पूर्वी ऑफिसात होत असलेला माझा नित्याचा जनसंपर्क सेवानिवृत्तीनंतर बंद झाला. शेजारी पाजारी, माझ्या घरी मला भेटायला येणारे आणि मी ज्यांना भेटायला जातो असे सगेसोयरे, आप्त वगैरेची वर्दळ किंचितशी वाढली असली तरी त्या सर्वांच्या फाइली आधीपासून उघडलेल्या आहेत. त्यांत क्वचित एकाददुसरी नवी नोंद झाली तर झाली, एरवी त्या नुसत्याच अपडेट होत असतात. लहान मोठ्या कारणाच्या निमित्याने थोडा प्रवास घडला तर दोन चार वेगळी माणसे भेटतात, निदान दृष्टीला तरी पडतात. यामुळे शरीराला आरामशीर वाटत असली आणि खिशाला परवडत असली तरीही स्थानिक प्रवासासाठी सहसा मी टॅक्सी करत नाही. त्यापेक्षा बसमधून धक्के खात जाणेच पसंत करतो.