डोमिसाईल हवंय.... ? ?
आता म्हणाल हे डोमिसाईलचं काय नवीनच फ्याड? तुम्हाला एक वेळ ''पी.एस.पी.ओ. '' माहीत नसेल तरी क्षम्य आहे . पण डोमिसाईल - महाराष्ट्रातल्या रहिवासाचं प्रमाणपत्र माहीत हवंच. मागची दहा वर्षे तुम्ही महाराष्ट्रात रहात असल्याचा पुरावा. तुम्ही म्हणाल इथंच तर असतो तीस वर्षं झाली - दुसरीकडे कुठं जाणारे? तुम्ही राहिवासी असालही महाराष्ट्राचे - पण तुमच्या पाल्याला प्रमाणपत्र मिळालंय का तसं?
अतिप्राचीन काळापासून जन्मभूमी आणि कर्मभूमी वेगळी असण्याचा इथला इतिहास आहे. अनेक महारथी जन्मदात्याच्या घरात न रहाता अन्यत्र जाउनच मोठे झाले. तुम्हीही तसेच महान असाल हे सरकारने गृहीत धरलंय. सामान्य माणसाचं असं काहीच नसतं. आपण आपल्याच घरी मोठे होत असतो. मग आपण सर्वसामान्य इसम असल्याचं एक मामुली प्रमाणपत्र नको द्यायला?
मग चला तर - कामाला लागा !
वरकरणी फॅड वाटणारं हे डोमिसाईल - पण आज ना उद्या तुम्हाला त्याच्या कचाट्यात पकडायची तयारी मायबाप सरकारने करून ठेवलीय ! विशेषतः व्यावसायिक अभ्यासक्रमाला जाणाऱ्या मुलांसाठी. जर तुमचं स्वतःचं शिक्षण अशा कागदांशिवाय पार पडलं असलं तर आकाशातल्या दयाळू प्रभूचे गुण गा. पण पुढच्या पिढीची सुटका नाही. तुमच्या पाल्याला इथे किंवा अन्य राज्यांत व्यावसायिक अभ्यासक्रमाला जायचं असेल तर हे रहिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र दहावी -बारावीच्या परीक्षेदरम्यान मिळवून ठेवणे आले. पंचवीस तीस वर्षापूर्वीचं तुमचं असलं तरी ते पुरेसं नाही. त्यातूनही प्रत्येक पाल्याचं वेगळं प्रमाणपत्र असायला हवं. आणि तितक्या वेळा तुम्ही व्यवस्थेला शरण जायला हवं.
बरं हे प्रमाणपत्र देणार कोण? तर ज्याना शिक्षणातलं काही कळत नाही पण राजकीय पोहोच आहे, फुकटच्या पैशाची अफाट भूक आहे, लोक काम होण्यासाठी ज्यांच्यामागे पैसे घेऊन धावतात, अशी नशीबवान मंडळी. त्यांनी जागोजागी महापालिकेच्या जागेत तुमची सेवा करायची दुकानं थाटून ठेवलीयत. त्यांच्याकडे मिळणाऱ्या सशुल्क सेवांची भव्य यादी एकदा डोळ्याखालून घातलीत तर तेच स्वतः सरकार आहेत हे तुम्हाला कळून येईल !
अशा या रहिवास प्रमाणपत्रासाठी आपण आधी सरकारी वेबसाईटवर जातो. हल्ली ती वेबसाईटच सापडत नाही- जानेवारीत होती. मिळालीच तर पहा- तिथे सगळं सोप्पं वाटतं. ३२ रुपयात सरकार आपल्याला हे प्रमाणपत्र घरबसल्या देऊन किती मोठी सोय करतंय असं वाटेल ! पण थांबा. तसं काही होत नसतं. तिथे फॉर्म ऑनलाईन भरायचा पर्याय चालणारच नाही - तुम्हाला फॉर्म कागदावर छापायला सांगितले जाईल. खरी मेख इथेच आहे!
आता उठा - जमिनीवर या ,तुमच्या जवळच्या ई- सेवा केंद्रात जा - तिथल्या सन्माननीय व्यक्तींना सांगा तुम्हाला काय हवंय . त्यांच्याकडे विविध सेवांची पोतडी भरलीय. सार्वजनिक कल्पवृक्षच म्हणा ना! पाच सातशे रुपये दिलेत तर काम त्वरित हलेल. तुम्ही चार कागद एकत्र बनवताय? वा ! मग जरा भाव पण करता येईल - म्हणतात ना, 'चीपर बाय डझन'. अन हो, पावती वगैरे चांगली माणसं मागत नसतात बरं का. तिथे जरा शहाण्या माणसासारखं बोला -शिकलेल्यासारखं नव्हे!
इथे तुम्हाला कळेल, की वेबसाईटवरची कागदपत्रे आणि प्रत्यक्ष लागणारी कागदपत्रे - सत्यप्रती फारच वेगळ्या आहेत - प्रक्रियासुद्धा वेगळी आहे . मग दर ३२ रुपयेच कसा असेल नाही का? तर इथे नव्याने कळलेली सात-आठ कागदपत्रे पंधरा दिवस हिंडून जमवा, ती साक्षांकित करा (साक्षांकित नही जाणते? आ-टे-ष्टे-ड . कळलं ?) पाचशे रुपये द्या आणि मग ई s s सेवावाले त्यांच्या लॉग-इनने तुमचा फॉर्म ऑनलाईन भरतील. तुम्हाला आलं असतं का घरून असं पटापट ऑनलाईन भरता? नाही ना? मग?
पण तिथं पावर अन नेटवर्क एका वेळी असेल तरच फॉर्म भरला जाईल. नैतर उद्या जावा की. दुसरं काम काय तुमाला ? नशिबाने एकदाचा हा फॉर्म भरला की प्रिंटाउट मिळेल तो घेऊन तुमच्या नशिबात कुठला तलाठी आहे हे शोधा. तुमच्या पत्त्याला अनुरूप असा तलाठी एकच असतो- तो शोधा. त्यांची वेळ माहीत करून घ्या. हे लोक्स त्यांना हवे तेव्हा हापिसात येतात - तुम्हाला हवे तेव्हा नाही. उगाच दहा ते पाचचे फंडे सांगून त्यांच्या डोक्यात जाऊ नये. बाकीची अनुभवी लोकं वाट बघतात तसं तुम्ही पण बसा. सारखं कधी येतील? विचारू नका आणि घड्याळ बघू नका! काही उपयोग नाही .
तुमची वेळ (!) आली की ते साहेब तुमचा फॉर्म - तोच तो- ई s s सेवा मध्ये मिळालेला पाहून ठेवणीतला प्रश्न टाकतील , '' रेशनकार्ड आनलंय ?''
'' नाही !''
'' मग काय उपेग?'' सुशिक्षित माणसाने कधीही लागत नसले तरी पत्ता बदलला किंवा व्यक्ती वाढल्या की रेशनकार्ड अपडेटेड ठेवायला हवे. पासपोर्ट/ आधार कार्ड कसे बरोबर काढून ठेवता किनई ?
'' मग आता?'' तुमच्या डोक्यात आजच वाया गेलेला हाफ डे आणि इथे वाट पाहून झालेली चिडचिड असते. पण चित्त शांत कसं ठेवावं याचा अभ्यास सुरु करायची हीच ती जागा आणि वेळ हे जाणावे. पुढे उतारवयात स्थितप्रज्ञतेचा अभ्यास करायचा असेल तर इथेच त्याची मुळाक्षरं गिरवायची!
तुमचं रेशनकार्ड फार्फार जुनं असलं तर त्यावर पत्ता जुना असतो आणि सध्याच्या कुठल्याच कागदाशी मेळ खात नाही. तुम्हाला निराश झालेलं पाहून एक उपाय सांगितला जातो. प्रत्येक समस्येला उपाय असतोच असतो. आणि त्या दिवशी नाही तरी दुसऱ्या- तिसऱ्या दिवशी एकदाचा तलाठी दाखला हाती येतो. आता दिलेल्या पैशाच्या पावत्या मागायचा विचारही तुमच्या डोक्यात येत नाही. म्हणजे तुम्ही समजदार नागरिक झालात. आता एकच लक्ष्य - काम वेळेत पूर्ण करणे! वेळ, पैसा, कायदे, नियम, आत्मसन्मान अशा ऐहिक गोष्टीचे विचार कसे आपसूक गळून पडतात .
पण उगीच आताच खूष होऊ नका - आता फक्त 'सुपर एट' मध्ये ' गेलात! हा दाखला आणि ''तो'' फॉर्म परत ई s s सेवा मध्ये नेउन द्या. तिथून ते तहसीलदार कार्यालयाला पाठवतील- तुम्हाला नाही, एकट्या फॉर्मला ! आणि मग सांगतील किती दिवस वाट पहायची ते.
मग वीसेक दिवसांनी कदाचित फोन येऊ शकतो. ''तहसीलदार कार्यालयातून तुमच्या फॉर्ममध्ये अमुक एक त्रुटी आहे असं समजलंय'' त्रुटी काहीही असू शकेल. ''आधी नाही का सांगायचं?'' हा प्रश्न गैरलागू आहे- फाट्यावर मारण्यात येईल. उदाहरणार्थ आता तुमचा जन्मठिकाणाचा पुरावा पाहिजे- तर तुमचे वीस-तीस वर्षापूर्वीचे बाबांनी काढून दिलेले डोमिसाईल प्रमाणपत्रच नाही चालत!
आता तिकडून प्रश्न,'' तुम्ही दहावी झालात का? हो ना? मग ती शाळा सोडल्याचा दखला आणा''.
'' तो तर कॉलेजने घेतला !''
अहो, मग कॉलेजचा आणा - पण त्यावर नागरिकत्व 'भारतीय' असं ल्हिलेलं असायला पायजे, नायतर…. ''
'' एव्हढच ना, अहो मग पासपोर्ट आहे की !'' पासपोर्टावर आपल्या जन्मस्थानाचा उल्लेख असतो हेच मुळात त्यांच्या गावी नसतं. पण समजून घ्यायची त्यांची इच्छा नसते. गिर्हाईकांची रांग लागलेली असते, आणि तुम्ही त्या रांगेतले एक नगण्य व्यक्ती असता.
'' आणा पण मग ग्यारंटी नाय - जे कागदपत्र मागितले तेच शक्यतोवर द्यावेत. ''
'' कॉलेजकडून दाखला घ्यायचं राहून गेलंय…. आता वेळ लागेल ओ मिळायला, बघतो मिळालं तर !''
'' बगा हां, नायतर सात दिवसांनी अर्ज परत येतो! ''
आपण निराश न होता जुनेपुराणे कागद काढून दहावीच्या सर्टिफिकेटची फोटोकॉपी असेल तर काढून द्यावी. ती असल्यास प्रश्न मिटला. मूळ प्रत कुणी विचारत नाही.
प्रत्यक्ष पासपोर्ट आणि आधार हे तुमच्या पत्त्याचे/ जन्मस्थळाचे अधिकृत पुरावे नाहीत. तर रेशन कार्ड , तलाठी दाखला आणि दहावीनंतर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यांची किमान झेरॉक्स असणे जास्त महत्वाचे. (किती महत्वाची माहिती ! ) असे 'पुरावे' दिलेत की तुमचं प्रत्यक्ष काम संपतं. मग वाट पहा- वेळोवेळी फोन करत रहा. जमल्यास एक चक्कर मारा. त्यामुळे ओळखी पक्क्या होतात !
असे करता करता दोनेक महिने गेले आणि भरपूर पैसे खर्च करून अनुभवात वाढ झाली की मग सन्मानपूर्वक हे प्रमाणपत्र तुम्हाला तिथे बोलावून प्रदान केले जाते. त्यावेळी '' पैसे दिले होतेत ना? ''असं परत एकदा विचारलं जातं. आता प्रमाणपत्र तुमच्या हातात आले असल्याने '' $%*&$£"^, त्याशिवाय का माझं काम केलंस ?'' असं मनात आलं तरी चुकूनही म्हणू नका. कारण 'इस अंजुमन में आपको आणा है बार बार'…. हे लक्षात ठेवा. उर्वरित आयुष्यात लईs s ई - सेवा ईथेच घ्यायच्यात हे समजून ग s s प हसतमुखाने कल्टी मारा !
( पेर्णा / आणि नुकताच आलेला ताजा अनुभव !)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हेहेहे!
गोव्यामधे पर्रीकर होते
माहित नै!
अग्गोबै
हो बहुतेक
.
.
पुढे काही समस्या नाही.