मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

थेट गहुंजेवरून . . .

श्रीगुरुजी · · काथ्याकूट

भारत वि. ऑस्ट्रेलिया ४ कसोटी सामन्यांची मालिका

उद्यापासून भारतात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाविरूद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना गहुंजे (पुणे) येथे गुरूवार २३ फेब्रु ते सोमवार २७ फेब्रु या कालावधीत खेळला जाईल. मी गहुंजे येथील पहिला कसोटी सामना बघण्यास जाणार आहे. जमल्यास तिथूनच किंवा नंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर सामन्याविषयी लिहीन व काही फोटोही टाकेन. कोणी मिपाकर सामना बघण्यास येणार असतील तर त्यांची भेट घ्यायला आवडेल. मी यापूर्वी नेहरू स्टेडिअम येथे इंग्लंडविरूद्ध खेळला गेलेला एक एकदिवसीय सामना तिकीट न काढता घुसून बघितला होता. त्याच मैदानावर काही रणजी व दुलीप ट्रॉफीचे सामनेही तिकीट न काढता पाहिले होते. कसोटी सामना प्रत्यक्ष बघण्याची ही पहिलीच वेळ आणि स्वतःच्या पैशाने तिकीट काढून सामना बघण्याची सुद्धा ही पहिलीच वेळ. या कसोटीत अनेक आवडत्या खेळाडूंना प्रत्यक्ष डोळ्यासमोर खेळताना बघणार आहे. पुण्यात/पुणे परीसरात प्रथमच कसोटी सामना खेळला जात आहे. यापूर्वी पुण्यातील नेहरू स्टेडिअमवर काही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले होते. त्यातील शेवटचा सामना २००५ मध्ये खेळला गेला होता. त्यानंतर पुण्यात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला नाही. उद्यापासूनच प्रथमच गहुंजे येथील मैदान एक नवीन कसोटी केंद्र म्हणून उदयास येत आहे. मालिकेचे वेळापत्रक असे आहे (सर्व सामने सकाळी ९:३० ते दुपारी ४:३० या वेळात खेळले जातील). पहिला कसोटी सामना - गहुंजे (पुणे) येथे २३ ते २७ फेब्रु दुसरा कसोटी सामना - बंगळूर येथे ४ ते ८ मार्च तिसरा कसोटी सामना - रांची येथे १६-२० मार्च चौथा कसोटी सामना - धर्मशाळा येथे २५-२९ मार्च भारताने पहिल्या दोन कसोटींसाठी जाहीर केलेल्या संघात नेहमीच्या यशस्वी खेळाडूंप्रमाणे कुलदीप यादव व जयंत यादव हे नवोदीत खेळाडू आहेत. अभिनव मुकुंदचे बर्‍याच कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले आहे. त्रिशतकी वीर करूण नायर सुद्धा संघात आहे. मात्र सातत्याने अपयशी ठरलेल्या के एल राहुलला पुन्हा एकदा संघात घेतले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात कर्णधार स्टिव्हन स्मिथसह डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू वेड, मिचेल मार्श, शॉन मार्श, अ‍ॅश्टन अ‍ॅगर, जॅकसन् बर्ड, जॉश हॅजलवूड, पीटर हॅन्ड्सकॉम्ब, उस्मान ख्वाजा, नेथन लॉयन, ग्लेन मॅक्सवेल, स्टिव्हन ओ'कॅफी, मॅट रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन इ. खेळाडू आहेत. भारतीय खेळपट्ट्यांचे स्वरूप लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाने संघात फिरकी गोलंदाजांचा भरणा केला आहे. अर्थात अश्विन व जडेजाच्या फिरकीसमोर ऑसीज किती टिकाव धरू शकतात ते कळेलच. त्यांच्या जोडीला अमित मिश्रा सुद्धा आहे. भारताने भारतात खेळली गेलेली मागील मालिका ४-० अशी निर्विवाद जिंकली होती. परंतु २०१५ मध्ये भारताचा ऑस्ट्रेलियात ०-२ असा पराभव झाला होता. एकंदरीत दोन्ही देश आपापल्या भूमीत जिंकतात असेच मागील २-३ दशकात दिसून आले आहे (अपवाद भारतातील २००४ मधील मालिकेचा). भारताने लागोपाठ ६ मालिका जिंकून कसोटी क्रमवारीत प्रथम स्थान मिळविले आहे. भारताने मागील सलग १९ कसोटी सामन्यात पराभव पत्करलेला नाही. त्यामुळे याही मालिकेत भारतातेच पारडे जड आहे.

वाचने 12920 वाचनखूण प्रतिक्रिया 74

श्रीगुरुजी गुरुवार, 02/23/2017 - 21:08
सकाळी लवकर उठून गहुंजेला निघालो. काही कारणाने अपेक्षित वेळेवर निघता आले नाही. त्यामुळे अंदाजे अर्धा तास उशीरा पोहोचलो. पण नंतर दिवसभर सामना पाहिला. सुरवातीपासूनच वॉर्नर व रेनशॉ अत्यंत संथ खेळत होते. खेळपट्टी पाटा वाटत होती. तरीही दोघे संथ खेळत होते. बराच वेळ प्रतिषटक धावगती २.५० च्या आसपास होती. उपाहारापूर्वी काही वेळ असताना नाबाद ८२ या धावसंख्येवर उमेश यादवच्या गोलंदाजीवर वॉर्नर त्रिफळाबाद झाला. त्याच्या बॅटला लागून चेंडू यष्ट्यांवर गेला. यादव चेंडू टाकत असताना मी दुर्बिणीतून खेळ पाहत होतो. दुर्बिणीतूनच वॉर्नरचा त्रिफळा उडालेला अगदी स्पष्ट दिसला. हा माझ्या दृष्टीने अविस्मरणीय क्षण आहे! वॉर्नर बाद झाल्यावर पुढील फलंदाज यायच्या आतच रेनशॉ देखील स्नायू दुखावल्यामुळे तात्पुरता निवृत्त झाला. त्यामुळे शॉन मार्श व कर्णधार स्टिव्हन स्मिथ हे दोन फलंदाज एकदमच खेळायला आहे. उपाहाराला १ बाद ८४ अशी धावसंख्या होती. उपाहारानंतर पुन्हा एकदा संथ खेळ सुरू झाला. काही वेळातच शॉन मार्श स्वीप मारण्याच्या प्रयत्नात बॅकवर्ड शॉर्टलेगला कोहलीच्या हातात झेल देऊन बाद झाला. ही विकेट देखील मी दुर्बिणीतून पाहत असतानाच पडली. नंतर काही वेळाने पीटर हॅन्ड्सकॉम्ब व स्टिव्हन स्मिथ बाद झाले. उपाहाराला ऑसीज ४ बाद १४९ होते. उपाहारानंतर भराभर विकेट्स पडायला सुरूवात झाली. आधी शॉन मार्श, नंतर मॅथ्यू वेड व नंतर रेनशॉ बाद झाले. तत्पूर्वी रेनशॉने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. काही वेळाने उमेश यादवच्या एका चेंडूवर उडालेला ओ'कॅफीचा झेल साहाने उजव्या बाजूला हवेत झेपावत एका हातात घेतला व एक अत्यंत उत्कृष्ट झेल याचि देही याचि डोळा बघितल्याचे भाग्य लाभले. यादवच्या पुढच्याच चेंडूवर लॉयन पायचित झाला व उमेश यादवला हॅटट्रिकची संधी मिळाली. यावेळी ऑसीज ९ बाद २०५ अशा अवघड परिस्थितीत होते. परंतु त्याचा पुढील चेंडू हॅझलवूडने नीट खेळून हॅटट्रिक वाचविली. त्यावेळी पावणेचार वाजले होते व खेळ संपायला अजून ४५ मिनिटे होती. काही वेळातच १० गडी बाद होऊन आपल्याला आजच भारताची फलंदाजी बघायला मिळणार असे वाटत असतानाचा मिचेल स्टार्क ने जोरदार हल्ला चढविला. भारताच्या फिरकी गोलंदाजांची धुलाई करताना त्याने ३ षटकार व ५ चौकारांच्या सहाय्याने जवळपास १०० च्या धावगतीने नाबाद अर्धशतक करून दिवस संपविला. खेळ थांबला तेव्हा ऑसीज ९ बाद २५६ या धावसंख्येवर होते. आता उद्या लवकरच भारताची फलंदाजी सुरु होईल अशी आशा आहे.

कपिलमुनी Fri, 02/24/2017 - 11:55
आज सामना बघायला आलो होतो , कोहली आउट झाल्यावर परत ऑफिसला आलो, उद्या मी आणि काही मिपाकर मॅच बघायला येणार आहोत.

In reply to by अभिजीत अवलिया

श्रीगुरुजी Fri, 02/24/2017 - 21:19
येणार असाल तर भेटू या. मी साऊथ लोअर स्टँडमध्ये आहे. ४ थ्या दिवसावर नक्की जाईल. बहुतेक ४ थ्या दिवशीच सामना संपेल.

बाळ सप्रे Fri, 02/24/2017 - 12:44
उद्या येइन म्हणतो गहुंजेला.. पुण्यातला पहिला एकदिवसीय सामना पाहिला होता प्रत्यक्ष .. तो पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच होता.. माझ्या दुर्दैवाने तो सामना भारताने गमावला होता.. इंग्लंडविरुद्धचा पुण्यातला सामना त्याच दिवशी मुंबई मॅरॅथॉन असल्याने प्रत्यक्ष पहाता आला नव्हता.. नेमका तो अविस्मरणीय झाला.. आता कसोटी सामनाही बघायचाय आयुष्यात प्रथमच.. यावेळी तरी कामगिरी सरस होवो ही इच्छा.. आत्ता तरी फार वाईट अवस्था आहे भारताची.. १०० च्या आत ५ गेले...

बाळ सप्रे Fri, 02/24/2017 - 13:16
संपलं.. १५०+ आघाडी ... लो स्कोअरींग सामन्यात.. ओ कीफच्या ३ विकेटनी सामना फिरवला..

श्रीगुरुजी Fri, 02/24/2017 - 13:36
Great atmosphere here although very thin crowd (approx. 7 k). Watched all wickets live. Wicket boomranged. Excellent catching by Aussies. India got out in just 40.2 overs. Warner is already gone. India will most probably lose this match.

फेरफटका Fri, 02/24/2017 - 20:56
केटी लागून क्रिटीकल ला विषय गेलेल्या ईंजिनीअरिंग च्या स्टुडंट च्या निष्ठेनं, डिटरमिनेशन नं आणी बुडाला आग लागल्या च्या भावनेनं खेळलो तरच ईभ्रत वाचेल आता. नाहीतर दुसरा उपाय म्हणजे सारसबागेतल्या गणपतीसमोर सामुदायिक रीत्या 'ओ पालनहारे' चा गजर करणे.

श्रीगुरुजी Fri, 02/24/2017 - 21:16
दुसरा दिवसही आनंदात गेला. आजच्या दिवसात एकूण १५ विकेट्स पडल्या. ऑस्ट्रेलियाने ९ बाद २०५ वरून स्टार्कच्या फक्त ६३ चेंडूतील ६१ धावांमुळे २६० ची मजल मारली. ऑस्ट्रेलियाला थोडक्यात गुंडाळण्याचा भारताचा आनंद फार काळ टिकला नाही. फलंदाजी सुरू झाल्यापासून के एल राहुल जोरदार फलंदाजी करीत होता. तो थोडासा नशीबवानही ठरला कारण त्याचे २-३ फटके स्लीपच्या डोक्यावरून किंवा दोन स्लीपमधून हवेतून पार झाले. दुसरीकडे १० धावा करून मुरली विजय हॅझलवूडच्या एका बाहेर जाणार्‍या चेंडूला बॅट लावून यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. पुजारा थोडा वेळ टिकला. पण दुसर्‍या हप्त्यात गोलंदाजीला आलेल्या स्टार्कच्या एका बाहेर जाणार्‍या चेंडूवर पुजारा देखील बॅट लावून यष्टीरक्षकाकडे सोपा झेल देऊन बाद झाला. सर्व प्रेक्षक फलंदाजीसाठी कोहलीची आतुरतेने वाट पहात होते. तो मैदानात येऊ लागल्यावर प्रेक्षक भयंकर चेकाळले व आरडाओरडा करून त्यांनी स्टेडिअम दणाणून सोडले. त्यात अर्थात मी सुद्धा होता. कोहलीने स्टार्कचा पहिला चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळून काढला. पुढच्या काहीशा खाली राहिलेल्या बाहेर जाणार्‍या चेंडूवर चेंडूच्या पुरेसे जवळ न जाता त्याने बॅट लावली व पहिल्या स्लीपमध्ये पीटर हॅन्ड्सकॉम्बने एक अत्यंत उत्कृष्ट लो कॅच घेतल्यावर सर्वांना दु:खाचा धक्का बसला. १ बाद ४४ वरून केवळ ३ चेंडूत भारत ३ बाद ४४ अशा अडचणीत आला. नंतर रहाणेने राहुलला बर्‍यापैकी साथ दिली. राहुलने आपले अर्धशतक झटपट पूर्ण केले. नंतर त्याने लागोपाठ २ चौकार मारून रहाणेबरोबर ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. भारत ३ बाद ९४. पुढच्या ओ'कीफ या डावखुर्‍या फिरकी गोलंदाजाचा एक चेंडू खेळताना त्याने तो लाँगऑनला उचलून मारण्याचा प्रयत्न करताना त्याचा खांदा दुखावला व चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागून डीप फाईन लेग व डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान उंच झेल उडाला. फटका मारल्याक्षणीच तो वेदनेने जमिनीवर कोसळला. दरम्यानच्या काळात कसलेला क्षेत्ररक्षक डेव्हिड वॉर्नर लांबून धावत आला आणि त्याने अचूक झेल पकडला. ४ बाद ९४. अश्विन ६ व्या क्रमांकावर खेळायला आला व त्याने पहिल्याच चेंडूवर १ धाव घेतली. ओ'कीफच्या पुढच्याच काहीश्या उसळलेल्या चेंडूवर रहाणेला आपली बॅट काढता आली नाही आणि पुन्हा एकदा पीटर हॅन्ड्सकॉम्बने एका बाजूला झेपावत एका हातात उत्कृष्ट झेल घेतला. झेल नीट घेतला की नाही याची पंचांनी तृतीय पंचांकडे विचारणा केली. रिप्लेमध्ये झेल अत्यंत अचूक जमिनीच्या वरच पकडल्याचे स्पष्ट दिसले आणि रहाणे १३ धावा करून परतला. ५ बाद ९५. आता साहा खेळायला आला. या षटकाचे अजून २ चेंडू शिल्लक होते. षटकात पहिल्या ४ चेंडूत २ बळी गेलेले होते. ६ व्या चेंडूवर साहाची बॅट चेंडूला लागली आणि झेल यष्टीरक्षकाच्या हाताला लागून पहिल्या स्लीपमध्ये स्टिव्हन स्मिथच्या हातात विसावला. एकाच षटकात ३ बळी घेऊन ओ'कीफने भारताचे कंबरडे मोडले. ६ बाद ९५. काय होत आहे यावर प्रेक्षकांचा विश्वासच बसत नव्हता. अवघ्या ४-५ मिनिटात हाराकिरी झाली होती. लॉयनच्या पुढच्या षटकाच अश्विनने एक चेंडू बॅकफूटवर खेळला. चेंडू बॅटच्या दांड्याला लागून त्याच्या बुटावर पडला व तिथून उडून फॉरवर्ड शॉर्टलेगच्या दिशेने उडाला. पुन्हा एकदा पीटर हॅन्ड्सकॉम्बने अगदी खाली लो कॅच उत्कृष्ट झेलला. भारत ७ बाद ९५. आता जयंत यादव आला. तो बर्‍यापैकी फलंदाजी करू शकतो. त्याने व जडेजाने पुढील २ षटके सावध फलंदाजी करून धावसंख्या ९८ पर्यंत नेली. ओ'कीफच्या पुढच्या षटकात पाय ताणून फ्रंटफूटवर खेळताना जयंत यादवचा मागील पाय किंचित क्रीजच्या पुढे गेला. पाय मागे येण्याच्या आतच यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने बेल्स उडविल्या. रिप्लेत दिसले की यादवचा मागील पाय रेषेपासून जेमतेम १ सेंटीमीटर अलिकडेच राहिला व तो यष्टीचित झाला. ८ बाद ९८. उमेश यादव फलंदाजीला आल्यावर ओ'कीफच्या पुढच्या षटकात जडेजाने त्याचा एक चेंडू बेजबाबदारपणे मिडविकेट बाऊंड्रीच्या दिशेने उचलला. तिथे उभा असलेल्या लंबूटांग स्टार्कने कोणतीही चूक न करता आरामात झेल पकडला. हा ओ'कीफचा ५ वा बळी. ९ बाद १०१. शेवटचा फलंदाज इशांत शर्मा. पुन्हा एकदा ओ'कीफच्याच गोलंदाजीवर उमेशने स्लीपमध्ये स्मिथच्या हातात सोपा झेल दिला. भारत सर्वबाद १०५. ओ'कीफने ६ बळी घेऊन आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली. त्याचे पृथक्करण होते १३.१-२-३५-६. त्याने फक्त २४ चेंडूत ६ बळी मिळवून भारताची दाणादाण उडवून दिली. फिरकी खेळणारा सर्वोत्कृष्ट संघ अशी भारताची ओळख आहे. परंतु भारताने फिरकी गोलंदाजासमोरच नांगी टाकली. ऑस्ट्रेलियाने एकूण १५५ धावांचे जबरदस्त आधिक्य मिळविले. ऑस्ट्रेलियाचा डाव देखील सुरवातीस कोसळला. अश्विन व जडेजाने गोलंदाजीची सुरूवात करून काही वेळातच ३ बाद ६१ अशी पडझड केली. तीनही बळी अश्विनने घेतले. परंतु नंतर कर्णधार स्मिथ व रेनशॉने डाव सावरला. ११३ धावसंख्येवर जयंत यादवच्या गोलंदाजीवर लाँगऑफला षटकार मारताना रेनशॉचा इशांत शर्माने उत्कृष्ट झेल घेतला. ४ बाद ११३. परंतु त्यानंतर मिचेल मार्श व स्मिथने अजून विकेट न गमावता धावसंख्या १४३ पर्यंत नेली. आता ऑस्ट्रेलियाकडे २९८ धावांचे आधिक्य आहे व अजून ६ गडी बाद व्हायचे आहेत. एकंदरीत भारताची अवघड परिस्थिती आहे. ३५० धावांहून मोठे लक्ष्य असेल तर भारताला ते अवघड जाणार आहे. उद्या जर ऑस्ट्रेलियाने ४०० धावांच्या लक्ष्याचा टप्पा पार केला तर भारत सामना हरल्यातच जमा आहे. सामना बहुतेक ४ थ्या दिवशीच संपेल अशी चिन्हे आहेत. तसा खेळपट्टीत फारसा दम नाही. परंतु भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली.

In reply to by विशुमित

अभिजीत अवलिया Sat, 02/25/2017 - 15:21
निघाले असतील. सर्वबाद १०७. ३३३ धावांनी पराभव. आज टिकाव धरला असता तर उद्या जाणार होतो पोराला घेऊन मॅच बघायला. आता त्याची कशी समजूत घालायची ह्याचा विचार करतोय.

श्रीगुरुजी Sat, 02/25/2017 - 17:30
चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताचा ६ वा गडी बाद झाला होता व फक्त ९९ धावा फलकावर होत्या. त्यामुळे तेव्हाच घरी निघालो. चहापानाची २० मिनिटे थांबून नंतर दिवस संपेपर्यंत थांबण्याचा पेशन्स शिल्लक नव्हता. चहापान संपल्यावर जेमतेम २०-२२ मिनिटातच उर्वरीत ४ खेळाडू बाद होऊन भारताचा स्वतःच्या भूमीवर तब्बल ३३३ धावांनी अत्यंत लाजिरवाणा पराभव झाल्याचे नेटवर समजले आणि चहापानानंतर लगेच परत निघण्याचा अचूक निर्णय घेतल्याबद्दल स्वत:चीच पाठ थोपटली. इतक्या लाजिरवाण्या पराभवाचे आपण साक्षीदार असल्याचे वाईट वाटले. कांगारूंना कमी लेखणे व स्वतःबद्दल असलेला फाजील आत्मविश्वास यामुळे भारताचा जेमतेम पावणेतीन दिवसातच दारूण पराभव झाला. भारताचा पहिला डाव जेमतेम ४०.१ षटकात ३ तासात १०५ धावात संपला तर दुसरा डाव तर जेमतेम २ तासात ३३.५ षटकात १०७ धावात संपला. भारताने दोन्ही डाव मिळून जेमतेम ५ तास फलंदाजी केली व फक्त ७४ षटके खेळून २१२ धावा केल्या. मी दुर्बिणीतून पाहत असतानाच बहुतेक सर्व विकेट्स पडल्या. त्यामुळे बहुतेक सर्व विकेट्स अगदी जवळून प्रत्यक्ष बघता आल्या. विशेषतः दोन्ही डावात कोहलीला बाद होताना बघितले. दुसर्‍या डावात ओ'कीफचा काहीसा बाहेर पडलेला एक चेंडू स्टंपाबाहेरून निघून जाईल या समजूतीने कोहलीने दोन्ही हाताने बॅट उचलून धरून चेंडू सोडून दिला. त्याच्या दुर्दैवाने त्याचा अंदाज चुकला व चेंडू काहीसा आत येऊन त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त झाल्याचे पाहणे नशीबी आले. खरं तर तिथेच सामना संपला होता. पण आशा चिवट असते. म्हणून अजून थोडा वेळ थांबावे असा विचार केला. परंतु निराशाच पदरात पडली. नवोदीत डावखुरा गोलंदाज स्टिव्हन ओ'कीफ याने दोन्ही डावात ६ बळी घेऊन सामन्यात तब्बल १२ बळी मिळवून सामनावीराचा पुरस्कार मिळविला. त्याला नेथन लॉयनने पहिल्या डावात १ व दुसर्‍या डावात ४ बळी घेऊन उत्तम साथ दिली. स्टार्कने पहिल्या डावात केवळ ३ चेंडूत पुजारा व कोहलीला बाद करताना फलंदाजीत पहिल्या डावात ६३ चेंडूत ६१ व दुसर्‍या डावात ३१ चेंडूत ३० असे वेगवान डाव खेळले. त्याने दोन्ही डावात ३-३- षटकार मारले. रेनशॉने पहिल्या डावात ६८ तर दुसर्‍या डावात ३१ धावा केल्या. कर्णधार स्टीव्हन स्मिथने पहिल्या डावात २७ धावाच केल्या, पण दुसर्‍या डावात शतक झळकावले. भारताची गोलंदाजी तशी चांगली झाली. उमेश यादव, अश्विन व जडेजाने दोन्ही डावात चांगली गोलंदाजी करून भरपूर बळी मिळविले. परंतु फलंदाजीत राहुलच्या पहिल्या डावातील ६१ धावांचा अपवाद वगळला तर इतरांनी नुसत्या पाट्या टाकल्या. २००४ नंतर तब्बल १३ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथमच भारतात कसोटी सामना जिंकला. २००४ ची भारतात खेळली गेलेली ४ सामन्यांची मालिका भारत १-२ असा हरला होता. यावेळी त्याचीच पुनरावृत्ती होते की काय ही भयशंका मनात डोकावत आहे. आता भारताला पुढील ३ कसोटींपैकी एकही न हरता किमान २ सामने जिंकावे लागतील. पुढील कसोटी सामना ४ मार्चला बंगळुरात आहे. ५ दिवसांच्या तिकिटापैकी सव्वा दोन दिवसांचे तिकीट वाया गेले. तिकिटाचे पैसे आता कोण भरून देणार?

In reply to by श्रीगुरुजी

अभिजीत अवलिया Sat, 02/25/2017 - 20:02
समजा एखाद्या व्यक्तीने फक्त ४थ्या किंवा ५व्या दिवसाचे तिकीट काढले असते तर अशा केस मध्ये पैसे परत मिळतात का?

In reply to by अभिजीत अवलिया

गणामास्तर Mon, 02/27/2017 - 14:21
हो मिळतात. बुकमायशो वाल्यांचा त्याच दिवशी रात्री मेल आला कि रविवारच्या तिकिटाचे पैसे ८ दिवसांत अकाउंटला जमा होतील म्हणून.

श्रीगुरुजी Sat, 03/04/2017 - 15:16
आजपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध दुसरा कसोटी सामना बंगळूर येथे सुरू झाला. भारताने संघात २ बदल केले आहेत. सलामीवीर मुरली विजयच्या जागी अभिनव मुकुंद व जयंत यादवच्या जागी त्रिशतकवीर करूण नायरला संघात घेतले. ऑस्ट्रेलियाने पुण्यातील विजयी संघ कायम ठेवला आहे. मुरली विजयच्या जागी अभिनव मुकुंदला आणल्याने भारतीय संघाच्या कामगिरीत शून्य फरक पडला. संघाची धावसंख्या जेमतेम ११ असताना मुकुंद शून्यावर बाद झाला. मागील १-२ वर्षांपासून सलामीची जोडी ही भारताची प्रमुख समस्या आहे. गेल्या २ वर्षात खेळल्या गेलेल्या बहुतेक सामन्यात सलामीच्या जोडीचा किमान एक फलंदाज स्वस्तात बाद झालेला आहे. किंबहुना भारतीय सलामीच्या जोडीने यापूर्वी किमान अर्धशतकी भागीदारी मागील २ वर्षात किती वेळा केली हा संशोधननाचा विषय आहे. मुरली विजय, राहुल, पार्थिव पटेल, गौतम गंभीर, अभिनव मुकुंद असे सलामीसाठी अनेक प्रयोग करून झाले. परंतु भारताला भक्कम सुरूवात देणारी सलामीची जोडी अजून मिळालेली नाही. काही वेळाने पुजारा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने फक्त १७ धावा केल्या. त्यापाठोपाठ कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. फिरकी गोलंदाज नेथन लॉयनचा एक चेंडू खूप वळून लेगस्टंपबाहेर जाईल हे गृहित धरून त्याने चेंडू न खेळता बॅट वर करून सोडून दिला. त्याच्या दुर्दैवाने चेंडू थोडासाच वळून त्याच्या पायांवर चेंडू आदळला त्यावेळी त्याचा पाय अगदी मधल्या यष्टीसमोर होता. त्यामुळे पंचांना त्याला पायचित बाद द्यायला जराही कष्ट पडले नाहीत. मागील सामन्यातील दुसर्‍या डावात ओ'कीफचा चेंडू वळणार नाही अशा समजूतीने त्याने सोडून दिला होता, परंतु तो चेंडू थोडा वळून आत आला व कोहलीच्या ऑफस्टंपवर जाऊन आदळला होता. म्हणजे लागोपाठ दुसर्‍य डावात कोहलीचा फिरकीचा अंदाज चुकला. कोहलीने ३ डावात ०, १३ व १२ अशा धावा केल्या आहेत. नंतर रहाणे आला आणि थोड्याच वेळात तोही १७ वर यष्टीचित झाला. रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला. पुढील डावातही रहाणे अपयशी ठरला तर बहुतेक तो संघाबाहेर जाईल कारण रहाणे मागील १०-१२ डावात एक अर्धशतक वगळता पूर्ण अपयशी ठरला आहे. भारत ४ बाद ११८. त्यातले ३ बळी लॉयनचे. त्यानंतर स्थानिक खेळाडू करूण नायर आला. इंग्लंडविरूद्ध त्रिशतक करूनसुद्धा रहाणेला आत आणण्यासाठी त्याला नंतरच्या सामन्यात वगळण्यात आले होते. दुसरीकडे दुसरा स्थानिक खेळाडू के एल राहुल चांगली फलंदाजी करून धावा वाढवित होता. त्याने अर्धशतकही पूर्ण केले होते. करूण नायर बर्‍यापैकी खेळत असताना तो ओ'कीफच्या गोलंदाजीवर २६ धावांवर यष्टीचित झाला. एकंदरीत फिरकी गोलंदाजी खेळण्यामध्ये दादा समजले जाणारे भारतीय फलंदाज भारतातच फिरकीसमोर फसत आहेत. ५ बाद १५६. नंतर अश्विन आला आणि गेला. त्यापाठोपाठ वॄद्धिमान साहा आला आणि गेला. त्यानंतर आलेला जडेजा देखील हजेरी लावून परतला. आता भारताची अवस्था ८ बाद १८८ अशी दारूण आहे. यावेळी फिरकी गोलंदाज नेथन लॉयन याने ६ बळी घेतले आहेत. भारताची परिस्थिती अत्यंत अवघड आहे. एकटा राहुल नाबाद ८९ धावांवर झुंज देत आहे. उर्वरीत सर्व फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत.

श्रीगुरुजी Sat, 03/04/2017 - 15:24
संपला डाव. भारत सर्वबाद १८९. नेथन लॉयनची २२.२-४-५०-८ अशी अफलातून कामगिरी. १८९ मधील ९० धावा एकट्या राहुलच्या. उर्वरीत १० जणांनी मिळून ८३ धावा केल्या व १६ धावा अतिरिक्त. पुण्यातील कहाणीचा पुढील अंक बंगळूरमध्ये सुरू.

श्रीगुरुजी Sat, 03/04/2017 - 23:38
दिवसअखेर भारत सर्वबाद १८९ तर ऑसीज नाबाद ४०. पहिल्याच दिवशी भारताची वाट लागली आहे. हा सामना जर भारत हरला तर मालिका हरल्यातच जमा आहे. भारताची संघनिवड चुकत आहे. वृद्धिमान साहाऐवजी पार्थिव पटेल हवा होता. त्याच्यामुळे एक डावखुरा फलंदाज मिळतोच पण एक सलामीचा फलंदाजही मिळतो. इशांत शर्मा गोलंदाजी व फलंदाजी या दोन्हीतही निष्प्रभ आहे. त्याच्याऐवजी भुवनेश्वर कुमार हवा होता. भुवनेश्वर कुमार बर्‍यापैकी फलंदाजीही करतो. अजिंक्य रहाणेऐवजी कुलदीप यादव हा डावरा लेगस्पिन गोलंदाज संघात आल्यास एक वेगळ्या पद्धतीचा गोलंदाज संघात येऊन ५ व्या गोलंदाजाचा फायदा होईल. निदान पुढील २ कसोटीसाठी तरी योग्य ते बदल व्हावेत.

श्रीगुरुजी Tue, 03/07/2017 - 12:30
भारत जिंकण्याची शक्यता मला फारच कमी वाटत आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी टिच्चून फलंदाजी करून मालिकेच्या आधीच्या तीनही डावात किमान २६० धावा केल्या आहेत. ही खेळपट्टी चमत्कारिक वाटते. भारताच्या पहिल्या डावात ९ फलंदाज फिरकी गोलंदाजांनी बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ८ फलंदाज फिरकी गोलंदाजांनी बाद केले. भारताच्या दुसर्‍या डावात फिरकी गोलंदाजांना फक्त दोनच बळी मिळाले पण वेगवान गोलंदाजांनी ८ गडी बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या डावात भारताचे फिरकी गोलंदा़ज यशस्वी ठरतात का मध्यमगती गोलंदाज हे सांगता येणे अवघड आहे. तसेही १८८ हे फार मोठे लक्ष्य नाही. भारताची फलंदाजी दयनीय अवस्थेत आहे. गेल्या २-३ वर्षांपासून भारताला भरवशाची सलामीची जोडी मिळालेली नाही. मुरली विजय, राहुल, धवन, गंभीर, पार्थिव पटेल, अभिनव मुकुंद असे अनेक प्रयोग सलामीसाठी केले गेले. सलामीच्या जोडीपैकी किमान एक फलंदाज चटकन बाद होतो. मागील २-३ वर्षात भारताच्या सलामीच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी केल्याची अगदी दुर्मिळ उदाहरणे सापडतील. कोहलीचे या मालिकेतील अपयश चिंताजनक आहे. मागील ४ डावात त्याने ४,१३, १२ व १५ अशा ४० धावा केल्या आहेत. जडेजा व अश्विन सर्व सामन्यात अपयशी ठरले आहेत. रहाणेने फक्त १ अर्धशतक केले. मुरली विजय व मुकुंद सर्व डावात अपयशी आहेत. पुजाराच्या आजच्या ९२ धावा सोडल्या तर तोही साहाच्या आजच्या नाबाद २० धावा सोडल्या तर तोसुद्धा अपयशी आहे. एकट्या राहुलने ४ पैकी ३ डावात अर्धशतक केले आहे. गोलंदाजांची व संघाची निवडही चुकत आहे. इशांत शर्माचा फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात फारसा उपयोग नाही. त्याच्याऐवजी भुवनेश्वर कुमार हवा होता. तसेच संघात कुलदीप यादव हा अजून एक चायनामन फिरकी गोलंदाज हवा होता. सलामीसाठी व यष्टीरक्षक म्हणून सुद्धा पार्थिव पटेलला पुन्हा संघात आणल्यास उपयोग होईल. भारताला डीआरएसचा नीट वापर करता येत नाही असे दिसत आहे. आतापर्यंत भारताने फलंदाजी व गोलंदाजी करताना डीआरएसच्या बहुतेक सर्व संधी वाया घालविल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या डावात पहिल्या ४ षटकात नाबाद २२ धावा आहेत. त्यात ८ बाय धावांचा समावेश आहे. जिंकण्यासाठी आता फक्त १६६ धावा हव्या आहेत. बहुतेक आजच सामना संपेल. एकंदरीत भारतीय भूमीवर भारताच्या सामर्थ्याचा फुगा फुटत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद_१९८२ Tue, 03/07/2017 - 13:01
भारताची फलंदाजी दयनीय अवस्थेत आहे. सहमत श्रीगुरुजी, आजच्या दिवशी फक्त ३६ धावांच्या बदल्यात भारताचे सहा फलंदाज बाद झाले, अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे ही.

प्रसाद_१९८२ Tue, 03/07/2017 - 15:42
अभिनंदन, भारतीय गोलंदाजांचे, खासकरुन आर आश्विनचे. अगदी भेदक गोलंदाजी केली त्याने आज. ४१/६

श्रीगुरुजी Wed, 03/15/2017 - 20:55
उद्यापासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रांची येथे सुरू होत आहे. गहुंजेप्रमाणे रांची येथे प्रथमच कसोटी सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे ५ दिवसांच्या सामन्यात खेळपट्टी कसे रंग दाखवेल हे सांगता येणे अवघड आहे. नवीन खेळपट्टी असल्याने दोन्ही संघ नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजीचाच निर्णय घेतील असे वाटते. पहिल्या दोन सामन्यानंतर मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे. पहिला सामना शांततेत पार पडला असला तरी दुसर्‍या सामन्यात डीआरएस व बाचाबाची यामुळे वाद निर्माण झाले होते. विशेषतः स्टीव्हन स्मिथने डीआरएस मागण्याआधी ड्रेसिंग रुमकडे बघून डीआरएस बद्दल अंदाज घ्यायचा प्रयत्न करणे, इशांत शर्माने तोंड वेडेवाकडे करून स्टीव्हन स्मिथची नक्कल करणे अशा गोष्टींमुळे वातावरण बिघडायला सुरूवात झाली आहे. भारत प्रथमच डीआरएसचा वापर करीत आहे व ते तंत्र भारताला फारसे जमलेले नाही. भारताने मागितलेले बहुतेक रिव्ह्यू भारताविरूद्धच गेले. भारताकडून कोहली व ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नर अपयशी ठरत आहे. ते पुन्हा एकदा भरात यावेत अशी अपेक्षा आहे. स्टार्क व मिचेल मार्श दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले असून ऑस्ट्रेलियाला त्यामुळे धक्का बसलेला आहे. स्टार्कऐवजी पॅट कमिन्सला आणले आहे व मार्शऐवजी मार्कस स्टॉईनिस संघात आला आहे. स्टार्कने गोलंदाजी व फलंदाजीतही भारताला वैताग आणला होता. उद्याचा कसोटी सामना हा ऑस्ट्रेलियाचा ८०० वा कसोटी सामना असणार आहे. स्टिव्हन स्मिथला आपल्या ५००० धावा पूर्ण करण्यासाठी फक्त ७६ धावांची गरज आहे. पॅट कमिन्स आपला पदार्पणाचा कसोटी सामना २०११ मध्ये आफ्रिकेविरूद्ध खेळला होता. त्यात त्याने पहिल्या डावात १ व दुसर्‍या डावात ६ बळी घेतले होते. तब्बल ६ वर्षांच्या खंडानंतर तो पुन्हा कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे. भारतीय संघात एकमेव बदल होण्याची शक्यता आहे, तो म्हणजे अभिनव मुकुंदच्या जागी मुरली विजय पुन्हा संघात येऊ शकतो. बघूया उद्या काय होतंय ते.

विशुमित गुरुवार, 03/16/2017 - 10:11
कांगारूनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आहे. रेनशॉ ने धडाकेबाज सुरवात केली आहे. मला व्यक्तिशः हा खेळाडू खूप आवडला आहे.

श्रीगुरुजी गुरुवार, 03/16/2017 - 14:18
चहापानापर्यंत ऑसीज ४ बाद १९४. स्टिव्हन स्मिथ ८० वर नाबाद आहे. तो मालिकेतील दुसरे शतक करण्याच्या मार्गावर आहे. डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा १९ धावांवर बाद होऊन अपयशी ठरला. रेनशॉने पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करून ४४ धावा केल्या. यादवने २ तर जडेजा व अश्विनने प्रत्येकी १ बळी घेतला. इशांत शर्माला अजून बळी मिळालेला नाही. एकंदरीत इशांत शर्माऐवजी भुवनेश्वर किंवा शमी जास्त उपयोगी ठरला असता.

श्रीगुरुजी गुरुवार, 03/16/2017 - 20:55
पहिल्या दिवसाखेर ऑसीजने ४ बाद २९९ अशी भक्कम मजल मारलेली आहे. स्मिथने मालिकेतील दुसरे शतक केले. तो ११७ धावांवर नाबाद आहे तर ग्लेन मॅक्सवेल ८२ वर नाबाद आहे. स्टिव्हन स्मिथ भारताला कायमच नडत आला आहे. भारताविरूद्ध त्याने खेळलेल्या मागील ७ कसोटीत (या कसोटीसहित) त्याने एकूण ६ शतके केली आहेत. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने चारही सामन्यात शतक केले होते. या मालिकेतील पहिल्या कसोटीत आणि आजच्या कसोटीतही त्याने शतक केले आहे. अशीच फलंदाजी सुरू राहिली तर ऑस्ट्रेलिया उद्या किमान ४५० पर्यंत मजल मारू शकेल. क्षेत्ररक्षण करताना विराट कोहलीचा खांदा दुखावला आहे. त्यामुळे तो नंतर दिवसभर क्षेत्ररक्षणाला आला नाही. आज संध्याकाळी त्याच्या उजव्या खांद्याचे स्कॅनिंग होणार आहे. त्याची दुखापत कितपत गंभीर आहे ते उद्या सकाळीच समजेल. तो उद्या फलंदाजीसाठी तंदुरूस्त झाला तरी बराच वेळ मैदानाबाहेर असल्याने त्याला भारताचे किमान ५ फलंदाज बाद झाल्याशिवाय फलंदाजीला येता येणार नाही. जर त्याची दुखापत गंभीर असेल तर त्याला या कसोटीत फलंदाजी करता येणार नाही व ऑस्ट्रेलियाच्या धावांच्या डोंगरासमोर त्याच्याशिवाय भारत अत्यंत अडचणीत सापडू शकेल.

श्रीगुरुजी Sat, 03/18/2017 - 15:21
राहुलने या मालिकेत ५ डावातील ४ थे अर्धशतक केले. प्रथमच तो इतक्या जबाबदारीने व सातत्याने खेळताना दिसत आहे. मुरली विजयने पुनरागमन करताना चांगली फलंदाजी करून अर्धशतक केले. पुजाराला सूर गवसला आहे. मागील डावात तो ९२ वर बाद झाल्याने त्याचे शतक हुकले होते. मात्र या डावात त्याने नाबाद शतक केले आहे. या मालिकेत भारतातर्फे झालेले हे पहिलेच शतक. कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. ६ वर असताना स्लिपमध्ये झेल देऊन तो बाद झाला. आतापर्यंत झालेल्या ५ डावात त्याने फक्त ४६ धावा केल्या आहेत (सर्वाधिक १५). क्रिकेटरसिकांची त्याने घोर निराशा केली आहे. पाच डावात तो वेगवेगळ्या पाच गोलंदाजांच्या गोलंदाजीवर बाद झाला. रहाणे सुद्धा पुन्हा एकदा अपयशी ठरला. मागील कसोटीतील दुसर्‍या डावात केलेल्या ५२ धावांचा अपववाद वगळता इतर ४ डावात तो अपयशी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ४५१ धावांना उत्तर देताना भारत ५ बाद ३२० अशा चांगल्या स्थितीत आहे. खेळपट्टीचा रागरंग बघता हा सामना अनिर्णित होण्याचीच जास्त शक्यता दिसते. दुसरीकडे मायदेशात बांगलादेशाविरूद्ध खेळताना दुसर्‍या कसोटीत श्रीलंका अडचणीत आहे. आज चौथ्या दिवशी श्रीलंकेची अवस्था ६ बाद २०६ इतकी वाईट आहे. श्रीलंकेने पहिल्या डावात ३३८ अशी बर्‍यापैकी धावसंख्या रचलेली होती. परंतु बांगलादेशने पहिल्या डावात ४६७ धावा करून १२९ धावांची आघाडी मिळविली. सध्या श्रीलंकेकडे फक्त ७७ धावांची आघाडी असून त्यांचे ६ फलंदाज बाद झाले आहेत व सामन्याच्या उद्याचा दिवस शिल्लक आहे. जर हा सामना बांगलाने जिंकला तर परदेशात मोठ्या संघाविरूद्ध मिळविलेला हा खर्‍या अर्थाने त्यांचा पहिलाच विजय असेल (तसे त्यांनी काही वर्षांपूर्वी वेस्ट इंडीजमध्ये यजमानांवर २-० अशी मात केली होती. परंतु त्यावेळी विंडीजच्या सर्व प्रमुख खेळाडूंनी बहिष्कार टाकल्याने विंडीजला पूर्णपणे दुय्यम संघ खेळवावा लागला होता.).

श्रीगुरुजी Sat, 03/18/2017 - 23:36
भारत वि. ऑस्ट्रेलिया सामना अनिर्णिततेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. दुसरीकडे श्रीलंका वि. बांगलादेश सामना अत्यंत चुरशीचा झाला आहे. चौथ्या दिवसाखेर श्रीलंकेकडे १३९ धावांचे आधिक्य असून त्यांचे ८ गडी बाद झाले आहेत. उद्या पाचव्या दिवशी जर श्रीलंकेने १ तास खेळून १६० च्या पुढचे लक्ष्य ठेवले तर ते बांगलादेशाला जड जाण्याची शक्यता आहे कारण बांगलादेशाचा दुसर्‍या डावातील फलंदाजीचा इतिहास अत्यंत केविलवाणा आहे. तिसरीकडे द. आफ्रिकेने न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीवर हरवून सध्या आपणच कसोटीत प्रथम क्रमांकाचे आहोत हे सिद्ध केले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ऑस्ट्रेलियाचा हरविले होते. दुसर्‍या देशात सर्वाधिक विजय मिळविणार्‍या देशांमध्ये आफ्रिका प्रथम क्रमांकावर आहे.

अभिजीत अवलिया Sun, 03/19/2017 - 13:36
आता भारताने २६ धांवाची आघाडी घेतलेली आहे आणी अजूनही ४ गडी बाद व्हायचे आहेत. मला वाटते समजा आपली आघाडी १००-१२५ च्या पुढे गेली तर भारत कदाचित जिंकू शकेल हा सामना.

In reply to by अभिजीत अवलिया

गामा पैलवान Sun, 03/19/2017 - 18:45
सहमत. बक्कीने दीडशेची आघाडी घेतली. मला दोनशेची अपेक्षा होती. पण ठीकाय. कोहलीने साताठ षटके खेळायला लावून दोन गडी उचलले ते चांगलं केलं. आता आघाडी सव्वाशेच्या आसपास आहे. ती संपायच्या आंत पाहुण्यांना उखडायचे डावपेच तयार असतीलंच. -गा.पै.

आषाढ_दर्द_गाणे Sun, 03/19/2017 - 23:11
उद्याचा पहिल्या सत्राचा खेळ पाहण्याचा बेत करतोय. पण खेळपट्टी कदाचित दुपार संध्याकाळी जास्त रंग दाखवेल असं वाटतंय. हि कसोटी स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावर वाचवलीन तर स्मिथला 'मानला'. त्याचं तंत्र आणि शैली अजिबात आवडत नसले तरी.

श्रीगुरुजी Mon, 03/20/2017 - 14:21
५ व्या दिवशी पटापट बली मिळवून भारत सामना जिंकेल असे वाटले होते. त्या दृष्टीने आज सकाळच्या सत्रात स्टिव्हन स्मिथ व रेनशॉ यांचे बळी मिळवून भारताने ऑस्ट्रेलियाला उपाहारापूर्वीच ४ बाद ६३ असे अडचणीत टाकले होते. त्यावेळी ऑसीज ८९ धावांनी मागे होते. परंतु उपाहार ते चहापान हे संपूर्ण सत्र पीटर हॅन्ड्सकॉम्ब (नाबाद ४४) आणि शॉन मार्श (नाबाद ३८) यांनी सहज खेळून काढून नाबाद ८६ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला ४ बाद १४९ वर नेऊन अडचणीतून बाहेर काढले. ऑस्ट्रेलिया अजूनही ३ धावांनी मागे आहेत. परंतु सामन्याचे शेवटचे दोन तासच शिल्लक आहेत. चहापानानंतर पुढील १ तासात जर भारताने ऑस्ट्रेलियाचे उर्वरीत ६ गडी बाद केले तरच भारताला सामना जिंकण्याची संधी आहे. अन्यथा सामना अनिर्णित राहण्याचीच दाट शक्यता दिसते. आता मालिकेतील चौथा व शेवटचा कसोटी सामना धर्मशाळा येथे शनिवारी २५ मार्चला सुरू होईल. तो सामना २९ मार्चपर्यंत चालेल. नंतर लगेच ४ एप्रिलपासून आयपीएलचा तमाशा सुरू होईल व तो दीड महिना चालेल. नंतर लगेच १ जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी ही टॉपच्या ८ संघामध्ये एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा सुरू होईल. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी ८ व्या क्रमांकावर बांगलाचा संघ असून विंडीज ९ व्या क्रमांकावर असल्याने या स्पर्धेसाठी पात्र ठरलेले नाही. भारत या स्पर्धेत २००० मध्ये उपविजेता, २००२ मध्ये श्रीलंकेसह संयुक्त विजेता व २०१३ मध्ये विजेता होता. साधारणपणे दर दोन वर्षानंतर होणारी ही स्पर्धा ४ वर्षांच्या खंडानंतर ही स्पर्धा खेळली जात आहे कारण २०१४ व २०१६ मध्ये ट-२० विश्वचषक स्पर्धा खेळली गेली तर २०१५ मध्ये ११ वी विश्वचषक स्पर्धा खेळली गेली.

श्रीगुरुजी Sat, 03/25/2017 - 10:15
आजपासून धर्मशाळा येथे ४ था कसोटी सामना सुरु झाला. कोहली व इशांत शर्मा च्या जागी भुवनेश्वर कुमार व चायनामन गोलंदाज कुलदीप यादव संघात आला आहे. ऑस्ट्रेलिया आतापर्यंत ८.३ षटकांत १ बाद ४५ आहे.

श्रीगुरुजी Sat, 03/25/2017 - 20:47
पहिला दिवस रंगतदार अवस्थेत संपला. ऑस्ट्रेलियाने १ बाद १४ वरून १ बाद १४४ पर्यंत मजल मारली होती. मालिकेत पहिल्यांदाच वॉर्नरला सूर सापडला होता. स्टिव्हन स्मिथ नेहमीप्रमाणेच भारताला नडत होता. १ बाद १४४ वरून अचानक पारडे फिरले. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साथ देऊ लागली आणि दिवस संपताना ऑस्ट्रेलियाचा डाव ३०० वर संपला. पदार्पणाचा सामना खेळणार्‍या चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने वॉर्नर हा आपला पहिलाच बळी मिळविला व नंतर एकूण ४ बळी मिळवून पदार्पण दणक्यात साजरे केले. त्याचे हळू फिरक घेणारे चेंडू कांगारूंना समजत नव्हते. दिवसअखेर भारत नाबाद ० आहे. दुसरीकडे श्रीलंकेची आपल्याच देशात लिंबूटिंबू विरूद्ध वाईट अवस्था सुरूच आहे. दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटल्यानंतर आजच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ५ बाद ३२४ धावा केल्यानंतर आता याक्षणी श्रीलंकेची अवस्था २३ षटकात ३ बाद ८७ इतकी वाईट आहे. बांगलाच्या फलंदाजांनी शेवटच्या ६ षटकात तब्बल ८३ धावा फटकावल्या. आपल्याच भूमीवर बांगलाकडून हरण्याची नामुष्की श्रीलंकेवर येण्याची दाट शक्यता आहे.

श्रीगुरुजी Mon, 03/27/2017 - 15:32
सामना रोमहर्षक अवस्थेत आहे. भारताने कालच्या ६ बाद २४८ वरून सुरूवात करून उपाहारापर्यंत उर्वरीत सर्व गडी गमावून सर्वबाद ३३२ धावा केल्या. गोलंदाजांना बर्‍यापैकी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर ३२ धावांची छोटीशी परंतु महत्त्वपूर्ण आघाडी भारताला मिळाली. नेथन लॉयनने ५ बळी घेतले. या मालिकेतील पहिल्या कसोटीतील दुसर्‍या डावात ४, दुसर्‍या कसोटीतील पहिल्या डावात ८ आणि या कसोटीतील पहिल्या डावात ५ बळी मिळविलेला लॉयन या मालिकेत चांगलाच यशस्वी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाची दुसर्‍या डावाची सुरूवात वाईट झाली. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने ६ बाद १२० धावा केल्या असून ते फक्त ८८ धावांनी पुढे आहेत. उमेश यादवने सर्व कसोटीत वेगवान गोलंदाजी केलेली असून आतापर्यंत या मालिकेत त्याने १६ बळी मिळविले आहेत. भारत उद्या सामना जिंकेल असं दिसतंय. अर्थात ऑस्ट्रेलियाच्या शेपटाने त्रास दिला व लक्ष्य २०० च्या पुढे नेले तर जिंकणे तितकेसे सोपे नसेल.

श्रीगुरुजी Tue, 03/28/2017 - 21:20
भारताने आज उपाहारापूर्वीच २ बाद १०६ धावा करून सामना व मालिका जिंकली. गेल्या काही वर्षातील इतर मालिकांच्या तुलनेत ही मालिका भारताला बर्‍यापैकी जड गेली. मालिकेतील पहिलाच कसोटी सामना गमावल्याने भारत दडपणाखाली होता. दुसर्‍या सामन्यातही ऑस्ट्रेलियाला जेमतेम १८७ धावांचे लक्ष्य मिळाल्याने सामना हरण्याची भीति होतीच. परंतु दुसरा सामना गोलंदाजांनी जिंकून दिल्याने दडपण गेले. या मालिकेत काही रोचक गोष्टी झाल्या. - के एल राहुलने ७ डावात फलंदाजी करून ६५.५० सरासरीने ३९३ धावा केल्या. ७ पैकी ६ डावात त्याने अर्धशतक केले, परंतु एकदाही त्याला शतक करता आले नाही. - विराट कोहली सर्व ५ डावात अपयशी ठरला. मुरली विजय ५ पैकी ४ डावात, अभिनव मुकुंद २ पैकी दोन्ही डावात अपयशी ठरला. रहाणेला एकच अर्धशतक करता आले (५२ धावा). इशांत शर्माने ३ कसोटीतील ६ डावात फक्त ३ बळी घेतले. त्याच्या तुलनेत जडेजाने ८ डावात २५, अश्विनने ८ डावात २१ व उमेश यादवने वेगवान स्विंग गोलंदाजी करताना ८ डावात १७ बळी घेतले. - ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने ८ डावांमध्ये एकदाच अर्धशतक केले (५७ धावा). उर्वरीत ७ डावातही त्याला फार धावा करता आल्या नाहीत. शॉन मार्शही १ डावाचा अपवाद वगळता मालिकेत अपयशी ठरला. रेनशॉने पहिल्या दोन्ही कसोटीत अर्धशतक केले होते. परंतु तो नंतर ढेपाळला. या सर्वांच्या तुलनेत स्टिव्हन स्मिथने मालिकेत सर्वाधिक ३ शतके करून ८ डावात ७१.२८ सरासरीने ४९९ धावा केल्या. आता ५ एप्रिलपासून आयपीएलचा तमाशा सुरू होईल व नंतर १ जून पासून इंग्लंडमध्ये ८ देशांची चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा सुरू होईल. आयुष्यात प्रथमच संपूर्ण कसोटी सामना प्रत्यक्ष मैदानात जाऊन पाहण्याचे भाग्य लाभले. गहुंजे येथील सामन्यात भारताचा दारूण पराभव झालेला असला तरी सामन्याच्या स्मृती प्रदीर्घ काळ मनात राहतील.