Skip to main content

ई-उपवास

लेखक रघुनाथ.केरकर यांनी बुधवार, 17/08/2016 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
आपण बर्‍याच प्रकारचे उपवास करतो, कुणी अमुक एक महिन्यात मांसाहार टाळतो, कुणी चपला वापरायचे टाळतो, कुणी एकवेळ जेवतो, कुणी आपल्या मागण्यांसाठी अन्न पाणी त्याग करतो. वैगरे वैगरे, मी सुद्धा दर शनीवारी न चुकता उपवास करायचो. मग पुढे शनीवारी लांबचे प्रवास घडायला लागले तेंव्हा मात्र शनीवारी उपवास करायचे सोडुन दीले. पण शनीवारचा मांसाहार करीत नाही.पण हे झाले ठरवुन केलेले उपवास. कधी कधी न ठरवता देखील उपवास घडतो.मागच्या आठवड्यात असाच उपवास मला घडला. शुक्रवारी सकाळी नेहमी प्रमाणे कामावर जाण्यासाठी बदलापुर स्टेशन गाठलं, स्टेशन वर पोहचुन बघतो तर काय स्टेशन ला तुफ़ान गर्दी, लोक रेल्वे रुळावर उतरले होते. दोन लोकल्स च्या मोटरमन केबीन मध्ये आंदोलन कर्त्यानी ताबा घेउन दोन्ही गाडया मध्येच थांबवुन धरल्या होत्या. बर्राचा वेळ स्टेशन वर घुटमळत राहीलो, गाडया सुटायची काही चिन्हे दीसेनात, एव्हाना २० - २५ जणांना फोन करुन तिथला आंखो देखा हाल सांगीतला. मग १०-१५ फ़ोटु वेगवेगळ्या कोनातुन काढले, आणी पाउणतास टाईमपास करुन घरी परतलो. घरी परतताना मी जरा खुशीतच होतो, त्याची दोन कारणं होती एक म्हणजे भर पगारी रजा, आणी दुसरं म्हणजे चार दीवस आलेला वीकांत. लोकांचा रेल रोको माझ्या पथ्यावर पडला होता. शुक्रवार, शनीवार, रवीवार आणी सोमवार अशी सलग चार दीवसाची रजा मिळणार होती, कोकणात रहाणार्‍या चाकरमान्याना असे प्रसंग म्हणजे "सोनीयाचा दीनु". मी सुद्धा घरी आल्या आल्या जाहिर केलं की मी गावी चाललो. एवढा मोठा विकांत आहे म्हटल्यावर मी गावी जाणरच हे आई ला अभीप्रेत असल्याने तीने फ़ार काही प्रतीक्रिया दील्या नाहीत. बायकोने मात्र प्रश्नांचा भडीमार केला, तीला थोडक्यात समजावुन घरच्यांचा निरोप घेतला.सावंतवाडीपासुन १५ कीमी वर बांदा नावाचे एक गाव आहे, त्यात आरोस बाग नावाची एक लाहानशी वाडी आहे, तीथे माझे दुरचे नातेवाईक रहातात , मला त्यांच्याकडे २ दीवसांसाठी एका कामा नीमीत्त जायचं होतं. ऑफ़ीसचा ल्यापटॉप आणी दोन जोडी कपडे, एवढच सामान घेउन निघालो. बाय रोड थेट पनवेल गाठलं, पनवेल स्टेशन वर चौकशी केली तर कळालं कि १ वाजता कुठली तरी लेट झालेली गणपती स्पेशल येणार आहे. गाडीत बसल्यावर लक्षात आलं की मोबाइल फोन ची ब्याटरी ४५% वर आलिय. आनंदाच्या भरात ब्याग भरताना, पॉवर ब्यांक घ्यायला विसरलो होतो. "हुश्शार फ़ोन" असल्याने ब्याटरी भराभरा उतरते. आणी त्यातच सकाळी रेल रोको दरम्यान केलेली फ़ोटोग्राफी आणी फ़ोनाफ़ोनी यातच ब्याटरी उतरली होती. गाडी "हॉलीडे स्पेशल" गाडी असल्याने जुने डब्बे होते, आणी त्यात सुधा जनरल डब्बा असल्याने त्यात मोबाईल चार्जींग पॉईंट नव्हते, मग सगळ्यात आधी डेटा कनेक्शन बंद केलं, मग स्क्रीन लाईट कमी केला, नेटवर्क CDMA वरुन GSM केलं. रोहा येईस्तोवर ब्याटरी २५ टक्क्यांवर आली. आता मात्र फोन बंद करावा लागला. घरी फोन करुन तसं कळवल आणी फोन बंद केला. दर दोन तासांनी फोन चालु करुन घरच्याना कॉल करत होतो. आणी त्याच मुळे सावंतवाडी येइ स्तोवर मोबाईल ने दम तोडला. ल्यापटॉप वर मोबाईल चार्ज करावा तर ल्यापटॉप सुद्धा थंड पडला होता. गुरुवारी रात्री लेकाने त्यावर उशीरा पर्यन्त कुंफ़ु पांडा पाहीला होता. त्यामुळे ल्यपटॉप ची ब्याटरी कंप्लीट ड्रेन झाली होती. आता नातेवाईकांकडे पोहोचे पर्यंत बिना मोबाइल रहावे लागणार होते, कल्पनाच डेंजर होती. गाडी रात्री साडेनऊ ला सावंतवाडी स्टेशन ला पोहोचली. शेवटची एस टी जाउन अडीच तास झाले होते, रेल्वे स्टेशन वरच्या रिक्षावाल्याना विचारलं की बांदा ,आरोसबाग येणार का? तर कुणीच यायला तयार नव्हते. शेवटी ४०० रुपयाला एक जण तयार झाला. तो देखील बांदयातलाच होता म्हणुन तयार झाला. माझं सुदैव की त्याला माझ्या नातेवाईकंची वाडी माहीत होती. मी रिक्षात बसलो, रिक्षा बांद्याच्या दिशेने निघाली. वाटेत कीर्र काळोख होता आणी एकदम शांतता होती परीसरात फक्त अमच्याच रिक्षाचा आवाज होता. मध्येच एखाद दुसरा ट्रक हॉर्न मारुन निघुन जायचा. रिक्षा बांद्यात पोहोचली आणी डांबरी रस्ता सोडुन आमची रिक्षा कच्च्या रस्त्याला लागली. रस्ता प्रचंड खराब होता, उंटावर बसल्याचा फ़ील येत होता. एवढ्यात नेमका पाउस आला समोरची वीजीबीलीटी अवघ्या ५-७ मिटर वर येउन ठेपली. रिक्षा अगदी संथ गतीने हिंदकळत पुढे जात होती. घड्याळात ११.३० झाले होते. इतक्यात रिक्षावाला रिक्षा थांबवुन म्हणाला "तुमचा घर इला हा." मी बाहेर पाहीलं तर किर्र अंधार, मध्ये मध्ये काजवे पेटत होते. रिक्षावाल्याला विचारलं की कुठे आहे घर. तर त्याने रस्त्याच्या डावी कडे बोट दाखवलं आणी म्हणाला "ह्या काय सामक्या आसा" (हे काय समोरच आहे). इतक्यात एक माणुस रॉकेलचा दीवा घेउन आमच्या दिशेने आला. निटसं दीसत नव्हतं पण डोळे थोडे ताणल्यावर लक्षात आलं की हेच ते नातेवाइक ज्यांच्याकडे मी एवढ्या लांब आलो होतो. रिक्षावाल्याला त्याची बिदागी दीली आणी त्याला मोकळं केलं. रिक्षावाल्याने रिक्षा वळवुन माघारी जाण्यापर्यंतच रिक्शाचा आवज आणी प्रकाश होता, मग मात्र तो सुधा कमी कमी होत गेला. मग मी त्या नातेवाईक काकां बरोबर चालु लागलो. त्यांच्या मागोमाग मी एका पडवी सद्रुश्य खोलीत आलो. त्या पडवी सद्रुश्य घरात काळोख होता, कदाचीत लाइट गेले असावे असं मला वाटलं आतुन त्यांच्या पत्नी बाहेर आल्या, त्यानी अजुन मोठा रॉकेलचा दीवा आणुन एक टेबल सद्रुश्य वस्तुवर ठेवला. आणी त्या दीव्यासमोर मला बसायला एक खुर्ची ठेवली, दोन्ही कडच्या खुशाल्या वीचारुन झाल्यवर मी त्याना लाइट गेले आहेत का वीचारल तर त्या दीव्याच्या उजेडात काकांच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर एक छद्मी स्मित दीसलं, मला पुढे काही जास्त बोलवेना झाल. बाहेर धो धो पाउस कोसळत होता, वातावरणात वेगळाच गारवा होता. त्यात पायाखाली शेणाने सारवलेली जमीन होती. पडवी सोडली तर बाहेर सभोवताली गच्च अन्धार होता, वेगळाच अनुभव होता तो. एवढयात गरमागरम जेवण आलं. जेवण करुन आडवा झालो. पावसाच्या आणी रातकीड्यांच्या आवाजात कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी ७ ला जाग आली, पडवीतुन बाहेर येउन पाहीलं तर पाउस थांबला होता, बाहेर उन पडलं होतं. घरा भोवती गच्च झाडी होती, चुलीवर अंघोळीचं पाणी तापत होतं. चुलीच्या धुराचा वास मला माझ्या बालपणीची आठवण देउन गेला. मग नकळत पाय चुलीकडे वळले, चुलीच्या समोर बरुन मी विस्तवाचा शेक घेउ लागलो. थोड्याच वेळात ब्रश वैगरे करुन चहा नाष्टा झाला. एवढयात घरी फोन करायची आठवण झाली. ब्यागेतुन मोबाइल काढला आणी चार्जींग करायला निघालो. चार्जर हातात घेउन भिंतीवर लाइटीचा बोर्ड शोधायला लागलो. पडवीच्या सगळ्या भींती शोधल्या पण एकही बोर्ड सापडला नाही. साधी वायरींग पण दीसली नाही. काका माझा हा कर्यक्रम टक लाउन बघत होते. माझं त्यांच्याकडे लक्ष जाताच ते हसुन म्हणाले "लायट अजुन येउक नाय आसा. गणपती च्या नंतर येयत असा सरपंच सांगा व्हते." मी एकदम शांत झालो. मोबाइल आणी चार्जर पुन्हा ब्यागेत ठेवला. मला खुप प्रश्न पडले होते. कुठला प्रथम वीचारु हेच कळत नव्हतं. तरी सुद्धा न रहावुन मी बोललोच: मी: लायट केवा पासुन नाय आसा? काका: पैल्या पासुनच नाय आसा. मी : म्हणजे? काका: तरी ६० - ७० वर्षा झाली. मी: तुमी अर्ज करुक नाय काय? काका: गेल्यावर्षी केल्लो. सगळे कागद बनवन घेतले. मगे तो सायब बदाललो आनी ते कागद सुधा तेनी धापो केल्यान मेल्यानं. फुडल्या वाडीताकात लायट इली आसा. सरकारी बाईर सुधा पंपाक लायन इली, आमका देवकच लायट नाय आसा गवरमेंटाकडे.आमका आता सवय झाली आसा पन पावने सोयरे इले की पंचायत जाता. काकांच्या बोलण्यात विषाद जाणवत होता. मी कल्पनाच करु शकत नव्हतो की विजेशीवाय त्या काकांच्या कुटुंबाने इतके दीवस कसे काढले. खुप अस्वस्थ वाटायला लागलं, पुढचे दोन दीवस मी विना मोबाईल, विना ल्यापटॉप काढले. दोन दीवस सतत, प्रत्येक क्षणाला मला सारखा एकच विचार यायचा की विजेशीवाय इतकी वर्ष हे लोक कसे राहीले. ज्या कामा साठी आलो होतो ते काम उरकले आणी तीसरर्‍या दीवशी पुन्हा मुंबई ला जायला निघालो, सावंतवाडीहुन कोकणकन्या पकडली, गाडितच मोबाइल आणी ल्यापटॉपचार्ज करुन घेतला. मागचे दोन दीवस मी अपघाताने का होइना पण. इ-उपवास केला. कुठल्याही प्रकारचं ईलेक्ट्रीक किंवा ईलेक्ट्रोनीक यंत्र मी ह्य दोन दीवसात वापरलं नव्हतं परतीच्या प्रवासात रात्र भर फक्त डोक्यात एकच वीचार होता, काका आणी त्यांच्या कुटुंबाचा उपवास मी कसा सोडवु? ​टीप: पहीलाच प्रयत्न असल्याने शुद्धलेखन व मांडणी मधल्या चुकांकडे दुर्लक्ष करावे.​

वाचने 49142
प्रतिक्रिया 124

प्रतिक्रिया

In reply to by यशोधरा

नाय गो यशो, माका तर माज्या घरातल्या गजालीच वाटल्या. बाकी कुळकायद्यार कोनीतरी लीवूक व्होया.

In reply to by एस

हो की :) त्या मालिकेत इतकं वाईट मालवणी बोलतात, त्यावरुन मीही ज्योकचा एकदमच क्षीण प्रयत्न केला.. :) कोणाही मालवणी भाषिकाला विचाराल तर त्या मालिकेच्या भाषाबेढबपणाला शिरा पडोच म्हणेल!

In reply to by एस

'रात्रीस खेळ चाले' स कोटीकोटी धन्यवाद. या मालिकेमुळे तुमचा संवाद समजला. :=))
अगदी मनातलं बोललात...मी तर प्रत्येक वाक्य माईच्या आवाजात ऐकून समजून घेत होतो..

माझा HONGKONG मधील एक मित्र सांगतो कि मी दिवसातले १२-१४ तास लाप्तोप वर असतो त्यामुळे विकांताला डोळ्यावर ताण नको म्हणून मी कुठेतरी ट्रेकिंग अथवा निसर्गरम्य ठिकाणी जातो, घरचे, नातेवाईक यांचा फोन आला तरच उचलतो. वीजेच म्हणाल तर आपल्या गावी लवकरात लवकर वीज यावी अशी प्रार्थना करतो, कोकणातील माझ्या आजोळीसुद्धा १५-२० वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती होती पण आता विजेमुळे परिस्थिती खूप नाही पण बर्यापैकी सुधारली आहे. लोडशेडिंगची कटकट आहेच पण घरी गेल्यावर charger लावायला मिळतो, गेल्या दोन वर्षांपासून तर जरा नदीकाठी गेल्यावर मोबाईलला उत्तम रेंज मिळते. मोबाईलवर रेंज नसली तरी चालते उगा कटकट होते कधी कधी पण वीज आणि पाणी या दोन गरजा असणे मात्र आवश्यक आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी एक डॅशबोर्ड प्रसिद्ध केला होता त्यात भारतातील दुर्गम भागामध्ये वीज पोहोचवण्याचे काम कसे चालू आहे याची माहिती मिळते, यात मला वाटत फक्त विकानसशील राज्यांचा समावेश आहे , त्यात प्रगत महाराष्ट्राचे नाव दिसत नाही. यात मागे मी संपूर्ण भारताचा नकाशा बघितला होता कि त्यात त्यांनी कुठे कुठे वीज आली आहे, पोहोचणार आहे आणि पोहोचायची आहे हे झूम करून कळायचं तो आता मला सापडत नाहीये.

ते लालफीत वगैरे कायबी नसते.गावातल्या लोकांत एकी पाहिजे.आमदार नेक पाहिजे त्याने हात वर केला तर अर्ध्यातासात एसटी गावात येते आणि कितीही चिंधी रोड असेल आणि कितीही पाऊस पडला तरी फेय्रा बंद होत नाहीत.( पनवेल -धोधाणी बस ,रस्ता).चार महिन्यांत शिमिटचा भक्कम रस्ता आणि नळपाणी येते.( गव्हे रस्ता, दापोली .)सोलर दिवेसुद्धा लावून देतात.(राजमाची , ढाक गाव).उत्तम खेळणी ठेवलेली अंगणवाडी/बालवाडी देतात ( कोंडेश्वर,बदलापूर).उत्तम पॅालिटेक्निक - म्हसळा,आंबेत.

In reply to by हेमन्त वाघे

तुम्ही मनोज भार्गवा ह्या अमेरिकन-भारतीय उद्योगपती च्या Billions in change ह्या प्रोजेक्ट च्या ट्रेलर ची खालील लिंक पहा. तुम्ही सांगितलेला उपायावर ते मोठ्या स्केल वर काम करत आहेत. आणखी माहिती गुगल करू शकता https://m.youtube.com/watch?v=mMfzR9Lu-os http://billionsinchange.com/solutions/free-electric

पहिलाच लेख असूनही सुंदर लिहीलाय.अभिनंदन स्नेहांकिताताईला धन्यवाद तात्काळ प्रतिसादाबद्दल. मिपाचा अभिमान वाटतो तो या साठीच. कितीही दंगा करू दे पण एकमेकांच्या मदतीला तत्पर.

सुरेख लेख...!! धन्यवाद!! स्नेहांकिता तैंचा लगेच आलेला प्रतिसाद बघून थक्क व्हायला झालंय. यातून आता काहीतरी चांगलं निघू दे ही सदिच्छा!!

रघुनाथ दादा लेखन बोर्डवर स्वागत आहे. बाकी इ उपवास कसा वाटला तेही सांगा. तुमचा आणि यशोधरांचा संवाद वाचून त्या गावातलेच दोघं बोलत असावी असे वाटले.

१७ ऑगस्ट्ला हा धागा प्रकाशीत झाला, बर्‍याच लोकांनी लेखन प्रयत्नांचं कौतुक करत परीस्थीती बद्दल हळ्हळ व्यक्त केली, काहीनी पर्याय देखील सुचवले. धागा प्रकाशीत झाल्यापसुन आजमीतीस महिना देखील उलटला नसेल. पण स्नेहांकीता या आमच्या मीपा भगीनीने स्वताच्या प्रयत्नाने मांजरेकर प्रकरणात लक्ष घालुन, घटना स्थळापसुन २०० किलोमिटरहुन लांब असुन सुधा या प्रकरणात लक्षणीय प्रगती घडउन आणली. गेल्या चार वर्षात जी प्रगती झाली नव्हती ती अवघ्या १५ -१६ दिवसात झाली. आता लवकरच मांजरेकर याना वीज कनेक्शन मीळेल असं वाटतय. स्नेहांकीताजींचे खुप खुप आभार. अभीमान वाटतोय की स्नेहांकीताजीं सारखे सदस्य मीपावर आहेत.

In reply to by रघुनाथ.केरकर

अरेवा! अभिनंदन आणि स्नेहांकिताताईंचे अनेक आभार, आम्हाला तुमचा अभिमान आहे ताई! _/\_ हॅट्स ऑफ!

In reply to by प्रचेतस

अरेवा. भारीच की. इधर बटन दबाया, उधर उजेड पड्या.

In reply to by मोदक

फ्लेक्स करेंगे लेकिन लाईट आणे के बाद! दिवे लागलेल्या घराचा फोटो आवश्यक आहे त्याला. दणदणीत फ्लेक्स मारु!

In reply to by रघुनाथ.केरकर

आणि आता गाववाल्यांना सांगा. नुसत्या गजाल्या करन्यापेक्षा आता लाइट इलंय. मिपा मिपा खेळा. फायदा होईल. ;)

In reply to by रघुनाथ.केरकर

स्नेहांकिताला खूप धन्यवाद आणि अभिनंदन!

In reply to by रघुनाथ.केरकर

जवळ जवळ एक वर्षांपूर्वी म्हणजे १६ ऑगस्ट ला मांजरेकरांच्या घरी वीज आली. मी माझ्या वैयक्तिक कामामध्ये असल्याने मला मिपावर हा अपडेट देता आला नाही. या सर्व प्रकरणात आपल्या मिपा भगिनी स्नेहांकिता यांनी खूप मदत केली. मांजरेकरांच्या घरापासून २०० किलोमीटर लांब असून सुद्धा त्यांनी हे सगळं शक्य करून दिला. स्नेहांकिताजी नी जी काही मदत केली त्यासाठी मी स्वता आणि मांजरेकर कुटुंबीय कायम ऋणी राहू. खरंतर ह्या सगळ्या प्रयत्नांचा लेखाजोखा कागदावर उतरून इथे लिहायचा होता. पण वेळे अभावी ते जमलं नाही त्या बद्दल क्षमस्व. तसेच ह्या धाग्यावर ज्या लोकांनी आपली मते मांडली त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. तुमचे सर्वांचे देव बरे करो. रघुनाथ केरकर

श्री मांजरेकर यांना वीज कनेक्शन मिळेपर्यंत त्यांच्या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यास मी बांधील आहे, इतकेच सांगते. __/\__

In reply to by सस्नेह

क्या बात !!! तुझ्या वेळोवेळच्या प्रतिसादा वरुन वीज मंडळ योजना करत असतं, त्यांच्या मनात पण सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे इच्छा असते हे कळतंय. प्रश्न आहे तो जनजागृतीचा. ती ही होईल. हे लवकर बदलेल, असा विश्वास दिल्याबद्दल धन्यवाद. हे खरं सरकारी अधिकार्‍याचं काम ! काऊंटरच्या पलिकडच्या माणसाने नेहमीच जबाबदारीने आणि बांधिलकीने संवाद साधायचा असतो, तो तू करते आहेस त्याबद्दल तुझं मनापासून कौतुक !

जिथल्या चर्चांमधून सभासद देश सुधारणारे भरीव, ठोस कार्य करतात त्या संस्थळावर मी मिपाकर असल्याचा अभिमान वाटतो! थेंबे थेंबे तळे साचे. Let us all keep up the good work! जियो मिपा!

स्नेहाताई तुम्हाला हार्ट फेल्ट सॅल्यूट! खफ वर स्रुजाताईंनी कॉमेंट वाचली तसा धागा उघडला अन ही बातमी मिळाली! मन प्रसन्न झाले, तसेही मी सरकारी लोकांना (वादविवादात) डिफेंड करणारा म्हणून (कु)प्रसिद्ध आहेच म्हणा ;), पण माझा तो आटापिटा बरोबर ठरवल्याबद्दल आपले विशेष वैयक्तिक आभार आमच्या फोर्स मध्ये किंवा आर्मी मध्ये डिफेन्स मध्ये, तुम्हाला मिळणारे "क्लायंट" किंवा तुमचा "वर्कफोर्स" हा एक किमान लेव्हलचा असतो MPSC/UPSC करणाऱ्या लोकांचे तसे नसतात! डायव्हर्स चॅलेंजेस असतात, पूर्ण बुद्धीचा कस लावून परीक्षा पास व्हायची अन ती झाल्यावर ज्याला सेवा द्यायची आहे त्या ग्राहकवर्गातले विपुल डिफरन्सस सुद्धा मॅनेज करायचे हे खायचे काम नव्हे, माझे काही मित्र MPSC मधून तहसीलदार झाले आहेत त्यांचे काम बघितले का हात जोडले जातात आपोआप, गडी अगदी संयमितपणे एखाद्या ग्रामीण माणसाला नरेगा योजना समजावत असतो, कधी डोक्यात बर्फ ठेऊन एका पूर्ण गावाला हागणदारीमुक्तीचे फायदे सांगत असतो, तर कधी तितकाच शांतपणे एखाद्या डोक्याला शॉट आमदाराला सुद्धा कटवत असतो. प्रचंड जास्त डिमांडिंग काम आहे प्रशासनात करायचे ठरवल्यास एखाद्याने. असो, स्नेहाताईंचे कौतुक करता करता विषय थोडा लांबला खरा, पण त्या निमित्ताने एक सकारात्मक सुखद चित्राचा आनंद घेता आला, केरकारानु तुमचे सुद्धा कौतुक, संयतपणे प्रॉब्लेम मांडल्याबद्दल, मांजरेकरांचा आनंद खूप मोठी कमाई असेल तुमची :) . धन्यवाद

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

माझी नाही, स्नेहांकीताजींची, ह्या व्यासपीठाची. मी फक्त नीमीत्त असेन.

छान लेखन. स्नेहांकिता ताईंचे खरेच कौतुक आहे! :)

रघुनाथराव अतिशय उत्तम लिखाण आणि स्नेहांकिता ताईंचे आभार मानावे तेवढे थोडे. यानिमित्ताने थोडी माहिती देतो आहे. हरीष हांडे - आय आय टी खरगपूर, University of Massachusetts Lowell ची डॉक्टरेट - एनर्जी इंजिनिअरिंग मध्ये. गेली अनेक वर्षं social entrepreneur म्हणून कार्यरत आहेत. २०११ चा मॅगसेसे पुरस्कार. असो तर इतका उच्च विद्याविभूषित मनुष्य काम करतो आहे कमी खर्चात आणि सोयीची सौर उर्जा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी. आणि हौस म्हणून नव्हे तर पूर्ण वेळ काम म्हणून - गेली वीस वर्षे ! https://www.youtube.com/watch?v=6xSx_ujm240 सेल्को ही त्यांची कंपनी यासाठी काम करते. बंगलोर मध्ये ही कंपनी आहे आणि मुख्य काम कर्नाटकात असले तरी त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरात मध्येही काम केले आहे. यापूर्वी काही कारणाने संपर्क केला तर उत्तर देतात असा अनुभव आहे. http://www.selco-india.com/technology.html http://www.selco-india.com/enquiries.html इतरांना काही अधिक माहिती असेल तर इथे दिल्यास सर्वांनाचा उपयोग होईल.

In reply to by मैत्र

त्यांच्याकडून घेत असलेल्या सिस्टीम्वर बँकेकडून अर्थ सहाय्याची व्यवस्था आहे काय? तसेच ग्रामीण भागातील शाळेला बस्वायची असल्यास त्यांना काय माहीती द्यावी लागेल?येथील त्यांचा प्रतिनिधी भेटू शकेल काय? सध्या फक्त सोलर हिटर व सोलर कुकर वापरणारा नाखु

चांगले झाले. स्नेहांकिता ताईंचे आभार.

तुमचा रेल्वे प्रवास धाग्यावरचा खुमासदार प्रतिसाद वाचून हा धागा उघडला. मस्त स्टाईल आहे लिहीण्याची. असेच लिहीत राहा. आली का वीज मांजरेकरांकडे ?

In reply to by संजय क्षीरसागर

विज आजुन आली नाही, पण स्नेहांकीता ताइंच्या प्रयत्नाने बरीच प्रगती आहे. थोड्याच दीवसात उपास सुटेल मांजरेकरांचा.

In reply to by रघुनाथ.केरकर

स्नेहाताई, जियो! मांजरेकरांच्या घरी लवकर वीजपुरवठा येवो ही सदिच्छा.

आज ७ वर्ष होऊन गेलीत. मांजरेकरांकडे वीज पुरवठा चालू झालाय. याचं सर्व श्रेय महावितरण चे वरिष्ठ अधिकारी आणि मीपा च्या स्नेहांकिता ताई यांनाच जातं. सायंकाळच्या प्रत्येक दिवेलागणीच्या वेळी स्नेहांकिता ताईंची आठवण काढत असतील मांजरेकर. देव तुम्हा सर्वांचे बरे करो

सगळ्या ऊदात्त भावनांनी चिंब करणारा, आणि माणुसकीवरील विश्वास दृढ करणारा हा अनुभव आहे. स्नेहांकिता ताईंना सलाम.

स्नेहांकिता ताईंना सलाम आणि रघुनाथ.केरकर यांनाही. रघुनाथ.केरकर यांनी मिपावर आपला अनुभव, व्यथा मांडली आणि त्याचे निराकरण झाले. छान!

स्नेहांकिता आणि केरकर खूप चांगलं काम केलंत.