ती एक न उलगडलेलं कोडं होती. एक अधुरी राहून गेलेली कविता होती. तीन दशक..., जवळजवळ तीन दशके तीने आपल्या नजाकतभर्या , मादक स्वरांच्या जोरावर रसिकांच्या मनावर अनभिषीक्त साम्राज्य गाजवलं.
तिच्यावर हिंदी सिनेसृष्टीबरोबरच तिच्या नशिबाने, तसेच जवळच्यांनीही खुप अन्याय केलेला आहे.
'सुजाता' मध्ये एक गाणं आहे. 'तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार!"
सचीनदेव बर्मन यांनी हे गाणं तिच्याबरोबरच आशाबाईंकडुनही गाऊन घेतलं होतं. ऐनवेळी सचीनदांनी तिच्या आवाजातलं गाणं फायनल केलं. पण रेकॉर्ड बनवताना ग्रामोफोन कंपनीला 'आशाबाईंचं' नाव चुकून पाठवलं गेलं. आणि त्यानंतर जवळ जवळ सत्तावीस वर्षे हे गाणं आशाबाईंच्याच नावाने वाजत राहीलं. बर्याच वर्षांनी अमेरिकन रेडीओने घेतलेल्या एका मुलाखतीत तिथल्या निवेदकाने आशाबाईंना हे गाणं ऐकवलं आणि विचारलं ," हे गाणं कुणी गायलय? हा कुणाचा आवाज आहे?"
आशाबाईचं उत्तर होतं...
"गीता दत्त!"
एखादं गाण्याचं श्रेय, मुळ गायिका जिवंत असताना सत्तावीस वर्षे दुसर्याच गायिकेला मिळण्याचं हे एकमेव उदाहरण असेल.
'कागज के फुल' साठी गुरुदत्तने तिच्याकडून एक गाणं गाऊन घेतलं होतं. 'वक्तने किया..क्या हंसी सितम, हम रहें ना हम्....तू रहें ना तू..!" जणु काही या गीतातून 'गीता दत्त'ची वेदनाच व्यक्त झाली होती. गीताच्या बाबतीत काळाने खरंच खुप मोठा अन्याय केला आहे, तिच्या हयातीत आणि तिच्या मृत्युनंतरही. तीचं प्रचंड गाजलेलं, पहीलं लोकप्रिय गाणं होतं..." मेरा सुंदर सपना बीत गया" ...
ते गीत गाताना तिला तरी कुठे माहीत होतं की ही वेदना यापुढे आयुष्यभर आपली सोबत करणार आहे. १९७२ च्या जुलैमध्ये म्हणजे जवळ जवळ ४० वर्षांपूर्वी गीताने या आभासी जगाचा शेवटचा निरोप घेतला. पण आजही तिचे अस्तित्व तिच्या गाण्यातुन जाणवत असते. कुठे ना कुठे, एखादा रेडीओ , एखादा टेपरेकॉर्डर आर्तपणे तिची वेदना आळवत असतोच...
‘वक्त ने किया क्या हँसीं सितम, तुम रहे न तुम, हम रहे न हम... ( http://youtu.be/MZ3S4-bm70s )
सर्वात आधी गीता दत्तचे सुर कानावर आले ते १९४६ साली आलेल्या 'भक्त प्रल्हाद' या चित्रपटातील काही गाण्यांमध्ये. पण यात तिचा वाटा कोरसमधल्या दोन ओळींचा होता फक्त. त्यामुळे गीता दत्त (त्यावेळची गीता रॉय) पडद्यामागेच राहीली. १९४७ मध्ये गीताला महत्त्वाचा ब्रेक मिळाला. चित्रपट होता 'दो भाई' . या चित्रपटाने हिंदी सिनेसृष्टीला एका जबरदस्त ताकदीच्या गायिकेची ओळख करुन दिली. गंमत म्हणजे या चित्रपटात गीताने गायलेल्या गाण्याने सचीनदांनाही स्वत:ची अशी एक नेमकी ओळख मिळवून दिली. हे गाणं होतं...."मेरा सुंदर सपना बीत गया..."
राजा मेहंदी अली खान यांनी लिहीलेल्या या गाण्याने गीता दत्तला लोकप्रियतेचा उच्चांक गाठुन दिला.
मेरा सुंदर सपना बीत गया...
मै प्रेम में सब कुछ हार गयी
बेदर्द जमाना जीत गया..
मेरा सुंदर सपना बीत गया ( http://youtu.be/zaka9-uC0S4 )
जणु काही गीताचं भवितव्यच या गाण्याने सांगितलं होतं. या गाण्यातली वेदना पुढे आयुष्यभर तिची साथसंगत करत राहीली. सांप्रत काळात बांग्लादेशाचा भाग असलेल्या फरीदपुर या गावच्या एका गर्भश्रीमंत जमीनदाराच्या घरात १९३० साली जन्माला आलेलं हे सुंदर पण करुण स्वप्न पुढची कित्येक वर्षे रसिकांच्या काळजाला हात घालत राहीलं आणि यापुढेही घालत राहील. १९४२ साली जेव्हा गीता बारा वर्षाची होती, तेव्हा तिचं कुटूंब मुंबईतल्या दादर इथे स्थलांतरीत झालं. इथुन पुढे गीताचं आयुष्य एक वेगळा आकार घेणार होतं.
मग १९५० साली आला 'जोगन' !
दिलीप कुमार आणि नर्गीसच्या सर्वांगसुंदर अभिनयाने नटलेला 'जोगन' १९५० चा सर्वात हिट चित्रपट होता. या चित्रपटाने त्या काळी एक कोटीच्या वर व्यवसाय केलेला होता असे मानले जाते. पण चित्रपटाच्या यशाचे खरे शिल्पकार होते संगीतकार 'बुलो सी रानी' आणि गायिका 'गीता घोष रॉय चौधरी उर्फ गीता रॉय उर्फ गीता दत्त'. या चित्रपटातील गाण्यांनी गीताला एका उच्च स्थानावर नेवून बसवले. मीराबाईंची आर्त आळवणी गीताच्या स्वरातून रसिक श्रोत्यांच्या कानापर्यंत पोहोचली आणि जणु काही विरह भावनेलाच एक अतिशय उच्च स्थान देवुन गेली. 'घुंघट के पट खोल रे, तोहे पिया मिलेंगे' (http://youtu.be/QRzES82UPyc ) तसेच 'मै तो गिरीधर के घर जाऊ, तसेच 'जरा थम जा तू..ऐ सावन..., मेरे साजन को आने दे' या गाण्यांनी गीताच्या आवाजाची ताकद रसिकांच्या मनापर्यंत पोचवली.
"'जरा थम जा तू..ऐ सावन...," मध्ये तर एकाच गाण्यात गीताने विरही मनाच्या अनेक अवस्थांचे इतके सुंदर दर्शन घडवून आणले आहे की पुछो मत. (http://youtu.be/gJ_CYMsQ84A)
ती मुक्त स्वरात गाऊन गेली... 'घूँघट के पट खोल रे तोहे पिया मिलेंगे' .., दुर्दैवाने तिचा पिया तिला तिच्या आधीच (१९६४ साली) सोडून गेला आणि गीता आर्तपणे गात राहीली... "
जोगी मत जा पाँव पड़ूँ मैं तोरी
मत जा मत जा मत जा जोगी (http://youtu.be/72a1dxaXdPw )
याबाबतीत तिचा पिया म्हणजे गुरुदत्तही दुर्दैवीच ठरला. गीता दत्त, पुर्वाश्रमीची गीता रॉय तिच्या आवाजातल्या आर्ततेमुळे त्याच्या आयुष्यात आली. काही दिवस गुरुदत्तचे आयुष्य गीताच्या सहवासाने आणि तिच्या गीतांनी सुंदर बनुन गेले आणि मग आली वहिदा. वेड्या गुरुने 'कागज के फुल' चं रुपांतर 'चौदहवी का चांद'मध्ये केलं, पण बिचारा शेवटपर्यंत 'प्यासा'च राहीला. कुठल्यातरी एका बेसावध क्षणी वहिदादेखील त्याच्या आयुष्यातून निघून गेली आणि शेवटी वहिदा आणि गीता दोघीही त्याच्या आयुष्यातून दुर-दूर होत गेल्या. बहुतेक त्या एकाकीपणालाच कंटालून त्या मनस्वी कलावंताने मृत्युला साद घातली असावी.
याच वर्षी आलेल्या 'बावरे नैन' मध्ये देखील गीताने संगीतकार रोशन यांच्यासाठी मुकेशच्या बरोबरीने एक निरतिशय सुंदर गाणे दिले होते.
खयालोंमे किसीके इस तरहा आया नही करते.. (http://youtu.be/6gDnijylB4k )
१९५१ साल तिच्या वैयक्तीक आयुष्यात एक नवं, सुंदर पर्व घेवुन आलं होतं. (ज्याचा अंत एका न संपणार्या विरहात होणार होता) 'बाजी' या चित्रपटाच्या दरम्यान तिची ओळख गुरुदत्तशी झाली आणि याच चित्रपटातील एका प्रचंड गाजलेल्या गीताच्या रेकॉर्डींगच्या वेळी गुरुदत्त तिच्या प्रेमात पडला. गाणं होतं...
"तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले.., एक दांव लगा ले" (http://youtu.be/cgwfvDh7cPc )
सर्वस्व गमावून बसलेला, निराश झालेला नायक (देव आनंद) आयुष्याप्रती एकदम उदासीन होवून हार मानून परत निघालेला असतो. तेव्हा गिटारच्या धुंद करणार्या साथीत अवखळ नायिका (गीता बाली) त्याच्यातल्या हिंमतीला कर्तुत्वाला आव्हान करते. स्वतःवर विश्वास असेल तर अजुन एक संधी घेवून बघायला प्रेरीत करते. 'बाजी' हा चित्रपट खरेतर गुरुदत्त आणि देव आनंद या दोघांसाठीसुद्धा एक जुगारच होता. त्या आधी दोघेही आपापल्या आयुष्यात खुप संघर्ष करुन थकले होते. असे म्हणतात की आपल्या संघर्षाच्या काळात या दोन मित्रांनी एकमेकांना वचन दिले होते की त्यांच्यापैकी जो कुणी प्रथम चित्रपट बनवेल , तो दुसर्याला आपल्या चित्रपटात संधी देइल. म्हणजे 'देव'ने चित्रपट केला तर दिग्दर्शक गुरुदत्त असेल आणि गुरुदत्तने चित्रपट केला तर नायक 'देव' असेल. संधी 'देव आनंद'ला मिळाली आणि त्याने आपले वचन पाळले. 'बाजी' हा चित्रपट व्यावसायिक यशाच्या पातळीवर देव आणि गुरुदत्त दोघांसाठी देखील एक पहिली आणि शेवटची संधीच होता. पण या संधीचे गुरुदत्तने सोने केले. या गाण्याने तर लोकप्रियतेचे सगळे विक्रम मोडले. आणि याच गाण्याच्या रेकॉर्डींग दरम्यान गीता त्याच्या आयुष्यात आली.
आपल्या नशिबावर आणि गुरुदत्तच्या प्रेमावर विश्वास ठेवून तिने हा डाव खेळला. कुठल्यातरी क्षणी ती देखील गुरुदत्तच्या प्रेमात पडली आणि १९५३ मध्ये तीने गुरुदत्तबरोबर विवाह केला. प्रथमदर्शनी तरी असेच भासले की तिने खेळलेला हा नशिबाचा डाव कमालीचा यशस्वी ठरला. बाजीच्या यशाने गीताला पार्श्वगायिका म्हणून पक्के स्थान मिळवून दिले. बाजीनंतर गुरुदत्तच्या बहुतेक सगळ्या चित्रपटात गीता गायली आणि जिव तोडून गायली. गुरुदत्त आणि गीताने या काळात एकाहुन एक सुंदर अशी अनेक कर्णमधुर गाणी दिली.
सचीनदा एकदा म्हणाले होते, "वो जब गुरुदत्तके लिये गाती है तो गलेसें नही, दिलसें गाती है!"
'बाजी' असो वा 'आरपार', 'प्यासा' असो वा 'कागज के फुल' , सी.आय.डी. असो वा 'चौदहवी का चांद' ! गीताने आपल्यापाशी जे काही सर्वोत़्कृष्ट गाणं होतं ते गुरुदत्तच्या पदरात टाकलं. या गाण्यांनी इतिहास घडवले. आजही भारतीय आणि अभारतीय रसिकसुद्धा गीताच्या आवाजातील या वैविध्याने भारलेले आहेत. तिच्या मनाचा अस्वस्थपणा, तिची वेदना, तिची तडफड, तिचा एकटेपणा तिच्या आवाजातून, तिच्या गाण्यातून थेंबाथेंबाने बरसत राहीला, झिरपत राहीला....
‘बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा संभलना...हाँsssss बड़े धोखे हैं...बड़े धोखे हैं, इस प्यार में’ ( http://youtu.be/A35PbjcKoBA)
ती जिव तोडून गात राहीली. पण तिच्या नशिबात तेच होते. तिच्या वैयक्तीक आयुष्यात देखील तिला तिच्या प्रेमाने धोकाच दिला. ज्याच्यावर जिवापाड प्रेम केलं, ज्याच्यासाठी आपलं सर्वोत्कृष्ट गाणं दिलं तो गुरुदत्तच वहिदाच्या नादाने तिच्याकडे पाठ फिरवून निघून गेला आणि तरीही गीता गातच राहीली...
‘ये लो मैं हारी पिया, हुई तेरी जीत रे।‘ ( http://youtu.be/piSnt5pj5XI )
गीताने आपल्या कारकिर्दीत जवळ-जवळ सगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत. पण तिच्या गाण्यांमध्ये जास्त प्राधान्य दिसून येतं ते प्रेम आणि विरहभावनेला. मग ते 'भाई-भाई' मधलं 'ए दिल मुझे बता दे..तू किसपें आ गया है' असो वा प्यासातलं 'आज सजन मोहे अंग लगा ले' असो, गीताने आपल्या प्रत्येक गाण्याला नेहमीच पुर्णपणे न्याय दिलेला आहे. पण 'गीता' स्वतः मात्र आयुष्यभर एकच गीत मनोमन गात राहीली असावी...
'कैसे कोइ जिये, जहर है जिंदगी' (http://youtu.be/oXLtgfjSAbQ )
त्या दु:खातच कधीतरी, कुठल्यातरी बेसावध क्षणी ती नकळता मद्याच्या आहारी गेली आणि त्यातच शेवटी बुडून गेली. 'साहिब, बीबी और गुलाम' हा चित्रपट जरी 'मीनाकुमारीच्या' अभिनयासाठी ओळखला जात असला तरी या चित्रपटाच्या गाण्यात खरं त्याचं यश सामावलं होतं. पतीने केलेला विश्वासघात, एकटेपणाची ती आर्तता, 'छोटी बहु'ची वेदना 'गीता'च्या आयुष्यात भरून सामावलेली होती. साहजिकच सगळा दर्द तिच्या गाण्यात उतरला नसता तरच नवल. आपली सगळी वेदना एकवटून गीता गायली...
"न जाओ सैय्या..., छुडाके बैय्या, कसम तुम्हारी मै रो पडूंगी...जाने ना दूंगी.." ( http://youtu.be/TCDbIT13MRY )
या गाण्याने मीनाकुमारीला हिंदी सिनेसृष्टीत आणि रसिकांच्या मनात अजरामर केले पण एवढी आर्त आळवणी करुनही गीताचा पिया काही तिच्याकडे राहीला नाहीच. तो आधी वहिदाकडे आणि नंतर काळाच्या गर्तेत दूर कुठेतरी तिला एकटीला सोडून निघून गेला.
त्यानंतर आलेलं १९५६ साल गीताच्या कारकिर्दीत अतिशय महत्त्वाचं ठरलं. 'हावडा ब्रीज' साठी ओ.पी. नय्यरने एक वेगळीच पण कठीण धुन तयार केली. त्याने गीताला हे गाणे देवु केले. खरेतर गीताला स्वतःलाच ती या गाण्याला न्याय देवु शकेल याबद्दल खात्री वाटत नव्हती. कारण पाश्चात्य संगीताबरोबर स्वतःचे सुर जमवून घेण्याचा प्रसंग आजवर कधी आलाच नव्हता. पण ओपीला पुर्ण विश्वास होता की या गाण्याला कोणी व्यवस्थीत न्याय शकेल तर फक्त 'गीता दत्तच'. ओपीवर विश्वास ठेवुन गीताने हे आव्हान स्वीकारले. त्यासाठी तीने अनेक पाश्चात्य गायिकांची गाणी अगदी बारकाईने ऐकली, अभ्यासली. पण ते बारकावे तसेच्या तसे आपल्या गाण्यात न आजमावता तीने ते आपल्या गायनशैलीनुसार बदलून घेतले आणि जन्माला आलं एक अफलातुन गाणं...
"मेरा नाम चुन चुन चू..., चुन चुन चू..., रात चांदनी मै और तू, हॅल्लो मिस्टर हाऊ डु यु डू?"
(http://youtu.be/lVKEMOenP-o )
आपण या पद्धतीची गाणीदेखील गाऊ शकतो ही गोष्टच तीला प्रचंड आत्मविश्वास देवुन गेली. ओपी ने खर्या अर्थाने गीता दत्तला तिच्या ताकदीची जाणिव करुन दिली असे म्हणायला हरकत नसावी. या जोडीने हिंदी सिनेसृष्टीला आणि आपल्यासारख्या सामान्य रसिकांना एकाहुन एक अजरामर गीते दिली...
सुन सुन सुन जालिमा, (रफीसाहेब आणि गीतादत्त http://youtu.be/Ws4_dxK3Q3A )
बाबूजी धीरे चलना, (http://youtu.be/A35PbjcKoBA )
ये लो मै हारी पिया ( http://youtu.be/piSnt5pj5XI )
मोहब्बत कर लो जी भर लो, (http://youtu.be/e1BsXULRl-U सहगायक रफीसाहेब),
ठंडी हवा काली घटा, (http://youtu.be/unxd92NgGm()
जाने कहां मेरा जिगर गया जी, (http://youtu.be/9mXnOybU3T0 सहगायक रफीसाहेब)
आंखो हीं आंखो मे इशारा हो गया, (http://youtu.be/6ialHMUFvlE )
जाता कहां है दीवाने (सीआईडी-1956), (http://youtu.be/NwFnzs_p2Hs)
मेरा नाम चिन चिन चु (हावड़ा ब्रिज-1958), (http://youtu.be/cQjXKdyp_wM )
तुम जो हुये मेरे हमसफर (12ओ क्लाक-1958), (http://youtu.be/LeBuNvEKHhs )
पण जरी ओपीने गीताला एक नवे रुप, एक नवे स्वरुप दिले असले तरी गीताचा आवडता संगीतकार सचीनदाच होते. सचीनदांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गीताने अनेक लोकप्रिय गाणी दिली. ही यादी खुपच मोठी आहे. तरी त्यातली माझी आवडती गाणी म्हणजे..
मेरा सुंदर सपना बीत गया (दो भाई- 1940 - http://youtu.be/zaka9-uC0S4 )
तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना दे (बाजी-1951) - http://youtu.be/J6cfWroNcNY )
चांद है वही सितारे है वही गगन (परिणीता-1953 http://youtu.be/tffJfUEaT7M )
हम आपकी आंखों मे इस दिल को बसा लें तो (प्यासा-1957 http://youtu.be/8UkEcMxjGO8 )
वक्त ने किया क्या हसीं सितम (कागज के फूल-1959 - http://youtu.be/MZ3S4-bm70s )
And last but not the least...
जाने क्या तुने कहीं जाने क्या मैने सुनी (http://youtu.be/mLGCAGHNTJU : प्यासा )
हे गाणं पाहताना काय बघु आणि काय ऐकु असं होतं. गुरुदत्तचं अप्रतिम दिग्दर्शन, वहिदाच्या चेहर्यावरचे अवखळ तरीही लाजरे भाव, सचीनदांचं दुसर्याच विश्वात घेवुन जाणारं संगीत आणि गीताचा लाडीकपणे थेट हृदयाला हात घालणारा दैवी आवाज. हाय कंबख्त... इस एक गानेपें सारी जिंदगी निसार कर देनेको दिल करता है!
1957 नंतर मात्र गीताच्या दुर्दैवाला सुरुवात झाली. गुरुदत्तने तिच्या वैयक्तीक आयुष्यात, तिच्या कामात फारच रस घ्यायला सुरुवात केली. स्पष्ट शब्दातच बोलायचे तर ढवळाढवळ करायला सुरुवात केली. गीताने फक्त आपल्याच चित्रपटात गायला हवे हा अतिशय अव्यवहारी आणि निर्दय हट्ट गाजवायला त्याने सुरुवात केली.गाण्यावर जिवापाड प्रेम असलेल्या गीताने आधी याला विरोध केला खरा, पण नंतर ती नशिबाला शरण गेली. मग हळु-हळु इतर दिग्दर्शक, संगीतकार तिला आपल्यापासून दूर करायला लागले. पण गुरुदत्तची ढवळाढवळ खुपच वाढली होती. संगीत आणि गायन हेच पहीलं प्रेम असलेल्या गीताच्या सहनशक्तीलाही काही मर्यादा होत्या. त्याच दरम्यान गुरुदत्तचं नाव वहिदा रेहमानबरोबर जोडलं जाऊ लागलं होतं. ते मात्र गीता दत्त सहन करु शकली नाही आणि शेवटी नाईलाजाने तीने गुरुदत्तला सोडून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. पण मला वाटतं गीताने पण गुरुदत्तला ओळखण्यात चुकच केली होती. गुरुदत्त अतिशय मनस्वी कलावंत होता. वहिदाच्या प्रेमात पडण्याचं कारण तिचं सौंदर्य नसून तिच्यात त्याला गवसलेला त्याच्याच सारखा मनस्वी कलावंत होता. काही दिवसांनी वहिदाही त्याला सोडून गेली आणि गुरुदत्त आतुन तुटत गेला. मद्याच्या आहारी गेला. शेवटी १० ऑक्टोबर १९६४ रोजी झोपेच्या गोळ्या घेवुन त्याने स्वतःचे जीवन संपवले. गुरुदत्त गेला मात्र त्याबरोबर गीताही संपली. तीने अगदी मनापासुन प्रेम केले होते गुरुदत्तवर. त्या धक्क्याने ती ही तुटत गेली, आपलं एकटेपं, ते तुटलेपण लपवण्यासाठी तीनेही शेवटी दारुचाच आधार घेतला. गुरुदत्तच्या मृत्युनंतर मात्र तिची अवस्था खरोखर खुपच वाईट बनली. बाकी निर्माता-दिग्दर्शकांनी तर तिच्याशी संबंध तोडले होतेच. आता गुरुच्या मृत्युनंतर त्याची कंपनी त्याच्या भावांच्या हातात गेली. त्यानंतर गीताला तिथेही काम मिळणे बंद झाले. तेव्हा गीताला आपले कुटुंब, आपली मुले यांच्या अस्तित्वाची जाणिव झाली. गीता आणि गुरुदत्तला एकुण दोन मुले आणि एक मुलगी होती. तरुण, अरुण आणि नीना. गुरुदत्त गेला तेव्हा धाकटी नीना अवघी दोन वर्षाची होती.
आपल्या मुलांसाठी म्हणुन गीताने पुन्हा फिल्म इंडस्ट्रीचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली.
याच दरम्यान तीला बंगाली चित्रपटांतुन संधी मिळाली. काही प्रमाणात पुनश्च आपले बस्तान बसवण्यात ती यशस्वीही झाली. तीने गायलेली काही लोकप्रिय बंगाली गीते..
तुमी जो आमार (हरनो सुर-1957)
निशि रात बाका चांद (पृथ्वी आमार छाया-1957)
दूरे तुमी आज (इंद्राणी-1958)
एई सुंदर स्वर्णलिपि संध्या (हॉस्पिटल-1960)
आमी सुनचि तुमारी गान (स्वरलिपि-1961)
गीता दत्त : विकीवर (http://en.wikipedia.org/wiki/Geeta_Dut )
मी सुरुवातीलाच म्हणल्याप्रमाणे गीता हे कधीही न उलगडलेलं एक कोडं होतं. कुठली गीता दत्त खरी मानायची? "मैं तो गिरिधर के घर जाऊं" म्हणणारी प्रेमविव्हळ प्रेमदिवाणी की "ओह बाबू ओह लाला" म्हणत एका लहान मुलाच्या, लाडिक आवाजात गाणारी एक गायिका. अगदी "आओगे ना साजन, आओगे ना" सारखं शास्त्रीय संगीतावर आधारीत गीत गातानाही गीताची मधुर लय हरवत नाही किंवा तीने मास्टर धनीरामसाठी गायलेली "बाट चलत नयी चुनरी रंग डारी" ही ठुमरीही तेवढीच वेड लावते. आणि हीच गीता दत्त "ना यह चाँद होगा ना तारे रहेंगे मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे" देखील गाते. व्हर्सटालीटी अजुन काय असते? जोगन मधलं "चन्दा खेले आँख मिचौली बदली से नदी किनारे, दुल्हन खेले फागन होली" तसंच साधना मधलं "तोरा मनवा क्यों घबराये रे" ही गाणी आठवताहेत? या गाण्यांमधुन गीताने आपला अनुभव आणि अधिकार जणु निर्विवादपणे सिद्ध केला होता.
अजुन बरीच गाणी आहेत. तिच्या मनापासून आवडलेल्या गाण्यांची यादी कधीही न संपणारी आहे. शेवटपर्यंत, अगदी गुरुदत्त गेल्यानंतर देखील ती नऊ वर्षे अजुन एक डाव आजमावत राहीली. पण आता तब्येतही साथ देइनाशी झाली होती. हळु हळु गीताने गाणं बंद करत आणलं. जवळ जवळ ३० वर्षे आपल्या रसिकांना वेड लावणारा हा जादुई आवाज २० जुलै १९७२ रोजी आसमंतात विलीन होवून गेला.
***************************************
तळटीप : छायाचित्रे आणि माहिती आंतरजालावरून साभार.
विशाल...
प्रतिक्रिया
22 Jan 2015 - 3:30 pm | राजाभाउ
वा मस्तच !!!
22 Jan 2015 - 3:33 pm | कपिलमुनी
लेख आवडला !
22 Jan 2015 - 3:35 pm | स्पा
खल्लास
तोडलंस विकू
22 Jan 2015 - 3:39 pm | सस्नेह
गीता दत्तच्या स्वरात एक वेगळाच ऐटदार बाज होता. मस्ती आणि धुंदी याचं अनोखं काँबिनेशन वेगळ्याच दुनियेत नेणारं !
आजही गीता दत्त ऐकताना कान ओढाळ होतात.
22 Jan 2015 - 3:40 pm | तिमा
गीता दत्तच्या आवाजात एक वेगळीच जादू होती.तिच्या कारकीर्दीचा इतका सुंदर आढावा तुम्ही घेतलाय.
शेवटच्या दिवसांतलं, 'मुझे जा ना कहो मेरी जान' हे गाणं सुद्धा अविस्मरणीय आहे.
22 Jan 2015 - 3:46 pm | पदम
प्रेम माणसाला काय काय करायला लावत.
22 Jan 2015 - 3:46 pm | निखळानंद
एक खजिना आमच्या साठीही links च्या रुपात खुला करुन दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद !
22 Jan 2015 - 4:00 pm | मदनबाण
अप्रतिम लेखन ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }
22 Jan 2015 - 4:08 pm | अत्रन्गि पाउस
लता आशा ऐन भरात असतांना स्वतःचा अमीट ठसा उमटवलेली एक गुणी गायिका
......वा बुवा !!
22 Jan 2015 - 4:15 pm | विशाल कुलकर्णी
धन्यवाद मंडळी ! ही सगळी माझी 'वाईट्ट' कॅटेगरीतली व्यसनं आहेत. एकेक करुन मांडत जाईन हळूहळू....
22 Jan 2015 - 11:46 pm | मुक्त विहारि
लेखांची चातकाप्रमाणे वाट बघत आहे.
22 Jan 2015 - 4:20 pm | उदय के'सागर
मस्तच लेख. आशा आणि गिता (एकंदरीत वर्सेटाईल सिंगर्स, म्हणूनच अत्ताची सुनिधी सुद्धा) आवडत्या गायिका.
एक अवांतर प्रश्न :
गुरु दत्त वहिदामुळे वाहवत गेला आणि गिता पासून दूर झाला हे ऐकत/वाचत आलो आहे. पण वहिदाचं पण गुरु दत्त वर प्रेम होतं का? ति त्याच्या बरोबर खरोखरच प्रेम-संबंधात होती का? की हे एकतर्फी म्हणजे फक्त गुरु दत्त कडूनच होतं? कारण काही ठिकाणी असंही वाचलंय की वहिदा ला हे संबंध कधीच मान्य नव्हते किंवा ती त्याच्या पासून इंटेशनली दूर गेली सो दॅट तो जास्त वाहवत जाऊ नये. पण काही ठिकाणी असंही वाचलंय की 'वहिदा ने गुरु-दत्त बरोबरचे प्रेम-संबंध संपवले' , 'ते वेगळे झाले' ... म्हणून थोडा गोंधळ होतो माझा.
22 Jan 2015 - 4:26 pm | विशाल कुलकर्णी
अनेक वदंता आहेत. काहीजण म्हणतात 'होते' आणि काहीजण साफ नाकारतात. काहीजण गुरुदत्तला दोष देतात तर काहीजण वहिदाला स्वार्थी ठरवतात. एक कलावंत म्हणून मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ते एकमेकाच्या कलेच्या ओढीने जवळ आलेले, मग नकळत गुंतत गेलेले कलावंत होते. कदाचित जे गीताच्या बाबतीत झाले तेच वहिदाच्या बाबतीत झाले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. (गुरुची स्वामित्वाची भावना)...
सत्य काहीही असो त्यामुळे तीन, किमान दोन आयुष्ये तरी उध्वस्त झालीच .... :(
22 Jan 2015 - 4:36 pm | उदय के'सागर
हम्म.. ठोस आणि नक्की अशी काहीच माहिती नाही म्हणजे. असो, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
22 Jan 2015 - 8:35 pm | प्रदीप
मला असे वाटते कुठल्याही दोन व्यक्तिंच्या संबंधाबद्दल त्या व्यक्तीच 'खरंखोटं' काय ते जाणत असतात (किंवा तसेही खरेतर नव्हेच, कारण शेवटी 'खरं' काय आणि 'खोटं' काय हे कोण ठरवणार?)
गुरूदतसारखे मनस्वी वगैरे कलाकार आपण दुरूनच पाहिलेले बरे. अशा कलाकारांच्या नातेसंबंधात, इतरांशी त्यांच्या देवाणघेवाणीत बरेचदा अनाकलीय काही घडत असते. त्रयस्थ व्यक्तिंना त्यांच्या तसल्या त्या चक्रमपणाचे कौतुक वगैरे वाटत असते. जवळची माणसे मात्र त्यांनी लावलेल्या वणव्यात जळून जातात.
तेव्हा गुरूदत्त, वहिदा, गीतादत ह्या सर्वांत नक्की काय झाले ह्याविषयी कुणासच फारसे ठाऊक असणे शक्य नसावे. आता त्यांचे संबंधित काहीबाही सांगतात, लिहीतात. तेही सर्व त्यांच्या व्यक्तिगत पर्स्पेक्टिव्हमधून पाहिलेले, अनुभवलेले असते. तेव्हा तसे काही निव्वळ कुणीतरी सांगितले अथवा तसे लिहीले म्हणूनच केवळ ते खरे मानणे फारसे खरे नव्हे. शक्या झाल्यास तत्संबंधित दोन्ही बाजूंच्या अनेक लोकांशी बोलल्यानंतर काही आडाखे आपण बांधू शकतो.
वरील नातेसंबंधाविषयी एक बाजू गुरूदत्तचे निकटवर्ती अब्रार अल्वी ह्यांनी त्यांच्या मेमॉयरमधे सविस्तर कथन केली आहे. त्यातील कथनानुसार गुरूदत्त त्या दोघींशीही अत्यंत स्वार्थीपणे वागला. अब्रार अल्वी सांगतात की तो वहिदात इतका गुंतला, की तिच्या मामाच्या सूचनेवरून त्याने तिच्याशी चक्क निकाह करण्याचा घाट घातला. त्यासाठी त्याने धर्मांतर करण्याचेही ठरवले. अगदी सगळी जय्यत तयारी झाली असतांना रेहमान, अब्रार अल्वी व जॉनी वॉकर (बद्रुद्दिन काझी) ह्या गुरूदत्तच्या जुन्या व जाणत्या मित्रांनी त्याला ह्या कृत्यांपासून परावृत्त केले, म्हणे. अल्वींनी असे नमूद केले आहे, की त्या प्रसंगी त्यांची व वहिदाच्या मामाची थोडी झटापटही झाली.
अल्वी पुढे असेही लिहीतात की गीता दत्त नंतर काही कामासाठी लंडनला गेली होती. इथे गुरू दत्तचे वहिदा प्रकरण रंगात आले होते. पण गीता घरी न परतता, एकदम काश्मीर येथे गेली, व तसे तिने गुरूदत्तला कळवलेही. काही दिवस वाट पाहूनही ती काही घरी परतायचे नाव घेईना, तेव्हा गुरूदत्तने आपल्या एका विश्वासू सहकार्यास' तिच्या मागावर पाठवले. त्यातून म्हणे त्याला असे समजले की ती कुण्या एका पाकिस्तान्याबरोबर तिथे रहात आहे. तेव्हा त्याने तिच्याशी संपर्क साधला, ज्यात त्याने म्हणे तिला वहिदास जीवनातून हद्दपार करण्याचे आश्वासन दिले. आणि, अल्वीसाहेब पुढे लिहीतात की त्याने हे तात्काळ अंमलात आणलेही. ह्यासंबंधात अल्वींनी असे म्हटले आहे की फेमसमधे गुरूदत्त प्रॉडक्शन्ने बुक केलेली एक मेकअपरूम वहिदा नेहमी वापरत असे, तिला दुसर्याच दिवशी, काहीही कारण न देता, एकदम मज्जाव करण्यात आला. मग रीतसर गीता घरी परतली, म्हणे!
आता, ह्याविषयी आपणांस 'खरे खोटे' काहीच माहिती नाही. ही एका नजिकच्या व्यक्तिच्या दृष्टिकोनातून पाहिलेली स्टोरी आहे.
23 Jan 2015 - 1:11 pm | उदय के'सागर
हो खरंय, खरं खोटं ते तिघंच जाणोत.. पण मेमॉयरमधे मधे असलेली शेअर केल्याबद्दल धन्यवद तुमचे.
22 Jan 2015 - 4:56 pm | विशाखा पाटील
छान! आवडलं!
22 Jan 2015 - 5:16 pm | दिपक.कुवेत
विकु अजून तुझे बाकि लेख वाचायचेत....
22 Jan 2015 - 6:42 pm | खेडूत
अप्रतिम लेख अन सोबत खजिना!
वाखू साठवालीच आहे .
22 Jan 2015 - 8:24 pm | सौन्दर्य
अतिशय उत्कृष्ट लेख, खूप आवडला, गीता दत्तच्या एकूण जीवनाचा आढावा फार छान घेतलाय. हल्लीच तिची खूप सारी गाणी सीडीवर ऐकली. लेख वाचताना सतत जाणवलेली एक गोष्ट म्हणजे तिच्या नितांत सुंदर गाण्यांबरोबर तिच्या जीवनातील दुखरी बाजू. आता तिचे गाणे ऐकताना ह्या तिच्या वेदना जाणवत राहतील.
22 Jan 2015 - 8:43 pm | अजया
फार आवडला लेख.खूप दिवसानी गीता दत्तच्या गाण्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.आता सवडीने सगळ्या लिंका परत ऐकेन.धन्यवाद.
22 Jan 2015 - 8:50 pm | प्रदीप
व एका अत्यंत टॅलेंटेड गायिकेविषयी! गीता हे प्रकरणच काही वेगळे होते. तिने गायिलेली सारी गाणी केवळे तिचीच म्हणून शोभून दिसतील, तिथे दुसरी कुणीही तिची जागा घेऊ शकणार नाही.
तिच्या अनेक गाण्यातील 'कैसे कोई जिये', 'आज सजन मोहे अंग लगा लो', 'ऋतू फिरे पर दिन हमारे, फिरे ना, फिरे ना, फिरे ना' मी माझी सर्वात आवडती गाणी आहेत. तसेच 'एक, दोन, ती; चार और पाँच' हेही तिचे एक सुंदर गीत आहे.
जाता जाता, सुजाता पिक्चर आल्यापासून मी 'तुम जियो हजारो साल' ऐकत आलो आहे, आणि ते मला अगदी ठसठशीत गीताचेच वाटत आलेले आहे. तसेच विवीध भारती, ऑल इंडिया रेडियो उर्दू सर्व्हिस, राजकोट- भुज उपकेंद्र इत्यादी आमच्यावेळच्या नेहमीच्या, अशी गाणी लावून आनंद देणार्या कुठल्याही स्टेशनवरून हे गाणे आशाचे आहे, असे चुकूनसुद्धा ऐकल्याचे मला आठवत नाही. गेल्या एकदोन दशकातून रेडियो, टी व्ही इत्यादी माध्यमांतून प्रहसन करणार्या नवीन व्यक्तिंना जुन्यापैकी बरेच काही माहिती नसते, समोरील व्यक्तिच्या कार्याचा किमान अभ्यासही केलेला नसतो, ह्यात आता काही नवीन राहिलेले नाही. (माझा दुबईतील मित्र डॉ. मंदार बिच्चू ह्याने ह्या संबंधात त्याने प्रत्यक्ष पाहिलेला एक मजेशीर किस्सा ऐकवला होता, त्याची ह्या अमेरिकेतील रेडियो निवेदिकेच्या किश्श्यावरून आठवण झाली. तसेच अलिकडेच कुठल्यातरी टी. व्ही.चॅनेलमधे लताची मुलाखत तिच्याविषयी संपूर्ण अनभिज्ञ अशी एक युवती घेत असतांना मला झालेला त्रास पुन्हा आठवला).
22 Jan 2015 - 11:41 pm | अनिवासि
माझ्या अज्ञाना बद्द्दल प्रथमच माफी मागतो. 'मेरी बीना रो रही आहे ' हे गाणे ह्यानीच गायले आहे का? असल्यास दुवा देउ शकाल का? लहानपणी ऐकलेले हे गाणे अनेक वर्र्षे मनात ठाण देउन आहे पण परत कधी ऐकायला मिळालेले नाही.
23 Jan 2015 - 3:39 am | बहुगुणी
मला वाटतं तुम्हाला अभिप्रेत असलेलं जुतिका रॉय यांचं हे गाणं असावं...
23 Jan 2015 - 10:56 pm | अनिवासि
धन्यवाद. बरोबर. आपण सन्गितल्यावर आठवले.
22 Jan 2015 - 11:45 pm | मुक्त विहारि
अप्रतिम...
23 Jan 2015 - 3:38 am | बहुगुणी
एकाहून एक सुंदर गाण्यांची आठवण करून दिलीत, धन्यवाद!
23 Jan 2015 - 7:04 am | चौकटराजा
हा लेख आहे चांगला. पण आपण ज्यावेळी कलाकारावर लेख लिहितो त्यावेळी त्याच्या कलेचे विष्लेषण प्रामुख्याने असावे.तिच्या आवाजाची गोडी, तिचा थ्रो, तिच्या आवाजातील अनुनासिक पणा , दर्द दु:ख व खेळकर पणा त्याच ताकदीने आवाजाच्या मध्यमातून व्यक्त करण्याची तिची हातोटी. काही बाबतील ती आशा व लतालाही मागे टाकत असे हे सत्य आहे. तिच्या एका परम भक्ताच्या मते ( तो तिला आपली आईच मानतो) काही कलाबाह्य कारणामुळे ती मागे पडली. माझा मात्र या निष्कर्षाला विरोध राहिलेला आहे. नय्यरच्या गीतांचा मध्य काळातील बाज पहाता तान हरकत ई. आयुधांच्या बाबतीत आशाने तिच्यावर मात केलीय असे मला वाटत आले आहे. म्हणून नय्यर बरोबरच इतर संगीतकारानीही तिचा विचार नंतर केला नाही. असेच रफी व तलत यांचेही उदाहरण देता येईल. रफीमधे तलत पेक्षा गायक म्हणून अधिक गुण होतेच. ( असे ३६ गुण गोविंदराव टेंबे यानी लिहिलेल्या एका पुस्तकात दिले आहेत.).पैशाचा फार मोठा जुगार खेळणार्या या झगमगत्या दुनियेत वैयक्तिक संबंधातील गफलतींमुळे करियरचा पूर्ण नकाशा बिघडला असे म्हणता येत नाही. शंकर जय जोडी फुटल्यानंतर व जय निवर्तल्यानंतर देखील शंकर यानी उत्तम संगीत देणे चालूच ठेवले की.
बाकी गीताची अशी काही ( जशी हेमंतकुमारना मिळाली) गीते आहेत की जी तिच्याशिवाय कोणीच गायलेली आपण कल्पना करू शकत नाही. रात्री सर्व दिवे मालवून हेडफोनवर एकाग्रपणे तिचा आवाज ऐकणे हे एक जगावेगळे सुख असते.
तिचेच बंधु मुकुल राय यानी स्वरबद्ध केलेले " दो चमकती ऑंखोमे बस ख्वाब सुनहरा था जितना....अब हाय जिंदगी तेरी राहमे आज अंधेरा है उतना " हे माझे एक लाड़के गाणे आहे.
23 Jan 2015 - 10:05 am | विशाल कुलकर्णी
धन्यवाद _/\_
23 Jan 2015 - 12:32 pm | एस
अप्रतीम लेख! कित्येक गाणी कितीतरी दिवसांनी पुन्हा मनात रुंजी घालू लागली!
24 Jan 2015 - 9:15 pm | पैसा
मनस्वी कलाकार आणि त्यांच्या जवळचे नातेवाईक यांना बरेचदा खूप दु:खच भोगावे लागते. गीता दत्तची खेळकर मूडमधली गाणी ऐकूनही मला बरेचदा उदास वाटते. त्यांच्या मुलांचे काय हाल झाले असतील हा विचारही मनात राहून राहून येतो.
लेख छान आणि प्रदीप यांचे प्रतिसादही खूप आवडले.