मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाजीराव मस्तानी: आमचेही सेन्सॉर!

चलत मुसाफिर · · काथ्याकूट
मित्रहो, 'बाजीराव मस्तानी' आम्ही आज थेटरमधे जाऊन पाहिला. काही ब्रह्मवृंद या चित्रपटावर खप्पामर्जी असल्याचे जगजाहीर झाल्यामुळे आम्ही हा सिनेमा मुद्दाम एखाद्या स्वघोषित सेन्सॉरबोर्ड मेंबरच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला. सिनेमाबद्दल काही ठळक मुद्दे मनात नमूद झाले ते लिहीत आहे. मुद्द्यांचे खास काही वर्गीकरण असे केलेले नाही. 1. सिनेमात बाजीराव, मस्तानी आणि काशी या तिन्ही मुख्य पात्रांना योग्य न्याय दिलेला आहे. किंबहुना काशी जबरदस्त भाव खाऊन जाते. तसेच बाजीरावाची आई, बंधू चिमाजी, छत्रपती शाहू यांचे चरित्रचित्रणही मजबूतपणे केलेले आहे. एक अत्यंत credible family conflict उभा करण्यात आला आहे. 2. "राऊ या कादंबरीवर आधारित" असे पडद्यावर घोषित केलेले आहे. मराठी कादंबरीवर आधारित असलेला हिंदी सिनेमा मला तरी दुसरा आठवत नाही. 3. 'पिंगा' गाण्याला तर्काधारित कल्पनाविलास करून कथारचनेत सुयोग्य स्थान दिलेले आहे. 'मल्हारी' या गाण्याला मात्र फारसा अर्थ किंवा प्रयोजन नसून ते संपूर्णपणे उडवले तरी काहीच फरक पडत नाही. 4. मस्तानीचा आणि तिच्या मुलाचा द्वेष/ विरोध हा पेशवे कुटुंबीयांनी अनेक कारणांमुळे केला. पैकी "पेशवेपदाचा वारसा" किंवा "इस्टेटीतला वाटा" हेही एक होते. पण ते अनुल्लेखाने मारण्यात आले आहे. 5. बुंदेलखंडातील मराठा-बंगश युद्धाची व्यूहरचना दाखवण्याचा प्रयत्न चांगला आहे. 6. मस्तानी बुंदेलखंडातून अनाहूत पाहुणी म्हणून शनिवारवाड्यात दाखल होते, हा सिनेमाचा भाग बखरीमध्ये एका वाक्यात लिहिल्यासारखा एका सीनमध्ये संपतो. दृश्यमाध्यमात तिचा प्रवास दाखवणे गरजेचे होते. 7. शनिवारवाड्यातला धबधबा जरूर पहा!! आता तो लुप्त झाला असावा. (शनिवारवाडाच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे ती गोष्ट वेगळी.) 8. मस्तानी आणि काशी या फक्त काही महिन्यांच्या अंतराने बाळंत होतात. पण नंतर नाना आणि शमशेर यांच्या वयात कित्येक वर्षांचे अंतर दिसते. 9. मस्तानीला पेशवे कुटुंबीयांनी राहत्या घरात साध्या नजरकैदेत ठेवले होते. पण सिनेमात तिला साखळदंड घालून तुरुंगात टाकतात. ही कविकल्पना आहे, पण चित्रपटाच्या विशिष्ट रचनेमुळे क्षम्य. 10. बाजीराव हा रांगडा, बेदरकार पण चाणाक्ष योद्धा असा चित्रित केलेला आहे. ते योग्यच म्हणावे लागेल. सिनेमात तो एकदाही सोवळे नेसताना, संध्या-पूजा करताना दिसत नाही. 11. आरसा महालातील सर्व दृश्ये विशेष काळजीपूर्वक पाहिली. पण कुठेही Equipment किंवा crew reflections आढळली नाहीत. हे प्रशंसनीय आहे. (तेवढ्यात मस्तानीचा नाच पहायचा मात्र राहून गेला) *** एकूण पहाता, डोक्यात राख घालून घ्यावी किंवा शेपटाला आग लावून थैमान करावे असे मला या सिनेमात काहीच आढळले नाही. ब्रह्मवृंदाने याकडे लक्ष द्यावे ही विनंती.

वाचन 17373 प्रतिक्रिया 0