मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक आणि विस्तव वल्ल्यायण - एक परिचय

राजेश घासकडवी · · जनातलं, मनातलं
कांदा संस्थान - भारताची अग्नि ५ ही चाचणी यशस्वी होणार याचे भाकित तीन महिन्यांपूर्वीच मी केले होते असे जाहीर करून प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक यांनी संस्थानात खळबळ माजवलेली आहे. प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा हा वृत्तांत. "माझ्याकडे इमेल्स आहेत. आमच्या मित्रांना पाठवलेल्या." पुरावा म्हणून हातातले प्रिंटाउट फडफडवत प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक म्हणाले. "त्यात मी स्पष्टपणे लिहिलंय" आपला चष्मा लावत ते वाचायला लागले. 'मग, विस्तव पेटणार का पाच?' "हे माझ्या मित्राने विचारलेलं आहे. त्यावर माझं उत्तर आहे," 'हो.' "विस्तव म्हणजे अग्नि आणि पाचचा स्पष्ट उल्लेख आहेच! या इमेलवर तारखा आहेत १४ जानेवारी २०१२ च्या." पुन्हा त्यांनी प्रिंटाउट फडकावले. त्यांच्या चेहेऱ्यावर विजयाचा आनंद ओसंडून वाहताना स्पष्ट दिसत होता. चं. पी. कर्तक हे व्यवसायाने न्हावी, पण त्या विषयात त्यांनी के. श. संभारकर नापिकविद्यालयातून डॉक्टरेट मिळवली. 'कानावरचे केस कायमचे काढण्याचे कट्टर उपाय' या विषयावर त्यांचा प्रबंध होता. तिथेच काही काळ त्यांनी प्राध्यापकी करून 'पुराणकालातील क्षौरकर्मयंत्रे' या विषयावर संशोधन केले होते. या संशोधनानिमित्त संस्कृतमधली जुनी ग्रंथसंपदा अभ्यासण्यासाठी त्यांनी अलिकडच्या काळात जर्मनीलाही भेट दिली. (तेव्हापासून ते संस्कृताभ्यासक जर्मनांप्रमाणेच प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक असे नाव लावतात अशी माहिती चहापानात एका विद्यार्थ्याकडून मिळाली.) पण त्यांचा ओढा सुरूवातीपासूनच आध्यात्माकडे होता. अन्नमय शरीरावरचे केस काढण्याचा लवकरच कंटाळा आला. एखादा कुशल न्हावी जसा भोचकपणे गिऱ्हाइकाच्या भानगडींमध्ये शिरतो तसं सूक्ष्मात शिरण्याचा त्यांनी ध्यास घेतला. मग त्यांनी रिकाम्या वेळात तुंबड्या लावण्याऐवजी ध्यान लावायला सुरूवात केली. त्यांच्या मते अन्नमय शरीर हे केवळ बाह्य आवरण असते. एखाद्या न्हाव्याच्या धोपटीसारखे. त्याच्या आत वस्तरामय, कातरीमय, कंगवामय शरीरे असतात, तशीच आपल्या शरीराच्या आतही अनेक शरीरे असतात. त्यांवर अन्नमय शरीराची बंधने नसतात. ध्यान लावण्याच्या कामी त्यांना काही जिवलग सन्मित्रांची बहुमोल मदत झाली. त्यांनी प्रा. कर्तकांना विस्तव आणि काही पुराणकालीन वल्लींच्या सहाय्याने सूक्ष्मात जाऊन ही शरीरं विलग करण्याचे तंत्र शिकवले. "विस्तव हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. माझ्या 'विस्तव वल्ल्यायण' या पुस्तकात मी त्याविषयी लिहिलेलं आहे. ते मुळापासून वाचावं ही विनंती करतो." ही विस्तव-वल्ली साधना सुरू केल्यावर त्यांच्या लक्षात आले की डोळे मिटले की शरीराची धोपटी उघडून आतली शरीरे बाहेर येऊ शकतात. सुरूवातीला त्यांना साधना साधायला थोडे कष्ट पडले. कधी कधी ही सगळी बाहेर आलेली शरीरे आत परत भरून ठेवायला त्रास झाला. त्यांच्या 'विस्तव-वल्ल्यायण'मध्ये त्यांनी एकदा दाढीचा-ब्रशरूपी शरीर बाहेरच राहिल्याने आयत्यावेळी कसा गोंधळ झाला होता याचा गमतीदार किस्सा सांगितलेला आहे. पण नंतर सवयीने ते व्यवस्थित जमू लागले. "आपण नेहमी जे शरीर वापरतो ते वस्तरामय शरीर असते. जैविक चैतन्याचे ते प्रतीक आहे. वस्तरा हा शब्दच मुळात विस्तव किंवा अग्निवरून आलेला आहे. अग्नि म्हणजे प्राणज्योती. भौतिक जीवनाशी वस्तऱ्याचा संबंध उघड आहे. वस्तु, वास्तु, विस्तव, वस्त्र, वस्ती व वनस्पती या चराचराशी संबंधित असलेल्या सर्व शब्दांचे वस्तऱ्याशी साधर्म्य आहे हा योगायोग म्हणाल काय?" त्यांनी उलटा सवाल केला. परंतु वस्तरामय शरीराला स्थळकाळाच्या भौतिक मर्यादा असतात. मात्र विस्तव-वल्लींच्या सहाय्याने समाधी अवस्थेत तासन् तास घालवल्यानंतर त्यांना तुरटीमय शरीर बाहेर काढता आले. तुरटी जशी क्षणात पाण्यात विरघळते आणि पाणी स्वच्छ करते तसे हे त्यांचे शरीर वातावरणात अनंतापर्यंत क्षणात पोचू शकते असा त्यांना शोध लागला. त्याच सुमाराला त्यांना भारतीय शास्त्रज्ञांनी जाहीर केलेल्या अग्नि प्रक्षेपणास्त्राच्या मोहिमेविषयी कुतूहल निर्माण झाले. "इस्रोने आत्ता या अग्नि क्षेपणास्त्राची चाचणी केलेली असली तरी हे ज्ञान आमच्याकडे हजारो वर्षे आहे. विस्तव वल्ल्यायणमध्ये मी ज्या अनलास्त्राचा उल्लेख केला आहे तेच हे अग्नि क्षेपणास्त्र. विस्तव या शब्दाचा ग्रामीण उच्चार इस्तू. इस्रो आणि अग्नि क्षेपणास्र यांच्या अर्थ आणि शब्दसाधर्म्याचा अन्योन्य संबंध तुमच्या लक्षात आलाच असेलच. आपल्या पुराणातलं ज्ञानच आपण पुन्हा शोधून काढतो आहोत इतकंच." १४ जानेवारी २०१२ च्या रात्री त्यांच्या दुकानात पाच विस्तव पेटले. त्या समाधीअवस्थेत प्रा. कर्तकांनी आपले तुरटीमय शरीर बाहेर काढले आणि भविष्यकाळात विरघळू दिले. ते क्षणार्धात तीन महिने पुढे आले. "मी दुसऱ्या दिवशी माझ्या मित्रांना लिहिलेल्या इमेलमध्ये या अनुभवाचं बारकाव्यांसहित वर्णन केलेलं आहे" हातातल्या प्रिंटाउट्समधून कागद शोधून काढून ते वाचू लागले. 'माझं तुरटीमय शरीर मुक्त केल्यावर मला हवेत तरंगल्याचा भास झाला. मी थोडा पुढे गेल्यानंतर मला एक प्रचंड खांबाप्रमाणे आकृती दिसली. काही काळ मी तिच्या आसपास फिरून तिचं निरीक्षण केलं. ती खूपच प्रचंड होती. मग अचानक आसमंतात हादरे बसल्याचं जाणवलं. मोठ्ठे घरघरीचे आवाज यायला लागले. कुठेतरी आग लागल्याचं जाणवलं. मोठ्ठा प्रकाश पडला. आसमंतात धूर धूर झाला. मी त्या खांबाला घट्ट चिकटून होतो. तो खांब हळूहळू वर जात असल्याचं मला जाणवलं. मीदेखील वर गेलो. मग काही काळाने अंधार झाला. मी वातावरणाच्या बाहेर आल्यामुळे मला श्वास घ्यायला जड व्हायला लागलं. कोणीतरी खालती खेचत असल्याचा भास झाला. थोड्यावेळाने मात्र खाली आलो. त्यानंतर आठवतंय ते अनेकांचे आनंदाने चित्कारण्याचे, हसण्याचे आणि टाळ्या वाजवण्याचे आवाज....' "यात मी प्रचंड आकार, खांबाप्रमाणे दिसणं, बसणारे हादरे, घरघर, आग, प्रकाश, धूर, वर जाणं, वातावरणाच्या बाहेर जाणं, गुरुत्वाकर्षणाने खाली येणं आणि शास्त्रज्ञांच्या टाळ्यांचे आवाज - अर्थातच योजनेचं यश - हे सगळं तीन महिन्यापूर्वीच पाहिलं. या ११ पॉइंट्सपैकी ११ प्रत्यक्ष घटनेशी तंतोतंत जुळतात!" हातातले कागद समोरच्या टेबलावर ठेवत ताठ मानेने ते म्हणाले. आमच्या वार्ताहराने नंतर अन्यत्र चौकशी केली असता एक रोचक माहिती कळली. १४ जानेवारी २०१२ च्या रात्री प्रा. कर्तकांच्या दुकानाच्या परिसरात एका कचरापेटीला कोणीतरी आग लावली होती. तिथे असलेला पोलिस हवालदार बघायला गेल्यावर आग लावणारा घाबरून विजेच्या खांबावर वरवर चढायला लागला. त्याला तंबी देण्याऐवजी त्याला खाली कसं आणायचं हाच प्रश्न पडला. शेवटी कसंबसं त्याला उतरवल्यावर आसपास जमलेल्या अनेकांनी हवालदाराचं कौतुक करून टाळ्या वाजवल्या. अर्थात यात काही विशेष गुन्हा न घडल्याने या घटनेची सरकारदरबारी कसलीही नोंद नाही. तेव्हा तिचा इथे संबंध कसा हाही प्रश्न उपस्थित होतोच.

वाचने 6649 वाचनखूण प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

चौकटराजा 21/04/2012 - 07:17
कहर ! कहर! कहर ! राजेश राव आपल्याला एकदा "ओम सत्यम "च्या स्तरावर सूक्ष्म देहासह भेटतो. मजा येईल.

चित्रगुप्त 21/04/2012 - 10:15
वा वा वा राजेश... मस्त. आम्हीही नुकतीच सूक्ष्म लिंगदेहाने 'आम्रविका' खंडाची काल-यात्रा केली, तिचा वृतांत देण्याच्या विचारात आहोत.
हे बाकी खरेय तुमचे.. मी त्यांच्या व्याख्यानाला गेलो आहे. त्यांची हिंदू धर्माप्रतीची कळकळ ठीक आहे पण त्यांचा अती वैज्ञानिक वाद मला नाही आवडत, त्यासाठी मी त्यांच्याशी भांडलो पण आहे. शिवाय अध्यात्माशी निगडीत व्याख्यान देताना ते ज्या पद्धतीने समजावून सांगतात ते अजिबात पटत नाही. आणि शेवटची गोष्ट म्हणजे सूक्ष्म रूपाने फेरफटका मारून येणे, ते अगदीच कहर आहे. सध्या धर्म कसा वाढेल आणि त्याचे संवर्धन कसे होईल ते बघावे, ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली तिचा पाया जमिनीत किती होता ह्यावर शोध लावत बसण्याची अजिबात गरज नाही.
१) डॉ कर्तक हे उन्हाळ्यातही कोट - कंठलंगोट वगैरे घालतात २) त्यांच्या त्या तश्या अवस्थेत म्या पामराला त्यांच्याशी भेटण्याचा योग आला. ते स्वत:स प्रज्ञासूर्य असे विशेषण लावत असल्याने माझे बालमन त्यांविषयीच्या आकंठ आदरात बुडून गेले होते. ३) त्यावेळी ओळख पाळख पूर्ण झाल्यावर मी त्यांस अतिव आदराने म्हट्लो " आपल्याला भेटून आनंद झाला! मागच्या वेळी थोडक्यात चुकामूक झाली. तुम्ही मंगळावरून जस्ट निघत होता ; नेमका तेंव्हाच मी तिथे पोचलो. " उन्हाळ्या मुळे कर्तकांना घाम फुटू लागला. त्यामुळे अधिक संभाषणाला वाव मिळाला नाही. ता. क. : बाकी बिनपाण्याने हजामत कशी करावी ? ह्यावर आपले अमूल्य मार्गदर्शन आज लाभले.

In reply to by राजघराणं

छोटा डॉन 21/04/2012 - 12:28
३) त्यावेळी ओळख पाळख पूर्ण झाल्यावर मी त्यांस अतिव आदराने म्हट्लो " आपल्याला भेटून आनंद झाला! मागच्या वेळी थोडक्यात चुकामूक झाली. तुम्ही मंगळावरून जस्ट निघत होता ; नेमका तेंव्हाच मी तिथे पोचलो. " उन्हाळ्या मुळे कर्तकांना घाम फुटू लागला. त्यामुळे अधिक संभाषणाला वाव मिळाला नाही
हा हा हा. खरं आहे एकदम. अ‍ॅक्युअली मी महर्षी कर्तकांना सांगत होतो की तुमचे एक फ्यान श्री. राजघराणं तुम्हाला भेटायला येणार आहेत तेव्हा थोडी देर वाट पहावी, पण त्यांचा प्लुटो ग्रहाचा दौरा असल्याने तसे करणे शक्य झाले नाही. बाकी मलाही त्या दिवशी शनी ग्रहाला तेल घालायचे असे लवकर निघावे लागले व तुमची प्रत्यक्ष भेट हुकली, क्षमस्व. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

राजघराणं 21/04/2012 - 12:45
दर शनिवारी रात्री ९ नंतर आम्ही सूक्ष्मात जातो. आज मी चंद्रावर जाणार आहे. आपला दुसरीकडे दौरा ठरला नसेल तर भेटा तिकडे.

In reply to by राजघराणं

इथेही अग्नि-वल्ली साधना करणारे आहेत हे माहीत नव्हतं. आपले सूक्ष्मप्रवासाचे अनुभव जरूर द्यावेत ही विनंती. मिपाचा एक सूक्ष्म-कट्टा होऊन जाऊदेत मंगळावर.

In reply to by राजेश घासकडवी

मंगळावर भेट घेतल्यास, सध्या मंगळ पृथ्वीच्या फार जवळ असल्याने, बोंबाबोंब होण्याची शक्यता आहे. शुक्र झपाट्याने सूर्याच्या दिशेने जात आहे, लवकरच शुक्र सूर्यतेजात लुप्त होईल तेव्हा शुक्रावरच भेट घेतल्यास त्यातली गोपनीयता जपली जाईल. मा. श्री. राजघराणं, मा. श्री. छोटा डॉन आणि श्री. श्री. परमानंद घासूगुर्जी यांनी याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती.

सहज 21/04/2012 - 12:30
भारी! देवळातुन मौल्यवान मुर्त्या बरेचदा चोरी होतात तसे एखाद्या नाडीपट्टी केंद्रातून ट्रकभर पट्या पळवल्या. हिंदु धर्म व हिंदु वैदीक विज्ञानाच्या शत्रुंनी, कर्तक महाराज सुक्ष्म रुपात मोहीमेवर गेले असता त्यांचा देह पळवला असे कधी ऐकीवात नाही? तसेच कर्तक यांनी हे अमुल्य ज्ञान वाया जाउ नये तसेच देशाचे भले व्हावे म्हणून हिंदुस्थानच्या फौजात एक पलटण बनवली आहे का? का ती माहिती गोपनीय आहे सध्या?
धर्माची, संस्कृतीची, धर्मरक्षकांची आणि संस्कृतीरक्षकांची अशी खिल्ली उडवणार्‍यांचे वाटोळे होवो ! त्यांची राख रांगोळी होवो ! त्यांच्या सुखा समाधानावरून गाढवांचे नांगर फिरोत ! त्यांना रौरव नरक मिळो ! त्यांचे मढे बसो ! त्यांचा व्हिसा रद्द होवो ! आठव्या पातळीवरचा मांत्रिक परा

In reply to by कवितानागेश

ते कसे विसरलात तुम्ही ? सनातन आणी मूलनिवासी या दोन्ही पेपरचा नियमित वाचक . हे दोघे नस्ते तर आयुश्य रसहीन टरले असते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

"माननीय प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक'जी" इज द ग्रेट मॅन!!!.. आय नो हिम!... सूक्ष्म देहातून मन्गळावर आणि चन्द्रावरही ते जाऊन आलेले आहेत... त्यान्नी काढलेल्या प्रेडिक्शनचा "इस्रो"लाही फायदा झालेला आहे. चान्द्रयान मोहिमेनन्तर इस्रोच्या सरसन्चालकांना कर्तकान्ची भेट घेऊन जाहीर आभार मानायचे होते, पण सरकारने त्यान्च्यावर दबाव आणून ते रद्द करायला लावले. मी माझ्या लेखात कर्तक'जीन्ची महतीच सांगितली आहे. उगाच अशी शिव्याशापांची भाषा वापरून चिखलफेक करू नका.

स्पा 21/04/2012 - 12:49
घासुगुर्जी.. त्यांची एवढी प्रगल्भ बुद्धी अशी टुकार विडंबन पाडण्यात वाया घालवत आहेत हे पाहून आश्चर्य वाटले असो...

In reply to by स्पा

Nile 21/04/2012 - 21:52
घासुगुर्जींसारख्या प्रगल्भ बुद्धीच्या माणसाला बुद्धी कुठे वाया घालवावी हे कळत नाही म्हणजे आश्चर्यच आहे. मन्या फेणे सारखे लोक आहेत म्हणून बरे, नाहीतर या प्रगल्भ बुद्धी वाल्या लोकांचं काय झालं असतं कोणास ठावूक!

Nile 21/04/2012 - 21:50
त्यांच्या 'विस्तव-वल्ल्यायण'मध्ये त्यांनी एकदा दाढीचा-ब्रशरूपी शरीर बाहेरच राहिल्याने आयत्यावेळी कसा गोंधळ झाला होता याचा गमतीदार किस्सा सांगितलेला आहे.
=)) =)) शेवटच्या परिच्छेदात दिलेल्या खर्‍या घटनेचा दाखला सोडून इतर लेख आवडला. असे खरे दाखले चं पी कर्तकांसारख्यांच्या महान आणि अद्भुत कार्यावर विनाकारण शंकेची पाल चुकचुकवतात! इथून पुढे लेखक अशा चुका करणार नाही अशी आशा बाळगतो.

रमताराम 24/04/2012 - 09:18
खरं म्हणजे घासुगुर्जींच्या या उथळ आणि उछृंखल लेखावर प्रतिक्रिया न देता गप्प बसायचे ठरवले होते. पण प्रतिक्रिया देणे हा पुणेकराचा जन्मसिद्ध हक्क आहे तसेच पवित्र कर्तव्य असल्याने, बराच वेळ एखाद्या च्यानेलचा/ची प्रतिनिधी आमची भूमिका विचारायला येईल अशी वाट पाहून नाईलाजाने - इथे नाईल या आयडीचा संबंध नाही - इथेच प्रतिसाद देतो आहे. बादवे, काही तरी 'नवाच' व्यवसायधंदा करावा असे बरेच दिवसापासून ठरवतो आहे. जुन्या पोथ्यांतील अशी क्षौरयंत्रांपासून विमानांपर्यंत सारे काही बनवणारे एक रिलायन्सच्या तोडीचे (आणि बौद्धिक स्वामित्वहक्काचे पैसे वाचणार असल्याने फायदेशीर) असे कॉन्ग्लमरेट उभे करावे अशी इच्छा आहे. तो ग्रंथ तेवढा कर्तकांकडून मिळवून द्यायला मदत करा की. ५% पार्टनरशिप देतो. आरं मारशिला हसवून. तेज्यायला माणूस आहेस का कर्तक?