवस्था केली. मॉर्टेन्सन यांनी इथल्या हजारो मुला-मुलींना शिक्षणाद्वारे नवी दारं उघडून दिली आहेत. स्वतःच्या अथक परिश्रमांनी आज खरोखरच त्यांनी ह्या मुलांचं जग बदललं आहे.