माणसाला अनेक छंद असतात. कुणाला वाचनाचा, कुणाला लिहिण्याचा, कुणाला झाडे लावण्याचा, कुणाला पशुपक्षी पाळण्याचा. छंदाशिवाय जीव म्हणजे सुकाणूशिवाय होडी होय. मला अनेक छंद आहेत आणि ते मी आजपर्यंत जोपासले आहेत.
मानवी जीवनात अध्यात्माला अनन्यसाधारण महत्व आहे. श्रद्धेविना जीवन रुक्ष आहे. याला कारण म्हणजे लहानपणापासून मी घरातील अध्यात्मिक वातावरणात वाढले. माझ्या वडिलांना अध्यात्माची खूप गोडी होती. "जीवनात कुणाचेही मन विनाकारण दुखवू नये. कुणाचाही द्वेष, मत्सर करून नये. मन शुद्ध असावे. मग त्या मनात ईश्वराचे प्रतिबिंब पडते!" असे ते सांगत. रात्री वडील आम्हाला रामायण व महाभारतातील गोष्टी सांगत.