Skip to main content

शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 19/10/2015 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे. १. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल : पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले. 'क्रॉनिक फटिग सिंड्रोम' ची लक्षणे माझ्यात दिसत होती, आणि वर्षानुवर्षे 'फिस्टुला' च्या वेदना मी भोगत होतो. फिस्टुलावर शस्त्रक्रिया हाच उपाय असल्याचे सर्जनने सांगितले, परंतु जालावर हुडकता शस्त्रक्रिया करून सुद्धा पुन्हा फिस्टुला उद्भवतो असे समजले. अ‍ॅलोपाथीची औषधे घेणे मला कधीच भावत नसल्याने आता करावे तरी काय, हेच कळेनासे झाले. पूर्वी नियमित व्यायाम करायचो, तोही आळस आणि निरुत्साहामुळे बंद झाला. गोड, तळकट खाणे सोडवले जात नव्हते. अतिशय निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली होती. रेक्झीन च्या खुर्चीवर बसल्याने, सिंथेटिक कापडाची विजार घातल्याने, कॉफी प्यायल्याने लगेच फ़िस्टुला होतो हे लक्षात आल्यावर कॉफी पूर्ण बंद केली, सुती पटलूण घालू लागलो, आणि सिनेमाला जातानासुद्धा बुडाखाली ठेवायला सुती बस्कुर नेऊ लागलो. या उपायांनी फिस्टुला होण्याचे प्रमाण जरा कमी झाले खरे, परंतु पुढे मूळव्याधीने पण मला ग्रासले. --- आता मात्र माझी पाचावर धारण बसली. जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे "मै अपनी जिंदगीसे तंग आ चुका था… मेरी बीवी मुझसे नफरत करने लगे थी " --- असे झालेले होते, पण ... " फिर एक दिन मुझे पिंटो मिला, उसने मुझे xxxxx के बारे मे बताया" ... असे मात्र काही घडून येत नव्हते. २. आशेचा किरण : अश्या परिस्थितीत २०१४ च्या जुलै महिन्यात अमेरिकेत येऊन पहुचलो. मुलाचे घर पहिल्या मजल्यावर होते, तो एक जिना चढायलाही मला जड जात होते. आलो, त्याच दिवशी मुलाने ' Fat, Sick and Nearly Dead' हा सिनेमा दाखवला आणि त्यात दाखवल्याप्रमाणे आपण सर्वजण एक आठवडा फक्त भाज्या-फ़ळांचा रस घेऊन राहूया, असा प्रस्ताव मांडला. मला आणि पत्नीला ही कल्पना अशक्य कोटीतील वाटली. नुसत्या रसाने पोट कसे भरणार ? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटे, दूध-तूप वगैरेंशिवाय शक्ती कशी राहणार ? एक दिवस सुद्धा जेवणात पोळी नसेल तर आपण त्रस्त होतो, सात दिवस कसे काढणार ? वगैरे शंका होत्या, पण मुलगा एवढे म्हणतो आहे तर करून बघू, झाला तर फायदाच होईल, अगदी रहावले गेले नाही तर खाऊया काहीतरी, असा विचार करून आम्ही संमती दिली. ३. रस-आहारावर वीस दिवस आणि 'काळ-सर्प वियोग' मग लगेचच बाजारात जाऊन ज्यूसर खरेदी केला आणि काकडी, हिरवी सिमला मिर्च, दुधी भोपळा, पालक, पोदिना, सेलरी, केल वगैरे हिरव्या भाज्या, हिरवी (ग्रॅनी स्मिथ) सफ़रचंदे, पिवळी-लाल सिमला मिर्च, गाजरे, संत्री, टमाटर, ग्रेपफ़्रूट, बीटरूट, लाल सफ़रचंदे, अननस, कलिंगड, वगैरे लाल-पिवळ्या भाज्या आणि फळे, आले, ओली हळद, लिंबू असे सर्व सामान नीट धुवून फ्रिज मध्ये ठेऊन सज्ज झालो. . दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले. ... रसासाठी भाजी आणि फळे आणताना ती हिरवी, पिवळी, नारंगी, लाल, जांभळी, काळी वगैरे विविध रंगांची असतील हे बघत होतो. . रोज सकाळ-संध्याकाळ वजन बघणे आणि थोडे पायी फिरणे सुरु केले. रोजची शी कशी होते, यावर देखील लक्ष ठेवले होते. दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते. . पाचव्या दिवशी हातभर लांब, काळे, रबरासारखे वेटोळेच्या वेटोळे बाहेर निघाले (त्याचे मी 'काळसर्प' असे नामकरण केले) ते बघून अगदी थक्क झालो. लगेच स्वतःचे वजन केले, ते एक किलो कमी भरले. आतड्यात वर्षानुवर्षे साचून घट्ट बसलेली घाण निघाली, हे लगेचच लक्षात आले. गंमत म्हणजे मला एकदम दहा वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटले, आणि मोठ्याने एकादे 'आयटम साँग' म्हणत धावत सुटावेसे, नाचावेसे वाटू लागले... ... सहाव्या दिवशी पण एक लहानसा 'काळसर्प' निघाला. या काळसर्प-वियोगानंतर दहा-पंधरा दिवसातच मूळव्याध आणि फिस्टुलाच्या भयंकर व्याधीतून माझी कायमची सुटका होऊन पुन्हा पूर्वीसारखा उत्साह वाटू लागला. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो, त्याने आणखी आरोग्यलाभ झाला. अमेरिकेला जाण्यापूर्वी मी भारतातून ३८-३९ इंच कंबरेच्या पटलूणी नेल्या होत्या, त्या अगदी ढगळ होऊ लागल्या, आणि ३३ इंची घ्याव्या लागल्या. वजन ५ किलो कमी झाले. ४. यानंतरचा काळ : भारतात आल्यानंतरही रोज एक-दोन ग्लास जूस पिणे चालू ठेवले. थोडासा ताजा आवळ्याचा रस, नारळ पाणी यांची आणखी भर पडली. शिवाय दही, पिकलेले केळे, खजूर आणि ज्यूस काढताना निघालेला थोडासा चोथा हे सर्व मिक्सर मध्ये पाण्यासह घुसळून बनवलेली स्वादिष्ट लस्सी/स्मूदी पिऊ लागलो. . ब्रेड, तळकट आणि मैद्याचे पदार्थ, मिठाई याविषयीचे आकर्षण आपोआपच संपलेले असल्याने मुद्दाम स्वत:वर ताबा ठेवावा न लागता हे पदार्थ आहारातून बाद झाले. 'ग्लूटेन फ्री' खायचे म्हणून गव्हाच्या पोळ्या खाणे अगदी कमी केले. ही झाली माझ्या आरोग्य संपादनाची हकीगत. मागे पुण्यात मिपाकरांसोबतच्या 'पाताळेश्वर कट्ट्या'त मी हा सर्व अनुभव सांगितला होता. त्यापैकी समीर शेलार याने मनावर घेऊन हा प्रयोग केला, त्याचा त्याला खूपच फायदा झाला. कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा. सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. या उपायाचे प्रवर्तक ऑस्ट्रेलियातील 'जो क्रॉस' यांच्या खालील वेबसाईट वर अनेक जूस, स्मूदी, सलाद, सूप वगैरेंच्या पाककृती दिलेल्या आहेत. http://www.rebootwithjoe.com Fat Sick and Nearly Dead: https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8

वाचने 275843
प्रतिक्रिया 317

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

अनुमोदन . फक्त मोबिलीटीच नव्हे तर strength stamina speed agility चारही पाहिजे ! कोणताही ट्रेक करताना आता मला जे साठवलेले ६-८ किलो एक्स्ट्रा फॅट आहे ते जाणवते राव .

In reply to by प्रसाद गोडबोले

आयडियली पाहता खांद्यावर ९-१० किलो वजनाची सॅक घेऊन राजगडसारखा ट्रेक तसा बर्‍यापैकी सहजपणे करता आला पाहिजे. ही अपेक्षा तशी बरीच जास्त आहे सद्यस्थितीकडे पाहता, पण असे काही लक्ष्य समोर ठेवले तर थोडे थोडे करत करत सुधारणा होईल असे वाटते.

चांगला लेख ! मात्र याबरोबरच शादी के पहले आणि शादी के बाद चा फोटो ( आय मीन सुरुवातीचा फोटो आणि प्रयोगानंतरचा फोटो) टाकला असता तर आमच्यासारख्यांना जरा जास्त प्रेरणा मिळाली असती !

In reply to by धर्मराजमुटके

पहले और बाद चे फोटो द्यायचे आहेत, पण अद्याप कंबरेचे उद्दिष्ट गाठता आलेले नाही (३८ वरुन ३३ वर आली, पण २८-३० वर यायची इच्छा आहे) शिवाय ते सिक्स अ‍ॅब वगैरे जमले तर उत्तमच.

In reply to by चित्रगुप्त

हायला, सिक्स प्याक अ‍ॅब ! शर्ट काडून पिच्चर-बिच्चर मदे काम करायच इचार हाय काय, भाय ?! ;) :)

आजपासून सुरु केले. दोन काकडी , दोन गाजर , एक सफरचंद , दोन संत्री , थोडी मेथी व चार टोम्याटो. मिस्करातून फिरवून थोडे पाणी घातले. अर्धा लिटर लिक्विड तयार झाले. यात पाणी घातले तर चालते ना ? साखर मीठ घातले नाही. चोथा गाळला नव्हता. चोथ्यासकटच प्यालो. सोबत लिंबू सरबत. संध्याकाळी थोडे दूध , दही , के ळी व खजूर ज्युस करायचा आहे.

न शिजवलेल्या भाज्या-फळे हे पचायला कठीण (त्यामुळे अयोग्य), आणी शिजवल्याने त्यातले व्हिटॅमिन वगैरे नष्ट होतात, या दोन्हीवरचा एकत्रित उपाय म्हणजे जूस. नुस्ती कच्ची फळे खाल्ल्यास त्यांचा चोथा शरीराबाहेर टाकायला पचन-संस्थेला एक-दोन दिवस काम करावे लागते, त्यामुळे आतड्यात वर्षानुवर्षे साचलेली घाण बाहेर काढायला मोकळीक मिळत नाही. जूसरद्वारे चोथा आधीच काढून टाकून आपण फक्त पाणी आणि पोषकद्रव्ये घेत असल्याने ते काम सहजपणे केले जाते. शिवाय आतड्यातील परजीवी जंतु (parasites) हे मुख्यतः शर्करा आणि starch वर जगत असतात, त्यांच्या अभावी ते मरून बाहेर पडतात, परिणामी भूक कमी लागू लागते, गोड, मैद्याचे पदार्थ वगैरे खाण्याची इच्छा मावळते. Gluten युक्त धान्ये विशेषतः गहू (मैदा, कणीक इ. चे पदार्थ) पचणे (पोटात विघटित होणे) कठीण असल्याने ते शरिरात हानिकारक द्रव्ये निर्माण करत असतात. त्या ऐवजी ज्वार, बाजरी इ. ची भाकरी वा अठरा धान्याची भाजणी खाणे उत्तम. खरेतर दुग्धजन्य पदार्थ (दूध, खवा, मिठाया) पण कमी करणे बरे. मी लेखाच्या शेवटी दिलेला तूनळीवरील 'Fat, Sick and Nearly Dead' हा व्हिडियो अवश्य बघावा.

In reply to by चित्रगुप्त

आगोबै , मी जुसर नसल्याने मिस्करातून फिरवुन चोथ्यासकट प्यालो. ताकातील पालक वगैरेही वापरता येइइल.

In reply to by dadadarekar

आगोबै , मी जुसर नसल्याने मिस्करातून फिरवुन चोथ्यासकट प्यालो. दादूस काय चाललंय काय? एकतर आगोबैनं सुरुवात! मग जुसर हा प्रेमळ उच्चार. मग मिश्किल मिस्कर? चोथ्यासकट कसे प्यालात? चोथा एकतर गिळावा लागणारच किंवा चावावा तरी लागणार?

In reply to by चित्रगुप्त

चोथा चांगला असतो ना शरीराला? पोट साफ होण्यासाठी फायबरयुक्त आहार असावा असे बर्‍याच ठिकाणी वाचले आहे. की हे असे फक्त डाएट पुरते (शरीरशुद्धी पुरतेच..) करायचे असुन नंतर रोजचाच आहार घ्यायचा आहे? अजुन काही शंका, -मी नोकरी करते, शिवाय मुलामागेही धावपळ खुप होते. अशा वेळी हे सलग २०-२५ दिवस ज्युसवर रहाणे शक्य होणार नाही बहुदा. वीकांताला हे प्रयोग केले तर मदत होईल का? -मध्यंतरी शंखप्रक्षालनासंबंधी पण वाचले होते ज्यात काही विशिष्ट व्यायाम आणि पाणी पिणे ह्याची सांगड घालुन १८-२० ग्लास पाणी पिऊन पोट साफ केले जाते. ह्या क्रियेतही आतडे साफ होत असतील ना? पण तेव्हा असा "काळसर्प" बाहेर पडल्याचे कधी ऐकले नाही. किंवा पंचक्र्मातही बहुदा विरेचनात पोट साफ होते तेव्हाही असे काही बाहेर पडल्याचे ऐकले नाही. ह्या मागे काय करण असु शकेल?

In reply to by पिलीयन रायडर

>>> मी नोकरी करते, शिवाय मुलामागेही धावपळ खुप होते. अशा वेळी हे सलग २०-२५ दिवस ज्युसवर रहाणे शक्य होणार नाही बहुदा. रात्री पाच सात बदाम भिजवून सकाळी सालं काढून खाणे. मस्त एनर्जी टिकते. याबरोबर सुका मेवा कमी क्वांटम मध्ये जास्त एनर्जी देतोच. बाकि ज्युस पेक्षा कच्ची फळं जास्त खाणं उत्तम. ज्युस बनवल्यास साखर अजिबात नको. डॉक्टरांना प्रश्न - कार्ब्स काही दिवस पूर्ण बंद केले तर काय होईल?

In reply to by प्यारे१

बाकि ज्युस पेक्षा कच्ची फळं जास्त खाणं उत्तम.
हे एरवी, म्हणजे जेंव्हा आपण पोळी, भात वगैरे आहार घेत असतो, तेंव्हा ठीक, परंतु शरीर-शुद्धीसाठी रसाहार घ्यायच्या दिवसात ते योग्य नाही, याचे कारण मी एका प्रतिसादात दिलेच आहे. समजा, एक टोपलीभर भाज्या-फळे आपण घेतली तर ती सर्व कच्ची एका दिवसात आपण खाऊ शकत नाही, आणि खाणेही योग्य नाही, मात्र त्यांचा रस सुमारे तीन-चार ग्लास निघेल, तो मात्र आपण सहज पिऊ शकतो, त्यातून सर्व पोषक द्रव्ये आपल्याला मिळतातच, परंतु चोथा बाहेर टाकून देण्याच्या कामात पचनसंस्था गुंतून रहात नाही, परिणामी जुनी साचलेली घाण काढणे शक्य होते.

In reply to by चित्रगुप्त

इतर काहीच न खाल्ल्याने तो काळपट संडास तयार झाला आहे. त्यात आधीची घाण व फळभाज्यातील रंगद्रव्ये दोन्ही असणार.

In reply to by चित्रगुप्त

त्यामुळे कच्ची फळे व भाज्या खाव्या लागतील. सकाळी मिक्स जुस दूपारी फळे व भाज्या. रात्री फ्रुट जुस दही घालून ( पंचामृत टाइप) थोडेसे दूध घालावे लागेल. त्यातून क्यालशियम व विट डी मिळेल. ते भाज्या / फळात नसते. यात मोड आलेले गहू , कडधान्ये घेता येतील का ? ... आमची एक एच आय व्ही पेशंट रोज कोर्फड गर , मोड आलेले गहू व कडधानुये खाते.. औषधेही आहेत. तीची तब्येत अगदी निरोगी आहे.

हा कालसर्पयोग प्रकार वेगवेगळ्या प्रकारे करतात असं वाटतंय. २००० साली एस एस वाय केलं होतं तेव्हा शेवटच्या टप्प्यात पातेलंभर कोमट पाणी मीठ घालून प्रत्येकाला दिलं होतं. पित राहायचं नि थोडं चालणं उड्या मारणं वगैरे. मीठाचं पाणी प्यायल्यावर व्हायचं ते होतं. आधी उलट्या मग खालून सगळं बाहेर पडणे वगैरे. पाणी पिणं थांबवायचं नाही. या बाहेर पडण्यात आधी चित्रगुप्त म्हणतात तसं अतिशय घाण पासून नंतर हळू हळू सगळं चिकटलेलं वगैरे बाहेर पडतं. शेवटाकडं प्यायलेलं पाणीच संडासवाटे बाहेर पडू लागतं. नंतर १० १५ दिवस बाळाचा आहार घ्यायचा. गुरगुट्या भात तूप घालून वगैरे. आणि त्यातले लोक निव्वळ कच्च्या भाज्या, ड्राय फ्रुट्स नि फळं यावर असतात.

अत्यंत माहितीपूर्ण धागा. तुमच्या चिकाटीला सलाम!!!!! तुमचे दिवसाचे पूर्ण वेळापत्रक द्याल का? १) सकाळी किती वाजता उठलात? २) सकाळी शरीर मोकळे होण्यासाठी काही व्यायामप्रकार केले का? ३) नाष्ट्या ऐवजी किती ग्लास ज्यूस प्यायलात? किती वाजता? ४) दिवसभरात इतर काही खाल्ले का? साधारणपणे किती वाजता? ५) पाणी किती प्यायलात? घन स्वरूपातील अन्न टाळत असल्याने पाणी पिण्याचे प्रमाण वाढले का? पाणी कोमट प्यायलात का साधे? ६) हे सगळे करताना दिवसातून ठरावीक वेळी माफक व्यायाम केला का? ७) झोप शांत लागते का? ८) झोपेच्या पूर्वीच्या आणि आत्ताच्या वेळापत्रकामध्ये काही फरक पडला आहे का? आणखी काही मुद्दे आठवले तर पुढील प्रश्न विचारेन.

In reply to by मोदक

मोदकला पुढचा प्रोजेक्ट मिळालेला आहे! आता लवकरच आपल्याला शास्त्रशुद्ध लेखमाला वाचायला मिळलेच. मग आपण ती आपल्या रुटीनमध्ये चोप्य पस्ते करु!

In reply to by पिलीयन रायडर

ओ ताई.. कशाला चेष्टा करताय गरिबाची. व्यायाम करायचा कंटाळा असल्याने आणखी काही मार्ग मिळतो आहे का ते शोधत असतानाच हा लेख सामोरा आला ..आणि हे सर्वांना सहज शक्य आहे. चित्रगुप्त साहेब.. तुमचे या लेखाबद्दल प्रचंड प्रचंड आभार..!!!!!!!!

In reply to by मोदक

१. सकाळी उठण्याची वेळः मला लहानपणापासून सुमारे ५-५:३० वाजता उठायची सवय आहे, त्यातून आता वयामुळे पहाटे तीन ते पाच च्या मधे केंव्हातरी जाग येते. २. व्यायामः मी सर्व बाबतीत अनियमित असल्याने व्यायाम नियमित कधीच केलेला नाही. त्यातून हा प्रयोग सुरु केला तेंव्हातर फारच आळशी झालेलो होतो. पोट, वजन कमी झाल्यावर मात्र उत्साह संचारून बर्‍यापैकी नियमित व्यायाम सुरु झाला. ३. माझ्या जेवणाखाण्याच्या वेळाही ठरलेल्या नाहीत (कदाचित अश्या सर्व अनियमितपणाच्या परिणामीच मूळव्याधीपर्यंत मजल गेली असावी) त्यामुळे जेंव्हा वाटेल, तेंव्हा थोडे थोडे जूस सावकाशपणे पीत होतो. ४. अन्य खाणे: याबद्दल नोंद न ठेवल्याने आता आठवत नाही, परंतु दोन-तीन दिवसांनंतर (कृमि मेल्यावर ??) अन्य काही खाण्याची इच्छा कमी झाली. खजूर, केळे, अंजीर, भिजवलेले बदाम, उकडलेले अंडे असे वाटले तर खात असे. ५. पाणी तहान लागेल तेंव्हा साधेच पीत असे. मुद्दाम ठरवून अमूक इतके असे केले नाही. जूसिंगच्या दिवसात एकाद लीटर पाणी पुरेसे वाटते. उन्हाळा असेल तर जरा जास्त. उत्तम भाज्या - फळे थंडीत चांगली मिळत असल्याने तेंव्हा करणे सोपे. ६. व्यायाम दहा-पंधरा दिवसांनंतर करू लागलो, तोही अगदी हलका. ७. झोप नेहमी अगदी लगेच लागते, त्यात काही बदल झाला नाही. पांढरी साखर (आणि मिठाया) खाऊ नये, त्या ऐवजी खजूर, केळी (अगदी पिकलेली) खाणे चांगले. मैद्याचे सर्व पदार्थ वर्ज्य केल्यास उत्तम परिणाम होतो.

In reply to by चित्रगुप्त

धन्यवाद. आणखी प्रश्न असल्यास जरूर विचारेन.

इच्छुकांसाठी जो क्रॉस यांची ही मोफत पीडीएफ आहे. १५ दिवसाचा प्लान आहे. बघुया करून. ते आतडीतून निघालेले रबर बघून नखशिखांत हललो आहे. कित्येक प्रयत्नांनंतरही वजन कमी न होण्याचे खरे कारण आज सापडले. चित्रगुप्त यांना लाख धन्यवाद! हा धागा योग्य रितीने चालू राहावा, चांगले माहितीपूर्ण प्रतिसाद येऊन प्रयोगकर्त्यांच्या अनुभवाचे बोलही इथे यावेत. आर्थिक घडामोडीसारखा हा धागा प्रवाही राहिले तर बरं.

In reply to by तर्राट जोकर

पिडिएफ घेतलीये.आज सर्व भाज्या फळं आणते लिस्ट प्रमाणे.बघतेच करुन डिटाॅक्स ! पिरे चल सुरु करु.

In reply to by अजया

इथे कुणीतरी ज्युस करुन , माझी मान मागे करुन माझ्या घशात ज्युस ओतुन मझं तोंड पुसुन माझी मान परत जागेवर आणुन देणार असेल तर I am in!!!

चित्रगुप्त काका, अत्यंत प्रेरणादायी लेख.. 'कोलोन क्लिनींग' बद्दल ऐकले आहे, पण त्याचे महत्त्व इतके असते हे ठाऊक नव्हते. ती एक 'मार्केटींग गिमीक' वाटायची.. काही प्रश्न, ज्यांनी उत्तरे तुमच्याकडून व डॉक्टरलोकांकडून अपेक्षित आहेत.. १. सुरुवातीला कही त्रास झाला का? 'क्रेव्हींग्स' वगैरे.. २. वर दादादरेकरांनी विचारलंय की चोथ्यासकट प्यावं की चोथ्याशिवाय? तुम्ही 'चोथ्याशिवाय' असं लिहीलंय. पण मग चोथ्यातील पोषकतत्वे वाया नाही का जाणार? चोथ्याला पुन्हा पाणी टाकून फिरवून त्याला गाळून घेतल्यास चालेल काय? (कंजूसपणासाठी सॉरी ;-) ) ३. महीना-दोन महीना हा आहार केल्यास त्याचे काही तोटे आहेत का (क्रॅशडायटींगसारखे)? ४. ह्या आहारासोबत व्यायाम केल्यास चालतो का? कि थकवा येणार? वेल्लासाहेबांची कमेंट आहेच वर.. ५. ह्या आहारानंतर आपल्या नेहमीच्या (माफक प्रमाणात 'बिंज' करणार्‍या) आहाराकडे वळल्यास त्याने काही तोटे आहेत का? बर्‍याचशा डाईटींग प्लान्सनंतर शरीर 'रिबाऊंड' करण्याचा प्रयत्न करते, असं ऐकलं आहे.. आणखीही काही प्रश्न आहेत.. सध्या इतकं पुरे..

In reply to by चिगो

१. सुरुवातीचे दोन-तीन दिवस रोजच्या अन्नाच्या अभावी जरा चुकल्या चुकल्या सारखे वाटले, परंतु भूक अशी लागली नाही, कारण खरेतर रोजच्यापेक्षा जास्त पोषक द्रव्ये शरीराला जूसमधून मिळणे सुरू झालेले असते. शरीरात साठून असलेली चरबी जाळणे हे उद्दीष्ट असल्याने खरेतर अन्नाची गरजही नसते. २. चोथ्यात असलेली पोषक तत्वे वापरण्यासाठी त्यात पाणी टाकून फिरवून वा उकळून गाळून सूप बनवता येईल. किंवा घरच्या इतर मंडळींसाठी चोथा वापरून पराठे, थालपीठ, आणखी भाजी घालून रस्सा वगैरेही बनवता येईल. चोथ्यात दही-केळे आणि पाणी घालून मिक्सर मधे उत्तम पेय तयार होते. मात्र हे सर्व जूसिंग करणाराने त्या ठराविक दिवसात न घेणे बरे. फार वाटले, तर एकाद वेळी घ्यायला हरकत नाही. ३. सुरुवातीला एकदम महिना-दोन महिने न करता सात-आठ दिवस करणे बरे. नंतर मधे काही दिवस सकाळी एक-दोन ग्लास जूस, बाकी दिवस भर रोजचा आहार (अर्थात मैद्याचे पदार्थ वर्ज्य) असे करून पुन्हा काही दिवसांनी पाच-सात दिवस रसाहार, असेही करता येईल. ४. उत्साह वाढत असल्याने व्यायाम करावासा वाटू लागतो, तो अवश्य करावा, मात्र अति शीण येणारे व्यायाम नकोत. योगासने सर्वात उत्तम. शिवाय पायी चालणे, सायकलिंग, पोहणे वगैरे झेपेल तेवढे करावे. हे सर्व जास्त वेगात करू नये. ५. एवढे केले, की पुढे काय करायचे हे आपोआपच समजते. मी रोज जूस आणि चोथा वापरून केलेली लस्सी/स्मूदी घेणे सुरु ठेवले आहे. पांढरी साखर, ब्रेड-मैद्याचे तळकट पदार्थ, याविषयी आपोआपच विरूचि निर्माण झाल्याने ते मुद्दाम टाळावे लागत नाहीत. कणकेची पोळी कधीतरी खातो, त्याऐवजी भाकरी, थालीपीठ, भात हे 'ग्लूटेन फ्री' अन्न घेतो. प्रत्येकाची प्रकृती निराळी असल्याने आपल्यावर काय परिणाम होतो, हे ज्याने त्याने जागरूकपणे बघून ठरवावे.

काका , लेख वाचुन थक्क झालो आहे. मला पित्ताचा त्रास आहे. (बराच आळशी पण आहे). तुम्ही सांगितलेला प्रयोग करुन बघणार. बाकी वेल्लाभट यांनी दोन ओळीत जीवनसत्य सांगितले आहे. बॉडी अँड सोल इज द ओनली अ‍ॅसेट यू रियली ओन. इन्व्हेस्ट इन वर्काउट अँड गुड हेल्दी डाएट, अँड रीप द डिव्हिडंड कॉल्ड फिटनेस. आभार!

In reply to by आनंदराव

>>>> बॉडी अँड सोल इज द ओनली अ‍ॅसेट यू रियली ओन. इन्व्हेस्ट इन वर्काउट अँड गुड हेल्दी डाएट, अँड रीप द डिव्हिडंड कॉल्ड फिटनेस. बाल की खाल - यु रिअलि 'ओन' द बॉडी???? :)

In reply to by प्यारे१

बाल की खाल - यु रिअलि 'ओन' द बॉडी????
यू आर सपोज्ड टू ओन इट. बट मेनी पीपल जस्ट पझेस इट. अँड दोज हू अझ्यूम ओनरशिप ऑफ इट, टेक केअर ऑफ इट. बिकॉज ओनरशिप कम्स बन्डल्ड विथ रिस्पॉन्सिबिलिटी.

कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा.
मला याबद्दल अधिक माहिती हवी आहे, इथे दिलीत तरी चालेल. वर मोद्कभाउंना पडलेले प्रश्न मलाही पडले आहेत. तसेच आपणास आहारात अचानक बदल केल्या केल्या काही त्रास जाणवला काय ? विषेशतः अपचन, अशक्तपणा, चक्कर वगैरे वगैरे ? मी सध्या रात्री फक्त सफरचंदे आणी संत्री (अधाशासारखा बका बका भरपेट ) खातो. पण यामुळे मला गॅसचा त्रास वाढला असे अनुभवाला आले आहे. त्यामुळे लिक्वीड डायट करायचे माझ्या मनात बरेच दिवस होते पण धिर होत न्हवता. तुमच्या मुळे तो सुदीनही उगवला असे वाटत आहे, आपण माहिती लवकर शेअर करा मी शक्यतो उद्या पासुनच हे करु इछ्चीत आहे. अतिशय धन्यवाद.

जे सदस्य हा प्रयोग लगेचच सुरू करू इच्छितात त्यांनी मी वर दिलेली पीडीएफ वाचून घ्यावी. त्यात म्हटल्याप्रमाणे १५ दिवसांचा प्लान सूरु करण्याच्या एक आठवडाआधीपर्यंत एक सिमॉल प्याक प्लान करावा. ज्यात फक्त दिवसातून एकदा ज्यूस, तळलेले व इतर हानिकारक पदार्थ वर्ज्य, पाणी भरपूर पिणे इत्यादी करावे. नंतर मेनकोर्स ला सुरुवात करावी. सुरवातीचे ३-५ दिवस असहय होण्याची शक्यता आहे. नंतर सुरळीत होईल. अधिक माहिती साठी पिडीएफ नीट वाचून घ्यावी. अजाणतेपणी शरिरासोबत अचानक प्रयोग करू नयेत. एकदा असेच ज्युस-फलाहार टायप डायट करून माझी प्रकृती पार बिघडली होती. चक्कर यायचे. अशक्तपणा वाढला. डॉक्टरकडे गेलो तर तो म्हणाला साखर कमी झालिये. पूर्ण चौरस आहार दोन्ही वेळेला घ्या. पण ह्या सगळ्या धबडग्यात या आगावूपणाचा दोन महिने खूप त्रास झाला. डॉक्टरकडे जायला अजून उशीर झाला असता तर स्वर्गवासी झालो असतो बहुधा, तेही कुणाच्या नकळत. तस्मात् सावधान!

In reply to by तर्राट जोकर

तर्राट जोकर यांच्या वरील प्रतिसादाशी सहमत. मला पूर्ण वेळ मोकळा, दगदगीचे काम काही नाही, मुलगा स्वतः फिजियोथेरापिस्ट आणि या प्रकारचे प्रयोग स्वतः केलेले असलेला, असे असल्याने निश्चिंतपणे प्रयोग करता आला. सावधगिरीने वागणे बरे, पण थोडी हिंमतही करणे आवश्यक. १५ दिवसांचा प्लान सूरु करण्याच्या एक आठवडाआधीपर्यंत एक सिमॉल प्याक प्लान करावा.... हे उत्तम. साखर, मैद्याचे पदार्थ वर्ज्य करावेत. १५ दिवस जमत नसेल तर ७ दिवस करावे.

डॉक्टर खरे साहेबांचे ह्या पोटातुन निघणार्‍या सर्पा विषयी मत आणि माहिती वाचायला आवडेल. डॉक्टरांनी त्या बाबतीत मौन च पाळले आहे असे दिसते.

In reply to by प्रसाद१९७१

रस-आहारावर वीस दिवस दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो

In reply to by सुबोध खरे

मी गेली २४ वर्षे क्षकिरण तज्ञ म्हणून काम करीत आहे त्यात बेरियम एनिमा हि एक तपासणी येते. यात रुग्णाला प्रथम साधा एनिमा देऊन पोट साफ केले जाते त्यानंतर बेरियम सल्फेटच्या द्रावणाचा एनिमा दिला जातो आणी हा द्रव कुठपर्यंत जातो आहे कुठे अडकतो ई चे एकस रे घेतले जातात. इतक्या वर्षात कोणत्याही रुग्णाच्या पोटातून असा काळा सर्प बाहेर पडलेला नाही. शिवाय मी बर्याच एण्डोस्कोपी पाहिल्या आहेत ज्यात माझ्या आई आणी वडिलांचाही आणी अनेक नातेवाईक आणी रुग्णांचा समावेश आहे. यापैकी एकाच्याही मोठ्या आतड्यात असा काळा सर्प मला किंवा माझ्या माहितीतील कोणत्याही पोटाच्या विकाराच्या तज्ञाला आढळून आलेला नाही. https://en.wikipedia.org/wiki/Mucoid_plaque चित्रगुप्त साहेबांचा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे तो नाहीच असे मी कसे म्हणू शकतो. पण माझ्या अनुभवात असे कधीही आढळून आलेले नाही. बाकी त्यांनी केलेल्या खालील गोष्टी सर्वानीच कराव्या अशा आहेत त्याबद्दल दुमत नाहीच. रस-आहारावर वीस दिवस दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो

In reply to by एच्टूओ

@एच्टूओ: अमेरिकेत नेहमी नवनवीन फॅड्स येत असतात, आणि त्यावर उलट-सुलट चर्चा, मतप्रवाह, त्या आधारे लाखो डॉलरांची उलाढाल वगैरे चाललेले असते. मी हा जो प्रयोग केला, तो याबद्दल उलट-सुलट मते न वाचता केला, आणि त्याचा अतिशय उत्तम परिणाम मला मिळाला. तुम्ही वर दिलेली लिंक अजून मी वाचलेली नाही. त्यात काय सांगितले आहे, हे थोडक्यात इथे सांगितले तर बरे होईल.

In reply to by सुबोध खरे

'काळा सर्प' हे मी गमतीने दिलेले नाव आहे, परंतु त्यामुळे काहीतरी 'काळा, सॉलिड जीव' अशी कल्पना होते, तसे मात्र नाही. स्वयंपाकघराच्या सिंकच्या खाली पाणी वाहून नेणार्‍या प्लास्टिकच्या नळीतून जशी लांबट बुळबुळीत घाण निघते, तसे ते होते. मला वीसेक वर्षांपासून फिस्टुलाचा विकार होता, त्या अर्थी एवढ्या प्रमाणावर घाण साठून असणे सहाजीकच वाटते. दुसरे म्हणजे एरव्ही विष्ठा तुकड्या-तुकड्यात निघते, तसे न होता एकच एक लांब गुंडाळी सरसर निघाली, हे वेगळेच वाटले. (एक जिज्ञासा: बकरीच्या अगदी गोल, गुळगुळीत लेंड्या कश्यामुळे असतात ?)

चित्रगुप्तजी, अभिनंदन. फॅट, सिक, निअरली डेड हा शिनेमा पाहीन. मी त्यातील फॅट, सिक व निअरली डेड अशी नसले तरी तब्येत चांगली ठेवण्याविषयी आलेले लेख, चित्रफिती पाहते (व्यायामही नियमीत करते). तुमच्यासारखा प्रयोग करण्याचे धाडस अजून नाही कारण त्याने काही कमी जास्त झाले तर नस्ता उद्योग होऊन बसायचा असे वाटते. शिवाय हा आहार काही आमचा रोजचा आहार नसेल. मग काय करायचे? हा प्रश्न आहे.

चित्रगुप्त साहेब, तुमचा हा लेख ज्यांना, माझ्या सारखेच, वजन कमी करायचे आहे आणि जमत नाही अशा सर्वांसाठी, अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. ते कृमी आणि कालसर्प अविश्वसनिय वाटते आहे तरी पण, तुमचा स्वानुभव असल्याकारणाने, हे का झाले असावे आणि फक्त तुमच्याच बाबतीत (फिस्तुला इतिहास) झाले की सर्वांच्याच पोटात असे कांही भयंकर वास्तव्यास असते अशा संभ्रमात मी आहे. सामान्यतः आतड्यात गांठ वगैरे होऊन मलावरोध होतो आणि तदनुषंगाने इतर आजार होतात. त्यावर शस्त्रक्रियेने अशी गांठ दूर केली जाते आणि मार्ग मोकळा होतो असे पाहिले आहे. असो. आता पंचांग पाहून, लवकरात लवकरचा 'मुहूर्त शोधून', आपण शिफारस केलेला आहार सुरु करायचा प्रयत्न करणार आहे.

चित्रगुप्त साहेब, तुम्ही दिल्लीला परतला असाल तर, पुन्हा एखाद्या दिवशी भेटू. मलाहि वजन कमी करायचे आहे, आपला सल्ला उपयोगी पडेल.

In reply to by विवेकपटाईत

विवेकश्री, मी दिल्लीला २० नोहेंबरला परतणार आहे. त्यानंतर आपण पुन्हा महाराष्ट्र सदनात कट्टा करूया. आणखी जी मंडळी तिकड असतील, त्यांची माहिती तोपर्यंत काढून ठेऊया. सध्या दिल्लीत लाल गाजरे, चुकंदर, पालक, मेथी, खीरा (हिरवा कंच अमेरिकन खीरा घ्या) किन्नोर सफरचंदे, नाग, बब्बूगोशा, देसी टमाटर, आवळे, सिमला मिर्च, दुधी भोपळा, मोसंबी, संत्री, अननस, द्राक्षे वगैरे सर्व उत्तम मिळत असेल, जूससाठी त्याचा लाभ घेणे सुरू करा.

माझ्या अमेरिकन मित्रानी मला याचे बरेच फायदे सांगितल्यानंतर असाच उत्साहानी ज्यूसर घेवून आलो आणी रोज सकाळी भाज्या आणी फळांचा ज्यूस प्यायला सुरुवात पण केली होती. कशामुळे तरी खंड पडला आणि मग आता ज्यूसर नुसतीच जागा अडवून पडला आहे. या निमित्ताने परत एकदा चालू करावे असं वाटतंय. संपूर्ण दिवस फक्त ज्यूस प्यायचं आत्ता तरी जरा अवघड वाटतंय. पण TJ नि दिलेल्या PDF मधील १५ दिवसांचे बघायला पाहिजे. धन्यवाद चित्रगुप्त काका आणि TJ.

In reply to by ट्रेड मार्क

प्रयोगासाठी अनेक शुभेच्छा! नीट प्लानिंग करून सुरुवात करा. कारण रोजचं कॅलरी इन्टेक शरिराच्या गरजेनुसार मॅच झालं पाहिजे. त्यामुळे हळू हळू सुरू करा. ज्युसिंगचा उद्देश बहुधा पचनसंस्थेवर ताण येऊ न देता आतड्यास उपास घडवणे असा काहीसा आहे असे वाटते. त्यामुळे रोजच्या आयुष्यासाठी आवश्यक इतकी उर्जा मिळेल इतकं पोटात जाणं आवश्यक अन्यथा सुगर वा इतर काही कमी पडून तब्बेतीवर परिणाम होऊ नये. जसा माझ्याबाबतीत झालं होतं ते बघता.....

वजन तर कमी करायचे आहे. पण यामुळे काही उलट होउन दांड्या मारायला लागू नयेत असे वाटते आहे. रोजची कामे करायचीच आहेत. त्यामुळे कोणी जर फुल प्रूफ प्लान देत असेल तर सीरीयसली करायला तयार आहे. ईथे कोणी विपश्यनेला जाउन आले आहे का? तिकडे रोजचा आहार अशाच प्रकारचा असतो असे ऐकीवात आहे. सरळ विपश्यनेला जावे काय?

In reply to by खटपट्या

विपश्यनेचा आहार हा त्या दहा दिवसाच्या जीवनशैलीला अनुसरुन आहे. तस्मात तो आहार रोजच्या धावपळीच्या जीवनात उपयोगाचा नाही. पण त्या दहा दिवसात त्वचेवर तजेला व शारिरिक हलकेपणा येतो. वजन खास कमी होत नाही. पण एकूण मानसिकतेवर खुप चांगला परिणाम होतो.

In reply to by खटपट्या

ईथे कोणी विपश्यनेला जाउन आले आहे का? तिकडे रोजचा आहार अशाच प्रकारचा असतो असे ऐकीवात आहे. आता काही बदल झाला असला तर माहित नाही (शक्यता कमी आहे), पण १० वर्षाआधी विपशना केली होती, तेंव्हा लेखात लिहिलेल्या पैकी काहीच नव्हतं तिथल्या रोजच्या आहारात.

In reply to by खटपट्या

रोजच्या जीवनशैलीत जे बसवता येईल आणि सासत्य टिकवता येईल तेच करणे जास्त योग्य आहे. एक सल्ला - वजन कमी करणे हे टारगेट ठेवू नका. सतत हालते रहा. बैठे काम असले तरी आवर्जून हालचाल करणे बघाच. म्हणजे लिफ्ट न वापरता जिन्याने जाणे, पाणी आपल्या ऑफिसमध्ये न भरुन ठेवता मुद्दाम लांबच्या नळावरुन आणणे, हाफिसातल्या हाफिसात ईमेल किंवा फोनवरुन सहकार्‍यांबरोबर होणारी कामे आवर्जून त्यांच्या ऑफिसात चालत जाऊन करणे. शिवाय घरापासून थोड्या अंतरावरची कामे चालत जाऊन करणे शक्य असेल तर तसेच करणे, सायकल जेव्हा सोयीची असेल तेव्हा वापरणे. किमान २५-३० मिनिटे व्यायाम रोज करणे. आणि मुख्य म्हणजे खाताना पोर्शन कंट्रोल. एका जेवणात समजा दोन पोळ्या खात असलात तर फक्त चतकोर किंवा शक्य असेल तर अर्धी पोळी कमी करा. एवढ्याने काय फरक पडणार असे वाटते परंतु वजनही असेच हळूहळू वाढलेले असते हे आपण विसरतो:)आणि या सगळ्याचा पॉझीटिव साईडइफेक्ट म्हणजे वजन कमी होणे हा असतो!:)

In reply to by खटपट्या

विपष्यना अवश्य करा. अर्थात आपण म्हणता तसा आहार त्यात अजिबात नसतो पण इतर फायदे बरेच आहेत.

In reply to by द-बाहुबली

मी पंधराएक वर्षांपूर्वी विपश्यनेचा कोर्स केला, तो सहज, निर्हेतुक कुतुहलामुळे. मात्र त्यात माझी पाठदुखी बरी झाली ती आजतागयत. मात्र त्यानंतर मी एक दिवसही विपश्यना केलेली नाही. कोर्स मधे मात्र पूर्ण समर्पणाने केली.

In reply to by खटपट्या

मी २०११ पासून रोज विपश्यना करतो. आताही मी ६० दिवसाच्या शिबिरात सेवा देतोय. इथे सकाळी नाष्टा पोहे, शिरा, उपमा, साबूदाना खिचड़ी , ढ़ोकळा, खाकरा, ब्राउन ब्रेड, केळी आनी सीजनल फळे असा असतो. चहा आणि दुधही असते. दुपारी कमी तिखट कांदा लसुन नसलेलया २ भाजी,डाळ् भात, चपाती, सॅलाड, रायता, ताक किंवा दही असे जेवण असते. संध्याकाळी ५ वाजता फक्त लिंबुपाणी असते. प्रथमच १० दिवसाचा कोर्स करणार्यांसाठी संध्याकाळी चिवड़ा आणि चहा किंवा दूध असते. विपशयना मुख्यता मन निर्मळ करण्याची साधना आहे. पण मनाचा शरिरावर खुप प्रभाव असल्याने मनाच्या आरोग्याचा शरीराच्या आरोग्यालाही फायदा होतो.

असे डाएट करायचे म्हणजे मनाचा पक्का निग्रह हवाच. तुमचे वय बघता तुम्ही हा उत्साह दाखवलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन. आणि तुमचे अनुभव इथे मांडलेत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! हे मला जमेल असे वाटत नाही परंतु दैनंदिनीमध्ये यातले काही प्रकार कसे बसवता येतील याचा विचार करु शकतोच.

माझा मुलगा, ज्याच्यामुळे हा प्रयोग आम्ही केला, हल्ली महिनाभरापासून जूसिंग करतो आहे.सकाळी साडेसहाला तो ऑफिससाठी निघतो, त्यापूर्वी आमची सून त्याला दोन-तीन (काचेच्या) बाटल्यात एक हिरवे आणि एक लाल जूस ताजे काढून देते, ती स्वतःही दोन बाटल्या नेते, आणि आमच्यासाठीपण काढून ठेवते. ते दोघे घरी साडेचार-पाचला येतात, तो पर्यंत जूसवरच असतात. संध्याकाळी अगदी हलका आहार सर्वजण घेतो. शिवाय पुन्हा जूसही घेतो. पंधरा-वीस दिवसाच्या जूसिंग नंतर मुलाचा आळस दूर होऊन तो आता संध्याकाळी चार-पाच मैल धावू लागला आहे. हे सांगण्याचा हेतु हा की करायचेच म्हटले, तर सर्व करता येते.