मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १०

प्रसन्न केसकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?) आधीचे भाग येथे वाचा : भाग एक - http://misalpav.com/node/8127 भाग दोन - http://misalpav.com/node/8138 भाग तीन - http://www.misalpav.com/node/8149 भाग चार - http://misalpav.com/node/8172 भाग पाच - http://www.misalpav.com/node/8189 भाग सहा - http://www.misalpav.com/node/8204 भाग सात - http://www.misalpav.com/node/8219 भाग आठ - http://misalpav.com/node/8233 भाग नऊ - http://misalpav.com/node/8251 ३ ऑगस्ट आज माजिरेच्या घरी त्याच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी होती. ऑफिसातल्या सगळ्याजणाना घरी जेवायला बोलावले होते त्याने. त्याचा पत्ता पाहीला अन लक्षात आले आपल्या घरापासून जवळच तो राहतो. सिंगल रूमचा फ्लॅट, त्यात तो, त्याची विधवा म्हातारी आई, बायको अन दोन मुले रहातात. त्याच्या घरीपण सगळी पुस्तकेच पुस्तके.... पत्रकारितेत वर चढायचे तर बरेच वाचावे लागते असे दिसते.... साला आपला तर या बाबतीत सगळा आनंदी-आनंद आहे. शिकत असताना पण कधी टेक्स्ट बुके नाही वाचली.... सगळा अभ्यास गाईडे अन अपेक्षीत प्रश्नसंचांवरच भागवला.... "अगदीच अडचण आली तर कॉपी करायची परीक्षेत हा आपला फंडा... कट्ट्यावर टिवल्याबावल्या करणे, पोरींवर लाईन मारणे, गॅदरिंग, ट्रिपा, पार्ट्या.... अन झालेच तर मारामार्‍या हे सगळे सोडून पुस्तके वाचण्यात मग कश्याला वेळ वाया घालवतोय आपण?" तसे त्या सरकारी दवाखान्यातल्या दमेकर्‍यांची बातमी आल्यापासून आपले अन माजिरेचे संबंध चांगले झालेत.... आता तो पुर्वीसारखे टाँटींग नाही करत आपल्याला. उलट अधून मधून आपल्या बातमीचे संपादन करताना काही शंका असेल तर विचारतो आपल्याला..... पण आज त्याने मुलाच्या वाढदिवसाला घरी बोलावले.... एव्हढीही नव्हती आपली अपेक्षा. वर घरी गेल्यावर त्याने आपली ख़ास ओळख करून दिली त्याच्या आई अन बायको बरोबर तर त्याना पण आपल्याबद्दल आधीच माहिती होती.... बायको म्हणाली म्हणजे हा तो नवीन क्राईम रिपोर्टर ना? अन आई तर "मला आवडली तुझी सरकारी दवाखान्यातल्या दमेकर्‍यांची बातमी..." असे पण म्हणाली. माजिरे आपल्याबद्दल घरच्यांशी चांगले बोललेला दिसतोय. जेवून सगळे निघाले तसा मी पण निघालो. तेव्हड्यात माजिरेची बायको त्याला म्हणाली, "अगबाई! आज या गडबडीत मी आईंच्या ब्लडप्रेशर च्या गोळ्या आणायलाच विसरले. आत्ता मिळतील का कुठे?" माजिरे पण प्रश्नात पडलेला वाटला... साहजिक आहे. रात्री साडेअकरा वाजलेले म्हणजे औषधांची दुकाने बंद झालेली असण्याची शक्यता. जवळपास कुठे ऑल नाईट मेडीकल शॉप पण नाही. मग मीच त्याला म्हणालो, "चल आपण दोघे माझ्या गाडीवर जावून बघू." आम्ही मग गेलो आणि गोळ्या घेतल्या तर माजिरे म्हणाला, चल पान खाऊ. मग पानवाल्याकडे गेलो. पान बनवेपर्यंत गप्पा मारत होतो तेव्हा मी माजिरेला म्हणालो, "माजिरे तुम्ही ऑफिसमधे एव्हडे कडक असता... पण घरी आल्यावर एकदम वेगळे वाटलात...." तर तो म्हणाला, "अरे ऑफिसमधे वेगळे वातावरण असते अन बाहेर वेगळे." म्हणजे? मी विचारले अन माजिरे भडाभडा बोलायला लागला, "असे बघ ऑफिसमधे आपण कायम तणावात असतो." चायला! हे जरा जास्तीच होतेय. साला उपसम्पादकाना कसला आलाय तणाव? ते काही बाहेर जावून बातम्या आणत नाहित.. बाहेर वण-वण फिरणे, लोकांच्या हातापाया पडून बातम्या मिळवणे, वेळी शिव्या-शाप घेणे हे करतो आम्ही अन यांना कसला तणाव? तसे विचारले तर माजिरे म्हणाला, "आम्ही जरी बाहेर जात नसलो तरी बरेच काम असते आम्हाला. असे बघ, तुम्ही रिपोर्टर किती अशुद्ध लिहिता? ते आम्हाला सुधारुन घ्यायचे असते, प्रत्येक बातमीला आकर्षक हेडिंग द्यायचे असते, पानांचे डिझाईन आकर्षक प्रकारे करायचे असते. एका प्रकारे आम्ही तुमच्या बातम्या वाचकाना विकणारे सेल्समन. बर हे काम सगळे वेळेतच झाले पाहिजे असे बंधन असते. आमच्या कामाला उशीर झाला तर पेपरच्या छपाईला उशीर होतो अन मग पेपर विकला जात नाही. त्यात अनेकदा रिपोर्टर बातम्या खूप उशीरा देतात विनाकारण? तूच मला सांग एखादी बातमी तुला सकालीच मिळाली तर तू ती लगेच लिहितोस का? जर ती तू दुपारी आमच्याकडे दिली तर आम्हाला तिच्यावर जास्त वेळ काम करता येईल. पण अनेकदा तसे होत नाही अन मग संध्याकाली उशीरा एकदम सगळ्या बातम्या हातात येतात. सहाजिकच आमची वेळेत काम संपवताना ओढाताण होते. त्यात काही वेळा गडबडीत चूका पण होतात. मग संपाद्क, रिपोर्टर सगळ्यांचे बोलणे ऐकून घ्यावे लागते...." साला हा पॉईन्ट तर कधी आपल्या लक्षात आलाच नव्हता.... खरे आहे माजिरे म्हणतो ते...... आपलेपण बरेच चुकते.... ४ ऑगस्ट गल्लीतल्या कट्ट्यावरच्या पक्याचा चांगलाच लोच्या झालाय! आज त्याने सांगितल्यापासून आपला तर भेजाच काम करेनासा झालाय? कसा एव्हडे दिवस गप्प बसला तेच कळत नाही. आज रात्री कट्ट्यावर तो भेटला अन म्हणाला, "पम्या चल! एक-एक क्वार्टर मारू. मग काय काढली गाडी अन गेलो दोघेच गावाबाहेर धाब्यावर. मस्त दारु प्यायलो अन परत येताना पक्याने मला अचानक गाडी थांबवायला सांगितली. मी गाडी थांबवली तर एकदम गळ्यात पडून रडायलाच लागला "पम्या माझ्यावर वाईट गेम पडली रे. मी फसलो. पार जिंदगीतुन उठनार आता," म्हणत. खोदून खोदून विचारले तर सांगितले, "अरे मी ज्या रिकव्हरी एजंसीमधे काम करतो ना ती फ गँगची आहे. एजंसी कसली, गँगच ती. दाखवायला करतात थोड़ी फार लोन रिकव्हरी पण बाकी सगळे खंडणी अन सुपारीचे धंदे. अन आता तर एक मोठा गेम करायचे ठरवलेय त्यानी..... १५ ऑगस्ट्ला शहरात काही स्फोट करणार आहेत. स्फोट झाले की लोक घाबरतील अन शहर सोडतील मग त्यांच्या जागा बळकावायच्या असे सगळे प्लॅनिंग. खूप मोठा जिलेटीन चा साठा जमा केलाय. काही लोकाना बॉम्ब बनवायचे ट्रेनिंग पण दिलेय! स्फोट झाले तर खूप राडा होईल. पोलिस नक्की आम्हाला धरतील अतिरेकी म्हणुन.... एन्काऊन्टर पण होऊ शकतील आमची.... मला खूप भिती वाटते रे......" ऐकले अन सगली चढलेली दारू खाडकन उतरली. साला असे झाले तर खूप मोठा राडा होईल.... काहीतरी केले पाहिजे.... पण करणार काय? खत्रीसाहेबाना बोलावे काय? पण नकोच! हे पुलिसवाले, ह्यांचा काय भरवसा द्यायचा. साला आपल्या दोस्ताच्या जिन्दगी अन मौत चा प्रश्न आहे......

वाचन 4951 प्रतिक्रिया 0