Skip to main content

लिहायचे आहे, पण कसे?

लिहायचे आहे, पण कसे?

Published on बुधवार, 19/07/2017
थोड्या धाकधुकीनेच हा धागा काढतोय पण माझ्यासारख्या नवख्याला तुमच्यासारख्या दिग्गज लोकांकडून मार्गदर्शन मिळेल हीच अपेक्षा आहे. लहापणापासून मी वाचन भरपूर केलंय, करतोय. पुस्तक, कादंबऱ्या, मोठ्या बहिणीची चार वर्ष पुढची पाठ्यपुस्तक, वानसामानाचे कागद, बाबांच्या ऑफिसातले रद्दीचे पेपर, वाचनालयातील पुस्तक, मासिक काही काही म्हणून सोडलं नाही. काही वर्षांनी आंतरजालीय लिखाण आलं आणि मग वाचनाला सीमाच नाही उरली. त्यातच काही दिवसांनी वाटलं कि लिहून पाहूया. एक दोन लेख लिहून जिलब्या पाडल्या पण मध्येच अखंड असा खंड पडला. आता लिहायची उर्मी परत वर येतेय, म्हटलं जरा शास्त्रशुद्ध काही पायऱ्या असतील तर त्या अभ्यासून लिहावं त्यासाठीच हा प्रपंच. ठळक मुद्दे असे कि - १) लिखाणाचं अस काही शिक्षण आहे का कि उस्फुर्त लिहीत सुटावं :D ,आणि शिक्षण असेल तर कस मिळवावं? २) अनुभवानेच सगळं शिकायचं असेल तर कुणी अनुभव शेअर करेल का? कि कशी तयारी केलीत, काय स्किल्स वाढवलेत? ३) थोडक्यात आपले म्हणणं कस मांडावं (लिखाणात) अँड सो ऑन.. ऍडमिन ना विनंती धागा नियमात नसेल तर माहिती देऊन उडवून लावावा!

याद्या 9500
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

अॅडमिन नव्हे हो . . . . . संपादक आणि मालक म्हणायचं इथे ! लिहायचं म्हणाल तर लिहित सुटा . . . . . आणि एकदा लिहिलं की संपलं . . . धागा प्रकाशित केला की गंगार्पण झाला समजायचं . . . . त्याचं पुढे काहीही होवो . . . आपण वळून बघायचं नाही ! मनापासून शुभेच्छा !!

मोबाईल आणि जनरेशन ग्याप, पहिलं प्रेम, शेतकर्‍यांचे हाल अन आयटी बेहाल, मुंबईची फास्ट लोकल आणि पुण्याची मुळामुठा, इंन्ग्लिशचे नळ आणि मराठीचे छळ हे सोडून काहीही लिहा.

In reply to by चिनार

गब्ब्यासारखा इंटरण्यासनल ब्रॅण्डेड मॉल हाय ना भो तुझ्याकडे. काहून टपर्यापायी जीव लावितो.

In reply to by अभ्या..

टपरीवरच्या चहासमोर मॉलच्या शीशीडीचा चहा झक मारते ना लेका.. मॉलमध्ये चक्कर मारून फुटपाथवरून बनियान घेणारे माणसं आम्ही...

खास कांही नाही.. आपण चार मित्रांच्यात बसून गप्पा मारतो तसे लिहा. साहित्यमूल्य वगैरे फालतू समीक्षकी गोष्टींना फाट्यावर मारा आणि बेसीक शुद्धलेखनाच्या चुका टाळा. अगदी मित्रामित्रांच्यात बसून बोललेले अभ्यासायचे असेल तर गविंचे लिखाण वाचा. त्यातही ब्राऊ सिरीज वाचा.

शास्त्रशुद्ध पायर्‍या वगैरे सोडा हो - जे तुम्हाला वाचावंसं वाटतं ते लिहा. लिहून झालं की दोनतीन जाणत्या लोकांकडून तपासून घ्या (याला "बीटा रीडर्स" म्हणतात). मग प्रकाशित करा आणि मापं म्हणतात तसं गंगार्पण करून मोकळे व्हा. मिपावर चांगल्या लेखनाला नेहेमीच उदंड प्रतिसाद मिळतो.

रद्दीचे पेपर, वाचनालयातील पुस्तक, मासिक काही काही म्हणून सोडलं नाही
सखाराम गटणे आठवला :) (ह.घ्या)

उस्फुर्त लिहीत सुटावं विषय संपला. वाढदिवसाच्या सॉरी, लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!!! -दिलीप बिरुटे

पोहायचे असले तर पाण्यात शिरायलाच लागते, तसे लिहायचे असेल तर लिहायला सुरुवात करावीच लागते. कोणत्याही चौकटीत न अडकता आणि आपल्या शैलीने लिखाण करा. इथे तुम्हाला मिळणार्‍या प्रतिसादांतून मिळणार्‍या, पटणार्‍या आणि शक्य असणार्‍या सल्ल्यांचा विचार करा... पण स्वतःच्या शैलीवर उगाचच स्वतःला न पटणारी बंधने टाकू नका आणि कोणाची कॉपी तर अजिबातच करू नका. हळू हळू लिखाण करणे तुमचे तुम्हालाच आनंदाचे वाटेल, जे सर्वात महत्वाचे आहे... इतर सगळ्यांना ते सगळे लिखाण आवडेलच असे नाही, मुख्य म्हणजे त्याची गरज नाही आणि तसे नामवंत लेखकांच्या बाबतीतही होत नाही. तर, उगाच विचार करण्यात वेळ न घालवता लिहायला सुरुवात करा. हजार किलोमीटरांचा प्रवास पहिले पाऊल टाकल्याशिवाय सुरू होत नाही.

मी जे जे लिहले ते ते मनापासून लिहले, अगदी शुद्ध लेखन इत्यादी फाट्यावर मारून. तेव्हा लिहायला सुरुवात करा बाकी नन्तर पाहू!

वरच्या सर्व प्रतिसादांत सर्व काही आलं. लिखाणासाठी शुभेच्छा.

बिनधास्त लिहीत जा. त्यात विचार करण्यासारखे खरच काही नाही. लिहायला लागलात की तुमचं तुम्हाला सुचेल आणि कळेल की लेखनात तुमची आवड काय आहे. मी सामाजिक, सांसारिक कथा लिहिल्या आहेत. पण माझी लिखाणातली मूळची आवड रहस्य किंवा भय कथा ही आहे; हे लिहायला लागल्यावर समजलं. नियम म्हणाल तर जर कथा लिहीत असाल तर शक्यतोवर मराठीच शब्द वापरा. उदा. गेट नाही फाटक आणि शक्यतोवर आपली कथा किमान 3-4 वेळा स्वतः वाचून मग इतरांना वाचायला द्या. बाकी लेख आणि चर्चात्मक विषय सुचल्याबरोबर लिहिणे आणि लगेच प्रकाशित करणे उत्तम. अर्थात ही सर्व माझी मतं आहेत

बिनधास्त लिहीत जा. त्यात विचार करण्यासारखे खरच काही नाही. लिहायला लागलात की तुमचं तुम्हाला सुचेल आणि कळेल की लेखनात तुमची आवड काय आहे. मी सामाजिक, सांसारिक कथा लिहिल्या आहेत. पण माझी लिखाणातली मूळची आवड रहस्य किंवा भय कथा ही आहे; हे लिहायला लागल्यावर समजलं. नियम म्हणाल तर जर कथा लिहीत असाल तर शक्यतोवर मराठीच शब्द वापरा. उदा. गेट नाही फाटक आणि शक्यतोवर आपली कथा किमान 3-4 वेळा स्वतः वाचून मग इतरांना वाचायला द्या. बाकी लेख आणि चर्चात्मक विषय सुचल्याबरोबर लिहिणे आणि लगेच प्रकाशित करणे उत्तम. अर्थात ही सर्व माझी मतं आहेत

हुरूप वाढलाय नक्कीच! आता मागे हटायचं नाय, लिहितो आणि लवकरच प्रकाशित करतो.

मोदक - पारायणं झालीत गविंच्या वाचनाची. कंजूस, आदूबाळ, मितान, बिरुटे सर, म्हात्रे साहेब, ऋतु हिरवा, दशाननजी, सौन्दर्य - _____/\______ इतके दिवस वाचनमात्र होतो, संवाद सुरु केल्यावर आपलेपणे वाटतोय. नक्कीच लिहितो आता.

अनुप, अंतरनाद दिवाळी अंक 2016 मधला 'साहित्य सर्जनाची सूत्रे' हा दत्ता नायक यांचा लेख जरुर वाचा . फायदा होईल

साहित्य पाडायची जोरात खाज सुटली असेल तर एक करा. साहित्य पाडण्याची एक जागा फिक्स करा. विशिष्ठ जागेवर बसून चिंतन करुन साहित्य पाडणारे अनेक तांब्याधिपती मिपावर आहेत. त्यांचे मार्गदर्शन घ्या. नैसर्गीकरीत्त्या कळ यायची वाट बघा. उगाच साहित्य पाडायचे म्हणून कुंथत बसू नका. असे अनेक कुंथलगिरीकर मिपावर आले आणि गेले. पण त्या सोबत अजून एक लक्षात ठेवायचे म्हणजे आलेली कळ दाबून टाकू नका. उगाच चार चौघांना काय वाटेल म्हणून लाजायचे नाही. ताबडतोब कोठा मोकळा करुन टाकायचा. लाजत बसलात तर मग तुमचा साहित्यिक तुंबारा झालाच म्हणून समजा. अशा तुंबार्‍याचा परीणाम म्हणजे मग कधितरी भयंकर साहित्यिक पोटशूळ उठतो. अशा पोटदूखीमधून मग उगाचच इतरांच्या मोकळे होण्यावर पिंका टाकणे सुरु होते. असल्या पोटदुखीवर इलाज करणारे अनेक तज्ञ डॉक्टर मिपावर उपलब्ध आहेत. त्यांच्या सेवेचा आवश्य लाभ घ्यावा. म्हणजे मग संमं वर ऑपरेशन करायची वेळ येत नाही. तसेच मी टाकतो त्या जिलब्या लाल व दुसर्‍यांच्या पिवळ्या असा अहंगड मनात बाळगू नये. जिलब्या पाडताना प्रत्येकालाच अपरीमित प्रसववेदनांमधून जावे लागते याची जाणीव ठेवावी. दुसर्‍याची एखादी जिलबी गोड लागली तर तसे बिनशर्त सांगायला लाजू नये. दुसरी कडे पाडलेल्या शिळ्या किंवा दुसर्‍याने पाडलेल्या उष्ट्या जिलब्या गोळा करुन इकडे खपवायचा प्रयत्न करु नका. जगभराच्या जिलब्यांची चव माहीत असलेले अनेक दर्दी मिपावर आहेत याची जाणिव ठेवावी. पाडलेली प्रत्येक जिलबी प्रत्येक ग्राहकाला आवडलीच पाहिजे असा आग्रह धरु नका. मिपावर अनेक चितळे बंधु आहेत. त्यांची जिलेबी हातोहात विकली जाते म्हणून आपलीही गेलीच पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नका. आपल्या टपरीवर एक दोन गिर्‍हाइके फिरकली तरी त्यात समाधान माना. चलातर मग उचला तांब्या आणि भरभर जिलब्या पाडायला लागा. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

तसेच मी टाकतो त्या जिलब्या लाल व दुसर्‍यांच्या पिवळ्या असा अहंगड मनात बाळगू नये. जिलब्या पाडताना प्रत्येकालाच अपरीमित प्रसववेदनांमधून जावे लागते याची जाणीव ठेवावी.
अगागागागागागागागा ! माउली दंडवत घ्या !!

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हायला ड्वाले पानावले (खरच हसुन हसुन) :) पैजारबुवा रॉक्स ... वाविप्र मध्ये ठेवण्यासारखे मार्गदर्शन

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

वाचून पोटात गडगड करायला लागलं. लोक जिलब्या टाकतात पण शेवटी नीट धूत नाहीत. (conclude करत नाहीत) यावर पण जरा मार्गदर्शन करा.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बरेच मोकळे झालात पैजारबुवा, जलेबी म्हणता म्हणता गु-लाब जामुन सुध्दा सोडलेत, ते ही नैसर्गीकरीत्त्या, भारीच!

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

कळेनाच काय प्रतिक्रिया देऊ. एका डोळ्यात हसू आणि आसू अशी अवस्था करू ठेवलीये. रच्याकने आमच्या पोस्टने मालकांना मोकळं केलं हि पावती समजतो आणि चपला घालतो पुढच्या प्रवासाच्या. असाच लोभ असावा!

भाऊ कदम ट्रिपल शेजवान राईसची पाकृ सांगतो तशी लिहिण्याची पाकृ सांगू का? =)) पैजारबुवांची पाकृ पुरेशी आहे खरं तर! =))

पुणेरी पाट्या, पुणे वि. मुंबई/नागपूर, लग्नाच्या बाजारात मुला/मुलींच्या अपेक्षा, नोटाबंदी ह्या गोष्टींवर उत्तम प्रतिची दळणे दळून झालीत. त्यामुळे हे विषय टाळलात तर उत्तम.

तुम्ही नवखे आहात. मार्गदर्शन हवे म्हणताय म्हनजे तुम्ही नक्की पुणेकर नाही . लिहायचे असेल तर काही हिट्ट विषय १) पुणे - रस्ते , वाडे , मिसळीची ठिकाणे,गल्ल्या , पाट्या, तर्हेवाईकपणा , किचकटपणा, अपमान करायच्या युक्त्या ( तेच ते. त्रिवार द्विरुक्ती होतेय ) , सकाळ मुपी , लुनावाले ब्रम्हे काहिही लिहा हमक्हास हिट्ट. २) मुंबई - कुठे किती साली पाणे साचले होते , भय्ये , शिवसेना , म न से, मुख्यमंत्री , बी एम सी , डोंबीवली, क्रिकेट हे नेहमीचे यशस्वी ३) महाविद्यालयीन शिक्षण. क्लासेस चे पेव, शाळेय अ‍ॅडमिशन. ४) गणीताचे सर , ** काका , ५) गरम पाण्याचे कुंड.... ५) **** गडाखाली चाखलेली मिसळ ६) उरलेल्या भाताचे काय करावे? ७) **** चे डोके ठिकाणावर आहे का?

लोक "का लिहीता" विचारायच्या ऐवजी "कधी लिहीणार" विचारतील असं लिहा. कधी लिहीणार, अर्थातच नेहमी रतीब घालणार्‍यांना लोक विचारत नाहीत. तुम्ही आता लिहीलंय तेही छान आहे. एकदा पोस्ट केलं की चांगले आणि वाईट दोन्ही प्रतिसाद येणार ही मनाची तयारी ठेवा, मग फार त्रास होत नाही.

एक अनाहूत सल्ला जेंव्हा सुचेल तेंव्हा टंकून ठेवा. दोन दिवसांनी आपलेच लिखाण परत वाचून पहा. त्यात काही दम वाटला तर अजून एक दिवस थांबा आणि परत वाचून पहा शुद्धलेखनापासून इतरही काही चुका आढळतील. त्या दूरूस्त करा आणि मग लेखन मिपावर टाका. लक्षात ठेवा दुसऱ्याच्या लेखनावर प्रतिसाद देणे किंवा पिचक्या टाकणे सोपे असते पण स्वतःचे लेखन कसदार करण्यासाठी बऱ्यापैकी कष्ट लागतात( लागत असावेत). मी काही लेखक नाही फक्त अनुभव लिहितो त्यामुळे स्वानुभव नाही