नमस्कार मंडळी !!
मिपा म्हणजे आमचा पडीक अड्डा झालाये...बॉस किवा कलीग असोत,सारखे विचारत असतात की काय करत असतोस दिवसभर ह्या साइटवर....(हे लोक अमराठी असण्याचा फायदा की मी नेमका काय करतोये ते कुणालाच कळत नाय ..शिवाय सगळ देवनागरी ह्या लोकाना वाचता येतं पण समजत काहीच नाय....)
तर मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यात काही खास मित्र असतात..तसे आम्हाला ही ४ चांगले मित्र लाभले.सारे आमच्या ग्रुपला आवर्जुन चांडाळ चौकडी म्हणत...आणी नावाप्रमाणेच आम्ही होतोही
(आहे म्हणनं जास्त सयुक्तीक ठरेन) तर ह्या मित्राशी आज तुमची ओळख करून द्यावी म्हटलं..
१)राजेश पाटीलः हे माननीय महोदय ९वी फेल..पण शिक्षकानी आवर्जुन ह्याना डायरेक्ट बाहेरुन १० वी द्या ,असा सल्ला वजा धमकी दिलेली.आणी आपण आयुष्यात किमान १० वी फेल असावं असा थोर विचार करुन ह्या प्राण्याने सुद्धा अनुमोदन दिलेलं .अर्थात अजुनही साहेब १० वी फेलच आहेत.आणी ह्यात अजिबात कमीपणा वगैरे वाटुन घेत नाहीत.ह्या महान माणसानी ९ वीत असताना भुगोलाच्या तासाला शिक्षकाना एक शंका विचारलेली,"सर्,आपण पॄथ्वीच्या आत रहातो की बाहेर?" शिक्षकानी ह्याला आधी समोर बोलावल आणी असा काय धुतला की सर्फ एक्सेल वाले पण लाजले. आणी यथेच्छ धुलाई झाल्यानंतर विचारले की,"आत्ता समजलं?" मार खाउन बराच दमला असल्याने ह्याने सुद्धा हो म्हटलं.पण ह्याला अजुन देखील माहीती नाहे की आपण पॄथ्वीच्या आत रहातो की बाहेर.एकदा मी समजावण्याचा प्रयत्न केला की आपण पॄथ्वीच्या आत किवा बाहेर नाय ,तर आपण पृथ्वीवर रहातो."मग पॄथ्वी गोल आहे तर आपण पडत का नाय ?"मला माहीत असलेलं सारं भूगोलाच ज्ञान मी ह्याच्या समोर मांडलं पन त्याच्या शंकांच समाधान नाय करु शकलो..
तर असा हा आमचा राजेश उर्फ खरुभाई ..
ह्या माणसाने गंभीरपणाने कुठलीही गोष्ट केली नाही (किमान माझ्या समोर तरी नाय्) स्वतःला मात्र आर.माधवन समजतात.आणी एकंदर बोलताना किमान इंजीनियरींग आहोत ,असा इतर नविन लोकाचा कसा गैरसमज होइल ह्याची पुरेपुर काळजी घेतात.ह्या माणसाची अजुन एक खोड म्हणजे प्रेम ......
आता ह्या माणसाला दर महिन्या दोन महीन्यातुन प्रेम होतं. आणी प्रत्येक वेळी ह्याचं ते पहीलं प्रेम असतं .ह्या बाबतीत मात्र फार सीरीयस आहेत.कुणाच्या घरी पूजा,लग्न वगैरे कार्यक्रम असेन तर आवर्जुन जाणे,लागेल तशी मदत करने.नवनवीन लोकाशी ओळखी करणे इ ह्यांचे आवडते उद्योग.गप्पांमध्ये कुणीच ह्यांचा हात धरू नाय शकणार.क्रिकेट हा ह्यांचा सर्वात नावडता खेळ. एकदा प्लेयर नव्हते म्हणुन ह्याला आम्ही अकरावा खेळाडू घेतलेला.तर ह्या शाण्यामुळे मॅच हरलेलो .ह्याला नेमका जिथं थांबवु ,तिकडेच बॉल जायचा ,आणी हे बेणं म्हणजे अस्सल नमुना.सा-या शिव्या मी खाललेल्या.इकडून आक्खी टीम आणी दुसरी कडे 'मला घेतलाच का तुम्ही लोकानी 'म्हणुन ह्याच्या सुद्धा .गाणी ऐकणे ,मनसोक्त गप्पा झोडणे,भरपूर चालणे(भटकणे ह्याअर्थी) हे आवडते छंद.दारू,सिगारेट आणी तत्सम सर्व पदार्थ चालतात.त्याबाबतीत कचरा कुंडी म्हणता येइन इतकी वाइट अवस्था.तर असा हा प्राणी पण मनाने खुप चांगला .कधीही ,कुणाच्याही मदतीला धाउन जाणार.हाक द्यायच्या आधी 'ओ' देणार."चल"म्हटलं की "कुठे "असा कधीच विचारणार नाय.चल म्हणजे चल.कुणी कितीही वाइट म्हटलं तरी माणुसपणा ,जिवंतपणा अगदी ठासून भरलेला.सध्या इमानदारीने गोदरेज साबणाच्या एका एजंसी मध्ये सेल्समन आहे.गणीताशी जन्मोजन्मीची दुश्मनी असल्याने फार त्रास होतो.कंपनीने एक कॅल्क्युलेटर दिलेला ,तो पण सायंटीफीक .ह्याला वापरताच येत नसल्याने अजुनही घडी मोडलेली नाही.आजही ८%स्कीम म्हणजे नक्की किती ,असा सवाल असतो ह्याचा. "८%म्हणजे १२ वड्यावर एक वडी फ्री" असा समजावुन सांगावा लागतो.तर ह्या माणसाच एकच स्वप्न की लग्न करायचं तर लव्ह मॅरेज्,नाय तर करायच नाय.त्यापायी काय काय कष्ट घेतले ह्या जीवाने ! पण सारे प्रयत्न व्यर्थ.अखेरीस आता यंदा कर्तव्य आहे असा बोर्ड लावुन फिरायच बाकी राहीलये.
२)अमर सोणावणे: ह्याला प्रेमाने आम्ही 'बाटली' म्हणायचो.माणसाने दारू का व कशी प्यावी ह्या विषयावर तासभर हा माणुस न थांबता, न दमता ,सविस्तर आणी अगदी तळमळीने लेक्चर देउ शकतो.जगातला कुठलाही समुपदेशक किंवा विवादपटू 'दारू' ह्या विषयावर आमच्या बाटलीला हरवु नाय शकत.तसा वाणीज्य शाखेचा पदवीधर ,एक चांगला संगणक शिक्षक.दिवसातुन किमान तासभर व्यायामाला घालवणार.भरपूर भटकणे,भरपूर पीणे ,आणी फूटबॉल ह्या माणसाचे आवडते छंद.कॉलेजच्या टीम मध्ये इतक्या चांगल्या फॉरवर्ड प्लेयरला गोल्टीची भुमीका पार पाडावी लागायची.पण हा प्राणी गोल-कीपर असला म्हणुन काय झाला,एकदा का बॉल आला की एकटाच पार समोरच्याच्या गोल पोस्ट पर्यंत घेउन जाणार .इकडे बाकीच्याची धावपळ .मी ह्याला ओळखतो तेव्हापासुन हा माणुस कधी खोट बोललेलं मला तरी आठवत नाय.एकदम सच्चा,जे आहे ते समोरा समोर .कुणाचीच भीड भाड ठेवणार नाय.कधी ही कुठेही भटकायचा प्लॅन झाला की आधी सगळी सुत्रे आपल्या हाती घेणार.सगळ्या डीटेल काढणे, माहिती गोळा करणे,त्याबर हुकुम सर्वाना भेटणार्,आणी सर्व संमतीने योजना तयार करुन अक्षरशःती वास्तवात आणणार .कधी कधी मला ह्या माणसाच्या बुद्धीचा फार हेवा वाटायचा.खुपच शार्प आणी हुशार! सर्वात महत्त्वाचं म्हनजे प्यायला कधीच ना नाही.सायबाचा फंडाच हाकी "मी खुषीत पीतो,दुखात पीतो! मूड नाय म्हणुन पण पीतो आणी मूड असेन तरी पीतो!फार काम आहे म्हणुन पीतो ,काहीच काम नाय म्हणुन पीतो!वेळ जात नाय म्हणुन पीतो आणी अजिबात वेळ नाय म्हणुन पण पीतो!दमला तरी पीतो आणी आळस आलाये म्हणुन पण पीतो !" कारण काहीहे असू देत पण पीणे म्हटल्यावर बाकी दुनीया गेली खड्ड्यात.आणी ह्या बाबतीत ह्याच्याशी बोलून फायदाच नाही.जो चार शहाणपणाच्या गोष्टी सांगायला जाइन ,येताना तोच टल्ली होउन येतो की काय अशी भिती वाटायची.
३)डी के : नाम मे क्या रक्खा है ?कुमार, देवदत्त वगैरे बरीच नावं आहेत ह्या माणसाला.एरीयातला ग्रूप्,कॉलेजचा ग्रूप्,कामातला ग्रूप प्रत्येक ठीकाणी ह्याला वेगळ्या नावानी ओळखतात.माणुस एक ,आणी नावे फार.म्हणुन तर म्हटलं नाम मे क्या रक्खा है ! ह्या प्राण्याची त-हाच निराळी.उभ्या आयुष्यात ह्याने जितके धंदे केले तीतके माझ्या ओळखीतल्या इतर कुणीच नाही.१२ वी नंतर पार्ट टाइम जॉब म्हणुन एका कंपनीत सेल्स प्रमोटर म्हणुन कामाला लागला.मी विचारलं की कुठला ही आधीचा अनुभव नसताना तुला कसा काय घेतला! म्हणे ,तुला माहीतीये मला काय येत नाय्,मला माहीतीये मला काहीही येत नाय ,पण बॉस ला कुठे माहीताये ?मोजुन ३ महीने त्या कंपनीत होता.सगळं काही व्यवस्थीत चालू होतं .अचानकच एके संध्याकाळी 'मी काम सोडतोये'अशी घोषणा केली .वर स्वतःचा शॉप टाकतोये हे पण सांगुन टाकलं.म्हटलं आरे अचानकच ! तर आधीच्या जॉब मध्ये झालेल्या ओळखी इकडे त्याला कॅश करता येणार होत्या.मग रबर मोल्ड बनवुन स्वतः सेल्स करायचा .सगळं काय आलबेल चालू होतं .तर साहेबाना डीजेल मेकॅनीक करायची हौस झाली.सगळ काही बंद करून डायरेक्ट ऍड्मीशन केली.पहील्या वर्षातच पोरगं कटाळलं.आणी डायरेक्ट औरंगाबादेत कुठेशी फायर & सेफ्टी चा डीप्लोमा करायला निघुन गेलं .आणी गेल्यावर आम्हाला फोन करून सांगतये.त्याच्या ह्या चंचल वागण्यावरून ब-याचदा आम्ही त्याला झापायचो.पण कुणाचं ऐकुन घेइन तो डीकेच काय ?यथावकाश डीप्लोमा न घेताच परतलं .विचारलं काय झालं ,तर सारी फीचे पैसे उधळ्पट्टीत खर्च केलेले.'खाओ खुजाओ ,बत्ती बुझाओ!' बाप मिलिट्री रीटायर्ड .एकदम वैतागलेला ह्याला.परत सहा महीने सेफ्टी एंजीनीयर म्हणुन काम करताकरता सर्वाच्या नकळत २१ सीटर गाडी खरेदी केली .आणी एका आयटी कंपनीत लावुन मोकळा.जगातला सर्वात मोठा स्मशान ह्याच्या हृदयात बनवलेला आहे.कुणीही यावं आणी अगदी मोकळेपणाने आपले मन ह्याच्या पाशी हलके करावे.कुणास ठाउक किती लोकाना आधाराचे ,सांत्वनाचे शब्द देउन आपलस करून ठेवलये.कित्येकानी आपली अगदी वैयक्तीक गुपीत ह्याच्यापाशी सांगीतलेली .पण कधी कुणाच्या विश्वासाला तडा नाय जाउ दिला.कधीही कुणाला जादुची झप्पी हवी असेन तर हक्काचं माणुस म्हणजे आमचा डीके!! कुणालाही हेवा वाटावा इतक्या मैत्रीणी आहेत .आणी विशेष म्हणजे नक्की मैत्री कशाला म्हणातात हे त्याच्याकडून शिकावे .कुणालाही एका भेटीतच जिंकण्याची क्षमता नक्कीच आहे त्याव्ह्यात. पण फार लहरी आणी चंचल मन. ह्या प्राण्यावर जितकं लिहीन तीतकं कमी!! अतीशय कमी बोलणार पण अगदी मुद्देसूद.समोरच्याला निरुत्तर करून टाकायची ताकद. शब्द म्हणजे हत्यार्,त्याचा अतीशय जपून करणार.
४)आस्मादीक :स्वत:बद्दल काय आणी किती लिहू असं होतये.पण सद्य परीस्थीती अशी आहे का लिहायला काहीच नाय .पैदाईशी बधीर्,बावळट वगैरे विशेषणानी नटलेल्या परंपरांचा मला रास्त अभिमान आहे.शिक्षण यथातथा.कधी गंभीर व्हावं आणी कधी धांगडधींगा घालावा इतकाही तारतम्य नसलेला प्राणी .शाळेत शिक्षकानी इतका काय पीसलाये की शाळा आठवली की एकेक छडी आणी लालेलाल झालेले तळहात आठवतात.खोड्या काढणे,मस्ती करणे.मानसीक त्रास देणे ह्या कलांमध्ये पारंगत.शांत बसणे म्हणजे ब्रम्हहत्या. कधीच कुठल्याच स्पर्धेत पारीतोषीक नाय मिळवलं.पण प्रत्येक खेळात आवर्जुन भाग घ्यायचा.अर्थात डफर ,बैल्,गाढव ई.ई.ऐकुन ऐकुन कान विटले.अभ्यास वगैरे करायला अगदी तयार.पण बाकीचे उद्योग असे की 'तौबा भली'!! नंतर एक एक नग मित्र म्हणुन भेटत गेले.उरलेली कमी त्या लोकानी पूर्ण केली .बाटली बरोबर बाटलीत उतरलो.खरूभाइ बरोबर गावभर हुंदडलो.डीके च्या प्रत्येक मुर्खपणात सामील.आयुष्य म्हणजे कशाशी खातात्,कधी सीरीयस सुद्धा व्हावं लागतं ,ह्याची जाणीवच नव्हती .सारे सँपल पीस जेव्हा एकत्र यायचो,तो दिवस फक्त आणी फक्त आमचाच असायचा.जीवनाचे सारे रंग अनुभवले.'रंग दे बसंती' नसली तरी दिल चाहता है दोस्ती नक्कीच होती.आजही आठवलं की आपोआप सारे क्षण डोळ्यासमोरून जातात फ्लॅशबॅकमध्ये.. केलेल्या एकेक मुर्खपणाची यदी तरळून जाते..
पण प्रत्येक गोष्टीला एक 'THE END' असतोच.
एका अपघातात आमचा बाटली गेला...
पूढच्या सहा महीन्यात खरूभाइ आणी डीके मध्ये किरकिरी झाली....आजतागायत एकमेकाचा चेहेरा बघत नाहीत.
राहीत राह्यलो मी .जाना था जापान ,पहुच गये चीन ....
कधी कधी वटतं काळ पून्हा मागे सरकावा..
रम्य ते दिवस परत एकदा जगावेत...
प्रत्येक क्षण ,प्रत्येक घटना पून्हा एकदा जगावी.
"दिन - दिन भर वो प्यारी बाते,
झुमे शामे ,गाये राते,
मस्ती मे रहे डूबा-डूबा हमेशा जहां..
हमको राहो मे युही मिलती रहे खुशीया..."
पण सत्य फार भयाण असते ,आणी ते स्वीकारावे लागते....
वाचने
8183
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहिलंय..
सु॑दर
end is not good
मस्तच.........
लेख आवडला पण वाईट वाटलं.
पण सत्य
व्वा!
In reply to पण सत्य by अवलिया
हं
खरच मनापासून लिहलय............
!! चांडाळ चौकडी !!
लेख आवडला
लेख भारी
धन्यवाद !!
आवडला
चांगलंच
छान!!!
अन्या मस्त
मला पण
"हाक
खुपच छान लीह ले आहे
पून्हा एकदा !!
छान
खरच छान
छान
अन्या भाय
खरच छान