✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आम्रपाली

अ
अरुंधती यांनी
गुरुवार, 04/08/2010 - 01:49  ·  लेख
लेख
आज एक लेख लिहिताना आम्रपालीच्या उल्लेखापाशी नजर थबकली. बौध्द काळातील एक सौंदर्यवती, अभिसारिका, गणिका, नगरवधू आणि तिची ही अनोखी कहाणी! आम्रपालीचा जन्म कोठे झाला, तिचे माता-पिता कोण हे कायम गूढच राहिले. वैशाली नगरीच्या राजप्रासादात ती एका आम्रतरूपाशी ठेवलेली सापडली म्हणून तिचे नाव आम्रपाली! इ.स.पूर्व ५०० चा तो काळ! त्या कालात ही अनाथ कन्या जसजशी मोठी होऊ लागली तसतशी तिच्या अप्रतिम सौंदर्याची, लालित्य, कौशल्य व मोहकतेची ख्याती चारही दिशांना पसरू लागली. प्रतिष्ठित घराण्यांतील अनेक सरदार, नामदार तरुणांना तिचे आकर्षण वाटू लागले. तिच्यावरून वैशाली नगरीत अराजक नको म्हणून मग तिला वैशालीच्या प्रमुख गणिकापदी नियुक्त करण्यात आले. अनेक राजपुरुष, सरदार, धनवान तिच्या महाली पाहुणचार घेत. आपल्या रसरशीत लावण्याने व अदाकारीने आम्रपाली सर्व लब्धप्रतिष्ठितांची हृदये काबीज करत असे. तिच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून वैशालीशी शत्रुत्व असलेल्या मगधाच्या बिंबिसार राजालाही आपले कुतुहल आवरता आले नाही. त्याने वैशालीवर हल्ला केला आणि काही दिवस आम्रपालीच्या महाली पांथस्थाच्या छद्मवेषात आश्रय घेतला. बिंबिसार राजा हा एक उत्तम कलावंत, कलासक्त व संगीतज्ञ होता. बघता बघता बिंबिसार व आम्रपाली एकमेकांच्या प्रेमात पडले. पण जेव्हा आम्रपालीला त्याचे खरे रूप कळले तेव्हा तिने त्याला तिथून जाण्याची व चालू युध्द समाप्त करण्याची विनंती केली. प्रेमात बुडालेल्या बिंबिसाराने खरोखरीच आम्रपालीच्या इच्छेचा मान राखून युध्द संपवले. त्याच्या ह्या कृतीने वैशाली नगरीच्या नागरिकांनी त्याची भ्याड राजा म्हणून हेटाळणी केली. ह्या सर्व प्रकारात आम्रपालीने आपल्या नगरीशी इमान राखले. पुढे आम्रपालीने बिंबिसाराच्या पुत्रास, विमल कौंडिण्यास जन्म दिला. बिंबिसाराचा पुत्र अजातशत्रू याने वैशालीवर कब्जा मिळवून पूर्वीच्या अपमानाचा सूड घेतला. एकदा आम्रपालीने रस्त्यातून एका तेजस्वी, देखण्या बौध्द भिख्खुला इतर भिख्खुंच्या समवेत जाताना पाहिले. असे रूप, असे तेज, असा डौल तिने अद्याप पाहिला नव्हता. बर्‍याच काळाने आम्रपालीच्या हृदयात त्या भिख्खुच्या केवळ दर्शनाने चलबिचल झाली, मनात त्याच्याविषयी अभिलाषा उत्पन्न झाली. तिने त्या भिख्खूला आपल्या महाली भोजनाचे आमंत्रण धाडले. साहजिकच इतर भिख्खूंचा थोडा जळफळाट झाला. ''तो एका क्षुद्र गणिकेच्या घरी कसे काय भोजन करू शकतो?'' त्यांची मने कुरबुरली. काही काळाने तो बौध्द भिख्खु परत येऊन आपल्या साथीदारांना म्हणाला की आम्रपालीने त्याला वर्षाविहारासाठी, म्हणजेच वर्षाकाळात निवास करण्यासाठी आपल्या महाली राहण्याचे निमंत्रण दिले आहे. सर्व बौध्द भिख्खु वर्षाकाळात चार महिने मठांमध्ये किंवा सलग एकाच ठिकाणी निवास करत असत. आम्रपालीचे निमंत्रण त्या तेजस्वी भिख्खूने स्वीकारले नाही. गौतम बुध्दाला विचारूनच, त्याची परवानगी घेऊनच तो हे निमंत्रण स्वीकारेल असे उत्तर त्याने आम्रपालीला दिले. जेव्हा बुध्दाला ह्या आमंत्रणाविषयी कळले तेव्हा त्याने तक्रार करणार्‍या इतर भिख्खूंना गप्प बसवले व त्या तरुण भिख्खूस पाचारण केले. बुध्दाने विचारल्यावर त्या तेजस्वी तरुणाने सर्व वृत्तांत कथन केला व आम्रपालीने आपल्याला वर्षाविहाराचे निमंत्रण दिल्याचेही सांगितले. बुध्दाने काही क्षण त्याच्या डोळ्यांत खोलवर डोकावून पाहिले व त्याला तसे करण्याची परवानगी दिली. इतर उपस्थितांना ह्याने जबर धक्का बसला आणि लवकरच आम्रपाली व बौध्द भिख्खूच्या संदर्भातील अफवांचे पेव फुटले. चार महिने होत आले तसे लोक उत्सुकतेने भिख्खू परत येण्याची वाट पाहू लागले. आणि काय आश्चर्य! भिख्खू परत आला पण त्याच्या पाठोपाठ आम्रपालीही भिख्खुणीच्या वेषात चालत येत होती. तिने गौतम बुध्दाची भेट घेतल्यावर आपण कसे त्या तरुण भिख्खूला भुरळ पाडण्याचा, आकर्षित करण्याचा, अनुरक्त करण्याचा वृथा प्रयत्न केला याचे त्यांच्यापाशी वर्णन केले. बुध्दाने नंतर आपल्या शिष्यांना सांगितले की त्याने तरुण भिख्खूस आम्रपालीच्या घरी राहण्याची परवानगी दिली कारण त्याला त्या भिख्खूच्या डोळ्यांत कसलीही कामवासना दिसली नाही. त्याच्या आत्मभानाने, मनोनिग्रहाने व तेजोबळाने त्याने आपली जागृतावस्था कधीच त्यागली नाही. परिणामवश आम्रपालीचे स्वतःच्या सौंदर्याविषयीचे गर्वहरण झाले व तिला वेगळ्या प्रकारे आयुष्य व्यतीत करण्याची ओढ लागली. अशा प्रकारे संन्यस्त जीवनाकडे आकृष्ट झालेल्या आम्रपालीने बुध्दाला आपल्या प्रासादात भोजनास बोलावले. बुध्दानेही ते आमंत्रण स्वीकारले. त्यानंतर तिने राजगणिकेच्या आपल्या पदाचा त्याग केला व बौध्द धर्म स्वीकारला. बौध्द धर्माच्या प्रसाराचे काम करता करता तिला आत्मसाक्षात्कार झाला. बौध्द संप्रदायात तिच्या योगदानाचे, कार्याचे महत्त्व कायम आहे. वयात आल्यावर विमल कौंडिण्यही बौध्द भिख्खू झाला. आम्रपालीच्या अंबपाली आम्रवनात वैशाली मुक्कामी बुध्द राहायचे आणि तिने पुढे हेच आम्रवन बुध्दांना अर्पण केले. ह्याच ठिकाणी बुध्दांनी प्रसिध्द अंबपालिका सूक्त सांगितले. आम्रपालीच्या जीवनावर आधारित ह्याच नावाचा हिंदी सिनेमा बर्‍याच वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. वैजयंतीमाला व सुनील दत्त ह्यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या. त्यातील एका गाण्याचा हा दुवा : " एक अनोखे आयुष्य जगणारी, सर्व भोगविलास भोगून झाल्यावर जेव्हा आत्मभान येऊ लागले तेव्हा तो प्रवासही धैर्यपूर्वक करणारी, सर्व सुखांचा -मान मरातब - प्रतिष्ठेचा परित्याग करून खडतर वाट पत्करणारी, ज्ञान व भक्तीच्या मार्गात लीन होऊन साक्षात्कारापर्यंत पोहोचलेली, अरहंतपद प्राप्त केलेली ही निश्चयी स्त्री! तिचा हा जीवनप्रवास नक्कीच वेगळा व स्फूर्तीदायी आहे. --- अरुंधती कुलकर्णी http://iravatik.blogspot.com/
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9129 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

अतिशय

प्राजु
गुरुवार, 04/08/2010 - 02:16 नवीन
अतिशय सुंदर लेख.. खूप माहिती पूर्ण. आम्रपालीच्या आणि बिंबीसारच्या प्रेम कहाणी बद्दल माहिती होतं. पण नंतरची बौद्ध भिख्खुंची आणि तिची कहाणी नव्हती माहिती. लेख नक्कीच आवडला. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो,

राघव
Fri, 04/09/2010 - 19:28 नवीन
सुंदर माहिती. अगोदर बिंबिसार व बिंदुसार मधे गोंधळ झाला. पण नंतर गुगलले जरा अन् गोंधळ आवरून घेतला. धन्यवाद! :) राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

+३

गणपा
Fri, 04/09/2010 - 20:21 नवीन
प्राजुताईशी सहमत. सुंदर लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

काय सुंदर

अनामिक
गुरुवार, 04/08/2010 - 02:31 नवीन
काय सुंदर लिहिलं आहे.... बरीच नवीन माहिती कळाली. लेखाचं शिर्षक वाचून पहिले चित्रपट आठवला आणि लगेच "नील गगन की छांव मे' गाणं ओठांवर आलं -अनामिक
  • Log in or register to post comments

छान लेख

धनंजय
गुरुवार, 04/08/2010 - 02:39 नवीन
मागे "वैशाली की नगरवधू" (लेखक : आचार्य चतुरसेन) ही हिंदी कादंबरी वाचली होती, तिची आठवण आली.
  • Log in or register to post comments

ह्या

अरुंधती
Fri, 04/09/2010 - 19:51 नवीन
ह्या कादंबरीतही ही सर्व कहाणी येते की फक्त तिच्या बिंबिसाराबरोबरच्या प्रेमसंबंधांपर्यंतच कहाणी थांबते? मला मिळाली तर ही कादंबरी वाचायला नक्की आवडेल! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

कादंबरीमध्ये ऐतिहासिक कल्पनारंजन

धनंजय
Fri, 04/09/2010 - 20:11 नवीन
अंबपाली भिक्खुणी होईपर्यंतची कथा आहे. त्या काळातली सर्व प्रमुख नावे कुठल्या-ना-कुठल्या कल्पनावेल्हाळ तर्‍हेने कथेत गोवलेली आहेत. गौतम बुद्ध आहेतच. अंबपाली नृत्यप्रवीण म्हणून उदयन तिच्या नाचाबरोबर वीणा वाजवायला (आणि तिच्याशी रत व्हायला) येतो. अजित केसकंबलीचा उल्लेख आहे. अंबपालीच्या जन्मदात्यांचे गूढ आहे. ऐतिहासिक बाबतीत कल्पनाभरार्‍या असल्या, तरी ललित म्हणून... कथानके-उपकथानके-राजखलवते-गुप्तहेर-विषकन्या... एकदम मस्त वाचनीय कादंबरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

हम्म!

अरुंधती
Fri, 04/09/2010 - 20:22 नवीन
हम्म! म्हणजे अंबपालीचा संन्यस्त जीवनकाळ, तिचे नेमके कार्य ह्याविषयी माहिती त्यात नाही. बघते कोठे गुगलून मिळाले तर! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

ललीत लेख

शुचि
गुरुवार, 04/08/2010 - 04:49 नवीन
ललीत लेख मस्तच. :) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण लेख आवडला

बेसनलाडू
गुरुवार, 04/08/2010 - 04:53 नवीन
(वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

मस्त लेख!!!

सुचेल तसं
गुरुवार, 04/08/2010 - 05:01 नवीन
नवीन माहिती मिळाली...
  • Log in or register to post comments

रोज काहीतरी नवीन

संदीप चित्रे
गुरुवार, 04/08/2010 - 06:23 नवीन
शिकायला मिळतं हे शब्दशः खरं आहे ! माहितीपूर्ण लेख आवडला अरूंधती.
  • Log in or register to post comments

छान आहे लेख

चित्रा
गुरुवार, 04/08/2010 - 08:28 नवीन
चित्रेही छान. शिल्पकलेत आंब्याच्या झाडाखालची आणि टेकून उभी असलेली यक्षीदेखील प्रसिद्ध आहेत, कदाचित या कथेवरून अशा प्रतिमा तयार केल्या असतील असे वाटले. किंवा आंब्यांच्या झाडांना तसेही खूप अधिक महत्त्व आले असेल.
  • Log in or register to post comments

छान

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 04/08/2010 - 08:38 नवीन
विश्वामित्र - मेनकेच्या ष्टोरीत मेनकाच नंतर ऋषीण होउन तपाला बसली आहे असे इंद्राला कळल्यावर त्याला काय धक्का बसेल अशी कल्पना करत होतो प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

अतिशय सुन्दर

चित्रगुप्त
गुरुवार, 04/08/2010 - 11:03 नवीन
अतिशय सुन्दर.... या गाण्यातील "दिल पंछी बन उड जाता है" च्या वेळचे वैजयंतीमालाचे विभ्रम अविस्मरणीय.... वाचून जुन्या आठवणी ताज्या झाल्या... खूप वर्षांपूर्वी शाळकरी वयात इंदूरच्या रीगल थेटरात आम्रपाली सिनेमा लागला होता, वैजयन्तीमालाचे भव्य कट-आउट बॅनर बघायला मुद्दाम जायचो... हा सिनेमा "प्रौढांसाठी" होता कि काय हे आठवत नाही, पण तेंव्हा खूप आकर्षण असूनही बघितला नव्हता.... गाणी मात्र अविस्मरणीय.... अलिकडे सीडी घेउन हा सिनेमा बघितला, गाणी अप्रतीम पण सिनेमा सामान्य वाटला.. यातील आणखी काही गाणी... http://www.youtube.com/watch?v=d_oRnqUxM5I&feature=related http://www.youtube.com/watch?v=7LRKOm8Lp-M&feature=related
  • Log in or register to post comments

इतर

अरुंधती
गुरुवार, 04/08/2010 - 15:00 नवीन
इतर गाण्यांच्या लिंक्स बद्दल धन्यवाद! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

आम्रपाली

बद्दु
गुरुवार, 04/08/2010 - 11:49 नवीन
आम्रपाली हे नावच इतके मधुर आहे की नुसत्या नावानेच मनात विविध असे झन्कार उठतात..काही काही नावातच ही जादू असते जसे प्राजक्ता, मानसी, सोनाली, अबोली, अंजली, प्रांजली..नुसत्या नावाचा उचार ही किती गोड वाटतो..असो...(ह्म्म....गेले ते दिवस).. बाकी माहिती छान आहे..चालू द्या...
  • Log in or register to post comments

छान!

स्वाती दिनेश
गुरुवार, 04/08/2010 - 12:19 नवीन
माहितीपूर्ण लेख आवडला, स्वाती
  • Log in or register to post comments

प्रतिसादा

अरुंधती
गुरुवार, 04/08/2010 - 15:10 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वाचन-लेखन

मीनल
गुरुवार, 04/08/2010 - 18:06 नवीन
तुमचं वाचन अगाध आहे. म्हणूनच तुम्ही विविध विषयावर माहिती छान संकलन करून लिहू शकता. ओरिजनल अनुभवाचे लेख ही वाचनीय असतात. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त

रामची आई
गुरुवार, 04/08/2010 - 18:40 नवीन
खुप छान माहिती
  • Log in or register to post comments

वेगळेच

रेवती
गुरुवार, 04/08/2010 - 20:34 नवीन
वेगळेच लेखन! माहितीपूर्ण आहे. धन्यवाद! रेवती
  • Log in or register to post comments

सुंदर लेख!

यशोधरा
गुरुवार, 04/08/2010 - 20:59 नवीन
सुंदर लेख!
  • Log in or register to post comments

सुरेख लेख...

मदनबाण
Fri, 04/09/2010 - 09:33 नवीन
सुरेख लेख... :) नविन माहिती मिळाली. सिद्धार्थ ते गौतम बुद्ध हा प्रवास अलौकीकच आहे. मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments

सर्वांचे धन्यवाद!

अरुंधती
Fri, 04/09/2010 - 15:12 नवीन
मीनल, रामची आई, रेवती, मदनबाण, यशोधरा.... सर्वांचे प्रतिसादाबद्दल हार्दिक आभार! मला अतिशय आवडणारा हा इतिहासातील काळ आहे.... त्यातील आम्रपालीसारख्या वेगळ्या व्यक्तिरेखेचे, तिच्या जीवनप्रवासाचे वर्णन करण्याचा हा फार त्रोटक प्रयत्न केलाय! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

उत्तम

तिमा
Fri, 04/09/2010 - 19:02 नवीन
आम्रपाली सिनेमा बघितला होता. पण एवढी माहिती एका ठिकाणी मिळणे अवघड! तुम्ही फार उत्तम लेख लिहिला आहे.धन्यवाद. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

नवीन

आवशीचो घोव्
Sun, 04/11/2010 - 13:21 नवीन
नवीन माहिती मिळाल्याबद्दल आपले आभार!!!
  • Log in or register to post comments

व्वा...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/12/2010 - 09:30 नवीन
माहितीपूर्ण लेखन आवडले...! और भी आने दो...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आदर दुणावला. कधी एकत्र येणे शक्य आहे काय ?

शशिकांत ओक
Tue, 04/13/2010 - 22:15 नवीन
अरुंधती जी, आपले सर्वच लेख फार उत्तम आहेत. कन्ननड कवियत्री व औलिया अक्कांच्या जीवनातील प्रसंग वाचून स्त्री वा पुरुष असा भेद आत्मज्ञानींसाठी करता येत नाही. त्यांना सांसारिक बंधने लागू होत नाहीत. आदि आपली विधाने मला पटली. आपण नाडी ग्रंथांच्या बाबत केले भाष्य व शोधकार्यास पुढाकार घेण्यासाठी प्रकाशांना केलेली विनंती वाचून आपल्या बाबतचा आदर दुणावला. धन्यवाद. आपण पुण्यात असाल तर कधी एकत्र येणे शक्य आहे काय ? माझा मो. नंबर ९८८१९०१०४९ नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत
  • Log in or register to post comments

सुंदर...... आज

डावखुरा
Tue, 04/13/2010 - 23:50 नवीन
सुंदर...... आजची संध्याकाळ सार्थकी लाग्ली..... पहिल्यांदाच पाहीले...आता आम्रपाली पुर्ण पहावा लागणार आहे... धन्यवाद..."राजे!"
  • Log in or register to post comments

आम्रपालीशी संबंधित एक कविता वाचल्याचं आठवत होतं..

बहुगुणी
Wed, 04/14/2010 - 07:59 नवीन
"Men usually do..." इथपासून सुरु झालेला interesting प्रवास अखेर कुठे जाऊन पोहोचतो त्याचं मार्मिक वर्णन करणारी ही कविता जालावर इथे वाचायला मिळाली, कवी/कवयित्री कोण आहे ते कळलं नाही, तुम्हाला कोणाला माहित असेल तर त्याची/तिची योग्य नोंद घेता येईल. सर्वांना इथेच आनंद घेता यावा म्हणून ती कविताच खाली देतो आहे: I was brought up by foster parents Yet I received more love than unorphaned children. My childhood was a bed of roses – The stuff dreams are made of. But I never forgot two things- That I was born out of wedlock That I was abandoned at birth. I presumed that a man had ditched my mother Men usually do. I fell in love ! I fell in love ! We were to get married. The Council decreed otherwise. That was their norm. A beautiful woman cannot be for one man’s pleasure. She must be married to the city of Vaishali. They envied a man who had a beautiful lover Men usually do. So I became a courtesan. But I extracted my pound of flesh. A couple of palaces , My personal guards , All expenses paid by the state , Leave , with provision to accumulate. They capitulated before the demands of a beautiful woman Men usually do. Then the parties began. They said that they came for the wine , For the music and the dancing , For ‘ intellectual companionship ‘. But they flashed their lust Men usually do. Bimbasara , the King of Magadha , Invited me to his bed. Magadha will give you more than Vaishali ever can. I spurned his advances – His armies laid siege on Vaishali. Rejected , he reacted like a child dispossessed Men usually do. The parties stopped , the pomp died down. My customers were daily going to their death. I could be their saviour , and I knew This would wound their honour and their pride. So I cast the final die- To emasculate the men of Vaishali and Have the King of Magadha on his knees. "If out of our union I conceive And if I give birth to a boy Then he will be your heir. If you consent to this then , Bimbasar , Come disguised to my chamber And instruct your armies to leave Vaishali." He signed away his wealth for a roll in the hay Men usually do. The deed was done The siege was lifted. I concieved. I chose to encash my accumulated leave And closed shop. There were rumours and stories And fretting and fuming But nothing could be done. The men went back to their wives Men usually do. For nine months I pondered who the target of my revenge was. Bimbasar , the men of Vaishali and/or all malekind. Nine nerve racking months without any answer. A boy was born - Bimbasar kept his promise. Then Gautam Buddha came to Vaishali. The evils lie in ones desires he said. Take refuge in me. Take refuge in duty. Take refuge in the monastic order. And you will be free from the tempest within your soul. I shaved my locks and donned the saffron robes. I finally met a man Who gave without asking for anything in return Men seldom do.
  • Log in or register to post comments

हेमा मालिनी ने Women of India या नावाने केलेली दूरदर्शन मालिका..

बहुगुणी
Wed, 04/14/2010 - 09:34 नवीन
...आहे, ज्यात आम्रपालीची कथा आहे: ""
  • Log in or register to post comments

बहुगुणी,

अरुंधती
Wed, 04/14/2010 - 13:19 नवीन
बहुगुणी, कविता व व्हिडियो लिंकबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

ललित लेख उत्तम

वाहीदा
Wed, 04/14/2010 - 16:58 नवीन
पण माझ्या माहीती नुसार बिम्बिसार अन आम्रपाली त्यांचा आणखिन एक पुत्र होता जीवक नावाचा जो पुढे एक प्रख्यात चिकित्सक अन राजवैद्य झाला बिम्बिसार च्या ५00 राण्या होत्या त्यातील एक आम्रपाली . बिम्बिसार ला एक कूटनीतिज्ञ आणि दूरदर्शी शासक मानले जाते. अजातशत्रु ने आपल्या वडिलांची बिम्बिसार ची हत्या करून राजगादी मिळविली होती . बिहार चा इतिहास रोचक आहे खरा ! शाळेत असताना कोणीतरी एक पुस्तक दिले होते तेव्हा वाचला होता आता जास्त आठवत नाही तुझ्या लेखा मुळे थोडे आठविले :-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

वाहिदा,

अरुंधती
गुरुवार, 04/15/2010 - 13:45 नवीन
वाहिदा, माझ्याकडे व नेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जीवक हा राजवैद्य होता, पण तो आम्रपालीचा पुत्र नव्हता. असो. जीवकाने गौतम बुध्दाच्या जखमांवर मलमपट्टी केल्याचे उल्लेख आहेत. आम्रपालीविषयी बर्‍याच आख्यायिका आहेत, त्यामुळे ही आख्यायिकाही असू शकते. तिच्या आयुष्याविषयी बौध्दांच्या ''खुद्दनिकाय'' मधील थेरीगाथेत (बौध्द भिक्षुणींनी रचलेल्या व गायलेल्या कविता/रचना) आम्रपालीचे चरित्र येते. बिंबिसाराच्या बर्‍याच राण्या होत्या हे मात्र बरोबर आहे. अजातशत्रू त्याचा मुलगा आणि ह्याच मुलाच्या हाती त्याचा अत्यंत क्रूर, निष्ठुर शेवट झाला. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

रोचक...

मन१
Mon, 07/16/2012 - 21:21 नवीन
बोधप्रद.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा