Skip to main content

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 14/11/2016 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला. या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी : १. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच. २. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे. ३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच. माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात... काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते. त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते. बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता. केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते. इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल. मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्‍या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला. हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत. आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत. परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्‍यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !

वाचने 134078
प्रतिक्रिया 637

प्रतिक्रिया

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शाई वापरण्याचा मुद्दा कारवाईच्या मूळ मसुद्यात होता. पण लोकांना त्रास होऊ नये यासाठी (साध्या मराठीत : विरोधी पक्षांना, "बघा, बघा, आम जनतेवर सरकार अविश्वास दाखवतेय" असा कांगावा करायला मिळू नये यासाठी) तो अमलात आणला गेला नाही. आता काळाबाजारवाले जनतेतील भोळ्या माणसांचा गैरवापर करत आहेत यासाठी शाई वापरात आणली आहे. लोकशाहीत अश्या तडजोडी न करणे अशक्य असते. आता यामुळे बँकेसमोरची गर्दी दोनएक दिवसांत कमी झाली तर आश्चर्य वाटायला नको.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नुसते शाईचा ठिपका हातावर लावणार म्हणून जाहीर करताच बँकेसमोरच्या रांगातले लोक कालच निम्म्याने घटले अशी बातमी आहे... Queues getting shorter at banks; long wait at ATMs continues याचा अर्थ त्या रांगातले निम्मे लोक भाडोत्री होते, "स्वतःचे पैसे बदलायला आलेले तथाकथित गरीबबिचारे, उपाशी-तापाशी, आजारी आणि सरकारच्या छ्ळाने गांजलेले लोक" नव्ह्ते ! म्हणजे "वाहिन्यांवर अतीव सहानभूतीने बोलणारे नेते व वाहिन्यांवरचे वार्ताहर आणि त्यांचे पाठीराखे" हे केवळ चलाख कोल्हेकुईच करत होते असे दिसत आहे :) अवांतर : एका वाहिनिच्या वार्ताहाराच्या रिपोर्टचे मी अन्यत्र केलेले विश्लेषण बरोबर होते असेच दिसत आहे. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एटीएमपुढच्या रांगा उद्यापासून कमी होतील असा अंदाज आहे. कारण आजचा दिवस एटीएमच्या रिकॅलिब्रेशनसाठी ठेवलेला आहे. एकदा एटीएममधल्या सर्व खान्यांतून रु १०० (किंवा रु १०० आणि रु५००) च्या नोटा बाहेर येऊ लागतील तेव्हा त्या रांगाही एकदोन दिवसांत नोटाबंदीपुर्वी होत्या तशाच होतील. कारण एटीएमचा उपयोग काळा पैसा पांढरा करायला (मजूर लावून) होऊ शकत नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आपण दिलेल्या बातमीत खालील तपशील वाचलेत People faced inconvenience in purchasing milk, vegetables, medicines as they did not have adequate small currency notes. At various hospitals across the country, patients and their family members are facing inconvenience in buying medicines, food and availing transportation. A bulk of daily labourers were rendered jobless as construction and other activities came to a standstill in the wake of cement, sand and other supplies not coming in. आता या बातमीतले खरे खोटे देव जाणे!

In reply to by संदीप डांगे

याची अपरिहार्यता आणि कारणे अनेकदा अनेक प्रतिसादांत (त्यातले काही प्रतिसाद तुम्हालाच उद्देशून होते) दिलेली आहेत. यावर ती कुढे आहेत असे विचारू नका. ती तुम्हीच शोधून पहा. जरा आपण व ज्यावर मुद्द्यावर टीप्पणी करत आहे त्याबाबतीतले दुसर्‍यांचे प्रतिसाद वाचून निदान या विषयाची चर्चा संपेपर्यंत तरी लक्षात ठेवलेत तर बरे होईल असे वाटते. त्यामुळे, दुसर्‍याचे काहीच रगिस्टर न होता आपलेच म्हणणे रेटत आहे, असे होणार नाही व किमान सामंजस्यपूर्ण चर्चा शक्य होईल. ७० वर्षांची घाण साफ करण्यासाठी उचललेल्या कोणत्याही कारवाईत जनतेला काहीच तोशीस पोचणार नाही अशी समज असल्यास, शुभेच्छा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मला काहीच म्हणायचे नव्हते, म्हणायचे असते तर मेगाबायटी टाकला असता. असो. 'सत्तर वर्षांची घाण' चांगला शब्द आहे. वापरण्यात येईल! शुभेच्छांसाठी धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

"सत्तर वर्षांची घाण" या शब्दाचे पूर्ण श्रेय माझ्याकडे नाही. बँकेच्या रांगेत उभ्या असलेल्या घरकामे करणार्‍या गृहिणीला एका वाहिनीच्या वार्ताहराने तिला होणार्‍या त्रासाबद्दल विचारले तेव्हा तिने दिलेले उत्तर मलाही काहीकाळ सानंद चकीत करून गेले... ती गृहिणी म्हणाली ते साधारण असे होते, "घर खूप दिवसांनी साफ करायला काढले की त्रास होणारच. पण तो त्रास सहन केल्याशिवाय घर कसे साफ होणार. घर साफ झाल्यावर मात्र किती छान वाटतं, नै का ?" या प्रसंगाचे वर्णन एक दिवसाने कायप्पावरही फिरु लागले होते. आता, या सर्वसामान्य कामकरी बाईइतकी बुद्धी विरोध करणार्‍या नेत्यांत नाही, असे अजिबात नाही. म्हणजेच त्यां नेत्यांच्या विरोधाची उद्दिष्ये नक्कीच त्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या बाईपेक्षा खूप वेगळी आहेत. ती उद्दिष्ये काय असू शकतात हा काही फार मोठे गुपित नाही :) भारताच्या सर्वसमावेशक उज्ज्वल भविष्याची इच्छा असणारा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून हा फरक समजून घेणे मला फार निकडीचे वाटते.

In reply to by संदीप डांगे

People faced inconvenience in purchasing milk, vegetables, medicines as they did not have adequate small currency notes. At various hospitals across the country, patients and their family members are facing inconvenience in buying medicines, food and availing transportation. आजच्या या बातमीवरून यातला निम्मा तरी त्रास पैसे बदलायला आलेल्या "मजूरांमुळे" होता असेच दिसत नाही काय ? पहिल्या दिवसापासून हाताला शाई लावायची असे मूळ योजनेत होते. पण तसे काही व्यावहारीक समस्या* आल्या असत्या म्हणून ते केल्याचे ताळले असे वित्तसचिवांनी राष्ट्रीय वाहिनीवर सांगितले आहे. * व्यावहारीक समस्या : असे केल्याने विरोधकांनी पहिल्या दिवसापासून "अरे बघा, बघा, हे सरकार आम आदमीवर किती अविश्वास दाखवत आहे पहा !" अशी कोल्हेकुई सुरू करून त्याचे राजकिय भांडवल केले असते. A bulk of daily labourers were rendered jobless as construction and other activities came to a standstill in the wake of cement, sand and other supplies not coming in. त्यांना त्यांच्या रोजच्या कामाची मजूरी मिळाली नसली तरी त्यापेक्षा जास्त मजूरीची लालूच असल्याशिवाय ते रोजचे काम सोडून रांगात उभे राहतील काय ? ++++++++++++++++ एका बाजूला स्वतःच काळाबाजार्‍यांनी पैसे बदलायला मजूर लावले आहेत असे म्हणायचे आणि त्या रांगेत उभे असलेल्या सर्व (मजूर + सज्जन) लोकांबद्दल गळा काढाताना हा मुद्दा विसरायचा. एकूण काय, भ्र्ष्टाचारविरुद्ध एक चांगले पाऊल उचललेल्या सरकारला ते आपल्या आवडीच्या पक्षाचे नाही म्हणून डोळे मिटून झोडपायचे ! चूकीला चूक आणी बरोबरला बरोबर म्हणण्याव्यतिरिक्त इतर काही मला कधीच जमले नाही. चूकीला चूक आणि बरोबरलाही चूक म्हणायला इतर बरेच काही लागते, त्याची आमच्याकडे वानवा आहे :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ह्या लोकांना स्वतःच्या खात्यात पैसे भरताही येत नाही व काढताही येत नाही., त्यामुळे त्यांना रांगेचा त्रासही नाही. आनंदी आनंद गडे..... हेच चित्र आहे सगळीकडे.

In reply to by मार्मिक गोडसे

सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी यासाठी सरकारने मोठी मोहीम चालवून तिच्यात बरेच यश आले असताना एखाद्या भौगोलिक विभागातले किंवा एखाद्या व्यवसायातले नागरिक ६० ते ७० टक्के व्यवहार बँकेशिवाय करतात, हे त्या भागातील नेत्यांना भूषणावह आहे का ? जिल्हा बॅंका अनेक वर्षे कार्यरत असूनही आरबीआयच्या मूलभूत नियमांचे (उदा: केवायसी) उल्लंघन करतात याला त्या बँका चालवणारे स्थानिक नेते जबाबदार नाहीत काय ? ते असे का करतात ? अश्या उल्लंघनाने शेतकर्‍यांचे (ही कारवाई नव्हती तेव्हाही) भले होत होते का ? आनंदी आनंद गडे अशी परिस्थिती होती का ? असो. या प्रश्नांची उत्तरे तितकिशी गुप्त नाहीत आणि आता त्यांची उत्तरे शोधायची वेळही नाही. आता पिडीत झालेले लोक स्थिरस्थावर झाल्यावर ते काम सावकाश करतील, अशी आशा करूया. ====== नकदेनेच ६० ते ७०% व्यवहार होतात असे बातमीत म्हटले आहे, याचा तेवढे नकद पैसे लोकांचा हातात आहेत. समस्या फक्त त्यातले जे पैसे जुन्या रु ५०० किंवा रु १०००च्या नोटांच्या स्वरूपात आहेत त्यांचा आहे. आताच्या स्थितीत योग्य बॅकेत जरूर ती ओळख कागदपत्रे घेऊन गेल्यास नवीन खाते काही तासांत उघडता येते. त्या खात्यात कितीही प्रमाणात नकद वैध उत्पन्न कोणत्याही प्रकारची चिंता न करता भरता येईल. शेतकी उत्पन्नावर आयकर नसल्याने कितीही वैध शेतकी उत्पन्न बँकेत भरले तर त्यावर आयकराचीही भिती नाही. त्यानंतर, सरकारने शेतकर्‍यांना खास वाढवून दिलेल्या रकमेत (शेवटच्या बातमीप्रमाणे दर आठवड्याला रु२५०००) नकद पैसे काढता येतील आणि बँकेत शिल्लक असेल त्या सीमेपर्यंत हवे तेवढे पैसे चेकने चुकते करता येतील. बँक जवळ नसली तर पोस्ट ऑफिस तरी असेलच. ====== अश्या कठीण काळात स्थानिक नेत्यांनी केवळ सरकारचा निषेध करत न बसता शेतकर्‍यांना (जे त्यांचे मतदारही असतात) योग्य बँकेत नवीन खाते उघडायला मदत केली तर त्याचा जेवढा फायदा शेतकर्‍यांना होईल तेवढाच (किंवा कांकणभर जास्तच) पुढच्या निवडणूकीत नेत्यांना होईल. किंबहुना अश्या वेळेस मतदारांच्या जे कामी येत नाही त्यांना नेते तरी कसे म्हणावे ?! सद्याच्या कठीण परिस्थितीत केवळ तक्रार करत बसण्यापेक्षा शक्य ते वैध उपाय शोधणे गरजेचे आहे, असे वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी यासाठी सरकारने मोठी मोहीम चालवून तिच्यात बरेच यश आले असताना एखाद्या भौगोलिक विभागातले किंवा एखाद्या व्यवसायातले नागरिक ६० ते ७० टक्के व्यवहार बँकेशिवाय करतात
शेतकर्‍यांची जि.म. बॅकांमध्ये खाती असतातच. पिक नुकसान भरपाई, पिककर्ज ह्याच बॅकामार्फत मिळते. त्यामुळे ६० -७० टक्के व्यवहार बँकेशिवाय चालतो ह्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही.
जिल्हा बॅंका अनेक वर्षे कार्यरत असूनही आरबीआयच्या मूलभूत नियमांचे (उदा: केवायसी) उल्लंघन करतात याला त्या बँका चालवणारे स्थानिक नेते जबाबदार नाहीत काय ?
आरबीआय जेव्हा बँकांना परवाना देते तेव्हा संबंधीत बँका आरबीआयच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करते की नाही हे पहाण्याची जबाबदारी आरबीआयची असते, स्थानिक नेत्यांची नाही.
आताच्या स्थितीत योग्य बॅकेत जरूर ती ओळख कागदपत्रे घेऊन गेल्यास नवीन खाते काही तासांत उघडता येते.
दुसर्‍या कशाला? ,ह्याच बॅकेत केवायसी पुर्ण करूनही व्यवहार करता येतील. परंतू सरकारने ह्या बँकाच्या व्यवहारावरच सध्या बंदी घातली आहे. ज्यांची ह्या बँकेत केवायसी पुर्ण आहे अशा खातेदारालाही आपल्याच खात्यातून रोख रक्कम काढता येत नाही. नोटाबंदीचा निर्णय हा सरकारने आरबीआयला बरोबर घेउनच घेतलेला आहे. ह्या चलनबदलीकरता बँक व पोस्ट प्रणाली वापरावी लागणार हे माहीत असताना, ह्या प्रणालीत येणार्‍या संभाव्य अडचणी दूर करूनच हा निर्णय राबवायला हवा होता. सरकारने फार घाईघाईत निर्णय घेताना लोकाच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले व त्याचे खापर स्थानिक नेत्यांवर फोडणे योग्य नव्हे.
सद्याच्या कठीण परिस्थितीत केवळ तक्रार करत बसण्यापेक्षा शक्य ते वैध उपाय शोधणे गरजेचे आहे, असे वाटते.
सरकारच्या निर्णयाला कधीच विरोध केला नाही. परंतू जे लोक म्हणतात जनतेला ह्या निर्णयामुळे काहीच त्रास होत नाहीये, ग्रामीण भागातील जनतेला त्रास होतोय,परंतू काही कारणामूळे तो लोकांसमोर येत नसल्याने सर्वत्र आनदी आनंदाचे वातावरण आहे असे ज्यांना वाटते अशांसाठी वरील संदर्भ दिला होता.

In reply to by मार्मिक गोडसे

प्रतिसादाशी पूर्ण सहमत आहे. लोकांचा निर्णयाला विरोध नाही मात्र निर्णयातील अंमलबजावणीतील ढिसाळपणा ला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा त्रास होतो आहे. आज मी ज्या पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून आलोय तिथे आमच्या गावातील पंचक्रोशीत फक्त एक महाराष्ट्र बँकेची शाखा आहे इतर कोणतीही मोठी पब्लिक सेक्टर किंवा private सेक्टर मधली बँक नाहीये. मात्र भरपूर गावात जिल्हा बँक, सहकारी बँका आणि पटसंस्थेचे जाळे आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात यावर अवलंबून आहे. शेतकऱ्याचं कर्जवाटप, शासकीय मदत, ऊस बिले पूर्ण ह्या बँकांत जमा होतात, याचा कोणताही विचार न करता सहकारी आणि जिल्हा बँकेना नवीन नोटा न पाठवणे तसेच जुना नोटा स्वीकारण्यास बंदी घालणे चुकीचे वाटते. आज आता ऊस तोडीची बिले शेतकऱयांच्या खात्यात जमा होऊ लागलीयेत मात्र शेतकऱयांना त्याचा वापर करता येत नाहीये आज शेतकरी शेतमजुरांना काही 100 रुपये किंवा 200 रुपयाचे रोजच्या कामाचे चेक लिहून देऊ शकत नाही, आणि भरपूर जिल्हा बँकांना atm ची सुविधा लिमिटेड आहे त्यामुळे असे हि पैसे काढू शकत नाही. तसेच आज सहकारी आणि शेतकरी बँकेत 6 ते 8 हजार कोटी जुन्या नोटांच्या बदल्यात शेतकऱ्यांनी जमा केलेत त्याच करायचं काय हा प्रश्न पडलाय कारण मोठ्या बँका ह्या नोटा स्वीकारेनात. सरकार नक्कीच याचा विचार करून मार्ग काढेल हि अशा अन्यथा अत्यंत चांगल्या निर्णयाची मोठी राजकीय किंमत ग्रामीण भागात तरी मोजावी लागेल. अवांतर राजकीय भाष्य: जेटली हे मोदींचे राजकीय मॅनेजर म्हणूनच शोभून दिसतात, अर्थमंत्री म्हणून अप्रभावी, ढिसाळ तसेच inefficient.

In reply to by अमितदादा

मोदी सरकारने घेतलेला निर्णय, त्यातही ज्यात मोदींचा अतिशय स्वत:चा महत्वाचा सहभाग ...मग असा निर्णउ चुकणं अशक्य. अंमलबजावणी मुळे सामान्य जनतेला २-४ वा ५० दिवस त्रास झाला तरी देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होवून त्याने तो सहन करावा. निर्णयावर टीका करणारा देशद्रोही. अंमलबजावणीतल्या त्रूटी दाखवणार्‍याची देशासाठी त्याग करण्याची तयारी नाही..या आणि अशा मानसिकतेतून बाहेर पडून सारासार विचार करणे गरजेचे आहे. मोदीभक्ती वा मोदीविरोध हे दोन्हीही व्यक्तीकेंद्रित आहे. ते बाजूला ठेवणून घेतलेला निर्णय आणि अंमलबजावणी याकडे वस्तुनिष्ठपणे बघायला हवे. आताही जिल्हा बँक, सहकारी बॅंक यांत kyc, PAN card ची माहिती पुर्ण करुन खातेदारांना पैसे स्वीकारण्यास / काढू देण्यास परवानगी द्यावी.

In reply to by मार्मिक गोडसे

एखाद्या भौगोलिक विभागातले किंवा एखाद्या व्यवसायातले नागरिक ६० ते ७० टक्के व्यवहार बँकेशिवाय करतात साहेब, आपण जो दुवा पुरावा म्हणून तुमच्या प्रतिसादात दिला आहे तो वाचला असतात तर या वाक्याला अर्थ नाही असे म्हटले नसतेत. ही माहिती तुम्ही दिलेल्या दुव्यातल्या बातमीतूनच घेतली आहे !!!!!!!!!!!!! आता, (अ) प्रथम तुमचा दुवा वाचून आणि (आ) माझा प्रतिसाद वाचून मग (इ) तुमचा वरचा प्रतिसाद वाचलात तर मला इतरही जास्त काही सांगण्यासारखे उरणार नाही ! :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सर्व शेतकर्‍यांचे जि,म. बँकेत खाते असले तरी, शेतकर्‍यांचे व्यवहार हे नेहमीच रोखीनेच असतात ह्याचे कारण शेतीमाल उत्पादनाची विक्री रोखीतच होत असल्यामुळे व शेतमजूरांना रोखीतच पैसे द्यावे लागत असल्यामूळे बहुतांश शेतकर्‍यांचा बँकेशी संबंध पिककर्ज, पिक नुकसानभरपाई ई. बँकेत जमा झालेल्या रक्कमा काढण्यापूरताच असतो. त्या अर्थाने ६०-७० टक्के व्यवहार बँकेशिवाय चालतात असा घ्यावा.

In reply to by मार्मिक गोडसे

ह्याच बॅकेत केवायसी पुर्ण करूनही व्यवहार करता येतील. या बँकांबद्दल तुम्हाला बरीच माहिती असावी असे लिखाणावरून दिसते. तेव्हा, आरबीआय ह्या बँकांच्या मागे लागूनही वर्षानुवर्षे हे केवायसीचे साधे सोपे काम का पूर्ण होत नाही, हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगले माहित असणारच ! :) बँकांनी वर्षानुवर्षे टाळलेले हे काम आता त्यांच्याच हस्ते, घिसाडघाईत काम केल्याने ते जास्त वेळखाऊ, अपूर्ण, चुकीचे आणि गैरव्यहारांसाठी सुलभ होऊ शकेल हे सांगायला नकोच. मग त्यामुळे पैशांचे किंवा इतर गैरव्यवहार झाले की, पूर्वी चालढकल करणारे लोकच, भारतिय सरकार आणि आरबीआयला दोष द्यायला सर्वात पुढे असणार, नाही का ?!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पूर्वी चालढकल करणारे लोकच, भारतिय सरकार आणि आरबीआयला दोष द्यायला सर्वात पुढे असणार, नाही का ?!
सहा महिन्यांपूर्वीच आरबीआयने आजच्यासारखा कठोर निर्णय घेतला असता तर आज ग्रामीण भागातील चलनबदलाची समस्या टाळता आली असती.

In reply to by मार्मिक गोडसे

सहा महिन्यांपूर्वीच आरबीआयने आजच्यासारखा कठोर निर्णय घेतला असता तर आज ग्रामीण भागातील चलनबदलाची समस्या टाळता आली असती. हे लिहायला सोपे आहे. पण... १. कठोर निर्णय !? शेतकर्‍याच्या फायद्याच्या कारणाने कठोर निर्णय घेतला तरी त्याचा विपर्यास करून शेतकर्‍यांच्या आडून गदारोळ करणार्‍यांना नेत्यांना आयतेच अजून एक कारण मिळाले असते. हे राजकारण भारताला नवीन नाही. आरबीआयने वारंवार नोटीसा पाठवूनही राजकिय दबाव वापरून ज्या कारणासाठी (जे सामान्य शेतकर्‍यांच्या फायद्याचे नाही) केवायसी केली जात नव्हती, ते कारण कायमच होते/आहे ना ? २. याशिवाय अजून जास्त महत्वाचे कारण : "आताच कठोर कारवाई का ?" असा प्रश्न पडून "चलाख" मंडळींनी यामागे काय कारण आहे याचा जोरदार तपास चालू केला असता आणि कारवाईची गुप्तता धोक्यात आली असती. गुप्तता तर या कारवाईचा प्राण होता. म्हणुनच तर सर्व विरोधकांचा रोख असाच आहे की, "कारवाई गुप्त का ठेवली ? पूर्वीच्या कारवायांप्रमाणे तिच्याबाबत अगोदर प्रसिद्धी करून मग सहाएक महिन्यांच्या मुदतीत ती लागू करायला हवी होती (पक्षी : आम्हाला काळ्याचे पांढरे करायला पळवाट ठेवायला हवी होती) ! :) दोन्ही बाजूंनी विचार केला तर बरेच ध्यानात येईल. जिल्हा बँकतून वर्षानुवर्षे मुद्दामहून ठरवून कामचुकारी केली गेली त्यामागे स्वार्थी हितसंबंध नव्हते, केवळ एक सामान्य आळस होता आणि केवळ सरकारचीच चूक आहे असे ठरवले असल्यास, कितीही समजावले तरी पटणार नाही. तेव्हा, या मुद्द्याला इथेच रामराम करूया ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शेतकर्‍याच्या फायद्याच्या कारणाने कठोर निर्णय घेतला तरी त्याचा विपर्यास करून शेतकर्‍यांच्या आडून गदारोळ करणार्‍यांना नेत्यांना आयतेच अजून एक कारण मिळाले असते.
आरबीआय कोणत्याही राजकीय दबावाखाली निर्णय घेत नाही (माजी गवर्नरनी रेपो रेटच्या वेळी दाखवले आहे).
आताच कठोर कारवाई का ?" असा प्रश्न पडून "चलाख" मंडळींनी यामागे काय कारण आहे याचा जोरदार तपास चालू केला असता आणि कारवाईची गुप्तता धोक्यात आली असती.
काहीही. २०१६ च्या Income Declaration Scheme च्या दरम्यान सरकारने काळा पैसेवाल्यांना ही शेवटची संधी आहे असे सांगितले होते . नंतर काळा पैसा काढण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट सांगितले होते, तेव्हा नाही का ह्या "चलाख" मंडळींना वास लागला? घाईघाईत निर्णय घेतल्याने आरबीआयवर ही नामुष्की आली आहे. उगाच गुप्ततेचे समर्थन करण्यात अर्थ नाही.
केवळ सरकारचीच चूक आहे असे ठरवले असल्यास, कितीही समजावले तरी पटणार नाही. तेव्हा, या मुद्द्याला इथेच रामराम करूया ! :)
हा आरबीआयच्या अखत्यारीतला विषय आहे उगाच सरकारला मध्ये आणू नका, सरकारची चूक आहे असे म्हटलेले नाही. सहा महिन्यांपूर्वीच आरबीआयने आजच्यासारखा कठोर निर्णय घेतला असता तर आज ग्रामीण भागातील चलनबदलाची समस्या टाळता आली असती. नीट वाचा.

In reply to by मार्मिक गोडसे

तो निर्णय कठोरपणे का राबवता आला नसावा याबद्दल वर काही मी लिहिले आहे ते वाचा. वर लिहिल्याप्रमाणे हा मुद्द्यावर अनेकदा लिहिलेली उत्तरे परत परत लिहिण्याचा कंटाळा आला आहे. तेव्हा चर्चेतला हा माझा शेवटचा प्रतिसाद. काळ बाकी सर्व सत्य गोष्टी उलगडून सांगेल असा अंदाज आहेच. त्यामुळे धन्यवाद आणि राम राम !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ठिक आहे, ६ महिन्यांपूर्वी आरबीआयला जि.म.बँकेचा भोंगळ कारभार माहीत असुनही गुप्तता धोक्यात येइल असे वाटल्याने कारवाई केली नाही. मग नोटाबंदी जाहीर झाल्यावर लगेच दुसर्‍याच दिवशी का नाही ह्या बँकांच्या व्यवहारावर बंदी आणली? का चार दिवस आरबीआयने दुर्लक्ष केले? ह्यावरून सिद्ध होते की, आरबीआयनेही पूर्वतयारी केली नव्हती. उगाच गुप्ततेचे समर्थन करू नका.

In reply to by गामा पैलवान

त्यानुसार जुन्या नोटा हे शासनमान्य वैध चलन ( = लीगल टेंडर) राहणार नाही. मात्र इतर लोकं ते चलन म्हणून वापरू शकतात. त्यावर शासन बंधन घालू शकंत नाही. आ.न.गा.पै. पुन्हा एकदा वाचा काहि गल्लत तर होत नाहिये ना.

In reply to by सचु कुळकर्णी

+१ बाद केलेल्या नोटा कायद्याने सरकारजमा करायच्या असतात. त्यांचा कोणत्याही चलनी स्वरूपात केलेला उपयोग कायद्याने गुन्हा ठरेल. फार फार तर काही थोड्या नोटा "कलेक्टर्स आयटेम" म्हणुन संग्रहात ठेवल्या तर त्या बाबतीत सरकार डोळेझाक करते.

In reply to by संदीप डांगे

ज्यांचे कोट्यवधी लक्षावधी रुपये आहेत ते मजूर, नोकर, लेबर कॉन्ट्रॅक्टर तर्फे 300 रुपये रोजंदारीवर पैसा पांढरा करून घेत आहेत. 50 दिवसात 10 बँकांतून 100 मजूर 4000 (आता दोन) 2 कोटी आरामात सफेद करून घेतील. वीस कोटी, 200 कोटीही होऊ शकतात. त्यासाठीच मोठ्या प्रमाणावर असलेला पैसा पकडला जातो आहे. योग्य ते स्पष्टीकरण दिल्यास तो परत देखील मिळेल. अन्यथा सरकारदरबारी जमा. बाकी मी आधीही लिहिले होते. ५० -६० लाखापर्यंत पैसा आरामात पांढरा होइल. १ कोटीपेक्षा जास्त अस्सेल तर अश्या माणसाला अडचण येइल २ कोटीपेक्षा जास्त असेल तर अश्या माणसाला नक्कीच झळ बसेल. त्याहुन जास्त असेल तर अश्या माणसांचे काही पैसे नक्की डब्यात जातील. ज्या मार्गाने अथवा सहजतेने १ कोटी पांढरे होउ शकतात त्या सहजतेने २०० कोटी नाही होउ शकत. किंबहुना होणारच नाहित. या मार्गाने अजुनही एक गोष्ट साध्य होइल की धनसंचय जो एकाच माणसाकडे आहे तो अनेक माणासांकडे विभागला जाइल आणी बाकीचा चलनबाह्य होइल.

In reply to by मृत्युन्जय

आता (अ) हाताला शाई लावणे; (आ) सरकार व रिझर्व बँकेकडून "बँकेअंतर्गत काळ्या व्यवहारातून काळाबाजार्‍यांना मदत केल्यास कारवाई होईल" असा संदेश देणे, (इ) जमा झालेल्या २.५ लाखावरच्या पैशाची चौकशी करणे* आणि (ई) जिल्हा स्तराच्या व त्याखालच्या बँकांना पैसेबदल कारवाईतून पहिल्यापासून वगळणे यामुळे असा पैसा खूपच कमी प्रमाणात (एकूण काळ्या पैशाच्या तुलनेत) बदलला जाईल. * कालच तशी एक नोटीस कायप्पावर पाहिली. अशा प्रत्येक विभागात एकदोन नोटीसेस गेल्या तरी काळाबाजार्‍यांना आपले बँकेचे खाते वापरायला देवून मदत करायला कोणी पुढे येईल असे वाटत नाही :) ...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अश्या नोटीसा आतापर्यंत दशहजार किंवा लाखांतही दिल्या गेल्याच्या बातम्या आहेत. म्हणजे काळ्याचे पांढरे करायला "उसने बँक अकाऊंट" वापरणे कठीण झाले आहे !

सचु कुळकर्णी,
आ.न.गा.पै. पुन्हा एकदा वाचा काहि गल्लत तर होत नाहिये ना.
आसं बगा की गामा पैलवानाला गावातल्या कुळकर्ण्याचा सांगावा आला की हिरीचा ऱ्हाट कोसळला हाये. गाम्या गेला तितं आन पैलवानकी दाखवीत येकट्यानं रहाट खेचडून काडला भाईर. आता कुळकर्ण्याकडं घरची शेती बऱ्यापैकी आसली तरीबी नगद पैका न्हाई. म्हून त्यानं घरचा गळका माठ पार फोडला आन एका खापरावर खडूने पैलवानास पन्नास रुप्ये देणे असा लिवला. हा खापर घेऊन गाम्या वाण्याच्या दुकानी जाऊन मीठमिरची इकत घेऊ शकतो की नाय? गावातल्या गावात खापराच्या तुकड्याच्या जागी रद्द नोटाही चालू शकतील. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गावातल्या गावात खापराच्या तुकड्याच्या जागी रद्द नोटाही चालू शकतील. == पण फक्त तीस डिसेंबर पर्यंत! (बॅंकेत जुन्या नोटा भरायची मुदतवाढ मिळाली नाहितर)

In reply to by प्रसाद_१९८२

प्रसाद_१९८२, या नोटा बँकेत भरण्यासाठी नाहीयेत. फक्त आपापसांत व्यवहार करण्यासाठीच आहेत. त्यामुळे जगाच्या किंवा नोटांच्या अंतापर्यंत चालतील. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गावातल्या गावात खापराच्या तुकड्याच्या जागी रद्द नोटाही चालू शकतील. रद्द नोटांचा तसा उपयोगही बेकायदेशीर आहे =)) त्या नोटांचे तुकडे करून आरबीआय त्यांच्या विटा बनवते असे एका वाहिनीवर पाहिले आहे. त्या विटांची बांधकामात वापरण्यासाठी विक्री होते काय हे शोधून काढले पाहिजे :)

बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. २००० च्या नोटा ८ तारखेच्या आधीच बँकात पोचल्या होत्या. माझ्या कायप्पाच्या एका ग्रुपवर ६ तारखेलाच २००० च्या नोटेचा फोटो आला होता आणि सर्व सदस्याना ती अफवा वाटली होती.

नेते, वार्ताहर आणि नागरीक यांच्यातील फरक दाखवणारी चित्रफीत...

(अ) हाताला शाई लावणे (आ) नोटा बदलून देण्याची सीमा कमी करणे (रु४५०० ऐवजी रु२०००) (इ) दुसर्‍यांच्या "भाडोत्री खात्यांत" रक्कम जमा करणे बेकायदा आहे व त्यासाठी दोन्ही पार्टींना दंड व शिक्षा होऊ शकते, याला पुरेशी प्रसिद्धी देणे व अश्या संशयित खातेधारकांना करविभागाच्या नोटीसा जाणे (ई) बरीचशी एटीएम्स रु १०० व रु५०० साठी कार्यान्वित होणे या वरच्या उपायांमुळे, आजपासून बँकांसमोरच्या रांगा अर्ध्यावर किंवा त्यापेक्षा कमी झाल्याच्या बातम्या माध्यमांत येत आहेत. आणि हे सर्व बँकेच्या एका दिवसाच्या सुट्टीनंतर घडत आहे ! यावरून, त्या रांगात "तथाकथित, गरीब, गांजलेल्या, पिडलेल्या आणि आजारी" लोकांचे किती प्रमाण असावे व भाडोत्री लोकांचे किती प्रमाण असावे याचा अंदाज, त्यांच्या नावाने दु:खी झालेल्या नेत्यांना, वार्ताहरांना आणि त्या दोघांच्या वचनांनी वाहत गेलेल्या लोकांनाही लावायला कठीण नाही. किंबहुना भाडोत्री लोक रांगात नसते तर सज्जन नागरिकांनी खूप खूप कमी त्रास झाला असता याचीही नोंद घ्यायला हवी ! रांगातल्या भाडोत्री लोकांचे समर्थन न करता त्यांचे बिंग फोडण्यासाठी जर नेतेगिरी, पत्रकारिता व नागरिक शक्ती वापरली गेली असती, तर त्या संबंधितांच्यातर्फे एक देशोपयोगी काम झाले असते. आता सद्याची वेळ गेली असली तरी, यावेळेस आपण प्रत्यक्षात कोणते/कोणाचे काम केले ह्याचे ज्याने त्याने आत्मपरिक्षण केले तर, भविष्यात काय करणे देशाच्या म्हणजेच पर्यायाने आपल्या सर्वांच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या फायद्याचे होईल हे नीट कळून चुकेल, यात मात्र काहीच शंका नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आज बँका बाहेर तुरळक गर्दी होती. ( अपवाद SBI/SBH). HDFC,BOM,ICICI,SBH यांचे एटीएम (रिकॅलीब्रेट)चालु झालेले दिसले. उगाच टिपी करत फिरलो, फोटु पण काढले. (प्रत्यक्षदर्शी )

आज नोटा रु ५०० व रु१००० च्या नोटा रद्द होण्याचा १३ वा दिवस. आज शेतकर्‍यांना व इतर जनतेला दिलासा देणार्‍या अजून काही सुटी जाहीर केल्या गेल्या आहेत. मिपाकरांपैकी कोणाच्या मजरेतून निसटल्या असल्यास कळाव्या यासाठी त्या खाली देत आहे. अधिक माहितीकरिता आपापल्या बँकेत किंवा संबंधीत इतर जागी चौकशी करावी... १. कार, घर किंवा इतर काही कारणांसाठी घेतलेल्या कर्जांचे १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या मुदतीतले हप्ते ६० दिवस पुढे ढकलले आहेत. यामुळे मूळ कर्जांच्या अटींत फरक (रिस्ट्रक्चरिंग) होणार नाही. २. शेतकर्‍यांना रु ५०० च्या जुन्या नोटा वापरून केंद्रिय व राज्य सरकारी केंद्रांतून आणि Indian Council of Agricultural Research येथून बियाणे खरेदीची परवानगी. ३. कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधा असणारे दर आठवड्याला रु५०,००० नकद काढू शकतील (काही अटी आहेत). ही सुविधा करंट अकाऊंट्सना अगोदरपासूनच आहे. ४. रु ५०० कोटी खर्चाच्या आरोपामुळे बातमीत असलेल्या जनार्दन रेड्डी याच्या मुलीच्या लग्नाला सेवा पुरवलेल्या कंपन्या / व्यक्तींची आयकर विभागाकडून चौकशी सुरू झाली. ५. नोव्हेंबर १८ पर्यंत बँकांत रु५.४४ लाख कोटी किंमतीच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. ६. विरोधकांनी नोटा रद्द करण्याच्या कृतीवर चर्चा करण्यास नकार देवून राज्यसभेत सरकारवरील विश्वास ठरावाचा आग्रह धरला आहे व तोपर्यंत सर्व कामावर स्थगितीचा ठराव (अ‍ॅडजर्नमेंट मोशन) आग्रह केला आहे. स्त्रोत : http://timesofindia.indiatimes.com/india/Day-13-of-demonetisation-Key-d…

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

राज्यसभेत सरकारवरील विश्वास ठरावाचा आग्रह धरला आहे
राज्यसभेत तसेही बीजेपी किंवा एनडीए बहुमत नाहीये (माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित चुकीची पण असेल). त्यामुळे नक्की कोणावर विश्वास ठराव करणार? राज्यसभा केंद्र सरकारवर अविश्वास ठराव काढू शकते? जर का केंद्र सरकारवरचा अविश्वास ठराव राज्यसभेत मान्य झाला तर पुढे काय होणार? यात कुठे लोकांच्या मताला काही किंमत दिली जाणार नाही हे तर उघडच आहे पण याचा केंद्र सरकारवर काही परिणाम होऊ शकतो का?

In reply to by ट्रेड मार्क

बातमी तर तशीच आहे ! माझ्या अप्लमतीप्रमाणे या मागचा उद्येश फक्त "सरकारला राज्यसभेत कोणतेही बिल मांडण्याला प्रतिबंध करणे व त्यामुळे जेवढ्या नवीन कायदे-कारवाया अडवता येतील तेवढ्या अडवाव्या" हेच आहे. जे या सरकारच्या कारकिर्दीतल्या पहिल्या चारपाच अधिवेशनांत केले होते, आणि त्यामुळे सर्व बाजूंनी टीका सुरू झाल्याने गेल्या अधिवेशनात काही बिले पास करावी लागली. आता हे नवीन कारण पुढे करून मागच्याच नाटकाचा पुढचा प्रयोग चालू आहे. सबळ मुद्दे असले तर विरोधी पक्ष सरकारने चर्चा करावी असा आग्रह धरून सरकारला अडचणीत आणतो. इथे सरकार चर्चेला तयार आहे आणि विरोधी पक्ष अ‍ॅडजर्नमेंट मोशनची मागणी करत चर्चा टाळत आहे आणि गदारोळ करून दोन्ही सदनांचे काम बंद पाडत आहे ! गम्मत म्हणजे राज्यसभेतल्या विश्वास/अविश्वास ठरावाला शून्य किंमत असते ! तो लोकसभेत मांडून सरकारचा पराभव झाला तरच सरकारला राजिनामा द्यावा लागतो. हे सर्व माहित नाही असे राज्यसभेच्या माननिय सभासदांना माहित नसेल असे समजणे कठीण आहे. यावरून काय ते ओळखा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विरोधी पक्षाने आज लोकसभेत घोषणाबाजी करून कामकाज बंद पाडले. इतकेच काय पण नुकत्याच झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल रेल्वेमंत्र्यांना निवेदन करू दिले नाही. कालपर्यंत ज्या जनतेच्या त्रासाबद्दल आरडाओरडा चालू होता त्या जनतेच्या बद्दलच्या सहानभूतीची ही नवीन पातळी आज लोकसभेत दिसली आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

राज्यसभेत आणि लोकसभेत काय चालू आहे हे जनता बघत असेलच पण त्यातून कोण किती पाण्यात आहे हे सर्वांना समजेल अशी आशा आहे. त्यामुळे जनतेचा कल कुठे आहे आणि ते आगामी विधानसभेच्या निवडणुलीत काय कौल देतात हे महत्वाचे आहे. बाकी दोन्ही सभागृहांत गोंधळ घालायचे काम राजकारणी इमाने इतबारे करत असतात. आता बऱ्याच राजकारण्यांची सांपत्तिक स्थिती खालावलेली असेल त्यावर ज्या दिवशी काम होऊ देणार नाहीत त्या दिवसाचे त्या मेम्बर्सचे मानधन कापून घ्यायचा निर्णय लवकरात लवकर व्हावा.

In reply to by मार्मिक गोडसे

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेली अनेक दशके अजितदादा, अंकुश काकडे इ. राष्ट्रवादींच्या नेत्यांच्या ताब्यात आहे. ते हबकल्यासारखे वाटत नाहीत. व्यवस्था झालेली दिसते.

The greed of Indians for money causes them to use various tricks to hoard money so that they do not have to pay tax. The tactics that I know to have been used so far include: using cash coolies (these are people who deposit money into their employer’s account), buying expensive things such as Rolex watches, buying gold at high price and then reselling it to the dealer thus increasing price of gold, renting janadhan account created by Modi, and paying airlines for overseas trips. Another trick used by a hotelier which was told by a friend who has just returned from Mumbai is as follows: a family goes to the hotel for a meal and say the bill comes to say Rupees 1800 when two thousand Rupee not is presented to settle the bill the hotelier says sorry Sir but I do not have change because I am out of 100 Rupee notes. Thus he pockets this 200 Rupees when the bill shows 1800. I am sure all the public servants and police are busy devising tricks like this to amass black money. I do not know what Modi can do to stop this malpractice.

The greed of Indians for money causes them to use various tricks to hoard money so that they do not have to pay tax. The tactics that I know to have been used so far include: using cash coolies (these are people who deposit money into their employer’s account), buying expensive things such as Rolex watches, buying gold at high price and then reselling it to the dealer thus increasing price of gold, renting janadhan account created by Modi, and paying airlines for overseas trips. Another trick used by a hotelier which was told by a friend who has just returned from Mumbai is as follows: a family goes to the hotel for a meal and say the bill comes to say Rupees 1800 when two thousand Rupee not is presented to settle the bill the hotelier says sorry Sir but I do not have change because I am out of 100 Rupee notes. Thus he pockets this 200 Rupees when the bill shows 1800. I am sure all the public servants and police are busy devising tricks like this to amass black money. I do not know what Modi can do to stop this malpractice.

Demonetisation " Slew of steps to push digital transactions, help farmers इकॉनॉमिक अफेअर्स सेक्रेटरी, शशिकांत दास यांनी काही नवीन सोईसचलती जाहीर केल्या आहेत. त्यातील काही मह्त्वाचे मुद्दे असे... १. नाबार्डला कोऑप बँकांना रु२१००० कोटीची देणे मंजूर करण्यास सांगितले. यामुळे शेतकर्‍यांना व शेतीविषयक बाबींना कर्जे मिळणे सोपे होईल. २. १.५ लाख पोस्टऑफिसांमध्ये नवीन नोटा उपलब्ध. ३. e-walletची सीमा दुप्पट ४. पैश्यांच्या बहुतेक इलेक्ट्रॉनिक व्यवहारांवरचे सेवाशुल्क ३१ डिसेंबरपर्यंत रद्द. इलेक्ट्रॉनिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यास ते कायमचे रद्द होण्याचीही शक्यता. ५. रेल्वेच्या ऑनलाईन बुकिंगवरचे सेवाशुल्क ३१ डिसेंबरपर्यंत रद्द. ६. TRAI ने डिजिटल ट्रांसफरवरचे सेवाशुल्क रु१.५० वरून रु०.५० इतके कमी केले आहे आणि फोन कंपन्या हा रु०.५० चा भार उअचलणार असल्याने ग्राहकासाठी सर्व रु१.५० सेवाशुल्क ३१ डिसेंबरपर्यंत माफ झाले आहे. ७. कालपर्यंत ८२०० एटीएम्स रिकॅलिब्रेट झाली आहेत. इतर काम जोरात चालू आहे. ८. Unified Payment Interface mobile phone application (app) च्या पायलट प्रोग्रॅममध्ये २० बँकाचा सहभाग झाला आहे, नंतर यात अजून वाढ होत राहील. या अ‍ॅपने रु ५०,००० पर्यंतचे पैश्याचे व्यवहार त्वरीत (रियल टाईम) करता येतात. या अ‍ॅपबद्दल तपशीलवार माहिती आपले मिपाकर निनाद यांनी एकात्मिक भरणा पद्धती या शीर्षकाखाली इथे दिलेली आहेच. ९. ECF-compliant RFID प्रणाली बसवलेल्या चारचाकींचा टोल एलेक्ट्रॉनिकली गोळा होण्याच्या दृष्टीने पावले उअचलली जात आहेत. याने टोल देण्यास चारचाकींना रांगेत उभे रहावे लागणार नाही. १०. भविष्यात सर्व सरकारी संस्था फक्त डिजिटल पद्धतींनीच शुल्क स्विकारतील. ११. सर्व सरकारी बँकांमध्ये डेबिट व इतर कार्डांची मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली आहे. ज्यांना जरूर/अथवा शक्य असेल त्यांनी या माहितीचा फायदा करून घ्यावा व तशी शक्यता असणार्‍या इतरांनाही ही माहिती जरूर द्यावी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सरकारी स्तरावर इतक्या वेगाने हालचाली होतात आणि जनतेची सोय पाहून लगेच इतके मोठे निर्णय पण होतात किंवा बदलता हे मोठे आश्चर्यकारक पण आनंददायी आहे! उदा. TRAI ने डिजिटल ट्रांसफरवरचे सेवाशुल्क रु१.५० वरून रु०.५० इतके कमी केले आहे आणि फोन कंपन्या हा रु०.५० चा भार उअचलणार सगळ्या कंपन्यांना एक्त्र आणून त्यांचा निर्णय ही होणे हे ग्रेट आहे. इथे एक हापिस मिटिंग घ्यायची म्हंटली तर पन्नास लोक म्हणतात वेळ नाही! :) इथे तर एक नाही, अनेक खाती वेगाने आणि कार्यक्षमतेने निर्णय घेत आहेत. ही अ‍ॅजिलिटी, चपळाई आश्चर्यकारक आहे.

In reply to by निनाद

बर्‍याच सरकारी खात्यांत बरीच कामे होत आहेत. ब्युरोक्रॅट्स वेळेवर कामावर येत आहेत, उशीरा घरी जात आहेत कारण मंत्री वेळेवर ऑफिसमध्ये येत आहेत आणि उशीरापर्यंत काम करत थांबत आहेत :) यातल्या बर्‍याच पायाभूत व दूरगामी गोष्टी तडक लोकाभिमूख नसल्याने त्यांचे परिणाम जनतेपर्यंत पोचून त्यांचे व्यवहारातले फायदे दिसायला वेळ लागणारच. यातल्या रेल्वेच्या बाबतीतले फरक तडक लोकाभिमूख असल्याने दिसत आहेतच... इतरही दिसतील हळू हळू... लोक आपली जबाबदारी पाळायला शिकले/लागले तर जरा लवकर दिसतील :)

In reply to by नावातकायआहे

पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्यानंतर जन धन बॅंक खात्यांमधील भरण्यात मोठी वाढ होऊन ती 21 हजार कोटी रुपयांवर पोचली आहे. यात पश्‍चिम बंगालचा प्रथम क्रमाक असून, कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. या प्रकारात पश्चिम बंगाल प्रथम क्रमांकावर आहे आणि ममता बॅनर्जी नोटा रद्द कारवाई मागे घ्या यासाठी हट्ट करत आहेत; यांचा काही संबंध असावा काय ? कालच्या टाईम्स नाऊच्या न्यूजअवरमध्ये गरीब जनतेला होणार्‍या त्रासासाठी नक्राश्रू ढाळणार्‍या तृणमूलच्या डेरेक ओब्रायनला जेव्हा, शारदा स्कॅमबद्दल (जिच्यात काही लाख गरीब लोकांचे पैसे बुडाले होते) काय कारवाई केली असा प्रश्न विचारला गेला तेव्हा, त्याचा चेहरा आणि प्रतिक्रिया बघण्याजोगी होती.

मी नुकताच राजस्थान व म. प्र चा दौरा करून आलो. मोदींच्या या निर्णयावर सामान्यलोक प्रचंड आशावादी आहेत असे चित्र आहे. टूरिझम मधे कोणतीही गैरसोय वा मंदी आलेली नाही. सरकारने वीस च्या नोटा मोठ्या प्रमाणात वितरित करायला सुरूवात केली आहे. असे दिसतेय. मोदीपेक्षा माझाच डोळा "जनधन" खात्यांवर जास्त आहे. गरीबी साळसुदीचा भाव आणून आर्थिक गुंडांची मद्त करणारे देखील गजाआड गेले पाहिजेत. अशा लोकानीच मुंबई व काश्मीर येथे दहशतवाद्याना मदत केली आहे. या लायनींमधे कोणते लोक जास्त उभे होते हे आपण पाहिले आहेच. मला वाटतेय "जनधन" हा सापळा मोदीनी फार कल्पकपणे वापरला आहे. ज्या काही केसेस विरोधी पक्ष दाखवीत आहेत त्या वैयक्तिक आहेत. त्या प्रातिनिधिक नाहीत. एरवी घरतला नातेवाईक वारला तर विवाह हे रद्द होत असतातच व उन्हामधे नातवाच्या प्रवेशासाठी उभे असलेले आजोबाही हार्ट अटॅक ने मरू शकतात. मरण व माणसाचे हेतू यांचा काय संबंध ?

In reply to by चौकटराजा

आह दोन राष्रीयीकृत बॅन्कात जाण्याची वेळ आली. दोन्ही वेळेस व्यवस्थापकाच्या केबिन मधे बसणे झाले. ३० डिसेम्बर पर्यंत काही व्यवस्थापक मानसिक ताणाने मरण्याची देखील शक्यता मला वाटतेय. खाजगी रुग्णालयानी लोकांची पंचाईत केली आहे असे दिसते. इथे चेक घेत नाहीत असे असावे. काही लोक इतके येडचाप आहेत की त्याना कार्ड स्वाईप करायला भिती वाटतेय. ( मी ही परवा परवा पर्यंत या लाईनीत होतोच).लोकाना ज्याअर्थी २५०००० लगनासाठी हवेत यात उधारीने का व्यवहार होत नाही ? हे कळत नाही. वा चेकने कार्डाने पेमेंट का नाही. कारण मॅनेजर ने ज्या लगनपत्रिका दाखविल्या त्या इतक्या भारी होत्या की त्या नवर्‍याकडे कार्ड॑ नसावे हे पटत नाही. भारतात हरेकाचे गुन्हेगारीकरण झाले आहे काय अशी शंका येउ लागली आहे.

गुजरातमधल्या एका कॅशलेस गावाचा विडियो व बातमी सध्या माध्यमांतून फिरत आहे. त्याबद्दल ह्या बातम्या. दुवा १ दुवा २ दुवा ३ तीनही मुळातून वाचाव्या.

आणखी एक मृत्यू :-( रांग हि एक व्यवस्था म्हणून शेकडो वर्षांपासून चालू आलेली आहे. तिचे फायदे अनेक असले तरी ती सर्व लोकांना समान संधी देत नाही. जसे वृद्ध, आजारी लोक रांगेत फार काळ उभे राहू शकत नाहीत. शिवाय आजकाल बँकेत लागणाऱ्या रांगा या बँकेच्या बाहेर वेगळ्या आणि फाटक उघडल्यावर वेगळ्या अश्या लागतात. फाटक उघडल्यावर सगळे पळत काउंटर च्या पुढे रांगा लावतात. वृद्ध, बायका सुद्धा धावत पळत रांग गाठतात. 4 5 तास हा सरासरी वेळ जातो. तेव्हा असे दुर्दैवी मृत्यू टाळण्यासाठी काय करता येईल? रांग हि system कशी सुधारता येईल. इतके मृत्यू होणं हे आपल्या व्यवस्थेचं अपयश आहे का? अजून किती दिवस असं चालू राहील?

आता म्हणे घरांच्या किमती खाली उतरणार म्हणे? किती शक्यता आहे त्याची? आणि असेल तर कधी पर्यंत होऊ शकेल? काही अंदाजा? कुणाला ह्याचा काही नमुना दिसण्यात आलाय का?

In reply to by स न वि वि

गेल्या पंधरा दिवसातल्या घडामोडीनुसार प्रॉपर्टी सेक्टर वर फारसा फरक पडणार नाही असे दिसते, छोटी व मध्यम किमतीची घरे यांचे भाव स्थिर राहतील, झालाच तर (ज्याची शक्यता 10 टक्के आहे) अगदी 5 टक्के बदल होईल पण तो फार मोठा बदल नव्हे. कारण इथे ब्लॅक मनी चे व्यवहार फार कमी प्रमाणात होतात, थेट बँकेकडून लोन घेऊन घरे घेतली जातात. व इथली मागणी हि राहण्यासाठी घरे या गरजेवर टिकून आहे व हि मागणी कमी होण्याची चिन्हे नजीकच्या भविष्यात दिसत नाहीत, ज्यांची अशी घरे आहेत त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये व अफवांना भुलू नये. किमान पाच वर्षे आपली घरे तातडीची गरज असल्याशिवाय विकू नये. एक कोटींपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांच्या किंमतीत मात्र 25 ते 35 टक्के करेक्शन येण्याची शक्यता या क्षेत्रातल्या अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे. अशी बहुतांश घरे गुंतवणूक व काळा पैसा जीरावण्याचं साधन म्हणून घेतली जातात,

In reply to by संदीप डांगे

" कारण इथे ब्लॅक मनी चे व्यवहार फार कमी प्रमाणात होतात, थेट बँकेकडून लोन घेऊन घरे घेतली जातात" ही माहिती तुमची चूकीची आहे. सर्वात जास्त ब्लॅक मनी चे व्यवहार हे घर खरेदी मध्ये होतात, अगदी १०-२०% च्या आसपास देखील होतात. तुम्ही तुमच्या ओळखीच्या बिल्डरला विचारून पहा, तो ८ तारखे आधी अगदी ५०% पण रोख रक्क्म घेण्यासाठी तयार होत असेल. आता थोडी गोच्ची झाली आहे, पण काही महिन्यात ते वेगळा मार्ग शोधतील देखील. पण ज्या प्रकारे प्रत्येक ट्रान्जक्शनचा सरकार हिशोब ठेऊ पाहत आहे त्या सिस्टममध्ये ते जरा अवघड होईल अशी अपेक्शा आहे.

In reply to by निओ१

याचा अर्थ असा होतो की घरांच्या किमती सरसकट 30 टक्के लगेच कोसळल्या पाहिजे होत्या, तसे झाल्याची माहिती तुम्हाला उपलब्ध असेल तर जरूर द्यावी, माझे मत बदलून घेईन.

ही मुलाखत छान आहे. एस. गुरुमूर्थी हे संघ परिवाराशी निगडीत आहेत. (ट्रिविआ: गुरू सिनेमातला आर माधवन = एस. गुरुमुर्थी)

In reply to by अनुप ढेरे

मुलाखत भारी आहे. गुरुमुर्ती विश्वासार्ह वाटतात. उजव्या वर्तुळातील अतिशय कमी विचारवंतातील एक आहेत. त्यांचं analysis पटनेबल आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधील भ्रष्टाचार बघुन आपण इन्कम टॅक्स प्रॅक्टिस सोडली असे ते सांगतात म्हणजे त्या खात्यावर पण डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही..:-(

In reply to by अनुप ढेरे

त्यांचं भाषण प्रत्यक्ष ऐकायला मिळालं होतं. अरुण फिरोदिया आणि त्यांची जुगलबंदी जब्री झालेली.

In reply to by पुंबा

२.५ लाखापेक्षा जास्त जमा केलेल्या रकमेच्या बाबतीत, जर खातेधारक त्या उत्पन्नाचा योग्य स्त्रोत दाकह्वू शकला नाही किंवा ते करापासून लपवलेले उत्पन्न आहे असे सिद्ध झाले तर, सद्य कायद्याप्रमाणे, त्यावर (कर + करावर २००% दंड) अशी कारवाई सरकार करू शकते. दुसर्‍याचे काळे पैसे आपल्या खात्यात स्विकारून नको ते बालंट ओढवून घेऊ नये यासाठी सरकार/आरबीआय फार पूर्वीपासून इशारे देत आहेच. आता अश्या बेकायदेशीर कृती करणार्‍या खातेदारांना कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागेलच, पण त्यांच्यातर्फे करविभागाला खर्‍या काळाबाजार्‍यांपर्यंत पोहोचायला मदत होईल.

नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे अन्नपदार्थांचे भाव कोसळले असून शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे, सर्वसामान्य कष्टकरी वर्गावर बेकारीची कुर्‍हाड कोसळली, जीडीपी वर वाईट परीणाम होत आहे, रब्बी पिकांची पेरणी खोळंबली आहे .... अशा अनेक आक्षेपांना उत्तर देणारा इंडियन एक्सप्रेस मधील सुरजित भल्ला यांचा लेख - http://indianexpress.com/article/opinion/columns/demonetisations-short-… अर्थात सुरजित भल्ला यांना भक्त, आंधळा समर्थक समजले गेले तर प्रश्नच मिटला.

बर्याच शहरात परिस्थीती आटोक्यात आलेली आहे. गुरुमिर्तीनी दिलेल्या सल्ल्या प्रमाणे सरकारी नोकरांना पगार कॅश मध्ये केला जात आहे. त्यामुळे कॅश मार्केटमध्ये इंजेक्ट होईल,