Skip to main content

टीआरपी साठी ’टेन कमांडमेंट्स’

लेखक रमताराम यांनी शुक्रवार, 20/04/2012 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: परागुरु यांचा हा धागा परागुरुंनी आयडी कसा काढावा नि त्याचा वापर कसावा याबाबत मौलिक मार्गदर्शन केलेले आहेच. ही पहिली यत्ता पार झालात की पुढच्या टप्प्यात आपले संस्थळ कसे चालवावे याबाबत अडवान्सड कोर्स घ्यावा अशी मनीषा आहे. (मनीषा आहे म्हणजे आमच्या माईंडमधे आहे. कोण ही मनीषा अशी खरड/व्य. नि. करू नये) नाही म्हणूच नका, प्रत्येक आयडीच्या मनात जसा एखादा डु. आयडी काढण्याची मनीषा (खुलासा वर पहावा) असते तसेच आपलेही एक संस्थळ असावे अशी खुमखुमी असतेच. तर जेव्हा तुम्ही असे संस्थळ सुरू करायचे मनावर घ्याल तेव्हा ते कसे चालवावे याबाबत 'टेन कमांडमेंट्स' मिपा नावाच्या 'माउंट सिनाय' वरून आम्ही तुम्हाला देत आहोत. या टेन कमांडमेंट्स सुमारे दोन वर्षांपूर्वी आम्ही एका संस्थळाच्या मालकांच्या वाढदिवशीची भेट म्हणून दिल्या होत्या आज त्याच तुम्हा भावी संस्थळ मालकांसाठी जीएनयू लायसेन्सखाली देतो आहे. १. एखादा ब्रँड अँबॅसिडर नेमा. (नाय हो मी आधीच बुक्ड आहे... ब्रँड अँबॅसिडर म्हणून हो) २. मधून मधून 'श्रद्धा/अश्रद्धा', 'शाकाहार/मांसाहार', 'हिरवा माज कुणाचा', वगैरे पाप्युलर धागे काढून धावफलक हलता ठेवा. यात आज एका बाजूला उद्या दुसर्‍या बाजूला राहून दोनही बाजूंचे उत्साह वाढवित रहावे. ३. तसेच अधे मधे 'कामू आणि सार्त्र यांचे अस्तित्वादावरील मतभेद', 'बिथोवनच्या सिंफनींमधील जीवनदृष्टी', 'विदग्ध काव्ये आणि भावरचना यांचा परस्परसंबंध', 'एरिक व्हॅन डॅनिकेन हा परग्रहावरचा अंतराळ्वीर', 'अमेरिकेच्या अर्थकारणातील घोडचुका', 'चे ग्वेव्हारा आणि लेनिन' वगैरे विषयावर लेख लिहावेत (विकिपिडियावरून घ्यावेत, पण मूळ लेखाचा संदर्भ देऊ नये, पकडले जाण्याची शक्यता असते.). असे बाउंसर टाकले की ब्याट्समन जरा तुमची इज्जत करू लागतात. ४. अगदी भुक्कड लेखांना - खास करून कवितांना - सतत उत्तेजनार्थ प्रतिसाद द्यावेत. त्यासाठी डु. आय. चा उपयोग करता येईल. (डु. आय डींबाबत माहितीसाठी परागुरूंचा लेख पहावा). यामुळे सगळे 'किंचित कवी' पळून न जाता त्यांचे लिखाण प्रकाशित करत राहतील. यामुळे दंगेखोरांना धुमाकूळ घालायला आयता धागा नि विडंबनसम्राटांना कच्चा माल मिळतो. काही उत्साही विडंबनसम्राटांना खरड टाकून 'नवा कच्चा माल' आल्याची सुवार्ता आपणच द्यावी. पुन्हा हे विडंबन 'नेहेमीसारखे जमले नाही' असे लिहून त्यांचा अहंकार डिवचत रहावे, जेणेकरून ईर्षाबद्ध होऊन ते अधिकाधिक विडंबने टाकत रहातात. ५. मधूनमधून स्थळावर काय सुधारणा कराव्यात असा कौल टाकावा. त्यामुळे मालक आपले सल्ले ऐकतात असा गैरसमज जोपासायला मदत होते. ६. मधूनमधून स्थळावरचे लेख एखाद्या वृत्तपत्राच्या पैलतीर, मुक्तपीठ वगैरे विभागात छापून आणावेत आणि सांगताना अमुकतमुक वृत्तपत्रातून छापून आल्याचा उल्लेख करावा. जालावर काही ब्लॉग स्वतःच निर्माण करून तिथे आपल्या स्थळावरील लिखाणाचा गौरवाने उल्लेख करावा. इकडे त्या ब्लॉग्सचे दुवे देऊन येथील लिखाणाची ब्लॉगविश्वाने चांगली दखल घेतल्याचा दावा करावा. ७. जालावरील अन्य स्थळांवर जाऊन कोणत्याही लिखाणाला प्रतिसाद देऊन असला/नसला संबंध जोडून इथल्या एखाद्या लिखाणाचा/प्रतिसादाचा दुवा द्यावा. यामुळे तिकडील सभासदांचे लक्ष वेधून घेता येते. ८. मधूनमधून सभासदांवर स्तुतीपर विशेषणांची खैरात करावी. एकाद्या स्त्री सभासदाला 'प्रियंभाषिणी' म्हणाचे, एखाद्या ज्येष्ठ सभासदाचा उल्लेख 'अभ्यासक' म्हणून करावा, त्यांचा अहंकार सुखावतो (स्वानुभवावरून सांगतो), एखाद्याला विशिष्ट प्रकारच्या साहित्याची 'जाण' आहे असे म्हणावे. एखाद्या शिंगे मोडून वासरात शिरू पाहणार्‍या ज्येष्ठाला 'वयाच्या मानाने तुमचा अभ्यास खूप आहे' असे म्हणून खूष करावे (त्यातील टोमणा इतरांना लक्षात आल्याने ते ही खूष होतात). ९. ताबडतोब एक संपादक मंडळ नेमून कारभार त्यांचा हातात दिल्याचे जाहीर करावे. आपण दंगा करायला मोकळे होतो. परत धागा/प्रतिसाद उडला/संपादित झाला तर संपादकाकडे बोट दाखवून कानावर हात ठेवता येतात. पुन्हा आपणच संपादकांच्या नावे शंख करून 'या' बाजूला असल्याचे दाखविता येते. इथेही संपादक विरूद्ध सभासद वादात दोन्ही बाजूंनी प्रतिसाद देत धावफलक हलता ठेवता येतो. १०. अधूनमधून 'धंदा मंदा असल्याची' तक्रार करीत रहावे. ज्यामुळे मालक स्वतःच्या खिशातून पैसे घालून स्थळ चालवित असल्याची जाणीव सभासदांना होत राहिल नि तुमचा 'बेडकाचा राजा' होणार नाही. जोपर्यंत एखादा कॉन्स्टंटाईन येऊन यात ढवळाढवळ करीत नाही तोपर्यंत या कमांडमेंट्स पुरेशा व्हाव्यात. भावी संस्थळ मालकांना आगाऊ शुभेच्छा.

वाचने 6637
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

संस्थळ कसे चालवावेच्या टीपा आवडल्या. क्र.३, क्र.७ आणि क्र. १० च्या मुद्याला पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत. परंतु काही मुद्दे अधिक स्पष्टीकरणासह आले पाहिजे होते, त्यामुळे काही गुण वजा केले आहेत. -दिलीप बिरुटे (उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेला प्रा.डॉ.)

वयाच्या मानाने तुमचा अभ्यास बराच दिसतोय! ;) लै भारी! याला क्रमशः का नाही बरे?

In reply to by पैसा

:). तुमच्या टोमण्याची दखल घेतल्या गेली आहे. शिंगे पुन्हा चिकटवून लोकांवर उगारण्याची प्रॅक्टिस चालू केली आहे.

In reply to by रमताराम

उद्देश सफल झाला! तेच तर पाहिजे होतं ना!

et tu, ररा? ;)

२. मधून मधून 'श्रद्धा/अश्रद्धा', 'शाकाहार/मांसाहार', 'हिरवा माज कुणाचा', वगैरे पाप्युलर धागे काढून धावफलक हलता ठेवा. यात आज एका बाजूला उद्या दुसर्‍या बाजूला राहून दोनही बाजूंचे उत्साह वाढवित रहावे. पॉप्युलर धाग्यांची लिस्ट अजून वाढवता आली असती ;) असो. बाकी मजा आली वाचायला! =)) =))

घासु, ररा यांच्यासारख्या हुशार गुर्जींना बहुदा बरेच संस्थळवाचन करुन येणारा लेखनकंड सोसवत नसल्याने त्यांच्या कुवतीपेक्षा निम्न दर्जाच्या विषयांवरचे लेख लिहतात. नको त्या विषयात त्यांची उर्जा खर्च करतात. मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच प्रभावी लेखक तयार झाले आहेत त्यामुळे दोन्ही गुर्जींनी काळजी करु नये व आता त्यांनी धनंजय व चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाउन संयमाचा पुढचा कोर्स करावा इतकेच म्हणतो. जेष्ठ नावे पाहून उत्साहाने लेखन वाचून पब्लीकचा भ्रमनिरास होउ देउ नये. गेलाबाजार डु आयडीने तरी हे लेख टाका.

In reply to by सहज

सहज, स्पष्ट प्रतिक्रियेबद्दल आभार रे. मुद्दा लेखनकंड शमवण्याचा नसतो रे. अधूनमधून आपल्यातले चारघौघांसारखे असणे इतरांनाही समजते यातून. आम्हाला आयुष्यातले सगळे रंग आवडतात, प्रत्येक रंग आपापला रस घेऊन येतो तो चाखून पहायला आमची ना नसते. त्यात थोडी थट्टा-मस्करी, जरा लुटूपुटुची भांडणेही आपलेपणच घट्ट करत नेतात. एखाद्या रांगत्या पोराबरोबर जसे रमतो आम्ही तसेच एकाद्या व्युत्पन्न नि परिपक्व विद्वानाबरोबरही (हे जाऊ द्या की विद्वान आमच्याबरोबर रमत नाहीत.). आयुष्य बहुरंगी आहे ते तसेच असावे असे आम्हाला वाटते. एकिकडे बोरकरांच्या कवितांवरचा सुनीताबाई-पुलंचा कार्यक्रम ऐकून तृप्त होतो तसेच कणेकराने विविध लोकांची उडवलेली टोपी ऐकून खुदूखुदू हसतोही. थोडक्यात आम्ही अजून पुरेसे जड झालेलो नाही. आता त्यांनी धनंजय व चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाउन संयमाचा पुढचा कोर्स करावा इतकेच म्हणतो. नावे घेतल्याने प्रतिक्रिया देणे अवघड झाले आहे. कारण माझे मूल्यमापन हे या दोघांवर टीका समजली जाऊ शकते. त्यामुळे या दोघांची आगाऊच क्षमा मागून पुढे लिहितो. 'आय डोन्ट कन्सिडर मायसेल्फ इन द सेम लीग' (मराठीत नेमका अर्थ मांडता आला नाही.) मी इथे लिखाण करतो ते इतरांनी वाचावे, प्रामाणिक प्रतिसाद द्यावेत म्हणून. याचसाठी जालावर अनेक लोक मला आजोबा, म्हातार्‍या म्हणतात हे मीच जाणीवपूर्वक जपलेले आहे. ती जवळीक हवीच आहे मला. माझे ज्ञान फक्त इथे चार लोकांना दाखवून कौतुक करवून घेणे यासाठी इथे आलो नाही मी. अनेकांशी वैयक्तिक मैत्री झाली - ज्यात तू ही आलास - यात त्यांना 'आपल्यातला' वाटण्याचा मोठा भाग असतो. एकवेळ माझे लिखाण टुकार आहे असे एखाद्याने म्हटले तरी चालेले, ते म्हणण्यासाठी का होईना त्याने ते वाचले एवढे समाधान मला पुरे आहे. 'स्वान्त सुखाय' लिहायचेच तर पर्‍याने दिलेली डायरी आहेच की, फारतर ब्लॉगवर लिहू. इथे चार-जणांशी संवाद प्रस्थापित करायचा तर संवादाला थोडा बेस हवा. थोडक्यात, मला धनंजय नि चिजं व्हायची इच्छा नाहीच. किंवा ते माझ्यासारखे नाहीत एवढ्याच कारणासाठी ते चूक आहेत असेही नसते. प्रत्येकाचा आयुष्याकडे बघण्याचा, घडवण्याचा दृष्टिकोन असतो, त्यानुसार आपण वागत्/जगत असतो. उगाच कोणाच्या पाठुंगळी बसलो म्हणून मी त्याच्यासारखा होत नाही. मला माझी कुवतही विचारात घ्यावी लागते नि मी ती घेतोच. जाऊ द्या. मस्त दंगा करायच्या धाग्या उगाच शिरेस कशाला व्हायचे. चला 'कवडसे' पाडले आहेत, ते तुम्हाला आवडतात का बघा बरं.

In reply to by सहज

...कुवतीपेक्षा निम्न दर्जाच्या विषयांवरचे लेख लिहतात.
समर्थांनी म्हटलेलं आहे 'टवाळा आवडे विनोद'. त्यामुळे विनोदी लिखाण हे काहीसं भंकस, आलतूफालतू लोकांनी करण्याचं माध्यम समजलं गेलेलं आहे, अजूनही जातं. साहित्यातल्या पारितोषिकांची यादी बघितली तर त्यात विनोदी लेखक किती दिसतात? गंभीर म्हणजे उच्चभ्रू, महत्त्वाचं; आणि विनोदी म्हणजे फुटकळ, बाजारू, गल्लाभरू - हा वर्णभेद होताना दिसतो. ख्याल गाणारा थोर, आणि उडती गाणी म्हणणारा टाकाऊ असं का व्हावं? माझ्या मते कुठचंच माध्यम किंवा विषय निम्न दर्जाचे नसतात. तुमचं लिखाण किती ताकदीचं आहे हे विषयावरून ठरू नये. लेखन चांगलं झालं नसेल तर तसं म्हणणं ठीकच आहे.
मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच प्रभावी लेखक तयार झाले आहेत त्यामुळे दोन्ही गुर्जींनी काळजी करु नये
संस्थळांची काय गरज आहे याचा माझ्या लेखनाशी संबंधच नाही. मला जे लिहावंसं वाटतं ते मी लिहितो. वाचकांनी माझी प्रतिमा निर्माण करून त्यात मी बसण्यासाठी लेखनकंडूच्या बाबतीत फक्त कानामागेच खाजवायचं - तेही हलकेच, इतर ठिकाणची खाज दाबून टाकायची असं कसं करणार? ज्यांना फक्त कानामागेच खाज येते ते भाग्यवान, आम्ही अभागी. असो. रमतारामचं उत्तर असंच काहीसं, पण बऱ्याच विनयशील भाषेत सांगतं.

In reply to by राजेश घासकडवी

>>>>त्यामुळे विनोदी लिखाण हे काहीसं भंकस, आलतूफालतू लोकांनी करण्याचं माध्यम समजलं गेलेलं आहे, अजूनही जातं. साहित्यातल्या पारितोषिकांची यादी बघितली तर त्यात विनोदी लेखक किती दिसतात? गंभीर म्हणजे उच्चभ्रू, महत्त्वाचं; आणि विनोदी म्हणजे फुटकळ, बाजारू, गल्लाभरू - हा वर्णभेद होताना दिसतो. ख्याल गाणारा थोर, आणि उडती गाणी म्हणणारा टाकाऊ असं का व्हावं? अगदी सहमत. वास्तविक पाहता कोणताही साहित्यीक त्याच्या प्रकृतीधर्मानुसार, मगदूरानुसार लिहीतो. यात गद्य पदय आलेत. सार्वजनीक जिवनात विवंचना काय कमी असतात का? पण त्याच विवंचना हे असले विनोदी लेखन कमी करतात. मला नाही वाटत की एकादी व्यक्ती त्याच्या संपुर्ण आयुष्यात केवळ गंभीर, उच्चभ्रू वाचत असेल अन ऐकत असेल. असे झाले तर तो वेडा तरी होईल किंवा विचारवंत तरी होईल. अन सर्वसामान्य माणूस या दोघांपैकी नसल्याने तो सर्वसामान्यांसारखा वागतो. म्हणूनच असले विनोदी साहित्य माणसाच्या आयुष्यात महत्वाचे स्थान राखून असते. आपल्या म्हणी वाक्यप्रचार वैगेरे काय आहे हो? आपल्या नेहमीच्या बोलण्यात आपण त्या का पेरतो? आपला संवाद हा गंभीर अंगाने जावू नये म्हणून तो एक बांध आहे. त्या नसत्या तर आपले लेख-बोलणे हे एखाद्या तांत्रीक विषयावर दिलेला एखादा बोजड थिसीस होईल. माझे बोलणे जरी या लेखाला-प्रतिक्रियेला धरून, संयुक्तीक नसेल तरी असली परिस्थिती आहे हे कुणी नाकारू शकत नाही. उदाहरणच द्यायचं झालंच तर किती मराठी विनोदी चित्रपटांना राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेला आहे? (पाडूं हवालदार हाच एकमेव चित्रपट अपवाद असावा.) किती काव्यस्पर्धांत विनोदी काव्याला मानाचे स्थान मिळालेले आहे? का गोविंदाच्या हलक्याफुलक्या गाण्यांना दुर्लक्षीत केले जाते? का दादा कोंडकेंच्या गाण्यांना नाक मुरडले जाते? असो. थोडक्यात प्रत्येक साहित्याचे त्याचे त्याचे स्थान समाजजिवनात आहे. आणखी एक: >>>अगदी भुक्कड लेखांना - खास करून कवितांना - सतत उत्तेजनार्थ प्रतिसाद द्यावेत. त्यासाठी डु. आय. चा उपयोग करता येईल. गेल्या काही दिवसांपासून संकेतस्थळावर (केवळ याच नव्हे) कवितांना कमी लेखले जाते. त्या कवितातल्या मतांची खिल्ली उडविली जात आहे. कवीच्या रचनेच्या पद्धतीवर टिका केली जात आहे. साधी टिका, विडंबन मला समजू शकते. (मी ही प्रगल्भ झालो आहे! (विचारवंत नव्हे! :-))) पण जी झाली ती दुखरी टिका आहे. दुर्दैवाने कवीसमाज हा मऊ समजला जात असल्याने ह्या ठिका सहन करतो. झालेल्या टिकेला खमकी उत्तरे देत नाही. कोणत्याही कविच्या सार्‍याच कविता चांगल्या, एकसारख्या, आधी गाजल्या तशाच येतीलच असली खात्री नसते. हे अगदी गाजलेल्या कविंच्याबाबतीतही घडलेले आहे. आपण समजू की केलेल्या कवितांपैकी ८% कविता चांगल्या होत्या(!? आता चांगल्या वाईट हे ठरवणारे कोण? अन कसे ठरवणार? त्याची मोजण्याची पातळी काय? हा वेगळाच गुद्याचा मुद्दा झाला. तो येथे चर्चीला जाणार नाही.) तर १००% कविता केल्यानंतरच ८% हा आकडा आला ना? मग त्या उरलेल्या ९२% कविता न वाचताच कसे ठरविणार की ८% कविताच चांगल्या होत्या ते? त्यातही जर त्या कविता गंभीर नसतील तर वरील प्रतिक्रियांवरून जो समज होतो त्याप्रमाणे त्या कविता गणल्याच जाणार नाहीत. हेच प्रमाण एखाद्या लेखकाच्या लेखाबाबतीतही, कथेबाबतही होवू शकते. साहित्यीक मंडळींना त्यातल्या त्या कवींना माझे एकच सांगणे आहे की आपल्या साहित्याला कुणीही प्रतिक्रिया देणार नाही असे समजून लिहीत चला. (वरील प्रतिक्रिया कुणीही वैयक्तिक घेवू नये ही कळकळीची विनंती. आपले एकमेकांतले मैत्रीपुर्ण संबंध कायम रहावेत हीच इच्छा!)

In reply to by सहज

मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच प्रभावी लेखक तयार झाले आहेत त्यामुळे दोन्ही गुर्जींनी काळजी करु नये व आता त्यांनी धनंजय व चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाउन संयमाचा पुढचा कोर्स करावा इतकेच म्हणतो.
मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच स्वयंघोषित सल्ले देणारे निर्माण झाले आहेत, त्यामुळे सहजकाकांनी काळजी करू नये आणि आता त्यांनी धनंजय आणि चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाऊन संयमित प्रतिसादांचा कोर्स करावा इतकेच म्हणतो. ;-)

=)) =)) =)) =)) लेखन एकदम आवडल्या गेले आहे. अजून एक दोन महत्वाचे मुद्दे राहीले का ? १) आपल्याच एखाद्या आयडीने संस्थळावरती बेक्कार धुमाकूळ घालावा आणि मग आपणच तो आयडी बॅन करून 'न्यायी' असण्याची वाहवा मिळवावी. २) नवीन संस्थळावरती जालावरतील प्रसिद्ध आयडींशी साधर्म्य दाखवणारे आयडी काढावेत आणि दंगा उडवून द्यावा. इ. इ.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मुद्दा १) हा एक नवाच मुद्दा तुम्ही मांडला आहे आणि एकदम पटला आहे. दुसरा मात्र नीटसा समजला नाही. यात संस्थळ-मालक असणे गरजेचे नसावे असे वाटते. 'आपल्याशी यावर एकदा सविस्तर चर्चा करायची आहे.' :) (शंकासमाधान झाले की उरलेला +०.५ टाकू या, कसं?)

प्रकाटाआ विरक्तीमुळे प्रतिसाद काढून टाकला आहे. ;)

=))

=))