Skip to main content

दोन उपास कथा

लेखक सतिश गावडे यांनी शनिवार, 01/10/2016 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
एकः कोंढवा बोपदेव सासवड मार्गावरील कानिफनाथ मंदिराच्या प्रांगणातील उपहारगृह. "उपवासाचे काही आहे का?" "बालाजीचे बटाटा वेफर्स आहेत" "एक पाकीट द्या" दोनः पुणे गेस्ट हाऊसमधील रात्रीच्या जेवणाची वेळ. एक वयस्कर जोडपे एका टेबलावर बसलेले. फक्त आजोबा जेवत होते. आजी आजोबांशी बोलत असतानाच आजूबाजूचे निरिक्षण करत होत्या. ते वृद्ध जोडपं हिंदी भाषिक होतं. आजींची नजर भिरभिरत असताना व्हाईट बोर्डवर लिहिलेल्या मेनूवर स्थिरावली. "बेटा इधर आ", आजींनी पोरसवदा वेटरला आवाज दिला. ते पोरगं येऊन त्यांच्या टेबलाच्या बाजूला उभं राहिलं "ये गुलाबजाम स्वीट हैं ना" "हा" "उपवास को चलता हैं क्या" "हा चलता हैं" वेटरचं बोलणं संपते तोच आजोबांनी त्या दोघांच्या संभाषणात व्यत्यय आणला. "नही चलता. मत खा" वेटर खांदा उडवत निघून गेला. आजी बिचार्‍या हिरमुसल्या होऊन आजोबांच्या चेहर्‍याकडे पाहत राहील्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13416
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

;) =))

:P

दर सुट्टीच्या दिवशी ती दुपारचा चहा घेत असताना पारले-जी बिस्कीटे त्यात बुडवून खायचा त्याचा नित्यक्रम. शनिवारी ती चहा घेताना तो म्हणाला, "मम्मा, चहामध्ये बिस्कीट बुड करायचं." ती म्हणाली "आज नाही रे.. आज माझा उपास आहे." (सत्यकथा)

जुनीपुराणी सत्यकथा: एकदा ती रस्त्यावरून काही कामानिमित्त जात असता समोरून एक गजरेवाला येत होता. सुरेख, टपोरे गजरे. गजरे पाहताना आपले केस लांबसडक असते तर त्यांचा आंबाडा बांधून त्यावर एक तरी गजरा माळला असता, असे स्वप्नरंजनही करून झाले तितक्यात. अचानक एका संवादाकडे तिचे लक्ष वेधले गेले. जवळच कोणी बोलत होती. आवाज आला म्हणून पाहिले तर, उल्हसित स्वर आणि आनंदाने फुललेला एक चेहरा. फुलांसारखाच. "अय्या, किती सुरेख आहेत गजरे! कसे दिले रे?" "दोन रुपयाला एक, ताई...." "दोन ला का? थांब हं..." "अहो, बघितलं का? घेऊ का एक गजरा? सुरेख आहेत हो..." चेहऱ्यावर अपेक्षा, उत्सुकता, आनंद.... आणि मग अहो वसकन ओरडले! क्षणात माहौल पालटला. गजरेवाला निघून गेला.. आनंदी चेहरा पूर्ण कोमेजला आणि अहोंच्या मागे त्यांनी फर्मावलं तसं खालमानेनं गजऱ्याशिवाय चालू पडला... एक दोन मिनिटांत हे सगळं घडलं, ते पाहून कानकोंड वाटून घेत ती पुढे आपल्या कामाला निघून गेली पण आजतागायत चेहऱ्यासकट हा प्रसंग विसरलेली नाही.

In reply to by टवाळ कार्टा

टकाबाळा, ह्या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही मध्ये देता यायचे नाही. तेव्हा - जिने पाहिले तिच्यासाठी जुनी कथा. तिने हे पाहून काही वर्षे लोटली.

मुळात उपासाला असलं काहीतरी खावंच का? धन्य ते उपास ज्याना तळलेले वेफर्स, साबुदाणे वगैरे चालतात ते! माझ्या सारख्या अ‍ॅसिडिटी उसळणार्‍या लोकांनी उपासापासून लांब रहावे आणि रोजचे जेवण दोन वेळा नीट जेवावे हेच बरे. दुसर्‍या कथेतले आजोबा आणि यशोधराच्या कथेतला "अहो" यांच्याबद्दल काय बोलणार! काही उपाय नाही.

In reply to by पैसा

उपासकथा आवडल्या. अ‍ॅसिडिटी वाल्यांसाठी अल्कलायझिंग पाणी बनवण्याची सोप्पी पद्धतः . रात्री काचेच्या बरणीत काकडी, लिंबू आणि आल्याचे काप टाकून ठेवायचे, आणि दिवसभर हे पाणी प्यायचे. लिंबू आंबट असले तरी अलकलायझिंग असते. अधिक माहितीसाठी वाचा : http://liveenergized.com/alkaline-diet-resources/enhanced-lemon-water-2…

In reply to by चित्रगुप्त

तर खूप acidic असते म्हणतात पण करून पहिले पाहिजे तुम्ही try केलं आहेत का?

In reply to by सामान्य वाचक

तुम्ही try केलं आहेत का?
होय.जवळजवळ रोजच आम्ही हे पाणी पीतो. एक बाटली पाणी मुलगापण ऑफिसात घेऊन जातो. तसा मला पोटासंबंधी कोणताही त्रास (आता) नाही. पंचवीसाहून जास्त वर्षे असणारी फिस्टुलाची व्याधि (अपचन, पोटात वर्षानुवर्षे साचणारी घाण वगैरेतून उद्भवणारी) आणि मू़ळव्याध अवघ्या पंधरा - वीस दिवसात केवळ रसाहाराने कशी कायमची बरी झाली, हे मी माझ्या खालील धाग्यात सांगितले होते: शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ? http://www.misalpav.com/node/33321

In reply to by चित्रगुप्त

आलं लिंबू आपण कधीही खातोच. आणि काकडी खाऊन थंड वाटते. तेव्हा या सगळ्याचे मिश्रण करून बघायला हवे.

In reply to by चित्रगुप्त

मी विचारच करत होते की अल्कलाईन फुड्स कोणकोणते असतील.. आणि तुम्ही हा चार्ट दिलात! नजर टाकली की सहज लक्षात येतंय, डावी बाजु सगळी हिरव्या भाज्यांनी भरलेली आहे. लक्षात ठेवायला सोप्पं!

नवरात्रीच्या नऊ दिवसात सकाळ दुपार संध्याकाळ उपासाचे काय काय खावे याची यादी व्हाट्सप वर फिरत आहे, विसंगतीचा कळस आहे

In reply to by संदीप डांगे

मागणी आणि पुरवठा हे समीकरण तयार करून आंधळ्या श्रद्धा वापरून त्यातून फायदेशीर नफ्याचे गणित, और क्या!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

उपासाला काय चालतं या प्रश्नाच्या उत्तराभोवती या कथा फिरतात. सोलकढीच्या जाहिरातीत "उपासाला चालते" असं उत्पादकाने स्वता:च घोषित केलेले असते.

In reply to by सतिश गावडे

सॉरी हा धया, मी लिहिलेली कथा उपवासाबद्दल नाही. तू लिहिलेली दुसरी कथा वाचली आणि एकदम आठवली ती लिहिली.

चालायचचं ! म्हातारपण आलं की काही माणसं लहान मुलांसाठी निरागस होतात. आजोबांनी न ओरडता त्यांना प्रेमाने समजावून सांगायला हवे होते. पहिल्या प्रसंगात काय विसंगती आहे हे मात्र कळाले नाही.

In reply to by धर्मराजमुटके

पण कधी कधी वाटते की आजोबांचे देखील फारसे काही चुकले नाहिये. प्रेमाने समजावून सांगण्यात फारच गोल गोल फिरवून बोलावं लागतं आणी एनर्जी खर्च होते. त्यापेक्षा सरळपणे सांगीतलं की दोन शब्दात काम होतं. वयोमानानं नसेल कदाचित आजोबांच्या अंगात तेवढी शक्ती.

लोकहो, हे एक संभाषण कानी पडलं. गिऱ्हाईक : शुद्ध तुपात घोळलेला विवेकवाद आहे का? दुकानदार : हो आहे ना. अनिसछाप आहे. गि. : तो नको. दु. : अहो घ्या की. फर्मास आहे. ऑगस्ट २०१३ पासूनचा मुरवलेला आहे. गि. : तुम्हाला माहित नाही काय? दु. : काय झालं म्हणता? गि. : अहो, ते तूप शुद्ध नव्हतं. उत्पादकांना फुकटची चरबी चढलेली होती. एके दिवशी उतरली. त्या उतरलेल्या चरबीत ते विवेकवाद तळायचे. आणि तुपात घोळलेला म्हणून खपवायचे. शिवाय गेले कित्येक वर्षे उत्पादकांचे आर्थिक व्यवहार संशयास्पद होते. अन्नौषधी विभागाने व्यवहारात गंभीर घोटाळे असल्याचं अहवालात नोंदवलं आहे. दु. : साहेब एक सांगू? त्याचं काये की हा अनिस ब्रांड इतका फेमस आहे की कित्येक लोकं त्याच्यावर जाम जळतात. म्हणून त्यांच्या नावाने उगीच अफवा फैलावल्या जातात. अंधश्रद्धाच त्या! तस्मात आपण तिथे दुर्लक्ष केलेलं बरं, नाहीका. शेवटी विवेक म्हणजे तरी काय हो? खातांना मस्तपैकी मजा आली पाहिजे. बरोबर की नाय? गि. : हेही खरंच की. साली हल्ली तोंडाची चवच गेलीये. अनिस ब्रांडचाच द्या किलोभर बांधून. असो. घरोघरी मातीच्याच चुली. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अंनिसचं सोडा. त्यांचा आणि माझा संबंध फक्त त्यांच्या साधना मिडीया सेंटरमधील पुस्तकं विकत घेण्यापुरता आहे. तुम्ही या क्षेत्रातील तज्ञ आहात तर तुम्हाला माझी एक शंका विचारतो. उपवासाला काय चालतं आणि काय चालतं नाही हे कोण ठरवतं? पाश्चिमात्य मुळ असलेल्या बटाटा भारतीय देवांच्या उपवासाला चालेल हे कुणी सर्टीफाय केले? सोलकढीचे उत्पादक "उपवासाला चालते" हे प्रमाणपत्र कोणत्या संस्थेकडून आणतात. जाता जाता, मी नास्तिक असलो तरी संकष्टीच्या दिवशी हापिसच्या क्यान्टीनला मिळणारी साबुदाणा खिचडी आवर्जून खातो. मस्त लागते. (बहुतेक साबुदाण्याचे मुळ पाश्चिमात्य आहे)

In reply to by सतिश गावडे

कंदमुळं फळे हि उपवासाला असावी अशी जुनी माम्यता, त्या वर्गात बसणारे पाश्चात्य असो वा देशी त्याने फरक पडत नाही

In reply to by संदीप डांगे

मी उपवास करते ते फक्त फळे खाऊन बाकी सगळे सवडशास्त्र असते हो तेल चालत नाही, यावं चालत नाही, त्यांव चालत नाही आणि बाहेरचे चिवडे, वेफर्स, इ इ चालतात

In reply to by सामान्य वाचक

उग्र वास असणारे नको म्हणतात बुआ! जाता जाता आम्ही उपवासाच्या दिवशी फक्त वेज खाऊन उपवास करतो, उदाहरणार्थ पावभाजी खाणे फक्त उपवासाला! ;)

In reply to by सतिश गावडे

सतिश गावडे, मी या क्षेत्रातला तत्ज्ञ आहे असा तुमचा घोर गैरसमज झालेला दिसतोय. तो दूर करू इच्छितो. कारण की मी या क्षेत्रातला तत्ज्ञ नाही! मी कधीही कसलाही उपास करंत नाही. तुम्ही जितक्या आत्मीयतेने साबुदाण्याची खिचडी खाता तितक्याच आवडीने मीही खातो. उपासाला काय चालतं आणि काय नाही याबद्दल मी तुमच्याइतकाच (=पूर्णपणे) अनभिज्ञ आहे. आ.न., -गा.पै. अवांतर : सनातन संस्थेचं नाव काढल्यावर काही लोकांचा जो तिळपापड होतो, तो मला फार खमंग वाटतो. ;-) मात्र याचा उपासाशी काही संबंध असेलसं वाटंत नाही.

In reply to by गामा पैलवान

गापैजी, तुमचे धर्मविषयक प्रतिसाद उद्बोधक आणि वाचनिय असतात. त्यामुळे माझ्या दृष्टीने तुम्ही त्या विषयातील तज्ञ आहात. उपवास हा लोकांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. महिन्यात संकष्टी, एकादशी, शिवरात्र, सोमवार, फुरुवार, शनिवार असे लोकांचे उपास असतात. अगदी बहुतांश लोक ज्या बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी उपास करत नाहीत त्या वारीही काहींचे उपास असतात. त्यामुळे उपवासाला काय खावे याचे काही ठोस असे प्रमाणीकरण असेल आणि तज्ञांना त्याची माहिती असेल असा माझा समज आहे.
अवांतर : सनातन संस्थेचं नाव काढल्यावर काही लोकांचा जो तिळपापड होतो, तो मला फार खमंग वाटतो. ;-) मात्र याचा उपासाशी काही संबंध असेलसं वाटंत नाही.
अगदी हेच तुम्ही वर जो अंनिस बद्दल प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल म्हणता येईल. आणि मी तर अंनिसचे कुठे नावही काढले नव्हते. तुम्ही बळेच तुमच्या मनातील मळमळ काढलीत.

In reply to by सतिश गावडे

>> उपवासाला काय चालतं आणि काय चालतं नाही हे कोण ठरवतं? उपवास करणारे ठरवत असावेत बहुदा. तुम्ही उपवास करता का ? असाल तर तुम्ही ठरवा. नसाल तर काय फरक पडतो ? का ?

In reply to by बांवरे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद बांवरेजी. मी उपवास करत नाही मात्र माझ्या घरातील लोक करतात. शेजारचे करतात. आजूबाजूचे करतात. आणि त्यांना उपवासाला एखादा विशिष्ट पदार्थ चालतो की नाही हा प्रश्न नेहमी पडतो. शेजारी आणि आजूबाजूचे सोडा, पण निदान माझ्या घरातल्यांना तरी मदत करता येईल या हेतूने आपल्यासारख्या तज्ञांचे मत जाणून घेण्यासाठी हा धागा काढला आहे. आपल्या मतानूसार आता माझ्या घरातल्यांनी जर उपवसाला वडापाव किंवा पनीर पहाडी कबाब किंवा आता नवरात्र पिज्झा खायचे ठरवले तरी तरी चालणार आहे.

In reply to by सतिश गावडे

कॅथॉलिक लोक ईस्टरच्या आधी ४० दिवस उपास करतात. ते काय चालते आणि काय नाही हे प्रत्येकजण आपले आपले ठरवतात. माझ्या काही कॅथॉलिक मैत्रिणी, कलिग्ज या दिवसात शाकाहारी बनतात. अर्थात कांदे लसूण वर्ज्य नसते. पण आमचा शिपाई मारियान. त्याला विचारले तुझ्या उपासाला काय चालते? तर म्हणे "चिकन मटण चालत नाही. नुस्ते (मासे) आणि सोरो (दारू) मात्र शिवराक (शाकाहारी)." त्याने अगदी गंभीरपणे सांगितले होते. मी मात्र ऐकून हसून लोळले होते. उपवास चा अर्थ काय? देवाजवळ बसून राहणे. अर्थात जेवण खाणात वेळ फुकट घालवू नये. नैसर्गिक रीत्या जे काय मिळेल तेवढे खावे. पण आपण त्याला एकादशी आणि दुप्पट खाशी पर्यंत नेऊन पोचवले आहे. कॅथॉलिक ख्रिश्चनांचे लेंट आणि मुस्लिमांचे रमझान हे तर अजूनच वेगळे प्रकार.

In reply to by पैसा

उपवास चा अर्थ काय? देवाजवळ बसून राहणे.
ते केवळ बसून राहणे असे नसावे. सर्वसामान्य इच्छा, आकांक्षा ह्यांरुण्न आपले चित्त काढून ते देवापाशी लावावे, त्याच्या सान्निध्यात ठेवावे. नाहीतर बसलेत देवापाशी अणि चित्त देव सोडून इतर सर्व ठिकाणी असे व्हायचे.

पहिल्या कथेशी सहमत. बालाजीचे वेफर्स नाहीतर उपवासाचा फराळी चेवडो(पॅकवर तसेच छापतात) खूप छान लागतो. वरुन लिंबू पिळल्यास अत्युत्तम चव.

In reply to by अभ्या..

इंग्लिशमध्ये "फरारी" असं स्पेलिंग करतात. बोलोन्न्याचा कोणी अँटोनियो पाझेल्ला आणि सौ दानीएल्ला पाझेल्ला दिवसभर फरारीचा चेवडो खाऊन उपास काढतायत हे चित्र समोर आणून लय हसतो.

उपवासाला यज्ञात आहुती म्हणून देता येणारे अन्न, उदा. पशुपक्षी इ. चे मांस वगैरे हे पदार्थ चालतात. खाणार काय उपासवाले? "आमचे येथे उपासाची चिकन बिर्याणी मिळेल."

प्रत्येकाकडं उपासाला चालणारे आणि न चालणारे पदार्थ वेगळाले आहेत. आपण मारे साबूदाण्याच्या खिचडीवर कोथिंबीर घालतो पण काही लोकांकडे तसे चालत नाही. आपण कढीपत्ता त्यावेळी फोडणीत वापरत नाही पण काही लोक्स वापरतात. जे सोसेल ते खावं.

नसताना माणुस चालतो आणि उपास असल्यावर त्याचे तोंड चालते . बोधकथा आवडली. एकादशी दुप्पट खाक्शी प्रेक्षक नाखु

In reply to by नाखु

उपास नसताना माणुस चालतो आणि उपास असल्यावर त्याचे तोंड चालते .
सौ टका खरे. तुमच्या प्रतिसादामुळे उपास का करायचा असतो ते माझे मला कळाले.

बेळगाव कर्नाटककडे पोहे उपीट पण चालत उपासाला. मला उपास असला की मुद्दाम जास्त भूक लागते. मग मी देवाला सगळं चालत असं म्हणून जे असेल ते खाते. दुसऱ्या कथेतल्या आज्जीनी दोन काय चार गुलाबजाम मागवून आजोबांच्या नाकावर टिच्चून खायला हवे होते.

In reply to by रातराणी

दुसऱ्या कथेतल्या आज्जीनी दोन काय चार गुलाबजाम मागवून आजोबांच्या नाकावर टिच्चून खायला हवे होते त्याने काय साधले असते??

In reply to by पैसा

कमाल हाय! =)) उपासाचा पिझ्झा! यजमान कंपनीला सांगतोच अता, की अष्टमी/नौमी ला हा(च्च) चालतो आम्हाला म्हणून! http://www.sherv.net/cm/emo/laughing/yellow-laughing-smiley-emoticon.gif

In reply to by पैसा

या ब्बात! याला म्हणतात देशीकरण. चिनी वस्तू वापरू नका वगैरे उबवलेल्या भानगडींपेक्षा जास्त परिणामकारक.

In reply to by पैसा

सध्या उत्तर भारतात वास्तव्य असल्यामुळे नवरात्रीचे व्रत ऐकून आहे. इथे उपवासाला व्रत म्हणतात. नवरात्रीत येथे वैविध्यपूर्ण पदार्थांची रेलचेल असते. डॉमिनो पूर्णतः शाकाहारी जेवण देतात. हल्दीराम सुद्धा नवरात्रीत स्पेशल थाळी सर्व्ह करतात. मुद्दा एकच .... आपल्या इथे जशी मैलावर भाषा बदलते त्याप्रमाणे रीतीरिवाजात सुद्धा फरक पडतात !!! याला वैविध्य मानावे कि वैगुण्य हे ज्याने त्याने ठरवावे

तमिळ लोक उपवासाला पोळी चालते पण भात नाही कारण भात त्यांच्या दृष्टीने अन्नम. उपासाच्या दिवशी तो टाळतात. आपल्या मानाने उत्तरेत उपास बर्‍यापैकी कडक असतो. फक्त फळे, दूध, चहा असे प्रकार.

सतिश गावडे, तुमच्या इथल्या प्रतिसादाबद्दल आभार. थोडी चर्चा करेन म्हणतो. १.
उपवासाला काय खावे याचे काही ठोस असे प्रमाणीकरण असेल आणि तज्ञांना त्याची माहिती असेल असा माझा समज आहे.
माझीही नेमकी हीच अपेक्षा आहे. माझ्या मते उपवास म्हणजे देवाच्या अनुसंधानात राहणे. त्याकरिता अनुकूल असलेले अन्न खावे अशी कल्पना असावी. निदान प्रतिकूल तरी खाऊ नये. त्यामुळे उपवासास काय खावे यापेक्षा काय खाऊ नये याची अधिक काळजी घेतली जात असावी. पूर्वी जशी याच्यात्याच्या हातचं न खायची पद्धत होती, नेमकी तशीच वर्ज्यावर्ज्य रीत आता खाद्यपदार्थांवर घसरली आहे. हिचं प्रमाणीकरण व्हायलाच हवं याबद्दल दुमत नाही. २.
मी तर अंनिसचे कुठे नावही काढले नव्हते. तुम्ही बळेच तुमच्या मनातील मळमळ काढलीत.
सौ टका सच. संधी मिळताच मी माझ्या मनातली मळमळ ओकून टाकतो. आता एखाद्या तोंडदेखल्या भक्ताची उपसाबद्दल आवडनिवड असते. हे नको ते चालंत नाही असे नखरे असतात. त्यातून विसंगती उत्पन्न होते. तिच्याकडे भक्ताचं लक्षही नसतं. नेमके असेच नखरे स्वत:ला दाभोलकरांचे अनुयायी म्हणवून घेणारे विवेकवादीही करतात. एव्हढाच मथितार्थ. आ.न., -गा.पै.

Upasache kahi prakar: 1. We decide what we are leaving and eat without those items. Those banned items should be from every day list. (eg. This time, I am doing without milk, sugar, wheat, rice and fried stuff) 2. Manache upas: a. tharavun kahi goshti karayachya nahit. b. Parameshwar smaran (he sarv prakarachya upasat antarbhoot asave khare tar) 3. acharache upas: Tharavun ekhadi kriya karane (eg. Konala naave na thevane etc)

In reply to by nanaba

नानबा/नानाबा विचार उत्तम आहेत पण, लिहिल्यास आपलं स्वागतच आहे. मराठी टंकण्यास काही अडचणी असल्यास. आपण गुगल इनपुट टूल चा वापर करू शकता. अधिक अडचण आल्यास http://www.misalpav.com/node/31920 हा धागा पहा.

( नोंद घ्यावी - मी कोठ्याल्याही प्रकारचा उपवास करीत नाही . ) अनेक वर्ष्यापूर्वी विलेपार्ले इथे ( मुंबईत ले छोटे पुणे) मी एक वैचारिक चर्चा एका मराठी उपहारगृहात केली होती - कि जर उपवासाला जर बटाटे आणे जव चालते तर काही प्रकारची वोडका जी बात्तात्यापासून केली जाते ती आणि काही बिअर ज्या जावा पासून केल्या जातात त्या का चालू नहेत ? म्हणजे घन ( solid ) असताना बटाटा चालतो आणि तेच द्रव रुपी वोडका झाले के चालत नाही आसे का? असे केल्यास उपवास अधिकाधिक लोकप्रिय होणार नाहीत काई ? त्यामुळे आपला धर्म हि अधिक समावेशक होऊन वाढायला मदत होईल . ( जसे कि बाबा उद्या जोहन आणि अब्दुल पण उपवासाला यायचे म्हणतात । तसेच ते "प्रसाद" पण स्वताच "घेवून" येत आहेत .. जाणकारांनी आपली मते द्यावीत.

In reply to by हेमन्त वाघे

आज मै व्हिस्की नही, वाईन पीउंगा माया, क्यूंकि आज मेरा उपवास है!

तुम्हाला खरोखरीच उत्तर जाणून घ्यायचे आहे असे समजून मला जेवढे माहिती आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करतो. उपवास म्हणजे भगवंताच्या समीप राहणे हे बर्‍याच ठिकाणी लिहिलेले आहे त्यामुळे ही माहिती काही नवीन नाही. उपवास हा निर्जल करावा असा उल्लेख जुन्या पोथ्या पुराणांमधून येतो. मात्र बरेच जणांना प्रकृती स्वास्थ्यामुळे असे करणे शक्य नसते. उदाहरणार्थ वृद्ध, लहान बालके आणि आजारी व्यक्ती. त्यांना निर्जल उपवास न करता पाणी पिऊन उपवास करावा असे सांगीतले आहे. ज्यांना ते ही शक्य नाहिये त्यांनी फलाहार करावा इतपत मान्यता धर्मग्रंथ देतात. मात्र उपवास म्हणजे खाण्याशी निगडीत आहे एवढाच विचार आपण सर्वजण करतो. उपवासाच्या दिवशी केवळ जिभेला किंवा पोटालाच आराम द्यावा असे नाही तर बाकी इंद्रियांना देखील ताब्यात ठेवावे असा उल्लेख आहे. यात प्रामुख्याने शब्द, स्पर्श, गंध, रस, दर्शन आणि मन यांना नेहमीच्या कामातुन निवृत्त करावे असा विचार देखील आहे. उपवासाच्या दिवशी दिवसा झोपू नये असादेखील नियम आढळतो. तस्मात उपवास करणे हा आपला इंद्रिय निग्रह आणि मनाचा मजबुतपणा तपासून बघण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आणि हे एक खरोखरीच चॅलेंजिंग काम आहे. आपण उपवास तापास करणार्‍यांना सहज हसतो किंवा त्यांची खिल्ली उडवितो. (कदाचित त्यामागील कारणे वेगवेगळी असु शकतात). मात्र वर सांगीतल्याप्रमाणे उपवास करणे खरोखरीच अवघड काम आहे. धर्म काय सांगतो, उपवासाने काय पुण्य मिळते किंवा त्याचे अमुक तमुक वैज्ञानिक फायदे काय आहेत किंवा उपवास केल्याने काय तोटा होतो हे विचार तुर्त बाजुला ठेऊन केवळ एक दिवस निर्जळ उपवासाचे अथवा केवळ पाणी पिऊन उपवास करण्याचे चॅलेंज घेऊन बघावयास काय हरकत आहे ? तुमचा तुमच्या मनावर किती ताबा आहे हे आजमावुन बघण्याचा कोणी प्रयत्न करुन पाहिला तर त्याचासाठी तो नक्कीच एक वेगळा आणि संस्मरणीय अनुभव असेल असे मला वाटते. ---------------------------------------------------- ता. क. : रेवडी उडवायला एवढे उपवास आख्यान पुरे का रे बाबांनो ??

असेच दोन परस्पर विरोधी प्रसंग आठवले . १. एका हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधील एक टेबल - "असं रडु नको..दोन घास खाउन घे. सगळं ठिक होईल ." २. त्याच हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधील काउन्टर - " काय हो .. कसली हि तुमची बिर्याणी ..एकदमच सो सो .काय मजा नाहि आली ."