तसं पाहिलं तर सत्शील व्यक्तिंनी उंबरा ओलांडू नये असे म्हणतात. त्यामानाने तुझा उंबरा फारच मोलाचा. जणू एखादी लक्ष्मणरेखाच. ती ओलांडली की माणसाने सद्गुणांना सोडले असे मानतात. वर्षअखेरीस तुझ्या उंबऱ्याच्या अलिकडे अगणित सद्गुणांची भली मोठी रास साठलेली असते. ती आम्हां 'अ'शीलवंतांना खुणावते. त्या राशीने भारीत झालेली मूठभर माती जरी मिळाली तरी उंबऱ्या पलिकडे जाऊन केलेल्या कुकर्मांचे प्रायश्चित्त मिळाल्यासारखे वाटते. ती दिव्य मृत्तिका आम्ही ढोल ताशे बडवित वाजत गाजत तुझ्याच वस्तीतून आमच्या ग्रीनलाईटच्या दुनियेत आणतो.