मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(जंगलातला) आजोबा !!

जॅक डनियल्स · · जनातलं, मनातलं
'सुजय डहाके' हा एक मराठी चित्रपटसृष्टीतला प्रयोगशील दिर्दर्शक ! सुरवातीचा चा पिच्चर 'शाळा' काढून त्याने सगळ्यांना 'इचीभना' म्हणायला लावला. त्याचा नवीन येणारा चित्रपट म्हणजे 'आजोबा'! आजोबा नावाच्या एका बिबट्याची गोष्ट त्याने सुंदर चित्रबद्धीत केली आहे. आजोबाला बघा आणि अनुभवा ! 'आजोबा' हे कसले बिबट्याचे नाव..पण हाच बिबट्या वाघ महाराष्ट्राच्या जंगलचा राजा होता. जसा राजा आपल्या प्रजेपासून अंतर ठेवून राहतो तसा तो ऐटीत जंगलात राज्य करायचा पण नंतर हीच प्रजा मारुतीच्या शेपटी सारखी वाढत गेली आणि राजाचे राज्य कमी होऊ लागले. मग या महाराष्ट्राच्या जंगलात फारीस्टची लोकं (वळू!), लाकूड व्यापारी इ. असे स्वघोषित राजे राज्य करायला लागले. पहिल्यांदा या राजाचा रुबाब गेला नंतर राज्य गेले. नंतर तर त्याला खायची प्यायची ददात पडायला लागली. मग त्याचा राजाचा याच फारीस्ट लोकांनी आजोबा करून टाकला. 'आजोबा करणे' म्हणजे स्वतःहून एखाद्याला व्ही.आर.एस. देऊन टाकणे. त्याचे फक्त अस्तिव ठेवायचे पण त्याच्या मताला किंमत शून्य ! त्याला कुठल्या जंगलात राहायचे, त्याने काय खायचे, कुठे जायचे अश्या प्रश्नांची उत्तरे फक्त फारीस्टची लोकं त्यांच्या डोक्याने देणार आणि सरकारी भाषेत आमलात आणणार. जंगलातील हरणे-काळवीटे सलमान खान सारख्या बड्या लोकांची भक्ष झाल्यामुळे बिबट्याला गावात येउन कुत्री, कोंबड्या, किंव्हा बकऱ्या यावर आपली भूक भागवावी लागत आहे. भूकेपाई बिबटे गावात शिरतात आणि कुत्री, कोंबड्या पळवतात, खर तर म्हणता हे खूप धाडसाचे काम आहे, पट्टेरी वाघ पण गावात शिरताना दोन वेळा विचार करतो. पण बिबट्या हा चतुर आणि धाडसी असल्यामुळे त्यालाच हे जमू शकते. अश्याच एका भक्षाच्या शोधात बिबट्या २००९ च्या एप्रिल महिन्यात अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर या गावात आला आणि बिचारा विहरीत पडला. पण हाच बिचारा बिबट्या नंतर मोठा इतिहास घडवणार होता. त्या बिबट्याच्या नशिबाने त्याला विद्या अत्रेया भेटली.(फुल जोशी -शिरोडकर लव्ह स्टोरी ;)). विद्या (बिद्या नाही विद्या !!) अत्रेया ही बिबट्याबरोबर राहून बिबट्यांचे प्रश्न सोडवणारी एक पर्यावरणतज्ञ. अन्नाच्या शोधात बिबटे- जुन्नरची उसाची शेते, ठाण्याची टीकोजीनी वाडी, पवईची याय.याय.टी आणि शेवटी कोथरूड पर्यंत सगळी कडे फिरतात आणि मग त्यांचा या मानवजाती बरोबर संघर्ष सुरु होतो. याच निवासस्थानावरून होणाऱ्या संघर्षाचा २००३ पासून विद्या अत्रेया अक्षरशः जंगलात फिरून अभ्यास करत आहे. तिच्या कामाचे नाव म्हणजे प्रोजेक्ट वाघोबा !! विहारीतला बिबट्या खूप शांत असल्यामुळे त्याचे नामकरण झाले ते: " आजोबा ". या आजोबाच्या गळ्यात रेडीओ पट्टा टाकला आणि पायामध्ये मायक्रो चकती (क्रमांक:00006CBD68F)टाकली. हा रेडीओ पट्टा बिबट्या जिकडे जाईल त्याच्या संदेश उपग्रहाला पाठवत असतो, त्यामुळे तो कुठे आहे याचा साधरण पणे अंदाज लावता येतो. थोडक्यात गाडीचे जि.पी.एस. काम करते त्याच पद्धतीने हे काम करते पण जास्त क्षमता असल्यामुळे जंगलातून, डोंगर-दऱ्यातून पण संदेश पाठवू शकते. १ मे, २००९ ला 'आजोबाला' माळशेज घाटात सोडून देण्यात आले. विद्या आत्रेयाचा कयास होता की हा बिबट्या, अहमदनगरच्या आजूबाजूला फिरेल, जास्तीत जास्त जुन्नर ला जाईल, आणि आपण त्याचा अभ्यास करू शकू. पण 'आजोबा' हा सगळ्यांचा आजोबा होता हे ती विसरली. १ ते ७ मे पर्यंत त्याने माळशेज च्या घाटात टंगळमंगळ केली आणि मग तो सुटला. १५ मे ते २२ मे च्या दरम्यान त्याने बेक्कार रहदारीचा मुंबई-आग्रा महामार्ग (NH४)ओलांडला आणि तो डहाणू जिल्ह्यामध्ये 'वाडा' गावात पोहचला. त्यानंतर आजोबा वसई औद्योगिक वसाहतीच्या जवळून गेला तरी त्या खूप लोकसंख्येच्या प्रदेशात पण कोणाला त्याने त्रास दिला नाही. आजोबाला शोधताना खूप वेळा रेडिओ संदेश नाहीसा होत होता, तरी त्या वरून विद्या अत्रेयाने अंदाज लावत लावत आजोबाचा पाठलाग चालू ठेवला. त्यानंतर आजोबाला खूप मानवी वस्तीच्या प्रदेशातून जावे लागले तरी तो आपला मार्ग अनुभवी आणि शांतपणे कापत होता. मे २२ ते २९ मध्ये आजोबा ठाणे जिल्ह्यातील शिरसाड गावात दिसला आणि नंतर मग त्याचा माग भिवंडी मध्ये लागला. तुंगारेश्वर-अभय जंगलातून शेवटी त्याने संजय गांधी उद्यानाच्या नागला- जंगलात प्रवेश केला. आजोबा खूप चतुर होता, कुठल्याही प्ररीस्थितीत तो माणसांच्या संपर्कात आला नाही,त्याने लपून छपून- शांतपणे हा १२० किलोमीटर चा प्रवास केला. नंतर त्याने कमालच केली, वसईची खाडी पोहून, आजोबा बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानाच्या मुख्य जंगलात शिरला. आजोबाचा प्रवास वरती दिलेला नकाशा बघाल तर समजेल की आजोबाचा प्रवास काय भन्नाट होता ते. विद्या अत्रेयाने अनुमान काढले की 'संजय गांधी उद्यान' हे आजोबाचे मूळ वसतीस्थान असेल आणि फारीस्ट लोकांनी त्याला त्याच्या लहानपणी माळशेज जवळ सोडून दिले असेल. संजय गांधी उद्यानाच्या चारही बाजूने कॉंक्रीट चे जंगल वाढत आहे म्हणून तिथल्या काही प्राण्यांची दुसऱ्या जंगलात सोय(निर्वासित छावणीत !) केली जाते. हा मूळ-निवासस्थानाचा खडतर प्रवास आजोबाने कसा केला हे एक मोठं कोडे आहे. १ मे ते जुलै १७ पर्यंत विद्या अथ्रेया आजोबाचा माग ठेवत होती पण नंतर जुलै च्या शेवटच्या आठवड्यात, आपल्या आजोबाचा संजय गांधी उद्यानाच्या बाजूने जाणाऱ्या महामार्गावर ट्रकखाली दुखःद शेवट झाला. काय दिले या आजोबाने ? त्याचा हा फक्त १२० किमी चा प्रवास नव्हता तर तो 'आम्हाला पण जगू द्या- आम्हाला आमचे जंगल परत द्या- आम्हाला निर्वासित करू नका' असा आक्रोश होता. मी कात्रजच्या वन्यजीव अनाथालयात कार्यकर्ता असतना असाच एक जुन्नर चा बिबट्या उपचारासाठी आणला होता. त्याच्या डोळ्यातले भाव बघून मला ग्याडीयेटर मधला रसेल क्रो आठवला. तो भाव अनेक लोकांच्या मते हिंस्त्र असेल पण माझ्यासाठी 'स्वतः ची चूक नसताना कुठल्यातरी लोकांच्या स्वार्थासाठी कैदेत टाकलेल्या' शूर राजाची आठवण करून देणारा होता. आजोबा हा सिनेमा कसा असेल मला माहित नाही. पण मला वाटते की त्यानिमित्ताने 'लोणावळा -खंडाला- महाबळेश्वरला थंड हवेचे ठिकाण ' आणि बिबट्याला फक्त हिंस्त्र जनावर मानणाऱ्या लोकांना थोडी खऱ्या बिबट्याची ओळख होईल. म्हणूनच फक्त उर्मिलासाठी 'आजोबा' हा सिनेमा बघू नका.( रंगीला, दौड बघा ..!!) 'आजोबा' फक्त हा शूर आणि समंजस बिबट्यासाठी बघा. त्याची जगण्याची धडपड बघा. सिनेमा संपल्यावर आजोबाचा मूक आक्रोश विसरू नका. आपल्या स्वतः च्या आजोबांचा जसा आदर करतो तसा या निसर्गातील आजोबांचा आदर करा, त्यांना निर्वासित करू नका किंवा वृद्धाश्रमाची वाट दाखवू नका. ज्या निसर्गामध्ये आपण राहतो, त्या निसर्गाने आपल्याला काय दिले आणि आपण त्याचे काय करणार आहोत याची नेहमी जाण ठेवा.

वाचने 13611 वाचनखूण प्रतिक्रिया 50

पैसा Sun, 06/16/2013 - 19:50
कसा असेल माहित नाही. पण आजोबाची कथा कोणत्याही सिनेमापेक्षा थरारक आहे. मात्र एवढ्या संकटांतून सुटून त्याचा शेवट एका ट्रकखाली झाला हे वाचून वाईट वाटलं. :(

In reply to by पैसा

जॅक डनियल्स Sun, 06/16/2013 - 21:51
हो ना ! रस्त्यावरील सापांचे आणि वन्यप्राण्यांचे मृत्यू हा एक अभ्यासाचा विषय आहे. रात्री रस्ता लवकर गार पडतो, त्यामुळे शरीराचे तापमान थंड करण्यासाठी साप, सरडे इ.रस्त्यावर येतात आणि गाडी खाली चिरडले जातात. खूप प्रमाणात हे मृत्यू होतात. रात्री अप्पर लावून ट्रक जातात त्यामुळे डोळे दिपून वन्यप्राणी गाडीखाली येतात. आजोबा पण असच अप्परमुळे चिरडला गेला.

In reply to by जॅक डनियल्स

पैसा Sun, 06/16/2013 - 22:44
अगदी आमच्या कॉलनीच्या मागे लगेच जंगल सुरू होते. शेवटच्या रस्त्यांवर संध्याकाळी उशीरा हमखास साप पसरलेले असतात. तसेच बेळगावला जाता येता संध्याकाळी उशीर झाला की गाड्यांसमोर खूपदा ससे, डुकरे, छोटी हरणे, गवे असे प्राणी येतात आणि उजेडात ते बिचकलेले दिसतात. हल्लीच पश्चिम बंगालमधे रेल्वेखाली ४ हत्ती मेल्याची बातमी वाचून काळीज चरकले होते. त्यातल्या एका पिलाचा फोटो पाहून तर फारच वाईट वाटलं.

In reply to by पैसा

जॅक डनियल्स Sun, 06/16/2013 - 23:05
पुण्यातले विलास काणे यांनी महाबळेश्वरमधील रस्त्यावरती चिरडले जाणरे साप या वरती संशोधन केले आहे. त्यांची माहिती धक्कादायक आहे. एका वर्षात ६,००,००० साप चिरडले जातात. त्यांनी त्यावरती 'एका निष्पाप जीवाचा अंत आणि The End of an Innocent Life या चित्रफिती बनवल्या आहेत.

In reply to by जॅक डनियल्स

पैसा Sun, 06/16/2013 - 23:11
भयंकर मोठा आकडा आहे. :( तुमच्या लेखातली प्रोजेक्ट वाघोबाची लिंक आवडली. वाचनीय आणि प्रेक्षणीय. तिथले सगळे फोटो पाहिले आणी लेख वाचले. व्हिडिओ मात्र सवडीने पाहीन.

In reply to by मोदक

जॅक डनियल्स Mon, 06/17/2013 - 04:50
पण तो खरा आहे. महाराष्ट्रामधील बहुतांशी पर्यटन स्थळामध्ये (थंड हवेची ठिकाणे ;)) असेच वन्यप्राण्यांचे हाल होत असतात. पण खूप बातम्या बाहेरच येत नाही.

गणपा Fri, 06/21/2013 - 13:13
परवाच चित्रपटाचा ट्रेलर पहाण्यात आला. तेव्हाच हा चित्रपट पहायचा असं ठरवलय. (कधी? कुठे? कसं? माहित नाही.) आजोबाचा प्रवास थक्क करणारा आहे. त्याचा दुदैवी मृत्युने हळहळ वाटली.

garava Sun, 06/23/2013 - 07:29
http://www.maayboli.com/node/43378. 'आजोबा' चा trailor पहायचा असल्यास इथे पहा. चालतं ना दुसऱ्या संस्थळाची लिंक दिली तर?

In reply to by garava

जॅक डनियल्स Sun, 06/23/2013 - 08:01
चालते ना ! पण आजोबाची विडिओ ची लिंक मी "आजोबाला बघा आणि अनुभवा" मध्ये दिली आहे. तुम्ही ती त्यावर टिचकी मारून बघू शकता.

सहज गुरुवार, 06/27/2013 - 13:37
म्हणे मुंबईत मुलुंड्च्या कोण्या सोसायटीत येउन गेला एक आजोबा, सीसीटिव्ही फूटेज मधे दिसतेय कुत्र्याला पकडून नेले त्याने. आधीक माहीती येथे

In reply to by सहज

जॅक डनियल्स गुरुवार, 06/27/2013 - 20:04
धन्यवाद ! लिंक दिल्याबद्दल. आपण त्यांच्या जंगलात घर बांधले तर तो आपल्या घरी येणारच. बिचाऱ्याला उपास घडला असेल आणि मग त्याला हे कुत्रे मिळाले असेल. काय मस्त शिताफीने पकडलेना त्याला !

एस Mon, 07/01/2013 - 00:47
ज्या निसर्गामध्ये आपण राहतो, त्या निसर्गाने आपल्याला काय दिले आणि आपण त्याचे काय करणार आहोत याची नेहमी जाण ठेवा.
माझ्या मनातली खंतच बोलून दाखवलीस मित्रा... विशेषतः आपण त्याचे काय आत्ताच करत आहोत हे पाहून नक्की मनाच्या संवेदना हरवल्यात की आपण जिवंतच नाहीओत हे कळत नाही.

चिगो Tue, 07/02/2013 - 14:22
आगामी चित्रपटाची सुंदर ओळख करुन दिली आहेस, मित्रा..
ज्या निसर्गामध्ये आपण राहतो, त्या निसर्गाने आपल्याला काय दिले आणि आपण त्याचे काय करणार आहोत याची नेहमी जाण ठेवा.
हम्म.. खंत योग्य आहे, पण फार काही होणार नाही. काँक्रीटच्या जंगलात रहात असतांना निसर्ग जपायला जमत नाही जास्त. आणि खर्‍याखुर्‍या जंगलात राहणार्‍यांची "कॉम्पिटीटीव्ह हाव" इतकी वाढलीय की पारंपारीक मुल्ये, निसर्गाला जपण्याची वृत्ती आता त्याला जास्तीत जास्त ओरबाडून आपले खिसे भरण्याकडे जायला लागली आहे.. "नैसर्गिकरीत्या समृद्ध असलेल्या प्रदेशांचा निसर्ग वाचवण्यासाठी विकास करु नका" असं मी म्हणत नाही, पण विकास करतांना लक्षात ठेवायला पाहिजे की निसर्गात केलेली लुडबूड कित्येकदा "इर्रिव्हर्सेबल" असते. उदाहरण द्यायचे झाल्यास, मी मेघालयात जिथे आहे तिथे "ट्रॅडिशनल ट्रायबल राईट्स"च्या नावावर अंदाधुंदपणे कोळसा काढला जातोय. मी ह्या गोष्टीला आणि मजुरांच्या असुरक्षिततेमुळे जेव्हा कोळसा-खाणी बंद करायला लावल्या, तेव्हा सगळे तुटून पडले माझ्यावर. त्यातली "लै भारी" ऑब्जेक्शन्स म्हणजे, "खाण अपघातात मजुरांचा बळी जाण्याच्या घटना नेहमीच होत आल्याहेत. तुमच्या आधीही बरेचजण आलेत पण कुणीच खाणी बंद करायला सांगितलं नाही. तुम्ही का सांगता?" दुसरं, "अश्या खाणी मेघालयच्या इतर भागातही आहेत. त्या बंद करायला सांगितल्या नाहीत. मग गारो हिल्सवरच हा अन्याय का?", तिसरं आणि सगळ्यात जोरदार.. " खाणीत होणारे अपघात आणि त्यात होणारे मृत्यु ह्यातूनच आम्ही जड मशीनरीज वापरतांना काय काळजी घ्यावी, हे शिकतो !!" ही ऑब्जेक्शन्स माझ्याकडे लिखीत स्वरुपात आहेत, आणि ऑर्डर मागे न घेतल्यास सर्वव्यापी आंदोलनाची धमकीपण आहे.. ;-) माझ्या ऑर्डरचे "पोलिस-बल नाहीये" आणि इतर अनेक राजकीय, सामाजिक कारणांनी धिंडवडे निघाले असले, तरी कमीत कमी "टेकन फॉर ग्रँटेड" अ‍ॅटीट्युडविरुद्ध सुरुवात तर झालीय, ह्याचेच समाधान आहे मला..

In reply to by चिगो

पैसा Tue, 07/02/2013 - 17:11
चिगो, अशा घटनांच्या विरुद्ध उभे रहायला धैर्य लागते. ते दाखवल्याबद्दल प्रचंड कौतुक वाटले. अभिनंदन! जमेल तेवढे नक्कीच कर. पण काळजी घे! सध्या उत्तराखंडात झालेला प्रलय सुद्धा अंदाधुंद धरणे बांधणे, वीज प्रकल्प. जंगलतोड, नदीकाठी केलेली बांधकामे यामुळे जास्त हानिकारक ठरला असे आता दबक्या आवाजात ऐकू येऊ लागले आहे. आपण निसर्गाशी जवळीक ठेवली नाही तर तो आपल्या मार्गाने शिक्षा देतो हे तात्पुरत्या फायद्यासाठी कोणी लक्षात घेत नाही. पण अशी शिक्षा मग निरपराधांना देखील होते. गोव्यातल्या पर्यावरणाला हानिकारक खाणी बंद केल्या तर खाणमालकांनी तिथल्या कामगारांना पुढे करून आंदोलने सुरू केली. :( असेच सगळीकडे चालते.

In reply to by पैसा

चिगो Tue, 07/02/2013 - 18:07
धन्यवाद ताई..
आपण निसर्गाशी जवळीक ठेवली नाही तर तो आपल्या मार्गाने शिक्षा देतो हे तात्पुरत्या फायद्यासाठी कोणी लक्षात घेत नाही. पण अशी शिक्षा मग निरपराधांना देखील होते.
शिक्षा निरपराधांनाच होते, ताई.. कोळश्याचा पैसा जातोय खाणमालक, नोकमा ह्यांच्या खिशात आणि प्रदुषणा, ओव्हरलोडींगमुळे होणारी रस्त्यांची दुर्दशा, अपघात भोगावे लागतात जनतेला.. इथले काही नोकमा हेलिकॉप्टर विकत घ्यायच्या गोष्टी करु शकण्याइतके श्रीमंत आहेत !! मेघालयच्या गुहा,चुनखडीच्या गुहा ह्या इथल्या "हायड्रॉलॉजीकल सायकल"च्या अविभाज्य भाग आहेत. खोदकामामुळे त्या एकदा कोसळल्या की वृक्षलावणी सारख्या त्या पुन्हा उभ्या करता येणार नाही.. पण जेव्हा हे कळेल, तेव्हा वेळ कधीच परत न येण्यासाठी निघून गेलेली असेल.. :-(

In reply to by चिगो

यशोधरा Tue, 07/02/2013 - 23:51
चिगो, तुमचे मनापासून अभिनंदन! ह्याबद्दल सविस्तर लिहाल का? गारो हिल्स हे अनेकविध दुर्मिळ फुलपाखरांसाठी ठाऊक असलेले नाव आहे. तिथल्या नैसर्गिक संपत्तीची विल्हेवाट लावली जात आहे का? :(

In reply to by यशोधरा

चिगो Mon, 07/08/2013 - 14:46
जास्त लिहू शकत नाही, कारण की ती आत्मस्तुती ठरेल. गोष्ट अशी आहे, की इथे "कोळसा खाण" हा एक प्रमुख व्यवसाय आहे. "ट्रॅडीशनल ट्रायबल मायनिंग राईट्स"च्या नावावर कुठल्याही नियंत्रणाविना हे खोदकाम सुरु असते. खनन विभागाचे म्हणणे की ह्या खाणी आमच्याकडे रजिस्टर्ड नाहीत. (मात्र रॉयल्टीचे पैसे नित्यनेमे घेतले जातात ;-)) त्यामुळे आम्ही काही करु शकत नाही. मजूर विभागाकडे भरपुर कायदे आहेत, पण त्यांचे म्हणणे आहे की "रजिस्टर्ड" नसल्याने आम्ही काही करु शकत नाही. म्हणजे तेरी भी चुप और मेरी भी चुप.. ह्या खाणींमध्ये काम करणारे बहुतांश मजुर आसामातून येतात, आणि त्यातही मुस्लिम समाजातून.. "गैर की जान सस्ती" ह्या नियमानुसार त्या मजूरांना कसल्याही सुरक्षा-सुविधा नसतात. मी आल्यापासून ८ मजूरांचा जीव गेलाय खाण अपघातांत... शेवटी ह्यांच्या सावळ्या गोंधळाला कंटाळून मी सीआरपीच्या कलम १३३ नुसार ह्या खाणींना "असुरक्षित व्यवसाय" घोषीत केलं आणि खाणकाम बंद करायला लावलं. पण त्यातही गोची आहे.. १३३च्या ऑर्डरला न मानल्यास जास्तीत जास्त शिक्षा ६ महीन्याची आहे, आणि आमच्या इथल्या पोलिस आणि कायदाव्यवस्थेचे जे काही हाल आहेत, त्यापायी कायद्याचा "डेटरंस" हा प्रकारच नाहीय. असो. फायदा हा झालाय की आता "ट्रॅडीशनल राईट्स" नाहीयेत्,हे यांना कळलंय. माझ्याविरोधात का होईना, खाणमालक एकत्र आलेयत. मी त्यांना काही गोष्टी करणे कसे त्यांच्या फायद्याचे आहे, हे सांगतोय. संबंधित विभाग, चरफडत का होईना, थोडे हलाय-डुलायला लागलेयत. आणि काही अवांच्छित घटना घडल्याने पोलिस माझी ऑर्डर इंप्लिमेंट करत नाहीयेत / करु शकत नाहीयेत, हे वरपर्यंत स्पष्ट झालंय. खरं सांगायचं झाल्यास,कोळसा खोदकाम ही इथली "मेजर इकॉनॉमिक अ‍ॅक्टीव्हिटी" असल्याने ती पुर्णपणे बंद होणार नाहीय, हे मला माहीत आहे. जबरदस्ती केल्यास ती बेकायदेशीरे रित्या आणखी भयंकरपणे फोफावेल. (स्मगल्ड अ‍ॅक्टीव्हिटी) ती नियंत्रीत, जागरुक पद्धतीने चालावी, हाच माझा उद्देश आणि प्रयत्न आहे, इतकंच..
गारो हिल्स हे अनेकविध दुर्मिळ फुलपाखरांसाठी ठाऊक असलेले नाव आहे.
नक्कीच.. "संरक्षण ट्रस्ट" नावाची एक संस्था ह्याविषयी चांगलं काम करतेय. त्यांनी एक चित्र-पुस्तकही काढलंय ह्यावर. हवं असल्यास पत्ता सांगा, पाठवतो.. :-)

In reply to by चिगो

जॅक डनियल्स Wed, 07/03/2013 - 07:38
बरोबर आहे तुमचे एकदम ! तुम्ही जे काही करत आहात ते खूप उच्च आहे, आम्हाला पण त्याची ओळख होऊ दे. मेघालयात राहून हे काम करणे केवढे अवघड याची मी फक्त कल्पनाच करू शकतो. तिकडे अजून निसर्ग खराखुरा उरला आहे, नक्षलवादी भागामुळे त्यांची थंड हवेची ठिकाणे तरी झाली नाही. माझा एक मित्र अरुणाचलप्रदेश मध्ये इगल नेस्ट नावाच्या सुरक्षित जंगलात काम करायचा, त्याला जवळपास १ वर्षाला एक अशी नवीन जात (सापाची,सरड्याची, विंचवाची) मिळायची.मला जायचे होते पण रगाड्यात जमले नाही. तुमच्या लेखाची वाट बघतो आहे.

In reply to by चिगो

बॅटमॅन Sat, 07/06/2013 - 15:35
याला म्हणतात कर्ते सुधारक. मान गये, दंडवत घ्यावा _/\_ हजार लेख अन एक कृती यांत अशा ठाम कृतीचे पारडे कधीही वरचढच ठरते. बहुत काय लिहिणे, असोच.

भाते Tue, 05/06/2014 - 13:33
या शुक्रवारी आजोबा आपल्या भेटीला येत असल्यामुळे मुद्दामुन हा धागा वर पुन्हा काढतोय.

एस Tue, 05/06/2014 - 17:14
म्हणूनच फक्त उर्मिलासाठी 'आजोबा' हा सिनेमा बघू नका.( रंगीला, दौड बघा ..!!) 'आजोबा' फक्त हा शूर आणि समंजस बिबट्यासाठी बघा. त्याची जगण्याची धडपड बघा. सिनेमा संपल्यावर आजोबाचा मूक आक्रोश विसरू नका. आपल्या स्वतः च्या आजोबांचा जसा आदर करतो तसा या निसर्गातील आजोबांचा आदर करा, त्यांना निर्वासित करू नका किंवा वृद्धाश्रमाची वाट दाखवू नका.
नक्की बघणार जेडी...

जॅक डनियल्स गुरुवार, 05/08/2014 - 04:47
हा लेख जवळपास एक वर्षापूर्वी लिहिला होता. परवाच "आजोबा " चित्रपट गृहात लागला. सगळी कडे आपल्या आजोबाचे कौतुक चालू आहे, हे बघून मस्त वाटले.

In reply to by जॅक डनियल्स

सुहास झेले गुरुवार, 05/15/2014 - 21:24
चित्रपट आवडला नाय अजिबात... ह्या लेखात तुम्ही ज्या प्रकारे आजोबाचा प्रवास मांडला आहे, तितक्या तळमळीने सुजयला जमले नाही. सुजय डहाकेचे शाळाचे यश आणि उर्मिला ह्या दोन गोष्टींवर सिनेमा चालतोय. चित्रपटातले काही प्रसंग अगदी बालिश वाटले. असो. त्यावर उतारा म्हणून हा लेख परत वाचला. :) :)

In reply to by सुहास झेले

तुमचा अभिषेक Wed, 05/21/2014 - 14:55
बरेच जणांचे प्रतिसाद असेच आहेत या चित्रपटाबाबत. मी अजून नाही पाहिला, मात्र वर्षभरापूर्वीचे ट्रेलर पाहिले होते तेव्हा हा चित्रपट मस्ट सी यादीत टाकला होता. हा लेख आता वाचला, लेख सुंदरच, प्रतिसादातील माहीतीही छान. त्यामुळे हे वाचूनही त्या मस्ट सी वर शिक्कामोर्तब झाले असते. आता मात्र गोंधळलो आहे, जर एका चांगल्या विषयावर चित्रपट चांगला बनत नसेल तर तो न बघणेच उत्तम अन्यथा या बातमीने साधलेला इफेक्टही मनातून कमी होतो या मताचा मी.. पण त्याचबरोबर एखादा वेगळ्या विषयाच चित्रपट मराठीत बनत असेल तर त्यालाही एक प्रेक्षक म्हणून पाठिंबा देणे गरजेचे याही मताचा मी..

लेख एक वर्षापूर्वी लिहिला होता , तेव्हा मी सुद्धा ट्रेलर पाहून प्रभावीत झालो होतो , हाच सिनेमा हिंदीत का नाही, ह्याचा आशय भारतात सर्वत्र सहज समजेल असा आहे , पण ह्या सिनेमावर फसोबा म्हणून वृत्त पत्रात लिहिलेले आढळले. सिनेमाच्या कथेवर टीका ही एकांगी असू शकते. पण सिनेमच्या ग्राफिक दर्जावर टीका झाली आहे , सिनेमाचे ग्राफिक अव्वल असून त्यास वाईट म्हणणे एवढे सोपे नाही तेव्हा ज्यांनी हा सिनेमा पहिला त्यांनी ह्या बाजूवर प्रकाश टाकावा . लेखकाला वन्य प्राणी व त्यांच्या समस्या ह्यांची आवड आहे हे माहिती आहे ,पण त्यांनी प्रत्यक्ष सिनेमा पाहून मग लेख लिहिला असता तर बरे झाले असते. कारण आजकाल सिनेमे दोन श्रेणीत मोडतात . प्रत्यक्ष थेटरात जाऊन पाहण्याच्या लायकीचे किंवा आंजा वर किंवा घरी काही महिन्यांनी लागले तर फुकटात पाहण्यासारखे आत्मशून्य ह्यांचा प्रतिसाद ह्या दृष्टीने महत्वाचा वाटतो.

In reply to by निनाद मुक्काम …

धन्या Wed, 05/21/2014 - 17:50
सिनेमाचे ग्राफिक अव्वल असून त्यास वाईट म्हणणे एवढे सोपे नाही तेव्हा ज्यांनी हा सिनेमा पहिला त्यांनी ह्या बाजूवर प्रकाश टाकावा .
आम्ही "आजोबाची" गोष्ट पडद्यावर पाहायला गेलो होतो. सिनेमातील ग्राफीक्स किंवा अ‍ॅनिमेशन नाही. त्यामुळे ग्राफीक्स कितीही चांगलं असलं तरी ती सिनेमाची जमेची बाजू होत नाही. :)

In reply to by निनाद मुक्काम …

सुहास झेले Fri, 06/06/2014 - 16:31
ग्राफिक्स अव्वल? अजिबात नाही रे... अगदीच बालिश आहेत. वैतागून हसायला येतं कधीकधी. त्यातून विषयाबद्दल असणारी तळमळ अजून खालावली जाते.

मदनबाण Wed, 05/21/2014 - 16:05
चित्रपट पाहिला नाहीये,पण बिबळ्याचा वावर अगदी जवळुन अनुभवला आहे,संजय गांधी उद्यानातले बिबळे आमच्या इथे बर्‍यादा येत असे... शाळेत असताना आमच्या मित्रांचा ग्रुप बर्‍याचदा जंगलात जात असे... बिबट्याच्या ताज्या पाउल खुणा अगदी हाताचे बोट त्यावरुन फिरवुन पाहिल्या आहेत. माझ्या लहानपणीच्या काही आठवणी बिबट्याशी निगडीत आहे,त्यातलीच एक... या मित्राचा बंगला {कवार्टस} असा जंगलातच होता... मी आणि तो त्याकाळी ठाण्याच्या तरण तलावात पोहणे शिकण्यासाठी जात असे... माझे काम म्हणजे पहाटे लवकर उठुन त्याच्या घरी जाउन त्याला उठवुन मग आम्ही पोहण्यासाठी बाहेर पडणे...त्याच्या बंगल्याचा आवारात सगळी गर्द झाडी.मला ठावुक होते की तिकडे बिबट्या येतो तरी सुद्धा पहाटेच्या अंधारात वेगाने पावले टाकत मी त्याच्या घराकडे जात असे... दरवाजा दिसला की वेगाने अनेकदा बेल दाबत असे... कारण मागुन बिबट्या आला तर ? अशी भिती सतत वाटे.पण मला कधीही मोकळा बिबट्या दिसला नाही ! :( परंतु त्याचे जवळपास असणारे अस्तित्व आणि एकदा त्याचा आवाज ऐकुन माझा थरकाप मात्र उडाला होता, ते कधीच विसरु शकत नाही. बाकी वनविभागाची मंडळी बिबट्या पकडण्यात जास्त ट्रेन्ड नसावीत असे बर्‍याच वेळा वाटते...कारण पकडताना किंवा पकडल्या नंतर बिबट्या मेला अशा बातम्या अनेक वेळा वाचल्या आहेत ! आता काही इडियो देतो :- मुलुंड मधे बिबट्या तर सरळ बिल्डींग मधे येतो { तसा तो आमच्या कॉलनीत अनेक वर्ष आला आहे.} मागच्या महिन्यात चंद्रपुरच्या एका बिबट्याचा थरार पहायला मिळाला होता... जाता जाता :- आपल्या आधीचे लोक, यांना मारुन पेंढा भरुन शोभेची वस्तु म्हणुन ठेवत... काही वर्षांनी हा जीव डायनासॉर प्रमाणेच विलुप्त होइल आणि त्याच्या वरच्या डॉक्युमेंट्रींज फक्त पुढच्या पिढीसाठी उरली. मनुष्य प्राणी हा सगळ्यात स्वार्थी आणि असलेल्या स्वातंत्र्याचा गैर वापर करणारा आहे. :(

In reply to by मदनबाण

तुमचा अभिषेक Wed, 05/21/2014 - 17:42
भारीय विडीओ, भरवस्तीत बिबट्या.. कसली तारांबळ उडाली होती लोकांची .. दहावीत असताना मी आणि माझा मित्र नॅशनल पार्क ते कान्हेरी केवस हा मार्ग वेड्यावाकड्या शॉर्टकट रस्त्याने जाऊया या नादात कुठेतरी आतवर शिरलो होतो तेव्हा अशीच एक गुरगुर कानावर पडून आमची कसली फाटली होती ते अजून आठवतेय. इथून पुढे जावे की मागे जावे, चालत जावे की धावत जावे, गपगुमान जावे की मदतीसाठी आरडाओरडा करत जावे हे समजत नव्हते. अखेरीस शांतपणे हलक्या पावलांनी मागच्या दिशेला परतलो. इतर कोणाला यातले गांभीर्य जाणवो न जाणवो, आम्ही दोघांनी मात्र मृत्युच्या दाढेतून सुटून आल्यासारखेच अनुभवले होते.

म्हैस Fri, 06/06/2014 - 15:41
व्यंकटेश माडगुळ करांच्या 'परवचा' नावाच्या पुस्तकात 'अपघात ' नावाचा लेख आहे . वाघ माणसाला खाण्यासाठी मारत नाही तर घाबरून मारतो . नंतर तो नरभक्षक कसा बनतो ते सांगितलं आहे .

In reply to by म्हैस

आत्मशून्य Sat, 06/07/2014 - 02:32
संरक्षण, घाबरायचा म्हणून हल्ला करत असे. पण शिकार खायचीही असते हे मात्र त्याला जनावरांनीच शिकावीले अन गोम्धळ झाला बरकां...! आणी म स्त्रियांनी इतर कारणांसाठीही शिकार उपयोगात आणायला शिकवीले. जसे की.... अन्ने,वस्त्रे, निवारे वगैरे वगैरे वगैरे.