Skip to main content

दर 18 वर्षांनी येणारे विवाहित स्त्रियांचे कोकीळा व्रत

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 24/08/2015 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या महिलावर्गाची कोकीळा व्रत करण्याची गडबड चालू आहे. हे व्रत आषाढ शु 15 ते श्रावण शु 15 असे महिनाभर चालते. अधिक आषाढ महिना संपून निज आषाढातील पोर्णिमा येईल तेव्हा सुरू करून श्रावण पौर्णिमे पर्यंत करावे लागते. हे व्रत 18 वर्षानी एकदा येते. ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते. यावेळेला हे व्रत 29 जूलै ते 29 आॅगस्ट या महिन्यात आहेे. हे व्रत विवाहित स्त्रिया करू शकतात. हे व्रत केल्याने स्त्रियांनां दीर्घकाळ सौभाग्य, घनवृद्धि, व सॆतंतीसौख्य व इतर प्रपंचातील सुखे प्राप्त होते. व्रत महिनाभराच्या पुण्यकाळात कुणी महिनाभर, कुणी 3 दिवस, कुणी 1 दिवस करतात. हे व्रत ब्रह्मर्षी वसिष्ठ मुनींनी शत्रुघ्नाची पत्नी कीर्तिमाला हिला सांगितले. कोकीळा व्रताची कहाणी: ब्रह्मदेवाला दहा पुत्र त्यातील दक्षप्रजापती,, त्याला 101 कन्या होत्या. जेष्ठ कन्या दाक्षायणीचा शंकराशी, 27 कन्या चंद्राला व इतर कन्यांचे विवाह इतर देवांशी करून दिले. दक्षाला पुत्र नव्हता म्हणून कपीलमुनीनूी त्यास पुत्रकामेष्टि यज्ञ करण्यास सुचविले. दक्षाने मग एका विशाल मैदानात यज्ञाची सिद्धता केली. दक्षाने सर्व देवांना, ऋषिनां आमंत्रणे पाठविली, पण शंकराला मात्र वगळले कारण दक्षाला शंकराचे वेदबाह्य वर्तन, स्मशानात राहणे, भुतांचा सहवास, नागांची भुषणे व अघोरी वागणे आवडत नसे. यज्ञाच्या वेळी सर्व देवांनी दक्षाला शंकराच्या अनुपस्थितीविषयी विचारले तेव्हा त्याने शंकराला बोलावण्यास स्पष्ट नकार दिला. मग यज्ञाला आरंभ झाला, पण नारदमुनी (कळलावे) तिथून थेट कैलासावर आले व दक्षाच्या यज्ञाचे रसभरीत वर्णन सांगितले. ते ऐकून शंकर शांत बसले पण दाक्षायणीला मात्र आपल्या वडिलांनी सर्वांना बोलावले पण शंकराला बोलावले नाही याचा राग आला. (बायकांना आपल्या नवर्याला माहेरी बाेलावले नाही तर फार राग येतो.) शंकराने गणपती, शिवगणांचे सैन्य, वाहन नंदी यांना दाक्षायणी सोबत माहेरी पाठवले. तेथे यज्ञ धुमधडाक्यात चालला होता, तेथे वडिल व आईने तिच्याकडे दुर्लक्ष केले, हे दाक्षायणिला जिव्हारी लागले. तिने रागाने कुणाला काही कळण्याआधी यज्ञकुंडात उडी घेतली. अग्नीने काही क्षणातच तिची आहुती घेतली. सर्वजण स्तंभीत झाले. काही वेळाने सर्व भानावर आले. सर्वत्र हाहा:कार माजला. नारद गुपचूप निघून कैलासावर गेले व त्यानी शंकराला सर्व सांगितले. हे ऐकूण शंकर ताडकन उठले व रागारागाने आपल्या जटा एका शिळेवर आपटल्या. त्या क्षणी तिथे एक विराट पुरूष (वीरभद्र) प्रगटला. शंकराने त्याला आज्ञा केली सर्व सैन्यानिशी तेथे जाऊन यज्ञाचा विध्वंस करा तसेच सर्व निमंत्रितांचा संहार करून दक्षाला मृत्युदंड द्या वीरभद्र त्वरेने मोठ्या सेनेसह यज्ञस्थळी पोहचला. त्याने हल्ला सुरू केला, सर्व देवांनी व ऋषि-मुनींनी वेदमंत्रांनी दर्भ शक्तीयुक्त करून प्रतिकार केला. वीरभद्राने व त्याच्या सैन्याने भयानक संहार केला, वीरभद्राने तलवारीने दक्षाचे मुडंके छाटून यज्ञात फेकले. बह्मा, विष्णू व नारदाने वीरभद्राने केलेला संहार सांगून वीरभद्राला शांत करण्यास सांगितले. तेव्हा शंकर उठले व यज्ञभूमीवर आले व सर्वांना जिवंत केले. बह्माने आपला पुत्र दक्षाला जिवंत करण्याची पार्थना केली. शंकराने त्याचे मुंडके आणण्यास सांगितले पण ते यज्ञात जळून खाक झाले होते. मग कोणतेही शिर आणा असे शंकर म्हणाले. तेव्हा जवळ पडलेले बोकडाचे मुंडके दक्षाच्या मानेवर ठेवले व त्याला जिवंत केले. नारदाने दाक्षायणिला (शंकराची पत्नी) जिवंत करण्याची विनंती केली. तेव्हा शंकराने सांगितले की तिचे दर्शन तुम्हाला घडवितो परंतु तिचे शरीर नसल्यामुळे ती पुर्नजीवित होणार नाही. असे म्हणून यज्ञकुंडातील राख हवेत फेकली तेव्हा दाक्षायणी प्रगटली. तिने हात जोडून शंकराची क्षमा मागितली. परंतु शंकर म्हणाले, प्रिये रागाच्या भरात तुझ्याकडून आत्महत्या व यज्ञाचा अपमान हे दोन अपराध घडले. त्याचे फळ अटळ असल्यामुळे पुढील दहा हजार वर्ष तुला काळ्या रंगाची व कुरूप पक्षिणी व्हावे लागेल. दाक्षायणिने उ:शाप मागितला तेव्हा शंकर म्हणाले तुला पश्चाताप झाला आहे म्हणून तू पक्षिणी जरी झालीस तरी गोड आवाजाची कोकीळा होऊन सदैव नंदवनात विहार करतील. शंकर पुढे म्हणाले दहा हजार वर्ष झाल्यावर तुला हिमालयाची पत्नी मेनका हिच्या पोटी जन्म मिळेल आणि हरितालिका व्रताच्या प्रभावाने पुन्हा आपला विवाह होईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 34519
प्रतिक्रिया 124

प्रतिक्रिया

In reply to by समीरसूर

ओ, का पेटवताय? शंकरान्नी स्वत:चा अपमान सहन केला आणि बायको अपमान झाल्यानं आत्महत्या करून मेली म्हणून राडा केला. शिवाय आत्ता लाइफ कोटा संपला लगेच लग्न होऊ शकत नाही म्हणून नंतर लग्न करु असं म्हणून सांगितलं (तसं ते केलं सुद्धा) दाक्षायणी चुकीचं वागली(आत्महत्या अधिक यज्ञ अपमान) म्हणून शिक्षा दिली, उगाच नाही. यात सुद्धा आज जेवायला अमुक नाही,मीठ जास्त वगैरे वैयक्तिक कारणं नाहीत. असो. मारलेल्या बाणाभोवती वर्तुळ काढायचं असल्यास हरकत नाही.

In reply to by समीरसूर

दाक्षायणीला का शाप? तिने बिचारीने शंकराचा अपमान झाला म्हणून यज्ञकुंडात उडी घेतली आणि शंकराने तिलाच व्हिलन ठरवून दहा हजार वर्षांचा शाप दिला? हा शाप दाक्षायणिला शंकराने दिला नाही तिने आत्महत्या व यज्ञाचा अपमान केला म्हणून तिच्या कर्माचे तिला फळ मिळाले. आणि जटा शिळेवर आपटल्या???? ही कोणती राग व्यक्त करण्याची पद्धत? आणि शंकराला राग नेमका कसला आला? बायकोने यज्ञात उडी घेतली त्याला कारणीभूत ठरलेल्या सासर्याचा (दक्षाचा) राग आला. या कथेत शंकर स्वत:चे डोके अजिबात चालवत नाही. शंकराला असे होणार हे माहित होते पण विधीलिखित घडणारच. पण नारदालाच लईच घाई कळ लावण्याची. नवरा नेहमी बायकाेकडूनच असणार. ज्या नारदमुनीमुळे हे सगळे घडले ते नामानिराळे! शंकराला हे समजले नाही? यात नारदमुनीचा दोष काय त्यांनी फक्त बातमी पुरवली. शंकराने दाक्षायणिला जाऊ नको असे सांगितले. पण बायकांना माहेर म्हणले की जायचा अट्टाहास असतो. तिला वाटले वडिल आमंत्रण द्यायला विसरले असतील. पण तिथे गेल्यावर आई-वडिलांनी दुर्लक्ष केल्यामुळे रागाने तिने यज्ञकुंडात अविचाराने उडी घेतली ही चुकी तिचीच. "कोणतेही शीर आणा". शंकराला एखाद्या मृत माणसाला जिवंत करता येते, एक शीर नाही मिळवता येत? दाक्षायणिने यज्ञकुंडात उडी घेतली आणि तिची राख झाली. शीर आणि धड नसल्यामुळे शंकर तिला कसे जिवंत करणार.

In reply to by हेमंत लाटकर

यज्ञाचा अपमान म्हणजे नेमके काय? पतिदेवाच्या अपमानाने व्यथित होऊन जर एखाद्या पतिव्रतेने प्राण त्यागले तर हे उलट चांगले कर्म झाले ना? शंकराने तर उलट खुश होऊन तिला वर द्यायला हवे होते. यज्ञात आहुतीच जात असते. मनुष्यदेहाची आहुती तर अधिक चांगली मानली जायला हवी. दाक्षायणीने उलट यज्ञाचा सन्मान वाढवला आहे असे त्याकाळातील प्रचलित समजुतीनुसार माझे ठाम मत आहे. सासर्याचा राग आला तर बायकोला का शिक्षा? जो देव मृत माणसाला जिवंत करू शकतो त्याला सगळं आपोआप कळलं पाहिजे; नारद हवाच कशाला कळ लावायला? नारदाने जर शंकराची समजूत काढली असती आणि सांगतांनाच शंकराचे कान भरल्यासारखे सांगून तेल ओतले नसते तर हा सगळा तमाशा घडलाच नसता. अरे वा, कुठलेही धड लावून माणूस जिवंत करता येतो, शरीर नसतांना माणूस जिवंत नाही करता येत. हे काय गौडबंगाल? काहीतरी लॉजिक आहे का यात?

In reply to by समीरसूर

यज्ञ चालु असतांना त्यात दाक्षायणीने आत्महत्या केली. म्हणजे यज्ञाचा भंग केला. येथे आमंत्रण न मिळाल्याने शंकराचा अपमान झाला होता, पण त्यांनी ते मनावर घेतले नाही. दाक्षायणिला समजावून सांगितले पण तिने जाण्याचा हट्ट केला. तेथे गेल्यावर आई-वडिलांनी दाक्षायणीकडे दुर्लक्ष केले हे तिला जिव्हारी लागले व अविचारानेे यज्ञात प्राणाची आहुती दिली. यात तिचा दोष असल्यामुळे त्याची शिक्षा तिला काळी व कुरूप पक्षिण व्हावे लागले. (हा शाप शंकराने दिला नाही तर तिच्या कर्मामुळे मिळाला. उलट शंकराने तिला उ:शाप दिली काळी कुरूप पक्षिण झाली तरी कोकीळसारखा ेगो़ड आवाज दिला. (ती कोकीळ/कोकीळा होती माहित नाही.) आणि अधिक अाषाढ मध्ये ज्या स्त्रियां कोकीळा व्रत करतील त्यांना सौभाग्य व इतर प्रापचिक सुख मिळतील असे सांगून तिला मानसन्मान मिळवून दिला. तसेच 1000 वर्षानंतर हिमालयाची पत्नी मैनावतीच्या पोटी पार्वती म्हणून जन्म घेशील व हरितालिका व्रत केल्याने माझ्याशी विवाह होईल असे आश्वासन (राजकारण्यांसारखे नाही) दिले.

गोष्ट सांगण्याची हातोटी आवडली नहि. मुळ गोष्ट वेगळी आहे . कंसातले उगीचच मारलेले टोमणे (स्त्रियांना आणि नारदांना ) आवडले नाहीत . दाक्षायानी कोकिळा झाली असंहि कुठं कधी वाचण्यात आलं नाही . सतीचं जळालेलं शरीर घेवून शंकर फिरत होते तेव्हा त्यांना त्यातून बाहेर आणण्यासाठी विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्या शरीराचे ५२ तुकडे केले . ते जिथे जिथे पडले ते शक्तीपीठात रुपांतरीत झालं . तसंच कोकिल व्रताचा उपवास सोडताना कोकिळेचा आवाज ऐकून सोडायचा असतो . आता कुठं तो आवाज ऐकू येणार ;-)

दिलेल्या कथेचा आणि कोकीळ व्रताचा संबंध कळला नाही. हे व्रत शंकराने दाक्षायणिला करायला सांगितले असं काही नाही किंवा दाक्षायणिने स्वतः केले असं काही नाही. तिचा कोकीळ झाला आणि दहा हजार वर्षांनी पुन्हा स्त्री रुपात जन्म झाला. यात व्रत आणि त्याचा विधी कुठे आला? हे व्रत महाराष्ट्र सोडून इतर कुठल्या कुठल्या राज्यांमधे दिसते? बरं ही येवढी हाणामारी घडण्याला कारण असलेले नारदमुनी सहिसलामत सुटले राव... ये नाइंसाफी हय.

In reply to by थॉर माणूस

आजकाल मिडिया एखाद्या छाेट्या गोष्टीचा इतका इशु करते मिडियाला कोणी जबाबदार धरत नाही. नारद सगळ्या देवांनां बातमी पुरवणारे माध्यम असल्यामुळे त्यांची काही चुक नाही.

दाक्षायणिने उ:शाप मागितला तेव्हा शंकर म्हणाले तुला पश्चाताप झाला आहे म्हणून तू पक्षिणी जरी झालीस तरी गोड आवाजाची कोकीळा होऊन सदैव नंदवनात विहार करतील.
गोड आवाज कोकिळा नाय करत तर कोकिळ करत असतो.
शंकर पुढे म्हणाले दहा हजार वर्ष झाल्यावर तुला हिमालयाची पत्नी मेनका हिच्या पोटी जन्म मिळेल आणि हरितालिका व्रताच्या प्रभावाने पुन्हा आपला विवाह होईल
मेनका नै हो. ती मेना. अप्सरा लग्न करत नसतात.

In reply to by प्रचेतस

बरोबर आहे पोथी मध्ये नावाची चुक झाली. हिमालयाची पन्ती मेनावती होती तिच्या पोटी पार्वतीचा जन्म झाला. तिने हरतालिका व्रत केल्यामुळे तिचा विवाह शंकराशी झाला.

In reply to by मांत्रिक

हाफशेंच्युरी निमीत्त सर्वांना कोकीळा व्रताची पोथी* देऊन सत्कार करण्यात येत आहे. शुभेच्छुक- जेपी आणी तमाम देवलसीकर्मकांडी कार्यकर्ते. *पोथ्या पोत्यात भरुन गुर्जीकडे ठेवल्या आहेत.घेऊन जाणे.

कर्मकांड -- एक वेगळा विचार कर्म कांडावर माझा मुळीच विश्वास नाही. मी रोज पूजा सुद्धा करत नाही. मी कर्मवादावर विश्वास ठेवतो. (स्वतःचे काम प्रामाणिक पणे करणे हि देवाची पूजा आहे) परंतु कर्मकांडाचे मानवी जीवनात एक नक्की स्थान आहे. माणूस जेंव्हा संकटात सापडतो आणी त्याची मती कुंठीत होते तेंव्हा त्याला एक मानसिक आधार लागतो. कितीही सज्जन माणूस असेल तरीही त्याच्या वर संकटे येतातच. आपले आईवडील किंवा भावंडं किंवा मुलं केंव्हा तरी आजारी पडतातच त्यातून एखादा आजार जास्त गंभीर असेल अशावेळेस माणूस उत्तमत उत्तम डॉक्टर पाहतो परंतु बर्याच गोष्टी डॉक्टरच्या हातात नसतात अशावेळेस पूजा करणे, यज्ञ करणे, दान देणे( ज्याचा अशा आजाराशी अजिबात संबंध नसतो) अशा गोष्टीनी त्या माणसाला एक मानसिक आधार मिळतो. यामुळेच सर्वच्या सर्व धर्मात कर्मकांड आहेच. साग्रसंगीत षोडशोपचारे पूजा केल्याने एखाद्या माणसाला मानसिक समाधान मिळते किंवा आपण अमुक तमुक व्रत केल्याने आपल्या नवर्याला दीर्घायुष्य लाभेल म्हणून व्रत करणारी स्त्री तिच्या कर्मकांडाची थट्टा करणे चुकीचे आहे. मानवी जीवन हे अस्थिर आहे. पुढच्या क्षणाला काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही मग अशा दोलायमान परिस्थितीत मनाची समजूत काढणे किंवा मानसिक शांती मिळवणे यासाठी एखादा माणूस कर्मकांडाचा आधार घेत असेल तर त्या चूक नाही. मानसिक तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी दारू पिणारे लोक काय कमी आहेत का? आर्ट ऑफ लिव्हिंग ला जाणारे किंवा विपश्यना करणारे सुद्धा शेवटी मानसिक शांतीच्याच शोधात असतात. पण ते इंग्रजीत बोलले कि कसे अद्ययावत किंवा सॉफिस्टीकेटेड वाटते. गटारीला दारू प्याय्लीच पाहिजे आणी सामिष खाल्लेच पाहिजे आणी श्रावणात मी सामिष खात नाही, मंगळवारी किवा गुरुवारी मी मास मटण खात नाही हे अभिमानाने हे सांगणारे लोकही कर्मकांडच पाळत असतात. रमजान मध्ये रोजा पाळणारे किंवा पर्युशन करणारे जैन लोक पण कर्मकांडाचा आधारच घेत असतात. मी मागे एका धाग्यावर म्हटल्याप्रमाणे आपण सारे जण दांभिक आहोत. आपल्या जावयाने घेतले कि "ड्रिंक" आणी मोलकरणीच्या नवर्याने प्यायली कि "दारू". तसेच एखादी सवाष्ण जर मनोभावे पूजा/व्रत करीत असेल तर ते कर्म कांड पण आपण श्रावण पाळला तर तो स्वतःचा मनावरील "ताबा"( सेल्फ कंट्रोल). दुसर्याच्या कर्मकांडाचा आणी श्रद्धेचा गैरवापर करणे/ बाजार मांडणे हि अत्यंत चुकीची गोष्ट आहे. मग ती पौरोहित्य करणाऱ्या गरीब( शहरात आता ते तसे गरीब राहिलेले नाहीत) माणसाने केली काय किंवा श्रद्धेचा बाजार मांडून आपली पोळी पिकवणार्या राजकारण्याने केली. अमुक तमुक चा राजा म्हणून ठणाणा बोम्बल्या( लाउड स्पीकर) लावून भव्य उत्सव काय किंवा दहा थरांची दहीहंडी काय? इफ्तार पार्टीचे आयोजन करणे काय? त्यावर बंदि घालायची भाषा करा लगेच आमच्या धार्मिक बाबतीत ढवळा ढवळ म्हणून कोल्हेकुई होते कि नाही? हि स्वतःची पोळी पिकवणारीच डांबरट माणसे आहेत ना? मी जेंव्हा माझा दवाखाना सुरु केला तेंव्हा माझ्या मित्रांनी काही रुग्ण पाठविले होते त्यांच्याशी बोलताना त्यांना काहीही झालेलं नाही हे मला दिसत असल्याने तुम्हाला सोनोग्राफीची गरज नाही असे सांगून मी परत पाठवले होते ( आणी त्याचे मला सात्विक समाधानहि वाटले होते) पण माझ्या मित्राने मला स्पष्ट सांगितले कि जसे तुझ्या सोनोग्राफीमध्ये काही आजार निघाला तर त्यचा फायदा आहे तसा सोनोग्राफी नॉर्मल आहे याचा पण एक प्रचंड फायदा आहे. रुग्णाला स्वतःला मानसिक शांतता मिळते आणी माझ्यासारख्या डॉक्टरला आपल्याकडून काही राहून जात नाही ना याची खात्री होते. मग तू त्याला कर्मकांड समजत असशील तरी चालेल. यामुळे माझेही डोळे उघडले. (बर्याच वेळेस आपल्या वृद्ध आई किंवा वडिलांना पोटात दुखते आहे त्याच्या सर्व तपासण्या करून काही गंभीर आजार नाही हे ऐकल्यावर होणारे मानसिक समाधान किती आहे याचा मी सुद्धा अनुभव घेतला आहे). कर्मकांड जोवर प्रमाणाबाहेर जाऊन तुमचे आयुष्य व्यापून टाकत नाही तोवर ठीक आहे अर्थात हि मर्यादा स्वतः ने घालून घेणे आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

धन्यवाद डाॅक्टर साहेब. तुम्ही नेमके विश्लेषण केलेत या कर्मकांडामागच्या मानसिकतेचे. ज्यांची आयुष्ये अत्यंत खडतर आहेत अशांना नक्कीच फायदा मिळतो अशा उपायांचा. देव देवता यंत्र मंत्र तंत्र यांचे तेच प्रयोजन आहे. आपली मानसिक शक्ती एकत्र होऊन नक्कीच फरक पडतो परिस्थितीत.

In reply to by मांत्रिक

मांत्रिक साहेब आयुष्यात सर्वांच्या चढ उतार हे येतातच. त्यावेळी मानसिक आधार देणारे कुणीतरी लागते. कुणी जर कर्मकांड करून तो मिळवत असेल तर त्यात फार चूक आहे असे मी मानत नाही. कर्मकांड म्हणजे शेवटी काय एखादी गोष्ट बुद्धीला पटत नाही किंवा ज्याचे आपल्याला विश्लेषण देता येत नाही किंवा ज्या बद्दल ज्ञान नाही त्याचे काय करावे हे आपल्या मतीचा बाहेर असते त्याबद्दल एखाद्या मोठ्या शक्तीला शरण जाणे. आणी अशी भक्ती करून आपले भले होईल असा आशावाद बाळगणे. ज्यामुळे कुणाचे नुकसान होत नाही अशा गोष्टी करून जर कुणाला मानसिक समाधान मिळत असेल तर त्यात काय चुकीचे आहे? आपले कर्मकांड दुसर्यावर लादणे हे चुकीचे आहे. यात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी अक्खा दिवस रस्ता बंद करणे किंवा नमाजासाठी रस्ता अडवणे हे एकच आहे.

In reply to by सुबोध खरे

आपले कर्मकांड दुसर्यावर लादणे हे चुकीचे आहे. यात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी अक्खा दिवस रस्ता बंद करणे किंवा नमाजासाठी रस्ता अडवणे हे एकच आहे. हां डाॅक्टर साहेब, या मुद्दयाबाबत कुणीच आक्षेप घेणार नाही. असे थिल्लर उत्सव करून आपण त्या देवतेलाच कमीपणा आणतो हेच अनेकांच्या लक्षात येत नाही.

In reply to by मांत्रिक

यात घोळ कुठे होत आहे? ट्रस्ट्सच्या लोकांनी स्वत: पदरमोड न करता इतरांच्या देणग्यांवर आपापल्या आराशी उभारल्या आणि डॉल्बी आणल्या. ट्रस्ट चे पदाधिकारी कुठल्या तरी राजकीय पक्षाशी संबंधित. राजकारण, व्यवहार आला की विषय देव धर्माच्या बाहेर गेला असं खुशाल समजावं आणि तिथे अजिबात पाया पडायच्या भानगडीत पडू नये. मेरे अल्पसंख्यांक भाईयोंके बारे में क्या बताए??? रहनेच दो|

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, आपला विचार पटला. सकाळी केलेली पूजा घरदार प्रसन्न करून जाते आणि त्यातून मानसिक समाधान आणि स्थैर्य लाभते हे नक्की. शेवटी हा मनाचा खेळ आहे. हेच समाधान जर कुणी नुसते हात जोडून मिळवत असेल तर ते ही तितकेच महत्वाचे. हे मानसिक बळ मिळवणे याबद्दल दुमत नाहीच; असल्या कथांमधून आणि व्रतांमधून पुत्रप्राप्ती म्हणजेच श्रेष्ठ संतानप्राप्ती, कन्याप्राप्ती म्हणजे कनिष्ठ संतानप्राप्ती वगैरे भयंकर विचार रुजतात आणि फोफावतात. आपल्या समाजात अजूनही जे मुलींना गर्भातच मारण्याचे जे भयंकर प्रकार घडतात त्याचे मूळ अशा कथा आणि अशी कर्मकांडे फोफावल्यामुळे घडतात. कर्मकांडांच्या अशा विघातक परिणामांना आक्षेप आहे. आणि त्यासाठी कर्मकांडेदेखील डोळे आणि सदसदविवेकबुद्धी दोन्ही टक्क उघडे ठेवून करणे गरजेचे आहे. तसे होत नसेल तर आपले शिक्षण, अनुभव यांचे महत्व शून्य म्हणायला पाहिजे. अशा व्रतांमधून पुढे मग नरबळी वगैरे भयंकर प्रकार घडायला वेळ लागत नाही. देवाला प्रसन्न करून घेण्याच्या हव्यासापायी पशुबळी देणे, त्याचे मटण शिजवून प्रसाद म्हणून खाणे, कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी चेंगरा चेंगरी होऊन माणसे दगावणे, नद्यांना प्रदूषित करणे, दुष्काळ असतांना लाखो लोकांच्या शाही स्नानासाठी लाखो लिटर पाणी विनाकारण व्यर्थ दवडणे, वगैरे सगळ्या कर्मकांडांच्या अतिआचाराने प्रचलित झालेल्या नकारात्मक गोष्टी आहेत. राधे मां, आसाराम, सारथी बाबा (हा नवीन आहे; कृष्णजन्माष्टमीला हा स्त्रियांचे एकांतात स्तनपान करतो आणि त्याची कृपा रहावी म्हणून विवाहित, अविवाहित स्त्रिया, मुली त्याला बिनदिक्कत असे स्तनपान करू देतात) असल्या भोंदू लोकांचे कर्मकांडांविषयीच्या आपल्या हळव्या भावनेमुळे मस्त फावते. आणि ही हरामखोर मंडळी मग कोट्यावधी रुपयांची माया जमवून ऐशोआरामात राहते. दाराला कुलूप नीट लागले आहे की नाही हे बघण्यासाठी ते दोनदा-तीनदा खेचून बघणे आणि मनाचे समाधान साधणे निराळे आणि देवा-धर्माच्या बाबतीत नको त्या प्रथांना आणि कथांना मुभा देणे निराळे. असो.

In reply to by समीरसूर

समीर सूर साहेब मी म्हणालो तसे आपली सारी उदाहरणे श्रद्धेचा किंवा कर्मकांडाच्या बाजाराची आहेत.बाजार कुणी केला मग तो राजकारणी असो कि बाबा किंवा माताजी असोत अथवा पौरोहित्य करणारा भटजी असो.जोवर धर्माला घरात ठेवले जाते तोवर ठीक आहे. कोणतीही गोष्ट बाजारात आणली कि त्याचे अवमूल्यन झालेच. मग ती श्रद्धा असो कि कला असो कि पावित्र्य.

>>>>>हे व्रत आषाढ शु 15 ते श्रावण शु 15 असे महिनाभर चालते आमच्या स्टाफ मध्ये बरेच उत्तरप्रदेश बिहार बंगाल आणि ओरिसा या राज्यामधले लोक आहेत. (मराठी कमीच्) या लोकांचा श्रावण आषाढ़ पौर्णिमा झाली की सुरु झाला आणि श्रावण पौर्णिमेला संपणार. आपण महाराष्ट्रात अमावस्येनंतरची प्रतिपदा ते अमावस्या असा महीना मानतो तर हे लोक पंधरा दिवस आधीच करतात. वर म्हटलेल्या तारखावरुन माझ्या मते हे कोकिला व्रत सुद्धा त्यांच्याकडे जास्त प्रचलित असावं.

असली बिनडोक व्रतवैकल्ये करून आपणच आपल्या धर्माला कमीपणा आणतो आहोत. जरा उपनिषदे वाचावीत, थोडेथोडके नामस्मरण करावे ते सोडून असल्या मूर्ख गोष्टींना भाव देण्यात कुणाचाच फायदा नाही. (पुरोहितवर्ग सोडला तर - तुम्ही पुरोहितांचे प्रतिनिधी म्हणून बोलत असाल तर तुमचे म्हणणे मान्य कारण इन दॅट केस तुमचा प्रामाणिक स्वार्थ असेल.>>>+१११११११११११ सतीचं यज्ञात जाळून घेणं , ५१ शक्तीपीठं , पार्वतीने तपस्या करून शिवला प्राप्त करून घेणं , शंकरांनी ३ रा डोळा उघडून कामदेवाला जाळण , पार्वतीने तिच्या शरीराच्या उत्न्यापासून गणेशाला निर्माण करणं, गणेशाला हत्तीचं डोकं बसवणं, समुद्रमंथनातून १४ रत्न बाहेर येणं ह्या गोष्टी भौतिक जगात घडलेल्या नाहीत ओ . सामान्य माणसांना अध्यात्मिक रहस्य सहसा समजत नाहीत म्हणून ह्या अश्या कथा रचल्यात . त्यामागचं लॉजिक खूप थोड्या जनांना समजतं . गुरूचं वाक्य प्रमाण न मानता स्वताच्या मनानेच काहीतरी करणं, शिवप्राप्तीसाठी घाई करणं, मग त्यातून चुकीची साधना किवा यज्ञयाग करणं असलं काही केलं की कुंडलिनी चुकीच्या मार्गाने धावू लागते आणि मग साधकाचा सर्वनाश होतो . हे दाखवण्यासाठी ती सतीची कथा आहे . पार्वतीच्या(पार्वती म्हणजे साधकाच्या शरीरात असणारी आदिशक्ती कुंडलिनी ) कथेत योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती साधना करून शिवप्राप्ती होते हे सांगितलंय . कुंडलिनी आज्ञाचक्र ( तिसरा नेत्र ) भेदून पुढे जाते तेव्हा साधकाच्या कामवासनेचा कायमचा नाश होतो . ह्याला ऊर्ध्वरेता अवस्था असं म्हणतात (सामान्य लोक त्याला ३ रा डोळा उघडून कामदेवाला जाळण असं म्हणतात ). समुद्रमन्थानाचा अर्थ कुंडलिनीचा मूलाधार चक्रापासूनचा सहस्त्रारा पर्यंतचा प्रवास आहे . त्या प्रवासाचे डीटेल्स , ते हलाहल विष , ती १४ रत्न म्हणजे नेमकं काय ह्याचे डीटेल्स ज्ञानेश्वरीत वाचायला मिळतील . हि अशी बिनडोक व्रतवैकल्य (काही लोजिकल खरीखुरी व्रतवैकल्य आहेत ) करण्यात स्त्रियांना काय मजा येते समजत नाही मला . समाजाला चुकीच्या दिशेने नेण्यात स्त्रियांचा मोठा वाटा आहे

In reply to by तुडतुडी

समुद्रमन्थानाचा अर्थ कुंडलिनीचा मूलाधार चक्रापासूनचा सहस्त्रारा पर्यंतचा प्रवास आहे. नाय हो, आमचा अभ्यास वेगळा दावा करतो... (ह घ्या. पण दावा पडताळून पाहण्यासारखा आहे खरा !)

In reply to by तुडतुडी

तुडतुडी अक्का, या प्रतिसादा साठी तुम्हाला ___/\___ फ़क्त काही गोष्टी टाळल्या तर बरं जसं बिनडोक व्रत वैकल्य. काहीतरी करा म्हणताना कधीकधी का करा हे ठाऊक नसतं, समजलं तरी त्याबाबत विचार करण्याची क्षमता नसते. त्यामुळे करत रहा असं सांगितलं जातं. काही वेळा स्वार्थापोटी, भीती दाखवून प्रश्नांना बंदी केली जाते. अवांतर- ऊर्ध्वरेता वगैरे वाचून एका दुर्घटनेची आठवण झाली. असो!

In reply to by तुडतुडी

तुम्ही वसकन अंगावर येणार नसाल तर एक सांगु का... चांगला आहे हा प्रतिसाद.. तुमची मतं ठाम आहेत.. माहिती सुद्धा खुप आहे तुम्हाला.. आणि वाचनही पुष्कळ असावं.. पण तुम्ही फारच अ‍ॅग्रेसिव्ह लिहीता म्हणुन तुमचं खरं वाटत नाही अनेकदा.. जर तुम्हाला पटला नाही हा प्रतिसाद तर सोडून द्या.. वाद नको घालायला.. ओके?

In reply to by तुडतुडी

समाजाला चुकीच्या दिशेने नेण्यात स्त्रियांचा मोठा वाटा आहे
अगदी अगदी. पटलंच मला. पण काय हो, समाजाने त्यांचं त्यांचं - स्वतःचं डोकं गहाण टाकलेलं असतं का?

In reply to by तुडतुडी

समाजाला चुकीच्या दिशेने नेण्यात स्त्रियांचा मोठा वाटा आहे
यात घोळ आहे असं नाही का वाटत? स्त्रियांना कसलेच स्वातंत्र्य नव्हते त्या काळात या असल्या, तुमच्याच भाषेत 'बिनडोक' व्रतवैकल्यांचा आरंभ झाला असावा. स्त्रियांना दुसरे काही करायला वेळ किंवा शक्ती रहाणार नाही यासाठी त्या काळात स्त्रियांना व्रतवैकल्यात अडकवून ठेवले असेल असे वाटत नाही का? तेव्हा त्यांना समाजाने आखून दिलं तसं जगायचं होतं. कुठच्या दिशेने जायचं स्वातंत्र्य नव्हतंच. (काही अगदी चमकदार अपवाद होते. पण ते अपवादच.) स्त्रिया स्वतःच प्रवाहपतित होत्या. त्या कसल्या कोणाला चुकीच्या दिशेने नेणार होत्या? आताच्या काळात मात्र स्त्रियांनी विचार करून यातून बाहेर यायचा प्रयत्न केला पाहिजे हे खरंय. म्हणजे निदान एकेक घर तरी अशा प्रथांतून बाहेर पडेल.

In reply to by पैसा

ज्या काळात स्त्रीला चप्पल घालणे माहित नव्हते ,तिचे स्थान माजघरापलिकडे नव्हते,तिला शिक्षणाचा गंध नव्हता त्या काळात ही व्रतवैकल्ये विरंगुळा तसंच त्या भाविक काळात निरनिराळ्या निमित्ताने देवाचे नाव घेणे,एक मानसिक आधार देणे यासाठी स्त्रिया व्रतवैकल्ये आदि गोष्टीत मन रमवत होत्या. आता शिक्षणाने विचार करु लागल्यावर यात बदल होतोय काही वर्गापुरता तरी.यातून बाहेर पडायचं म्हणजे काहीतरी पाप आहे,काहीतरी वाईट घडेल असल्या भितीतून हे वर्षानुवर्षे सुरूच राहिलंय. हल्ली मात्र पुन्हा एकदा असल्या व्रतवैकल्यांचे वाढते अवडंबर जाणवते.१९९६ मध्ये काहीही ऐकले नव्हते असे हे व्रत त्यावेळी पेक्षा आत्ताच करणारे मिरवणारे घाबरणारे असे लोकच जास्त दिसत आहे.सोशल नेटवर्कींगने या धाग्यावरनंसुध्दा हे व्रत जगभर पोचले असेल.आणि त्यातला फोलपणा लक्षात न घेता केलेल्या व्रताचे व्हाॅट्स अॅपी फोटो बघून हे व्रत सर्वव्यापी झाले तर आश्चर्य वाटू नये!!

In reply to by अजया

संतोषी माता, गुरुवारचे महालक्ष्मीव्रत, हे कोकिळाव्रत यांचे प्रस्थ सुरू होऊन वाढत गेलेले अगदी डोळ्यासमोर घडले आहे. आपल्या जुन्या कहाण्या आठवतात ना? त्यात व्रतं करायची पद्धत साधी सोपी असायची. कुठे झाडाखाली जाऊन पूजा करा, तळ्याच्या काठी जाऊन पूजा करा. साध्या सरळ गोष्टी असायच्या. श्रावण महिन्यात खूप पाने फुले मिळतात त्यांचा वापर करून पूजा वगैरे. अगदी केनीकुर्डूची भाजी केली इ. उल्लेख त्या कहाण्यांत असतात. असे भटजींना बोलावून दाने द्या वगैरे कुठेही सांगितलेले नसायचे. मला त्या सगळ्या कहाण्या वाचायला खूप आवडतात. पण ही सगळी व्रते म्हणजे.... जौदे. एखाद्याच्या श्रद्धेला हसू नये हे खरे. पण असली व्रते वगैरे श्रद्धा नाही म्हणता येत. ती अंधश्रद्धा सदरात जातील.

In reply to by पैसा

असली व्रते वगैरे श्रद्धा नाही म्हणता येत. ती अंधश्रद्धा सदरात जातील. >> नाही ती 'फोफावणारा आणि कधीच मंदीत न जाणारा बिझनेस' ह्या सदरात जातील :)

In reply to by यशोधरा

+११११ आणि यांना आधार म्हणून किंवा जाहिरात म्हणून चित्रपट मालिकांमधून प्रमोट केलं जातं. जय संतोषी माता, साईबाबा सारखे चित्रपट किंवा जय मल्हार सारख्या मालिका

असे थिल्लर उत्सव करून आपण त्या देवतेलाच कमीपणा आणतो हेच अनेकांच्या लक्षात येत नाही.
अगदी बरोबर . वर्गणी द्यायला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे . कुणी हिंदू उत्सव , परंपरा आहे असा युक्तीवाद केला तर , हिंदू धर्माची एवढी चाड आहे तर देवघरातल्या गणेशाला रस्त्यावर आणून त्याचा अपमान करताना धर्माभिमान कुठे जातो असा उलट प्रश्न विचारावा
समुद्रमन्थानाचा अर्थ कुंडलिनीचा मूलाधार चक्रापासूनचा सहस्त्रारा पर्यंतचा प्रवास आहे.
हा दावा माझा नसून ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलंय . योगशास्त्रा वरची काही पुस्तकं वाचण्यात आली . योगानुभावावरून हेच खरं आहे हे सिद्ध होतं . बिनडोक एवढ्यासाठी म्हणलंय कि लॉजिक शोधण्याचा प्रयत्न केला कि ते सापडतं . माझ्या काही ब्राह्मण मैत्रिणी आहेत . त्यांच्याशी ह्या विषयाबाबत बोलताना हसावं कि रडावं हे समजत नाही . अक्कल घरातल्या तिजोरीत कुलूप लावून बंद ठेवतात काही बायका .

ऊर्ध्वरेता वगैरे वाचून एका दुर्घटनेची आठवण झाली.
कुठली घटना हो ? असं नै करायचं . कुतूहल वाढवून मधेच नाही सोडायचं . इथे सांगता येत नसेल तर व्य नि केला तरी चालेल

समीरसूर सगळेच प्रतिसाद पट्ले/ आवडले . सगळ्यांणी आपापल्या स्वार्थासाठी कहाण्या तयार केल्या असाव्यात असे वाट्ते . एक कहाणी घ्या, तिचे अणेक व्हर्जण वाचयला मिळतील . ण्क्की कश्यावर विश्वास ठेवायचा? आणी का? लोक देव प्रसण्ण व्हावा म्हणूण अणेक व्रतवैकल्य करतात , मग देव का णाही वाचवत ? असो. ही घ्या ताजी बातमी http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4702027652677229192&S…

पैसा भाऊ , यशोधरा ताई स्त्रियांना व्रतवैकल्यात अडकवण्याचा किवा त्यांना वेद वाचण्याचा अधिकार मध्ययुगीन काळात नाकारण्याच कारण काय आहे हे वासुदेवानंद सरस्वती स्वामी आणि एका स्त्रीच्या संभाषणातून स्पष्ट होतं . स्त्रियांना स्वतःलाच व्रत वैक्ल्यात अडकून घ्यायला , अन्याय करून घ्यायला आवडत . ती स्त्री स्वामींना विचारते कि 'धर्म स्त्रीला माता , शक्ती वगेरे मानतो मग तिच्यावर अशी बंधनं का घालतो ?' तेव्हा ते म्हणतात स्त्री वर बंधन घालणारे आम्ही कोण ? स्त्रियांना स्वतःलाच बंधनात अडकायला आवडत . त्यांना मुक्तीची आस कधीच नसते . नवरा , पोरंबाळं ह्या पलीकडे कधी त्या विचार करत नाहीत . जन्मोजन्मी हाच नवरा मिळूदे म्हणून स्वतःहून स्त्री जन्म मागून घेतात . जन्माच्या फेर्यातून सुटण्याचा विचार करत नाहीत . आणि वेद हे ह्या मुक्तीसाठी आहेत . तेव्हा त्यांनी वेदांच्या नादी नं लागता सरळ व्रतवैकल्य करत बसावं .व्रतवैकल्य हि फक्त प्रापंचिक सुखासाठी असतात . कधी भजन , कीर्तनाला गेल्या तर गप्पाच मारत बसतील , वातीच वळत बसतील नाहीतर भाजी निवडत बसतील . ईश्वरप्राप्ती कडे त्यांचं लक्ष सुधा नसतं .मंत्र जप करण्यात स्त्रियांचं लक्ष कधीही केंद्रित होत नाही म्हणून त्यांना मंत्र दीक्षा देवू नये असं धर्म सांगतो . पण हे नियम जिला ईश्वरप्राप्तीची किवा मोक्षाची आस लागलीये तिला लागू होत नाहीत . बघा ना . गार्गी , मैत्रेयी वेदपठण करायच्या . अजूनही स्त्रिया करत असतील . जालिंदरनाथांनी मैनावती आणि तिची मुलगी चंपावतीला नाथपंथाची मंत्रदीक्षा दिली होती . एवढे मोठे रामकृष्ण परमहंस . त्यांना परमहंस पदाला पोचवणारी त्यांची गुरु 'भैरवी ब्राह्मणी' नावाची स्त्री होती . तिने त्यांना योगातल्या अत्यंत गूढ रहस्यांची दीक्षा दिली होती . तेव्हा स्त्रीनं व्रतवैकल्य करावीतच असा धर्माने काही आदेश दिलेला नाही .

In reply to by तुडतुडी

तसं तर मग पुरुषांबाबतही म्हणता येईल. विचार करुन पहा. दुसरं म्हणजे हा प्रतिसाद पहिल्या प्रतिसादाला contradict कर्तो आहे आणि माझ्या प्रश्नाचं उत्तरही हे नव्हे. असो.

समाजाने त्यांचं त्यांचं - स्वतःचं डोकं गहाण टाकलेलं असतं का?
हाच प्रश्न आहे ना . अर्धा समाज स्त्रियांनीच तर बनलेला असतो कि . आणि अश्या काही स्त्रीयांमुळे बाकीच्या स्त्रियांना सुधा त्याचा त्रास सहन करावा लागतो . जास्त मनाला लावून घेवू नका हो . मी पण स्त्रीच आहे आणि अर्थातच स्त्री च्याच बाजूने असणार . पण काही स्त्रिया खरंच …… जावूदे

In reply to by तुडतुडी

अच्छा, ओके, ओके! म्हणजे अर्ध्याच समाजाला चुकीची दिशा दाखवतात होय ह्या बायका? बरं बरं. मग त्यांना पार्शल म्हणूयात की बॅलन्स ठेवतात एकूण समाजाचा, असं म्हणूयात? म्हणजे अर्धा समाज चुकीच्या दिशेने (स्त्रियांवाला) आणि अर्धा समाज योग्य दिशेला (पुरुषवाला?), असं होतं का?