Skip to main content

गोष्ट छोटी डोंगरा एवढी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 24/10/2009 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो मरणार्‍या शेतकर्‍याला एक लाख देता, त्यापेक्षा शेतकर्‍याला जगण्यासाठी पंधरा - विस हजार द्या". कसे वाटले वाक्य ? खरेतर हा आहे संवाद (डायलॉग) तो पण निळु फुलेंच्या तोंडी. चित्रपटाचे नाव 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी'. ह्या आणी अशा अनेक शेतकर्‍याची सत्य परिस्थीती विशद करुन सांगणार्‍या संवादांनी आणी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट. शेतकर्‍याच्या खर्‍या अडचणी काय आहेत ? शेतकर्‍यावर आत्महत्या करायची वेळ का येते ? सात बार्‍यावरच्या कर्जाच्या नोंदी, सर्कारी बियाणे वाटपाची खरी परिस्थीती, शेतकर्‍यासाठी म्हणुन मिळणारे कर्ज आणी ते मिळवताना येणार्‍या अडचणी, संबंधीत लोकांनी केलेली अडवणुक सगळे अगदी काळजाला हात घालणारे. शेतकर्‍याच्या प्रश्नाला वाचा फोडणारे म्हणुन बरेच चित्रपट येउन गेले आणी येतील, पण बळीराजाच्या खर्‍या प्रश्नांची आपल्यासमोर मांडणी करणारा चित्रपट म्हणुन 'गोष्ट छोटी डोंगरा एवढीची' दखल निश्चीतच घ्यावी लागेल. कथेची उत्कृष्ट मांडणी आणी त्याला कलाकारांच्या अभिनयाची तेव्हडीच मिळालेली अप्रतिम साथ हे ह्या चित्रपटाचे वैशीष्ठ्य म्हणता येईल. भरत जाधव आणी मकरंद अनासपुरेचा चित्रपट म्हणले की आजकाल पळुनच जावेसे वाटत होते, अशावेळी मकरंद अनासपुरेचा ह्या चित्रपटातील संयत अनुभव अत्यंत सुखावुन जातो. मकरंदनी नेहमीप्रमाणेच अतिशय समजुन उमजुन हि भुमीका केली आहे. कारकिर्दीत त्याला मिळालेली एक आव्हानात्मक भुमीका असा हिचा उल्लेख करायला हरकत नाही. नागेश भोसले हा असाच अजुन एक ताकदीचा अभिनेता. देहबोली आणी आवाजाचा पुरेपुर फायदा कसा उठवावा हे ह्या अभिनेत्याकडुन शिकुन घ्यावे. ह्या चित्रपटात त्यानी मकरंदच्या गरीब शेतकरी मित्राची भुमीका साकारली आहे. कुटुंबासाठी धडपडणारा, पैशाची कायमच अडचण असतानाही शहरातुन आपला मित्र मकरंद आलेला बघुन त्याच्यासाठी श्रिखंड आणणारा, कर्जाच्या डोंगराखाली बैल विकावा लागल्यावर स्वत:ला नांगराला जुंपणारा नागेश भोसले काळजात घर करुन जातो. शेवटी हालाखीच्या परिस्थीतीमुळे आणी कर्जाच्या डोंगराखाली हा नागेश भोसले किटकनाशक पिउन आत्महत्या करतो तो प्रसंग तर डोळ्यात पाणी आणणारा. रात्री उशीरा अडखळत परत आला म्हणुन बायकोची आणी मित्राची बोलणी खाताखाता, "दारु पिउन आला का?" विचारल्यावार नागेश भोसले म्हणतो "दारु नाही, किटकनाशक प्यायलोय..." बास, संपुर्ण थेटरच आपल्या डोळ्याभोवती गरकन फिरल्यासारखे वाटते. शेतकर्‍याला कर्जासाठी, सरकारकडुन होणार्‍या बियाणे पुरवण्यासाठी वेळोवेळी कसे नाडले जाते, प्रत्येक ठिकाणी टेबलाखालच्या पैशासाठी कशी अडवणुक होते, पावसाचा लहरीपणा, २२/२२ तास गायब असणारी विज ह्या सगळ्याचे विदारक चित्र दिग्दर्शकाने साकारले आहे. चिकुच्या मिळालेल्या ५/- रुपायाच्या सरकारी चेकसाठी ५००/- पेक्षा जास्त पैसे भरुन बॅंकेत शेतकर्‍याला खाते उघडावे लागते हि माहिती ऐकुन तर डोक्याला हात लावायची पाळी येते. शेवटी जेंव्हा मकरंद अनासपुरे "एक माणुस म्हणून तरी शेतकर्‍याचे अस्तीत्व मान्य करा" असे कळवळुन म्हणतोना तेंव्हा कुठेतरी आपल्याला आपणच गुन्हेगार असल्यासारखे वाटायला लागते. मकरंद अनासपुरे, कै. निळुभाउ फुले, नागेश भोसले, सयाजी शिंदे, माधवी जुवेकर, मधु कांबीकर अशा उत्तमोत्तम ताकदीच्या कलाकारांचा सुंदर अभिनय ह्या चित्रपटाची जमेची बाजु आहे. चित्रपटात अधुन मधुन वाजणारे शिर्षक गीत मात्र डोक्यात जाते येव्हडाच काय तो चंद्रावर डाग म्हणायचा. आधी हा उपदव्याप अजय - अतुल ह्या संगितकारांचा(?) असावा असे वाटत होते पण नंतर तो शैलेंद्र बर्वे ह्या संगीतकाराचा आहे असे जालावर शोध घेता कळाले. एकुणच बळीराजाचे खरे वास्तव जाणुन घेण्यासाठी हा चित्रपट निश्चीतच पहा.

वाचने 4759
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

चांगले परिक्षण. कै. निळुभाउ फुले यांचा हा शेवटचा सिनेमा की काय?सिनेमा यादीमधे टाकला आहे.

चांगले परिक्षण. कै. निळुभाउ फुले यांचा हा शेवटचा सिनेमा की काय?सिनेमा यादीमधे टाकला आहे.

In reply to by सहज

असेच म्हणतो. पहावा लागेल एकदा तरी हे नक्कीच. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by सहज

होय, निळूभाऊंचा शेवटचा सिनेमा हा! (सत्य असलं तरीही कै. वाचवत नाही.) लवकरात लवकर हा चित्रपट पहायलाच हवा. अदिती

सुंदर परिक्षण -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

भयानक वास्तववादी चित्रपट! बघितल्यावर एकदम सुन्न होऊन गेले होते.

In reply to by वेदश्री

भयानक वास्तववादी चित्रपट! बघितल्यावर एकदम सुन्न होऊन गेलो होतो . --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by प्रभो

हेच म्हणतो --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

परा छान परिक्षण (बर्‍याच दिवसानी लिहिता झालास ) . पहायला हवा. पण एक्कदे कुठे मराठी सिनेमे लागणार त्यामुळे नेटावर येईपर्यंत वाट पहावी लागणार..

अप्रतिम सिनेमा व उत्कृष्ट परीक्षण. प्रत्येकाने जरुर पहावा असा चित्रपट! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

श्री राजकुमार, मराठीतील चित्रपटांचे परीक्षण मराठी संकेतस्थळांवर दुर्मीळ झाले होते. ती उणीव तुमच्या नेटक्या परीक्षणाने भरून निघाली. टॉरंट फाइल डाउनलोड (चोरीच ती) न करून थेटरात जाऊन चित्रपट पाहणे मसंवरचे चित्रपटपरीक्षक विसरले आहेत असेच वाटत होते. पण तो समजही तुमच्या परीक्षणाने दूर झाला.

नुकताच पाहिला, बराचसा चांगला आहे. जाणवलेली मुख्य त्रुटी म्हणजे खूप काही/सगळेच सांगायचे असल्याने जे काही सांगायचे आहे त्याला पूर्ण न्याय देता आलेला नाही. कथेचा शेवट, कॄषीमंत्र्यांचे अपहरण वगैरे थोडे अतिरंजक. जमेची बाजू म्हणजे सिनेमाटोग्राफी, ताकदवान अभिनय - विशेषतः माधवी जुवेकर (माली). ही अत्यंत गुणी अभिनेत्री आहे. मकरंदचे (राजाराम पवार) काम वेगळे आणि नेहमीचे अंगविक्षेप आणि हेल टाळून केलेले (कदाचित भूमिकेची तशीच मागणी असल्याने). नागेश भोसले (नंदू)ही अतिशय गुणी अभिनेता;पण या चित्रपटात त्याच्यातल्या दिग्दर्शकाने त्याच्यातल्या अभिनेत्यावर बर्‍यापैकी अन्याय केला आहे, असे वाटले.सयाजी शिंदेचे काम फार सामान्य;किंबहुना ही व्यक्तिरेखा त्याच्यातल्या अभिनेत्यासाठी साजेशी नाही, असे वाटले. एकंदर शेतकर्‍यांच्या समस्यांना तोंड फोडण्यात चित्रपट बर्‍यापैकी यशस्वी ठरलाय असे मात्र नक्कीच सांगता येईल. (प्रेक्षक)बेसनलाडू

परा, मस्त परिक्षण रे...! 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी' माझ्या दृष्टीने मध्यंतरालाच संपतो. चित्रपटातील मंत्र्याचा प्रसंग आणि मूळ समस्यावरील उपचार... कै च्या कैच. मात्र चित्रपट सर्वांनी पाहावा असा आहेच. -दिलीप बिरुटे