आयुष्याचा परिघ समजून घेताना
आसपास वसतीला असलेला अंधार प्रकाशाइतकंच प्रखर सत्य. पण उजेडाची आस अंतरी असणंही तसं स्वाभाविकच. वास्तव आणि कल्पितात अंतर असतं. ते ज्याला कळतं त्याला यश आणि अपयशाच्या व्याख्या पाठ नाही करायला लागत. वास्तवाचा विसर पडणं प्रतारणा असते आपणच आपल्या विचारांशी केलेली. खरं हेही आहे की, हे वास्तवच जगण्याची प्रेरणा असते. पायांचं नातं जमिनीशी अन् विचारांची सोयरिक आभाळाशी असली की, वास्तव विस्मरणात नाही जात.
आयुष्याचा विस्तार काही आपल्या हाती नसतो, पण त्याचा परीघ समजून घेणं शक्य असतं. त्याची लांबीरुंदी किती असावी हे आपल्या हाती नसलं, तरी कोण्या नजरेला अधोरेखित करता येईल एवढी खोली देता येणं संभव आहे.
मिसळपाव