मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चर्पटपंजरिका स्तोत्राचा भावानुवाद

राघव · · जे न देखे रवी...
काव्यरस
डिस्क्लेमरः आदी शंकराचार्यविरचित चर्पटपंजरिका स्तोत्र खाली लिहिलेले आहे. जालावर बर्‍याच ठिकाणी पाठभेद दिसलेत. शेवटी माझ्याजवळील पुस्तकात होते त्याप्रमाणे लिहिलेले आहे. चु.भु.द्या.घ्या. द्वादशपंजरिका व चर्पटपंजरिका अशी दोन स्तोत्रं आहेत. मी केवळ चर्पटपंजरिका स्तोत्राचाच भावानुवाद करण्याचा प्रयत्न केलाय. हा भावानुवाद आहे, त्यामुळे मूळ गाभा कायम ठेवून अनुवाद करण्याचा प्रयत्न केलाय. जर काही चुका आढळल्यात तर त्या नि:संशय माझ्याच आहेत, त्या दुरुस्त करण्यात जरूर मदत करावी! भावानुवाद करतांना मला अडचणी आल्यात त्यात नानांना(अवलिया) मदत मागीतली तेव्हा त्यांनी लगेच मदत केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. :)
 चर्पटपंजरिका स्तोत्रः

दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिर वसन्तौ पुनरायातौ।
कालः क्रीडति गच्छत्यायुस्तदपि न मुञ्चत्याशावायुः।।

भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते।
प्राप्ते सन्निहते मरणे नहि नहि रक्षति डुकृञ् करणे।।

अग्रे वह्निः पृष्ठे भानू रात्रौ चिबुक समर्पितजानुः।
करतल भिक्षा तरुतलवासः तदपि न मुञ्चत्याशापाशः।।

यावत् वित्तोपार्जनसक्तस्तावन् निजपरिवारे रक्तः।
पश्चाज्जर्जर भूते देहे वार्ता कोऽपि न पृच्छति गेहे।।

जटिलो मुण्डी लुञ्चित केशः काषायाम्बर बहुकृत वेशः।
पशयन्नपि च न पश्यति लोकः उदर निमित्तं बहु कृत वेशः।।

भगवद्गीता किञ्चिद्धीता गंगा जल लव कणिका पीता।
येनाकारि मुरारेरर्चा तस्य यमः किं कुरुते चर्चाम्।।

अंगं गलितं पलितं मुण्डं दशन विहीनं जातं तुण्डम् ।
वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चत्याशापिण्डम्।।

बालस्तावत् क्रीडासक्तस्तरुणस्तावत्तरुणीरक्तः।
वृद्धस्तावच्चिन्तामग्नः पारे ब्रह्मणि कोऽपि न लग्नः।।

पुनरपि रजनी पुनरपि दिवसः पुनरपि पक्षः पुनरपि मासः।
पुनरप्ययनं पुनरपि वर्षम तदपि न मुञ्चत्याशामर्षम्।।

पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम्।
इह संसारे खलु दुस्तारे कृपयाऽपारे पाहि मुरारे।।

वयसि गते कः काम विकारः शुष्के नीरे कः कासारः।
क्षीणे वित्ते कः परिवारः ज्ञाते तत्वे कः संसारः।।

नारीस्तन भर जघन निवेशं मिथ्या माया मोहावेशम्।
एतन्मांस वसादि विकारं मनसि विचारय वारंवारम्।।

कोऽहं कस्त्वं कुत आयातः का मे जननी को मे तातः।
इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारम्।।

गेयं गीता नाम सहस्रं ध्येयं श्रीपति रूपमजस्रम्।
नेयं सज्जन संगे चित्तं देयं दीनजनाय च वित्तम्।।

यावत्पवनो निवसति देहे तावत्पृच्छति कुशलं गेहे ।
गतवति वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन्काये।।

सुखतः क्रियते रामाभोगः पश्चाद्धन्त शरीरे रोगः ।
यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुञ्चति पापाचरणम् ।।

रथ्याकर्पट विरिचित कन्थः पुण्यापुण्य विवर्जित पन्थः।
योगी योगनियोजित चित्तो रमते बालोन्मत्तवदेव।।

कुरुते गंगा सागर गमनं व्रतपरिपालनमथवा दानम्।
ज्ञानविहीने सर्वमतेन मुक्तिर्न भवति जन्म शतेन ।।

 भावानुवादः

दिवस-रात्रीचा खेळ चालतो, शिशिर-वसंती पुन्हा नाहतो,
आयुष्याची सांज उगवते, ईच्छातृप्ती तरीही न होते..

गोविंदाचे भजन करा हो, गोविंदाचे स्मरण करा!
प्रेम रुजावे नामामध्ये.. त्याच्यासाठी ध्यास धरा!

पाठी-पोटी अग्नी पेटे, रात्र कशीतरी ढकलत जाते,
झाडाखाली जगणे हाती, तरिही ईच्छा असते ओठी..

जोवर पैका तुझीया हाती, तोवर सारी नाती-गोती,
"आणिक तुजला काय हवे?"-हे, म्हातार्‍याला कोण विचारे..

जटा वाढवुनी ध्यान धरूनी.. उगाच डोळे मिटून बसशी,
संन्याशाचा वेष अनोखा, पोटासाठी फसवी लोकां..

गीता ज्याने थोडी स्मरली, ज्याने गंगा अल्प प्राशली,
ज्याने स्मरला एक मुरारी, त्यास यमाची चिंता कसली?

आयुष्याच्या सांगाड्याची.. दातांनीही साथ सोडली,
आधाराला काठी आली, तरीही ईच्छा नाही सुटली..

बाल्य उलटले खेळण्यात-तव-यौवन सारे मैथुनात रत
चिंता, चिता ती वृद्धत्त्वाची, ब्रह्मतत्त्व पण कुठे न वेची..

दिवस-रात्र अन पक्ष-महिने, युगचक्राचे फिरते आरे,
वर्षामागुन वर्ष उलटती, तरिही ईच्छा पुन्हा प्रकटती..

पुन्हा पुन्हा हे जगणे-मरणे, आईपोटी पुन्हा निपजणे,
भवसागर हा किती भयकारी, तूच केशवा मजला तारी..

वृद्धा कसली कामवासना? नदीच नसता नाव कशाला?
पैका नसता कुठले नाते? तत्व समजता कसले जग ते..?

कशास फसशी कमनीय देहा..स्तन-नाभीच्या खोट्या मोहा,
मांस-अस्थि हे, नश्वर सारे, स्मरण मनाशी ठेव विचारे..

जन्म दिला तुज खरा कुणी रे, स्वरूप स्वत:चे खरे जाण रे,
मर्त्य जगी या असार सारे, स्वप्नासम तू त्याग जगा रे..

भगवंताची आस असावी, सत्संगाची कास धरावी,
भगवद्गीता नित्य स्मरावी, दीनजनांसी मदत करावी..

देही असतो प्राण जोवरी, घरी तयासी मान तोवरी..
जेव्हा मत्यू ग्रासे शरीरा, पत्नीसुद्धा त्यागे त्याला..

भवरोगाच्या तुच्छ कल्पना..सुखशोधाच्या हीन कामना..
जर्जर देही मृत्यू छाया.. तरीही मोहे कामवासना..

देहभानमुळी नुरे जयांला, पाप-पुण्य हा भेद न त्याला..
बालस्वभावे योगी सारे, आनंदाचे कुंभ निराळे!

तीर्थक्षेत्री भ्रमण करा वा व्रत-अनुष्ठाने-दान करा;
ज्ञानच नसता शतजन्मेही - मुक्ती नाही, गांठ धरा.

शुभम्

वाचने 7684 वाचनखूण प्रतिक्रिया 30

In reply to by यशोधरा

नगरीनिरंजन 14/10/2010 - 12:25
भावानुवाद आवडला आणि स्तोत्रातला विचारही फार आवडला.

In reply to by नगरीनिरंजन

मूकवाचक 18/10/2010 - 19:44
अप्रतिम भावानुवाद!

ज्ञानराम 14/10/2010 - 13:07
उत्तम.... पुन्हा आठवण झाली , या नाशीवंत देहाचि..

ज्ञानराम 14/10/2010 - 13:07
उत्तम.... पुन्हा आठवण झाली , या नाशीवंत देहाचि..

योगप्रभू 14/10/2010 - 13:13
राघवजी, किती सुंदर भावानुवाद केला आहे आपण. पण एकच वाटते, की आदि शंकराचार्यांचे काव्य हे गेय आहे. त्याच धर्तीवर आपल्या भावानुवादातील ओळीही संपूर्णपणे गेय हव्या होत्या. अजुनही शब्दांशी खटपट करणार का? (सूचनेबद्दल राग मानू नका.) १) दिवस-रात्रीचा खेळ चालतो, शिशिर-वसंती पुन्हा नाहतो, आयुष्याची सांज उगवते, ईच्छातृप्ती तरीही न होते.. आता याच ओळी मीटरमध्ये कशा होऊ शकतील बघा. दिन-रात्रीचा खेळ चालतो, शिशिर, वसंती पुन्हा नाहतो आयुष्याची सांज उगवते, देहभोग परी बाकी राहतो २) जोवर पैका तुझीया हाती, तोवर सारी नाती-गोती, "आणिक तुजला काय हवे?"-हे, म्हातार्‍याला कोण विचारे.. जोवर हाती पैका तुझिया, तोवर सारी नाती-गोती आणिक तुजला काय हवे, हे म्हातार्‍याला कोण पुसे? याच पद्धतीने मेकओव्हर करत गेल्यास सुंदर रचना होईल.

In reply to by योगप्रभू

राघव 14/10/2010 - 14:12
तुमचं म्हणणं मला अगदी मान्य आहे. याच कारणास्तव मी दीड महिना हे सुधारत बसलो होतो. पण शेवटी त्या शब्द अन्‌ ज्ञानप्रभू पुढे मान तुकवावीच लागते. मला अजून खूप पुढचा पल्ला गाठायचा आहे हेही कळतं. तुमच्या सूचना आवडल्यात. मी स्वतः या स्तोत्राचे ३-४ वेगवेगळे अनुवाद केलेले आहेत. त्यातल्या त्यात हा बरा वाटला. आणिक गेयता येण्यासाठी जरूर प्रयत्न करेन.

मेघवेडा 14/10/2010 - 13:25
सुरेख स्तोत्राचा तितकाच सुरेख भावानुवाद आवडला. गेयसुद्धा आहे.

नितिन थत्ते 14/10/2010 - 14:31
भावानुवाद आवडला. मात्र या ठिकाणी धनंजय यांनी सांगितलेल्या अर्थापेक्षा "प्राप्ते सन्निहते मरणे नहि नहि रक्षति डुकृञ् करणे।" या ओळीचा अर्थ पूर्णतः वेगळा दिला आहे. "बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले" आणि "लडकपन खेल में खोया, जवानी नींदभर सोया" - अनेक गीतांत वारंवार दिसणार्‍या असल्या भावनेचे मूळही कळले. योगप्रभूंच्या सूचनेपेक्षा मूळ काव्यच मीटरमध्ये अधिक योग्य वाटले.

In reply to by नितिन थत्ते

मात्र या ठिकाणी धनंजय यांनी सांगितलेल्या अर्थापेक्षा "प्राप्ते सन्निहते मरणे नहि नहि रक्षति डुकृञ् करणे।" या ओळीचा अर्थ पूर्णतः वेगळा दिला आहे. ते तर आहेच. मी धरलेला साधारण अर्थ असा - जेव्हा मरण समीप येतं तेव्हा ही घोकंपट्टी कामाची नाही. मी ही खूप प्रयत्न केला जसाच्या तसा अर्थ येथे आणण्याचा पण हवे तसे जमले नाही. त्यात याचा भावार्थ बघीतला तर असे दिसते की घोकंपट्टी व्याकरणाची असू शकते, नामजपाची असू शकते नाही तर उगाच काढलेला एखादा आवाजही असू शकतो. त्यांना असे म्हणायचे असावे की भाव आणल्याशिवाय यासगळ्याला काहीही अर्थ नाही. म्हणून मी अनुवाद करतांना अशा अर्थानं केलाय.

अविनाशकुलकर्णी 14/10/2010 - 14:55
खुप सुंदर..टेकनिकलचा विद्यार्थी असल्याने संस्कृत..नव्हते..आज त्याचे खरे दु।ख्ख झाले..

पाषाणभेद 14/10/2010 - 21:00
राघवजी, तुमची मेहनत फळाला आली. एकदम छान भावानूवाद केला आहे. असेच कार्य करत रहा. एक शंका आहे: 'चर्पटपंजरिका' म्हणजे काय? चर्पट+पंजरीका असे काहीतरी आहे काय? आता 'कालभैरवाष्टक' म्हणजे कालभैरवाचे अष्टक आहे. तसे चर्पटपंजरिका' म्हणजे काय? चर्पट हे कोणत्या देवतेचे नाव आहे काय? थोडेसे गुढ नाव वाटते आहे.

In reply to by पाषाणभेद

तसे म्हटले तर चर्पटपंजरिका हे रूढार्थानं स्तोत्र नाही. स्तोत्रांमधे साधारणपणे देवतेची स्तुती असते. येथे आचार्य एका व्यक्तीला/समाजाला उद्देशून हे म्हणताहेत. चर्पटपंजरिका या शब्दाचा शब्दशः अर्थ मलाही माहित नाही. तरीही साधारण अर्थ - "व्यर्थ बडबड/भावहीन कर्मकांड करत राहणार्‍याला/राहणार्‍यांना उद्देशून केलेले भाष्य" असा होऊ शकेल. संस्कृत जाणकार निश्चित प्रकाश टाकू शकतील. कालभैरवाष्टकाबद्दल काहीच माहित नाही. त्याबद्दल क्षमस्व.

धमाल मुलगा 14/10/2010 - 20:09
राघवा, बर्‍याच काळानंतर चर्पटपंजरिकास्तोत्राची आठवण दिलीस रे. अगदी मुमुक्षु अवस्थेस नेलेस :) अवांतरः शक्य झाल्यास असंच कालभैरवाष्टकाबद्दल लिहिशील का? :)

विसोबा खेचर 14/10/2010 - 20:26
लै भारी रे..! तात्या. -- तात्या-धर्मेन्द्र भेट हा लेख मिपावर लौकरच! :)

धनंजय 14/10/2010 - 22:49
मला बहुतेक कडवी गेय देखील वाटली. तुम्ही वृत्त धरून ठेवण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे. वृत्त साधे आहे - ८ मात्रांचा गण, अशा दोन गणांचा पाद, ४ पादांचे कडवे, ३र्‍या आणि ४थ्या पादाचे यमक जुळवलेले आहे. १ल्या आणि २र्‍या पादांचे यमक वैकल्पिक आहे. ते सर्व तुम्हाला जवळजवळ जमलेलेच आहे. एखादे अक्षर ह्रस्वाऐवजी दीर्घ उच्चारावे, किंवा दीर्घाऐवजी ह्रस्व उच्चारावे, असे वाटत असेल, तर कवितेत शब्द तशा प्रकारे जरूर लिहावा. उत्तमोत्तम कवी असेच करतात. त्यामुळे रसिकाला लय-ठेका पकडणे सोपे जाते. उदाहरणार्थ : दिवस-रात्रिचा | खेळ चालतो, || शिशिर-वसंती | पुन्हा नाहतो, || आयुष्याची | सांज उगवते, || ईच्छातृप्ती | तरिहि न होते.. || मराठीमध्ये "पु"न्हा मधला "पु" निसर्गतः लघु आहे, यावरून तुमच्या कानाला लय उत्तम समजते हे स्पष्ट कळते. त्या अर्थी तुम्ही स्वतःशी कडवे गुणगुणताना अधोरेखित केलेले उच्चार करता, ते उच्चार मराठी भाषेला मानवतात, हे कळतेच आहे. कवितेमध्ये वाचकाच्या सोयीसाठी ह्रस्व-दीर्घ तसे लिहिले तर उत्तम. तुमची रचना वाचताना दिसते, की अशी फेरफार थोडेशीच करावी लागेल. भावानुवादातील भाव मुळात मला जाणवतो त्या भावापेक्षा कमी विरक्त आहे.

In reply to by धनंजय

राघव 15/10/2010 - 00:42
मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद धनंजय. र्‍हस्व-दीर्घाची सूचना एकदम मान्य. लक्षात ठेवेन. भावानुवादातील भाव मुळात मला जाणवतो त्या भावापेक्षा कमी विरक्त आहे. हे तर खरेच आअहे. मलाही भावानुवादातील ओळी किंचित तुटक वाटल्यात, पण शक्य तेवढा प्रयत्न केलाय. अर्थात् सुधारणेस वाव राहतोच. त्यात त्यांची विरक्ती त्यांच्या स्वानुभवातून आलेली आहे. त्यामुळे तसा भाव येण्यासाठी ती विरक्ती अंगागांत भिनायला हवी.. जे नसल्यामुळे आपण तोकडे पडतो. असो.

विकास 15/10/2010 - 01:51
आत्ता वाचले. एकदम प्रसन्न वाटले. मराठीकरणा बद्दल धन्यवाद! आदी शंकराचार्य मला आठवते त्याप्रमाणे, काशीला फिरत असताना एक वृद्ध शिक्षक तावातावाने विद्यार्थ्याकडून व्याकरणाची घोकंपट्टी करून घेत होता. ते पाहून सुचलेले हे काव्य आहे असे ऐकले. मराठीकरणात आलेला आणि राघव यांनी सांगितलेला अर्थ पटतो...

In reply to by विकास

ही ढ विद्यार्थ्याने बनवलेली कथा असावी. वृद्ध झाल्यानंतरही शिक्षण पुरवण्यात रस घेणारे शिक्षक भेटले, की कसे प्रसन्न-भारावल्यासारखे वाटते. कुठला "ढ" विद्यार्थी म्हणेल की शिक्षक "तावातावाने" पाठांतर करायला सांगतो. अरे इथे कोणाच्या वृद्ध आजोबा-आजीनी कधी गोड बोलून तर कधी दटावून तुमच्याकडून पाढे पाठ करून घेतलेले नाहीत काय? ही कथा सांगताना त्या आजोबा-आजींचा अपमान होतो आहे, हे समजून आळवावी. ही अशी अपमानास्पद कथा ऐकून कोणाला प्रसन्न वाटेल? आता वृद्ध लोकांनी कधी काही पाठांतर घेऊच नये, दटावणी करून शिक्षण देऊच नये असे तुमचे गंभीर मत असेल, तर तसा अपमान करणे योग्यच आहे. वृद्ध झाला म्हणून सूट मिळत नाही. पण आधी तुमच्या स्वतःच्या वृद्ध शिक्षकांना मनात आणा. मग गंभीर मत असल्याची खरोखरची ग्वाही द्या. (शंकराचार्यांना "डुकृञ् करणे" हे वाक्य असलेला "धातुपाठ" ग्रंथ अगदी चांगला ठाऊक होता किंवा पाठ होता, त्यांनी त्यातील तपशीलांचा वापरही - ज्ञान म्हणून, शिव्या द्यायला नव्हे - केलेला आहे.)

In reply to by धनंजय

विकास 15/10/2010 - 06:28
ही ढ विद्यार्थ्याने बनवलेली कथा असावी. तो ढ विद्यार्थी मी नक्की नाही! ;) या पुस्तकाचे नाव आणि लेखक (पक्षी: "ढ" विद्यार्थी) : The hymns of Śaṅkara By Śaṅkarācārya, T. M. P. Mahadevan Dr. T.M.P. Mahadevan was born in 1911 and was educated in Madras. An earnest Advaitin by training and temperament, Dr. Mahadevan has since his graduation in philosophy with a brilliant First Class Honors in 1933, been engaged in intensive research and teaching. Several of his works, noted for their width of range and depth of insight, deal with Hindu scriptures and religion in general and Advaita Vedanta in particular. They include The Philosophy of Advaita-with special reference to Bharatitirtha Vidyaranya, Gaudapada - A Study in Early Advaita, Time and Timeless, Outlines of Hinduism, Sambandha-Vartika of Suresvaracarya, The Idea of God in Saiva Siddhanta, Ramana Maharshi and His Philosophy of Existence, Sankaracharya, and The Sage of Kanci, besides contributions to learned symposia published in India and abroad. बाकी माझे काहीच यात ज्ञान अथवा निष्कर्ष नाही जे काही वाचले ते सांगितले होते इतकेच.

In reply to by विकास

वाचलेल्यावर विचारही करावा :-) आणि वरील पानावरती तो वृद्ध तावातावाने शिकवत नव्हता. स्वतः पाठांतर करत होता. ही बाब दयनीय आहे, "took pity on" करण्यालायक आहे असे लेखक म्हणतो. "वृद्धांनी ऐहिक बाबतीत अभ्यास करणे हे कीव करण्यालायक आहे" असे तुमचे मत आहे काय? हे मत असण्यासाठी स्वतःची अभ्यासू वागणूक तपासावी - तुमचे तारुण्य काही दशकांनी सरले, तर ती वृत्ती ताकून द्यायची तुमची मनीषा आहे काय? नसेल तर तुमचा स्व-अभ्यास आहे, आणि क्रियाशील निष्कर्षसुद्धा आहे. श्री. महादेवन यांचे "कीव करण्यालायक" हे मत तरी प्रामाणिक आहे का, याबद्दल शंका वाटते. त्यांनी वय झाल्यावर तत्त्वज्ञानाच्या बारकाव्यांचा अभ्यास सोडून पूर्णवेळ गोविंदाचे भजन सुरू केले, असे त्यांच्या जीवनिकेबद्दल उद्धृत परिच्छेदातून दिसत नाही.

अवलिया 15/10/2010 - 18:01
चांगला अनुवाद केला आहेस राघवा !

चित्रा 16/10/2010 - 02:44
भावानुवाद आवडला.