मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राष्ट्रपतींचे डबे

पराग१२२६३ · · जनातलं, मनातलं
Presidential Saloon भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यावर डॉ. राजेंद्र प्रसाद सार्वभौम भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यावेळी राष्ट्रपतींसाठी रेल्वेचा खास डबा असावा असा विचार पुढे आला नव्हता. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव विमान प्रवासाऐवजी रेल्वे प्रवास करण्याचा सल्ला त्यांना त्यांच्या डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर स्वातंत्र्यापूर्वी भारताच्या गव्हर्नर-जनरलसाठी तयार केल्या गेलेल्या खास डब्यांचा वापर डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या दौऱ्यासाठी केला जाऊ लागला. ब्रिटिश राजवटीच्या काळात तो डबा भारताच्या गव्हर्नर-जनरलसाठी एकोणिसाव्या शतकात तयार करण्यात आला होता. गव्हर्नर-जनरल जेव्हाजेव्हा भारताच्या कोणत्याही भागाचा दौरा करत असे, त्यावेळी तो त्या खास डब्याच्या विशेष गाडीतून जात असे. 1911पर्यंत दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अखंड भारताची राजधानी कोलकत्याहून सिमल्याला स्थानांतरित केली जात असे. त्यामुळे गव्हर्नर-जनरलबरोबरच अन्य महत्वाचे ब्रिटिश उच्चाधिकारी आणि सर्व सरकारी दफ्तरही ‘हावडा-कालका मेल’ने (सध्याची नेताजी एक्सप्रेस) कोलकत्याहून सिमल्याला जात असे. त्याच गाडीला गव्हर्नर-जनरलसाठीचा खास डबा त्यावेळी जोडला जात असे. स्वातंत्र्यानंतर भारताच्या राष्ट्रपतींकडून दौऱ्यासाठी रेल्वेगाडीचा वापर वाढू लागल्यावर त्यांच्यासाठी मुंबईतील माटुंग्याच्या कार्यशाळेत 1956 मध्ये खास दोन डब्याचा सेट (Presidential Saloon) तयार केला गेला. हे दोन डबे आणि अन्य डबे मिळून तयार करण्यात आलेली ‘राष्ट्रपती विशेष’ रेल्वेगाडी दौऱ्यासाठी निघत असे. त्या खास दोन डब्यांमध्ये भोजनकक्ष, भेटीगाठींसाठीचा कक्ष, एक संमेलन कक्ष आणि राष्ट्रपतींचा शयनकक्ष असे राष्ट्रपतींसाठीचे खास कक्ष होते, जे अतिशय आरामदायी आणि वातानुकुलित होते. त्या डब्यात त्यांचे छोटेखानी कार्यालयही (स्टडी) होते. दुसऱ्या डब्यात स्वयंपाकघर होते. प्रवासाच्यावेळी राष्ट्रपतींबरोबर असणारे त्यांचे सचिव आणि कर्मचारी यांच्यासाठीही वेगवेगळे कक्ष त्या डब्यात होते. मजबूत, टिकाऊ लाकडाचा वापर करून बांधण्यात आलेल्या या डब्यांच्या अंतर्गत सजावटीसाठी उंची लाकूड आणि रेशमी कापड वापरण्यात आले होते. त्यात आकर्षक दिवे लावलेले होते. त्यामुळे ते विशेष डबे चालते-फिरते राष्ट्रपती भवनच बनले होते. राष्ट्रपतींसाठीच्या त्या खास डब्यांना 9000 आणि 9001 असे खास क्रमांक देण्यात आले होते. सत्तरच्या दशकापर्यंत प्रत्येक राष्ट्रपती नियमितपणे करत असत. प्रत्येक राष्ट्रपती आपला कार्यकाळ संपल्यावर या डब्यांमधून नवी दिल्लीहून आपल्या गावी जात असे. अशा प्रकारे या खास डब्यांचा शेवटचा वापर 1977 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. फकरुद्दीन अली अहमद यांनी केला होता. त्याच वर्षी अधिकृत दौऱ्यासाठी त्या खास डब्यांचा वापर डॉ. नीलम संजीव रेड्डी यांनी केल्यानंतर अनेक वर्षे ते डबे नवी दिल्ली स्टेशनवर वापराविना तसेच उभे होते. हा वापर बंद होण्यासाठी राष्ट्रपतींची सुरक्षा आणि संचालनविषयक अन्य बाबी कारणीभूत ठरल्या होत्या. मात्र त्या काळातही त्या डब्यांची नियमित देखभाल होतच राहिली. 1977 नंतर थेट 2003 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपतींसाठीच्या खास डब्यांमधून प्रवास केला. त्या वर्षी 30 मे रोजी त्यांनी बिहारमधील हरनौत येथे रेल्वेच्या एका कार्यक्रमासाठी जाण्यासाठी पाटणा ते हरनौत असा 60 किलोमीटरचा आणि त्यानंतर काही दिवसांनी चंदिगड ते नवी दिल्ली असासुद्धा प्रवास केला होता. त्यावेळी या डब्यांचे आधुनिकीकरण करून त्यात उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवेसारख्या आधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. तरी ते डबे 1956 मध्ये तयार करण्यात आलेले असल्यामुळे त्यांचे आयुर्मान संपले होतेच; शिवाय त्यांचे आणखी आधुनिकीकरण करणेही शक्य नव्हते. तसेच आजच्या काळात ते अधिक गतीने धावू शकणार नव्हते. या सगळ्या तांत्रिक बाबी विचारात घेऊन 2008 मध्ये ते डबे सेवेतून काढून टाकण्यात आले. राष्ट्रपतींसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विशेष रेल्वे डबे बांधण्याचा प्रस्ताव 2017 मध्ये विद्यमान राष्ट्रपतींच्या समोर ठेवण्यात आला होता. पण राष्ट्रपतींकडून त्याला मंजुरी मिळू शकली नाही. त्या दोन डब्यांसाठी सुमारे 8 कोटी रुपये खर्च येणार होता. मात्र पुढे हा विचार मागे पडला. राष्ट्रपतींसाठी 1956 मध्ये खास बांधण्यात आलेल्या डब्यांची जोडी आता दिल्लीतील राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयात ठेवण्यात आलेले आहेत. Link https://avateebhavatee.blogspot.com/2022/07/blog-post.html

वाचने 7912 वाचनखूण प्रतिक्रिया 24

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

तुषार काळभोर गुरुवार, 07/21/2022 - 17:09
+२ अवांतर : सुरक्षेच्या दृष्टीने, अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी रेल्वे हे कदाचित सर्वात असुरक्षित वाहतुक साधन असावे.

In reply to by यश राज

पराग१२२६३ Fri, 07/22/2022 - 11:59
वापर थांबला असला तरी हे डबे इतकी वर्ष नवी दिल्ली स्थानकावर 'राष्ट्रपतींच्या प्रवासासाठी केव्हीही तयार' अशा स्थितीत उभे असायचे. पण तरीही सामान्य लोकांच्या नजरेपासून दूरच असायचे. मी अलिकडे दिल्लीला गेलो होतो, तेव्हा मला पहिल्यांदाच प्रत्यक्षात पाहता आले, बाहेरून. तोपर्यंत त्याबद्दल फक्त ऐकलं होतं आणि एखादाच फोटो पाहायला मिळाला होता.

कंजूस गुरुवार, 07/21/2022 - 16:10
आता कोणत्यातरी राज्याने असे चांगले डबे राज्यपालांसाठी बांधून इतर राज्यांना वेळप्रसंगी देऊ करावेत. या निमित्ताने गुजरातध्ये काठियावाडात ( पूर्वीचे प्रचलित नाव) गोंडाल संस्थानिकांनी दोन डबे बनवून घेतले होते आणि ते कुठे जायचे झाल्यास ते डबे तिकडच्या रेल्वेस जोडून घेत. गोंडाल संस्थान।विडिओ लिंक

In reply to by कंजूस

पराग१२२६३ Fri, 07/22/2022 - 12:02
असे बऱ्याच संस्थानिकांचे डबे होते. त्यापैकी काही डबे देशभरातील वेगवेगळ्या संग्रहालयांमध्ये पाहायला मिळतात. कोल्हापूरच्या छत्रपतींचाही विशेष डबा होता.

In reply to by कंजूस

अनिंद्य Sat, 07/23/2022 - 14:45
राजकोट ते वेरावल एकदा नॅरोगेजच्या प्रथम दर्जाने (superior first class ) प्रवास करायला मिळाला होता मला, खूप पूर्वी. संपूर्ण लाकडी / शिसवी कोच, राजेशाही सजावट, एकूण बर्थ ४, प्रवासी दोनच - मी आणि तिकिटमास्तर. संथ गती, अगणित थांबे, अपूर्व अनुभव ! सौराष्ट्र-काठियावाड भागात एकूणच सर्व जुनी पिटुकली रेल्वे स्थानके फारच सुंदर, हवेशीर आणि स्थापत्यदृष्ट्या उच्च दर्जाची दिसली. आता काय परिस्थिती आहे माहित नाही.

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 07/21/2022 - 18:36
राष्ट्रपतींसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विशेष रेल्वे डबे बांधण्याचा प्रस्ताव 2017 मध्ये विद्यमान राष्ट्रपतींच्या समोर ठेवण्यात आला होता. पण राष्ट्रपतींकडून त्याला मंजुरी मिळू शकली नाही. त्या दोन डब्यांसाठी सुमारे 8 कोटी रुपये खर्च येणार होता. चंगळवादी प्रधानसेवक मोदींसाठी ८ हजार करोडचं विमान परवडतं. पण राष्ट्रपतींसाठी ८ कोटीही नाही??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस गुरुवार, 07/21/2022 - 19:00
आणि ते फक्त प्रधानसेवक मोदींसाठीच राखून ठेवलेलं असतं का? फोटो/बातमी टाका. राष्ट्रपती विमानाने जातात तेव्हा त्यांच्या विमानाच्या डावीकडे,उजवीकडे सुरक्षा रक्षक विमानेही उडत असतात का?

In reply to by प्रसाद_१९८२

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 07/21/2022 - 19:37
विमान, मोदी घरी घेऊन जातील कि कसे ? राष्ट्रपती ईंजीनाचा डब्बा घरी नेणार होते का?

In reply to by विजुभाऊ

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 07/21/2022 - 19:38
मागे खेळन्यांवरील लेखात संपादक, पोपट असा पांचट विनोद आपणच केलेलात ना? तेव्हा कुठे गेला होतं हे प्रवचन?

अनिंद्य Fri, 07/22/2022 - 11:12
छान माहिती. प्रचंड सुरक्षा आणि जामानिमा घेऊन प्रवास करणाऱ्या अतिविशिष्ट व्यक्तींनी रेल्वेमार्ग आता वापरू नये असे वाटते. भूमार्गाने सुद्धा प्रवास करणे टाळावे, शहरातले रस्ते वाहतुकीसाठी बंद करून त्यावर हजारो पोलीस उभे ठेवणे वगैरे.. त्यापेक्षा सरळ विमान/ हेलिकॉप्टर वापरावे असे वाटते. एकूण खर्च बघता तो सेमच असावा दोन्ही पर्यायांसाठी.

In reply to by अनिंद्य

कंजूस Sat, 07/23/2022 - 07:33
फास्ट इंटरनेट युग आलंय ना? विडिओ कॉल्स, कॉन्फ्रन्स कॉल्स करावेत. जे काही बोलणार ते उघड सर्वांसाठीच असणार आहे त्यासाठी वापरता येईल.