आमचा रायगडला जाण्याचा बेत रद्द झाला, आणि मी नववर्षाच्या पहिल्या शनिवारी आणि रविवारी एकटा पडलो. सगळे मित्र कुठे कुठे गेलेले होते. त्यामुळे शनिवार फारच कंटाळवाणा गेला. तेंव्हा मी असा विचार केला की किमान रविवार तरी असा काहीच न करता वाया घालवायला नको. मग मी माझ्या पुण्यातल्या मित्रांना SMS केले की सिंहगडावर जायचं का हे विचारायला, कोणीच मला फारशी उत्साहपूर्ण उत्तर दिली नाहीत. मग मी एकट्यानेच कुठेतरी जायचं ठरवलं. बरेच दिवसांपासून हे शंकराचे मंदिर मनात घोळत होते, तर मग विचार केला, की आज तिकडेच जाण्याचा बेत करावा, आणि अस्मादिकांची स्वारी एकटीच निघाली, नीळकंठेश्वराला.