धर्म - अर्थ - काम - मोक्ष हे पुरुषार्थ, बद्ध - मुमुक्षु - साधक - सिद्ध, या अवस्था आणि अष्टांगयोग
रोजनिश्यांमधील आठवणी वाचताना जाणवलं, की अरे, आपण किती उत्साही, धडपड्ये होतो, भविष्याची यत्किंचीतही कल्पना नसताना जेंव्हा जे जे समोर येत गेलं, सुचत गेलं, ते ते करत गेलो, यातून काहीतरी हिताचं असं घडतच गेलं, आणि आज बहुतांश कौटुंबिक जबाबदारया संपून आपण आता वाटेल ते करायला - आपल्या विशिष्ट मर्यादांमध्ये का होईना, स्वतंत्र आहोत...
... म्हणजे बर्यापैकी पुरुषार्थ आपण केला, असे म्हणता यावे...
चार पुरुषार्थापैकी अगदी सुरुवातीलाच "धर्म"
...पण मंदिरात जाणे, पूजाअर्चा, सत्यनारायण वगैरे व्रतवैकल्ये, असले काही आपल्या आई-बापाने सुद्धा कधी काही केले नाही, मग धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे चार पुरुषार्थ, आणि बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध, या चार अवस्था; याची आपल्या स्वत:च्या जीवनाशी कशी सांगड लावता येते ? हा प्रश्न उद्भवला, आणि विचार सुचत गेले ...
... अगदी सुरुवातीला शिकणे हे महत्वाचे असायचे, की बाबा आपण पेंटिंग शिकावे, पेटी वाजवता यायला हवी, जादूचे नवनवीन प्रयोग शिकावेत, इंग्रजी चांगले शिकले पाहिजे, फिजिक्स केमिस्ट्री वगैरे शिकून डिग्र्या वगैरे पण मिळवल्या पाहिजेत, आसनं, व्यायाम शिकावेत वगैरे.... म्हणजे एकंदरीत स्वतःचे असे विशिष्ट 'गुणधर्म' असलेली एक समर्थ व्यक्ती बनण्यासाठी करायचे खटाटोप म्हणजे 'धर्म' ही पायरी.
नंतरच्या काळात अर्थार्जन वा स्वतःची स्वतंत्र मिळकत होईल असा उद्योग करत राहून स्वावलंबी राहणे, म्हणजे 'अर्थ' ही पायरी.
पुढे क्षणोक्षणी आणि पुन्हापुन्हा उत्पन्न होणार्या, दीर्घ काळ टिकून राहणार्या, कामना पूर्ण करत राहता याव्यात, आणि पुन्हा पुन्हा निर्माण होत जाणार्या प्रतिकूलतेशी झुंज देता यावी, यासाठी एक सुरक्षित विश्व निर्माण करत जाणे ... म्हणजे सुरुवातीला किरकोळ वापरायच्या वस्तू वा भाड्याची खोली मिळवण्यापासून, पुढे स्वतःचे घर, मुलेबाळे - कुटुंबकबिला; उपजीविकेचे,कर्तव्य म्हणून,वा आवडीने अंगावर घेतलेले काम... असा वाढत जाणारा 'स्व' चा पसारा, आणि त्यातून पुन्हा उत्पन्न होणार्या नानाविध कामनांचा गुंता, म्हणजे "काम"
या सर्वात जास्त जास्त गुंतत जाऊन मुळातल्या 'स्व' कडे सुद्धा लक्ष न पुरवता येण्यासारखी परिस्थिती होऊन त्यातून येणारी बेचैनी. मग धर्म, अर्थ, काम या तिहीतून निर्माण झालेली "बद्ध" अवस्था अनुभवत, यातून आता सुटका व्हावी, अश्या तळमळीची "मुमुक्षु" अवस्था. (अर्थात हे मुमुक्षुपण सुद्धा आपण लहानपणापासून अनुभवत असतोच, जसे शाळेच्या सुट्टीची वाट बघणे वगैरे) यापुढील पायरी म्हणजे "साधक" अवस्था, आणि शेवटी त्या साधनेतून प्राप्त होणारी "सिद्ध" अवस्था.
आता मुमुक्षु अवस्थेतून साधक अवस्थेत जायचे, तर जी प्रत्यक्ष साधना करायची, ती कोणती, कशी, वगैरे गोंधळातून मार्ग काढायला कुणी गुरु मिळायला हवा, दीक्षा घ्यायला हवी, असं ऐकलेलं ...हल्ली तर टीव्ही वर असे अनेकानेक गुरु, महाराज, बुवा हजरच असतात ... हा परत आणखी गोंधळ.
शिवाय भक्तिमार्ग बरा की ज्ञानमार्ग, की कर्म, की योग, की जप की तप, वगैरे सतरा भानगडी...
...तर पुन्हा स्वतः पुरते बोलायचे म्हणजे भक्ती, जप, स्वामी-बाबा लोकांचे उपदेश वगैरे गोष्टी आपल्याला अगम्य असल्याने पतंजलीप्रणित अष्टांगयोग (यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी) उत्तम, असे वाटले. अर्थात हा मार्ग कठीण खरा, पण अतिशय व्यवस्थितपणे मांडणी केलेली असल्याने पायरी-पायरीने समजणे आणि प्रत्यक्षात उतरवणे, यात शक्य वाटते. मुख्य म्हणजे कोणतीही गोष्ट "मानायची" वा "श्रद्धा" वगैरेंची ची आवश्यकता नाही. प्रत्यक्ष क्रिया करा, आणि त्याचे फळ चाखा.
पातंजलयोगाचा अभ्यास करायचा, असे वाटू लागल्यावर यावर कोणकोणती पुस्तके उपलब्ध आहेत, हे बघायला सुरुवात केली. लायब्ररीत कुणा कोल्हटकर यांचे जुने, जाडजूड पुस्तक दिसले, ते आणून वाचायला घेतले, त्यात अगदी सुरुवातीलाच "अथ योगानुशासनम' या सूत्राच्या विवेचनात पातंजलयोग हा वेदांना अनुसरून आहे, हे सिद्ध करण्याचा खटाटोप बघून जरा साशंक झालो, म्हणजे सूत्रांचा सरळ अर्थ सांगण्यापेक्षा लेखकाला वेदांचे,हिंदूधर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यात जास्त स्वारस्थ्य आहे की काय, असे वाटू लागले, तरी चिकाटीने बराचसा भाग वाचून काढला, त्यातून एवढे समजले, की यापेक्षा चांगले विवेचन केलेले पुस्तक शोधणे क्रमप्राप्त आहे.
पुढील काही वर्षात बीकेएस अय्यंगार, प.वि.वर्तक व अन्य काही लेखकांची पुस्तके वाचनात आली, (गीताप्रेसचा पातंजलयोगावरील वशिष्ठऋषींचा ग्रंथ चाळला, पण घेतला नाही), पण माझ्या मनाचा अगदी ठाव घेतला, तो आचार्य रजनीश यांच्या चार खंडात प्रकाशित प्रवचनांनी.
यात एक एक सूत्र व त्याचा अर्थ असे नसून ही ही सूत्रे समजून घेण्यासाठी आणि जीवनात उतरवण्यासाठी कशी मनोभूमिका असावी, त्यासाठी मनाची मशागत कशी करावी, त्या त्या सूत्राच्या अर्थाचा आवाका किती विस्तृत आहे, त्याच्या कश्या अनेक अर्थछटा आहेत, आधुनिक काळातल्या संशोधनाचा त्याचेशी कसा आणि काय संबंध आहे, असे अनेकअंगी स्वरूप या प्रवचनांचे आहे.
रोज पहाटे एक सूत्र पाठ करण्याचा निश्चय करून चौदा-पंधरा सूत्रांपर्यंत मजल गाठली, पण मग अन्य व्यापात ते मागे पडले. अर्थात सूत्रे पाठ करून काय होणार, ती प्रत्यक्षात उतरवणे महत्वाचे, हे तर खरेच, पण मला या बाबतीत एक अद्भुत अनुभव आला तो असा, की जे सूत्र मी पाठ करायचो, ते त्या दिवशी दिवसरात्र मनात घोळत असायचे आणि दिवसभरातील घडामोडीत त्या सूत्राचा अन्वयार्थ लागत रहायचा. आणि विशेष म्हणजे बहुधा दुसऱ्या दिवशी पहाटे उठताना त्यातील आणखी नवीनच अर्थछटा स्पष्ट व्हायची, आणि अतिशय आनंदात मी जागा व्हायचो.
एकूण फक्त १९७ सूत्रात, आशयाचा अतिशय विस्तीर्ण आवाका असलेला हा ग्रंथ अद्वितीय, अद्भुत आहे. हा समजून घेण्यासाठी नुसते संस्कृत भाषेचे पांडित्य पुरेसे नाही. जीवनाच्या प्रत्येक अनुभवातून यातील मर्म हळूहळू उलगडत जाणे, हे मला याचे वैशिष्ट्य वाटले.
आता पुन्हा नव्या उमेदीने मी हा अभ्यास करू म्हणतो. यावर काही लिहिण्याइतपत लायकी मिळवता आली, तर इथे लिहीन सुद्धा.
__________________________________________________
जिज्ञासूंसाठी: बीकेएस अय्यंगार यांच्या पुस्तकातून प्रत्येक सूत्राच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेउन जोडीला त्यावरील ओशोंचे प्रवचन वाचणे हा सर्वोत्तम मार्ग, असा माझा अनुभव आहे.
_______________________________________________
या विषयावर यापूर्वी मिपावर कुणी लिहिले असल्यास कृपया धाग्याचा दुवा द्यावा.
वाचने
10012
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरं मग?
प्रतिक्रिया
In reply to बरं मग? by शिल्पा ब
मी कुठे काय लिहावं ते मी
In reply to प्रतिक्रिया by नेत्रेश
नेत्रेशभाऊ...
In reply to प्रतिक्रिया by नेत्रेश
मोह आवरला असता तर हा प्रतिसाद
In reply to नेत्रेशभाऊ... by धन्या
पण माझ्या मनाचा अगदी ठाव
>>>>>>>>>>पण माझ्या मनाचा
In reply to पण माझ्या मनाचा अगदी ठाव by यकु
आता निरंतर साधना चालु आहे.... या बद्दल माहिती द्यावी.
In reply to >>>>>>>>>>पण माझ्या मनाचा by विलासराव
ते गौतम बुद्ध याने
In reply to आता निरंतर साधना चालु आहे.... या बद्दल माहिती द्यावी. by चित्रगुप्त
धन्यवाद स्वानंद. मी विपश्यना
In reply to ते गौतम बुद्ध याने by स्वानन्द
" या साधनेचा मुख्य उद्देश आहे
In reply to धन्यवाद स्वानंद. मी विपश्यना by विलासराव
@मनीषा - तुमचे प्रश्न सहाजीक
In reply to " या साधनेचा मुख्य उद्देश आहे by मनीषा
मनीषा
In reply to " या साधनेचा मुख्य उद्देश आहे by मनीषा
विपश्यना शिविर
'आर्ट ऑफ लीव्हिंग' चा अनुभव
In reply to विपश्यना शिविर by चित्रगुप्त