Skip to main content

नथ.............भाग-८-शेवटचा

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 15/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ.......भाग-२ नथ.........भाग-३ नथ........भाग-४ नथ........भाग-५ नथ........भाग-६ नथ.........भाग-७ नथ..........भाग-८ नशिबाने वलिखान व खैरुनबेगमने मला मुलगी मानले असल्यामुळे मुल्ला मौलवींचे त्यांच्या पुढे काही चालले नाही व पुढचा प्रसंग टळला. उलट त्यांनी माझी व माझ्या मुलांची सोय त्यांच्याच हवेलीत केली व संपत्तीचा अर्धा वाटाही आम्हाला दिला. जे काही आयुष्य उरले होते ते तेवढ्या संपत्तीत आम्ही सुखाने राहू शकत होतो. वलिखानने माझ्या मुलांचा ताबा घेतला व त्यांचे शिक्षण अफगाणी परंपरेने चालू झाले. मी त्यांना माझ्याच घरी राहण्याची जबरदस्तीच केली ज्यामुळे त्यांना थोडीफार मराठा व ब्राह्मण संस्कृतीचीही ओळख झाली.... पाच सहा वर्षानंतर अहमदशाबाबाने परत एकदा हिंदूस्थानावर स्वारी केली. ही त्याची हिंदूस्थानवर शेवटची स्वारी होती. यावेळी त्याने कुर्दी सरदारांचे सैन्य उभे केले होते. या मोहिमेचाही विचकाच उडाला. (कार्लेकर : हे साल बहुदा १७६९ होते) अहमदशाबाबाची तब्येतही वेगाने ढासळत होती. त्याने त्याच्या राजपूत्राला तैमूरला त्याचा वारस नेमल्यावर सुलेमानच्या बाजूच्या सरदारांनी त्यांचा राग प्रकट केला. वलिखान सुलेमानच्या बाजूने ठामपणे उभा राहिला. शहा अजूनही खुदादादला विसरला नव्हता. वलिखानकडे तो माझी व माझ्या मुलांची चौकशी करत असे. शेवटी वलिखान मुलांना दरबारात घेऊन गेला. तीन वर्षांने अहमदशाचे नाक झडू लागले. बहुदा त्याला महारोग झाला होता. त्याचे नाक कापून त्याजागी चांदीचे नाक बसविले गेले. त्याच वर्षी अहमदशाचे बोलणे समजेनासे झाले व त्याच आजारात त्याचा मृत्यु झाला. अफगाणीलोकांचा आधार गेला. ज्याने या देशाला अकार दिला त्याच्या मृत्यु झाल्यावर अफगाणीस्थानवर शोककळा पसरली. नंतर जे राजकारण व लढाया होणार होत्या त्या टाळण्यासाठी वलिखान मुलांना घेऊन डोंगरात निघून गेला व त्या भल्या मोठ्या हवेलीत मी एकटी राहिले. अर्थात वलिखानने माझ्या संरक्षणाची पूर्ण व्यवस्था केली होती. त्यानंतर माझी व वलिखान व खैरुनबेगमची गाठ पडली नाही. माझी मुलेही त्यांच्याबरोबर गायब झाली. कोणी म्हणतात ते तुर्कस्थानला गेले कोणी म्हणतात ते इराकमधे गेले. शेवटी मी एकटी पडले. मी कोण होते हे अफगाणीस्थानमधे सगळ्यांना माहीत असल्यामुळे मला भुरटे चोर सोडल्यास विशेष त्रास झाला नाही. अहमदशहा अब्दाल्लीचे दफन झाल्यावर वातावरणातील ताण जरा कमी झाल्यावर मी अफगाणीस्तान बघण्याचे ठरविले व प्रथम बामियानसाठी प्रस्थान सोडले...... कार्लेकर : पुढे बाईंच्या सफरीचे वर्णन आहे. ते तुम्ही नंतरही वाचू शकता.) आर्य : काका पण या बाई वेळासच्या कुठल्या घराण्याच्या होत्या त्याचा काही पत्ता लागलाच नाही. श्री. कार्लेकर : पुढे वाचल्यावर ते तुम्हाला कळेल. पण बामियानच्या सफरीवर असताना बाईंनी, बुद्धाच्या मूर्तींबरोबर अजूनही काही चित्रे रेखाटली आहेत. त्या चित्रात समुद्र दिसतो त्यामुळे ती वेळासची असावीत असे मला वाटते. ही बघा आणि सांगा ही जागा कुठली आहे ! ती चित्रे पाहिल्या पाहिल्या सगळ्यांच्या तोंडून बाहेर पडले, ‘‘ब्राह्मण खाई’’ ! आणि ते दिसते ते घर श्रीधरभटाचे आहे. ब्राह्मणखाईत फक्त त्यांचीच वाडी आहे. ते ऐकल्यावर सगळेजण मागे बसलेल्या यमूकडे पहायला लागले. ती बिचारी बुजून उठली आणि उठून आत पळाली. ’’चला आता उशीर झाला. उद्या आपण समाध्या व वृंदावने पहायला जाऊ. तेथेच बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल.’’ आर्य म्हणाला. यमू श्रीधर भानू.... आता हे काय लचांड आमच्यामागे लागले ? याने आमची बदनामी होईल का ? आता ते मुसलमान येथे पोहोचल्यावर वेळास काय म्हणेल ? कुठे राहतील ते ? मी व बाबा पहाटे उठलो व इंदीराकाकूंकडे गेलो. तेथे कार्लेकरकाकाही भेटले. मी माझ्या सर्व शंका त्यांना व आर्यला विचारल्या. ‘‘यमे तू काळजी करु नकोस. इस्माईल व वलिखान ही उमदी व सभ्य माणसे आहेत व हे त्यांच्या आईजानचे गाव आहे याचे भान त्यांना निश्चितच असणार्. तू बघशील ते या मातीशी किती नम्रपणे वागतील ते’’ आर्य म्हणाला. मी, बाबा, आर्य, कार्लेकरकाका, इंदिराकाकू, मानसीताई व इतर जण नदीकिनारी समाध्यांपाशी गेलो. आमच्या घरातील जी समाधी होती त्यावरील नाव कार्लेकर काकांनी मोठ्याने वाचले ‘’सिताबाई ’’. ‘‘चला वलिखानचे स्वप्न पूर्ण झाले म्हणायचे’’ आर्य म्हणाला. ‘‘सिते, राणीचे आयुष्य जगलीस ग ! नाहीतर इथे काय करणार होतीस शिंचे’’ इंदिराकाकू पुटपुटल्या.. पुढच्या आठवड्यात आर्य इस्माईल व वलिखानला वेळासला घेऊन आला. त्या सतीच्या वृंदावनासमोर आम्ही डोके ठेवल्यावर त्यांनीही डोके ठेवले. बराच वेळ झाला ते दोघेही उठले नाहीत. उठले तेव्हा त्या धिप्पाड पठाणांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. त्यांनी आम्हाला विनंती केली की समुद्राकाठी असलेल्या घरात त्यांची राहण्याची सोय करता येईल का ? आईजान तेथेच रहात होत्या ना? आम्हाला उरलेले दिवस तेथेच रहायचे आहे. त्यांना अर्थातच नाही म्हणणे अशक्यच होते. रात्री त्या घरात गप्पांचा मोठा फड जमला त्यात बरेच गावातील प्रतिष्ठित माणसे हजर होती. ती गेल्यावर आमच्या घरातील माणसांची मैफील जमली.... तेवढ्यात वलिखान उठला व आत गेला. बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात एक चांदीची डबी होती. त्यातून एक सुंदर नथ काढून त्याने माझ्या हातात दिली. ‘‘आईजानची वस्तू तिच्याच घरी जाते आहे याचे मला समाधान आहे.’’.........अणि ते दोघे एकदम ढसाढसा रडायलाच लागले................... उपोद्घात : इस्माईल तालीबानच्या हल्ल्यात ठार झाला व एक अघटित घडले - त्याचा शोक वेळासमधे पाळला गेला. यमू अमेरिकेत उच्च शिक्षण घेते आहे. तिच्या शिक्षणाचा खर्च तिच्याच वलिखानचाचाने उचलला आहे. वलिखान : वेळासहून अफगाणिस्थानला परत गेल्यावर आईजानच्या आठवणीसाठी त्याने एक छोटीशी शेंडी ठवली आहे. श्रीधर भानूचा भाव गावात वाढला आहे. आर्य व मानसी परत अमेरिकेला गेली व नंतर त्यांची बदली कोरियाला झाली. इंदिराकाकू आता थकल्या. त्यांची स्मरणशक्ती त्यांना दगा देते. परवाच त्यांनी कोणालातरी ‘‘कोण इस्माईल चाललाय का ? असा प्रश्न विचारला. श्री. कार्लेकरांनी ‘‘सिताबाई सदाशीव भानू’’ या नावाने एक पुस्तक लिहिले. त्यात तुम्हाला सिताबाईंची पूर्ण कहाणी वाचायला मिळेल व त्यांनी काढलेली रेखाचित्रेही बघायला मिळतील. बामियानचे बुद्ध : तालिबानने हे तोफा डागून फोडले त्यामुळे सिताबाईंनी लिहिलेल्या वर्णनाला व चित्रांना बरेच महत्व प्राप्त झाले आहे. दोन वर्षातून एकदातरी वलिखान व त्याचे कुटुंबीय वेळासला वृंदावनाच्या दर्शनाला येतातच येतात व त्याच वाडीत राहतात. सिताबाई सदाशीव भानू........... यांचे काय झाले ? याची उत्सुकता असेल ना तुम्हाला ? या बाई शेवटी वाराणसीमधे एका आश्रमात मृत्यु पावल्या. त्या तेथे कशा आल्या यासाठी तुम्हाला ते पुस्तक वाचावे लागेल किंवा मी लिहिलेले त्या पुस्तकाचे परिक्षण ! || लेखनसीमा ||. जयंत कुलकर्णी या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20119
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

पण मनांत फारच सावळा-गोंधळ निर्माण झाल्याने.... इतकेच नोंदवतो की, मस्त लिहीले आहे. ओघवती शैली आणि कहाणीत गुंतून बसलो होतो. लेखणीत दम आहे हो तुमच्या...

पण शेवट गुंडाळल्यासारखा वाटला.

In reply to by भिंगरी

असंच वाटलं, अपेक्षेहून लवकर संपली कथा. (पण कदाचित आणखी लांबवून 'च्युइंग गम' झाली असती...). आवडली हे पुन्हा एकदा म्हणतो.

लवकर संपली. शेवट थोडा गुंडाळल्यासारखा वाटला. पण त्याचं कारण कदाचित आधीच्या भागांनी निर्माण केलेली उत्कंठा असू शकेल. मला ' नथ ' हे नाव एकदम समर्पक वाटले. जर याचे हक्क कोणाला चित्रपटासाठी विकलेत तर एक विनंती प्लीज मान्य करा - नाव 'नथ' च ठेवा!

कथा खूsssप आवडली हे सांगण्याची गरज नाही ! मात्र शेवट अजून जरासा खुलवला असता तर अजून मजा आली असती. संपूर्ण लेखमालेने उत्सुकता ताणून धरली होती. पुढच्या लेखनास शुभेच्छा !

संपली? एवढ्यात संपली? छान वाटली पण मालिका. सिताबाईंचा रोल करु शकेल अशी कोण अभिनेत्री आहे? मराठी? स्पृहा जोशी कदाचित. श्रद्धा कपूर हिंदीमध्ये?

भाग वाचुन झाल्यावर प्रतिक्रिया देत अहे. खुप उत्कंठावर्धक कथा आहे!

खुप आवडली नथ. तुमच्या डोक्यात एव्हढं सगळं रामायण येतच कसं याचं आश्चर्य वाटतं.

खूपच आवडली कथा. चांगल्या चित्रपटाचे पोटेंशियल आहे या कथेत. वेगवेगळ्या कालखंडात आणि भूभागावर घडणार्‍या प्रसंगांना अशाप्रकारे कथेत गुंफण्यामागच्या तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम! __/\__ चतुरंग

___/\___!! धन्यवाद लेखक महोदय!

आणि सुरस मालिका जयंतकाका रऑक्स !

सुंदर कथा!! मलाही शेवट गुंडाळल्या सारखा वाटला.. आधीचे भाग वाचुन सिताबाईंमुळे खुपच लक्षणीय बदल घडले, त्यांच्या नावाचा तिथे खुप दबदबा होता असे वाटत होते त्यामुळे तसेच त्यांचे कर्तुत्व असणार... त्याविषयी वाचायला मिळेल असे वाटले... शिवाय नक्की त्या भारतात कशा आल्या? इथे आल्यावर लोकांची प्रतिक्रिया काय होती? आधीच्या भागात सविस्तर वर्णनं आल्यामुळे सिताबाईंचे वर्णन अजुन जास्त अपेक्षित होते... तरीही मालिका अत्यंत सुंदर झाली ह्यात शंकाच नाही...!

In reply to by पिलीयन रायडर

पिरा यांच्याशी सहमत. बाकी मालिका छान झाली!

In reply to by एस

असेच म्हणतो. कथा जबराच होती. एखादा सिनेमा वैगरे तर नक्कीच बनू शकतो या कथेवर.

In reply to by पिलीयन रायडर

पिरा सारखेच म्हणते, स्वाती

मस्त दीर्घकथा!

एकंदर अफघाणिस्तान आणि मध्य आशियाबद्दल काहिसं वेगळच आकर्षण आहे. फार इच्छा आहे तिथे फिरायची. त्यामुळे अजूनच आवडली गोष्टं!

छान कथा वाचल्याचे समाधान ! शेवट वेगवान होता!

जबराट कथा , शेवट गुंडाळल्यागत वाटत असला तरी लांबवला नै हे जास्त चांगले केले. बाकी मान गये@!!!!

एक सुंदर कथा वाचल्याचा आनंद मिळाला!

अहो पण ते पुस्तकाचे नाव द्यायचे राहिले की! कि अगोदर तुम्ही कुठे नमूद केले आहे आणि माझे वाचायचे राहिले?

संपूर्ण लेखमाला वाचली. अत्यंत चांगला चित्रपट बनण्यासाठी योग्य कथा आहे. तुमची लेखनशैलीही आवडली काका. एकदा असं वाटलं की अजून काही भाग असते तरी आवडलं असतं पण ही आटोपशीर लेखमालाही आवडली.