Skip to main content

ठाण्याचे नवे मेतकूट हॉटेल - एक वाईट अनुभव

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 11/01/2015 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी आम्ही एकुण ८ कुटुंबियांनी दुपारी जेवायला नव्याने सुरू झालेल्या व वॉसप वर प्रचार झालेल्या 'मेतकूट' या मराठमोळ्या उपाहारगृहात जाण्याचे ठरवले. रविवार आहे हे लक्षात घेता आरक्षणासाठी संपर्क साधला तेव्हा दुपारी १२.३० ते १.४५ या वेळत उपाहारगृह पूर्णतः आरक्षित झाले असल्याचे समजले. आम्ही ८ जणांसाठी दुपारी २ वाजताची चौकशी केली व फोनवर श्री सनी पावसकर यांनी आमची वेळ निश्चित केली. दुपारी १.५५ ला आम्ही पोचलो असता बाहेर बरेच लोक ताटकळताना दिसले. आरक्षण आगाउच केल्याने आम्ही निर्धास्त होतो. आत शिरताच मी नाव व आरक्षणाविषयी सांगताच व्यवस्थापकाने आवंढा गिळला. त्याने हातातील कागदावर लिहिलेल्या प्रतिक्षा यादीत माझे नाव टाकताच मी त्याला आरक्षणाचे स्मरण करुन दिले. पाचेक मिनिटात जागा होईलच असे त्याने आश्वासन दिले व कोपर्‍यतले मोठे टेबल दाखवुन हे रिकामे झाल्यावर तुम्हालाच देणार आहोत असे संगितले. २.३० झाले तरी काही हालचाल नाही. चौकशी केली असता. होइलच इतक्यात असे मोघम उत्तर मिळाले. आता इतका उशीर केला आहात, आत आल्यावर जेवण संपले असे सांगु नका असे म्हणताच काळजी नको, पोटभर जेवा असे आश्वासन मिळाले. अखेर २.४५ ला प्रवेश मिळाला. ८ जणांना दोन जागी विभागुन बसावं लागलं. तसच बसवायचं होतं तर आधीच बोलवायचं होतं! असो. गर्दी आहे तर बसू वेग़ळे म्हणुन आम्ही सोडुन दिले. वास्तविक शेजारचे टेबल दुसर्‍या कुटुंबाला देण्याऐवजी आम्हाला जोडुन देता आले असते, पण कुणाला पडली नव्हती. अखेर दहा मिनिटे वाट पाहुन वेटरला मेनू कार्डाची विचारणा केल्यावर चौघात एक दिले गेले. आम्ही थाळी मागवणार होतो, पण अन्य वेळेस आले तर काय मिळते ते पाहायचे होते. वेटरला ऑर्डर देताच त्याने थाळी संपल्याचे सांगितले. संतप्त होऊन व्यवस्थापकाला जाब विचारला असता हो संपली असे उत्तर मिळाले. आम्ही बाहेर पडायचे ठरवले. कुणाला काही पडली नव्हती. बाहेर श्री सनी पावसकर यांना "आमचे आरक्षण असतानाही पाऊण तास रखडवलत आणि आता जेवण संपलय असे सांगता?" असे विचारले असता त्यांनी कसलीही दिलगिरी व्यक्त न करता ' आ ला कार्टे मागवा असे मग्रूर उत्तर दिले. जेवण संपले याचा सरळ अर्थ पोळी, भाजी, वरण, भात हे पदार्थ निश्चितच उपलब्ध नव्हते. मग भर दुपारी आम्ही जेवणा ऐवजी काय वडे, भजी, आळुवड्या, थालिपिठ खावे? आम्ही पैसे मोजुन आपल्या आवडीचे जेवायला अलो होतो, उपाहारगृहातले उरले सुरले संपवायला आलो नव्हतो. नाराजी व्यक्त करुन बाहेर पडत असता श्री सनी पावसकर यांच्याशी बोलत असलेल्या बाई त्यांना म्हणाल्या, 'आपण तर यांना टेबल तर दिले होते" म्हणजे केलेली मेहेरबानी ऩ जाणणारे गिर्‍हाइकच वाईट. एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला. बाहेर पडलो आणि राम मारुती रस्त्यावरील शिव सागर मध्ये गेलो. उत्तम स्वागत झाले, उत्तम जेवण मिळाले. चार वाजुन गेल्यावर म्हणजे बंद करायची वेळ झाली असताना सुद्धा अखेरपर्यंत तत्पर सेवा मिळाली, कसलीही घाई केली गेली नाही. नाइलाजाने असे वाटले की त्या मेतकूटवाल्यास जाऊन सांगावे की बाबारे, हॉटेल कसं चालवायचं, ग्राहकाशी कसं वागायचं हे शिकायला इथे काही दिवस नोकरी कर आणि मग हॉटेल उघड. मिपाकरांनो, पैसे द्यायची तयारी असतानाही जर गैरसोय, मनस्ताप व अपमान सहन करायचा असेल तर घंटाळी, ठाणे येथे सुरू झालेल्या 'मेतकूट' ला अवश्य भेट द्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 72662
प्रतिक्रिया 233

प्रतिक्रिया

In reply to by सविता००१

त्या उ. गृहात पूर्वी दिवसभर अशी सर्व्हिस मिळत असे. ते फार सोयीचे पडायचे. माझी कामाची ठिकाणे तिथे आजूबाजूला असल्याने जरा जाणे झाले होते. अजूनही मला हे माहितीये की येत्या दोन तीन वर्षात दुसरे उ. गृह तिथे उघडले नाही तर बास्रीवाल्यांशिवाय मला इलाज नाही.

In reply to by जयंत कुलकर्णी

पुणेकरांच्या डेक्कन भागात 'मथुरा' आहे. काही पदार्थ शुद्ध (गावठी) तुपातले असतात. २-३ वेळा जेवण घेतलेय. अनुभव एकूणच छान आहे.

In reply to by रेवती

थंडगार दोसा पुढ्यात आला.
कोणत्याही हॉटेलात वाफाळता "गरम डोसा" पुढ्यात आल्याचं आजवरच्या हयातीत आठवत नाही. त्यासाठी रस्त्याकडेचा एखाद्या अण्णाचा गाडा किंवा दावणगिरी लोणी स्पंज डोश्याची गाडी गाठावी लागते.

In reply to by गवि

सवाई गंधर्व महोत्सवात जे खाण्याचे स्टॉल लागतात तिथे वाफाळता डोसा मिळतो ,बहुतेक जण त्यासाठीच सवाईला आल्याचे जाणवत होते. *ROFL*

In reply to by गवि

गवि, विनोदी आहात. अत्यंत कुरकुरीत दोसा खाण्याने जसे समाधान होत नाही तसेच दोसा हा फारवेळ गरम राहू शकत नाही तर त्यातील गरम भाजी, सांबार यांच्या साथीने त्याचे तापमान, लज्जत वाढते हे आपल्याला माहित आहेच. तुम्ही माझी चेष्टा करताय.

In reply to by रेवती

..उलट मीही तेच म्हणतोय. ..चेष्टेचा अजिबातच उद्देश नाही हो. ..सर्वच गार दिलं असेल हे लक्षात आलं नाही...ते तर फारच बेकार. ..दोसाही गरम मिळू शकतो पण हॉटेलात नाही इतकाच मर्यादित मुद्दा होता.

In reply to by बोका-ए-आझम

तिथली रसम इडली तर वाह!!!!!!!!!!!! गरमागरम आणि मस्त आंबटशार चवीचा नादच नाय करायचा. कार्टूनमध्ये दाखवतात तसे तोंडातील सगळे दात तोंडाला सुटलेल्या पाण्याबरोबर वाहत जातील असे वाटते.

In reply to by रेवती

तुळशीबागेमधलं "अगत्य" किंवा अक्षय का हो? अक्षय वाल्यानी एकदा आंबलेली बटाट्याची भाजी घालुन डोसा दिलेला. त्यावर तक्रार केली असता खालच्या मालकानी सॉरी बिरी नं म्हणता अनुनासिक स्वरामधे "जंराँशीं तंरं लांगंलेंलीं दिंसंतेंयं" किंवा "झांलीं अंसेंलं खंरांबं" अश्या टायपाचं उत्तर दिलं होतं. बरं असं उत्तर ऐकुन आईनी तिथे चामुंडा अवतार धारण केला होता. परत कै त्या हाटेलात गेलो नाही कधी. अगत्य वाला मात्र चांगला आहे. कधे मधे गार देतो, पण ते सोडुन क्वालिटी चांगली आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही नाही. वर नाव दिलय. यावेळी तुळशीबागेत मी हरवले होते. लगेच स्वत:ला सापडले. ;) काय ती गर्दी!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

एकही चांगले फॅमिली हॉटेल नाहिये. दुनियाभरचे लोक्स तिथे ख्ररेदीला येतात, शिवाय गणपतीमध्ये लांबलांबुन लोक येतात त्यामुळे इथे कायम हमखास गिर्‍हाईक असते.पण मला वाटत नाही त्यातले कोणी रिपीट कस्टमर असतील.

अरे!! माझा थायी हॉटेलवाला वेळ असेल तर माझ्या टेबलवर खुर्ची घेउन हमखास बसतो. मस्त नवर्‍या मुलांबरोबर टीपी करतो. एकदा त्यांनी सुपचा बेसच खारट करुन ठेवला होता, तीनदा सूप (चार माणसांच) बदललं तेंव्हा कुठे लक्षात आलं त्यांच्या काय झालय ते. त्या बद्दल कितीदा सॉरी म्हणावं. ( थायी हॉटेलचा मालक ऑस्सी आहे. आणि ऑस्सी लय म्हणजे लय बोलतात. अक्षरशः अरे बाबा आता बास बॉस म्हणावं लागत) भारतात मात्र डोसा थंड आहे, याला आचारी म्हणतात का? ( गणपा भाऊंची कृपा ;) ) अश्या अनेक खोडी काढुन आम्ही निवांत डीशेश

मिपावरील हा धागा प्रिंट करुन त्याच्या काप्या हॉटेलच्या मालकाला वा म्यानेजराला द्या. वाईट अनुभव. भलताच माजोरडेपणा.

In reply to by नित्य नुतन

फेब्रुवारी-मार्चमध्ये मी सलग दोन आठवड्यांत तीनदा 'मेतकूट'मध्ये गेले होते. गर्दी होती तेव्हा व्यवस्थापन, अन्नाची चव सगळ्या बाबतीत जेवढं जमेल तेवढं सगळं गंडलेलं होतं. पदार्थ संपलेला वेटरांना माहित नव्हता. ते सांगायलाही चिकार वेळ लावला. मोदकासारखा पदार्थ "तीनच देणार, एक किंवा दोन नाही मिळणार" छाप नियम का बनवतात कोण जाणे! पण ती जागा म्हणजे खुराडं आहे. चकचकीत फरश्या आणि आरसे लावून क्षीण प्रयत्न केला आहे. पण तिथे बसून मला कोंदटल्यासारखं होत होतं. फार गर्दी नसूनही. बाकी चकचकीत असूनही हात धुवायची सोय भीषण आहे. गर्दी नव्हती तेव्हा तिथल्या वेटरांची विनम्रता अंगावर येणारी होती. गर्दी नसताना पदार्थांची चव मात्र चांगली होती. कष्ट न करता सणासुदीचं जेवण ... नॉट बॅड. गर्दी नसताना मी एकटी गेले होते, तेव्हा मालक आणि वेटर लोकांनाही पुरेशा विचित्र नजरांनी बघितलं. एकटी बाई कशी काय हाटेलात येऊन खाते असा भाव होता. थोड्या वेळाने मैत्रीण आली, हे नशीब. नाहीतर बहुदा जेवायला वाढलंच नसतं अशी शंका आली. पुढे आमचं पाच-कोर्सचं जेवण, दोन बायकांनी वारेमाप खाणं हे सुद्धा तिथल्या मंडळींना फार पचलं नसावं असं त्यांच्या चेहेऱ्यावरून दिसत होतं. बाहेर लोक ताटकळत उभेही नव्हते. त्यामुळे आम्ही त्या नजरांकडे दुर्लक्ष करत दोन तास गप्पा मारत जेवलो. 'मेतकूट'च्या समोरच 'श्रद्धा' आहे. तिथे वडे मिळतात, "पाव मिळणार नाही" अशी पाटी सुरुवातीपासून आहे. तिथेही चिक्कार गर्दी असते. अनेक वर्षं तिथले वडे, समोसे, मूगभजी खाऊन वजन चिक्कार वाढवलं आहे. तिथे कधीही असा माजोर्डेपणा दिसत नाही. "पाव मिळत नाही" हे पण प्रेमाने सांगतात. 'श्रद्धा' ही टपरीवजा जागा आहे. हे वडेवाले आणि तिथे काम करणारे लोक जितके प्रेमळ आहेत त्यांतला अर्धा भाग जरी 'मेतकूट'वाल्यांनी उचलला तरी अनुभव बराच सुधारेल.

तुम्हाला वाईट अनुभव आला हे वाईटच आहे. परंतु धाग्यात किंवा विशेषतः प्रतिसादात मांडलेली एकंदरित मतं ही अतिरेकाची आणि केवळ रागापोटी मांडलेली वाटतात. आम्हाला याच हॉटेलचा अगदी चांगला अनुभव आहे. पदार्थांची चवही उत्तम होती, मालक स्वतः गप्पा मारून गेले, त्यांनी गर्दीमुळे त्यांची उडणारी तारांबळ आम्हाला सांगितली. तेंव्हा, त्यांची चूक त्यांच्यापर्यंत पोचवणं इथपर्यंत ठीक आहे. पण मराठी माणूस, त्याचं ते नेहमीचं जनरलायझेशन की त्याला बिजनेस कसा करायचा न कळणं इत्यादी टिप्पण्या निषेधार्ह आहेत. मराठी माणसाने मराठी माणसाचेच पाय ओढणं का काय ते यालाच म्हणतात. जा ना, तोंडावर सांगा हे असं आवडलं नाही हे हे सुधारा. नाही ऐकलं तर करा मग जे हवं ते. आहेच तुमचं व्हॉट्सॅप, फेसबुक, ट्विटर; राग काढायला.

In reply to by वेल्लाभट

प्रतिसादात मांडलेली एकंदरित मतं ही अतिरेकाची आणि केवळ रागापोटी मांडलेली वाटतात.
बघा, म्हणजे राग कसा काढायचा, केव्हा काढायचा आणि कुठे काढायचा याचे पण नियम तयार झालेत वाटतं. अर्थातच इथे रागच आहे. स्वतःचे पैसे घालून अशी वागणूक मिळत असेल तर राग येणार नाही तर काय लोकांना?
तेंव्हा, त्यांची चूक त्यांच्यापर्यंत पोचवणं इथपर्यंत ठीक आहे.
हो ना सुधारणेचा मक्ता घेतलाय ना लोकांनी मग्रूर वागणूक सहन करून. बाय द वे, म्हणजे जोपर्यंत कोणी सांगत नाही तोपर्यंत या लोकांना त्यांची चूक कळलीच नाहीये की काय?
मराठी माणसाने मराठी माणसाचेच पाय ओढणं का काय ते यालाच म्हणतात.
टीका करणं म्हणजे पाय ओढणं हे म्हणजे नवीनच. या गुंठामंत्र्यानी कुठेही हॉटेल काढायचं. मग्रूरी करून लोकांचा अपमान करायचा आणि टीकाही सहन होत नाहीये काय? मराठी माणसाला पायाची काळजी नव्हे, त्याच्या खिळे ठोकून ताठ केलेल्या पाठीच्या कण्याची काळजी करायला हवी.

In reply to by वेल्लाभट

अन तुम्ही टीका करा की आणि काय करा मला कैच्च नाही त्याचं. फक्त शितावरून भाताची; किंवा सुतावरून स्वर्ग; किंवा असलं काहीतरी करू नका असा आपला सल्ला. सहज शब्द आठवला. रॅशनॅलिटी. असो.

In reply to by वेल्लाभट

अहो, पैसे देवून जेवायला जायचं असतं ना? त्यात रॅशनॅलिटी कुठे आलीय? बाकी तुमचे मित्र असले ते हॉटेलवाले तर सांगा ना त्यांना त्यांच्याच फायद्यासाठी. बाकी शितावरूनच भाताची परिक्षा करतात यात काही नवीन किंवा चुकीचं आहे का? बाकी पाऊस आणि टब या उपमा कशासाठी वापरल्यात काही कल्पना नाही. आमची जबाबदारी हॉटेल मालकाला सुधारणं नाही. यड्या मराठी हॉटेल मालकांना सुधारणं तर त्याहून नाही.

In reply to by वेल्लाभट

मी माझा अनुभव जसा आला तसा व्यक्त केला. वर धर्मराज यांना नुकत्याच दिलेल्या प्रतिसादात उहापोह केलाच आहे, कृपया वाचा. जेव्हा मालकाला सांगितल्यावर तो तुम्हालाच बदलायचा सल्ला देतो तेव्हा राग हा येणारच. मी मराठी माणसाचे जनरलायझेशन व कशाचेच जनरलायझेशन करत नाही. अनेक उत्तम सेवा देणारे मराठी व्यावसायिक मला माहित आहेत. अनेक मराठी उद्योजक यशस्वी आहेत. मी माझा तिथला अनुभव सांगितला. आपला अनुभव वेगळा असू शकतो.

In reply to by सर्वसाक्षी

तुम्ही नाही; मी म्हटलंय प्रतिसादात जनरलायझेशन्स झालीयत. तुम्हाला आलेला अनुभव वाईट आणि खेदजनकच आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं. त्याबाबत नो दुमत.

हॉटेलचे नाव 'मेतकूट' असेच आहे की 'मेटाकूट'? ;) अवांतर - मेटाकूट शब्दाची व्युत्पत्ती काय? हा शब्द मेटाकुटीला येणे ह्या वाक्प्रचाराव्यतिरीक्त अन्यत्र वापरण्यात येतो काय?

In reply to by सुनील

मेटेंखुंटीस, मेटाखुटी, मेटाकुटीस येणें-१ मांडी घातलेली काढून गुडघ्यावर उभें राहणें (एखाद्यास मारण्याकरितां वादांत वरचष्मा होण्याकरितां) २ नेटानें खेचण्याकरितां, ओढण्याकरितां गुडघे टेकून उभें राहणें. (मनुष्य, पशु यांनीं). इथे पहा - दाते कर्वे शब्दकोश http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/philologic/getobject.pl?c.37:1985…

माणूस मराठी असो की अमराठी... प्रथम अव्यवस्था आणि त्यावर उद्धटपणा करणे अक्षम्य आहे. "मी उद्धटपणा केला तरी (पैसे मोजून माझ्या दुकानात येत असलात तरी) तुम्ही मात्र गप्प राहून सहन करा किंवा फारतर विनयाने माझ्याकडेच तक्रार करा." असा विचार करणार्‍या व्यावसायीकाची कीव करणे सोडून धडा शिकवणेच जास्त योग्य आहे. किंबहुना, हा धडा शिकल्याशिवाय व्यवसायांत यशस्वी होता येत नाही... म्हणजे एक प्रकारे असे करणे हा गिर्‍हाईकाने व्यावसायीकावर केलेला उपकारच आहे... त्याचा सकारात्मक उपयोग करून घेणे, न घेणे सर्वस्वी व्यावसायीकावर अवलंबून आहे !

एक विशेष म्हणजे आता पुण्यातील सर्व हॉटेल्स् मध्ये जागेचा अत्युच्च वापर केलेला दिसतो. मोकळी जागा ही शिल्लकच नसते. जरा जागा दिसली की तिथेच एक टेबल टाकून दोन खुर्च्या टाकतात. अरे काय हे. लोक हॉटेलात जेवायला आलेत की खानावळीत? बर डिशेसही दीडशे दोनशे अडीचशे अशा रेटने. म्हणजे स्वस्त नव्हेतच. चव चांगली असली तर गर्दी जास्त आणि मग टेबल्स ही तेवढीच जास्त. वेटरवर्गाचा आविर्भाव ही असा की जेवा आणि लवकर जा. तसे रेट देवून दुसर्‍या कुणाच्या तरी पाठीला पाठ लावून जेवणे हे म्हणजे हॉटेलमालक उपकार करतोय असेच वाटते. एकूणच "लुटणे" हा पुण्यातल्या हॉटेलमालकांचा मुख्य धंदा आहे. हॉटेल चालवणे हा जोडधंदा.

In reply to by काळा पहाड

जागेचा पुरेपूर वापर ही पुण्या मुंबईची गरज आहे. जागेच्या किंमती प्रचंड वाढल्यात. हॉटेलचा धंदा चालवुन नफा मिळवण्यासाठी जागेचा पुरेपूर वापर केलाच गेला पाहिजे. नुकतेच ऐकले की पुण्यात नवी तुळशीबाग जी सुरु होते आहे तिथे १०*१० च्या गाळ्याचा (५०% बिल्ट अप) रेट ५० लाख रुपये आहे (खरे खोटे देव जाणे). हा जर रेट असेल तर हॉटेलवाले पण नफा कमाविण्यासाठी जागेचा सुयोग्य वापर करुन घेणारच. रेट बद्दलही तेच. पुण्यात एकुणच जागेचे भाव जास्त असल्याने डिशेसही महाग असतातच, हे कोल्हापुर सांगली सातार्‍यात रेट्स अर्थाच कमी असतील. हॉटेलवाल्यांनी रेट कमी लावु नयेत असे काही म्हणणे नाही पण इतर शहरांच्या मानाने दर जास्त असण्याचे मुख्य कारण जागेचा भाव हे आहे. पुण्यातल्या ज्या ज्या हॉटेलात मला सेवा अयोग्य मिळाली ती मी ब्लॅकलिस्ट केली. कालांतराने त्यातली बरीच हॉटेल्स बंद पडली. जी अजुन चालु आहेत तिथे मी जात नाही. वेटर्स तुसडे असलेले मात्र फारसे कुठे बघायला नाही मिळालेले. नारायण पेठेतल्या ४ टेबलाच्या क्षुधा शांती गृहातील वेटर कदाचित तुसडे असु शकतील. पण त्याकडे मी फारसे लक्ष देत नाही. लुटणे हा कुठल्याही उद्योजकाचा स्थायीभाव असतो. कुठल्याही शहरातला. त्याची किंमत जर जास्त असेल तर तो आपोआप स्पर्धेबाहेर पडतो किंवा किंमत कमी करतो. तो तरीसुद्धा लुटत असेल तर तो केवळ मालाच्या दर्जाच्या बळावरच.

In reply to by मृत्युन्जय

नुकतेच ऐकले की पुण्यात नवी तुळशीबाग जी सुरु होते आहे तिथे १०*१० च्या गाळ्याचा (५०% बिल्ट अप) रेट ५० लाख रुपये आहे (खरे खोटे देव जाणे). हा जर रेट असेल तर हॉटेलवाले पण नफा कमाविण्यासाठी जागेचा सुयोग्य वापर करुन घेणारच.
एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करणार्‍या दुकानमालकाला तेवढाच फायदाही अपेक्षित असणार. जर त्या किंमती वरचे व्याज पाहिले तर जागामालकाला महिन्याला किमान एक कोटीची उलाढाल (आणि दोन लाखांचा नफा) अपेक्षित असणार. एवढ्याश्या जागेतून एवढी मोठी उलाढाल कशी चालेल याचा काही अंदाज येत नाही ब्वा. सध्या सगळा किराणा बिग बाझार मधून आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन घेतोय. बाकी भारतीयांना आपली किंमत जास्तच असल्याचं वाटतं (ओव्हर व्हॅल्युएशन) त्याचा हा परिणाम आहे.

दमण येथील एका मोठ्ठ्या पॉश हॉटेल मधे बिलातील उरलेले पैसे परत करताना कमी पैसे परत केले गेले. कारण विचारलं असता सुट्टे नाहीत असं सांगितलं. 'बरं' म्हणून मालकाकडे गेलो. आवाजाची पट्टी न बदलता घडली गोष्ट सांगितली. तो म्हणे आत्त देतो, सगळं फ्री देतो इत्यादी. मी म्हटलं, 'गरज नाही. एखाद्याने चार दोन रुपयांसाठी हे सांगितलंही नसतं, पण प्रश्न तत्वाचा आहे. आज एवढं मोठं हॉटेल थाटून बसता आणि सुट्टे नाही म्हणता? बरं हे खरोखर नसतील तर ते मान्य नाहीच पण सुट्यांच्या नावाखाली जर तो वेटर पैसे मारत असेल तर मॅनेजर ला सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून सांगतोय. याहून अधिक सांगण्याची किंवा उगाच तमाशा करायची माझी इच्छा नाही. बाकी तू बघ काय करायचं ते.'

In reply to by वेल्लाभट

प्रत्येक वेळी आपल्या हॉटेलात काय चाललंय हे मालकाला कळतंच असं नाही. एक चांगुलपणा म्हणून गिर्‍हाइकाने अशा गोष्टी आपण होऊन सांगणं हे अत्यंत सेन्सिबल आहे.

In reply to by असंका

खरं आहे. महिन्याला जवळ जवळ १५ ते २० हजार गिर्‍हाईकांना सेवा पुरवायची म्हणजे तारेवरची कसरत असते. १५ ते २० हजार गिर्‍हाईके म्हणजे १५ ते २० हजार स्वभाव. स्वतःचा व्यवसाय असल्याकारणाने मालक डोके शांत ठेवून, प्रसंगी अपमान झेलून प्रत्येक तक्रारदार गिर्‍हाईकाची समस्या सोडवायचा प्रयत्न करतो. (केलाच पाहिजे). पण तिथे नोकरी करणार्‍यांचे तसे नसते. पुन्हा, वरचेवर कर्मचार्‍याला काढून टाकणे आणि नविन चांगला कर्मचारी मिळविणे दुरापास्त असते. हल्ली उपहारगृह व्यवसाय जोरात आहे. अनेक नविन उपहारगृह उघडत आहेत. ह्या क्षेत्रात नोकरी करणार्‍यांना (आचारी, सेवादाते, स्वच्छ्ता कर्मचारी, स्वयंपाकगृह आणि जेवण दालनाचे पर्यवेक्षक) अनेक संधी उपलव्ध असतात. जरा काही त्यांना बोललं की लगेच नोकरी सोडून जायचे हत्यार उपसतात. त्यामुळे आहे त्यांनाच दादापुता करून, समजावून क्वचित धमकावून कामे करून घ्यावी लागतात. प्रत्येक तक्रारदाराची तक्रार मालकापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक असते. त्याने ताबडतोब एखाद्या कर्मचार्‍याला नोकरीवरून काढून नाही टाकले तरी मालकाच्या मनांत कर्मचार्‍यांची एक 'काळी यादी' तयार होत असते आणि संधी मिळताच तो कृती करतो. माझ्या इथल्या दोन उपहारगृहात मिळून २२ माणसे काम करीत आहेत. नविन दोन उपहारगृह सुरु होण्याच्या मार्गावर आहेत म्हणजे अजून ३० ते ३५ कर्मचारी येतील ह्या ५० -५५ कर्मचार्‍यांमध्ये सर्वच जणं अप्रतिम सेवादाते, निष्ठावंत आणि बौद्धीक चुणूक असणारे नसतात. सतत त्यांचे वागणे, गिर्‍हाईकांच्या तक्रारी आणि अभिप्राय ह्यातून त्यांचे मुल्यमापन होत असतेच. संधी मिळाली की कचरा साफ केला जातोच. पण, त्यासाठी आपल्या निरिक्षणाबरोबरच गिर्‍हाईकांचे 'फिड बॅक' फार महत्त्वाचे असते.

मला वाटतं एवढं हे हॉटेल चालतंय तर रेट दुप्पट करावेत तिथे बसून वाफाळलेला डोसा खाणाऱ्यांसाठी. बाकीच्यांना पार्सल द्यावे. खातील त्यांच्या दोन गाड्या उलटसुलट लावून डिक्यांची शटरं वर करून. मालकपण खुश गिऱ्हाइकंपण खुश.

एखाद्या पंचतारांकित प्रचंड पसारा असलेल्या हॉटेल्च्या चेअरमन विषयी कदाचित असे असू शकेल पण ते त्यालाही भारी पडेल. इथे नव्याने सुरू झालेल्या हॉटेलवर मालक स्वतः नसेल तर काही खरं नाही. बहुतेक हॉटॅलचे मालक बहुतांश वेळ स्वतः तिथे उपस्थित असतात अन्यथा त्यांच्या कुटुंबातिल एखादी विश्वासू व जबाबदार व्यक्ति त्यांच्या गैरहजेरीत देखरेख करते. कुठलाही व्यवसाय विशेषतः हॉटेल, वाहतुक व्यवसाय हे हात स्वतः काळे करायचे उद्योग आहेत. मी शेठ बनुन घरी बसतो, संध्याकाळी गल्ला आणुन द्या असे होत नाही. अनेक हॉटेल मध्ये शेट्टी स्वतः तिथे नाश्ता / जेवण करताना दिसतात.

In reply to by सर्वसाक्षी

..प्रचंड सहमत..नुसते हजरच नव्हे तर मुदपाकखान्यातही प्रसंगी उभे राहणारे आणि स्वतःच्या हातात चव असणारे जाणकार मालक आवश्यक असतात.

In reply to by सर्वसाक्षी

सर्वसाक्षी, मालक स्वतः हजर नसेल तर कर्मचार्‍यांच्या वर्तुणूकीवरही प्रचंड नकारात्मक परिणाम होतो. जो धंद्याला अत्यंत घातक असतो. कर्मचार्‍यांवर वचक ठेवणे, त्यांच्या बारीक सारीक (नगण्य वाटणार्‍या) चुकाही त्यांच्या निदर्शनास आणुन देणे त्याच बरोबर त्यांनी केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टी बद्दल इतर कर्मचार्‍यांसमोर शाबासकी देणे हे करावेच लागते. कोणीही कर्मचारी बेफिकीर राहू नये आणि सहकर्मचार्‍यांना आणि आपल्यालाही डोईजड होऊ नये इथे लक्ष देण्यासाठी तिथे त्यांच्या डोक्यावर उभे राहावे लागते. उपहारगृह व्यवसाय संध्याकाळ ते मध्यरात्र ह्या वेळेत जोरात असल्याने मालकाला सोशल लाईफ उरत नाही. एकाहून अधिक उपहारगृहे असतील तर प्रत्येक ठिकाणी आकस्मित भेट देऊन नियंत्रण ठेवावे लागते. मीही अजून शिकतोच आहे.

असा अनुभव प्रत्येकाला येइलच असे नाही पण तुम्हि हा प्रसन्ग सांगून काही जणांना सावध केले आहे हे नक्की. हा आण्भव वाचून तिथं जायचं का नाही हा निर्णय ज्याने त्याने घ्यायचा आहे. बाकी तुम्हाला आलेला अनुभव वाईटच होता याबद्दल दुमत नाही. :(

मलाही ही मेतकूटची जाहिरात व्हॉट्सअॅपवर आली होती. आता हाच रिव्ह्यू व्हॉट्सॅपवर टाका. आपण घामाचे पैशे खर्च करताना गुजराती-मराठी वगैरे अस्मिता मध्ये आणायची काडीचीही गरज नाही. मराठी गिऱ्हाईकांचा अपमान करण्यात मराठी दुकानदारच पुढे असतात.

काही वर्षापुर्वी ठाण्यात तलावपाळिजवळ नमस्कारमद्धे असा अनुभव आला होता. काहितरी चिकन-मटणची डिश व आठ रोट्या मागवल्या होत्या.जेवण वेळेवर आले, पण त्याने चारच रोट्या दिल्या. बाकिच्या नन्तर देतो असे सान्गितले. पहिल्या चार रोट्या खाउन झाल्यावर आम्हि उरलेल्या चार आणायला सान्गितले. तर त्याने आता देतो/ थोड्या वेळा येतील असे बोलुन अर्धा तास लावला, तोपर्य्नत आमच्या पुढ्यातली डिश गार होउन गेली होती, तेव्हडा वेळ आह्मि एकमेकान्च्या तोन्डाकडे बघत होतो. हॉटेलात बाकी लोक सुद्धा अर्धा तास असेच बसुन इकडेतिकडे बघत होते, कोणालाच काहिच सर्व्ह केले जात नव्हते. शेवटि एकदाच्या रोट्या आल्या. त्या खाउन आणखी काही ऑर्डर न करताच आम्हि घरी परत आलो. ( न जाणो आणखी अर्धा तास लावला तर). तिथुन जाताना नेहमी त्या दिवसाची आठवण येते. सध्यातरी ते हॉटेल बन्द पड्ले आहे. त्यामानाने मखमली तलावासमोरिल उत्सवमद्धे चान्गली सेवा व जेवण मिळते.

मी यावेळी चांगल्या म्हणवल्या जाणार्‍या फराळवाल्यांकडून (चितळे नाही, घरगुती करणारे असतात त्यांच्याकडून) एक दोन पदार्थ करवून घेतले. हे टिकावू पदार्थ त्यांच्याकडून उचलल्यापासून ३ दिवसात खराब झाले. विमानात सगळे सामान थंडगार असते. येथे पोहोचल्यावर मिपाकर लंबूटांगने आम्हाला विमानतळावरून उचलले. त्या रात्री भयंकर थंडी होती. नंतर सामान बेसमेंटच्या गारव्यातच होते. सकाळी सामानातून फराळ काढून ज्यांनी मागवला होता त्यांना म्हणजे ३ घरी दिला दुसर्‍या दिवशी आमचे म्हणून आणलेले पाकीट उघडले तर बुरशी आलेली. आईकडे फोन करून खात्री करून घेतली की तिने दुसरीकडून मागवलेला हाच पदार्थ टिकलाय ना तर तिचा पदार्थ २ अठवडे मजेत डब्यात बसला होता. मग त्या फराळवाल्यांना कळवले व दीड हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले. यावर, त्यात काय एवढे! असं होतं कधीकधी.........तुम्हाला त्याचे एवढे वाटायला नको वगैरे. भरपाईचे तर नावच नको. त्यावर मी म्हणाले की पुढील वेळी तुम्हाला ऑर्डर देण्याआधी मी विचार करावा लागेल. तर ते म्हणाले की काही हरकत नाही. आपल्यामुळे कोणाचे नुकसान झालेय तर दिलगिरी नाही उलट भरपाई मिळणार नाही म्हणाले. आता या मनुष्याकडे मी अजिबात जाणार नाही पण म्हणून यांना ग्राहकांची कमतरताही नाहीये ना! चितळ्यांना पर्याय म्हणून यांचा विचार केला होता. आता हेही बाद!

In reply to by रेवती

त्यात काय एवढे! असं होतं कधीकधी.........तुम्हाला त्याचे एवढे वाटायला नको वगैरे. बापरे! मी तर एखाद्या गिर्‍हाईकाने 'पेठकर, आज मिसळ मधे मजा नाही आली.' असे म्हंटले तरी बिलात मिसळीचे पैसे लावत नाही. स्वतः मिसळ चाखून जे काही कमी जास्त आहे ते आचार्‍याला दम मारून सांगतो आणि नंतर वरचेवर मिसळ चाखून लक्ष ठेवतो. (मी लक्ष ठेवतो आहे हे कर्मचार्‍याच्या नजरेत असणं महत्त्वाचं असतं).

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर साहेब हाच तर बर्या आणि चांगल्या हाटेलातील फरक आहे.

In reply to by सुबोध खरे

पेठकर काका हॉटेल मालकाचे "लक्ष्य" आणि लक्ष मधील फरक मेतकूट समानधर्मींना समजेल तो सुदीन !

In reply to by रेवती

आता पुढच्यास ठेच मागचा शहाणा हा नियम लावून सदर फराळवाल्यांचे नाव कळवा म्हणजे बाकी लोक त्यांच्या कडून घेताना विचार करतील.

मी ब्लोक-लिस्ट केलेली ठिकाणे १. डॉमिनोज पिझ्झा हिंजेवाडी & चिंचवड २. सयाजी हॉटेल मध्ये पोर्तीको ३. सर्जा- औंध

मागच्या आठवड्यात कोयनेवरून येताना मुद्दाम चिपळूण महाड मार्गे मुंबईला आलो. येताना महाडच्या जवळ एका नदीच्या बाजूला असणार्‍या एका छान मिनी-रिसॉर्ट मध्ये जेवण घेतले. बहूतेक रत्ना असे नाव होते रिसॉर्टचे. जेवण ठिक होते पण लोकेशन खूप छान होते. वेटरने जेवण झाल्यावर हाताने लिहीलेले बील दिले. बिल घेताना सहज बिलावर नजर टाकली असता माझ्या अंदाजापेक्षा जवळ जवळ दिडपट बील जास्त वाटले म्हणून चेक केले तर वेटरने दोन पदार्थ जास्त लावले (जे आम्ही घेतलेच नव्हते) असे दिसले. म्हणून त्याला नवीन बील आणायला लावले. नवीन बीलात (ते सुद्धा हाताने लिहीले होते..प्रिंटेड बील नव्हते) वेटरने जी भाजी आम्ही खाल्ली तिचा दर पन्नासने वाढवून ठेवला होता. मग सरळ मॅनेजरकडे गेलो. एक बाई बसली होती. तिने बील पाहून जास्त डोके न लावता सरळ पेनाने खाडाखोड केली आणि वेटरची चुक झाली हो म्हणून बील करेक्ट केले. नंतर उगाच आम्ही विचारले नसताना ही हा वेटर हल्लीच आला हो. त्याला काय बी माहीत नाही अशी सुद्धा माहिती दिली. तिचे बोलणे आणि एकंदरीत बॉडी लॅग्वेज बघता ती खोटे बोलतेय असे वाटले. कदाचित असे जास्तीचे पदार्थ बिलात लावणे किंवा वाढीव दर लावणे असा प्रकार त्यांचा रोजचा असावा असे उगाचच वाटून गेले. आमची छोटी फॅमिली होती आणि त्यामुळे आम्हाला लगेच कळले की जास्तीचे बील लावलेय पण एखादा मोठ्ठा ग्रुप गेला तर असे हे सहज खपुन जात असावे. तसेच अशा ग्रुप मध्ये काहीच जणांना पैसे देऊन मोठेपणा घेण्याची घाई असते त्यामुळे सहसा बील चेक होत नाही आणि यामुळे असले हॉटेलवाले याचा फायदा उठवत असावेत. कदाचित ती मॅनेजर बाई म्हणाली ते खरे सुद्दा असावे की वेटर नवा होता आणि त्याला काय बी माहित नसावे. म्ह्णजे छोट्याबीलात असा प्रकार न करता मोठ्या बीलात अशी फसवाफसवी करावी हे त्याला कळले नसावे.

In reply to by योगी९००

हे सर्व ठिकाणी कॉमन आहे. इथे शहरात वाणी / दुकानदार यांना जर का वाटले हा माणूस पैसेवाला आहे तर त्याला नक्की चुना लावतात.

खरं तर साक्षीकाकांचा लेख यायच्या आधीच मी मेतकूटला जायचं ठरवलं होतं, पण गेला आठवडा बाहेर भटकण्यात गेल्यामुळे जायला जमलं नाही. ठाण्यात परत यायच्या आधीच साक्षीकाकांचा या मराठी उपहार गृहाविषयीचा वाईट अनुभव मिपावर आल्यामुळे मन थोडे साशंकित झाले होते. हा धागा आणि त्यावर येणार्‍या सर्व बर्‍या-वाईट प्रतिक्रिया वाचल्या आणि भलेही थोडा वेळ गेला तरी चालेल, पण मेतकूटला एकदा भेट द्यायला हवी असं ठरवून आज संध्याकाळी पावणे नऊला उपहार गृहाच्या बाहेर पोचलो. शनिवार संध्याकाळ आणि या नव्या उपहार गृहाविषयी उत्सूकता असल्याने बर्‍यापैकी गर्दी होतीच. गेल्यानंतर उपहार गृहाच्या मालकांना श्री. सनी पावसकर यांना भेटून दोन माणसांसाठी कधीपर्यंत जागा मिळेल अशी विचारणा केली. अत्यंत नम्रपणे बाहेर असलेल्या गर्दीचा अंदाज घेत त्यांनी साडेनऊ तरी वाजतील असे सांगितले. साक्षीकाकांचा धागा डोक्यात असल्यामुळे "साडेनऊला तरी नक्की मिळेल, कि आम्हाला उपाशीच परत जावे लागेल?" असे बोलल्यानंतर पावसकरांना मी त्यांचा इथला अनुभव वाचून गेलोय हे लगेच कळाले. त्यानंतर त्यांनी लगेच बाहेर येत झाल्या प्रकाराबद्दल खुलासा केला. थाळीची वेळ (दुपारी ३:३०) संपल्यानंतरही आमच्याकडे अ ला कार्टे स्वरूपात फक्त अळूवड्या, थालिपिठ असे पदार्थ न मिळता सगळे पदार्थ(पोळ्या, भात, वेगवेगळ्या भाज्या) मिळतात. आणि हीच गोष्ट आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवू शकलो नाही. पावसकरांसोबत दहा मिनिटाच्या बोलण्यात मला त्यांच्या बोलण्यात कुठेही मग्रुरी जाणवली नाही. उलट जाणवलं ते फक्त महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीमध्ये वैविध्यपूर्णतेने नटलेल्या खाद्यपदार्थांना जागेच्या अभावामुळे ठाण्यातल्या लोकांपर्यंत पोचायला अडचण येतेय. साधारण तासाभरात आम्हाला आत बसायला जागा मिळाली. थाळी संपलेली होतीच त्यामुळे "अ ला कार्टे" स्वरूपात पोळ्या, कोल्हापूरी रस्सा आणि फोडणीचा भात हे पदार्थ आम्ही मागवले होते. सोबतीला खमंग कोशिंबीर(होय! ते त्या पदार्थाचे नाव आहे), अळूवड्या आणि सरतेशेवटी गाजराचा हलवा मागवला होता. एकुणात सगळ्याच पदार्थांची चव चांगली होती. पुन्हा मेतकूटला जायला मला तरी हरकत नाही.

In reply to by किसन शिंदे

माझा एक बेशिक प्रश्न हाय. हाटेलात जाऊन पोळ्या, अळूवड्या, कोशिंबीर आणि फोडणीचा भातच जर खायचा तर हाटेलात कशाला जावं म्हंतो मी.

In reply to by प्रचेतस

हे सगळे सोप्पे घरी सहज आणि खूपवेळा होणारे पदार्थ आहेत. शिवाय जेवणासाठी एक तास थांबून मग थाळी संपली हे ऐकणं परवडणारं नाही. आ-ला-कार्ट प्रकाराने जेवणातलेच पदार्थ घेणे खूप महाग पडते. थाळीची किंमत आणि या सुट्या मागवलेल्या पदार्थांची किंमत यात किती पैसे जास्त गेले सांग.

In reply to by प्रचेतस

पूर्वी खव्याचे गुलाबजाम करायचे आता गिट्स चे करतात , घरच्या गृह्देवतेला एक दिवस स्वयंपाकाला सुट्टी देण्यात काय हरकत आहे , वरील उल्लेख केलेले पदार्थ ज्या दिवशी महाराष्ट्रात ज्या दिवशी नवरे आपल्या बायकांना करून खायला घालायला लागले त्या दिवशी महाराष्ट्र खर्या अर्थाने पुरोगामी होईल , ता,क पावभाजी ते डोसे ते वडापाव व भेळ अनेकदा रविवार चा बेत म्हणून घरी केले जातात तरीही ह्यांच्या साठी बाहेर खवय्ये गर्दी करतात.

In reply to by निनाद मुक्काम …

डोसे, वडा, याला जरा तरी खटपट करावी लागते. फोडणीचा भात आणि कोशिंबीर यात करायचं काय असतं? बाहेर नेऊन खायला घालायचं तर खास काहीतरी घाला ना! फोडणीचा भात कशाला?

In reply to by किसन शिंदे

मेतकूटच्या व्यवस्थापनाच्या वागण्यात फरक पडला आहे हे केव्हाही स्वागतार्ह आहे. मात्र तुमच्या आणि सर्वसाक्षींच्या तेथे जाण्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. तुम्ही अनाहूत म्हणुन गेला होता आणि ते आरक्षण करून गेले होते. रेस्तरॉच्या व्यवस्थापन समस्येमुळे त्यांना टेबल उशीरा मिळाले असल्याने "रेस्तराँची जेवणाची ठराविक वेळ संपली. आता अ ला कार्ट घ्या." असे सांगणे म्हणजे "आमची चूक असली तरी त्याची शिक्षा तुम्हीच भोगली पाहिजे." असे गुर्मीने म्हटल्यासारखे आहे. त्याउलट व्यवस्थापनाने आपली चूक मानून, माफी मागून, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तेव्हाही तयार असलेले पदार्थ वापरून थाळी बनवून द्यायला पाहिजे होती... आणि खरेच त्या व्यवस्थापनाला चांगले व्यवस्थापन करावयाचे असते तर एखादा विशेष / गोड पदार्थ "ऑन द हाऊस" देऊन त्यांनी गिर्‍हाईकाचे मन जिंकले असते. असे झाले असते तर हा लेख स्तुतीपर असता. त्या अभावी आताचे वर्तन "वाईट वर्तन व्यवसायाला भोवू शकते" या विचाराने झालेली उपरती आहे... पण आताच्या घडीला हे ही नसे थोडके ! कारण बाहेर जेवायला जाण्यात बहुसंख्य गिर्‍हाईकांचा मुख्य उद्देश "मालकाला धडा शिकवणे" असा नसतो तर "परत परत भेट द्यावी असे वाटणारे उत्तम जेवण आणि सेवा मिळणे" हा असतो.

फोडणीचा भात कोशिंबीर हे उंच इमारतीत राहणाऱ्या आजच्या तरुणाई साठी नेहमीचे खाद्य पदार्थ उरले नाही आहेत. कार्यालयातील कार्यबाहुल्यामुळे आधुनिक गृहिणी घरी जेवण खुपदा करत नाही , सर्व एका फोनवर घरबसल्या मागवता येत. अश्या हायटेक लोकांच्या साठी अश्या गोष्टी हॉटेलात पैसे देऊन खाणे हा नॉस्टेल्जिया चा अनुभव देतो. भारतात आल्यावर घरी मी फोडणीची पोळी फोडणीचा भाताची फर्माईश करतो.

सर्वप्रथम "मेतकूट"मधून नाराज होऊन गेलेल्यांची मन:पूर्वक माफी मागतो. मराठी खाद्यसंस्कृतीचा झेंडा सर्वभाषिकांमध्ये फडकवण्याच्या हेतूने सुरु केलेल्या या लहानशा खानपानगृहाला सुरुवातीसच जो प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यामुळे आम्हाला आनंदोत्साहाचे भरते आणि जबाबदारीचे ओझे या दोन्हीचा अनुभव येत आहे. आमची तुलनेने लहानशी जागा, घरी करायला सोपे वाटणारे पण हाॅटेलमध्ये चौदा तासात कधीही ताजे उपलब्ध करण्यास कठीण पदार्थ आणि लांबूनलांबून प्रवास करुन येणारे ग्राहक अशा वस्तुस्थिती व अपेक्षा यात असलेल्या अंतरामुळे काहीजण नाराज होत आहेत, याचे आम्हाला वाईट वाटते. मनापासुन व्यक्त केलेल्या दिलगिरीने समोरच्याच्या मनातले ओरखाडे बुजत नाहीत पण अशांनी कृपया "मेतकूट"ला पुन्हा एक भेट द्यावी. आमचे पाहुणे म्हणून आमच्या सेवेचा लाभ घ्यावा. त्याच्या प्रतिक्रिया थेट आमच्याकडे द्याव्यात ज्यामुळे आवश्यक त्या सुधारणा करणे आम्हाला शक्य होईल. उत्तम प्रतिसादामुळे उतणार नाही मातणार नाही आणि ग्राहकांना पोटभर खूष करण्याचा वसा टाकणार नाही एवढंच या निमित्त आम्ही सांगू इच्छितो. किरण भिडे, सनी पावसकर - "मेतकूट" ठाणे