✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण : एक पांगलेला वृत्तांत.

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Mon, 01/14/2013 - 16:36  ·  लेख
लेख
उद्या साहित्य संमेलनाला निघायचं आहे, तयार राहा आम्ही सकाळी पाच वाजेला तुझ्याकडे पोहचतो असा माझ्या लहरी प्राध्यापक मित्रांचा फोन आला आणि ठरल्याप्रमाणे प्रा.डॉ.सर्जेराव जिगे-पाटील, प्रतिष्ठाण महाविद्यालय, पैठण. प्रा.डॉ. महेश खरात, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, माझ्याकडे पोहचले. सकाळच्या गुलाबी थंडीत आम्ही पुण्याकडे प्रयाण केले. सकाळचा सूर्य झकास दिसत होता.
2013-01-10-002
उगवतीचे रंग
दहा वाजेच्या सुमारास नाष्ट्याची आठवण झाली आणि मिसळपाव नेहमीप्रमाणे आडवी आली. यथेच्छ ताव मारला. पोटाचं काही होणार तर नाही ना, अशी पुसट शंका आम्ही पुसून टाकली. पुण्याला अगोदर पोहचलेल्या मित्राला प्रा.डॉ.सुधाकर जाधव, परतुर.जि.जालना यांनाही सोबत घेतले आणि सातारा रोड पकडायचा तर आमच्या ड्रायव्हरनं सोलापूरचा रस्ता पकडला होता. गुगल नकाशा सुरु करुन करुन चिपळूण रस्त्याला लागलो. उंब्रज सोडलं आणि कोकण सुरु झालं याची पुरेपुर खात्री पटत चालली. अरुण इंगवले हा चिपळूणचा कवी म्हणतो- माझ्या तांबड्या मातीत, आंब्या फणसाच्या वास नमन, जाखडी, दशावतार गोम-संकासूर नाव. येथे खळाखळत्या नद्या,टच्च फुगलेल्या खाड्या पडाव,गलबत मचवे,कुठे शेलाटश्या होड्या असं कवितेतील कौतुक वास्तवात दिसायला लागलं. आंबे, पोफळी, साग, नारळ,
2013-01-12-044
चिपळूणचो रस्तो
अशा दाटीवाटीतून रस्ता चिपळूणला चालला होता. घाट ओलांडत एकदाचे चिपळूणला पोहचलो. चिपळूणला चौकाचौकात परशुरामाच्या भूमीत स्वागत आहे, अशा भाऊ दादांच्या आणि गल्ली बोळातल्या एका दिवसात नेता झालेल्यांचे होर्डींग्ज लक्ष वेधून घेत होते. संमेलन स्थळी पोहचलो तेव्हा सायंकाळचे साडेपाच झालेले होते. वातावरणात प्रचंड दमटपणा वाटत होता. मैदानावर (यशवंतराव चव्हाण नगरीत) धूळही अधिकची दिसत होती. मुख्य व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले, केंद्रीय कृषिमंत्री. मा.श्री. शरद पवार, उषा तांबे, सुनिल तटकरे कौतिकराव ठाले, दादा गोरे, कुंडलिक अतकरे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे विविध पदाधिकारी दिसत होते. अशा या भव्य व्यासपीठावर भव्य स्क्रीनही लावलेला होता. आणि यशवंतराव चव्हाण नगरी साहित्यप्रेमींनी तशी फूलूनच गेली होती. साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला पंधरा ते वीस हजार लोक असावेत, असे मला वाटते. मा.सुनिल तटकरे यांचं स्वागताध्याक्षाचं भाषण चालू होतं. वादापलिकडे जाऊन साहित्यसंमेलनाचा आनंद घ्यावा, असे आग्रहानं नमुद करुन चुकभुल पदरात घ्यावी, असे म्हणून झाल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे म्हणाल्या की महामंडळाच्या वतीने चिपळूनच्या साहित्य संमेलनाचा आनंद वाचकांनी, साहित्यप्रेमींनी सामान्य नागरिकांनी याचा घ्यावा म्हणत. विश्व साहित्य संमेलन काही कारणाने घेऊ शकलो नाही, परंतु साहित्य महामंडळाचे विविध उपक्रम चालू आहेत, त्याची माहिती सांगितली. लोक
2013-01-11-007
यशवंतराव च्व्हाण नगरी
विनाकारण वाद करत असतात अगदी निमंत्रण पत्रिकेत राजकीय नेत्यांची नावं खूप दिसतात इथपासून ते संमेलन उधळून लावू या सर्व गोष्टींचा उहापोह त्यांनी प्रशासकीय पदाधिकारी आणि महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून केला. अध्यक्षपदाची सूत्रं बहाल करतांना वसंत आबाजी डहाके म्हणाले, साहित्य माणसाला जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नव्हे. अध्यक्षपदाची सूत्र देणे हा एक भाग असेल परंतु सूत्र म्हणजे बांधिलकी आणि या सामाजिक बांधिलकीचे हस्तांतरण म्हणजे सूत्र बहाल करणे. आणि पुढे साहित्य, साहित्य संमेलने, भाषा, वाचक, अशी सहज मांडणी करत शब्द वापरणे हे जोखमीचे काम आहे त्याचा योग्य वापर केला पाहिजे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभा बद्दल बोलतांना दैनिकांतील पत्रकारांना विधानांचा आणि विषयांचा विपर्यास करण्याची एक वाईट सवय लागली आहे, त्यामुळे समाजात द्वेषाचं वातावरण निर्माण होते, सामाजिक ऐक्याला तडे जातात तेव्हा पत्रकारांनी समाजाला जोडण्याचे काम करावे, असे ते म्हणाले. अतिशय सहजपणे सर्वांना भावेल असे हे भाषण झालं. त्यानंतर ’रत्नप्रभा’ या स्मरणिकेचं प्रकाशन साहित्य संमेलनाचे उद्घाटक कृषिमंत्री मा.श्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मा.श्री शरदपवार यांच्या उद्घाटनीय भाषणाला सुरुवात झाली. राजकारणी आणि साहित्यिक यांचा संबंधाच्या निमित्ताने लेखनात सर्व प्रकारचे लेखन असते तेव्हा साहित्य संमेलनाच्या ठिकाणी राजकीय व्यक्तिच्या उपस्थितीबाबत आक्षेप घेतला जातो तो योग्य नाही.
2013-01-11-014
भव्य व्यासपीठ
राजकीय लोक साहित्य संमेलनात दिसले तर वाद घातला जातो परंतु राजकारणात साहित्यिक आले तर आम्ही वाद घालत नाहीत असे म्हणून प्र.के अत्रे, ना.धो.महानोर, आणि इतर साहित्यिकांचा दाखला देत विधानसभा-विधानपरिषद गाजवलेल्या दाखला दिला. राजकारणी चूकत असतील तर त्यांना योग्य दिशा साहित्यिकांनी सुचवली पाहिजे. मुख्य व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्याने वाद झाला म्हणे परंतु बाळासाहेब एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते, वादग्रस्त असले तरी त्यांची व्यंगचित्रे, पत्रकारिता, हे योगदान विसरता येणार नाही, असा उल्लेख झाल्याबरोबर प्रचंड टाळ्यांचा गजर झाला. साहित्य सर्वसमावेशक व्हावे, हे सांगून मराठी साहित्याचा मराठीच्या अधिव्याख्यात्यांना लाजवेल असे त्यांचे भाषण पुढे सरकत गेले. स्त्रियांचे सक्षमीकरण, स्त्रीवाद, आणि यापुढेही अधिकाधिक स्त्रिया संमेलनाच्या व्यासपीठावर दिसाव्यात असेही मत त्यांनी मांडले. मराठी साहित्य आणि त्याचे विषय इतर भाषेत पोहचले पाहिजेत. राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा, असे लेखन पुढे येत नाही, त्याचा विचार व्हायला हवा. गाव तेथे ग्रंथालय होऊन वाचक समृद्ध व्हावा. त्याचबरोबर वास्तवाचे आकलन करुन लेखकांनी दमदारपणे तो विचार साहित्यातून मांडला पाहिजे अशी भूमिका मांडली. साहित्य लेखन अधिक समाजाभिमुख व्हावं असा विचार मांडून नवीन लेखक, नव्या लेखकांची पुस्तके, कादंबरी, ग्रामीण लेखक, संत साहित्य, आधुनिक साहित्य, भाषा,जागतिकीकरण त्याचा प्रभाव, प्रभावावरचे लेखन-लेखक,
2013-01-11-008
उद्घाटन समारंभ असा लांब बसून ऐकला
यांची नावे घेत त्यांनी कल्पना दुधाळ यांच्या दोन कविता वाचून आपल्या भाषणाचा समारोप केला. पाच वाजून बत्तीस मिनिटाला सुरु झालेले भाषण सहा वाजून एकविस मिनिटे चालले जवळ-जवळ तासभर. मराठी विषयाच्या प्राध्यापकाप्रमाणे त्यांनी मराठी विषयाचा रसिकांचा तासच घेतला. शेवटी शेवटी रसिक चुळबुळत असल्याचे जाणवले. साहेबांचे भाषण संपल्यावर राकॉचे कार्यकर्ते हळुहळु आपल्या खुर्ची सोडतांनाही दिसले. एक अवांतर, आठवण होत आहे. कल्पना दुधाळ या एक कवयित्री आहे. ‘सिझर कर म्हणतेय माती’ या काव्यसंग्रहाने प्रकाशझोतात आलेल्या कल्पना दुधाळ या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीभडक या गावातील रहिवासी असून त्या स्वत: शेती करतात. शेतीची सर्व कामे करतात, म्हणजे शेतकरीच. पण, कविता अतिशय सुंदर आहेत. अशा या कवयित्री औरंगाबादला मसापच्या कार्यक्रमाला आपल्या कुटुंबासहित हजर होत्या. त्यांच्या कवितेवर भाष्य करायला काही समीक्षकांना बोलावलेले होते. समीक्षकांनी या काव्यसंग्रहातील कविता कशा सुमार दर्जाच्या आहेत, दखल घेण्याजोगी एकही कविता नाही, वगैरे मांडले होते आणि या कवयित्रीच्या डोळ्यातून सारखे पाणी वाहात होते . पुढे याच काव्यसंग्रहाने त्यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज पुरस्कार आणि अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत, काल कल्पना दुधाळ यांच्या दोन कविता शरद पवार साहित्य संमेलनाच्या व्यासपीठांवरून वाचून दाखवत आहे, हा प्रसंग कवयित्रीला आज किती आनंद देत असेल, हा विचार सारखा येत होता. व्यक्तिगत मलाही त्याचा आनंद वाटत होता.
2013-01-11-039
परिसंवादाची तयारी
८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले हे आमचे थेट एम.ए.मराठी प्रथम वर्गाचे शिक्षक. आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत म्हणून असे म्हणत नाही. सर, पुढे कुलगुरुही आमच्या विद्यापीठात झाले. युजीसीच्या 'जागतिकिकरण आणि मराठी साहित्यावर त्याचे परिणाम' या सिसर्च प्रोजेक्टच्या वेळी सर आणि डॉ.यशवंत मनोहर हे मला विषय तज्ञ होते, पुढे हा प्रोजेक्टही मला मिळालाही होता. मिपावर माझ्या काही मित्रांनी मला संशोधनासाठी एक प्रश्नावलीही भरुन दिली होती. असे आमचे गुरुजी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांच्या विद्यार्थ्यांना आनंद होणारच, नाही का...!
2013-01-11-038
व्यासपीठासमोरील रांगोळी
सरांचे अध्यक्षीय भाषण सुरु झाले ''अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्याचा आणि भाषेचा सर्वोच्च सोहळा आहे. साहित्यासाठी दर वर्षी अतिशय निष्ठेने संमेलनाला पदरमोड करुन ह्जारो रसिक येतात. इथे झडणा-या चर्चांमधे सहभागी होतात, ही अचंबित करणारी घटना आहे. मराठी साहित्य आणि भाषेबद्दलचे प्रेम जागविणारी गोष्ट आहे. या व्यासपीठावरुन साहित्याबदल काही चिंतन व्हावे, मराठी भाषा आणि साहित्य यांना अस्वस्थ करणाया प्रश्नांची चर्चा व्हावी, जमल्यास त्यातून मार्ग निघावा, निदान त्या दिशेने काही वाटचाल व्हावी, अशी रसिक जनांची अपेक्षा असते. अशा वेगवेगळ्या अपेक्षा घेऊन अवतरणारे हे संमेलन या वर्षी चिपळूण येथे लो. टिळक स्मारक मंदिर या ग्रंथालयाच्या वतीने होत आहे. मला तर येथील निसर्गसंपन्नतेने भारावून टाकलेले आहे. मी मराठवाड्यातून आलेलो आहे. माझ्या प्रदेशाचा यासाठी उल्लेख केला की, तेथे वर्षा दोन वर्षांनी दुष्काळ पडतो. पिण्याच्या पाण्याचेही प्रश्न निर्माण झालेले असतात. ज्याला पाणी पहावयास मिळत नाही, समृद्ध निसर्ग पहावयास मिळत नाही त्या माझ्यासारख्या माणसाला आपण स्वर्गात तर नाही ना ? असे वाटले तर नवल नाही.''
2013-01-11-014
कवी संमेलन सर्व कवी मंडळी.
सरांनी आपलेल्या लिहिलेल्या भाषणावरुन नजर हटवली आणि व्यासपीठावरील नेते मंडळीकडे पाहून म्हणाले आमच्या मराठवाड्यात पाणी टंचाई आहे, लक्ष घालावे. पाणीच नसेल तर माणूस बोलण्यासाठी उभा कसा राहील, असे म्हणत दाद मिळवली. माझ्या अठ्ठेचाळीस पानाच्या भाषणावर तिनशे पानांची चर्चा व्हावी, असे म्हणत चिपळूनचे निसर्ग सौंदर्य, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर,कवी कुलगुरु तुकाराम, साहित्य आणि जीवन, म.फुले, म.विठ्ठल रामजी शिंदे, डॉ.आंबेडकर, करंदीकर, सूर्वे, यांच्या साहित्य-समाज जीवनाची चर्चा करत मराठी भाषेचे संवर्धन, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर भाषा विकासाची साधनं आणि माध्यमं, वाचन संस्कृती, आणि काही प्रश्न उपस्थित करुन भाषणाचा समारोप केला. सरांचे भाषण दमदार झाले असे वाटले नाही, एकतर कारण पवार साहेबांनी घेतलेला वेळ, रसिकांची एकाच जाग्यावर बसण्याची क्यापिसिटी, आणि परस्परविरोधी अघळ-पघळ अशी विधानं यामुळे मांडणीत नेमकेपणा नव्हता असे वाटत होते. अध्यक्षीय भाषणाकडून काही अपेक्षा असतात त्या पूर्ण झाल्या नाहीत, असे जे म्हणल्या जात आहे, ते थोडं पटण्यासारखं वाटलं. पण,एवढं तेवढं चालायचंचं. उद्घाटनीय कार्यक्रम संपला. हात पाय मोकळे करावेत म्हणून काही चहा-पाणी करुन यावं म्हणून बाहेर पडलो. लगेच निमंत्रितांचं कवीसंम्मेलन सुरु होणार होतं. भव्य मंडपातून बाहेर पडू लागलो आणि अचानक आपल्या कवयत्रि मिपाकर क्रांती सडेकरांची भेट झाली. निमंत्रितांमधे त्यांची कविता आहे, हे मला कार्यक्रमपत्रिकेवरुन कळलेच होते परंतु भेट होईल अशी गर्दीत खात्री नव्हती परंतू भेट झाली आणि मिपाकरांना मिपाकर भेटल्यावर जो आनंद होतो तो मलाही झाला.
2013-01-11-013
सन्मानचिन्ह स्वीकारतांना क्रांती सडेकर
चहा पाणी घेऊन आलो. उद्घाटनाच्या वेळी पब्लिकमधे लांब बसून कार्यक्रम बघावा आणि ऐकावा लागला होता. कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम मला मागे बसून बघायचा लैच कंटाळा. सतत पुढे असलं पाहिजे हा आमचा बाणा. महाविद्यालयाचे ओळखपत्र घरी विसरलो त्यामुळे नोंदणी केली नाही. नियोजन न करता आले की हाल होतात, ते हाल आमचे होणारच होते. मग, पुढे तर बसायचे तेव्हा आमच्यापैकी दोघांना तुम्ही मागून या असे सांगून आमदार, खासदार, आणि विशेष अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवेश दारात पोहचलो. साहेबांबरोबर आलेलो आहोत असे पोलिसांना अंदाजपंचे ठोकून कोणा नेत्याच्या पाठीमागे दमदार पावलं टाकत महत्त्वाच्या पाहुण्यांमधे अगदी व्यासपीठासमोरची जागा बळकावली. पण, जिथे बसलो तिथेही मला समाधान वाटेना. तेथून उठलो आणि पत्रकार कक्षाची जागा निवडली. पत्रकारांसाठी असलेलं बिसलरीतलं पाणी आम्हाला मिळालं. अधाशासारखं घटाघटा पाणी पिऊन टाकलं आणि एक बिसलरी सोबतही ठेवली. च्यायला, एवढं करेपर्यंत क्रांतीची सडेकरांची कविता वाचून झालेली होती. ल्यापटॉपवर [उर्ध्वपट] थेट वृत्तांत मिपावर टाकावं तर ल्यापटॉपनं मान टाकली. गाडीच्या डिक्कित असलेल्या ब्यागेत ल्यापटॉपला घाटातून बहुतेक भोवळ आली असावी. ल्यापटॉप चालूच होईना. कवींच्या कविता सुरु झालेल्याच होत्या.
2013-01-11-005
छ.शिवाजी महाराज यांची प्रतिकृती
इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षेतेखाली शेख साहेबांची गझल सुरु झालेली होती. शेख साहेब म्हणाले- ''तु मला भेटू नको, नाराज असल्यासारखी तु अशी वागू नको, प्रेमात नसल्यासारखी'' मला अशी प्रेमाची कविता ऐकायला मिळाली की मी आठवणींनी मोहरुन जातो. माझा मी चालू वर्तमान काळातून भूतकाळाच्या आठवणींवर डहाळीसारखा झुलु लागतो.मला शेख साहेबांची गझल आवडली. गझल संपल्यावर कवींचे सन्मानचिन्ह देऊन इंद्रजित भालेराव यांच्या हस्त सत्कार केल्या जात होता. प्रत्येक कवीला असं कविता वाचून झाल्यावर अशा प्रकारे सन्मानित करण्यात येतं होतं. पर्सनली मला ते काही आवडलं नाही. त्यामुळे काव्यमैफिलिचा बेरंग होत होता. सूत्र संचलन करणारा तर नक्कीच वशिल्याचा तट्टू होता. अतिशय सुमार सूत्रसंचलन या काव्य मैफिलीचं सुरु होतं. संतोश शेरेची कविता 'हम्म' होती. ''मला एक मूलगी दिसते, गच्चीवर,स्टेशनवर, बागेत, एक मुलगी दिसते, चालतांना, खातांना, कुत्र्याशी खेळतांना ...... मुलगी दिसते सदान कदा सेलवर (मोबाईलवर) '' बबलु वडारच्या कवितेला मात्र चांगली दाद मिळाली. आपण संगणकावर वावरणा-यांना संगणकीय
2013-01-11-040
काव्य कट्ट्यावर कोणाही रसिकाला कविता वाचण्याची संधी होती.
शब्दांचे नवल वाटत नाही. तसे अनेकदा अशा कविता डोळ्याखालून गेलेल्या असल्यामुळे लोकांना भावलेली आणि या साहित्य संमेलनाचं एक नवं फाइंडिंग म्हणून या कवीचा उल्लेख केला गेला, तेव्हा लोकांच्या अभिरुचीत आणि आपल्या अभिरुचीत फरक आहे असे मला वाटले. कविता साधारणतः अशी होती- ''आऊटडेटेड झालंय आयुष्य, आणि स्वप्नही डाऊनलोड होत नाही. ................. घर आतां शांत असते, मोबाईलला रेंज नसल्यासारखे .......................... फाटली मन साधणारा इंटरनेटवर धागा नाही. .................................. ही पिढी भलतीच क्यूट कॊंटेक्ट लिष्ट मोठी आणि संवाद झालाय म्यूट'' अशी कविता दाद मिळवून गेली आणि या कवीला वन्स मोअर ची मागणीही झाली आणि त्यांनी ती मोजक्या ओळी म्हणून पूर्णही केली. संजिवनी तळेगावकर आमच्या मराठवाड्यातल्या कवयत्रि. दोन काव्य संग्रह प्रकाशित झाले आहेत. 'काट्यानेच काटा काढता आला असता तर आयुष्यात चालता आले असते' असा एक शेर म्हणून कविता गायला सुरुवात केली. ओ माय गॉड, कविता गायन हा प्रकार कधी जमला नाही तर ते काव्यवाचन कसं फसतं आणि ऐकणा-यांचे कसे हाल होतात, त्याचा हा उत्तम नमुना होता, असे मला वाटते. ही कविता ऐकतांना माझे थोडे हालच झाले. रसिकांनी कविता संपल्यावर दाद दिली. हल्ली दाद कशालाही मिळते, असे वाटून गेले. योगिराज माने आपल्या बाप माझ्या कवितेत म्हणतो-
2013-01-11-035
खुल्या गप्पा. अशोक नायगावरकर, रामदास फुटाणे
''किति पुरविले लेकरांचे लाड सावलीचे झाड बाप माझा. वरुन कठोर काळजात लोणी माय-बाप दोनही माझा. दुष्काळी प्रश्नाला कष्टाचे उत्तर घामाचे अत्तर बाप माझा. गरिबीची नाही केली .......... [च्यायला, इथला शब्द मीच लिहून मलाच तो शब्द आता वाचता येईना] श्रीमंत मनाचा बाप माझा. भजनात दंग मुखी हरिनाम जानकीचा राम बाप माझा. जन्मभर पंढरीची केली वारी भोळा वारकरी बाप माझा. ............................. ईश्वराची छाया बाप माझा.'' मला ही कविता आवडली होती. पण लिहिण्याचा धावपळीत काही शब्द गळाले तर काही गळाला लागले. एक एक ओळ कवींनी पुन्हा पुन्हा म्हणायला हवी. अनिल निगुडकराची 'वृद्धाश्रम' नावाची कविता होती. भोपाळमधून आलेले हे कवी महाराज होते. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन कवींच्या कविता निवडून निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित केले पाहिजे. असा विचार माझ्या मनात आला. 'आज आई-वडीलांना भेटायला जायचे आहे’ अशी 'ट ला ट' परंपरेतील ही कविता होती. एक कविता तर अशी होती आता कवीचं नाव लिहायचं विसरलो. सर्व चिन्ह त्या कवितेत भरलेली होती. जसे- ''काळा पैसा. पूर्णविराम. बलत्कार, स्वल्पविराम. फरारी, प्रश्नचिन्ह'' अशी काही तरी कविता होती. वंदना केळेकर यांची 'मायमराठी' विलास कुवलेकर यांची 'माय' आणि नंतर इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या काही कविता वाचून दाखवल्या. इंद्रजित भालेराव 'आणखी एक' कवितेत म्हणतात दोन ओळी - ''काट्या कुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता''
2013-01-11-034
निमंत्रण पत्रिका (शिल्लक राहीलेल्या. काही बदलल्या होत्या)
आणि गावाकडे शेतीची काय अवस्था आहे, शेतक-याचं जीवन कसं आहे, त्यावर असलेलं ही कविता होती. ती कविता झाल्यानंतर रसिकांकडून 'जलम’ कवितेचा आग्रह झाला. 'जलम' कवितेलाही मी कंटाळलेलो आहे. पण त्याऐवजी त्यांनी दुसरी कविता म्हटली. ''शीक बाबा शिक लढायला शिक कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक'' ............................................ ''घेतलेली कर्ज बुडवायला शिक'' अशी एक कविता त्यांनी गायली रसिकांची भरपूर आणि मनापासून दाद या कवितेला मिळालेली दिसली. आता रात्रीचे अकरा वाजत आलेले होते. चहा-पाण्याचा कार्यक्रम करुन आलो तर...मराठी गीत गायनाचा कार्यक्रम सुरु झालेला होता. अतिशय सुरेख असा कार्यक्रम. मंगला खाडिलकर यांचं सुंदर सुत्रसंचलन. सुत्रसंचलनासाठी अभ्यास असावा लागतो, हे शिकवणारं सूत्रसंचलन. रविंद्र साठे, मंदार आपटे, मृदुला-दाढे जोशी यांच्या बहारदार गीत गायनाने अप्रतिम आनंद दिला. एकोनाविसशे तीस पासूनच्या काही सुंदर कविता ज्याचं गाणं झालं आहे, ते ऐकायला मिळालं. दुसरा दिवस...
2013-01-11-026
मराठी गीत गायन
दुसर्‍या दिवशी सकाळी अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, प्रकाश देशपांडे यांनी खुल्या गप्पांमधून मजा आणली. ''जो पर्यंत अशोक नायगावकरांची कविता आहे तोपर्यंत आकाशात सूर्य तारे फिरत राहतील'' असे म्हणत रसिकांच्या चेह-यावर हसु फुलवले. रामदास फुटाणे वीज भारनियमनाचे ओझे नुसते सामान्य माणसाला नाहीतर विजेच्या खांबानांही आहे, असे म्हणाले. खांब नुसते उभे आहे त्यांचेही एक दु:ख आहे. गळ्यात तारेचे ओझे वागवावे लागते. ''व्याकुळ पोल म्हणाला ती हल्ली कुठे दिसत नाही, लोंबकळत तार म्हणाली, हल्ली तिने नवं घर केलं आहे, इन्व्हर्टर आल्यापासून ती आता कोणाला भेटत नाही” असे म्हणत खुल्या गप्पांमधे रंग भरला. राजकारण-समाज-आणि साहित्य यावरची रंगलेलेली ही जुगलबंदी खासच झाली. पहिल्यांदाच कार्यक्रम बघणाणा-यांना या गप्पा दिलखुलास हसवतात. ''कविता ही कशी आतून आली पाहिजे, ढेकरही आतून येतो म्हणजे ती कविता होत नाही'' ''माणूस लग्न कशासाठी करतो तर एकमेकांना कामे सांगण्यासाठी, रस्त्यावर भेटलेल्या बाईला आपण काम सांगु का ?'' असे म्हणत नेहमीप्रमाणे मजा आणली. ' हे काय चालले आहे' शीर्षकाच्या कवितेतून स्त्रीया कशा क्रर असतात. स्वयंपाक घरात काम करतांना स्त्रीया भाज्या कापतांना किती क्रुरपणे वागतात त्याची ती मिश्किल कविता. रामदास फुटाणे यांची 'हिमोग्लोबीन' आणि 'दोन मिनिटे' नावाची कविता अनेकांनी ऐकली असेल. हिमोग्लोबीनच्या ओळी. दादा म्हणाला- 'वर्गणी काढा' भाई म्हणाला- 'खंडणी काढा' डॉक्टर म्हणाले- 'कपडे काढा' रिपोर्ट म्हणाला- ''हिमोग्लोबिन कुठे आहे ?'' हिमोग्लोबिन हरवल्याची तक्रार घेऊन मी पोलिस स्टेशनवर गेलो. तर तिथे एक महात्त्मा उभा चरखा हरवल्याची तक्रार घेऊन पोलिस पावती विचारत होते चरखा खरेदी केल्याची एक हवालदार जवळ आला म्हणाला- हिमोग्लोबिनचा तपास कसा लागेल ? प्रथम रक्त होतं हे सिद्ध करावं लागेल.
2013-01-11-017
सरांसोबत सरांचे विद्यार्थी
खुल्या गप्पानंतर 'यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि आजचा महाराष्ट्र' या परिसंवादात दीपक पवार, न.म.जोशीसर,शेषराव मोहिते, आणि उल्हासदादा पवार यांनी यशवंतरावांच्या विचारांनी सभामंडप भारावून टाकला. अध्यक्षीय समारोप निशिकांत जोशी यांनी केला. दुपारच्या सत्रात रामदास आठवले, उद्धव ठाकरे, हेही परिसंवादात होते. आम्ही सायंकाळी दोन दिवसांच्या उपस्थितीनंतर काही पुस्तकांची खरेदी केली. अ.भा.साहित्य संमेलनाच्य अध्यक्ष यांची अचानक समोरासमोर भेट झाल्यावर सरांचे अभिनंदन केले. एवढ्या गडबडीतही त्यांच्या चेहर्‍यावर ओळख आहे, असे भाव दिसले. 'अरे वा , औरंगाबादहुन कोण कोण आलं' असं विचारल्यामुळे आमचं येणं सार्थकी लागलं त्याच आनंदात आम्ही औरंगाबादला परत फिरलो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
नाट्य
वाङ्मय
कविता
साहित्यिक
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिसाद
प्रतिक्रिया
आस्वाद
माध्यमवेध
मत
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
18696 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

अर्रे हो.... एक सांगायचं राहीलं...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/20/2013 - 10:49 नवीन
काल कल्पना दुधाळांचा फोन आला होता. मिसळपाववरील साहित्य संमेलनाचा वृत्तांत आवडला म्हणाल्या. मुंबईचे मिपाकर वाचक (नाव विसरलो) त्यांनी वृत्तांताबद्दल त्यांना सांगितलं. मस्त गप्पा झाल्या. अतिशय साधेपणा-सहजपणा बोलण्यात होता. 'कवितेच्या कोणत्याही मानदंडाची मला ओळख नाही, मी आपलं लिहित जाते' असं त्या म्हणाल्या. औरंगाबादचीही आठवण झाली. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन जेव्हा त्यांच्या कवितेचे वाचन चाललेलं तेव्हा कोणी तरी त्यांना सांगितलं, टीव्ही लावला तेव्हा दुसरी कविता वाचन सुरु होतं, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अतिशय आनंद झाला. आम्ही वाचक आपल्या पाठीशी आहोत उत्तमोत्तम लिहिण्यासाठी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छाही दिल्या. इंटरनेटाशी त्यांची तितकीशी ओळख नाही. प्रयत्न करत आहेत, शिकताहेत. ब्लॉग लिहा. सार्वजनिक संकेतस्थळावर लिहा, असेही म्हणालो पण त्यांना या जगात वावरायला कितपत आवडेल आत्ता तरी मला ते माहिती नाही. मुंबईच्या मिपाकर वाचकमित्राचे मनःपूर्वक आभार. आपल्यामुळे मला कवयित्री शी गप्पा करता आल्या. धन्स. -दिलीप बिरुटे -
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा