Skip to main content

!! मोरया !!

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 09/11/2011 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
बहुचर्चित (?) असा मोरया चित्रपट परवा पाहण्यात आला. झेंडा ह्या सो कॉल्ड वादग्रस्त चित्रपटानंतर अवधूत गुप्ते ह्यांचा हा पुढला चित्रपट. बर्‍यापैकी कथा, तरुणाईचा फ्रेश लुक आणि दमदार अभिनय ह्यामुळे एकूणच झेंडा आवडून गेला होता. काही काही पंचेस आणि संवाद दाद देण्याजोगे होते, तर काही प्रसंग वाखाणण्याजोगे. एकुणात काय तर झेंडामुळे 'मोरया' बद्दलच्या अपेक्षा थोड्या का होईना उंचावलेल्या होत्या. किरकोळ बदल सोडता अवधूत गुप्ते ह्यांनी झेंडाचीच टीम इथे उतरवलेली आहे. कथा-पटकथा-संवाद अशी तिहेरी जबाबदारी सचिन दरेकर ह्यांनी सांभाळलेली असून, अतुल कांबळे आणि अवधूत गुप्ते ह्यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे. दिग्दर्शन म्हणून पुन्हा एकदा अवधूत गुप्तेच आहेत. चित्रपटात दिलीप प्रभावळकर, स्पृहा जोशी, चिन्मय मांडलेकर, परी तेलंग, संतोष जुवेकर, मेघना एरंडे, धनश्री कोरेगावकर अशी तरुण आणि अभिनयसंपन्न स्टारकास्ट आहे. अर्थात ह्यातील परी तेलंग व मेघना एरंडे ह्यांच्या भूमिका प्रमुख भूमिका म्हणून का गणल्या गेल्या आहेत हा मोठा प्रश्नच आहे. गणेशोत्सव, त्याचे पावित्र्य, गणेशाच्या उत्सवात शिरकाव करून बसलेल्या वाईट प्रथा, गणेशोत्सवाच्या आधारे चालवले जाणारे राजकारण आणि एकूण राजकारण्यांची प्रवृत्ती अशा सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकायचा प्रयत्न म्हणजे 'मोरया' हा चित्रपट. कथेच्या जोडीला चाळीचे बिल्डिंगमध्ये रुपांतर, दोन चाळींमधला आपलाच गणपती कसा मोठा ह्यासाठी होणारा संघर्ष, तरुणाईची सध्याची तगमग असल्या पटकथांची देखील जोड आहे. मुळात कथाच दमदार नसल्याने ह्या पटकथा देखील तिला टेकू देऊ शकलेल्या नाहीत. ना भरभक्कम कथा, ना पटकथा, त्यातच संवादात देखेल फारसा दम नसल्याने अनेक गुणी कलाकार असूनही हा मोरया काही सुखकर्ता ठरत नाही. समोरासमोर परंतु एकाच जागेत असलेल्या गणेश चाळ व खटाव चाळ ह्या दोन चाळी. दोन्ही चाळींचे गणपती वेगळे, इतर सणवारही वेगवेगळे साजरे होणारे. लवकरच तिथे विकसन होणार असल्याने, बिल्डरने एकाच गणपतीसाठी मंदिराची सोय करण्याचे कबूल केले आहे. आता एकाच गणपतीची स्थापना ह्यापुढे दरवर्षी करायचे चाळकरी ठरवतात. दोन्ही चाळीतल्या तरुणांना मात्र हे मान्य नाही. एका चाळीच्या तरुणांचा नेता आहे चिन्मय मांडलेकर तर दुसर्‍या चाळीचा अर्थातच संतोष जुवेकर. ह्या दोन्ही चाळीतला शहाणा मनुष्य म्हणजे दिलीप प्रभावळकर. अर्थात दोन्ही गट त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. शेवटी ह्या वर्षी ज्या गटाचा गणपती जास्ती गर्दी खेचेल, जास्ती प्रसिद्धी मिळवेल तो टिकेल असा ठराव होतो आणि दोन्ही गट जीव तोडून मेहनतीला लागतात. आता आपलाच गणपती टिकला पाहिजे ह्या ईर्ष्येने दोन्ही गट पेटून उठल्याने मग मोठ्या प्रमाणावर वर्गणी गोला करण्याची चढाओढ सुरू होते. वेळेप्रसंगी मग त्यासाठी एका गटाकडून राजकारण्यांचा आसरा घेतला जातो तर एका गटाकडून चक्क मुसलमान मालक असलेल्या यात्रा कंपनीचे पोस्टर मांडवाबाहेर झळकवले जाते. गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर तर एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नाही नाही त्या मार्गांचे अवलंब करायला दोन्ही गट सुरुवात करतात. मग आपला गणपती नवसाला पावतो अशी संतोष जुवेकरच्या गटाने चॅनेलवरती खोटी जाहीरात करताच, चिन्मय मांडलेकरच्या गटाकडून त्यांनी लावलेले मुसलमानी पोस्टर आणि त्यांचा गणेशोत्सव कसा सर्वधर्म समभाव निर्माण करणारा आहे ह्याची जाहिरातबाजी केली जाते. त्याच वेळी चिन्मय मांडलेकर हा खरा मुसलमान, मात्र सच्चा गणेशभक्त असल्याचे दाखवून अवधूत गुप्ते आपल्याला छान चक्कर आणतो. डोक्याला हात मारून पुढे काय घडते ते बघण्याशिवाय आपल्या हातात काही नसते. मग उरलेल्या काळात बाप्पासाठी कार्यकर्ते कशी जीवतोड मेहनत घेतात, संतोष जुवेकर सारखे तडफदार [?] तरुण रजा मिळाली नाही तर नोकरी वरती लाथ कशी मारतात, दहा दिवस कार्यकर्ते बाप्पासाठी दारूचा त्याग कसा करतात इ. इ. आपण नेहमी वाचत असलेले आणि बघत असलेले प्रसंगच साकार होतात. त्यामुळे मधल्या वेळात थोडीशी डुलकी घेतली तरी चालेल. हान तरा आता सरळ मार्गाने पुरेसे यश काही मिळत नाही म्हणल्यावरती दोन्ही गटाकडून गैरमार्गाचा वापर केला जातो. अर्थात त्याला पाठिंबा असतो तो राजकारण्यांचाच. एका गटाकडून दुसर्‍या गटाच्या मांडवामागे दारूच्या बाटल्यांचा ढीग ठेवला जातो आणि त्याचे चित्रीकरण करून चॅनेलवरती दाखवले जाते. अर्थात मग दुसर्‍या गटाकडून विरुद्ध गटाच्या मांडवाबाहेर लावलेल्या हिरव्या पोस्टरचे नुकसान केले जाते. ही घटना घडते आणि ताबडतोब शहरात दंगली उसळतात. मग दोन्ही धर्माचे राजकारणी त्याचा येणार्‍या निवडणूकीत कसा वापर करता येईल त्याच्या हिकमती लढवायला लागतात. शेवटी काय होते ? खरा गुन्हेगार सापडतो ? दोन्ही गटांना आपली चूक लक्षात येते ? आणि शेवटी गणपती कुठल्या गटाचा राहतो ? ह्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर 'मोरया' दर्शाना शिवाय पर्याय नाही. अर्थात आजकालच्या तुम्हा जाणकार मंडळींना असे प्रश्न पडतील असे वाटत नाही. ह्याची उत्तरे चित्रपट न बघताच तुम्हाला कळले देखील असतील. बरं आता चित्रपटाचे येवढे पोस्टमार्टेम केल्यावर, चित्रपटात काही चांगले आढळलेच नाही का ? नक्की आढळले. स्पृहा जोशी, चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर ह्या तरुणांचा अभिनय, त्यांचे लुक्स, त्यांची संवादफेक, कॅमेर्‍याचे ज्ञान सगळे सगळे आवडले. चित्रपटाचे चित्रीकरण, वापरलेले लोकेशन्स देखील झकास. शीर्षक गीत, दहीहंडी नृत्य देखील झकास जमले आहे. मात्र दिलीप प्रभावळकर ह्यांना अशी आगा पिच्छा नसलेली आणि जणूकाही समोपदेशकाच्या थाटाची भूमिका देऊन वाया का घालवले आहे ते कळत नाही. परी तेलंग, मेघना एरंडे ह्या देखील चॅनेल्सच्या निवेदकांच्या भूमिकेत छाप पाडू शकलेल्या नाहीत. अर्थात भूमिका मध्येच काही दम नसल्याने त्यांना दोष का द्यावा ? मुळात ह्या दोन चाळीतल्या गणेशोत्सवा शिवाय जगात काही घडतच नाहीये अशा ठाम मानसिकतेने ही चॅनेल्स चाळीतच ठाण मांडून का बसलेली असतात ते बाप्पालाच ठाऊक. राकारण्याच्या भूमिकेत इथे पुन्हा एकदा ३/४ प्रसंगात पुष्कर श्रोत्री दर्शन देतो. त्याची भूमिकाच उद्धव ठाकरे टाईप लिहिली आहे, का तो अजून झेंडाच्या मानसिकतेतून बाहेरच पडू शकलेला नाही ते कळत नाही. चित्रपटात मध्येच एक मुसलमान नेता कम बिझनेसमनचे पात्र घुसडलेले आहे. कुठल्याच पात्राला एक ठाम अशी विचारधारा किंवा ज्याला ग्राउंड म्हणावे ते पुरवले गेलेले नाही. कुठलेच पात्र ठसठशीत झालेले नाही. स्पृहा जोशी फक्त गायला मिळते, गळ्याचा कस वगैरे लागतो म्हणून डान्सबार मध्ये गात असते हे तर पटता पटत नाही. चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर हे पोटापाण्यासाठी, रोज रात्री दारू पिण्यासाठी पैसे कुठून आणतात हा प्रश्न प्रत्येकाने आपापल्या बुद्धिसामर्थ्यावर सोडवावा. एकुणात काय तर एकाच चित्रपटात सगळेच काही दाखवण्याचा अवधूत गुप्तेंचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे.

वाचने 11066
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

मस्त परिक्षण !!! चला परत पैसे वाचले म्हणायचे... प्रमाणाच्या बाहेर अवांतरः--- मेघना एरंडे ह्या देखील चॅनेल्सच्या निवेदकांच्या भूमिकेत छाप पाडू शकलेल्या नाहीत. मेघना एरंडे वरुन आठवलं... ती सह्याद्री वाहिनीवर सचिन ट्रॅव्हलच्या कार्यक्रमात दिसते... एकदा चॅनल बदलताना तो कार्यक्रम लागला होता,म्हंटल बघु या तरी नक्की काय चाललयं ते ! प्रेक्षक फोन करुन निरनिराळ्या ट्रॅव्हल पॅकेजेस बद्धल विचारत होते,त्यातच एक इरसाल इसमाने फोन केला. इसम :--- हॅलो. मेघना :--- हॅलो... हा बोला. इसम :--- मला हनिमुन पॅकज हवं आहे. मेघना :--- अच्छा ! (चेहर्‍यावर थोडेसे लाजरे भाव) कुठे जायची इछा आहे तुम्हाला ? आणि किती दिवसासाठी ? इसमः--- कुठले प्लान्स आहेत तुमच्या जवळ ? मला एक महिन्यासाठी जायचे आहे. मेघना:--- एक महिना ? ( चेहर्‍यावर धसका घेतल्याचे भाव ) तुम्हाला एक आठवडा म्हणायचे आहे ना ? इसम :--- एक महिना हो... मेघना:--- बहुतेक त्यांना एक आठवडा म्हणायचे असेल... (कॅमेराकडे बघुन अवघडलेले भाव) इसम :--- कुठले पॅकेज आहे का ? कॉल कट होतो... मेघनाचा चेहरा अगदी बघेबल झालेला असतो ! ;) ( मी मनातः--- १ महिना ? च्यामारी हा तर हीमॅनचा पण बाप दिसतो !) ;)

In reply to by मदनबाण

चला परत पैसे वाचले म्हणायचे... पण हा चित्रपट टॉकिजमधून बाहेर पडून कित्येक आठवडे(?) झालेत, मग कुठले पैसे वाचले म्हणायचे?

In reply to by किसन शिंदे

Time is money...म्हणून म्हणाला असेल ;)

In reply to by सुहास झेले

Time is money...म्हणून म्हणाला असेल खी खी खी... सुहासराव तुमी लयं हुशार बघा ! ;)

परवाच पाहिला. (चकटफू.) अवधुतच्यच 'झेंडा' इतका प्रभावी वाटला नाही.
अवधूत गुप्तेंचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे.
पुर्णपणे सहमत.

सहमत! वाहिन्यावालेदेखील बाकी सगळे गणपती सोडून फक्त या दोघांच्याच गणपतीला ब्रेकिंग न्यूज कस काय करतात.गणपतीतले सगळे दिवस यांच्याच चाळीमध्ये कसे काय वाया घालवतात? (कारण अशा वाहिन्यावले कितीही मोठी बातमी असली तरी ती दुसर्यादिवशी देखील परत दाखवत नाहीत.टी आर पी कमी होतो न!) दिलीप प्रभावालाकारंच म्हणाल तर ते खरच पटल नाही.त्यांना खरच वाया घालवलाय.जी मुल बाकी कोणाच ऐकत नाहीत..ती त्याचं काय ऐकणार? त्यांना शाळेची इतिहासाची पुस्तक देन हा श्हुध गाढवपणा!दिलीप प्रभावळकर आपल्या प्राणांची आहुती देणार हे तेव्हाच वाटल होत. पोलीस एवढ्यासार्वासमोर मोदक खातायत हे देखील पटत नाही. निदान लोकांसमोर तरी आपण कर्तव्यदक्ष आहोत,राजकारण्याच्या हाताखालचे नोकर नाही अस दाखवावं लाकत त्यांना.

परिक्षण झकास .. सिनेमा पाहिलेलाच नसल्याने छान वाटले.. तो झेंडा पण मला आजिबात आवडला नव्हता ( गाणी मात्र छान होती) अवांतर : पटकथा म्हणजे कथेला संवादानुसार लिहायचे असे मला वाटत होते.

In reply to by गणेशा

तो झेंडा पण मला आजिबात आवडला नव्हता
गण्याचे अन माझे विचार पहिल्यांदी जुळले..... झेंडा तद्दन फालतु नाई पण फालतु म्हणन्याइतका फालतु तर नक्कीच होता....

परीक्षण झकास.. बाकी अवधूत गुप्तेचे शी णे मे बघायचे नाहीत असे ठरवलंय... तेच कलाकार.. त्याच बाजाची गाणी.. तशाच कथा.. तसेच कॅमेरा angels . कंटाळा आला आता पुरे

In reply to by स्पा

'मोरया' हा गुप्त्यांचा जेमतेम दुसरा चित्रपट. इतक्या थोड्या माहितीवरून आपण हा निष्कर्ष कसा काय काढलात ब्वा?

In reply to by प्रचेतस

आम्हास शितावरून भाताची परीक्षा करण्यास जमते...असो... बाकी आपण सध्या भारीच स्मार्ट झाला हात.. असे नम्रपणे नमूद करू इच्छितो ;)

In reply to by स्पा

म्हणजे आम्ही आधी स्मार्ट नव्हतो असे आपणास म्हणावयाचे आहे काय? 'असतील शिते तिथे जमतील भूते' ही म्हण या निमित्ताने आठवली.

In reply to by स्पा

आधी आपण फोनवर बोलायचो, आता स्मार्ट फोनवर बोलतो तसेच का? बाकी तुमच्या ग्रहणला का ग्रहण लागलेय? टाका की लवकर.

पाहिला आहे (चकटफु) त्याच वेळी चिन्मय मांडलेकर हा खरा मुसलमान, मात्र सच्चा गणेशभक्त असल्याचे दाखवून अवधूत गुप्ते आपल्याला छान चक्कर आणतो. डोक्याला हात मारून पुढे काय घडते ते बघण्याशिवाय आपल्या हातात काही नसते.>> या पॉइंट्ला सिनेमा पाहताना एकदम अचंबित झालो होतो. डोक्याला हात मारला अन माझ्या हातात त्या वरच्या मोरयाने फास्ट फारवर्डचे बटण दिले होते ते वापरले व संपवुन टाकला एकदाचा!! परत गुप्त्याचा सिनेमा पाहणार नाही रे बाबा!!

In reply to by मोहनराव

>>> खरा मुसलमान, मात्र सच्चा गणेशभक्त असल्याचे दाखवून..... पारतंत्र्याच्या काळात असले कादंबर्‍यातले वर्णन सरकारी बक्षीस, पुरस्कार, एखादी पदवी, विद्यापिठात पुस्तक लागणे यासाठी हुकूमाचा एक्का असायचा. आताच्या काळात याचा उपयोग वरीलप्रमाणेच आणि सोकॉल्ड सामाजिक एकता वैगेरे साठी केला जातो. परिक्षण छान. फक्त उशीरा आल्यासारखे वाटते. अर्थात उशीरा आले म्हणजे ते परिक्षण असते असे नाही.

परा, चित्रपट परिक्षणाबद्दल आभारी आहे. चित्रपट पाहिल्यावर चित्रपट आणि परिक्षणाबद्दल मत व्यक्त करीन. तो पर्यंत ही केवळ पोच. अवांतर : देवा, तेवढी ती खरडीची ताटी उघडा ना. किती दिवस असे स्वतःला आत कोंडून घेणार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरांच्या आवांतराशी सहमत. म्हाराज आम्हास खरडी टाकुन पशार व्हत्यात. आता आम्ही काय दरवेळी व्यनीने उत्तरं धाडावी होय ;) .

सदर परिक्षण आणि मुळ पिक्चर दोन्हीही आवडले असे सांगतो. पिक्चर आणि परिक्षणामध्ये न आवडण्यासारखे फारसे असे काही नाही. ;) सत्य परिस्थिती सांगण्याबाबत्/दाखवण्याबाबत मुळ पिक्चर आणि हे परिक्षण दोन्हीही अचुक आणि उत्तम आहेत असे सांगतो ;) असो, एकंदर मजा आली ... पिक्चर पाहुन आणि परिक्षण वाचुनही, दोन्हीही उत्तम ;) - ( दोन्हीही आवडलेला ) छोटा डॉन

परीक्षण उत्तम झाले आहे. यादव ह्या गुणी कलाकारांचे पोलीस इन्स्पेक्टर ची भूमिका वठवली आहे. ह्यात पोलिसांचे ह्या सोहळ्यात होणारे हाल व कामाचा ताण ,राजकारणी व वरिष्ठ लोकांकडून होणार्या हुकुमांचा मारा हे सर्व त्याने उत्कृष्ट रीत्या दाखवले आहे. मोदकाचा प्रसंग अजिबात खटकला नाही. आमच्याकडे कुर्ल्याला जेव्हा चाळीचे गणपती निघत तेव्हा पाईप रोड ( जेथे सिमीचे प्रमुख कार्यालय होते.) तेथून जातांना व भटकळ बंधूंचे निवास्थान येथेच असल्याने गणपती विसर्जन व ईद च्य दरम्यान पोलिसांवर प्रचंड ताण असतो.त्यांची देहबोली व संभाषणातून तो व्यक्त होतो. अर्थात हा ताण ह्या १० वर्षात वाढीला लागला आहे. अवधूत हे त्याच पठडीतील सिनेमे काढतो हे मान्य मात्र ज्या वातावरणात त्याचे बालपण गेले ज्यासंधार्भात तो हक्कने सिनेमे काढू शकतो. त्याने गावाकडचे सिनेमे काढले तर मग तरी मग त्याला नावे ठेवली जाणार. .तरीही सिनेमात हिंदू मुस्लीम दंगल तेही गणपतीत हे अती केलेय. आज पर्यंत मुंबई चा इतिहास आहे की गणपती व ईद ह्या दिवशी हिंदू मुस्मिम हे समजुतीने वागतात. १९९२ च्या दंगलीच्या सुमारास सुद्धा गणपती सुरळीत पार पडले.आज छोटा राजनचा टिळक नगरचा गणपती तर दाउद च्या पाक मोडीया स्ट्रीट वर ईद शांततेत साजरी होते. मधील मुंबईत प्रसिद्ध आहे. सिनेमातील गाणी मला आवडली. सुरवातीचे गाणे अप्रतिम इमेल काल... पद्धतीची फिल्मी लावणी झकास

In reply to by निनाद मुक्काम …

तरीही सिनेमात हिंदू मुस्लीम दंगल तेही गणपतीत हे अती केलेय.
१९९७ साली नांदेडात अशीच एक दंगल उसळली होती....

In reply to by वपाडाव

अफजल खान च्या फोटो वरून खाजून करूज काढण्याचे प्रकार झाले असतील. पण मुंबईत गणपती आणी ईद ही शांततेत होतात.. भेंडी बाजार मध्ये ईदचा मालपोआ . आणी तितर खायला आतुर निमुपोज ( आयुष्यात एकदा तरी हैद्राबाद मधील हलीम ईद च्या दरम्यान खास केले जाते ते खाण्याची इच्छा आहे. नीलकांत ने सचित्र लेख लिहून जिव्हेची वासना चाळवली आहे.

परिक्षण आवडले. वास्तववादी आहे. झेंडा आणि मोरया दोन्ही चित्रपट अजिबात आवडले नाहीत. झेंड्यातील 'विठ्ठला रे कोणता झेंडा...' हे गाणे मात्र आवडले होते.

मस्त परीक्षण लिहिले आहे.आवडले. मीपण सिनेमा बघितलाय. अवधूत गुप्ते बद्दल ज्या कल्पना होत्या त्यात नाही बसला बिल्डिंगमध्ये रुपांतर, दोन चाळींमधला आपलाच गणपती कसा मोठा ह्यासाठी होणारा संघर्ष, तरुणाईची सध्याची तगमग असल्या पटकथांची देखील जोड आहे. मुळात कथाच दमदार नसल्याने ह्या पटकथा देखील तिला टेकू देऊ शकलेल्या नाहीत. ना भरभक्कम कथा, ना पटकथा, त्यातच संवादात देखेल फारसा दम नसल्याने अनेक गुणी कलाकार असूनही हा मोरया काही सुखकर्ता ठरत नाही. हे एकदम भावले. मलापण चित्रपट नाही रुचला

मस्त परीक्षण लिहिले आहे.आवडले. मीपण सिनेमा बघितलाय. अवधूत गुप्ते बद्दल ज्या कल्पना होत्या त्यात नाही बसला बिल्डिंगमध्ये रुपांतर, दोन चाळींमधला आपलाच गणपती कसा मोठा ह्यासाठी होणारा संघर्ष, तरुणाईची सध्याची तगमग असल्या पटकथांची देखील जोड आहे. मुळात कथाच दमदार नसल्याने ह्या पटकथा देखील तिला टेकू देऊ शकलेल्या नाहीत. ना भरभक्कम कथा, ना पटकथा, त्यातच संवादात देखेल फारसा दम नसल्याने अनेक गुणी कलाकार असूनही हा मोरया काही सुखकर्ता ठरत नाही. हे एकदम भावले. मलापण चित्रपट नाही रुचला