मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विश्वाचे आर्त - भाग ६ - जंबोजेट दृष्टान्त

राजेश घासकडवी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
भाग १ - काळाचा आवाका भाग २ - नासदीय सूक्त भाग ३ - अस्तिस्तोत्र भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी अगदी कट्टर नास्तिक सोडले तर बहुतेक लोक कुठच्या ना कुठच्या उच्च शक्तीचे अस्तित्व मानतात. या शक्तीचे आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्त्व आहे हे प्रत्येकजण आपापल्या अनुभवांवरून ठरवतो. मात्र अशा शक्तीवर विश्वास ठेवण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे या जगात दिसणारा अद्भुत निसर्गाचा विस्तार. हे सगळे कुठून आले? कोणी तयार केले? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी 'ज्या कोणी तयार केले ती सर्वोच्च शक्ती' असा विश्वास दृढ होतो. या विश्वासातून ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. यांना 'रचना-दृष्टांत' किंवा इंग्रजीमध्ये 'आर्ग्युमेंट फ्रॉम डिझाइन' असे म्हणतात. त्यांचा प्रातिनिधिक म्हणून मी खालील उतारा वापरलेला आहे. १८०२ साली विलियम पेलीने हे लिहिले. मी त्याचा सर्वसाधारण गोषवारा - स्वैर अनुवाद लिहिला आहे. (कंस माझे आहेत). "समजा तुम्ही रस्त्याने चालत असताना तुम्हाला एखादा दगड दिसला आणि तुम्ही विचार केला की हा इथे कसा काय आला? तर तुम्ही म्हणू शकता की हा कायमच इथे असला पाहिजे. (दगड कसा "झाला" हा प्रश्न काही तितकासा विचार करण्याजोगा नाही.) पण समजा, तुम्हाला एखादे घड्याळ पडलेले दिसले तर त्याविषयी तुम्हाला "ते कायमच इथे असले पाहिजे" असे साधे उत्तर देता येणार नाही.... त्या घड्याळाचा सूक्ष्म अभ्यास केल्यावर तुम्हाला असा निष्कर्ष काढावा लागेल की भूतकाळात कधीतरी एका किंवा अनेक अभियंत्यांनी किंवा कुशल कारागिरांनी त्याचा आराखडा आखला असला पाहिजे, त्याची रचना केली असली पाहिजे. (कारण सामान्य नैसर्गिक प्रक्रियांतून घड्याळासारख्या क्लिष्ट रचनाप्रधान गोष्टी तयार होत नाहीत हे उघडच आहे.) .... आता तुम्ही प्राण्यांकडे किंवा एकंदरीतच सृष्टीकडे पहा. जिथे पाहाल तिथे घड्याळा इतक्याच किंबहुना त्यापेक्षाही अधिक जटील वस्तू, रचना दिसतील. मानवी डोळ्याचंच उदाहरण घ्या (डोळ्याच्या क्लिष्टतेच अत्यंत खोलात वर्णन करून मग तो पुढे म्हणतो..) डोळा हा घड्याळापेक्षा किती तरी अधिक सुरचित आहे. वनस्पती, पक्षी, प्राणी यांच्याकडे बघितले तर जागोजाग ही रचना दिसून येते. मग आता तुम्ही मला सांगा, की इतक्या सुंदर रचना बघितल्यावर त्यामागे कोणी रचनाकार नाही यावर कसा विश्वास बसेल? (प्राणी कसे "झाले" हा महत्त्वाचा, विचाराण्याजोगा प्रश्न आहे, आणि त्याचे एकच उत्तर संभवत - ते म्हणजे एका सर्वोच्च शक्तीने - ईश्वराने ते निर्माण केले. याचा अर्थ प्राण्यांचे अस्तित्व हाच ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा आहे.)" पण मूळ प्रश्न बाजूलाच राहिला. वरवर पटणारा पेलीचा सिद्धांत/दृष्टांत कितपत खरा आहे? पेलीच्या भाष्यात दोन उघड उघड चुका दिसतात. एक - त्या मानाने छोटी चूक - मी कंसात मांडलेली आहे. "कारण सामान्य नैसर्गिक प्रक्रियांतून घड्याळासारख्या क्लिष्ट रचनाप्रधान गोष्टी तयार होत नाहीत हे उघडच आहे."... हे गृहीतक वापरून, आपल्याला पेली ते रचित आहे हे पटवतो. मग तो निसर्गाकडे बघतो आणि त्याला घड्याळापेक्षा सुरचित गोष्टी दिसतात. जर निसर्गात घड्याळापेक्षा जटील वस्तु दिसू शकतात, आणि त्या आपोआप तयार होऊ शकतात असे गृहीत धरले तर घड्याळाविषयी काहीच विशेष वाटण्याची गरज नाही. पण पेली सफाईदारपणे आपल्या मनातील पाने, डोळे (नैसर्गिक) व घड्याळ (मानवनिर्मित - कृत्रिम) या दोन कल्पनांमधले अंतर वापरतो आणि एखाद्या जादुगाराप्रमाणे दोन्हींना सारख्याच पातळीवर (सुरचित - रचनाकाराची गरज असलेले) नेउन ठेवतो. ही चलाखी फारच तरल, वाखाणण्याजोगी आहे. पण पेलीच्या प्रश्नाकडे पाठ फिरवूनही चालत नाही. "हे सगळे कसे काय तयार झाले?" जोपर्यंत वैज्ञानिक उत्तर सापडत नाही तोपर्यंत पेलीचे उत्तर कितीही चूक वाटले तरीही त्याच्या अनुत्तराशिवाय आपल्याकडे अधिक चांगला पर्याय नाही. आणि मेख अशी आहे की सजीव सृष्टीतल्या प्रत्येक कोड्याचे उत्तर सुटले पाहिजे. पक्षी का उडतात? (त्यांना पंख आहेत म्हणून नव्हे - त्यांना उडण्याची क्षमता का असते हा प्रश्न आहे) जिराफाची(च) मान लांब का? डोळे कसे निर्माण झाले? (ते कोणी केले असल्यास मुळात तो कर्ता कसा निर्माण झाला?) माणसाच्या मना मनाचे पोत जाऊ द्या, त्याचे हात, पाय, जगण्याची इच्छा कुठून आली? माणूस म्हातारा का होतो? माणूस मरतो का? आई मुलावर प्रेम का करते? कोंबडी आधी की अंडे आधी? बोला, आहेत उत्तरे? हजारो वर्ष तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंतांनी डोकी खाजवली, चर्चा केल्या. पण बराच काळ त्यांच्या हाताला रिकाम्या शब्दच्छलाशिवाय काही लागले नाही. इकडे पेली आनंदात होता, कारण त्याच्या सुंदर चपखल अनुत्तरापुढे कुठचच उत्तर टिकाव धरणार नाही याची त्याला खात्री होती. प्रश्न इतका कठीण होता की सगळ्यांना हात झटकून झक मारत मर्ढेकरांनी म्हटल्याप्रमाणे 'हासडल्या तुज शिव्या तरीही तुझ्याच पायी आलो लोळत' म्हणत यावे लागणार याबद्दल शंका नव्हती. या प्रश्नाला पेलीच्या उत्तरा इतकंच असंभव असलेले दुसरे उत्तर देता येते. ते उत्तर असे "कोणताही प्राणी हा अणु-रेणू पासून बनलेला असतो. पृथ्वीवर हवे तितके रेणू आहेत. ते पाण्यात, वार्‍यामुळे, एकंदरीत ऊर्जेमुळे एकमेकांवर आपटतात - एकमेकांशी जोडले जातात. असेच जर खूप रेणू अचानक विविक्षित आकारात जोडले गेले की कदाचित माणूस तयार होण्याची शक्यता आहे. आणि एकदा एक पुरुष आणि एक स्त्री तयार झाली की पुढचा सोपे आहे." ही अर्थातच इतकी हास्यास्पद कल्पना आहे की याला जम्बो जेट दृष्टांत असे नाव आहे. माणूस सोडून द्या, आपण जर एखाद्या जम्बो जेट चे स्पेअर पार्ट मोठ्ठ्या पाखडायच्या यंत्रात घातले, भरपूर उर्जा दिली आणि वाट पाहत बसलो, की कधी तरी त्यातून आख्खे जम्बो जेट बाहेर येईल... त्याची शक्यता काय याचाअंदाज बांधता येतो... त्याला इतका वेळ लागेल की आख्या विश्वाचा कालावधी निमिषार्धाप्रमाणे वाटेल. आणि मनुष्य तर विमानाच्या कित्येक पतीने क्लिष्ट असतो. त्यात शिवाय आणखीन एक स्त्री तयार करायची. ती सुद्धा तो पुरुष मारायच्या आत... त्यापेक्षा पेलीचा जादूगार परवडला. मुळात जम्बो जेट तरी कसे तयार झाले? आपल्याला विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला हे माहीत असते. पण त्यांनी तरी शून्यापासून थोडंच बनवले? विमानाची कल्पना लेओनारदो दा विन्ची पर्यंत जाते. पण त्याही आधी बलून होते, पतंग होते, आणि उडण्याची "प्रेरणा" नसलेल्या, किंवा त्या इच्छेने न बनवलेले कागदाचे कपटे, पाने हवेवर लाखो वर्षांपासून गिरक्या घेताहेत. हवेवर तरंगणाऱ्या वस्तु ते आधुनिक जम्बो जेट पर्यंत कल्पना/रचना - अवकाशात रेष काढली तर त्यावर मधल्या मधल्या टप्प्यांवर त्या त्या काळाच्या तंत्रज्ञानाला शक्य असे अनेक विमानाचे "पूर्वज" सापडतात. किंबहुना विमानांच (किंवा "उडणार्‍या/तरंगणाऱ्या वस्तूंचे - पक्षी वगळता") नीट वर्गीकरण केले तर त्यांच्यात हवेपेक्षा जड व हवेपेक्षा हलके अशा दोन उघड शाखा तयार झालेल्या दिसतील. "हवेपेक्षा हलके किंवा आपल्या आपण तरंगणारे" या गटामध्ये साबणाचे फुगे, पाने, कागदाचे कपटे, सुंदरीचे भुरभुरणारे उत्तरीय, छत्र्या, पॅराशूट, हात-ग्लायडर, ग्लायडर, बलून, मोठे बलून ते हिंडेनबर्ग पर्यंत वाटचाल दिसेल. इथे या चढत्या क्रमात 'उडणं' या प्रक्रियेची देखील हळूहळू वाटचाल होताना दिसते. भरकटणे, एका जागी भुरभुरत राहणे, संथपणे खाली येणे, तरंगत थोडे पुढे जाणे, तरंगत बरेच पुढे जाणे पण वार्‍यावर अवलंबून असणे, आणि खऱ्या अर्थाने तरंगत पाहिजे तिथे जाता येणं] हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे - कारण रचनेची वाढ होते त्याबरोबर विशिष्ट क्षमतेतही बदल होत जातो. शब्दांना जीव प्राप्त होतो. ही मांडणी करण्यामागे उद्देश काय? तो असा - जम्बो जेट किंवा हिंडेनबर्ग शून्यापासून तयार करणे यासाठी रचना अवकाशात प्रचंड मोठी उडी घ्यावी लागते. अशा उड्या मारणे अशक्यप्राय असते. म्हणजे मोहेंजोदारो संस्कृतीतल्या अग्रेसर अभियंत्याला अणुबॉम्ब बनवायला सांगण्यासारखे. पण त्यालादेखील काही वस्तू तरंगतात, हे माहीत असते (उदा सुंदरीचे भुरभुरणारे उत्तरीय). आपल्याला काही पुरावा सापडलेला नाही, पण जर असे सिद्ध झाले की त्या काळात पतंग अस्तित्वात होते तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही. तरंगणाऱ्या वस्तूंपासून पतंगा पर्यंत फार मोठी उडी नाही. जर रचनाहीनतेपासून ते अत्यंत क्लिष्ट रचनेपर्यंत छोट्या छोट्या पायर्‍यांचा प्रवास आखता आला तर तो शक्य आहे. आणि जर या पायर्या अगदी बारीक केल्या तर तो जिना न राहता वरती जाणारा हलका चढ होईल. मग त्यावरून प्रवास करणे सहज शक्य आहे. गरज आहे ती पाठून लावण्याच्या बलाची. आणि पुरेशा काळाची. पण चार अब्ज वर्षे म्हणजे काही कमी काळ नाही. पेलीच्या प्रश्नाला उत्क्रांतीवादाचे उत्तर काहीसे असे आहे. 'अब्जावधी वर्षांपूर्वी काही रेणूंना पुनरुत्पादनाची शक्ती प्राप्त झाली. हे रेणू आणि त्यांच्यामुळे घडणाऱ्या त्यांच्या आसपासच्या रचना क्लिष्ट होत होत त्यांचे एकपेशीय जीव तयार झाले. पुनरुत्पादन होताना काही वेळा 'चुका' होत असत. बहुतांश चुका तोट्याच्या असल्याने तो जीव मरत असे, पण काही वेळा त्या बदलांमुळे तयार होणारा जीव हा तत्कालीन परिस्थितीत टिकण्यासाठी अधिक सक्षम असे. असे जीव लोकसंख्येत अर्थात वाढत जात. ही प्रक्रिया अजूनही चालू आहे. पिढ्यानपिढ्या ही प्रक्रिया चालली की आपल्याला अधिकाधिक क्लिष्ट रचना घडताना दिसतात. पिढ्यांमागून पिढ्या गेल्या की असे 'सुधारणात्मक बदल' गोळा होतात. आणि मग लाखो पिढ्यांनंतर तरंगणे ते स्वबळावर उडणे सारखे क्रांतीकारी बदल घडताना दिसतात.' थोडक्यात, पेलीच्या युक्तिवादात जम्बोजेट दृष्टांत अंतर्भूत आहे. शून्यापासून ते तयार डोळ्यापर्यंत एका फटक्यात पोचण्याबद्दल तक्रार आहे. ती तक्रार रास्त असली तरी हा प्रवास टप्प्याटप्प्याने करता येतो. त्यामुळे तो डोळा कोणी बनवण्याची गरज पडत नाही. (मी मराठी लाइव्हमध्ये पूर्वप्रकाशित)

वाचने 16041 वाचनखूण प्रतिक्रिया 45

एस Wed, 12/16/2015 - 18:02
शून्यापासून ते तयार डोळ्यापर्यंत एका फटक्यात पोचण्याबद्दल तक्रार आहे. ती तक्रार रास्त असली तरी हा प्रवास टप्प्याटप्प्याने करता येतो.
ह्या प्रवासाचा मानवी आयुष्याच्या तुलनेत महादीर्घ कालावधी सामान्यांना पटत नाही. त्यातूनच ह्या प्रवासाची शक्यता नाकारली जाते व इंटेलिजंट डिझाईन सारख्या कल्पना पुढे येतात.

राजेश घासकडवी Wed, 12/16/2015 - 18:55
भाग १ - काळाचा आवाका http://www.misalpav.com/node/33974 भाग २ - नासदीय सूक्त http://www.misalpav.com/node/33987 भाग ३ - अस्तिस्तोत्र http://www.misalpav.com/node/34009 भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर http://www.misalpav.com/node/34037 भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी http://www.misalpav.com/node/34072 या भागाच्या सुरूवातीला हे दुवे द्यायचे राहिले, म्हणून इथे देतो आहे. संपादकांना विनंती आहे की हे पाच दुवे लेखात वर चिकटवावे.

सतिश गावडे Wed, 12/16/2015 - 19:10
डॉकिन्सच्या "ब्लाइन्ड वॉचमेकर" या पुस्तकाचे नांव पेलीच्या या उतार्‍यावरूनच आले असावे काय? बाकी लेखाच्या पहिल्याच वाक्यातील उल्लेखाने उर अभिमानाने भरून आला. ;)

In reply to by सतिश गावडे

राजेश घासकडवी Wed, 12/16/2015 - 19:19
होय. वाचून बरीच वर्षं झालेली आहेत, पण मला वाटतं त्याने पहिल्या प्रकरणात पेलीचा लेख जवळपास संपूर्णपणे मांडलेला आहे आणि त्यावर टिप्पणी केलेल्या आहेत. निसर्गाच्या विस्मयकारी आविष्कारांतून चकित होणं, त्यांचं सौंदर्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणं याच्याशी तोही आपलं नातं जुळवू शकतो. मात्र हे कसं झालं याचं उत्तर द्यायची वेळ आली की त्यांचे मार्ग बदलतात. आर्ग्युमेंट फ्रॉम डिझाइन - हे कुठल्यातरी अंतिम, निर्मिक शक्तीवर विश्वास ठेवण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. त्या शक्तीशी जोडले जाणारे इतर गुण या निर्मितीक्षमतेतून येतात. म्हणूनच धर्मसत्तेचा उत्क्रांती शिकवण्याला विरोध आहे.

In reply to by सतिश गावडे

राजेश घासकडवी Wed, 12/16/2015 - 19:23
ब्लाइंड वॉचमेकरच्या विकीपीडिया पानावर हे सापडलं. In his choice of the title for this book, Dawkins refers to the watchmaker analogy made famous by William Paley in his book Natural Theology.[1] Paley, arguing more than fifty years before Charles Darwin published On the Origin of Species, held that the complexity of living organisms was evidence of the existence of a divine creator by drawing a parallel with the way in which the existence of a watch compels belief in an intelligent watchmaker.
बाकी लेखाच्या पहिल्याच वाक्यातील उल्लेखाने उर अभिमानाने भरून आला. ;)
हा भाग कळला नाही.

In reply to by राजेश घासकडवी

सतिश गावडे Wed, 12/16/2015 - 19:37
ते असंच गंमतीत लिहिलं होतं. मी ही दोन वर्षांपूर्वी "गॉड डिल्युजन", "सेल्फिश जिन्स" आणि "ब्लाइंड वॉचमेकर" ओळीने वाचले होते. मात्र आता विशेष आठवत नाही. अर्थात एकदा विषयाचा गाभा कळल्यानंतर त्याची आवश्यकताही वाटत नाही. ही पुस्तके वाचण्याची प्रेरणा तुमच्याच एका लेखातून मिळाली होती. :)

साती Wed, 12/16/2015 - 23:24
असाच एक किस्सा न्यूटनच्या नावावर खपविण्यात येतो. ख खो न्यू जा. कुणीतरी म्हणे ग्रहगोल आपोआप तयार झाले, तर न्यूटनने म्हणे त्यांना एक प्लॅनेटरी सिस्टीमचे मॉडेल दाखवून सांगितले की जर साधं मॉडेल कुणीतरी बनविक्याशिवाय बनत नाही तर ग्रहगोल आपोआप कसे बनतील?

अर्धवटराव Wed, 12/16/2015 - 23:52
अब्जावधी वर्षांपूर्वी काही रेणूंना पुनरुत्पादनाची शक्ती प्राप्त झाली
भौतिकी नियमांतर्गत कार्य करणार्‍या अणुंच्या संयोगाला पुनरुत्पादन शक्ती 'प्राप्त' झाली (आणि फ्री विल सुद्धा??) हा सिद्धांत पेलीच्या सिद्धांतासारखाच पोकळ वाटत नाहि का?

In reply to by अर्धवटराव

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/17/2015 - 00:10
सुगमशास्त्रिय लेखनातही शास्त्रार्थ बिघडणार नाही इतपत मूलभूत नियम पाळावेच लागतात. लेखन जर शास्त्र बाजूला ठेवून ललित-/काव्य-प्रतिभेच्या आहारी गेले तर ते लेखन शास्त्रिय राहत नाही. मात्र, ललित / कविता लेखनात अमर्याद सूट (poetic license) असते, असे म्हणतात ;) :)

आरोह गुरुवार, 12/17/2015 - 00:11
. 'अब्जावधी वर्षांपूर्वी काही रेणूंना पुनरुत्पादनाची शक्ती प्राप्त झाली". घसकवडी साहेब ...तुमचे ह्यावर काय मत आहे?? ह्या लेख मालेचा हेतू नक्की काय आहे...काही ठोस भाष्य हि लेख माला करणार कि हा hard problem hard च राहणार?

राजेश घासकडवी गुरुवार, 12/17/2015 - 01:36
अब्जावधी वर्षांपूर्वी काही रेणूंना पुनरुत्पादनाची शक्ती प्राप्त झाली
या वाक्याबद्दल अनेकांनी आक्षेप घेतलेला आहे, म्हणून थोडं स्पष्टीकरण. पुनरुत्पादन हा शब्द आपण सजीवांशी आणि फक्त सजीवांशीच जोडतो त्यामुळे या वाक्यातून 'रेणूंना सजीवत्व प्राप्त झालं' असा अर्थ काढला जाऊ शकतो. तो अर्थ इथे निश्चितच अभिप्रेत नाही. पण पुनरुत्पादन म्हणजे नक्की काय? तर अनुकुल परिस्थितीत बाहेरचे घटक घेऊन त्यांपासून आपल्यासारखीच प्रतिकृती बनवणं. पुनरुत्पादन हा शब्द खास सजीवांसाठी राखीव असल्यामुळे सजीव व निर्जीव या दोहोंसाठी लागू पडेल असा स्वजनन हा शब्द जास्त योग्य आहे. त्याची चर्चा पुढच्या एकदोन लेखांत येणार असल्यामुळे या लेखात तो शब्द वापरला नाही. या लेखात पेलीचा प्रश्न - 'आपोआप क्लिष्टता किंवा कॉंप्लेक्सिटी निर्माण कशी होऊ शकेल?' त्याला उत्तर म्हणजे 'प्रतिकृती तयार करण्याची क्षमता काही रेणूंत होती. त्या प्रतिकृती करण्याच्या प्रक्रियेतून क्लिष्टता वाढत गेली, त्या रेणूंभोवती कवच निर्माण होऊन पेशी तयार झाल्या. त्या पेशी एकत्र राहायला लागून अनेकपेशीय जीव तयार झाले. आणि मग त्या पेशीसमुहांच्या भागांना विशिष्ट गुणधर्म प्राप्त होऊन त्यांपासून अवयव तयार झाले. अशी क्लिष्टता हळूहूळू वाढत गेली - त्या अब्जावधी वर्षाच्या वाढीचा परिणाम आपण आत्ता पाहात आहोत.' शून्य क्लिष्टता ते मनुष्याच्या शरीराइतकी क्लिष्टता अशी एक उडी नाही. तो अब्जावधी वर्षांचा बारीकबारीक सुधारणांचा प्रवास आहे. आणि या प्रवासात प्रतिकृती तयार करण्याची प्रक्रिया ही सर्वात महत्त्वाची आहे.

In reply to by राजेश घासकडवी

अर्धवटराव गुरुवार, 12/17/2015 - 03:30
याचाच अर्थ प्रतिक्रुती तयार करण्यची क्षमता असणे हे सजीव शरीर निर्मीतीची बेसीक गरज आहे असं म्हणावं लागेल. आणि एका विशिष्ट क्षमतेनुसार असं वर्गीकरण हाच पेलीच्या सिद्धांताचा पाया आहे. असो. पुढील भागात अधिक स्पष्टीकरण होईल अशी आशा आहे.

In reply to by अर्धवटराव

राजेश घासकडवी गुरुवार, 12/17/2015 - 07:24
याचाच अर्थ प्रतिक्रुती तयार करण्यची क्षमता असणे हे सजीव शरीर निर्मीतीची बेसीक गरज आहे असं म्हणावं लागेल.
सजीवांची व्याख्या करताना आपण अनेक वेगवेगळे निकष लावतो. उदाहरणार्थ १. श्वसन २. हालचाल ३. भक्षण ४. अवयव असणं ५. वाढ होणं ६. पुनरुत्पादन करणं पैकी पहिले पाच निकष वेगवेगळ्या प्रमाणात लागू पडणाऱ्या किंवा लागू न पडणाऱ्या प्रजाती सापडतात. झाडं हालचाल करत नाहीत, बॅक्टेरियांना अवयव नसतात. पण पुनरुत्पादन न करणाऱ्या प्रजाती सापडतच नाहीत. पुनरुत्पादन करणं हे सजीवांंचं एकमेव व्यवच्छेदक लक्षण आहे असं म्हणता येईल. बाकीचं सगळं आहे ते त्यासाठी पूरक.

In reply to by राजेश घासकडवी

आदिजोशी गुरुवार, 12/17/2015 - 19:17
माणूस हा त्याचा एखादा कार्यभाग साधण्यासाठी हालचाल करतो. चेंडू पकडण्यासाठी रांगणे असो की ऑफिसला जाणे असतो. तसंच, झाडांच्या बाबतीतही सूर्यप्रकाशाच्या दिशेने फांद्या वाढणे, पाणी शोधायला मुळं खोलवर जमिनीत जाणे, असले प्रकार होतच असतात. प्राण्यांइतक्या वेगाने न होता अत्यंत हळू क्रिया असली तरी ती होत असते. मुळं पाण्याच्या मागे खोल जमीनीत जातात आणि माणूस किचनमधे. माझा ह्या विषयावरचा अभ्यास शून्य आहे. वर लिहिलेलं मला वाटतं ते बरोबर की चूक ते कळावं म्हणून हा प्रतिसाद.

In reply to by राजेश घासकडवी

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/17/2015 - 12:59
"रेणूंची प्रतिकृती करण्याची क्षमता" या शब्दप्रयोगात क्रिया करणे (अ‍ॅक्टीव्ह पार्टिसिपेशन) हा अर्थ अध्याहृत होतो. त्या ऐवजी "रेणूंचा प्रतिकृती तयार होण्याचा गुणधर्म" हा शब्दप्रयोग जास्त योग्य होईल. कारण रेणू स्वतःहून कधीच काही करत नाहीत, तर केवळ भौतीक-रासायनिक नियमांप्रमाणे त्यांच्या क्रिया घडतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

राजेश घासकडवी गुरुवार, 12/17/2015 - 18:02
अगदी बरोबर. भाषेमध्ये कर्तरी प्रयोगाला प्राधान्य असतं. कर्मणि प्रयोगातली वाक्यं काहीशी अनैसर्गिक आणि कंटाळवाणी होतात. त्यामुळे प्रत्येक वेळी तसा वाक्प्रयोग करणं कटकटीचं होतं, आणि वाचायला कंटाळवाणं होतं. म्हणून अधूनमधून 'करतात असं म्हटलेलं असलं तरी ते उद्देशपूर्ण करत नाहीत, जे होतं ते आपोआप होतं' अशी आठवण करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. किंबहुना आपल्या आसपास जी सृष्टी दिसते तिलाही आपण 'हा पसारा कोणी निर्माण केला' हाच प्रश्न विचारतो, 'हे सगळं तयार कसं झालं' असं विचारत नाही. या भाषेच्या कर्तरीप्रधानतेमुळेच यामागे कोणीतरी कर्ता आहे ही भावना सहज मनाला पटते. उलट हे आपोआप, निसर्गनियमाने तयार झालं यावर विश्वास बसायला वेळ लागतो.

In reply to by राजेश घासकडवी

विवेक ठाकूर गुरुवार, 12/17/2015 - 18:17
जे होतं ते आपोआप होतं हाच निष्कर्ष आहे ना शेवटी ? मग यालाच तर सोप्या भाषेत दैव किंवा देव असं म्हणतात ! इतक्या साध्या गोष्टीसाठी विनाकारण इतके सिद्धांत कशाला हवेत?

In reply to by विवेक ठाकूर

राजेश घासकडवी गुरुवार, 12/17/2015 - 18:34
अहो हे सगळे सिद्धांत सांगण्याचा उद्देश लोकांना उत्क्रांतीची प्रक्रिया कळावी हा नाहीच्चे. मला आणि मिपाकरांना तुमचे अनमोल प्रतिसाद वाचण्याची संक्षी आपलं, संधी मिळावी म्हणूनच मी हे सगळं लिहितो आहे. (ह. घ्या. - हे लिहावं लागतं आजकाल, नाहीतर कोणीतरी पुन्हा हा प्रतिसाद क्वोट करेल!)

In reply to by राजेश घासकडवी

विवेक ठाकूर गुरुवार, 12/17/2015 - 20:01
हे सगळे सिद्धांत सांगण्याचा उद्देश लोकांना उत्क्रांतीची प्रक्रिया कळावी हा नाहीच्चे. ठीकाये. पण शेवटी उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा निष्कर्ष हाच असेल : जे होतं ते आपोआप होतं तर मग संक्षी, आपलं संधी कशाला पाहिजे ? लेखमालेतून भारंभार माहिती मिळेल पण उत्तर मिळणार नाही हे सुरुवातीलाच सांगितलं होतं.

In reply to by विवेक ठाकूर

राजेश घासकडवी Fri, 12/18/2015 - 18:35
लेखमालेतून भारंभार माहिती मिळेल पण उत्तर मिळणार नाही हे सुरुवातीलाच सांगितलं होतं.
लेखमालेतून काहीही हाती लागणार नाही याची खात्री असूनही तुम्ही ज्या चिकाटीने प्रत्येक लेख वाचता, आणि प्रत्येक लेखावर ज्या कळकळीने सांगत राहाता त्या चिकाटी आणि कळकळीचं मला मनापासून कौतुक वाटतं. कदाचित तुम्ही लादेन ध्यानप्रकार करून हे गुणधर्म मिळवले असावेत. अशा डेडिकेटेड चाहत्यांची मला गरजच आहे.

In reply to by राजेश घासकडवी

विवेक ठाकूर Fri, 12/18/2015 - 19:19
इतका साधा तर्क कुणीही करू शकेल, त्यासाठी ध्यानाची आवश्यकता नाही. उत्तर नसेल तर मात्र उगीच इकडचे तिकडचे धागे दाखवून, काही तरी बचाव करावा लागतो.

In reply to by गवि

विवेक ठाकूर Fri, 12/18/2015 - 12:18
ती तर उत्पत्तीच्या आधीची स्थिती आहे आणि प्रक्रिया तिचा वेध घेऊ शकत नाही. अर्थात, लेखमालेचं नांव `विश्वाची उत्पत्ती ' वगैरे असलं तरी लेखकाला अवकाश (ज्यात सगळं घडतंय) तेच मान्य नाही. त्यामुळे `का' ? विचारण्यात अर्थ नाही. `कसं' वरची कसरतच झेपत नाहीये तिथे `का?' ची काय कथा !

कवितानागेश गुरुवार, 12/17/2015 - 02:58
प्रतिकृति तयार करताना क्लिष्टता वाढायचे कारण काय असू शकेल? स्वतः ची प्रतिकृति तयार करणारे रेणू प्रयोगशाळेत बनवण्यात शास्त्रदन्यांना यश आले आहे असे फार पूर्वी वाचले होते. तेंव्हादेखिल प्रश्न पडला होता की काही काळानी हे रेणू उत्क्रांत होतील का? आणि मुळात उत्क्रांत का होतात? रेणूना स्वतः ची प्रतिकृति तयार करता येतेच् आहे. मग अजून काय हवय? बदल कशासाठी घडवून आणला? किंवा कशामुळे घडला?

In reply to by कवितानागेश

राजेश घासकडवी गुरुवार, 12/17/2015 - 07:41
प्रतिकृती करताना क्लिष्टता कशी निर्माण होते हा नैसर्गिक निवडीच्या गाभ्याचा प्रश्न आहे. त्यासंबंधी चर्चा पुढच्या लेखांमध्ये येईलच, पण थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा एक रेणू आपल्या प्रतिकृती तयार करतो, आणि काही कारणाने त्याच्या प्रतिकृती त्यापासून विलग होतात तेव्हा दोन रेणू प्रतिकृती तयार करायला लागतात. असे एकाचे दोन, दोनाचे चार करत अगदी थोड्या वेळातच महाप्रचंड संख्येत प्रतिकृती तयार होतात, आणि घटक रेणू संपून जातात. मग मूळ रेणू मोडून पडण्याचा दर आणि नवीन प्रतिकृती तयार होण्याचा दर यात एक इक्विलिब्रियम येतो. इथपर्यंत सगळं ठीक आहे. एवढंच झालं तर क्लिष्टता वाढण्याचा प्रश्न येत नाही. मात्र प्रतिकृती तयार करण्याची प्रक्रिया ही अचूक नसते. त्यामुळे काही रेणू असे तयार होतात जे मूळ स्वजनकाच्या हुबेहुब प्रतिकृती नसतात. आता यापैकी बहुतेक स्वजनक नसतात. त्यामुळे ते कधीतरी मोडून पडतात, आणि नष्ट होतात. पण काही असे असतात, जे स्वतःही स्वजनक असतात. आता असा नवीन तयार झालेला रेणू आधीच्या रेणूपेक्षा अधिक कार्यक्षम असेल (जास्त वेगाने प्रतिकृती करणं, जास्त काळ टिकून राहातील अशा प्रतिकृती करणं इत्यादी) तर मूळ स्वजनक रेणू आणि नवा रेणू यांच्यात स्पर्धा सुरू होते. ही काही ठरवून केलेली स्पर्धा नसते, पण परिणामतः पहिला रेणू हळूहळू नष्ट होतो (आपल्या घटक रेणूंमध्ये मोडून पडतो) आणि दुसरा रेणू जास्त जास्त दिसून येतो. एक काळ असा येतो की दुसऱ्या रेणूचंच राज्य दिसून येतं. असं बराच काळ झाल्यानंतर पॉप्युलेशनमध्ये दोनतीन वेगवेगळ्या रेणूंचं राज्य असू शकतं. त्यातल्या एखाद्या रेणूंत बदल होऊन असाही रेणू तयार होईल ज्याच्या रासायनिक अभिक्रियांचे बायप्रॉडक्ट्स हे पॉप्युलेशनमधल्या एखाद्या प्रजातीसाठी घातक असतील. त्यांचे जर तुकडे पडणार असतील तर हे पहिल्या रेणूसाठी 'खाद्य' झालं, कारण ते तुकडे वापरून हा भक्षक रेणू आपल्या अधिक प्रतिकृती बनवेल. पहिल्या, भक्ष्य रेणूंपैकी तेच टिकून राहातील ज्यांच्याभोवती कवचसदृश काही ना काही संरक्षण असेल. हे कवच जितकं प्रभावी तितकी त्यांची टिकण्याची शक्यता जास्त. असं करत करत शेवटी व्यवस्थित कवच असलेले रेणू शिल्लक राहातात. या आपल्या अगदी प्राथमिक पेशी. मग पुढे होणारी स्पर्धा त्या रेणूंमध्ये या कवचाच्या आतलं पर्यावरण अनुकूल करत, बाहेरून घटक रेणू (खाद्य) घेणाऱ्या पेशींमध्ये होते. इथे आपण क्लिष्टतेची पहिली पायरी ओलांडली आहे. रेणूंपासून पेशींपर्यंत. एकंदरीतच नैसर्गिक निवड म्हणजे काय, तिने स्पर्धा कशी होते, आणि गुणधर्म 'सुधारतात' कसे, याबद्दल आपण पुढच्या काही लेखात पाहूच.

विवेक ठाकूर गुरुवार, 12/17/2015 - 11:12
हे सामान्यातल्या सामान्य विचार करणार्‍याला सुद्धा मान्य होईल. त्यासाठी दुसरं वाक्यसुद्धा लिहीण्याची गरज नाही. पण ..... डोळा कोणी बनवण्याची गरज पडत नाही एवढी एकच गोष्ट सांगण्यासाठी आख्खी लेखमाला चालू आहे ! त्यात आता हे जंबोजेट प्रकरण अब्जावधी वर्षांपूर्वी काही रेणूंना पुनरुत्पादनाची शक्ती प्राप्त झाली कशामुळे ? विचारलं की `धीर धरा ते पुढे येईल' म्हणून तेच दळण. फक्त नव्या दळणासाठी नवे गहू !

In reply to by sagarpdy

sagarpdy गुरुवार, 12/17/2015 - 11:38
थेअरिच मूळ अस आहे कि पुनरुत्पादन होणारे रेणू (उदा. RNA) हा तसा लांबचा पल्ला आहे. त्या आधीची पुनरुत्पादनाची पायरी म्हणजे एक रेणुसमूह दुसऱ्या रेणुसमूहास जन्म देतो व दुसरा रेणुसमूह पहिल्यास (अर्थात येथे २ पेक्षा अधिक रेणुसमूह असणार हेवेनसां) आज जे कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन चक्रे आपण जीवशास्त्रात शिकतो त्याचं मूळ या थेअरित आहे. या थेअरिलच गुरुजींनी सांगितलेली पुनरुत्पादानातील चुका (error ) ची जोड दिली कि नवीन रेणुसमूहाच्या निर्मिती ची मीमांसा मांडता येते. असाच एखादा रेनुसमुह पुनरुत्पादनक्षम असून जीवसृष्टीच्या निर्मितीची पुढील पायरी ठरतो. टीप : फक्त थेअरी म्हणून वाचली आणि तार्किक दृष्ट्या पटली. प्रायोगिक पुराव्यांबद्दल माहित नाही.

In reply to by sagarpdy

राजेश घासकडवी Fri, 12/18/2015 - 20:35
याबद्दल काहीच तक्रार नाही. कधीतरी केव्हातरी कुठेतरी एक स्वजनक निर्माण झाला. तो कसा झाला याची काही पटण्याजोगी प्रक्रिया लेखकाने मांडलेली आहे. त्याच्या मते प्रतिकृती निर्माण करणारा एक रेणू नसून विभिन्न रेणूंची मालिका होती, जी एकमेकांना तयार करत असे. ते कधीतरी एकत्र आले आणि स्वजनक तयार झाला हे खरं असू शकेल. मलाही प्रायोगिक पुराव्यांची काही कल्पना नाही.

विवेक ठाकूर गुरुवार, 12/17/2015 - 13:55
अब्जावधी वर्षांपूर्वी काही रेणूंना पुनरुत्पादनाची शक्ती प्राप्त झाली कशामुळे ? त्यात लेखकानं पुन्हा स्वतःचीच गोची करून घेतली आहे कारण त्यांनी इथे म्हटलंय : तुम्हाला हवं तर त्याला 'शामपूरचा शिलेदार' असं नाव द्या. नावात काय आहे? मग देव हे नांव कसं वाटतं?

In reply to by अनुप ढेरे

नको हो.. त्यापेक्षा देवच बरं.. ;) हे उगीच चांगल्या कामात आंSSssक छ्छी!!! केल्यासारखं वाटतं..

पॉइंट ब्लँक Sat, 12/19/2015 - 12:53
मरठीत लिहिनं थोडं अवघड जात आहे. त्यामुळ इंग्रजीत लिहितो.
पुनरुत्पादन होताना काही वेळा 'चुका' होत असत. बहुतांश चुका तोट्याच्या असल्याने तो जीव मरत असे, पण काही वेळा त्या बदलांमुळे तयार होणारा जीव हा तत्कालीन परिस्थितीत टिकण्यासाठी अधिक सक्षम असे.
This is a LOAED statement and has excessive oversimplification! Are you suggesting that random mutations( mistakes in ur jargon) is the only mechanism for evolving? You have not accounted for epigenetic changes which can happen in large population simultaneously in response to changes in environment and are sometimes transferred to next generation. They certainly are not random. If survival is the only objective, there is no better example than cancer cells. As the tumor turns more aggressive, if you monitor the changes in genomic composition, one sees symphony and not the chaos that wld come out of randomness. They build their own blood vessels, survive in hypoxia, manage to evade immune system and are capable of transferring of genetic material to other cells. So even cancer does not happen by randomness. Current biology with all its knowledge of omics is far from solving the cancer puzzle, let alone attempt to think of evolution. One needs to understand how shaky foundation of biology are. There are more myths in biology than scientific facts. As an example, I can mention two foundations of biology which have started to tremble in last five years. 1. Central dogma - There are exceptions to this blueprint of protein synthesis 2. JUNK DNA - for more than 3 decades biologist religiously (sorry, can't call it scientifically ) believed that 98% of DNA is junk and everything can be explained with just 2%. Long story short, explain evolution is not in yet the realm of current knowledge( or lack of it) of biology. In the wake of so much uncertainty, you are allowed to be biased towards either Darwinism or Intelligent Design. But selling one of them as truth is against scientific spirit.

In reply to by पॉइंट ब्लँक

गवि Sat, 12/19/2015 - 13:18
प्रचंड टाळ्या. उत्कृष्ट. जीवांची रचना आणि परस्परसंबंधांवर आधारित अनेक धागे पाहून आणि एखाददोन सुरुवातीच्या अणुरेणू बेस्ड पाय-यांवरुन एक्स्टरापोलेट करुन आजचे जीव आणि नाती बनली हे ओव्हरओव्हरओव्हरसिंप्लिफिकेशन वाटतं.

In reply to by गवि

विवेक ठाकूर Sat, 12/19/2015 - 15:50
Long story short, explain evolution is not in yet the realm of current knowledge( or lack of it) of biology. In the wake of so much uncertainty, you are allowed to be biased towards either Darwinism or Intelligent Design. But selling one of them as truth is against scientific spirit. लेखकाला समजेल अशा भाषेत नेमका प्रतिसाद आहे. @ गवि एखाददोन सुरुवातीच्या अणुरेणू बेस्ड पायर्‍यांवरुन एक्स्टरापोलेट करुन आजचे जीव आणि नाती बनली हे ओव्हर ओव्हर ओव्हरसिंप्लिफिकेशन वाटतं विश्वोत्पतीचं रहस्य उलगडलं अशी मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न लेखमालेत चालू आहे. पहिल्या लेखाला इतक्या लोकांनी एकदम खडी सलामी दिली की विरोधी विचार मांडावा किंवा कसं याबद्दल मला ही वाटत होतं. पण `इकडून तिकडून आणला विदा आणि ओतला जमेल तिथे बदाबदा' अशी पूर्वपिठीका असल्यानं म्हटलं लेट मी रिस्क !

In reply to by गवि

राजेश घासकडवी Sat, 12/19/2015 - 19:29
एखाददोन सुरुवातीच्या अणुरेणू बेस्ड पाय-यांवरुन एक्स्टरापोलेट करुन आजचे जीव आणि नाती बनली हे ओव्हरओव्हरओव्हरसिंप्लिफिकेशन वाटतं.
'काही अब्ज वर्षांपूर्वी असे रेणू होते त्यावरून आजच्या प्राण्यांतही असंच काहीतरी असणार' असं कोणीच म्हणत नाही. सुरूवातीच्या रेणूंचा अभ्यास करून त्यावरून आजच्या परिस्थितीपर्यंत एक्स्ट्रापोलेशन हे कार्ट बिफोर हॉर्सचं उदाहरण आहे. उत्क्रांतीची तत्त्वं आजच्या प्राण्यांचा, त्यांच्या पूर्वजांचा अभ्यास करून मांडली गेलेली आहेत. किंबहुना तीच तत्त्वं प्रायमॉर्डिअल सूपला लागू पडतात असंच म्हणणं आहे. असो. या लेखमालेत बऱ्याच वेळा चर्चा आधी आणि धागा नंतर असं व्हायला लागलेलं आहे. या धाग्यात फक्त 'उत्क्रांती म्हणजे एक महाप्रचंड उडी नसून पायरीपायरीने होणारे लहान लहान बदल' हा मुद्दा आहे.

In reply to by पॉइंट ब्लँक

राजेश घासकडवी Sat, 12/19/2015 - 19:23
सर्वप्रथम, मी वरच्या लेखात रॅंडम म्यूटेशन्स कशा होतात याचं वर्णन केलेलं होतं. एपिजेनेटिक बदल होतच नाहीत असं कुठेही म्हटलेलं नाही. ज्यांना एपिजेनेटिक बदल म्हणजे काय हे माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात - प्रत्यक्ष डीएनएमध्ये बदल न घडता, त्यातले कुठचे जीन्स एक्स्प्रेस होतात, त्यावरून त्या त्या पेशीचे गुणधर्म बदलतात. त्यातून पेशींमधले फरक निर्माण होतात. म्यूटेशन्स होतात, आणि त्यांमधूनच मुख्यत्वे उत्क्रांतीचा प्रवास घडतो. एपिजेनेटिक बदलांतून लोकसंख्या तात्पुरती बदलण्याची प्रक्रिया घडते. मात्र एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत होणारे बदल एपिजेनेटिक बदलांतून समजावून घेता येत नाहीत. म्हणजे जमिनीवर वावरणाऱ्या प्राण्यापासून बदल होत होत व्हेल तयार झाला. यात झालेले बदल हे म्यूटेशन्सनेच झालेले आहेत. अशा लक्षावधी प्रजातींमध्ये झालेले बदल हे सर्वार्थाने म्यूटेशनने झालेले - प्रत्यक्ष डीएनए बदलणारे आहेत. एपिजेनेटिक्समुळे उत्क्रांतीची थियरीच बदलून जाणार आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. या लेखात लेखकाने हे व्यवस्थितपणे मांडलेलं आहे. एकंदरीत तुमचा आक्षेप रॅंडम या शब्दाला आहे. उत्क्रांतीबद्दल जे काही गैरसमज आहेत त्यांत 'रॅंडम बदलांमुळे उत्क्रांती होऊच शकणार नाही' हा एक आहे. आणि जसजशी ही लेखमाला पुढे जाईल तसतशी त्यावर अधिक चर्चा होईलच. मात्र नैसर्गिक निवडीची प्रक्रिया ही रॅंडम नसते. होणारी म्यूटेशन्स शेकडो, लाखो असतात - त्यातले बहुतांश बदल मारक असतात. मात्र एखाद-दुसरा 'चांगला' बदल असतो. हा बदल सिलेक्ट होतो - म्हणजे पुढच्या पिढीत अधिक प्रमाणात जातो. त्यामुळे रॅंडम बदलातून नेमका चांगला बदल 'स्वीकारण्याची' नैसर्गिक निवडीची प्रक्रिया ही उत्क्रांती घडण्यासाठी प्रभावी प्रक्रिया आहे.
One needs to understand how shaky foundation of biology are.
In the wake of so much uncertainty, you are allowed to be biased towards either Darwinism or Intelligent Design.
टॉक अबाउट लोडेड स्टेटमेंट्स! जीवशास्त्रात काही अज्ञात गोष्टी आहेत याचा अर्थ इंटेलिजेंट डिझाइन बरोबर आहे?? अहो, म्हणजे माझ्या डॉक्टरला कॅन्सरवर उपाय माहीत नाही याचा अर्थ मी साप चावल्यावर डॉक्टरकडे किंवा मांत्रिकाकडे कोणाकडेही जावं असं म्हणण्यासारखं आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पॉइंट ब्लँक Sun, 12/20/2015 - 02:41
एपिजेनेटिक्समुळे उत्क्रांतीची थियरीच बदलून जाणार आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. या लेखात लेखकाने हे व्यवस्थितपणे मांडलेलं आहे.
हा ब्लॉग २०११ सालचा आहे. गूगल स्कॉलर वापरून त्यानंतरच्या काळात झाले शोध पाहिलेत तर चित्र वेगळे दिसतं.
जीवशास्त्रात काही अज्ञात गोष्टी आहेत याचा अर्थ इंटेलिजेंट डिझाइन बरोबर आहे??
अजिबात नाही आणि तसा दावा मी कधीहि माझ्या प्रतिसादात केला नाही. आक्षेप फक्त जीवशास्त्रात अनेक गोष्टी अज्ञात आहेत हे माहित असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून त्याआधारे डार्विनिझम हेच सत्य आहे हे मानन्याला आहे. डार्विनिझम मध्ये असलेले कमतरता दाखवली ह्याचा अर्थ इंटेलिजेंट डिझाइनला मान्यता दिली असा होत नाही. कुठल्याही गोष्टीला सबळ पुरवा नसताना "You are either with us or against us." अशी भुमिका का? जर खरोखर वैज्ञानिक मनोवृत्ती ठेवायची असेल तर जोपर्यंत पूर्णत: एखादी गोष्ट पडताळली जात नाही तोपर्यंत नि:पक्ष राहाणे अपेक्षित आहे. लेखमालिकेचा ओघ पाहिला तर तस होताना दिसत नाही.
माझ्या डॉक्टरला कॅन्सरवर उपाय माहीत नाही याचा अर्थ मी साप चावल्यावर डॉक्टरकडे किंवा मांत्रिकाकडे कोणाकडेही जावं असं म्हणण्यासारखं आहे.
चर्चा जीवशास्त्रावर चालू आहे. जीवशास्त्र ते वैद्यकशास्र्त हा प्रवास फार लांबचा आहे त्यामुळे तिथे जाणे त्वरित तरी टाळूयात.

In reply to by पॉइंट ब्लँक

राजेश घासकडवी Sun, 12/20/2015 - 04:25
डार्विनिझम मध्ये असलेले कमतरता दाखवली ह्याचा अर्थ इंटेलिजेंट डिझाइनला मान्यता दिली असा होत नाही. कुठल्याही गोष्टीला सबळ पुरवा नसताना "You are either with us or against us."
पहिल्या प्रतिसादातल्या उद्धृत केलेल्या वाक्याचा 'In the wake of so much uncertainty, you are allowed to be biased towards either Darwinism or Intelligent Design.' अर्थ मला तरी असा लागला - 'डार्विनच्या उत्क्रांतीवादात इतके गोंधळ आहेत की उत्क्रांतीवाद आणि इंटेलिजेंट डिझाइन हे दोन्ही सारखेच'. तुम्हाला त्यातून वेगळं अभिप्रेत असेल तर ते स्पष्ट झालेलं नाही.
जीवशास्त्र ते वैद्यकशास्र्त हा प्रवास फार लांबचा आहे
अहो ते उदाहरण म्हणून होतं - उत्क्रांतीवाद व वैद्यकशास्त्र जितक्या प्रमाणात चांगलं प्रस्थापित आणि उपयुक्त आहे त्याच्या विरुद्ध प्रमाणात इंटेलिजेंट डिझाइन आणि मंत्रविद्या अप्रस्थापित आणि निरुपयोगी आहे - एवढंच सांगायचं होतं. गेल्या चार वर्षांत जे झालेलं आहे त्यातून एपिजेनेटिक परिणामांमुळे माकडसदृश पूर्वजापासून माणूस कसा झाला हे सांगता येतं का? एपिजेनेटिक बदलांमुळे गुणसूत्रांची संख्या बदलते का? डीएनएचं स्ट्रक्चर बदलतं का? मग केळ्यासारखं झाड आणि हत्तीसारखा प्राणी हे मूळ एकपेशीय पूर्वजापासून एपिजेनेटिक बदलांमुळे कसे होतील? आपल्याला जी एवढी महाप्रचंड वैविध्याने नटलेली सजीव सृष्टी दिसते कारण त्या प्रजातींचे डीएनए वेगवेगळे आहेत. हे म्यूटेशन्स किंवा जेनेटिक ड्रिफ्टशिवाय कसे होणार? असो. या लेखाचा मुख्य गाभा असा आहे - या जीवसृष्टीची निर्मिती रॅंडम प्रक्रियेने झालेली नाही. कारण जसं पार्ट्स एकत्र करून तयार करता येत नाही तसंच सजीवसृष्टीचं आहे. अनेकांना उत्क्रांतीची प्रक्रिया रॅंडम वाटते, तशी ती नाही. इतकंच म्हणणं आहे. अजून मी जेनेटिक्स, म्यूटेशन याविषयी फार खोलात जाऊन बोलतही नाहीये. जेव्हा ते होईल तेव्हा सखोल चर्चा होणं रास्त ठरेल.