मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वगताची सांगता.

रामदास · · जनातलं, मनातलं
http://www.misalpav.com/node/1673 http://www.misalpav.com/node/1678 http://www.misalpav.com/node/1690 http://www.misalpav.com/node/1700 सकाळी झालेला उशीर मला दिवसभर छळत होता.मनातला काटा निघाला होता पण मधूनच हलकास सल जाणवत होता.आजी समोर तर मला अगदी चोरट्यासारखं वाटत होतं.ताप उतरल्यावर कसं हलकं हलकं वाटावं तसं दिवसभरवाटत होतं.सकाळचा चहा दिल्यावर मी किचनमध्ये गेले. हे आलेच पाठोपाठ.काय करत्येस? काही नाही. .... आणि तुम्ही सुध्दा आता कामाला लागा. स्वामींची जयंती आहे आज . विसरलात वाटतं . ही मात्रा ताबडतोब लागू पडली. मी नैवेद्याची तयारी करतेय . तोपर्यंत तुम्ही पूजेचं बघा.काल हरवलेली लय आज सापडली होती. घर नव्या उजेडानं भरून गेल्यासारखं वाटत होतं. पूजा झाली. आरती मनासारखी झाली.आज्जी नी संपूर्ण हरीपाठ म्हटला. सांगतेला सुरुवात झाली. अकल्पायुष व्हावे तयाकुळा ...आम्ही दोघांनी एकमेकाकडे पाह्यलं. माझीया सकळा हरीच्या दासा.आजीनी माझ्याकडे पाह्यल. कल्पनेची बाधा न हो कोणेकाळी......हे माझ्याकडे बघून मिस्किल हसले .ही संत मंडळी सुखी असो. नामा म्हणे तया कुळा असावे कल्याण म्हणेपर्यंत मी ह्याच्याकडेच बघत राह्यले. आज परत प्रेमात पडल्यासारखं वाटत होतं.सारखं सारखं एकमेकांकडे पाहत रहावसं वाटत होतं. ह्यांनी पाह्यलं तर नजरेला नजर पण देताना लाजल्यासारखं होत होतं. दिवस संपूच नये असं वाटत होतं ========================================================== यादी तयार झाली. बेडेकरांच्या दुकानातून मेतकूट. सांडगे. नाचणीचे सत्व. गोरा गांधीकडून वेखंडाची पावडर, बाळ गुटी, सुतार चाळीच्या रमण विठ्ठल कडून डींकाच्या , अळीवाच्या लाडवाचं सामान. येताना दादरला उतरून पांढरी मलमल. आणि लवकर या. बाहेर जास्तं काही खाउ नका .आपल्याला पुढच्या आठवड्यात निघायचं आहे.खरं म्हणजे मी उगीचच सूचना देत होते. माझ्या समाधानासाठी. प्रवासाची काळजी हेच वाहणार होते. हे बाहेर पडले आणि मी माझ्या कामाला लागले. हातात विणायच्या सुया घेतल्या पण वेग काही येईना. फिरून फिरून तेच तेच विचार यायला लागले. केव्हढा लांबचा प्रवास. आपल्याला झेपेल ना सगळं? मुलीला मदत होईल ना?.एक ना दोन ,हज्जार विचार मनात.मग फिरून वाटल हे आहेत ना सोबत. सब सुख लहैइ तुमारी सरणा तुम रच्छक काहू को डरना. तीस वर्षाचा प्रवास सुरळीत पार पडला. प्रतारणेचा डाग नाही. अभद्र पैसा घरात कधी आला नाही. मुलंही सोन्यासारखी.मनानी ही सगळी वर्षं याच्या पाठुंगळीस बसूनच प्रवास झाला. आता उत्तरायणाची चिंता कशाला.विणकाम काही होईना. एक खांब . दोन खिड्क्या. एक मुका. विण भलतीकडेच जायला लागली. शरू तुझ्या वेळची गंमत. माझी आई आली होती. वझ्यांच्या दवाखान्यातून मी चार दिवसात घरी आले.मग ह्यांची रवानगी झाली बाहेरच्या गॅलरीत.सहा महिन्याची शिक्षा.शेजारचे वर्तक रोज न विसरता विचारायचे. काय? बाहेरच का?..... हे पण कंटाळले. मग झालं .ठरलं. बोरिवलीला जाउ या रहायला.खूप त्रासाचं झालं. पण मुकाट्यानं कर्ज फेडत राहिले. आणि लगेच शशी च्या वेळचे दिवस गेले. नाना एक दिवस हसत हसत म्हणाले , नायगावात आपोआपच फॅमीली प्लॅनींग झालं असतं. ========================================================== अडीच वाजले आणि दारावरची बेल वाजली.सप्रे मामी दारात उभ्या. हुश्श करत आत आल्या . कसला गं बाई पसारा सगळा? अमेरीकेला जातोय.वाटलंच मला,मामी म्हणाल्या. मी यांना म्हटलंच होतं शर्वरी आहेच अमेरीकेत तुम्ही न्यालच दादांना उपचारासाठी. कुठे आहेत दादा? बेडरेस्ट सांगीतली आहेना? काय गं बाई, एव्हढे नेमस्त ........... मला काही कळेचना? मामी , काय बोलताय? ह्यांना काही झालेल नाहीय्ये.शर्वरीला मुलगा झालाय,म्हणून जातोय आम्ही. मामी क्षणभर वेड्यासारख्या बघतंच राह्यल्या. अरे देवा, म्हणजे दादांनी........ माझा तोल सुटला. मामी .. काय ते धड सांगा ना. अगं परवा मी साठे डॉक्टरांकडे गेले होते ना तेव्हा दादा पण तिथेच होते. साठे दरवाजापर्यंत दादांना सोडायला आले होते दादांना म्हणत होते, दादा.....पूर्ण बेड रेस्ट. रिस्क घेउ नका...तीन महीने आराम...कधीही काहीही होउ शकतं बरं.... शरु आहे ना अमेरीकेत....हवं तर सगळ्या टेस्ट तिकडेच करा..... माझ्या डोळ्यावर अंधेरी यायला लागली. हे देवा.... ह्या भल्या माणसानं काही सांगू नये मला.... आणि मी पण शहाणी........ मनात एकदम विज कडाडली. हातचा एक इथेच राहीला होता.. गणिताचा ताळा इथेच चुकत होता..... मामी काय पुढे बोलत होत्या मला काही कळेना.... देवा रे देवा..... बेड रेस्ट.... काहीही होउ शकतं....आणि मी तिरिमिरीत जागची उठले.... ह्यांचा मोबाईल बंद....शशीला फोन लावला....बंद हातपायाला मुंग्या यायला लागल्या...तोंडाला कोरड पडली... आज्जीला उठवलं....सगळं सांगीतलं....आज्जी धिराची... तिनं मला जवळ घेतलं.....घाबरू नकोस गं ...दादा समर्थ आहे.... अहो , मामी सांगतायत ते तर ऐका ... ऐकलं सगळं....काही तरी गडबड दिस्तेय....मामी वेंधळीच आहे गं . ...दादा यील आत्ता. मला कुठचा धीर.... तेव्हढ्यात परत बेल वाजली..... दारात वॉचमन आणि एक अनोळखी माणूस. मी साळुंखे... हवालदार ... परत एकदा विज कोसळली... मी मट् कन खालीच बसले.... आज्जी पुढं झाली ... काय हवय..... काही नाही आज्जी ....पासपोर्टसाठी अर्ज केलाय ना... हो.. हो... हो... तेच सांगायला आलेलो ..... देवा.. काय रे घडी ही .... मला कळेना. धावा मनात सुरु झाला आत सज्ज धनुशा... रक्षणाय मम राम.... .............मी सोफ्यावर कोसळलेच.... परत बेल.... आज्जीनी दार उघडलं...... हे दारात उभे..... मी धावतंच पूढे गेले.... दोन्ही दंड धरून यांना गदगदा हलवलं..... काय हो हे असं ह्यांना कळेचना.. माझा हात धरून सोफ्यावर बसवलं शांत हो आधी... मी थोडी सावरले.रडत रड्त सगळं काही सांगीतलं हे आपले शांतच. आणि मग मोठ्यानी खदखदा हसले.....माझा जीव चालला होता. वेडी का काय तू मामी अर्धवट....मी गेलो होतो सुजाथाची चौकशी करायला... सुजाथाला दिवस गेलेत. तिची भावंडं थॅलसिमीक आहेत...म्हणून मी साठ्यांना भेटायला गेलो हो भेटायला.. अर्धवटच मामी पण . आता कळलं. बाई , केवढा गोंधळ घातलास.... म्हणून मी म्हणतो कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ........ मी शांत झाले.परत घरात सोनेरी पिवळा उजेड दिसायला लागला... हे हसले म्हणाले ...... मी एकटा कसा जाउ गं तुला पाठुंगळीस घेउन जाईन. आजी पुढ्म आली मला परत जवळ घेतलं. मला कितीतरी छान छान वाटायला लागलं. (आता थांबू या.)

वाचन 10510 प्रतिक्रिया 0