===================================================================
उपनिषदे :
(१)... (२)... (३)... (४)... (५)... (६)... (७) उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?... (८) ईशावास्योपनिषद...
(९) केनोपनिषद... (१०) अविद्या... (११) मुंडकोपनिषद... (१२) प्रश्नोपनिषद-१... (१३) प्रश्नोपनिषद-२...
(१४) कठोपनिषद-१... (१५) कठोपनिषद-२... (१६) ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं...
===================================================================
ईशावास्योपनिषद
ईशावास्योपनिषद हे दशोपनिषदातील सर्वप्रथम असून आद्य शंकराचार्यांचे याच्यावर भाष्य आहे. .हे शुक्ल यजुर्वेदाचे उपनिषद आहे. हे एकमेव उपनिषद संहितेत असून इतर ब्राह्मणे-आरण्यके यांत आहेत. म्हणून हे जास्त पवित्र मानले जाते. बुद्धीवादी, थोर महर्षि योगीराज याज्ञवल्क्य हे कर्ते. शुक्ल यजुर्वेदाचा चाळीसावा अध्याय म्हणजे हे उपनिषद. यज्ञ म्हणजे कर्म आणि उपनिषदे म्हणजे ज्ञान. कर्म श्रेष्ठ की ज्ञान श्रेष्ठ हा वाद निर्माण झाला असता याज्ञवल्क्यांनी या उपनिषदात "ज्ञान-कर्म समुच्चया"चे तत्व प्रतिपादन केले. फार महत्वाचा विचार. उत्तरकालीन वैदिक साहित्यात निर्देशिलेल्या बत्तीस विद्यांमध्ये या उपनिषदातील पहिले सात मंत्र "ईश विद्या" म्हणून ओळखले जातात. यात अठरा मंत्र असून हे संपूर्ण पद्य उपनिषद आहे .कालखंडाप्रमाणे प्राचीन दुसर्या खंडात मोडते. खरे म्हणजे बृहदारण्यक या प्राचीनतम उपनिषदाचे आणि याचे कर्ते एकच असल्याने पहिल्या खंडातच टाकले पाहिजे. आता उपनिषदाकडे वळू. शान्तिमंत्र आहे ॐ पूर्णमद: पूर्णमिदम् पूर्णात्पूर्णमुदच्यते !! पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते !! अर्थ: हे ब्रह्म पूर्ण आहे. (त्यातून निर्माण झालेले) हे विश्व पूर्ण आहे. पूर्णातून पूर्णच निर्माण होते. पूर्णातून पूर्ण वजा केले तरी पूर्णच राहणार. पूर्ण ब्रह्मातून पूर्ण विश्व वजा केले, काढून टाकले तरी पूर्णच शिल्लक राहणार. इथे विश्वाला ब्रह्मासारखेच "पूर्ण" म्हटले आहे. "जगन्मिथ्या " असे नाही. शांकरमताच्या विरुद्ध असे मत इथे स्पष्टपणे मांडले आहे. माऊलीसुद्धा जगाला ब्रह्माचा "विलास" मानते. मिथ्या नाही. पहिला मंत्र आहे ईशावास्यमिद सर्वम् यत्किं च जगत्यां जगत् !! तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृध: कस्यस्विद्धनम् !! (१) पहिल्या दोन शब्दांवरून उपनिषदाला हे नाव दिले. सर्व जग ईश्वरमय आहे.त्याचा त्यागपूर्वक उपभोग घ्या. थोडासुद्धा अपहार करू नका. इथे उपभोग घेण्यास विरोध नाही. फक्त त्यात गुंतू नका; त्यागाचीही भावना मनात पाहिजे असे सांगितले आहे. नीतीचा उपदेश लक्षात घेण्यासारखा आहे. परत एकदा जगाला ईश्वरमय म्हटले आहे. दुसर्या श्लोकात कर्मप्रशंसा, तिसर्यात अज्ञाननिंदा आणि चथा-पाचवा यात आत्मस्वरूप वर्णन केले आहे, वस्तु सर्वाणि भुतानि आत्मन्नेवानुपश्यति !! सर्वभूतेषु चात्मानम् ततो न विजुगुप्सते !! (६) "ज्ञाता"बद्दल म्हटले आहे : जो ज्ञाता सर्व जग स्वत:मध्ये बघतो; तसेच सर्व जगात आपल्याला पाहतो, तो कशाचाच तिरस्कार करत नाही. माझ्यातील आत्मा आणि सर्वभूतांतला आत्मा एकच असे समजल्यावर तिरस्कार कुणाचा करणार ? संत म्हणतात "जे जे भूत भेटते, त्याच्यात भगवंत दिसतो". हा एकात्मतेचा साक्षात्कार आहे. आता "आत्म्या"चे वर्णन बघा. सपर्यगाच्छुक्रमकायमव्रणम् ! अस्नअविर शुद्धमपापविद्धम् !! कविर्मनीषे परिभू: स्वयंभू: ! याथातथ्यतोsर्थान् व्यदधाच्छाश्वतीभ्य: समाभ्य: !! (८) आत्मा सर्वव्यापी, शुद्ध, शरीररहित, अखंड, स्नायूरहित, निर्मल, पापरहित, द्रष्टा, सर्वज्ञ, सर्वश्रेठ आणि स्वयंभू आहे. त्याने जगाला यथार्थ ज्ञान दिले. इथे दिलेली आत्म्याची विशेषणे नंतर सर्वांनी वापरली. महत्वाचे आत्मा जगाला "यतार्थ ज्ञान" देतो इथे आहे. उपनिषदे म्हणजे ऋषींचे उत्स्फुर्त उद्गार असे म्हटले जाते तेव्हा ही उत्स्फुर्तता म्हणजे आत्म्याने दिलेले यतार्थ ज्ञानच होय. पुढील सहा मंत्रात कर्म व ज्ञान यांचा समन्वय ग्रथित केला आहे. अन्धं तम: प्रविशन्ति येsविद्यामुपासते ! ततो भूव इव ते तमो च्च उ विद्याया:रता: !! (९) ज्ञान म्हणजे विद्या व कर्म म्हणजे अविद्या. केवळ अविद्या उपयोगी नाही हे कळू शकते पण केवळ विद्यासुद्धा उपयोगाची नाही जे कर्मच करत राहतात ते अज्ञानात प्रवेश करतात व विद्या म्हणजे ज्ञानच संपादन करतात तेही अज्ञानातच प्रवेश करतात अन्यदेवाहुर्विद्यया अन्यदाहुरविद्यया ! इति शुश्रुम धीराणाम् ये नस्तद्विचचक्षिरे !! (१०) केवळ कर्म किंवा केवळ ज्ञान याच्यापेक्षा प्राप्तव्य वेगळेच आहे हे प्राप्तव्य ज्ञान व कर्म या दोहोंच्या समुच्चायाने साधते विद्यांचाविद्यां च यस्यद्वेद्वोभयं सह ! अविद्यया मृत्युंतीर्त्वा विद्ययाsमृतमश्नुते !! (११) जो ज्ञान व कर्म हे दोन्ही एकत्र जाणतो, तो कर्माने मृत्यू टाळतो व ज्ञानाने अमर होतो अन्धं तम: प्रविश्यन्ति येsसंभूतिमुपासते ! ततो भूय इव ते तमो य् उ संभूत्यां रता: !! जे केवळ अव्यक्त प्रकृतीची उपासना करतात ते अंधारात प्रवेशमान होतात. त्याचप्रमाणे जे कारणरूप ब्रह्माची उपासना करतात ते सुद्धा अंधारातच प्रवेश करतात.(१२) जरा अध्यात्म सोडून जगरीतीकडे बघा. लोकांचे कल्याण हे प्राप्तव्य. शिकले-सवरलेले विद्वान राजकारणात प्रवेश न करता, लोकांत न मिसळता, हे करावयास पाहिजे ते करावयास पाहिजे असे नुसते बडबडत राहतात. काम काहीच करत नाहीत ,हे झाले "ज्ञान". प्राप्तव्य दूरच राहते. गुंड राजकारणात धुडगुस घालतात. काही कामे करतात, हे झाले कर्म. पण लोककल्याण दूरच राहते. आणखी असे पहा, ज्ञानेश्वर-तुकाराम यांना या जगात काही, मिळवावयाचे नव्हते. इच्छाही नव्हती. मग ते अज्ञानी लोकांच्या कल्याणाकरिता आयुष्यभर का झटत राहिले ? हे कर्म त्यांनी स्वेच्छेने स्विकारले. त्यांनी ज्ञान आणि कर्म यांचा समुच्चय आचरणात आणून लोकांसमोर आदर्श ठेवला. मंत्र १४ ते १८ मध्ये मृत्युसमयीची प्रार्थना आहे. त्यातील दोन उल्लेखनीय गोष्टी (१) "हे सूर्या, तुझे जे ब्रह्मस्वरूप आहे, तो मी आहे." इथे मी(=माझ्या शरीरातील आत्मा) हा ब्रह्मस्वरूप आहे याची जाण आहे (२) "माझे शरीर जळून भस्म होवो" इथे प्रेतदहनाची चाल रूढ झाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र संन्याशाचे प्रेत पुरण्याची चाल होती. . इशावास्योपनिषदाचे थोडक्यात तत्वज्ञान (१) ऐहिक सुखांचा त्याग ही मिथ्या कल्पना. हा त्याग संन्याशाश्रमात करावा. (२) सुखाचा उपभोग हा कोणताही अपहार न करता, त्यागाची भावना जागृत ठेवून घ्यावयाचा. (३) असे कर्म करत १०० वर्षे जगा. (4) ज्ञाता जग स्वतामध्ये पाहतो, सर्व जगाला आपल्यात बघतो, कोणाचा तिरस्कार करत नाही (5) फक्त कर्म करणारे आणि केवळ ज्ञान मिळवणारे दोघेही अंधारात, अज्ञानातच प्रवेश करतात (6 ) जो व्यक्त आणि अव्यक्त दोन्ही एकाच वेळी जाणतो तो मृत्यू टाळून अमरत्व मिळवतो (7) मी ब्रह्मस्वरूप आहे.. (8) .हे अग्ने, कर्मफळ भोगण्यासाठी मला चांगल्या मार्गाने ने, माझे पाप नष्ट कर. मित्र हो, (१) एखाद्या उपनिषदाचा परिचय करून देतांना, एकसंधता राखण्यासाठी, मागील लेखांतील काही भाग परत येईल .द्विरुक्ती अटळ आहे. (२) काही वाचकांच्या सागण्यावरून संस्कृत श्लोक दिले आहेत. पण खरच त्यांची गरज आहे का ? शरद .
वाचने
9244
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख. आवडले.
छान लेख. द्विरुक्ती चालेल.
उत्तम ओळख.
संस्कृत श्लोकांबरोबर मराठी
संस्कृत श्लोक
In reply to संस्कृत श्लोकांबरोबर मराठी by धनंजय माने
काका, आपल्याला सोयिस्कर असं
In reply to संस्कृत श्लोक by शरद
@उपनिषदे म्हणजे ऋषींचे
सुरेख !!
सुंदर...
शरदसाहेब,
आदरणीय शरद सर !
शांतिमंंत्र
In reply to आदरणीय शरद सर ! by प्रसाद गोडबोले
उत्तम विवेचन. पण त्रोटक वाटले
ऊपनिषदे
शरदराव, वेद आणि उपनिषदांमधील
हम्म,
In reply to शरदराव, वेद आणि उपनिषदांमधील by सतिश गावडे
आम्हाला सायबेरियातसुद्धा ओम
In reply to शरदराव, वेद आणि उपनिषदांमधील by सतिश गावडे