पहिल्या ऑफीस जॉबचा निरोप घेतल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस छान निवांत गेले. मनाला आलेलं साचलेपण हळू हळू निथळू लागलं. सकाळी उठायचं, रोजची कामं आवरायची, आईला मदत हवी का, ते पाहायचं, मग निवांत पेपरवाचन... दुपारच्या जेवणानंतर गेल्या अनेक महिन्यात वेळोवेळी कुठे कुठे खरडून ठेवलेल्या ओळी, कल्पना चाळायच्या... असे खूपच कागद जमले होते. छान वेळ जायचा. संध्याकाळी बाबा ऑफीसमधून आल्यानंतर आई-बाबांसोबत चहा. मग ते दोघं नेहमी एक फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडायचे. मी कधी त्यांच्यासोबत तर कधी एकटीच भटकायचे. माझे बाबा नीटीमध्ये होते. आयआयटी सारखीच नॅशनल इंडस्ट्रीयल इंजिनियरींग इन्स्टीट्यूट.