Skip to main content

आयटीवाले !

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 08/10/2015 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एक लेख वाचण्यात आला. त्यात आयटीतील लोकांच्या रोजच्या जीवनमानाबद्दल लिहीले होते. त्यां लेखाचा मतितार्थ असा होता की आयटीतील लोक खूप स्वच्छंद जगतात. त्याना हवे तेवढे पैसे उपलब्ध असतात मात्र नशिबात आईच्या हातची गरम भाकरी खाण्याचे सूख मात्र नसते. एकूणातच समाजातील आयटीवाले हा एक छोटा वर्ग लोकांच्या चर्चेचा नेहमीच विषय असतो. यातील काही कॉमन अभिप्राय/प्रश्न असे आहेत. तुम्हालाही असे अनुभव आले असतील्.तुम्हाला काय वाटतंय या अभिप्रायांबद्दल? लोकांच्या मते १)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात. २) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात. ३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ? ४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत. ५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला. ६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात. ७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्‍या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..) ८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही. ९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही १०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.

वाचने 67309
प्रतिक्रिया 209

प्रतिक्रिया

काय विजुभौ ! आज सुट्टी का मधेच? बाकी प्रश्न विचार करण्यासारखे हाएत खरं ! (शॉपफ्लोर वाला ) खेडूत ….

माझा पास. या गोष्टींबद्दल बोलण्यात पण अर्थ नाही. आधीच एव्हढे सगळीकडे बोलून झाले आहे. जाता जाता - पूर्वी मला कोणी काम काय करता असे विचारले तर कंपनीचे नाव सांगायचो. हल्ली फक्त आयटी मध्ये आहे असे सांगतो. विचारणारा किंवा त्याची मुले आयटीमधलीच असेल तर कंपनी वगैरे विचारतो. नाहीतर तो पण आयटी म्हणल्यावर गप्प बसतो. तरी पण कोणी फारच मागे लागला तर तुम्हाला कंपनी माहीत नाही असे सांगतो.

In reply to by आनन्दा

बाकी माझा एक मॅनेजर मला काही वर्षांपूर्वी म्हणाला होता, की आयटी पण आता लवकरच फॅक्टरी मोडमधे जाईल. तसे काही खरेच झालेले आहे का याबद्दल वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांमधील लोकांचे मत ऐकायला आवडेल.

१)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात. भारतातली आजची परिस्थिती ठाऊक नाही पण सात आठ वर्षांअगोदर किमान आठ दहा वर्ष किंवा अधिक अनुभव असणारे त्यांच्या अमेरिकेन काउंटरपार्टच्या तुलनेत खूपच चांगला पगार मिळवायचे. याउलट फ्रेशर्सचा पगार त्यांच्या अमेरिकन काउंटरपार्टच्या तुलनेत अतिशय लाजीरवाणा असायचा. (म्हणायचा अर्थ हा की अमेरिकेत फ्रेशरच्या दुप्पट पगार मिळवायला कदाचित १२-१३ वर्षे लागू शकतात. भारतात १२-१३ वर्षे अनुभव असणारा मा.तं अभियंता कदाचित फ्रेशच्या आठ नऊ पट पगारही मिळवायचा (आजचे ठाऊक नाही). २) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात. जगात कुणी कुणाला फुकट पैसे (पगार) देत नसते. संगणकीकरणामुळे एसी आजकाल प्रत्येक ठिकाणी सरकारी वा खाजगी कार्यालयात असतो. उगाच एसींना मध्ये आणू नये ३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ? अगदी जुजबी अनुभव असताना परदेशातल्या व्यक्तींकडून काम वा त्याबाबतच्या अपेक्षा काही मिनिटांच्या फोन कॉलमध्ये समजावून घेऊन ते पार पाडणे हे काही वेळा चांगलेच आव्हानात्मक काम असू शकते. ४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत. भारतातील मोठ्या शहरांमधल्या जागांच्या किमती वाढण्यासाठी भारतात काळा पैसा असणारे श्रीमंत लोक सर्वाधिक जबाबदार आहेत. त्यानंतर काही निवडक शहरांत खूप सार्‍या मा. तं. कंपन्यांना कार्यालये थाटू देऊन त्यांचे संख्येने अधिक शहरांत विकेंद्रीकरण होऊ न देणे हे अत्यंत अदुरदर्शी धोरण भारतातल्या विविध राज्यांच्या सरकारांनी राबवले आहे त्याचेही दुष्परिणाम सर्वांनाच सहन करावे लागत आहेत. ५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला. परदेशात जगण्यासाठीही पैसे लागतात. तिथला आयकर व इतर कर भारतापेक्षा अधिक असतो. त्यामुळे या दाव्यातली कमाईची रक्कम अतिरंजित आहे. ६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात. ऑनसाईट मगरपट्ट्यापासून रत्नागिरी व जळगावलाही असलेले पाहिले आहे. ७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्‍या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..) याबाबत शून्य अनुभव असल्याने भाष्य करू शकत नाही. ८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही. समानतेच्या युगात याबाबतीत केवळ मुलींचा विचार करणे चुकीचे आहे. मी या क्षेत्रात करियर केले असल्याने बहुतांश तरुण तरुणींना व्यवस्थित घरकाम करताना पाहिले आहे. मी व माझी बायकोही व्यवस्थित घरकाम करणार्‍या गटातच मोडतो. ९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही याबाबत फार अभ्यास नाही पण अमेरिकेसारखे नवउद्योजकांसाठी मैत्रीपूर्ण वातावरण आपल्याकडे अजिबात नव्हते. शिक्षणक्षेत्रही अजिबात प्रॅक्टिकल ओरिएन्टेड नाही. १९९१ नंतर उदारीकरणामुळे बरेच काही शक्य झाले. हेच १५-२० वर्षे आधी सुरु झाले असते तर कदाचित आज चित्र बरेच वेगळे असते. १०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल. असे करणे अशक्य असल्याने हे विधान भाष्य करण्याजोगे नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

त्यानंतर काही निवडक शहरांत खूप सार्‍या मा. तं. कंपन्यांना कार्यालये थाटू देऊन त्यांचे संख्येने अधिक शहरांत विकेंद्रीकरण होऊ न देणे हे अत्यंत अदुरदर्शी धोरण भारतातल्या विविध राज्यांच्या सरकारांनी राबवले आहे त्याचेही दुष्परिणाम सर्वांनाच सहन करावे लागत आहेत.
हा अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. ऐरोलीत जे प्रचंड SEZ उभे आहेत ते पाहुन नेहमी वाटते की हे असे नाशीक, सांगली, कोल्हापुर, नागपुर, अमरावती, जळगाव, औरंगाबाद, सोलापुर अणि अशी अन्य शहरे इथे का नाही होत. ज्या मुळे ह्या शहरातला विकास होण्यास मदत झाली असती आणि मंबईतील गर्दी कमी झाली असती. स्थानीक मुलांना वाव मिळाला असता.

In reply to by मराठी_माणूस

असहमत. जेवढं टलेंट (संख्येच्या प्रमाणात) मुंबईत एकवटून आहे तेव्हढं इतर ठिकाणी नाही. वरच्या सर्व शहरांमधून लायक मुलं मुंबईत येतात. छोट्या शहराच्या ठिकाणी टॉप मॅनेजमेंट पासून ग्राऊंड लेबर पर्यंत सर्व प्रकारचं स्किलसेट असणारं मनुष्यबळ मिळत नाही. मिळालं तरी त्यांना ज्या प्रकारच्या सोयीसुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर ची आवश्यकता आहे ते उभारायला वेळ आणि पैसा प्रचंड लागेल, तसेच टॉप मॅनेजमेंट मेट्रो शहरे सोडून छोट्या शहरांमधे करीयर करायला उत्सूक नसतात हे ही आहेच. दहा लाख माणसं एकाच ठिकाणी काम करणं, तीच दहा लाख पन्नास ठिकाणी काम करणं याचे आपआपले फायदे तोटे आहेत. दहा वर्षांआधी विकेंद्रीकरण अशक्य होतं, आज शक्य आहे तर आयटीक्षेत्र संपृक्त होत आहे. पैशाकडे पैसा येतो ह्या तत्त्वाप्रमाणे मेट्रोजमधे आधीच माणसं होती, त्यांनी काम करून अधिक व्यवसाय/संपत्ती मिळवली, त्याने अधिक लोक आकर्षित होऊन, बोलावल्या जाऊन गर्दी वाढली. छोट्या शहरांचा विकास 'बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर व दर्जेदार शिक्षण' या दोन गोष्टी दिल्या तरी आपोआप होईल. आयटी हेच प्रचंड पैसा देणारे क्षेत्र आहे असे नाही. प्रत्येक शहराची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. त्यांना जगराहाटीचे ज्ञान आले तरी भर भराट शक्य आहे. नुसते बांबू विकणारे एक छोट्याशा गावात सगळे करोडपती आहेत. 'माहिती तंत्रज्ञान' मोठे क्षेत्र आहेच पण त्याही पेक्षा योग्य माहीती व उपयोगी तंत्रज्ञान हे विकासाचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे हेही लक्षात ठेवले पाहिजे.

In reply to by तर्राट जोकर

असहमत. माणसे जीथे रोजगार असेल तिथे जातील. इन्फ्रास्ट्रक्चर सुध्दा हळु हळु तयार होउ शकेल. आज मुंबई मधे काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे? २/४ की.मी. साठी तासंतास खर्च करावे लागतात. कॉस्ट ओफ लीवींग सुध्दा ज्यास्त आहे. इथल्या पेक्षा निम्या खर्चात छोट्या शहरा मधे लोक आनंदात राहु शकतात. इन्फोसिस , विप्रो यांनी जेंव्हा सुरुवात केली तेंव्हा बेंगलोर मधे काय होते .

In reply to by मराठी_माणूस

असहमती कबूल. मतभेदाच्या मुळाशी दोन वेगवेगळे दृष्टीकोन आहेत असं वाटतंय. बंगलोरमधे दर्जेदार मनुष्यबळ होते. विकास घडायला काहीतरी मजबूत निविष्ठा (रीसोर्स) लागतेच. मुंबईत ज्या लेवलचे मनुष्यबळ आहे ते तुम्ही उल्लेखित शहरांमधे नाही. जे आहे त्यांना तिथे राहयचे नाही. कारण तसा स्कोप नाही. तुमच्यापेक्षा माझा दृष्टीकोन वेगळा आहे, तुम्ही आज आलेली भरभराट बघत आहात. 'सुरुवात होण्यास काय पार्श्वभूमी होती' हे आता कळले आहे. म्हणून असे म्हणू शकतो की इन्फ्रा-स्ट्रक्चर अस्ते तर विकास झाला असता. पण हेच अंधार असतांना कळत नसते. आपण 'आज' विकेंद्रीकरण केले असते तर बरे झाले असते असे म्हणतो. आयटी ही काही आपली मक्तेदारी नव्हती किंवा सरकारी उपक्रम नव्हता. उपलब्ध जागेत, उपलब्ध परिस्थितीत ताबडतोब काम सुरू केले म्हणून जगात आज आपले नाव आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि विकेंद्रीकरण करण्याच्या नादात ती संधी गमावली असती तर आयटीमधे चायना-फिलिपाइन्स आज भारताच्या जागी असते. कारण त्यांना उशीर झाला तो त्यांच्या इंग्रजीच्या कमकुवतपणामुळे. ज्या काळात ते इंग्रजीवर मेहनत घेत होते तोवर आपण बाजी मारली. अगदी हेच आपल्यासोबतही झाले असते. त्या विशिष्ट वेळी 'केवळ इंग्रजी चांगले' म्हणून भारताला हे दिवस दिसले. याचा अर्थ आपल्या लोकांच्यात हुशारी कमी आहे असा नाही. दोन तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमधे एका साध्याशा पॉइंटने हारजीत होते. म्हणून तो साधासा मुद्दाच 'फक्त' महत्त्वाचा असे नाही. चांगले इंग्रजी हेही आपले एक रिसोर्स होते. विकास घडायला रिसोर्स आवश्यक आहेत, ते जिथे असतील तिथेच उजेड पडतो. राहीला तो मुंबैच्या प्रवासाचा त्रास. वाहतूक सोडली तर आणखी काय त्रास आहे मुंबैत? घरात नळ असले तरी आठ-पंधरा दिवस पाणीबंदी नाही, पाणी नदीवर जाऊन आणावे लागत नाही. विहिरीत उतरून तासंतास कळशीभर पाणी चमच्याने भरावे लागत नाही. सोळा सोळा तास वीज जात नाही. शाळा-कॉलेजांचा दर्जा भंगार नाही, दळणवळणासाठी सकाळी एक बस, सायंकाळी एक असा प्रकार नाही. इंटरनेट तर सोडा मोबाइलच्या रेंजसाठी झाडावर चढावे लागत नाही. एवढ्या सार्‍या सुविधा असून मुंबैला शिव्या घालणे रोचक आहे. दुसरा मुद्दा कॉस्ट ऑफ लिविंगचा. जगातल्या सर्व प्रमुख शहरांचे कॉस्ट ऑफ लिविंग त्यांच्या नजीकच्या छोट्या शहरांपेक्षा कैक पटीत जास्त आहे. तो अर्थशास्त्राचा नियम आहे. रडून उपयोग नाही. जास्त पैसे कमवायला लोक शहरात येतात. याचाच अर्थ कुणाला तरी जास्त पैसे द्यावेच लागणार ना? मुंबैतल्या एका मिठाइवाल्याकडे एक पोर्‍या काम करतो, त्याला गावात पन्नास रुपये रोज मिळत असतो, ते सोडून तो इथे दोनशे रुपये रोज कमवायला येतो. मिठाइवाला २०० रुपये किलोनेच मिठाइ विकणार, त्याला गावातल्या मिठाइवाल्यासारखं ५० रुपयांनी विकायला नाही परवडत. ज्यांना ५० रुपयाच्या मिठाइत सुख वाटतं त्यांनी मग दोनशे रुपये पगाराची अपेक्षा धरू नये.

In reply to by तर्राट जोकर

हे क्षेत्रच जेंव्हा बाल्यावस्थेत होते तेंव्हा बंगलोर मधे ह्या क्षेत्रा साठी लागणारे मनुष्यबळ मुबलक होते हे कशावरुन म्हणता येईल ? मुंबई मधे ह्या क्षेत्रात काम करणारी जास्तीत जास्त मंडळी ही मुंबई बाहेरची आहेत. ही मंडळी, त्यांना काम अन्य शहरात मिळाले तर ते तीथे जातील. घरच सोडायचे असेल तर कुठेही जाता येईल. बाकी तुम्ही म्हणता ते पाणी आणि वीजेची परिस्थीती ही इतकी बिकट नाही (विहिरीत उतरून तासंतास कळशीभर पाणी चमच्याने .....वगैरे ). आता तर मंबईत सुध्दा २०% पाणी कपाती मूळे त्रास सुरु झाला आहे. १९९६-९७ मधे सतत वीज जाणे हे बँगलोर मधे मी स्वतः अनुभवले आहे. दुरद्रूष्टीची गरज आहे. ज्या लोकांची मेट्रो मधे ऑफिसेस आहेत ते त्यांची एक छोटी शाखा लहान शहरात सुरु करु शकतात.

In reply to by मराठी_माणूस

मी मुबलक मनुष्यबळ नाही तर दर्जेदार मनुष्यबळ म्हटले आहे. ह्यात राजकारण्यांपासून अभियंत्यांपर्यंत सगळेच आले. मुंबैत येणार्‍यांना मुंबैचे अप्रूप आहे. गावात काम मिळाले तरी करणार नाहीत. इतर ठिकाणी जाय्ला काही हरकत नाही पण तिकडे मुंबैसारखे ग्लॅमर नाही. इतर ठिकाणी केवळ वीज-पाणी नाही, इतरही खूप समस्या आहेत. आयटी हा धंदा आहे, प्योर बिजनेस. एखादी शाखा अविकसित शहरात सुरु करून तिथल्या स्थानिकांचे टॅन्ट्रम झेलायला रो.ह.यो. नाही. तरीही काही लोकांनी स्थानिक भाषेतली कॉलसेंटर्स सुरू केली आहेत. विशेष कौशल्य न लागणारे बॅक-ऑफीस, बी.पी.ओ. सुरु केले आहेत. कोअर आयटीची शक्यता कमी आहे. कारण आधीच म्हटल्याप्रमाणे हे क्षेत्र सॅचुरेशनकडे फार वेगाने जात आहे. दोन हजार सालाच्या आसपास आपल्या लोकांना आयटीचे महत्त्व कळायला लागले. पण पंधरा वर्षातच आयटीचा जोर ओसरला आहे. हालचाल होऊन काही करण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ लागतो. ठाण्याचा एक फ्लायओवर व्हायला ८ वर्षे गेली. ह्या गतीने शाळा, कॉलेजं, त्यांचे योग्य अभ्यासक्रम, ते शिकवणारे दर्जेदार शिक्षक, आयटी-शिक्षण-व्यवस्था, संपर्क-व्यवस्था, दळवळण, जीवनमान उंचावणारे इतर सुविधा, जेणेकरून टॉप-मॅनेजमेंटला सुखकर वाटेल अशी वातावरण निर्मिती, इत्यादी एवढ्या कमी कालावधीत उभे करून उत्पादनास तयार करणे अशक्य होते. मी निराशावादी नसून प्रचंड आशावादी आहे. आयटी इंडस्ट्रीने भारतासाठी यशाचे एक मोठे दालन उघडले आहे. याचा फायदा घेऊन देशातला तरुण आपल्या राहत्या शहरात बरंच काही करू शकतो, त्यास सरकारवर अवलंबून राहायची गरज नाही. असेल तर तसा तो दबाव आणू शकतो. पण तो ते सोडून आरक्षण, मांसबंदी, मोबाइल सर्फींग, वॉट्सॅप, इत्यादी फुटकळ आणि अनुत्पादक बाबींमधे गुरफटला जातोय. इतर अनेक क्षेत्रात जगासाठी भारत उपयुक्त आणि भरिव काम करू शकतो. दूरदृष्टीची गरज आहेच, पण ती वेगळ्या पद्धतीच्या.

In reply to by तर्राट जोकर

पायाभूत सुविधांचा अभाव असूनही काही शहरांमध्ये मातं कंपन्यांची क्षमतेपेक्षा खूपच अधिक कार्यालये निघत राहिली. याउलट पायाभूत सुविधांमध्ये उत्कॄष्ट असूनही केवळ भौगोलिक स्थान तेवढे सोयीचे नसल्याने नागपूरसारख्या शहरांत अगदीच जुजबी संख्येने मा.तं कंपन्यांचा प्रसार झाला. औरंगाबादबाबत फारसे ठाऊक नाही पण जेवढे पाहिले आहे अन जेवढी माहिती आहे त्यानुसार तिथेही बर्‍यापैकी प्रसार होऊ शकला असता. सरकारांनी पुढच्या दोन तीन दशकांचा विचार करून धोरण आखणी करायची असते. आपोआप घडणार्‍या गोष्टींनाच साहाय्य देऊन आला दिवस ढकलणे हे तर कुणीही करतच असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

आयटीसाठी दर्जेदार मनुष्यबळ महत्त्वाचं आहे. पायाभूत सुविधांचा तेवढा अडथळा भासत नसावा. नागपूर मागे पडण्यामागे भौगोलिक स्थानाचा दोष नसून कुशल मनुष्यबळाचा असावा. महाराष्ट्रातून सगळं क्रीम पब्लिक शिकून पुण्या-मुंबै कडे धाव घेतं. अ‍ॅप्टेकच्या शाखा अगदी छोट्या छोट्या शहरांतही निघाल्या पण तिथे शिकलेल्यांना संधी पुण्या-मुंबै-बेन्गलोर-हैदराबाद इथंच. तेव्हा एकदा सवय लागली आणि झापड बसली की कुणी दुसरा विचारच येत नाही. राजकिय दूरदृष्टी तर परम आवश्यकच. त्यांच्याकडून कुशल मनुष्यबळ तयार करण्याकडे दुर्लक्ष झाले म्हणावे तर मेट्रोजमधे येणारे हे भारतीयच आहेत ना?

In reply to by तर्राट जोकर

नागपूर अन भोवतालच्या दोनशे अडीचशे किमी त्रिज्येतले अभियंते गेल्या दोन दशकांत प्रामुख्याने बंगरुळू, हैद्रबाद अन पुणे येथून सुरुवात करून मोठ्या संख्येने सर्वच मा.तं. कंपन्यांमध्ये पोचले. मी देखील त्यापैकीच एक. सुरुवातीच्या काळात नागपूरमध्येच नोकरी करायला मिळण्याची संधी असती तर यापैकी मोठ्या प्रमाणात हे अभियंते लांब गेले नसते. राजकीय अदूरदर्शीतेचा मुद्दा मी माझ्या पहिल्याच प्रतिसादात मांडला आहेच.

In reply to by श्रीरंग_जोशी

पण त्यापैकी कुणीही परत येऊन या दोनशे अडीचशे किमी त्रिज्येत स्वतःची आयटी कंपनी स्थापन केली नाही. वीज, इंटरनेट आणि थोडेसं भांडवल एवढं सोडलं तर अजून पायाभूत सुविधा काय लागतात एका आयटी कंपनीला? इथे सरकारने नक्की काय मदत करावी अशी अपेक्षा होती? तरी सरकारने हात आखडतेही घेतले नव्हते. नागपूरहून छोट्या शहरांमधे आज कैक स्थानिक सॉफ्टवेअर कंपन्या स्वतःचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारून चांगले काम करत आहेत. मुंबैत तर बरेच लोक सब-कॉन्ट्रॅक्ट घेऊन घरगुती फ्लॅटमधे १०-१० जणांच्या टीम बनवून काम करत आहेत. यातूनच मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या निर्माण होतात. आपण कुठल्या अँगलने या प्रश्नाकडे बघतो त्यावर मत ठरते असं वाटतं. मी विदर्भातल्या टॅलेंटला कमी लेखतो असा आपला गैरसमज झालेला दिसतो. 'इथून सारे बाहेर गेले' हेच आपणही मांडले, मीही. अँगल वेगळा आहे. 'पैशाकडे पैसा जातो' हे अर्थशास्त्राचं तत्त्व आहे. 'पैशाकडे माणूस जातो' हे मानसशास्त्र आहे. आपल्याकडे पैसा यावा असे वाटत असेल तर काय करायला हवे ते विदर्भात होत नसेल.

In reply to by तर्राट जोकर

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असणे फार आवश्यक असते असे वाचले होते. मुंबई-पुणे दृतगती महामार्ग नसता तर पुण्यातही या उद्योगाचा एव्हढा विस्तार झाला नसता. नागपूरहून थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे आजही कमीच असावीत. तेव्हढ्यासाठी मुंबई वा हैदराबाद गाठावे लागणे हा दोष असल्यामुळे नागपूरचा समावेश आयटी-सिटींमध्ये झाला नाही.

In reply to by एस

नागपूर-मुंबई विमानप्रवास पुणे-मुंबई एक्प्रेसपेक्षा जास्त वेगवान आहे. पण विदर्भात सामान्य लोकांची मानसिकता हाच फॅक्टर जास्त महत्त्वाचा वाटतो.

In reply to by एस

हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकाही अमेरिकन एअरलाइनची थेट सेवा आजही उपलब्ध नाही. अमेरिकेतून हैद्राबादला जाताना एक तर लोक आखातातून जातात किंवा भारतातल्या इतर मोठ्या विमानतळांवरून कनेक्टिंग फ्लाइटने जातात. कुठल्याही शहरात जोमाने उद्योग सुरु झाले की थेट किंवा कनेक्टेड फ्लाइट्सने मोठ्या प्रमाणावर ते शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडले जाऊ लागते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गामुळे पुण्यातल्या मा.तं. उद्योगाच्या प्रगतीला मोलाचा हातभार लागला या निरिक्षणाशी सहमत. अवांतर - पर्सिस्टंट कंपनीचे संस्थापक व सिइओ आनंद देशपांडे ९० च्या दशकात दर गुरुवारी मुंबईला क्लायंट इमेल चेक करून रिप्लाय करायला जात असत कारण तोवर पुण्यात इंटरनेट उपलब्ध होऊ शकले नव्हते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अवांतर - पर्सिस्टंट कंपनीचे संस्थापक व सिइओ आनंद देशपांडे ९० च्या दशकात दर गुरुवारी मुंबईला क्लायंट इमेल चेक करून रिप्लाय करायला जात असत कारण तोवर पुण्यात इंटरनेट उपलब्ध होऊ शकले नव्हते.
काय सांगता, ही गोष्ट नक्की कधीची आहे? आमच्या मिरजेतही इंटरनेट पाहिलेले आहे १९९८-९९ साली म्हणून विचारले.

In reply to by तर्राट जोकर

हा मूळ धाग्याचा विषय नाहीये अन विषयाचा आवाकाही मोठा आहे. राज्याची संतुलित वाढ होण्यासाठी राज्य सरकारांना धोरणात्मक प्रयत्न करावे लागता. नाही तर सध्या आपण जे बघत आहोत ते असंतुलित चित्र स्पष्टच दिसत आहे. नागपूर शहरामध्ये मा. तं. कंपन्यांची वाढ कूर्मगतीने का होईना सुरु आहेच. सर्वसामान्य नव-उद्योजकांना गेल्या दशकात भेडसावलेली सर्वात मोठी समस्या म्हणजे लोडशेडींग. वीजच दिवसातले अनेक तास अनुपलब्ध असेल तर पुढच्या गोष्टींचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रातील मा.त. उद्योगाने ढोबळ मानाने २००० सालपासून वेगाने घोडदौड सुरु केली. सुरुवातीच्या काळातच दूरदृष्टीने धोरणे आखली असती तर नागपूरसारख्या शहराच्या क्षमतेचा योग्य वापर करता आला असता अन मुंबई व पुणे या महानगरांवरचा ताणही आहे त्यापेक्षा नक्कीच कमी करता आला असता. गेली अनेक वर्षे मी अमेरिकेत राहत आहे. इथे बर्‍याच राज्यांमध्ये उद्योगांचे व रोजगाराच्या संधींचे व्यवस्थित विकेंद्रीकरण झालेले पाहत अहे. महाराष्ट्रात आता थोडेबहूत या दिशेने प्रयत्न सुरु झालेले दिसत आहे. बघुया किती चित्र बदलते ते. बाकी पैशामागे पैसा जातो अन पैशामागे माणूस जातो हे शाश्वत सत्य आहे याबद्दल पूर्ण सहमती.

In reply to by श्रीरंग_जोशी

तुमचे म्हणणे मान्य पण हे असंतुलन केवळ आयटी साठी नाही तर सर्वच उद्योगांसाठी सरधोपट आहे. विकासाचा अनुशेष इत्यादी... पिठाच्या गिरण्या बंद पडून लोक घरोघरी परत जाती फिरवतात का काय असा प्रसंग यावा. इतक्या भयाण परिस्थितीत आयटीचे तर नाव कुणी काढणार नाही. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचीच काय, कशाचीच वाढ विदर्भात झालेली दिसून येत नाही. आहे तीही चिंधीभर कारखानदारी बंद पडायच्या मार्गावर आहे. विदर्भातली मंडळीही एकदा सोडून गेली की ज्ञान, संपत्ती असलं काही घेऊन परत विदर्भात येत नाहीत.... १९९१ ते २०११ या वीस वर्षांदरम्यान झालेल्या लोकसंख्येच्या वाढीवरूनच हे लक्षात येइल. nagpur: 32 lac - 46 lacs amravati: 22 lac -- 29 lac akola/washim: 21lac -- 30 lac yavatmal: 20 lac -- 28 lac chandrapur: 18 lac -- 22 lac buldhana: 19 lac -- 26 lac pune: 55lacs--> 95 lac nashik: 39 lacs --> 61 lac नाशिक-पुणे या फक्त दोन जिल्ह्यांमधे झालेले लोकसंख्यावाढ ही विदर्भातल्या महत्त्वाच्या ६ जिल्ह्यांच्या एकूण लोकसंख्यावाढीपेक्षा तीस टक्क्यांनी जास्त आहे. हा जिल्ह्यांचा हिशोब आहे. शहरांचा नाही. म्हणजेच विदर्भातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. याची विदर्भाला सवयही लागली आहे. मुंबैचा हिशोब मांडला नाही कारण तिथला डेटा मिक्स्ड आहे. खेड्यातून जवळच्या मोठ्या शहरात कामधंद्याला जावे तसे लोक विदर्भातून पुण्या-मुंबैत येतात. ज्या दिवशी वैदर्भीय माणसाचे डोळे उघडतील तो सुदिन.... एकूणच विदर्भाच्या बाबतीत राजकारण्यांपासून, उद्योजक, सामान्य नागरिक सगळेच जरा उदासिन आहेत. कोणा एकाचा तर दोष नाही. विदर्भाचा बिहार-युपी झाला असता पण मराठी आहेत म्हणून संस्कार टिकून आहेत अजून... नक्षलवादास पूर्ण रान मोकळे असून एक-दोन जिल्ह्यांशिवाय फोफावला नाही. असो. धाग्याचे अवांतर विदर्भाच्या अनुशेषापर्यंत होण्याची आवश्यकता नाही. आयटीवाल्या मुलींचे उत्तान शरीरसौष्ठव प्रदर्शन हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे काही जणांसाठी इथे. त्याबद्दल बोलूया...

In reply to by तर्राट जोकर

लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतराबाबत वर वर कल्पना होती पण कधी आकडेवारी तपासली नव्हती.

In reply to by तर्राट जोकर

आयटीवाल्या मुलींचे उत्तान शरीरसौष्ठव प्रदर्शन हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे काही जणांसाठी इथे. त्याबद्दल बोलूया...
म्हणजे अशी म्हणायची आहे का? IT girl सर्व अनाहितांना सस्नेह निमंत्रण....तत्परतेने जे काही हाताला मिळेल ते घेउन या =))

In reply to by तर्राट जोकर

आकडेवारी ज जोरदार आहे, जर रिसोर्सेस बद्दल बोलायचे असेल तर त्याची काही कमी नाही. मध्य प्रदेश , आंध्र, छत्तीस गड मधून लोक मुंबई पुण्या पेक्षा नागपूर ला आले अस्ते. मेन इषू वीज आणी तापमान हा होता. सत्यंम च्या वेळेस आम्ही उन्हाळ्यात टेस्ट केल्या होत्या नेटवर्क स्विचेस रीबूट होत होते दर १० मिनटा मधे, कुलिंग चा प्रोब्लेम असायचा राजकारण्यांची इच्छा हा अजून एक दुसरा पेहलू आहे. आता पुष्कळ छोट्या छोट्या कंपन्या आहेत पण मिहान मध्ये ज्यांनी जागा घेली होती यांनी अजून हि काही सुरु केले नाही. पर्सिस्टन्त बर्यापैके मोठी आहे नागपूरला कारण त्यांच्या कडे BFSI clients नाही आहेत. मला टाईप करायला जमत नाही जास्त त्यामुळे एवढेच पुरे सध्या साठी . :)

In reply to by पप्पुपेजर

पर्सिस्टन्त बर्यापैके मोठी आहे नागपूरला कारण त्यांच्या कडे BFSI clients नाही आहेत असे कसे?

In reply to by एकुलता एक डॉन

वरचे स्टेटमेंट मलाही कळले नाही. बँकिंग न फायनांन्स चे क्लायंट नसणे अन मोठे असण्याचा अर्थाअर्थी काही संबंध दिसत नाही.

In reply to by मराठी_माणूस

माझ्या मित्राने पश्चिम महाराष्ट्रातील एका शहरात स्वतःची आयटी कंपनी काढली. त्याला योग्य मनुष्यबळच मिळत नाही. जे मिळते ते सगळे पुण्याल किंवा बंगलोरला पळायच्या विचारात असतात.

हम्म वाचतेय. पाहुया तरी काय काय (गैर)समज आहेत आमच्याबद्दल. नंतर सवडीने प्रतिवाद करेन. फॉर नाउ, ही येऊन गेल्याची पावती

In reply to by अनुप ढेरे

ये टी आर पी का चक्कर डेंजर रे बाबा ==== नाखुराव आपटे. मिपा हेरा फेरी.

जगातल्या प्रत्येक कामधंद्यात चांगल्या न वाईट गोष्टी आहेत. आयटीवाल्यांना इतरांच्या तुलनेत ऑनसाईटच्या, पैसा छापण्याच्या जास्त संधी आहेत. कामही एसी ऑफिसमध्ये बसुन असतेच (पण त्यात शाररिक दगदग नसते एवढंच.. मानसिक ताण पुष्कळ असतो.. पण तो सगळ्याच क्षेत्रात असतो म्हणुन एसीत तर किमान बसता येतय ह्यांना असा बाकिच्यांचा सुर लागत असावा.) कॉलेजमधुन बाहेर पडुन बर्‍यापैकी पैसा मिळवायला हे एक बरे क्षेत्र आहे म्हणुन आयटीत नसणार्‍यांना आयटीत असणार्‍यांचा हेवा वाटत असणार. आणि हाच समज लोकांचाही असल्याने रिक्षावाले, भाज्यावाले स्वतःच भाव वाढवुन ठेवतात. खिशात पैसा खुळखुळणारे जर मोलभाव करत नसतील तर तसा अंदाज बांधणं स्वाभाविकही आहेच. पण आता जे आहे ते आहे.. उगाच गिगाबायटी चर्चा करुन काय होणारे?

In reply to by पिलीयन रायडर

आयटीवाल्यांना पुरवल्या जाणार्‍या सर्व सोयीसुविधा ह्या इतर लोक लग्जरी म्हणून बघतात त्यात त्यांची अज्ञानामुळे होणारी चूक आहे. कारण जीवंत माणसाला वस्तू-यंत्र म्हणून वापरलं जातंय हेच त्यांना कळत नाही. कारखान्यात एखादं बॉयलरला काही कोटी रुपये लागतात तेव्हा हिच माणसं लोखंडाच्या बंबाला काय एवढे पैसे असं म्हणत नाहीत. आयटीमधे मनुष्यबळ व त्याची बुद्धी हेच सर्वात मोठे रीसोर्स असतं, त्याला जास्तीत जास्त परफॉर्मन्स द्यायला 'योग्य ते वातावरण' असणं ही 'लग्जरी' नाही तर 'मिनिमम रीक्वायरमेंट' आहे. कारखान्यांच्या काळात जगलेल्यांना यंत्र ही मोठी, त्यांना चालवणारी माणसं लहान अशी वर्गवारी माहित. आज माणसं मोठी यंत्र लहान हा बदललेला विचार त्यांना लवकर पचनी पडत नाही. त्यांच्या दृष्टीने कम्प्युटर आणि बॉयलर मधे फरक नाही तसेच सुपरवायजर व टीम लीडर मधेही फरक नाही. तो फरक फक्त आयटीत काम करणारेच जाणू शकतात. यंत्रासारखे, न कुरकुरता, सदैव उत्तम काम देणार्‍या आयटीवाल्यांनीच जग जगण्यास सुखकर केलंय हे एटीममधे जाऊन चटकन नोटा हातात घेणार्‍याला कळत नाही तसेच गिर्हाइक उभे ठेवून मोबाइलवर बिन्कामाच्या गप्पा हाकणार्‍या भाजीवाल्यालाही कळत नाही. त्यांच्या सो-़कॉल्ड लग्जरी मुळे आज आपण खर्‍याखुर्‍या लग्जरीत जगतोय हे त्यांना कळत नाही. पण आयटीवाल्यांचा पगार फक्त दिसतो, तो ओरबाडून घेण्याच्या नीच प्रवृत्तीला शब्द नाहीत माझ्याकडे. काही प्रमाणात याला आयटीतली लोकंही जबाबदार आहेत. संपत्तीच्या अभावात बालपण काढलेली मुलं पैसा बघून चेकाळली, पैशाच्या जोरावर काहीही विकत घेता येतं हेही कळलं. बालपणीचं अभावाचं जीणं झुगारून वाट्टेल तसा पैसा खर्च करायला लागली. सेझ झाल्यावर नवी मुंबईत भाड्यांच्या किमती वाढल्या कारण हीच मुलं "तुमको कितना मंगताय उतना लगाव, हम्को कंपनी पैसा देगी" असा बादशाही आव आणत होती. हे डोळ्यानी पाहिलंय. त्यांच्यामुळे मला घरमालकाने सरळ तीस टक्के घरभाडं वाढवून मागितलं. म्हणजे 'ती' देऊ शकतात, तुम्हाला जमत असेल तर राहा नाहीतर निघा. आयटीवाल्यांचे असे स्वभाव बघून इतरही लोकांनी आपले भाव चढवले. तशीही आयटीतली जास्तीत जास्त मुलं छोट्या शहरातून आलेली, "मुंबै-पुण्यात सगळं महागच असतं"चा पुर्वग्रह घेऊन. त्यांना इथे मोलभाव करायला जमतही नव्हतं, तशी गरजही नव्हती. तिकडे गावात बाप जितका महिन्याला कमावत असेल तितकं तर ही मुलं मेसवाल्याला देत होती. त्यामुळे पैशाचं अप्रूप संपलं. रुपया-रुपया जपून खर्च करावा ही बापाची शिकवण गरीबीच्या पोटी आली आहे असं त्यांना वाटायला लागलं. त्यातून बेफिकीरी वाढली आणि महागाई तर अशा प्रसंगाची वाटच बघत असते. घ्यायला सोडायला येणार्‍या गाड्या आहेत म्हणजे हे पैसा छापणारे मोठे साहेब आहेत अशी मानसिकता ८०-९०च्या दशकात होती. तीच अजून कायम आहे. पण ह्या गाड्यांमधून नेल्या जाणारे फक्त हमालीचं काम करत आहेत, त्यांच्या पगारातूनच ह्या लग्जरीजचे पैसे वळते करून घेतले जात आहेत, कंपनी कुठलेही उपकार वा चोचले करत नाहीये - असं चुकूनही सामान्य लोकांना कळत नाही. ते आपले फक्त लुटायला बघतात.

In reply to by तर्राट जोकर

आयटीमधे मनुष्यबळ व त्याची बुद्धी हेच सर्वात मोठे रीसोर्स असतं, त्याला जास्तीत जास्त परफॉर्मन्स द्यायला 'योग्य ते वातावरण' असणं ही 'लग्जरी' नाही तर 'मिनिमम रीक्वायरमेंट' आहे.
हीहीहीहीही

In reply to by तर्राट जोकर

आयटी सोडून दुसरे सगळे काय रोबोट असतात काय? मनुश्यबळ आणि बुध्दी अजून कला अन कारागीरी. याशिवाय दुसरे काय वापरतो मनुश्य स्वतःचे? आयटी सोडून पण तेच असते. मग सर्वानाच गरज असते मिनिमम लग्जरीची. मग कशाला कौतुके?

In reply to by अभ्या..

अरे अभ्या, आपल्याकडं एकंदरच माणसाकडं नि त्याच्या आयुष्याकडं बघण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे. हे आयटीवाले सुविधा देतात त्यामध्ये कदाचित क्लायेन्टकडून आलेला दट्ट्या सुद्धा असेल की कमीत कमी एवढ्या सुविधा पुरवाव्यात. आमच्या कंस्ट्रक्शन लाईन मधल्या मजूर लोकांना आठवड्यात चार वेळा चिकन दोन वेळा अंडी दिली की ती सुविधा भरपूर वाटते. मजूरीचं स्वरुप वेगळं असतं नि त्यानुसार होणारे लाडही वेगळे.

In reply to by अभ्या..

गैरसमज झाला बरं का तुमचा... ही जी 'मिनिमम रीक्वायरमेंट' आहे ती प्रत्येक ठिकाणी लागू आहे. जे लागू करत नाहीत त्यांना त्यातली गोम कळली नाही म्हणून.... आता आयटीमधेच ही सक्ती किंवा मुभा का? तर आयटी ही इंडस्ट्री आहे. म्हणजेच इंडस्ट्रीला इंडस्टीसारखे वागवणारे आले. जेव्हा गाय घराचीच असते तेव्हा ती रानोमाळ भटकते, आपले आपण काय-बाय खाते, घरी येते. घरचे जेवढं निघेल तेवढं दूध काढून समाधानी असतात. त्याविरूद्ध इन्डस्ट्रीयल मिल्कींग मधे गाय जास्तीत जास्त दूध कसे देइल यावर असंख्य संशोधक काम करतात. त्यातून वेगवेगळे सल्ले-प्रयोग देतात-करतात. गायीला कसे वागवले म्हणजे जास्त दूध मिळेल याचीच चिंता असते. आता आयटीकडे या. इथे मनुष्य व त्यांचा मेंदू हेच रीसोर्स आहे. याची जेवढी जास्त काळजी घेतली जाईल तेवढा जास्त चांगला परफॉर्मन्स मिळेल हे साधं गणित. साधं असलं तरी अनेक प्रयोगांतून-संशोधनांतून पुढे आलंय. आपली कार्यक्षमता (म्हनजे कंपनीची) वाढवण्यासाठी काय करावे लागेल किंवा चुका का घडतात यावरच्या संशोधनातून असे लक्षात आले की बुद्धीजीवी मनुष्यास त्याचे काम चांगले करण्यासारखे वातावरण असेल तर त्याची कार्यक्षमता कैक पटीत वाढते. यात येण्याजाण्यापासून ते ऑफिसच्या वातावरणापर्यंतचे घटक ह्या कार्यक्षमतेवर चांगला-वाईट परिणाम करू शकतात हेही लक्षात आले. उदा. बसण्याची जागा शरीरास आरामदायक नसेल तर मेंदूचा काही भाग त्या अवघड परिस्थितीवर काही प्रमाणात लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे जे काम हातात आहे, ज्याचे भविष्य पूर्णपणे मेंदुवर अवलंबून आहे त्या कामास पूर्ण न्याय देण्यास मेंदू कमी पडतो. लक्ष विभाजीत होते. प्रोडक्शन कमी होते. चुका वाढतात. हे जेव्हा आयटीच्या मोठ्या कंपन्यांना लक्षात आले तेव्हापासून ते कामगारांना प्रचंड सुविधा देण्यास पुढे आले, कारण केवळ त्यावरच त्यांचे अ‍ॅन्युअल रिपोर्ट्स व स्टॉकचे रेट अवलंबून आहेत म्हणून. कारखानदारी मधे जिथे बरेचसे काम यंत्रांद्वारेच होते तिथे मनुष्य देखरेख किंवा हाताने काम करणे यासाठी उपलब्ध असतो. एखादा कामगार यांत्रिकपद्धतीने एखादी वस्तू जसे पंखा बनवणे, रेडीयो बनवणे, सायकल बनवणे असं काम करतो तर तिथे त्याला कौशल्य लागतं, बुद्धी व मेंदूची एकाग्रतेची तेवढी प्रचंड आवश्यकता नाही जितकी आयटीमधे आहे. कारखान्यात जुळणी करत असतांना तो मनुष्य 'महिना संपत आलाय, आता कुणाकडे उधारी करायची, देणी कशी फेडायची' याच्या प्रचंड तणावात असूनही कंपनीस आवश्यक इतके प्रॉडक्शन देऊ शकतो. हीच परिस्थिती कोड लिहिणार्‍या किंवा दुरुस्त करणार्‍या संगणक अभियंत्यास घातक आहे. कारण त्याची चुकलेली एक लाइन वा डॉट त्याला ते काम परत परत करायला भाग पाडू शकतो, कंपनीचा परफॉर्मन्स घटतो आणि त्याची स्वतःची पतही. कारखानदारीत यंत्र बनवणार्‍यांचे अतोनात महत्त्व आहे, जे लाड आहेत, ते तेच यंत्र चालवणार्‍यांचे नाही. आता कारागीरी किंवा कला, जसे सुतारकाम किंवा मिस्त्रीकाम. हे सरावाने येणारे कौशल्य आहे. यात सुरुवातीस प्रचंड मेहनत घेऊन हे कौशल्य आत्मसात केले की पुढे निरंतर कामाने ते अधिक अधिक मजबूत होत जाते. एक स्थिती अशी येते की त्या ठिकानी कारागीर अगदी गप्पा हानत, शिव्या घालत, इकडे तिकडे बघत ते काम करू शकतो. कारण नवनिर्मिती असली तरी ते सृजन नाही. आयटीत हे शक्य आहे का? कितीही मोठा कोडर असला तरी तो वरील अवस्थेत अचूक कोड लिहू शकेल किंवा दुरुस्त करू शकेल काय हे आयटीधुरिणांनी सांगावे. पुढचा मुद्दा निव्वळ कला किंवा उपयोजित कला, ज्यात तुम्ही स्वतः आहात असे कळते. इथे आयटीसदृश्य परिस्थिती आहेच. पण इथे वरील तिन्ही गोष्टींचा संगम होतो. सरावाने सहज होत जाणारे कौशल्य एकाग्र बुद्धिने वापरले जाते. इथे पण मेंदूस एकाग्रता लागतेच, पण कलेचा एक अनामिक डोळा अनावधनाने झालेल्या चुका लगेच लक्षात आणून देतो. चुकलेले रंग, आकार, शब्द तिथल्या तिथे बदलले जातात. ही प्रोसेस नकळत होत असते. ती उपजत असते. शिकवून येत नाही. शिकवून फक्त तंत्र आत्मसात होते, कला नाही. तर कलेच्या क्षेत्रात आरामदायक वातावरणाची जरूर असली तरी ती प्रॉडक्शन क्षमतेवर परिणाम करेलच असे नाही. तरीही मोठमोठ्या जाहिरात संस्था आयटीसारखे वातावरण आयटीच्या आधिपासून राखून आहेत. मनुष्य आणि त्याची बुद्धी हेच आयटीमधे 'सबकुछ' आहे. तिथे चुकीस मुभा नाही, पर्यायी व्यवस्था नाही. अशा मनुष्यबळास सांभाळणे, त्याकडून जास्तीत जास्त उत्पादन करवून घेणे ह्यालाच प्राधान्य आहे. त्यामुळे डोक्याला ताप देतील अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या मार्गातून दूर केल्या जातात. अगदी कामगारांचे व्यक्तिगत करव्यवस्थापन पासून पासपोर्ट विजापर्यंत कंपन्या मदत करतात, मुलांसाठी पाळणाघरं चालवतात, अजूनही काय काय. त्यामुळे लाड होतात असा गैरसमज आहे बाहेर. इंडस्ट्रीयल मिल्किंगमधल्या गायींना वेळच्या वेळी कसदार खाणं, वैद्यकिय देखभाल, चळांना त्रास न होता दूध काढणार्‍या मशिन, राहण्याची अत्याधुनिक व्यवस्था, अल्टीमेट स्वच्छता हे सगळं मिळतं म्हणून रानोमाळ भटकणार्‍या गायीने तिच्याकडे असूयेने पाहणे कितपत बरोबर...?

In reply to by तर्राट जोकर

त्रिभुवनदास जव्हेरी तुमचे सखोल विश्लेषण आवडलेले आहे.
तरीही मोठमोठ्या जाहिरात संस्था आयटीसारखे वातावरण आयटीच्या आधिपासून राखून आहेत.
ह्याला तर लै सहमत आहे. . एकेकाळी थ्रीफोर्थ टीशर्टात नोकरीच्या नावाखाली एसीत झोपणारा.

In reply to by सतिश गावडे

अबे झबलंच. त्येला बंडी म्हणायचं, नायतर छाटण. बिनबाह्याचे आसतय. आमच्या सारख्या तब्येतवाल्यांना शोभतेय. बिअर ढेरकाट दाखवणार्यांना येगळे असतेत.

In reply to by टवाळ कार्टा

तू तीन तीन प्रश्नचिन्हे दिलेली चालतेत. म्या एक कॉमा इसरलो तर पळत आला टोचायला. छिद्रान्वेशी कुठला. (टक्या तुला लैच परफेक्ट बसतोय बे ह्यो शब्द)

In reply to by अभ्या..

आम्ही एकदा कॉमा चुकून दुसरीकडं टाकलो होतो. >>>>>हो, शिंदळीच्या अशी शिवी आहे. ऐवजी >>>>>हो शिंदळीच्या, अशी शिवी आहे. असं एका थोर्थोर मिपाव्यक्तिमत्वास म्हणून आलो. ती व्यक्ति खरंच तशी असल्यानं तिनं दुर्लक्ष केलं बहुधा. ;)

In reply to by तर्राट जोकर

>>आयटीवाल्यांना पुरवल्या जाणार्‍या सर्व सोयीसुविधा ह्या इतर लोक लग्जरी म्हणून बघतात त्यात त्यांची अज्ञानामुळे होणारी चूक आहे. कारण जीवंत माणसाला वस्तू-यंत्र म्हणून वापरलं जातंय हेच त्यांना कळत नाही. +१

In reply to by तर्राट जोकर

perfect. आपल्या कडे एखादा शेरा आपण अगदि सहज मारतो. त्यातले आपल्याला कळो न कळो .खोल विचार वैगेरे कोण करणार.

इतके सगळे असताना आपल्या देशी कंपन्या फक्त सेवा देण्यातच अडकून पडल्या आहेत. प्रत्येकानेच प्रॉड्क्ट डेव्हलप केले पाहिजे असे नाही. मायक्रॉसॉफ्ट , एस ए पी , गूगल , अ‍ॅपल मधले भारतीय लोक त्या कम्पन्याना प्रॉडक्ट डेव्हलप करुन देत असतातच. पण ते प्रॉड्क्ट त्या विदेशी कंपन्यांच्या नावावर जमा होते. भारतीय कंपनीच्या नावावर नाही

In reply to by विजुभाऊ

छान चर्चा. हल्ली तो 'प्रॉड्क्ट'च्या नावाने सगळीकडे उद्घोष चालू असतो.उत्साहापोटी काहीतरी नविन करण्याची मानसिकता भारतियांमध्ये तशी कमी असते.जो काही पगार्,सुखसोयी आहेत त्या पुढे रेटत कशा न्यायच्या ह्यावर भर.मग टाटा असो वा बजाज वा तुमची ती विप्रो...disruptive innovation का काय म्हणतात ते येथे घडायची शक्यता फार कमी असे ह्यांचे मत.

एकदा लग्जरी गाड्या , घरे घेणाऱ्या लोकांची यादी बनवा ( BMX merc etc etc ) त्यात आएती वाले किती आणि नोन आएती वाले किती ते शोधा , दुसरी बाजू डॉक्टर कडे येणर्या लोकांची यादी तपासा ( मुले होण्यासाठी त्रीत्मेंत ते हृदय रोग पर्यंत ) त्यात आएती वाले किती ते शोधा आणि मग ठरवा.

In reply to by बिहाग

योग्य प्रश्न विचारलास रे बिहाग्या. मर्सेडिझ,ऑडीसारख्या प्रचंड महाग मोटारी लहान सहान धंदे-व्यवसाय करणार्या लोकांच्या आहेत.कर कसा चुकवायचा ह्या काळजीत असणारा हा नवश्रीमंत वर्ग तो हाच. औरंगाबादमध्ये २०० लहान मोठ्या व्यापार्यांनी २०० मर्सेडिझ गाड्या पूर्वी बूक केल्या होत्या त्याची आठवणे झाली.आता औरंगाबादेत आय.टी. कुठे? आय.टी.वाल्यांची झेप आय.१० किंवा स्वीफ्ट डिझायर पर्यंत असते असे वाटते.

भारतात आयटीवाल्यामुळे चंगळवाद फोफावला आहे ,पुण्यासारख्या सांस्कृतीक शहराचे वातावरण बिघडायला हेच लोक कारणीभूत आहेत.व्यसनं करणे ,त्याचं उद्दातीकरण करणे ,पैश्याचा माज दाखवणे,रेव्हपार्ट्या करणे,वासनेला खतपाणी घालणारे शरीरसौष्ठव दाखवत फिरणार्या आयटीतील तरुणी,यांच्यामुळे ईतरांची मनं कलुषीत होतात,मग गुन्हे आणी बलात्कार झाले की हेच आयटील लोक मस्त एसीत बसून ' सिक इंडीयन मेंटॅलीटिवर' लांबचौड्या पोस्ट सोशल मिडीयावर टाकतात.पैसा कमावण्याला कोणाचीच हरकत नाही, पण त्याबरोबर सामाजिक भानसुद्धा ठेवने गरजेचे आहे.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

आयला, ह्या सगळ्या गोष्टिंसाठी मी पण जबाबदार आहे हे मला गेल्या ~१० वर्षांत समजलंच नाही. बरं तुम्ही सांगितलं. "वासनेला खतपाणी" हे सगळ्यात भारी आहे. मी आठवतो आता कोणी कोणी काय काय केलं होतं वासनेला खतपाणी घालण्यासाठी ते :)

In reply to by टवाळ कार्टा

:) आयटीत काम करणार्‍यांची लैच भारी ईमेज आहे. जिनियस साहेबांनी .व्यसनं करणे ,त्याचं उद्दातीकरण करणे ,पैश्याचा माज दाखवणे,रेव्हपार्ट्या करणे, हे सगळ्याच आयटी वाल्यांना चिकटवून टाकलंय. बायदवे, जिनियस साहेब तुम्ही काय काम करता ओ? आणि तिकडे सगळे संत असतात का?