✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

|| चिरन्जीवी परशुराम ||

म
मृगनयनी यांनी
Mon, 05/14/2012 - 15:25  ·  लेख
लेख
परशुराम ;- भगवान महाविष्णुचा सहावा अवतार असणार्‍या "परशुरामा"बद्दल काही जातीय कारणास्तव बरीच उलटीसुलटी चर्चा ऐकायला मिळते. परशुरामाबद्दल काही तरी ऐकीव माहितीआधारे बरेच लोक त्याला अविवेकी ठरवतात. परन्तु परशुरामाचे खरे रूप अत्यन्त सच्चे, मातृ-पितृ भक्त असेच आहे. तसेच त्याने कोणावरही कुठलाही अन्याय केलेला नाही...उलट भगवान परशुरामामुळे लोकांचे कल्याणच झाले आहे. यावर प्रकाश टाकणारा हा लेख! - महिष्मती नगरीचा क्षत्रियकुलोत्पन्न राजा क्रतुवीर व राणी राकावती यांना गुरु-दत्तात्रेय कृपेने पुत्रपाप्ती झाली. त्या पुत्राचे नाव- कार्तवीर्यार्जुन. यास जन्मतः दोन्ही हात नव्हते, पाचव्या वर्षानन्तर दत्तकृपेने अचानक हजार हात उत्पन्न झाले. म्हणून त्याला सहस्त्रार्जुन असेही म्हटले जाई. तेव्हा दत्तगुरुंनी त्यास उपदेश केला, की 'कार्तवीर्यार्जुन हा क्षत्रियांचा स्वामी होईल, तिन्ही लोकांत समर्थ्यवान होईल. पण लोभीपणा व दु:संगतीमुळे जर देव, गुरु, सन्त इ.चा अपमान, अव्हेर जर कार्तवीर्यार्जुनाकडून होईल.. तर त्याचा स्वतःचा तर नाश होईलच पण सार्‍या क्षत्रियकुलाचा विध्वंस होऊन तो अपकीर्तीला पात्र ठरेल." कार्तवीर्यार्जुन खूपच शक्तिशाली होता. त्याने लन्केचा राजा- रावण यासही बन्दीवान बनवून ठेवले होते. रावणाच्या वडिलांनी- पौलस्तिऋषींनी मध्यस्थी करून गोड बोलून रावणाची सुटका करवून घेतली. पण यामुळेच कार्तवीर्यार्जुनाचा मद दिवसेंदिवस वाढीस लागला. दत्तगुरुंनी सांगितलेल्या गोष्टी, नम्रपणा इ. तो विसरू लागला. ते पाहून नारद मुनींनी त्याला सावध करण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फल ठरला. सहस्त्रार्जुनाच्या राज्यात सज्जन, ऋषीमुनी यांचा छळ होऊ लागला होता. दत्तगुरुंच्या आशीर्वादामुळे आपल्या सहस्त्र बाहूंच्या शक्तीने तो इन्द्रलोकीची सम्पत्ती हिरावू इच्छित होता. त्यामुळे सर्व देवांनी शंकर आणि आदिमायेची प्रार्थना केली. व सहस्त्रार्जुनाचा नाश करण्याची भावना व्यक्त केली. शिवपार्वतीने 'तथास्तु' म्हणून त्यांची मनोकामना पूर्ण करन्याचे आश्वासन दिले. रेणुक राजा व भोगावती राणी यांनी 'त्रिवेणीसंगम' येथे जाऊन केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाचे फलित म्हणजेच "रेणुका" होय. जी साक्षात आदिमायेचे- पार्वतीचे रुप होती. अश्विनीकुमारांच्या कृपेने नवतारुण्य-आरोग्य प्राप्त झालेल्या, भृगुवन्शीय च्यवनऋषींचा पुत्र ऋचिक व गाधिराजाची कन्या सत्यवती यांच्या पोटी जन्मलेले "जमदग्नि" ऋषी हे साक्षात शंकराचे अंश होते. अगस्त्यमुनींच्या सांगण्याप्रमाणे पूर्वसन्केतानुसार ब्राह्मण जमदग्नीमुनी व क्षत्रिय रेणुकादेवी यांचा विवाह झाला. रेणुकेस वसु, विश्ववसु, बृहदभानु, बृहतकण्व असे चार पुत्र झाले. त्यानन्तर जमदग्निऋषींनी भगवान नारायणाच्या सामर्थ्याने सिद्धमन्त्र जपून एक "चरू" बनवून रेणुकेस दिला. त्यायोगे भगवान विष्णु पुत्ररुपाने जमदग्नि-रेणुका मातेच्या पोटी जन्माला आले. तो दिवस- अक्षयतृतीया. त्या समयी एकाएकी कार्तवीर्यार्जुनाच्या राजधानीचे शिखर फुटुन चुराडा झाले. क्षत्रिय बायकांच्या मन्गळसूत्राला हिसका बसला. हाच महाविष्णुचा सहावा अवतार! - 'परशुराम' इकडे नवीन बालकाचे नाव- "रामभद्र" असे ठेव्ले गेले. तेव्हापासून जमदग्नि ऋषी व इतर शिष्यांचे वसतिस्थान असणार्‍या 'सिद्धाचल पर्वता'स 'रामशृन्ग पर्वत' असे म्हटले जाऊ लागले. आठव्या वर्षी रामभद्राचा व्रतबन्ध झाल्यावर जमदग्निऋषींनी त्याच्याकडून अध्यायनही करवून घेतले. मातापित्याच्या सेवेत रामभद्र तत्पर असताना एके दिवशी क्षत्रियांच्या छळामुळे त्रासून गेलेले गालव, मातन्ग, शांडिल्य, कौंडिण्य इ महर्षि रामशृन्ग पर्वतावर जमदग्नि ऋषींच्या आश्रयास आले. ऋषी-महर्षिंना क्षत्रियांपासून होणार्‍या त्रासाचे वर्तमान कळताच त्या ऋषींना जमदग्निंनी आपल्या आश्रमात ठेवुन घेतले. रामभद्रा'ला धनुर्विद्या शिकण्यासाठी कैलास पर्वतावर पाठवले. व क्षत्रियांची मस्ती उतरवण्यासाठी जमदग्नींनी उग्र तपाला प्रारम्भ केला.. त्यामुळे 'क्रोधदेवता' त्यांना प्रसन्न झाली. त्यांचे तप चालू असताना ते भन्ग करण्यासाठी कार्तवीर्यार्जुनाने अनेक प्रयत्न केले. पण ते फोल ठरले. तिकडे "रामभद्र" कैलासपर्वतावर साक्षात शिवाकडून धनुर्विद्या शिकला. पार्वतीमातेकडून त्याने "अंबिकास्त्र" मिळवले. कार्तवीर्याकडून व इतर राजांकडून होत असलेला ऋषेमुनींचा छळ वाढतच होता. त्यामुळे जमदग्निंच्या आज्ञेनुसार रामभद्राने कैलासपर्वतावरील आपली साधना अधिक वाढवली. सासरच्या रीतीप्रमाणे लग्न झाल्यानन्तर रेणुकामाता रोज सकाळी नदीवर जाऊन वाळूची घागर बनवून त्यात पाणी भरून डोक्यावर सापाची चुम्बळ करून त्यावर घागर घेऊन शिवपूजेसाठी पाणी येत असे. परन्तु जमदग्नि ऋशींची तपस्या चालू असताना एके दिवशी पाण्यास रेणुकामाता गेली असता चित्ररथ नावाच्या गन्धर्वाची व त्याच्या पत्नीची जलक्रीडा तिच्या दृष्टीस पडली. ते पाहून आपल्यालाही आपल्या पतीसह अशीच क्रीडा करता आली असती तर!.. असा स्त्रीसुलभ विचार तिच्या मनात डोकावला. पण दुसार्‍याच क्षणाला मनाच्या चन्चलपणाचा धिक्कार करून तिने आपले मन पाणी भरण्याकडे केन्द्रित केले. पण त्यावेळी तिला रोजच्यासारखी वाळूची घागर बनवता नाही आली. सापाची चुम्बळ बनवताना साप हातातून निसटून गेला. व पाण्याशिवाय घरी यावे लागले. शिवपूजेला पाणी न मिळाल्याने क्रोधायमान झालेल्या जमदग्नि ऋषींनी तिला पाणी न आणण्याचे कारण विचारल्यावर तिने खरे काय ते सांगितले. त्यामुळे ते जास्तच चिडले व रेणुकेस चालते होण्यास सांगितले व तिस शाप दिला, की तुझे तोन्ड आणि शरीर काळे ठिक्कर पडेल. व तसे खरोखर झाले. बाहेर पडलेल्या रेणुकेला दु:ख अनावर होत होते. अश्या वेळी तिला "एकनाथ व जोगिनाथ" हे २ शिवयोगी भेटले. तिने त्यांना वन्दन केले. तेव्हा तिचे मनोगत जाणून शिवयोग्यांनी तिला सांगिअले, की "समोरील सरोवरात रोज स्नान करून शिवलिन्गाची पूजा कर. व पाच घरी भिक्षा मागून अर्धी भिक्षा आम्हास दे व अर्धी तू खा. तुझे शरीर व मन पुन्हा पूर्ववत होईल" त्याप्रमाणे रेणुका देवी वागल्यानन्तर ती पुन्हा गौरवर्णीय व स्थिरमनाची बनली. शिवयोग्यांचा निरोप घेण्यासाठी ती गेली असता ते म्हणाले,' अजून काही दिवसांनी तुला तीन घटका वैधव्य प्राप्त होईल. त्यानतर मात्र तुझे सौभाग्य अखंडित राहील." दुसर्‍या दिवशी शिवगुरुंचा आशीर्वाद घेऊन रेणुकादेवी आपल्या आश्रमाकडे निघाले. ती तिथे पोचताच जमदग्निंच्या वर प्रसन्न झालेल्या क्रोधदेवतेमुळे ते रेणुकेवर प्रचन्ड चिडले व क्रोधायमान होऊन म्हणाले," ज्याअर्थी तू इतके दिवस आश्रमाबाहेर होतीस.. त्या अर्थी तुला इथे थारा नाही. तू चालती हो!" त्यामुळे वारंवार माफी मागून रेणुकादेवीने त्यांना विनवले. जमदग्नि ऋषींचा सन्ताप अनावर होऊन त्यांनी आपल्या चार ज्येष्ठ पुत्रांना बोलावले व रेणुकेकडे बोट दाखवून सांगितले, की "तुमच्यापैकी कोणी हिचा वध करू शकत असेल.. तर करा." तेव्हा "पित्यापेक्षा माता हजार पटींनी श्रेष्ठ असते, त्यामुळे आम्ही हे अविचारी पापकृत्य करणार नाही." असे चारी पुत्रांनी पित्यास स्पष्ट सान्गितले. त्यामुळे जमगग्निंमधल्या क्रोधदेवतेने चौघा पुत्रांना "मृत व्हा" असा शाप दिला. व क्षणार्धात ते चारी जण मृत्यू पावले. रेणुकामाता ते पाहून शोक करू लागली. त्यावर जमदग्नींनी रामभद्राला हाक मारली. तोच रामभद्र कैलासपर्वतावरून आला. चारही पुत्रांप्रमाणे जमदग्निंनी त्यालाही मातेचा वध करायची आज्ञा केली. नाहीतर चौघा भावांप्रमाणेच त्याचाही वध करण्याची जमदग्निंनी तयारी होती. वडिलांवर प्रसन्न झालेली क्रोधदेवता रामभद्रास माहित होती. ऋषी-मुनी सज्जनांना छळणार्‍या कार्तवीर्यार्जुनादि क्षत्रियांच्या नाशासाठी प्रसन्न करून घेतलेल्या या क्रोधदेवतेचा उपयोग अ‍ॅक्चुली अनुचित कारणासाठी होतोय.. हे रामभद्राने जाणले. त्यामुळे नाईलाजाने मातेचा वध करण्यापलीकडे उपाय नाही, हेही रामभद्रास कळून चुकले. परन्तु मातेचा वध केल्यानंतर शान्त झालेल्या क्रोधदेवतेकडून जमदग्नि पुनश्च रेणुकामातेस जिवन्त करू शकतील.. असा विश्वासही त्यास होता. त्यामुळे सारासार विवेक बुद्धी वापरून रामभद्राने रेणुकामातेचा वध केला. व पित्याची आज्ञा अमलात आणली. साहजिकच खूष झालेल्या जमदग्निंनी रामभद्रास वर मागायला सांगितले. तेव्हा रामभद्राने " मातेस व चौघा बन्धुंस पुनः जिवन्त करावे आणि त्यांना मृत्यूचे स्मरणही राहू नये, असे करावे. तसेक्ष या सर्व गोष्टींना काराणीभूत असलेली जी क्रोधदेवता, तिचा त्याग करावा" असे सांगितले. त्याप्रमाणे रामभद्राचे वचन कबूल करून त्या पाचही जणांना जमदग्नि ऋषींनी उठवले. व क्रोधदेवतेला त्यांना जाण्याची आज्ञा केली. अणि त्यावर ते पूर्ववत् संसार करू लागले. परन्तु या सगळ्यामुळे रामभद्राला मातृहत्येचे पातक लागले. त्यामुळे या पापातून कसे मुक्त व्हावे, असा प्रश्न त्यांनी पित्याला विचारला. तेव्हा जमदग्नींनी त्यास मन्त्रोपदेश करून भागीरथीतीरी शिवाराधना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे रामभद्राने शन्करास प्रसन्न करून घेतले. शन्कराने रामभद्रास कैलास पर्वतावर बोलावून नेले. तिथेच षण्मुखस्वामींपासून रामभद्रास चौदा विद्या, चौसष्ठ कलांचे ज्ञान अवगत झाले. पुढे श्रीगणेशाला रामभद्रास "परशु" दिला. आणि रामभराचे "परशुराम" असे नामाभिधान केले. व मातापित्यांना भेटून येण्यास सांगितले. तेव्हा 'परशुराम' पुन्हा रामशृन्ग पर्वतावर येऊन मातापित्यांच्या सेवेत रत राहू लागले. परशुरामाने प्राप्त केलेल्या शस्त्रास्त्र विद्येमुळे, दिव्य परशुमुळे, शिवपार्वती व गणेशाच्या आशीर्वादामुळे जमदग्नि ऋषींनी सर्व ऋषीमुनींना निविघ्नपणे यज्ञयागादि करण्यास सांगितले. त्यावर काही कारणास्तव परशुराम पुन्हा कैलासावर गेले. इकडे नारदमुनी रामशृन्ग पर्वतावर जमदग्नि ऋषींच्या आश्रमात आले, तेव्हा जमदग्नि-रेणुकेचा इन्द्रदेवाने लग्नात भेट दिलेल्या कामधेनूच्या सहाय्याने चाललेला संसार पाहून त्यांना आनन्द झाला. आपल्या आराध्य दैवताच्या म्हणजे विष्णुच्या सहाव्या अवताराची-परशुरामाची व शन्कराची आठवण त्यावर ते कैलासावर गेले. शिवाने नारदांसमोर परशुरामाचे व त्याच्या सामर्थ्याचे वर्णन केले. ते ऐकून कार्तवीर्यार्जुनाचा नाश होण्याची वेळ जवळ आल्याचे नारदांनी ओळ्खले व त्यांना आनन्द झाला. त्या आनंदाच्या भरात ते कार्तवीर्यार्जुनाच्या महिष्मती नगराकडे वळले. व त्याचा अतिथीउपचार स्वीकारल्यावर त्यास जमदग्निंकडच्या कामधेनूबद्दल सांगून अशी दिव्य गोमाता सहस्त्रार्जुनाकडे असावयास हवी असेही आमिष त्याच्या मनात निर्माण केले. तसेच जमदग्निमुनींनी क्रोधदेवतेचा त्याग केल्यामुळे आता त्यांच्यापासून कार्तवीर्यास कोणताही धोका नसल्याचेही नारदांनी त्यास सांगितले. त्यावर नारदांच्या सांगण्यानुसार कार्तवीर्यार्जुन ७०० सैन्य व सातशे घोड्यांसह राम्शृन्ग पर्वतावर गेला. तेव्हा जमदग्नि-रेणुकामातेने त्यांचे उचित स्वागत करून सर्वांना पन्चपक्वान्नाचे जेवण दिले. तेव्हा कार्तवीर्यार्जुनाला जमदग्निंकडे असलेल्या 'कामधेनू'बद्दल खात्री पटली. व त्याने जमदग्निंकडे कामधेनू'ची मागणी केली. तेव्हा जमदग्नि म्हणाले," हे राजन, तुझ्याजवळ अलोट सम्पत्ती, हजारो दास-दासी व सेवक आहेत. तेव्हा तुला कामधेनू काय कामाची? आम्हा ऋषीमुनींकडे कामधेनू असल्यामुळे लोकांच्या कल्याणासाठी, तसेच वातावरण पवित्र ठेवण्यासाठी यज्ञ याग करायला व हरिस्मरणाला आम्हाला भरपूर वेळ मिळत आहे. त्यामुळे ही कामधेनू आमच्याकडेच राहू देत." तेव्हा त्यांचे बोलणे न ऐकता कार्तवीर्यार्जुनाने बलात्काराने कामधेनू हरण करायचा प्रयत्न केला. तिचे चारी पाय दोरीने आवळून बान्धताच कामधेनूने ते बन्धन एका क्षणार्धात सोडून जमीनीवर जोराने पाय आपटले. व क्षणार्धात तेथे हजारो गाई उत्पन्न झाल्या. आणि त्यांनी शिन्गे खुपसून कार्तवीर्यार्जुनाच्या सैन्यास ठार मारले. व कामधेनू पुनश्च जमदग्निंच्या जवळ येऊन उभी राहिली. त्यामुळे कार्तवीर्यार्जुनाचा अत्यंत सन्ताप झाला. व तो जमदग्निंना ठार मारण्यासाठी पुढे सरसावला. तोच कामधेनू त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या पुढे एखाद्या पहाडासारखी उभी राहिली. पण जमदग्नि तिला उद्देशून म्हणाएल," हे नदिनी, जे विधिलिखित आहे, ते तू पुसू नकोस. या राजाची इच्छा पुरी होऊ देत." त्यावर कामधेनू नाईलाजाने दूर झाली. व कार्तवेर्यार्जुनाने जमदग्निऋषींचा शिरच्छेद केला. तो दिवस म्हणजे- मार्गशीर्ष शुद्ध १४, कृत्तिका नक्षत्र व रात्रीचा पहिला प्रहर होता. त्यावर कार्तवीर्यार्जुन पुन्हा कामधेनूस धरायला गेला असता ती अदृश्य झाली. ते पाहून कार्तवीर्यार्जुन भयभीत झाला आणि आपल्या राजधानीस गेला. अश्याप्रकारे शिवयोगींनी रेणुकेस सांगितलेले भवितव्यही खरे ठरले. त्यामुळे रेणुका वैधव्यदु:ख असह्य होऊन "परशुरामा"स हाका मारू लागली. तोच परशुराम कैलासावरून क्षणार्धात आश्रमात आले. व त्यांनी मातेला धीर दिला, की " तू काळजी करू नकोस, सूर्योदय होताच स्थिती पालटुन्न जाईल." त्यावर ऋचिक, वसिष्ठ, अगस्त्य, विठोब, शिरशृन्ग इ. ऋषींनी रेणेकेस बोध केला. तोपर्यन्त अरुणोदय झाला. तेव्हा अगस्त्यमुनींनी वसिष्ठांच्या कमंडलूतील पाणी (जमदग्निंच्या वडिलांच्या)ऋचिक्मुनींच्या हातावर घातले. ऋचिकमुनींनी ते पाणी सन्जीवनी मन्त्राने अभिमन्त्रित करून जमदग्निंच्या मृत शरीरावर शिम्पडले. आणि भविष्यवाणीनुसार जमदग्नि पुन्हा शिवस्मरण करीत उठून बसले. तोच स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली. नाना वाद्ये वाजू लागली. आनन्दोत्सव साजरा झाला. अगस्त्यमुनी व ऋचिक मुनींनी शिव-पार्वती-गणेशाची स्तुती करून परशुरामास सर्व देवांना शान्त करन्यासाठी शान्तीहोम करण्यास सांगितले. व ज्या कारणास्तव परशुरामाने आत्तापर्यन्त इतके सामर्थ्य मिळवले.. त्या कार्यास आरम्भ करण्यास सांगितले. म्हणजेच सर्वांचा छळ करणार्‍या कार्तवीर्यार्जुनाचा आणि इतर तत्सम क्षत्रियांचा नाश करून पृथ्वीवरील भार हलका करण्यास सांगितले. पितामहांकडून आलेली आज्ञा घेऊन परशुरामकार्तवीर्यार्जुनाच्या महिष्मती नगरीत आला व सामर्थ्याच्या बळाने मदोन्मत्त झालेल्या सहस्त्रार्जुनाकडे युद्धभिक्षा मागितली. कार्तवीर्यार्जुन परशुरामाला प्रथमच बघत होता. तोपर्यन्त त्याने परशुरामाबद्दल ऐकलेल्या गोष्टीची व त्याच्या पसरलेल्या कीर्तीची खात्री पटली. जरी कार्तवीर्यार्जुन युद्धाला उभा राहिला.. तरी त्याच्या दुष्कर्माचा अन्त जवळ आल्यामुळे मनातून तो अत्यन्त भयभीत झाला होता. "गोहत्या, स्त्रीहत्या, ब्रह्महत्या इ. पाप करण्याबद्दल नेहमी सावध रहा." हा दत्तगुरुंनी दिलेला उपदेश कार्तवीर्यार्जुनाने पालान केला नाही. त्यामुळे त्याच्याकडून गुरुआज्ञेचा भन्ग झाल्याचेही पाप घडले. परशुरामाने आधी शस्त्रास्त्रेकरून सहस्त्रार्जुनाचे सैन्य मारून टाकले. नन्तर अम्बिकास्त्र सोडून प्रथम कार्तवीर्यार्जुनाचे हात तोडले. परन्तु कार्तवीर्यार्जुनास सहस्त्र बाहूंचे वरदान असल्यामुळे एकीकडे परशुराम सहस्त्रार्जुनाचे हात तोडत आहे.. व दुसरीकडे ते परत उत्पन्न होत आहेत.. असे चालले. उत्प्न्न झालेल्या हातांमुळे कार्तवीर्यार्जुन युद्ध करतच राहिला. एकवीस वेळा असे घडल्यावर परशुराम चिन्तीत झाला. यामुळेच "परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली." असे म्हटले जाते. तोच आकाशवाणी झाली, की "अर्जुनाच्या पोटातील अमृताची कुपी काढलीस तर खचित विजयी होशील!" त्याप्रमाणे परशुरामाने केल्यावर सहस्त्रार्जुनाचा वध तो करू शकला. व स्वार्थी, क्षत्रियधर्म विसरलेल्या, ऋषीमुनींचा छळ करून अत्याचार करणार्‍या दुराचारी क्षत्रियांपासून पृथ्वीला मुक्त केले. त्यानन्तर परशुरामाने मातापित्यांस वन्दन करून सर्वांना अभयदान दिले. त्यावर अगस्तिमुनींनी सर्वांना याची आठवण करून दिली, की ""दुष्टांचा संहार करण्यासाठी व सज्जनांचे रक्षण करण्यासाठी इन्द्रादि देवांनी प्रार्थना केल्यावरून देवमाता अदितीने दीर्घ तपश्चर्या करून शन्कराकडून वर मिळवला आणि र्णुक राजाच्या यज्ञ कुन्डात ती प्रकट झाली. तिने शिवस्वरूप असणार्‍या जमदग्निंना वरून परशुरामाला जन्म दिला. परशुराम भगवान विष्णुचा सहावा अवतार. त्याच्यामुळे कार्तवीर्यार्जुनाचा नाश झाला. त्यामुळे महापतिव्रता रेणुकामातेला कुणी कधीही विसरू नका."" परशुरामाने दुश्ट क्षत्रियांचा संहार करताना जे चांगले सद्धर्मी क्षत्रिय होते.. ते वाचले व परशुरामाला शरण आले. त्या सर्वांना परशुरामाने माता रेणुकेचे दर्शन घडविले. व माता रेणुकेने त्या सर्वांना जोगिन्दर तीर्थात स्नान करून गोरग्रीबांना अन्नदान करन्यास सांगितले. त्यानतर चिरन्जीवी परशुराम पुन्हा हिमालयात निघून गेला. मिथिला नगरीचा क्षत्रिय राजा- जनक याच्याकडे परशुराम आपले शिवधनुष्य घेऊन आला असता लहान सीता त्याचा घोडा करून खेळू लागली.. तेव्हा चिरन्जीवी परशुरामाने जनकराजास सान्गितले, की "हिच्या स्वयंवरात जो कोणी हे धनुष्य पेलेल व याची प्रत्यंचा मोडेल.. त्याच्याशीच हिचा विवाह होईल." त्यानुसार महाविष्णुच्या सातव्या अवतारात प्रभू रामचन्द्राने या शिवधनुष्याची प्रत्यंचा मोडली व सीतेने त्यांस वरले. परशुरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी सह्याद्री पर्वतावरून शरसन्धान करून अरबी समुद्रास मागे हटवले. व तिथे कोंकणभूमी वसविली. तसेच परशुरामाचे वास्तव्य कर्नाटकातील पवित्र 'गोकर्ण' क्षेत्री असल्याचेही मानतात. चिपळूण येथे 'लोटे परशुराम' हे त्यांचे जाज्वल्य स्थान मानले जाते. तसेच तळकोकणातील परशुराम मन्दिर प्रसिद्ध आहे. काही कोकणस्थ ब्राह्मणांचे कुलदैवत परशुराम आहे. परशुरामाची आई- माता रेणुका हिचे अस्तित्व 'माहूर गडा'वर असून ते साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. रेणुकामाता देखील महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक कुटुम्बांची कुलदेवता आहे. तिनेच आपल्या पुत्राला -रामभद्राला उर्फ परशुरामाला चिरन्जीवी बनवले होते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
संस्कृती
धर्म
वाङ्मय
इतिहास
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
माहिती
वाद

प्रतिक्रिया द्या
35145 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

पोट धरधरून हस्तोय

राजघराणं
Mon, 05/14/2012 - 15:41 नवीन
कामधेनूने ते बन्धन एका क्षणार्धात सोडून जमीनीवर जोराने पाय आपटले. व क्षणार्धात तेथे हजारो गाई उत्पन्न झाल्या. आणि त्यांनी शिन्गे खुपसून कार्तवीर्यार्जुनाच्या सैन्यास ठार मारले. व कामधेनू पुनश्च जमदग्निंच्या जवळ येऊन उभी राहिली. :) सैनीक सातसो और गायी हजारो बहुत नाइन्साफी है ! बाकी तापट जमदग्नी आणी युधखोर परशूरामाकडे असलेल्या गायीने मालकांचे गुण घेतले काय ?
  • Log in or register to post comments

परशुरामाबद्द्ल छान माहीती

पियुशा
Mon, 05/14/2012 - 15:52 नवीन
परशुरामाबद्द्ल छान माहीती दिलियेस ग नैने :) ह्या इतिहासापासुन अनभिज्ञ असतील बरेच ,माझ्यासारखे :)
  • Log in or register to post comments

ह्या इतिहासापासुन अनभिज्ञ

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 05/14/2012 - 17:45 नवीन
ह्या इतिहासापासुन अनभिज्ञ असतील बरेच ,माझ्यासारखे
इतिहास ??? तुमच्या शाळेचे नाव सांगाच हो एकदा !!!!!!! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

वि.मे माझ्या शाळेच नाव डॉन

पियुशा
Tue, 05/15/2012 - 10:57 नवीन
वि.मे माझ्या शाळेच नाव डॉन बॉस्को स्कुल :) ह्या इतिहासापासुन म्हणजे परशुरामाच्या इतिहासापासुन म्हणतेय मी निट वाचा जरा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

@ वि.मे. कुठं डोकं फोडतोय

प्यारे१
Tue, 05/15/2012 - 11:08 नवीन
@ वि.मे. कुठं डोकं फोडतोय बे?????? डान बास को हाय ते! जान दे ना! ;) इतिहास काय पुराण काय? कि फर्क पैन्दा? काल झालेलं ते पण इतिहासच असतंय आणि रामाच्या खापरपणजोबांचं पण इतिहासच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

वि.मे माझ्या शाळेच नाव डॉन

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 05/15/2012 - 13:56 नवीन
वि.मे माझ्या शाळेच नाव डॉन बॉस्को स्कुल
अरे व्वा !!! डॉन बॉस्को का !!!! मग तुम्ही बोलता ते बरोबरच असणार की. चुकलेच माझे. इतिहासच असणार ते. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

@ वि.मे. पुराण अन इतिहास हा

पियुशा
Tue, 05/15/2012 - 14:54 नवीन
@ वि.मे. पुराण अन इतिहास हा फरक मला कळला नाही .ही माझी चुक :( माझ्या शाळेचा काय दोष ? उगा शाळेला नाव ठॅवायच कारण नाय !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

डोन बाबाची शाळा राम आणि

टवाळ कार्टा
Tue, 05/15/2012 - 15:24 नवीन
डोन बाबाची शाळा राम आणि परशुराम यांच्याबद्दल शिकवते???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

पोटातील अमृत ... रावणाच्या

JAGOMOHANPYARE
Mon, 05/14/2012 - 15:57 नवीन
पोटातील अमृत ... रावणाच्या कथेतही असेच आहे.. राम रावणाचे मुंडके तोडतो, पण ते पुन्हा उगवते.. बिभीषण रामाला रावण्च्या पोटात अमृत असल्याचे सांगून आधी तिथे बाण मारायला सांगतो.. एकच क्लायमॅक्स
  • Log in or register to post comments

उत्तम माहिती...

मुक्त विहारि
Mon, 05/14/2012 - 16:08 नवीन
"नन्तर अम्बिकास्त्र सोडून प्रथम कार्तवीर्यार्जुनाचे हात तोडले. परन्तु कार्तवीर्यार्जुनास सहस्त्र बाहूंचे वरदान असल्यामुळे एकीकडे परशुराम सहस्त्रार्जुनाचे हात तोडत आहे.. व दुसरीकडे ते परत उत्पन्न होत आहेत.. असे चालले. उत्प्न्न झालेल्या हातांमुळे कार्तवीर्यार्जुन युद्ध करतच राहिला. एकवीस वेळा असे घडल्यावर परशुराम चिन्तीत झाला. यामुळेच "परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली." असे म्हटले जाते." हे माहित न्हवते.
  • Log in or register to post comments

@ मुक्तविहारी'जी.. ह्म्म्म

मृगनयनी
Mon, 05/14/2012 - 16:30 नवीन
@ मुक्तविहारी'जी.. ह्म्म्म !... बर्‍याचदा अनेकांना प्रश्न पडतो.. की एक्दा पृथ्वी नि:क्षत्रिय झाल्यावर पुन्हा २० वेळा ती कशीकाय नि:क्षत्रिय होऊ शकेल.. ? तर कार्तवीर्यार्जुनाचे २१ वेळा हात तोडणे.. म्हणजे त्याच्या ठायी असलेली अनुचित क्षत्रिय शक्ती नष्ट करणे.... जी त्याच्या वारंवार उत्पन्न होणार्‍या सहस्त्रहातांमधून बाहेर येत होती.. कार्तवीर्यार्जुनाच्या आधीच त्याच्या सहयोगी च समविचारी क्षत्रियांचा नाश एकदाच परशुरामाने केला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Mon, 05/14/2012 - 16:48 नवीन
पृथ्वी नि:क्षत्रिय केली म्हणजे काय केले ह्याचे फार छान उत्तर आमच्या पुप्याने इथे दिले आहे. ते कृपया वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

-

इनिगोय
Mon, 05/14/2012 - 16:26 नवीन
"कार्तवीर्यार्जुनि नाम राजा" अशी सुरुवात असलेला एक श्लोक ऐकण्यात आला होता. "यस्य स्मरणमात्रेण गतम् नष्टम् च लभ्यते" असा त्याचा शेवट असावा. हरवलेल्या वस्तू सापडण्यासाठी हा मंत्र म्हटला जातो, असे म्हणतात. याबद्दल काही अधिक माहिती आहे का? (हे परशुरामाशी नाही तरी कथेतल्या खलनायकाशी संबंधित असावे.) आणि
"जमदग्निऋषींनी भगवान नारायणाच्या सामर्थ्याने सिद्धमन्त्र जपून एक "चरू" बनवून रेणुकेस दिला."
"चरू" म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

"कार्तवीर्यार्जुनि नाम राजा"

मृगनयनी
Mon, 05/14/2012 - 16:41 नवीन
"कार्तवीर्यार्जुनि नाम राजा" अशी सुरुवात असलेला एक श्लोक ऐकण्यात आला होता. "यस्य स्मरणमात्रेण गतम् नष्टम् च लभ्यते" असा त्याचा शेवट असावा. हरवलेल्या वस्तू सापडण्यासाठी हा मंत्र म्हटला जातो, असे म्हणतात. याबद्दल काही अधिक माहिती आहे का? (हे परशुरामाशी नाही तरी कथेतल्या खलनायकाशी संबंधित असावे.) सहमत इनिगोय'जी.. "कार्तवीर्यार्जुननाम राजा बाहुसहस्त्रवान.. तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते" असा तो श्लोक आहे. आणि तो याच कार्तवीर्यार्जुन म्हणजे सहस्त्रार्जुनाशी सम्बंधित आहे. दत्तगुरुंनी दिलेल्या आशीर्वादानुसार त्याच्या हजारो हातांच्या साहाय्याने तो ती वस्तू शोधून देतो, अशी सम्कल्पना आहे. आणि "जमदग्निऋषींनी भगवान नारायणाच्या सामर्थ्याने सिद्धमन्त्र जपून एक "चरू" बनवून रेणुकेस दिला." "चरू" म्हणजे काय? "चरू" म्हणजे अधिकारी ऋषींनी उचित मंत्राच्या साह्याने अभिमन्त्रित केलेले एक वेगळ्या प्रकारचे पाणी किन्वा द्रव्य. त्या त्या मन्त्रशक्तीनुसार हे अभिमन्त्रित द्रव्य सोने, माती, इ. च्या कलशात ठेवले जाते. व ते ज्या व्यक्तीसाठी किन्वा एखाद्या कारणासाठी बनवले असते.. ते फक्त त्याच व्यक्तीने सांगितलेल्या वेळी प्राशन करणे जरूरी असते. शिव-शक्ती, ब्रह्माशक्ती, विष्णुशक्ती इ. ना मन्त्राद्वारे पाचारण करून त्यांचे तेज अभिमन्त्रित करून "चरु" बनवले जात असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

-

इनिगोय
Mon, 05/14/2012 - 17:01 नवीन
आभार. ('एकेरी'वर येऊन चालेल..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

तो श्लोक

मिसळपाव
Mon, 05/14/2012 - 17:39 नवीन
"कार्तवीर्याजुनो नामः राजा बाहू सहस्त्रवान| तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टंच लभ्यते|" असा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

-

इनिगोय
Tue, 05/15/2012 - 13:08 नवीन
आभार्स... कधी पडताळा आला आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

अनुभव सांगितला तर हसाल पण

रेवती
Wed, 05/16/2012 - 03:51 नवीन
अनुभव सांगितला तर हसाल पण माझी आजी कोणाचं काही हरवलं की हा श्लोक म्हणायला सांगायची. मी तो लिहून कपाटाच्या दारच्या आत चिकटवला होता......वयाच्या दहाव्या वर्षी. आता माझं हरवून हरवून काय हरवणार? पुस्तक, शाळेतील शिवणाचे सामान इ. हो, मिळाले. एक आवडता रुमाल मात्र मिळाला नव्हता. आता गंमत वाटते पण त्यावेळी मी या श्लोकाची फ्यान होते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

किती वेळा म्हणायचं हा श्लोक?

किचेन
Fri, 05/18/2012 - 14:46 नवीन
किती वेळा म्हणायचं हा श्लोक? माझ्या गाडीची चावी हरवलीये...चावीवाल्याला बोलावान्याआधी एकदा हा श्लोकही वापरून बघते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

नविन माहिती

अमृत
Mon, 05/14/2012 - 17:03 नवीन
वाचायला मिळाली. छान लिहीलयं.फक्त तो 'अ‍ॅक्च्युली' शब्द खटकला. पौराणिक विषयांवर आणखी वाचायला आवडेल. अमृत
  • Log in or register to post comments

नवीन माहिती वाचायला मिळाली.

मृगनयनी
Mon, 05/14/2012 - 17:13 नवीन
नवीन माहिती वाचायला मिळाली. छान लिहीलयं.फक्त तो 'अ‍ॅक्च्युली' शब्द खटकला. धन्यवाद! टाईप करताना चुकुन बोलीभाषेतला शब्द टंकला गेला. :)
  • Log in or register to post comments

परशुरामाच्या कथा

पैसा
Mon, 05/14/2012 - 19:46 नवीन
परशुरामाबद्दलच्या कथांचं संकलन आवडलं.
  • Log in or register to post comments

छान माहीती!!

किलमाऊस्की
Mon, 05/14/2012 - 19:57 नवीन
छान माहीती!!
  • Log in or register to post comments

थॅन्क्स पैसा ताई, हेमांगी

मृगनयनी
Tue, 05/15/2012 - 09:39 नवीन
थॅन्क्स पैसा ताई, हेमांगी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किलमाऊस्की

मात्रु हत्या / स्त्री हत्येचे

jaypal
Mon, 05/14/2012 - 20:48 नवीन
कौतुक / उदत्तीकरण करणारी भंपक कथा. स्वतःचा जिव वचवण्यासाठी आईची हत्या करणारे पुजले जातात हेच खर दुर्दैव. केवळ विचार मनी आला म्हणुन जिव घ्यायचा :-(. ही असली पुरुषप्रधान संस्क्रुतीचा उदोउदो करणारी गोष्ट मोठ्य भक्तीभावाने ऐकली व सांगीतली जाते तेही २०१२ मधे :-( नव-याच्या अंगी धमक असती तर मुलांना वध करायाला सांगीतलाच नसता.
  • Log in or register to post comments

तुमच्यासारख्या लोकांना आपल्या

शिल्पा ब
Mon, 05/14/2012 - 21:26 नवीन
तुमच्यासारख्या लोकांना आपल्या भारतीय इतिहासाची काडीइतकीही माहीती नाही तरीही असे अर्थहीन प्रतिसाद देत आहात हे पाहुन मनाला अनंत यातना झाल्या. मुळ लेखाविषयी : <<<परशुरामाबद्दल काही तरी ऐकीव माहितीआधारे बरेच लोक त्याला अविवेकी ठरवतात. अगदी खरं आहे, अन म्हणुनच तुमच्यावर पुर्ण विश्वास आहे कारण नुसत्या ऐकीव माहीतीवर हा लेख लिहिलेला नाही हे दिसत आहे. म्हणुनच "तो परशुराम" असं एकेरी संबोधलं आहे हे दखलपात्रच आहे. क्रोध ही सुद्धा एक देवता आहे ही एक नविन माहीती मिळाली त्याबद्दल धन्यवाद. फक्त एक दुरुस्ती सुचवते, पटतंय का पहा: तिनेच आपल्या पुत्राला -रामभद्राला उर्फ परशुरामाला चिरन्जीवी बनवले होते. या मधे "होते" च्या ऐवजी "आहे" असं असायला हवं ना? लेखिकेसारख्या धार्मिक अन सुसंकृत लोकांची देशाला खुप गरज आहे हे पुन्हा नमुद करु इच्छिते. भारत माता की जय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

हाण्ण!

दादा कोंडके
Mon, 05/14/2012 - 22:22 नवीन
लेखिकेसारख्या धार्मिक अन सुसंकृत लोकांची देशाला खुप गरज आहे हे पुन्हा नमुद करु इच्छिते.
ह्या वाक्या नंतर ;) ही स्मायली राहिली काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

लेखिकेसारख्या धार्मिक अन

मृगनयनी
Mon, 05/14/2012 - 22:43 नवीन
लेखिकेसारख्या धार्मिक अन सुसंकृत लोकांची देशाला खुप गरज आहे हे पुन्हा नमुद करु इच्छिते. तुम्हाला "सुसंस्कृत" म्हणायचे आहे का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

हो हो...आपण सुसंस्कृत आहात

शिल्पा ब
Mon, 05/14/2012 - 23:47 नवीन
हो हो...आपण सुसंस्कृत आहात हेच म्हणायचंय...अर्थात आधीच्या प्रतिसादात टायपो नसल्याने तो आपल्याला दिसला नसावा असं गृहीत धरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

@ jaipal - "परशुरामाने

मृगनयनी
Mon, 05/14/2012 - 22:09 नवीन
@ jaipal - "परशुरामाने आपल्या आईला पुन्हा जिवन्त केले".. हे आपल्याकडून सोईस्करपणे विसरले जातेय.... "आईची हत्या परशुरामास का करावी लागली" याचे विस्तृत विश्लेषण लेखात दिलेले आहे. :) क्षत्रिय राजा असूनही ऋषी-मुनींची सम्पत्ती बळकावणार्‍या, त्यांच्यावर अत्याचार करणार्‍या, गाय दिली नाही म्हणून एका ऋषीची हत्या करणार्‍या, केवळ अधिकार गाजवण्यासाठी सर्वांचा छळ करणार्‍या "सहस्त्रार्जुना"बद्दल आपले काय मत आहे? तसेच सहस्त्रार्जुनाच्या "संस्कृती"स आपण नक्की काय म्हणू इच्छिता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

मुळात

रमताराम
Mon, 05/14/2012 - 22:30 नवीन
आईवर हत्यार चालवणे हा अश्लाघ्यपणा केला तिथेच सारे संपले. नंतर जिवंत केले वगैरे पोराटोरांना सांगण्याच्या गोष्टी. खल्लास. (आमचा हा पहिला नि शेवटचा प्रतिसाद). (जामदग्न्य कुलोत्पन्न असूनही परशुरामाचे कृत्य अश्लाघ्य नि निंदनीय मानणारा) रमताराम अवांतर: पॉपकॉर्न हवेत का कोणाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

आता

अँग्री बर्ड
Mon, 05/14/2012 - 23:59 नवीन
आता जामदग्न्य कुलोत्पन्न असून सुद्धा जर श्री परशुराम आईवर शस्त्र चालवतात हे तुम्ही धरून चालता तर मग परत तिला जिवंत केले हे मान्य करायला तुमचे काय जाते ? की नुसता विरोधासाठी म्हणून विरोध करायचा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

कैच्याकै

रमताराम
Tue, 05/15/2012 - 09:53 नवीन
शस्त्र चालवल्याने हत्या होते याचे असंख्य पुरावे आमच्या आसपास आहेत त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणे अवघड नाही. जिवंत करता येते याचा एक पुरावा दाखवा मग आम्ही मानू. आणि आम्ही अमान्य करण्याचा प्रश्न येतोच कुठे, खुद्द परशुरामाच्या 'त्या कृत्याचे समर्थक'च हे मान्य करतात ना. (खरंतर हे अध्याहृत होतेच पण नाहीच समजले तर उलगडून सांगतोच) 'जर तुम्ही म्हणता तसे कृत्य घडले असेल तर ते अश्लाघ्य, निंदनीय होते.' हा प्रतिसाद आहे. घडले की घडले नाही याचा आमच्या जगण्यावर वा विचारावर काडीचा परिणाम होत नाही, सबब आम्ही त्याचा विचारही करत नाही. घडले असा दावा 'तुम्ही' केलात तर वरचा प्रतिसाद लागू, नाही केलात तर बल्ले बल्ले. हॅरी पॉटरने एखाद्या ड्रॅगनला मारले हे योग्य केले की नाही यावर आम्ही आमचे मत देऊ शकतो, ते त्या पुस्तकातील लिखाणावर आधारित असते. याचा अर्थ खरंच हॅरी पॉटर अस्तित्त्वात आहे, तो जादूगार आहे नि अस्तित्त्वात असलेल्या एखाद्या ड्रॅगनला त्याने ठार मारले यावर आमचा विश्वास आहे असा नसतो. साहित्यिक प्रश्न असतो तो नि उत्तरही त्या संदर्भातच घ्यायचे असते. (चमत्कार वगैरे शाळकरी कल्पनांमधून केव्हाच बाहेर आलेला) रमताराम ता.क. (हा मात्र 'नक्की' शेवटचा प्रतिसाद, कारण याच प्रतिसादाच्या स्वरूपावरून इथून प्रतिसादाची 'डिग्री' - श्लेष अपेक्षित - वाढत जाणार त्यामुळे प्रतिवाद करण्यात फार अर्थ नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अँग्री बर्ड

तुम्ही

अँग्री बर्ड
Tue, 05/15/2012 - 10:01 नवीन
तुम्ही शेवटचा प्रतिसाद देऊन मोकळे झालेलात ना ? मग परत कशी टंकाटंकी सुरु केलीत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

अरेच्या !! तुम्हीच प्रश्न

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 05/15/2012 - 13:00 नवीन
अरेच्या !! तुम्हीच प्रश्न विचारलेत ना ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अँग्री बर्ड

गोष्ट म्हणून वाचायला छान

मराठे
Mon, 05/14/2012 - 21:11 नवीन
गोष्ट म्हणून वाचायला छान आहे.
  • Log in or register to post comments

छान

अँग्री बर्ड
Mon, 05/14/2012 - 21:51 नवीन
छान माहिती आहे. आपल्याला आवडली बॉ. :) || जय परशुराम ||
  • Log in or register to post comments

चौंडक!!

स्पंदना
Tue, 05/15/2012 - 05:26 नवीन
चौंडकाबद्दल लिहायच राहिल का? राहिल असेल तर मी सांगते. १) चौंडक, जे आपण जोगत्यांच्या (जोगवा मागत येणार्‍या लोकांच्या ) हातात पहातो , या वाद्याचा निर्माण इतिहास सांगतेय मी. जे एकवीस वेळा क्षत्रिय निर्मुलन केल गेल त्यात स्त्रिया मारल्या गेल्या नव्ह्त्या. अन अश्या चौल क्षत्रिया??????मला नक्की घराण आठवत नाही आहे, पण या क्षत्रियांचा वध केल्यावर त्यांच्या स्त्रीया परत श्री श्री श्री भगवान परशुरामांना शरण गेल्या , अन आता आम्ही विधवा झाल्याने आम्ही कसे जगावे असे विचारु लागल्या. तेंव्हा या श्री श्री श्री महात्म्याने युद्धभुमीवर पडलेल्या त्या क्षत्रियांच्या कवट्यांना त्यांचीच आतडी लावुन हे चर्मवाद्य वाजवत जोगवा मागत फिरा असा आदेश दिला , जो आजही आपण अस्तित्वात पहातो. या बद्दल्च विवेचन का नाही आल या लेखात. बा द वे, रेणुकेच्या गडावर जे ब्राम्हण लोक धर्माच्या नावाखाली करुन राहिले त्या बद्दल त्यांचा निर्वंश कोण करणार? २) परशुरामाला 'अवतार' न मानता 'अंशअवतार ' म्हंटल जात.
  • Log in or register to post comments

चौंडक, जे आपण जोगत्यांच्या

मृगनयनी
Fri, 05/18/2012 - 19:31 नवीन
चौंडक, जे आपण जोगत्यांच्या (जोगवा मागत येणार्‍या लोकांच्या ) हातात पहातो , या वाद्याचा निर्माण इतिहास सांगतेय मी. जे एकवीस वेळा क्षत्रिय निर्मुलन केल गेल त्यात स्त्रिया मारल्या गेल्या नव्ह्त्या. अन अश्या चौल क्षत्रिया??????मला नक्की घराण आठवत नाही आहे, पण या क्षत्रियांचा वध केल्यावर त्यांच्या स्त्रीया परत श्री श्री श्री भगवान परशुरामांना शरण गेल्या , अन आता आम्ही विधवा झाल्याने आम्ही कसे जगावे असे विचारु लागल्या. तेंव्हा या श्री श्री श्री महात्म्याने युद्धभुमीवर पडलेल्या त्या क्षत्रियांच्या कवट्यांना त्यांचीच आतडी लावुन हे चर्मवाद्य वाजवत जोगवा मागत फिरा असा आदेश दिला , जो आजही आपण अस्तित्वात पहातो. या बद्दल्च विवेचन का नाही आल या लेखात. @ aparna akshay.. "बेटासूर" नावाच्या एका दैत्याचा वध करून त्याच्या नसा आणि शिरा कापून त्या त्याच्या कापलेल्या डोक्याच्या ब्रह्मरन्ध्रात रोवून (ब्रह्मरन्ध्र- डोक्याचा किन्वा कवटीचा वरचा असा भाग.. ज्यामधून आत्मा बाहेर पडतो.. व व्यक्ती मृत होते.) त्याचे एक वाद्य बनवले. (यामध्ये आतड्याचा वापर कुठेही झालेला नाही.) व "तितृणं" "तितृणं" असा आवाज करत वाजवत परशुराम रेणुकामातेपाशी आला. ते वाद्य (ज्याला बोली बाषेत तुणतुणं म्हणतात) रेणुकामातेने जोगत्यांना दिले. पुढे हे वाद्य बनवण्यासाठी पशूंच्या चामड्यांचा वापर होऊ लागला. 'गोन्धळी लोक' रेणुकामातेस आपले आद्यदैवत मानतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

या कथेतुन नक्की काय सांगायचे

५० फक्त
Tue, 05/15/2012 - 07:04 नवीन
या कथेतुन नक्की काय सांगायचे आहे कुणी सुगम मराठितुन सांगेल काय ? बाकी जयपाल आणि ररांशी शंभर वेळा सहमत.
  • Log in or register to post comments

अनाक्रोनिजम

चित्रा
Tue, 05/15/2012 - 08:34 नवीन
परशुराम - सीता- दत्तगुरु-- शिवयोगी एकनाथ इ. सगळे एकाच कथेत कसे असे प्रश्न पडतात. कथा म्हणून ठीक आहे. पण आत्ता अचानक ही सर्व कथा लिहीण्याचे काही खास कारण आहे का? (अवांतर: एक सुचवते- अनेकदा आपल्या प्रिय व्यक्तीवर लोकांनी चुकीने, न समजता आरोप केलेले असतात असे आपल्याला वाटत असते. असे आरोप कधी खरे असतात, तर कधी नसतात, तर कधी गैरसमज असतात. कधी अशा व्यक्तींना शूर, किंवा उत्तम किंवा खुजे किंवा दुष्ट किंवा लबाड म्हणून सिद्ध करण्यासाठी म्हणून काहींनी त्यांच्याविषयी लंब्याचौड्या बाता मारलेल्या असतात. अशा आपल्याशी जोडलेल्या लोकांवरचे आरोप दूर करण्याची कधीकधी इच्छा होऊ शकते. जेव्हा ही व्यक्ती या काळात, जितीजागती, रक्ताच्या नात्याने जोडलेली अशी आपल्यासमोर असते किंवा आरोप दूर होण्याशी काहीतरी स्वार्थ जोडलेला असतो, तेव्हा असे आरोप दूर करणे एखाद्याच्या दृष्टीने निकडीचे असू शकते. मात्र जेव्हा अशी व्यक्ती ही अनेक पिढ्यांमागची, लांबची नातेवाईक असण्याची शक्यता असते, तेव्हा अशा काळाने, आहाराविचाराने दूरस्थ अशा व्यक्तीवरचे असे आरोप दूर झाले काय किंवा नाही झाले काय, आपल्या "खुद्द" स्वत:च्या सध्याच्या स्थितीत काहीही ढिम्म फरक पडणार नाही असे बहुदा दिसून येते. उगाच वेळ वाया का घालवा? भारतातल्या ऐतिहासिक गोष्टींत इतकी भेसळ झाली आहे की कशाचा कशाला पत्ता लागत नाही. या अशा कथांमधील भेसळीला दूर करून अशा कथेतील ऐतिहासिक सत्य काय असू शकते याचे थोडेफार अंदाज लावण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो, पण तसा करण्याची गरज आहे का असा प्रश्न स्वतःलाच विचारावा. )
  • Log in or register to post comments

अवांतराशी सहमत

नाना चेंगट
Tue, 05/15/2012 - 10:14 नवीन
अवांतराशी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

नाना

jaypal
Tue, 05/15/2012 - 12:09 नवीन
नाना चेंगट्याशी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

जयपालशी सहमत.

शिल्पा ब
Tue, 05/15/2012 - 21:40 नवीन
जयपालशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

शिल्पाशी सहमत.

मोदक
Wed, 05/16/2012 - 10:28 नवीन
शिल्पाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मोदकशी सहमत.

आनंदी गोपाळ
Fri, 05/18/2012 - 14:52 नवीन
मोदकशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

परशुराम - सीता- दत्तगुरु--

मृगनयनी
Tue, 05/15/2012 - 11:12 नवीन
परशुराम - सीता- दत्तगुरु-- शिवयोगी एकनाथ इ. सगळे एकाच कथेत कसे असे प्रश्न पडतात. कृतयुगात जन्मलेले भगवान परशुराम "चिरन्जीवी" होते. ते कृतयुगातही होते, त्यानन्तरच्या त्रेतायुगातही होते. त्यामुळेच तर त्यांनी मिथिलेच्या जनकराजाकडे जाऊन भगवान शन्करांनी दिलेले "शिवधनुष्य" त्यास दिले. व सीतास्वयंवरात ठेवण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर जेव्हा रामाने ते शिवधनुष्य मोडून स्वयंवर जिन्कले, तेव्हा परशुराम स्वतः तिथे आले होते. व राम-सीतेला आशीर्वादही दिला होता. त्यानन्तर द्वापारयुगातही परशुराम होते. फक्त ब्राह्मणांनाच ते अस्त्रविद्या शिकवित असत. परन्तु एकदा कर्णाने स्वतः ब्राह्मण असल्याचे सांगून परशुरामांकडून अस्त्रविद्या शिकून घेतली. परन्तु एका भुन्ग्यामुळे तो ब्राह्मण नसल्याचे उघडकीस आले. व "ती अस्त्रविद्या तुला स्वसंरक्षणासाठी उपयोगी पडणार नाही" असा परशुरामाने कर्णास शाप दिला. आता कलीयुगामध्येही जेव्हा अजून अडीच हजार वर्षांनी कल्की-अवतार होईल, तेव्हा कल्कीचे गुरु हे भगवान- परशुरामच असतील. (सन्दर्भ- कल्की पुराण) तसेच "दत्तगुरुं"चे अस्तित्व अनादिकालापासून आहे. कलियुगात दत्तगुरुंनी -नृसिंहसरस्वती, चिदम्बरम स्वामी, साईबाबा, स्वामी समर्थ इ गुरुंच्या माध्यमातून स्वतःच्या अस्तित्वाचे पुरावे दिलेले आहेत. शिवयोगी- एकनाथ आणि जोगिन्दर हे सत्ययुगातील दोन शिवयोगी होते. ज्यांनी जमदग्निंच्या क्रोधामुळे आश्रमाबाहेर पडलेल्या रेणुकामातेला आसरा देऊन उपदेश केला होता. यामधल्या "एकनाथां"चा व महाराष्ट्रातील कलीयुगीन सन्त- पैठणचे एकनाथ यांचा काहीही सम्बंध नाही. कथा म्हणून ठीक आहे. पण आत्ता अचानक ही सर्व कथा लिहीण्याचे काही खास कारण आहे का? हो.. हा लेख टंकण्यामागे एक कारणही आहे. एका कुठल्याश्या लेखात सप्तचिरंजीवींपैकी एक- भगवान परशुरामांचे वर्णन- 'अविवेकी सूडवृत्ती' वगैरे केले होते. जे न पटणारे होते. तसेच समाजात परशुरामांबद्दल अनेक गैरसमज आहेत.. ते दूर व्हावे असेही मला वाटत होते.. त्यामुळे हा लेख टंकून भगवान परशुरामांबद्दल माहिती सांगण्याचा एक प्रयत्न केला आहे. बाकी आपले 'अवांतर' काही पटण्यासारखे व काही न पटण्यासारखे आहे. परन्तु माझ्या लेखामुळे कुणाला काही नवीन माहिती कळत असेल किन्वा माहित असलेल्या गोष्टी पुन्हा रिवाईज होत असतील.. तर मला आनन्दच आहे! तसेच ज्यांना माझ्या लेखातील काही / पूर्ण गोष्टी आवडत नसतील.. तर तेही लोक त्यांची मते मान्डतातच की!.. आणि त्यामुळे होणारा फायदा असा, की वेगवेगळ्या 'आयडी'च्या मनोवृत्तीची आपल्याला कल्पना येऊ शकते. त्यांचे विचार आपल्याला कळतात.. त्यांची एखाद्या व्यक्तिरेखेबद्दल काय मतं आहे.. हे आपल्याला समजते... त्यांची भाषाशैली कळते. ओव्हरऑल मेन्टॅलिटी कळते. :) ;) =)) =)) उदाहरणार्थः- jaypal आणि रमताराम या दोन आयडींच्या विचारांमध्ये खूप साधर्म्य आहे. फक्त फरक इतकाच आहे, की 'रमताराम' हे जमदग्निंच्या कुळातले आहेत. आणि jaypal जमदग्निंच्या कुळातले नाहीयेत. त्यामुळे परशुरामाबद्दल वाईट बोलताना 'रमताराम' यांच्यापेक्षा jaypal यांची भाषाशैली जास्त हार्श आहे. आणि jaypal यांचा "जमदग्नि" ऋषींवर जास्त राग आहे, हेही जाणवते. .. बाकी दोघांची मेन्टॅलिटी साधारण सारखीच्च आहे!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

<<<तसेच "दत्तगुरुं"चे

शिल्पा ब
Tue, 05/15/2012 - 11:58 नवीन
<<<तसेच "दत्तगुरुं"चे अस्तित्व अनादिकालापासून आहे. आपला व्यासंग पाहुन वरील वाक्यासंदर्भात एक प्रश्न मनात आला आहे त्याचे उत्तर मिळेल अशी आशा करते. प्रश्न असा: अनादिकाल केव्हा सुरु होतो? नै म्हणजे मधे डायनोसोर वगैरे येउन लोपसुद्धा पावले असे पुरावे आहेत त्यामुळे त्यावेळेस ही वेगळी मानवजात कुठे राहात असे? त्यांचा शीतयुगात कसा निभाव लागला हे वाचायला आवडेल. तसेच अजुन एक म्हणजे, कल्की पुराण लिहिणारे कोण आहेत? अन जिथे पुढच्या सेकंदाला काय होणार हे माहीत नाही तिथे त्यांनी कलियुगात कुठे, कोण अन कसा जन्म घेणार अन त्याचे गुरु कोण असणार वगैरे कशाच्या आधारावर सांगितले की जे तुम्ही सत्यच्च आहे असे मानता? बाकी लोकांची मेंटॅलिटी कळते हे अगदी योग्य निरीक्षण आहे हे नमुद करु इच्छिते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

शिल्पातैनी विचारलेल्या

५० फक्त
Tue, 05/15/2012 - 12:34 नवीन
शिल्पातैनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास बरं वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

छुपा अजेंडा

jaypal
Tue, 05/15/2012 - 11:59 नवीन
>>की 'रमताराम' हे जमदग्निंच्या कुळातले आहेत. आणि jaypal जमदग्निंच्या कुळातले नाहीयेत. "एकमेकांची कुळ शोधुन कोण श्रेष्ठ? कोण कनिष्ठ? अशी भांडण लावायची आणि हरी हरी करत मजा बघायची" अश्या कथा ईथे देण्या मागे तुमचा हा छुपा अजेंडा असावा अशी दाट शक्याता होती ती आता निश्चित झाली. उगा मिपा करांची मेन्टॅलिटी वा मनोवृत्तीची तपासणी करण्याची तुम्हाला गरज काय? बहुदा खुप वेळ आहे तुमच्या कडे काड्या सारायला. रीकामा ** कुडाला तंबड्या लावी. तुम्हाला वाढ दिवसाच्या शुभेच्छा :-). मिपा वरील वातावरण गढुळ / दुषीत होण्या पुर्वीच संपादक मंडळ वेळीच लक्ष घालतील ही खात्री. :-) जन्माला महत्त्व न देता कर्माला महत्त्व देणारा. जयपाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा