मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अविद्या

शरद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
=================================================================== उपनिषदे : (१)... (२)... (३)... (४)... (५)... (६)... (७) उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?... (८) ईशावास्योपनिषद... (९) केनोपनिषद... (१०) अविद्या... (११) मुंडकोपनिषद... (१२) प्रश्नोपनिषद-१... (१३) प्रश्नोपनिषद-२... (१४) कठोपनिषद-१... (१५) कठोपनिषद-२... (१६) ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं... =================================================================== अविद्या उपनिषदांचा परिचय करून देतांना ब्रह्म, आत्मा वगैरे संज्ञांची ओळख आपण करून घेतली होती. त्याच वेळी प्राण वगैरे इतर काहींची माहिती करून द्यावयाची होतीच. राहून गेले . आज एक महत्वाचा विषय "अविद्या" थोडा हाताळू. अविद्येकडे वळावयाच्या आधी "विद्या" म्हणजे उपनिषदात काय म्हटले जाते हे पाहणे जरुरीचे आहे. उपनिषदकाली मूर्तिपूजा अस्तित्वात नव्हती. आदित्य अग्नि, चंद्र पंचमहाभुते, संहितादि ग्रंथ, यांच्याशी आचारधर्म निगडित होता. यातून "प्रतिकात्मक" उपासना सुरू झाली. ही प्रतिकोपासना हे "विद्या"चे सूत्र. उपनिषदांत विद्या अनेक आहेत. त्यातील काही : ब्रह्म ,आत्मा, अक्षि, अग्नि, अंगुष्टमात्र, आनंदमय, ईश, उद्गीथ, गायत्री, दीर्घायुष्य, पुरुष, प्राण, बालाकि, भूमा, मधु, मंथ, मैत्रेयी, यज्ञ, वैश्वानर,संवर्ग इत्यादि "अविद्या याचा अर्थ "विद्या नाही ती" अथवा "अपराविद्या" (कनिष्ष्ठ) असा नाही. असत् वस्तू भासवणारी शक्ती म्हणजे अविद्या वास्तविक जीवात्मा ब्रह्मापासून वेगळा नसताही जीवस्वरूप वेगळे दिसते, ते अविद्येमुळे. विश्व हे जसे मायाकार्य तसे जीव हे अविद्येचे कार्य होय. थोडक्यात पिण्डी अविद्या तसे ब्रह्मांण्डी माया. ईशावास्यामध्ये कर्माला (कर्मकांडांना) अविद्या का म्हटले ? सरळ आहे. ही अविद्याच तुमची "ही कर्मे म्हणजे मोक्षाचा मार्ग" अशी फसवणुक करीत असते. मित्र हो. आपल्या सगळ्यांचे संस्कृतचे ज्ञान काही उच्च दर्जाचे नाही. मान्य? तेव्हा आपले मराठी संत अविद्येबद्दल काय सांगतात ते बघू. शिवीं जे योगमाया विख्याती ! जीवीं तीते अविद्या म्हणती !! (एकनाथी भागवत ३.१०३) मायोपाधी ब्रह्म तो परमात्मा ! अविद्योपाधी ब्रह्म तो जीवु !! (विवेक सिंधु १५-३०) माया-अविद्या असा जोडशब्दही वापरला जातो पण माया ही संज्ञा व्यापक असून अविद्या ही व्याप्त आहे. माया अविद्या तेचि आरसे ! तेथ परब्रह्म प्रतिबिंब आपैसे !! ते ईश्वर जीवु ऐसे.! तेथ बोलिले !! (वि.सिं. ७-.३) माया परब्रह्माला परमात्म स्वरूपात आणते, तर अविद्या आत्म्याला जीवस्वरूपात बंदिस्त करते. (एक नम्र विनंती. श्री समर्थांचे अभ्यासू समथांची मते इथे टाकतील काय ?) अशी ही अविद्या. ती जीवाला बंधनात टाकत असली तरी परब्रह्माच्या संदर्भात तिला अस्तित्वच नाही. माऊलींनी अनुभवामृतात अविद्याखंडणाकरता १०० पेक्षा जास्त ओव्या खर्ची घातल्या आहेत. ते अविद्या नावावार कोटी करून म्हणतात "जी नावातच विद्यमान नाही , ती असणार तरी कशी ?" अविद्या येणे नावें ! मी विद्यमानचि नव्हे !! हे अविद्याचि स्वभावे ! सांगतु असे !! एकदा तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला की तुम्हाला बंधनात घालण्यास काही उरत नाही व मग बंधन घालणारी शक्तीही नसतेच. नेहमीचे उदाहरण म्हणजे सूर्याच्या संदर्भात अंधार नसतोच. अविद्या म्हणजे अज्ञान असे म्हटले की अज्ञान खंडण हे अविद्याखंडणच होते.. . . हा छोटा लेख short break सारखा. पुढे आहे मुंडक उपनिषद . शरद

वाचने 4293 वाचनखूण प्रतिक्रिया 5

ज्ञानोबाचे पैजार 13/07/2016 - 13:06
विद्या च अविद्या च यस्तद्वेदोभयं सह । अविद्याया मृत्यु तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते ॥ अर्थ अर्थात सांगता येणार नाही. पैजारबुवा,

शरद 14/07/2016 - 05:54
जो ज्ञान व कर्म हे दोन्ही एकत्र जाणतो, तो कर्माने मृत्यू टाळतो व ज्ञानाने अमर होतो ईशावास्योपनिषदातील अकरावा मंत्र शरद