Skip to main content

बाजीराव मस्तानी: आमचेही सेन्सॉर!

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 28/12/2015 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, 'बाजीराव मस्तानी' आम्ही आज थेटरमधे जाऊन पाहिला. काही ब्रह्मवृंद या चित्रपटावर खप्पामर्जी असल्याचे जगजाहीर झाल्यामुळे आम्ही हा सिनेमा मुद्दाम एखाद्या स्वघोषित सेन्सॉरबोर्ड मेंबरच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला. सिनेमाबद्दल काही ठळक मुद्दे मनात नमूद झाले ते लिहीत आहे. मुद्द्यांचे खास काही वर्गीकरण असे केलेले नाही. 1. सिनेमात बाजीराव, मस्तानी आणि काशी या तिन्ही मुख्य पात्रांना योग्य न्याय दिलेला आहे. किंबहुना काशी जबरदस्त भाव खाऊन जाते. तसेच बाजीरावाची आई, बंधू चिमाजी, छत्रपती शाहू यांचे चरित्रचित्रणही मजबूतपणे केलेले आहे. एक अत्यंत credible family conflict उभा करण्यात आला आहे. 2. "राऊ या कादंबरीवर आधारित" असे पडद्यावर घोषित केलेले आहे. मराठी कादंबरीवर आधारित असलेला हिंदी सिनेमा मला तरी दुसरा आठवत नाही. 3. 'पिंगा' गाण्याला तर्काधारित कल्पनाविलास करून कथारचनेत सुयोग्य स्थान दिलेले आहे. 'मल्हारी' या गाण्याला मात्र फारसा अर्थ किंवा प्रयोजन नसून ते संपूर्णपणे उडवले तरी काहीच फरक पडत नाही. 4. मस्तानीचा आणि तिच्या मुलाचा द्वेष/ विरोध हा पेशवे कुटुंबीयांनी अनेक कारणांमुळे केला. पैकी "पेशवेपदाचा वारसा" किंवा "इस्टेटीतला वाटा" हेही एक होते. पण ते अनुल्लेखाने मारण्यात आले आहे. 5. बुंदेलखंडातील मराठा-बंगश युद्धाची व्यूहरचना दाखवण्याचा प्रयत्न चांगला आहे. 6. मस्तानी बुंदेलखंडातून अनाहूत पाहुणी म्हणून शनिवारवाड्यात दाखल होते, हा सिनेमाचा भाग बखरीमध्ये एका वाक्यात लिहिल्यासारखा एका सीनमध्ये संपतो. दृश्यमाध्यमात तिचा प्रवास दाखवणे गरजेचे होते. 7. शनिवारवाड्यातला धबधबा जरूर पहा!! आता तो लुप्त झाला असावा. (शनिवारवाडाच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे ती गोष्ट वेगळी.) 8. मस्तानी आणि काशी या फक्त काही महिन्यांच्या अंतराने बाळंत होतात. पण नंतर नाना आणि शमशेर यांच्या वयात कित्येक वर्षांचे अंतर दिसते. 9. मस्तानीला पेशवे कुटुंबीयांनी राहत्या घरात साध्या नजरकैदेत ठेवले होते. पण सिनेमात तिला साखळदंड घालून तुरुंगात टाकतात. ही कविकल्पना आहे, पण चित्रपटाच्या विशिष्ट रचनेमुळे क्षम्य. 10. बाजीराव हा रांगडा, बेदरकार पण चाणाक्ष योद्धा असा चित्रित केलेला आहे. ते योग्यच म्हणावे लागेल. सिनेमात तो एकदाही सोवळे नेसताना, संध्या-पूजा करताना दिसत नाही. 11. आरसा महालातील सर्व दृश्ये विशेष काळजीपूर्वक पाहिली. पण कुठेही Equipment किंवा crew reflections आढळली नाहीत. हे प्रशंसनीय आहे. (तेवढ्यात मस्तानीचा नाच पहायचा मात्र राहून गेला) *** एकूण पहाता, डोक्यात राख घालून घ्यावी किंवा शेपटाला आग लावून थैमान करावे असे मला या सिनेमात काहीच आढळले नाही. ब्रह्मवृंदाने याकडे लक्ष द्यावे ही विनंती.

वाचने 17398
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

आरसा महालातील सर्व दृश्ये विशेष काळजीपूर्वक पाहिली. पण कुठेही Equipment किंवा crew reflections आढळली नाहीत. हे प्रशंसनीय आहे. (तेवढ्यात मस्तानीचा नाच पहायचा मात्र राहून गेला)
लोल ! तुम्ही सॉफ्टवेअर टेस्टर आहात का ? नाहीतर क्वालिटीला ? हघ्या !

In reply to by उगा काहितरीच

एकेकाळी सिनेमे पहाण्याचा निव्वळ अतिरेक केल्यामुळे सिनेमा 'चढणे' बंद झालेले आहे. आता या गोष्टींकडेच आपसूक लक्ष जात राहते.

8. मस्तानी आणि काशी या फक्त काही महिन्यांच्या अंतराने बाळंत होतात. पण नंतर नाना आणि शमशेर यांच्या वयात कित्येक वर्षांचे अंतर दिसते.>>> तो दुसरा मुलगा राघोबा होता ना? की काशीबाईला नाना दोनदा झाला?

In reply to by सायकलस्वार

नानासाहेब पेशव्यांचे पहिले दर्शन चित्रपटात आरसे महाल बाजीरावांना दाखवला जातो तेव्हा होते. त्या प्रसंगात त्यांचे वय अंदाजे १०-११ वर्षे असावे.
10. बाजीराव हा रांगडा, बेदरकार पण चाणाक्ष योद्धा असा चित्रित केलेला आहे. ते योग्यच म्हणावे लागेल. सिनेमात तो एकदाही सोवळे नेसताना, संध्या-पूजा करताना दिसत नाही.
एका प्रसंगात बाजीराव नदीच्या घाटावर लहानगे रघुनाथराव अन समशेर बहादूर यांना कुठले तरी मंत्र शिकवत असतो असा प्रसंग चित्रपटात आहे. तिथे बाजीरावांची आई कृष्णाभट यांचे बरोबर आल्याने या मंत्रशिक्षणात खंड पडतो असे दाखवले आहे. बाकी धागाकर्त्याच्या निरिक्षणशक्तीला प्रणाम.

In reply to by सायकलस्वार

खरे तर काशीबाई सुरुवातीला अगदी अल्लड, अवखळ दाखवली आहे त्यामुळे मनात गोंधळ होतो. रघुनाथाच्या वेळचे बाळंतपण हे तिचे पहिलेच बाळंतपण असावे असा समज तत्पूर्वीच्या तिच्या या अल्लडपणामुळे होतो. ही चूक एखाद्या सूचक वाक्याने टाळता आली असती. मराठी इतिहास अजिबात माहीत नसणार्‍या इतर भाषकांचा गोंधळ नक्कीच होऊ शकतो, होतो. 'मल्हारी' नाचाच्या वेळीही बाजीरावाची सर्वसमावेशकता आणि सामान्य सैनिकांविषयीचा जातपातहुद्दानिरपेक्ष जिव्हाळा हा एखाददोन वाक्यांनी नृत्याआधी सूचित करता आला असता. उंचनिंच बाजीराव एकदम टणाटण नाचू लागतो हे थोडे विसंगत वाटते.

In reply to by राही

रघुनाथ रावच्या बारशा आधी एका प्रसंगात नाना साहेब ६ ते ८ वर्षाचे बाजीरावांच्या किंवा चीमाजीच्या भवति दाखवले आहेत. तो प्रसंग आठवत नाही

मनोरंजक सेन्सॉरशिप! मराठी/पंजाबी/ गुजराती/बंगाली असा कोणताही योद्धा/ राजकारणी/ समाजसेवक/नेता असे कोणावरही चित्रपट निघू देत. मूळ कथेशी, त्याकाळाशी प्रामाणिक राहणे एवढेच म्हणणे आहे. त्यात सुसंगती दिसत नसल्यास चुकीला चूक म्हणणे म्हणजे शेपटावर पाय पडणे, डोक्यात राख घालणे नव्हे. उलट पुन्हा योग्य चित्रिकरण करण्यास भाग पाडणे/घुसडलेल्या गोष्टींचे चित्रिकरण वगळावयास भाग पाडणे (किंवा जे कमी खर्चाचे असेल ते) हे बरोबर आहे. सिनेम्याटिक लिबर्टी नक्कीच हवी पण किती आणि कशाला हे तारतम्य! क्र१. ओक्के. क्र. २ भविष्यात येऊ शकेल. कोणतातरी शिनेमा पहिला असणारच! अचूकता जितकी जास्त तितके कौतुक जास्त होणार हे साहजिक आहे. क्र ३ यावरून तर मिपावरील धाग्यांमध्ये चर्चेचे आख्खे महाभारत घडले. क्र ४ तेच ते, अप्रीय घटना असली तरी उल्लेख आल्यास चालेल. मी सिनेमा पाहिलेला नसल्याने त्याबद्दल बोलू शकत नाही. क्र ५ ओक्के. क्र ६ सहमत क्र ७ दुर्दैवी गोष्ट आहे. क्र. ८ वाचून फिस्सकन हसू आले. ;) मुद्दा क्यान्सल समजलेला आहे. क्र. ९ आपण फार क्षमाशील आहात असे म्हणेन. :) नजरकैदेत असणे व साखळदंडात असणे या पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. सोदाहरण स्पष्ट करू शकेन पण टंकाळा आलाय. क्र. १० तेही ठीक....................म्हणजे ठीक नाही, निदान पुसटसा शॉट असायला हवा, पण त्याने इतिहास बदलत नाही म्हणून ठीक म्हटले आहे. क्र. ११ ग्रेट निरिक्षण! नाच तूनळीवरही पाहता येईल. वाईट वाटून घेऊ नका. एकंदरीतच धागा आवडला.

क्र. 8 बद्दल तो सारा वाद वृथा होता असे तेव्हाही वाटले आणि आताही वाटते.

चित्रपट पाहून खालील भावना जाणवल्या …. पडद्यावरील काल्पनिक का होईना पण बाजीराव, पाहून खरोखरच्या बाजीरावासाठी उर भरून आला, खरोखरच तो बाजीराव मर्द मराठा (इथे मराठा हा महाराष्ट्रीय अश्या अर्थी) पराक्रमी होताच. ब्रम्हभोज यज्ञ इ कर्मकांडा ऐवजी, त्याने खरा पेशवाधर्म (स्वराज्याच्या विस्तार, स्वराज्याच्या शत्रूंना पायबंद, स्वराज्याची सीमेजवळील बफर स्टेट सुरक्षित व मैत्रीपूर्ण राखणे )अखेरच्या श्वासापर्यंत पाळला… स्त्रीला सन्मान (प्रेम व व्यभिचार मधला फरक समजणारा), जात धर्म न पाहता प्रेम करणारा (गुणग्राहक), पहा खांद्याला खांदा लावून लढणार्यात महादजी शिंदे वैगरे मित्र, आपल्या पश्चात दुसर्या पत्नीची मुलाची आबाळ होवू नये याची दक्षता आपल्या हयातीच घेणारा, असा हा शिवाजी महाराजांच्या पराक्रमासार्खाच चतुर पराक्रमी लढवय्या, कुटुंबियांच्या कृत्यांसमोरमात्र थकून स्वतःशीच हरला… चित्रपट पाहताना एक गोष्ट त्यामुळे नक्कीच जाणवली…. पिंगा मल्हारी विरोध तर फक्त बहाणा होते… खरे दुखणे वेगळेच आहे.

In reply to by पगला गजोधर

पिंगा मल्हारी विरोध तर फक्त बहाणा होते… खरे दुखणे वेगळेच आहे
प्रचंड सहमत

In reply to by प्रदीप साळुंखे

जात धर्म याच्या प्रतिष्ठेत अजूनही समाज अडकला असल्यामुळे, "आमच्या घरातील तरुण वा तरुणीला, प्रेम विवाह करण्याचा अधिकारच नाही". ‘आम्ही सांगू त्या घरातच तिने नांदायला गेले पाहिजे,’ किंवा त्याने लग्न केले पाहिजे'' अशा वृत्तीची माणसे आजही समाजात आहेत. सोळाव्या शतकाप्रमाणे अजूनही महिलांनी वागले पाहिजे, अशी परंपरा राखू पाहणाऱ्या प्रवृत्तींकडून, या वृत्तीविरुद्धच कोणी बंड केले आणि विवाह केला. तर आपला आत्मसन्मान दुखावला म्हणून कुणालाही ठार मारून टाकण्याचा प्रकार (ऑनर किलिंगसारख्या) (रेफः पाटिल कुलकर्णि हत्याकान्ड कोल्हापुर) होतो. अश्याच बुरसटलेल्या प्रवृत्तींकडुनचा, "पिंगा मल्हारी विरोध तर फक्त बहाणा होते… खरे दुखणे वेगळेच आहे"

In reply to by प्रदीप साळुंखे

उत्तर प्रदेशातील दादरी येथे घडलेल्या घटनेत बिसरा खेडय़ात अखलाख नावाच्या मुस्लीम व्यक्तीस गाईचे मांस सेवन केल्याच्या संशयावरून जमावाने ठार मारले होते. या व्यक्तीच्या घरातील शीतकपाटात सापडलेला मांसाचा तुकडा हा बकऱ्याच्या मांसाचा होता, असे आता प्रयोगशाळेतील तपासणीत निष्पन्न झाले आहे.
पिंगा मल्हारी विरोध तर फक्त बहाणा होते… खरे दुखणे वेगळेच आहे.

In reply to by पगला गजोधर

आणि आडनाव बघून टार्गेट करणारे ही आहेत इथे,याचा प्रत्यय आला एका धाग्यावर. . . . स्वतःच्या निरर्थक विचारसरणीवर आघात करणारे एखादे प्रतिकूल मत आले कि यांचा थयथयाट पाहून मजा येते.

In reply to by प्रदीप साळुंखे

भोपाळ २४.९.२०१५- साईबाबा हे मुस्लिम होते. यामुळे हिंदू देव-देवतांसोबत त्यांची पूजा करायला नाही पाहिजे, असे वक्तव्य करणारे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्यावतीने वकिलाने उच्च न्यायालयात माफी मागितली आहे.
पिंगा मल्हारी विरोध तर फक्त बहाणा होते… खरे दुखणे वेगळेच आहे.

In reply to by पगला गजोधर

पिंगा आणि मल्हारीला केलेला विरोध जातीय आहे? कसा? काय नक्की हेतु आहे? स्पष्ट करा.

In reply to by पिलीयन रायडर

◆ माणूस हा भावनाप्रिय प्राणी आहे,आणि साहजिकच त्या भावनांना अस्मिता अन् अभिमानाची जोड असते. ऐतिहासिक व्यक्तीमत्वे आपल्याला प्रिय असतात,पण ठराविकच व्यक्तीमत्वे ही एकदम जवळची का वाटतात?,कारण त्यांचाशी आपली अस्मिता जोडलेली असते,मग ती प्रांतीय/जातीय/भाषीय या स्वरूपाची असू शकते.या अस्मितेबाबत मानवी स्वभावाप्रमाणेच आपल्या भावना या तीव्र स्वरूपाच्या असतात. ◆ कोणी कितीही नाही म्हणलं तरी मनाच्या खोल गाभार्यामध्ये ही अस्मिता दडलेली असते.आणि वेळ आली कि ती बाहेर येतेच.आता या गोष्टीची जाणीव स्वतः त्या व्यक्तीला नसते किंबहुना ती व्यक्ती ठामपणे अशी गोष्ट नाकारत असते. ◆ "इतिहासाच्या विकृतीकरणाला विरोध आहे,आणि मग तो कोणाचाही इतिहास असो, माझे मत हेच राहील",असे ती व्यक्ती सांगत असते.आणि दुसरीकडे शिवाजीमहाराजां बद्दल असं विकृतीकरण झालं तर चालेल का? असा उलट प्रश्न करत असते. ◆ बाजीराव आणि काशीबाई नाचू कसे शकतात? हे एक कारण असू शकते.ते रास्त आहे. पण ते "सिनेमात नाचले" प्रत्यक्षात नाचले असतील/नसतील माहित नाही. पण आपण पाहतोय तो सिनेमा आहे ही गोष्ट ध्यानात ठेवली कि विषय तिथेच संपतो. पण तरीही मन मान्य करीत नाही,यावरून ही गोष्ट सिद्ध होते कि मनातील त्या अस्मितेचे रूपांतरण दुराभिमानामध्ये झालेले असते. ◆ मग सिनेमाच न बघणे आणि शक्य आहे तिथे आपले मत मांडणे हे विरोधाचे उत्तम पर्याय आहेत.याबद्दल काही म्हणणे नाही.

In reply to by प्रदीप साळुंखे

"इतिहासाच्या विकृतीकरणाला विरोध आहे,आणि मग तो कोणाचाही इतिहास असो, माझे मत हेच राहील",असे ती व्यक्ती सांगत असते.आणि दुसरीकडे शिवाजीमहाराजां बद्दल असं विकृतीकरण झालं तर चालेल का? असा उलट प्रश्न करत असते.
कारण कोणाच्याही बाबत विकृतीकरण झालेले मला चालणार नाही हे स्पष्ट शब्दात तिथेच लिहिलेले आहे. या दोन्हीचा अर्थ एकच आहे. तुम्हाला मराठी भाषा कळते का हो? तुम्ही मात्र एकाचे विकृतीकरण झाले तर चालेल अन दुसर्‍याचे चालणार नाही असे म्हणताय. चालू दे तुमच्या पद्धतीचा प्रोपागंडा.

In reply to by पैसा

आणि एवढं करुन आपण जे विरोध करत आहोत ते "बुरसटलेले" का? आनि हा विरोध "बहाणा" असुन... "दुखणे" वेगळेच आहे म्हणजे काय? ह्यांना हे मान्य आहे की आपली अस्मिता आपल्या प्रांताशी निगडीत असते. म्हणजे पेशव्यांबद्दल मला राजपुतांपेक्षा जास्त ममत्व असणार. पण मग त्यांच्या प्रतिमेला धक्का लावणार्‍या गोष्टीला मी विरोध केला तर मी "बुरसटलेली" कशी होते? त्याही पेक्षा डेंजर, "जातीय" कशी होते?

In reply to by पैसा

हे तुम्हाला उद्देशून नव्हतं.माझा एका मित्राचं उदाहरण आहे ते.आता त्याचं म्हणणं तुमच्या प्रतिक्रियेशी सुसंगत आहे त्याला मी काय करणार.
तुम्ही मात्र एकाचे विकृतीकरण झाले तर चालेल अन दुसर्‍याचे चालणार नाही असे म्हणताय
माफ करा,मी असे कधीही म्हणलं नाही. त्या धाग्याचा आशय काय होता बघा,त्याला विरोध होता माझा. . . (शिवरायांवर असा सिनेमा आला आणि त्यात ते नाचले तर मला चालेल.)

In reply to by प्रदीप साळुंखे

(शिवरायांवर असा सिनेमा आला आणि त्यात ते नाचले तर मला चालेल.)
हे एवढे मॉडर्न होणे मला या जन्मात जमण्यासारखे नाही. साष्टांग नमस्कार. अर्थात असा सिनेमा आला आणि त्याचे तुम्ही समर्थन केले तर तिथेही आपले असेच भांडण होईल याची १००% ग्यारेंटी.

In reply to by पैसा

+११११११११ सिनेमाय.. त्यात काय.. चालतय... वगैरे काहीही कारणांनी सुद्धा मी हे वेडे चाळे बघु शकणार नाही..

In reply to by पैसा

पुढच्या धाग्यावर भांडूया मग. _/\_ _/\_ _/\_ अशाप्रकारे हे युद्ध संपलेलं आहे. बाकि वैयक्तिक आकस न ठेवणे. लोभ असावा. ◆धन्यवाद◆

In reply to by प्रदीप साळुंखे

तुम्हाला नक्कीच चालेल. एका मुसलमानाला शिवरायांबद्दल फारसं प्रेम नसेलच नाही का, प्रदीप साळुंखे खान उर्फ मोगा खान उर्फ हितेश खान उर्फ आणि काही तरी खान?

In reply to by काळा पहाड

शाळेचा दाखला दाखवू काय तुला.त्यावर लिहलयं हिंदू मराठा असं काहीतरी. जातीचा फालतू माज मी दाखवत नाही. मुळात मी जातच मानत नाही. . . आणि द्वेषभावना कमी कर जरा,तुझ्यासारख्या लोकांमुळे हिंदू धर्म बदनाम होत आहे

In reply to by प्रदीप साळुंखे

हा वाद इथे थांबवावा ही विनंती. जातिसंस्थेबद्दल (किंवा अगदी एखाद्या विशिष्ट जातीसंबंधीही) संयत भाषेत चर्चा करणे शक्य आहे.

In reply to by पैसा

"विकृतीकरण" या शब्दात अनेक गृहीतके आणि पूर्वग्रह लपलेले असल्यामुळे तो वरवर दिसतो तितका साधा नाही. संगीत मानापमानात कृष्णाने गाणी म्हटली तशी प्रत्यक्षात म्हटली नसणार हे उघड आहे. मग ते विकृतीकरण होते का? पेशवे सोडा, हिंदी सिनेमात मंगल पांडे, अकबर, सम्राट अशोक, भगतसिंग, मिल्खासिंग, शाहजहान या सर्वांनी नाचकाम केलेले आहे. किंबहुना "गाणी गात नाचणे" हेच विकृतीकरण आहे असे म्हटले तर एकवेळ स्वीकारता येईल कारण प्रत्यक्ष जगात कुणीच तसे करत नाही. पेशव्यांना वेगळा न्याय लावण्याची गरज नाही. यासंबंधी "गीत गाता चल (पण का?)" या धाग्यावर चर्चा सुरू आहे. (भ्रमणध्वनीवरून दुवा डकवता येत नाहीये. सहाय्याचे स्वागत)

In reply to by चलत मुसाफिर

कृष्ण ऐतिहासिक व्यक्ती आहे का? हा दुसर्‍या एका ५०० प्रतिक्रियावाल्या धाग्याचा विषय आहे. काढा तुम्हीच. संगीत मानापमानात कृष्ण आहे अस कुठून कळले तुम्हाला? का हे दुसरे कोनते मानापमान नाटक आहे? असो. माझ्यापुरते उत्तर की वरच्या यादीतला एकही सिनेमा मी पाहिलेला नाही. आणि त्यात सम्राट अशोक ऊर्फ सारुक टीव्हीवर नाचताना पाहिला तेव्हाही मला विचित्रच वाटले होते. (मुघले आझम आणि ताजमहाल हे अपवाद. पण त्यातली गाणी बघायला बरीच सुसह्य होती. किमान शाहजहान "इश्क कमीना" म्हणत पाय उडवीत तरी नाचत नव्हता.) बाजीराव सिनेमात जे काही आहे ते मल्हारी खंडोबाच्या वाघ्या पद्धतीचे गाणे नाही. ज्याला पिंगा म्हटले आहे तो पिंगा नाही. लावणी म्हटली तर ती लावणी नाही. बॉलीवुड छापाचे अर्धवट कथक आहे ते. खरी लावणी बघायची आहे? सुरेखा पुणेकर, छाया माया खुटेगावकर वगैरेंचे कार्यक्रम बघा. त्यात त्या खानदानी भरजरी साड्या कशा नेसतात ते बघा. असल्या थिल्लर झगामगा साड्या खर्‍या तमाशातल्या बायका पण नेसत नाहीत. अठराव्या शतकातल्या बायका तर कुठे?

In reply to by पैसा

माफ करा. स्वयंवर किंवा सौभद्रऐवजी मानापमान टंकिले गेले असावे. पण मुद्दा राहतोच. बाजीराव/कृष्ण असोत की बसंती टांगेवाली/बजरंगी भाईजान, चित्रपटातील पात्रांनी नाचगाणी करणे हे अवास्तवच आहे. त्याला कविकल्पना म्हणावे की विकृतीकरण? दोन्हीला एकच न्याय लावा ना! बरं ते जाऊ द्या. समजा श्रीमंत बाजीरावांनी नृत्य केलेच असते, तर कोणते केले असते असे तुम्हाला वाटते?

In reply to by चलत मुसाफिर

जो माणूस युद्धावर जाताना जेवण्यासाठीही घोड्यावरून उतरत नव्हता तो नाच बिच करील हे कधीच शक्य वाटत नाही. कविकल्पना आणि विकृतीकरण यात तुमची गल्लत होते आहे. जे काल्पनिकच आहे, त्यात काहीही मालमसाला टाका. काय फरक पडतो? मात्र जे घडून गेले आहे त्यात नको ते प्रकार आपल्या कल्पनेने घातले तर तो त्या मूळच्या माणसांवर अन्यायच झाला ना.

In reply to by पैसा

अहो, घोड्यावरून काय, रिक्षा किंवा ट्रेनने जाणारा माणूसही फारसा नाच करत नाही. नाचगाणी हा हिंदी सिनेमाचा भाग आहे. बरं, बाजीराव आणि काशी नाचले तर त्यात कुळाचा, ज्ञातीचा वा देशाचा फार मोठा अपमान झाला ही धारणाच माझ्यामते चुकीची आहे. चित्रपटात बाजीराव हा एक बेदरकार, बेधडक, पण धुरंधर आणि विवेकी योद्धा दाखवलेला आहे. हे चित्रण (एका!) सामाजिक धारणेला सुसंगत आहे. आणि जरी नसेल, तरी तितके विचारस्वातंत्र्य असणे अभिप्रेत आहे. भारतात ते नसेल, पण हॉलीवूडमध्ये ऐतिहासिक व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून, त्यांच्याभोवती पराकोटीचा कल्पनाविलास रचून चित्रपट काढले जातात. Abraham Lincoln - Vampire Hunter या नावावरूनच सिनेमा किती चित्तचक्षुचमत्कारिक असेल हे कळते. अशी अनेक उदाहरणे आहेत. बाजीराव मस्तानी या चित्रपटाचा तो उद्देश नाही हे उघड आहे.

In reply to by चलत मुसाफिर

अहो त्या दुसऱ्या धाग्यावर काय लिहिलय वो तुम्ही?

In reply to by भंकस बाबा

गाणी हा भारतीय सिनेमाचा अविभाज्य भाग होण्यामागे काही समाजशास्त्रीय अथवा मानसशास्त्रीय कारणे असतील का, असा मुद्दा मांडला आहे

In reply to by चलत मुसाफिर

बाजीराव आणि काशी नाचले तर त्यात कुळाचा, ज्ञातीचा वा देशाचा फार मोठा अपमान झाला ही धारणाच माझ्यामते चुकीची आहे.
हे इथे मिपावर कोणी म्हटलंय का? आणि तुमच्या लेखाबद्दल बोलायचे म्हणजे मस्तानीचे वंशज उमर अली बहादूर आणि तमकीन अली बहादूर; उमाबाई दाभाडे यांचे वंशज, अनिल शिरोळे, यांनी या सिनेमावर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. ते ब्रह्मवृंदात मोडतात हे मला माहीत नव्हते. मिपावर कोणी जर एखाद्या जातीचा उल्लेख करून अपमान झाला वगैरे बोलत नसेल तर तुम्ही मिपाचे वातावरण जातीचा उल्लेख करून बिघडवायचा प्रयत्न का करताय?

In reply to by पैसा

ब्रह्मवृंदाचा उल्लेख करण्याचे कारण असे की या वर्णनाला जुळणारे जन सदर चित्रपटाला तीव्र आक्षेप घेत आहेत. माझ्या व्यक्तिगत परिचयातील व संबंधातील लोकही "काशी, मस्तानी आणि बाजीराव नाचतात म्हणजे काय?" या मुद्द्यावरून तोंडाला फेस येईपर्यंत संतप्त झालेले आहेत. त्यांना समजावून पाहिले, पण काही फरक पडलेला नाही. जातीय अभिमान याशिवाय याचे दुसरे कारण मलातरी दिसत नाही. सदर शब्दाचा वापर मी मूळ लेखातच केलेला आहे. त्यानंतर सुरू झालेल्या चर्चेत मी जातीचा उल्लेख केलेला नाही. कारण चर्चा चित्रपटावर व्हावी, जातीवर नव्हे, असा उद्देश आहे.

In reply to by पैसा

जो माणूस युद्धावर जाताना जेवण्यासाठीही घोड्यावरून उतरत नव्हता
खरंतर ह्या विषयाचा आता कंटाळा आलाय पण हे विधान वाचून अंमळ हसू आले! अशा ऐतिहासिक गृहीतकांवर आधारलेला इतिहास हा विकृतीकरणासाठी नक्कीच ससेप्टीबल / व्हल्नरेबल असणार! :) - (जांभई देणारा) सोकाजी

In reply to by पैसा

मला वाटतं ह्या गृहितकाला बखरीत आधार आहे. घोड्यावरून जाता जाता शेतातून कणसं उपटून हातावर मळून खात असत असा कायसा उल्लेख आहे. पण हे केवळ बाजीरावाचा झपाटा दाखवण्यासाठी रूपकार्थाने वापरलेले असावे. ह्यात तथ्थ्यांश असलाच तर अगदी अत्यल्प स्वरूपाचा व अपवादात्मकच असावा.

In reply to by प्रचेतस

मात्र बखरीत उल्लेख असला तरी तेव्हा मराठे युद्धावर जाताना इतर काही सामानसुमान बरोबर नेत नसत. त्यामुळे हे अगदी सहज शक्य वाटते. कोवळी कणसे कोणतेही सोपस्कार न करता सहज खाता येतात. ती सामान, जनानखाने आणि बाजारबुणगे सोबत न्यायची मुघलांची पद्धत जेव्हा मराठ्यांच्यात आली त्यानंतर पानिपतचा मोठा पराभव झाला.

In reply to by पैसा

जनानखाने बाळगले म्हणुन मराठे हरले म्हणे. आणि तेच जनानखाने बाळगुन मुसलमान मात्र जिंकले. ! संभाळायला अक्कल लागते ! उद्या तुमच्या शेतातून येणारेजाणारे कणसं खात फिरले तर ते चालेल का ? उत्तर भारतीय इतिहासकार मराठ्यांबद्दल चांगले लिहित नाहीत, ते याचमुळे असेल का ?

In reply to by मोगा

मोगाजी,उग्गीच् राळ उडवु नका, काय तो सोक्षमोक्ष लावुन टाका. मोगाजीचे खरड़ने एका फटक्यात कळले तर हुर्ड्याची पार्टी द्यावी म्हणतो. एक अनपढ़ गवाँर।

In reply to by पैसा

मात्र बखरीत उल्लेख असला तरी तेव्हा मराठे युद्धावर जाताना इतर काही सामानसुमान बरोबर नेत नसत. काय बोलावे आता! हे पोकळ गृहीतक नसून, अभ्यास करून लिहीलेले ऐतिहासिक सत्य? हर हर महादेव! आता मात्र इतिहासाची 'वाट लावली' असं गाण नाचत म्हणावसं वाटतय! :) - (कोवळी कणसे खाऊन जगावे असा विचार करणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

अहो त्यांचे काम अंतिम निर्णय देणे आहे! त्यांनी लिहिलंय ना! म्हणजे नक्की तसच झालेलं असणार... :P

In reply to by सोत्रि

ऐतिहासिक फेकाफेक आहे हि, याचा मूळ उगम कोण्या १९ व्या शतकातील कवितेतून आहे. मुळात उत्तरेत त्याकाळात मका पण नव्हता आणि ज्वारी पण नव्हती त्यामुळे कणसाचा प्रश्नच येत नाही. मराठ्यांच्या पत्रात जागोजाग उल्लेख आहेत वेगवेगळ्या ठिकाणी छावण्या पडल्याचे. अलंकारिक उपमेशिवाय दुसरे काही नाही, हि उपमा तितकीच खरी असावी जितक्या "नेताजी पालकराचा घोडा आवाजापेक्षा जास्त वेगात पळतो" आणि "शिवाजी राजे २०-३० फुट उंच उडी मारतात" या उपमा आहेत

In reply to by मालोजीराव

आपण म्हणताय ते बरोबर आहे..पण हे सगळे सामानसुमान वाहुन नेण्यासाठी कामगार माणसे आणि इतर सोयी असतीलच की..बाजीराव किंवा इतर खाशांना मोहिमेची आखणी, अंमलबजावणी ही कामे असणार ना...मोहिमेतल्या खाण्याबाबत म्हट्ले तर अजुनही एखाद्या प्रवासाला चारचाकी चालवताना आपण अनेकदा काहितरि पट्कन खातोच की, मुक्कामी पोहोचल्यावर निवांत जेवण. लगेच ती उपमा आहे कि सत्य याचा उहापोह कशाला.

In reply to by प्रदीप साळुंखे

मी विचारलं की हा विरोध "जातीय" कसा? बुरसटेला का? खरे दुखणे नक्की काय आहे? त्याबद्दल बोलुया. बाकी तुमची कारणमीमांसा कळली.. पटलीच असे नाही. पण त्यात मला रसही नाही.

In reply to by पिलीयन रायडर

जातीय म्हणजे इतरांबद्दल द्वेष असणे किंवा इतरांना कमी लेखणे असं माझ मत नाही. . . तर स्वजातीय व्यक्तीमत्वे जी आहेत त्यांच्याबद्दल असणारे अतिप्रेम ही सुद्धा एक जातीयताच आहे. बाकि हलके घेणे. माझे म्हणणे हे जास्ती करून चित्रपट बंद पाडण्यार्यांना लागू होते,आपल्याला नाही. कारण चित्रपट न पाहणे तसेच योग्य तो विरोध या माध्यमातून करणे,हे कायदेशीर आहे त्याबद्दल आपले कौतुक केलेच आहे.

In reply to by प्रदीप साळुंखे

जे चुकीचे आहे ते जर मनाने मानले नाही तर तो दुराभिमान कसा काय??

In reply to by पगला गजोधर

'दिलवाले' विरोधकांकडून 'तिला' बलात्काराची धमकी. पिंगा मल्हारी विरोध तर फक्त बहाणा होते… खरे दुखणे वेगळेच आहे.

In reply to by पगला गजोधर

अहो महाशय, "खरे दुखणे वेगळेच" म्हणजे नक्की काय ते सांगा कि.. वर दहा वेळा विचारले लोकांनी. का उगाच कुठल्याही लिंका चिकटवत सुटायचे? कशाचा कशाला काय सम्बन्ध?

In reply to by पगला गजोधर

तुमच्याच्यानी सांगणं होणार असेल तर ठिके.. नैतर ह्या असल्या सडेल पिंका न टाकाल तर बरं होईल..

हा हा हा! मुद्दा क्रमांक १ व ८ सोडल्यास एकदम सहमत आहे. माझ्या मते चित्रपट मस्तानी केंद्रित ठेवण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. काशीबाई तितका भाव खात नाखा, बाजीराव देतही नाही ;) माझे नी यांचे मत बरब्बर जुळते :)

वरील मु्द्द्यांशी सहमत. मुद्दा 8 कँसल झालेला आहेच. अजून एक न पटलेले म्हणजे भंसालीचा देवदास हँगओव्हर. पूर्वार्धातल्या रांगड्या बाजीरावाचा उत्तरार्धात पार देवदास करुन टाकला. बाकी इतिहास म्हणावे तर दोन इतिहास संशोधकात सुद्धा कधी इतिहासावर एकमत होत नाही तिथे भंसाली आणि बॉलीवुडकडून काय अपेक्षा ठेवावी. वैयक्तीक दृष्ट्या मी पाचवीत इतिहास शिकला तेंव्हापासून पहीला बाजीराव आवडत होता. मस्तानी वगेरे विषयी नंतर कळले. चित्रपट बघितल्यावर मनातील त्या प्रतिमेला थोडासा देवदासपणा सोडला तर अजिबात धक्का पोहचला नाही. उलट काही गोष्टी अधिक प्रकर्षाने जाणवायला लागल्या. चिमाजीआप्पा आणि बाजीराव यांचे संबंध. चिमाजीआप्पाचा बाजीरावाला अजिबात विरोध नव्हता, गरज पडली तर या चिमाजीआप्पानी बाजीरावासाठी जीवसुद्धा दिला असता पण त्याला मस्तानी नको होती. अजिबात नको होती. काय पोटंशियल आहे राव कथेमधे.

In reply to by मित्रहो

इतिहास म्हणावे तर दोन इतिहास संशोधकात सुद्धा कधी इतिहासावर एकमत होत नाही तिथे भंसाली आणि बॉलीवुडकडून काय अपेक्षा ठेवावी.
अगदी सहमत. म्हणूनच वर ज्या परिक्षणाची लिंक दिलीये त्यातले हे मला खूप आवडले:
मी काही इतिहासाची भक्त नाही नि इतिहास म्हणजे माझं दैवत नाही. त्यातही गल्लाभरू मेनस्ट्रिम सिनेमा हे काही माझं इतिहास शिकायचं साधन नाही. त्यामुळे मला त्याने काही घंटा फरक पडत नाही. मला जर इतिहास माहीत करून घ्यावासा वाटलाच, तर मी हा सिनेमा नक्कीच पाहणार नाही. तितकं डोकं मला आहे. ज्यांना नाही, त्यांच्याबद्दल मला कणव आहे. जसं ‘राऊ’, ‘मृत्युंजय’ किंवा ‘छावा’ वाचून हाच इतिहास अशी समजूत मी करून घेतली नाही, तशीच या सिनेमामुळेही नाही. तेवढी सुज्ञ मी आहे आणि त्यामुळे मला या सिनेमात किती सुयोग्य इतिहास दाखवलाय याच्याशी फारसं देणंघेणं नाही.

In reply to by मित्रहो

बाजीराव आपल्या कुटुंबियांच्या विरोधापुढे एका मर्यादेपलीकडे काहीही करू शकला नाही हे त्याच्यावरील संस्कार सांगतात ही आपली संस्कृती सांगतात, राऊ कादंबरीत राऊ मस्तानी वर संकट आलेले पाहून हळवा व खचलेला रंगवला आहे राऊ कादंबरीमुळे आतापर्यंत लोकांना राऊ बद्दल माहिती मिळाली आहे. अर्थात हि कादंबरी हे ऐतिहासिक सत्य किंवा इतिहास नाही हे खूप वर्षांनी कळले. हे नको होते दाखवायला ते नको होते दाखवायला हे म्हणणाऱ्या लोकांना नम्रपणे सांगतो. पुराव्याने शाबित असे प्रमाण ,ऐतहासिक दाखले , कागदपत्रे व दस्तावेज ह्यातून खरा इतिहास किती सामान्य लोकांनी वाचला आहे

या चित्रपटात एक गोष्ट असायला हवी होती. विविध घटनांचा ढोबळ मानाने का होईना काळ (उदा इ. स.१७२२ चा हिवाळा, इ. स.१७२८ इत्यादी) या खेरीज चित्रपटात दाखवलेल्या पुण्याबाहेरच्या काही घटना जिथे घडल्या त्या ठिकाणाचे नाव व भारताच्या नकाशातले स्थान दाखवले असते तर दुधात साखर.

In reply to by श्रीरंग_जोशी

+१ मी चित्रपट पाहिलेला नाही तरीही अशा गोष्टी नसतील तर असावयास हव्यात, (धमक असलेल्या दिग्दर्शकांनी पळवाटा न वापरता संदर्भांचा आणि टिकेचाही चित्रपटाच्या शेवटी उहापोह करावयास हरकत नसावी) चित्रपटात मागची वर्षे स्थळे आणि नकाशा इत्यादी दाखवल्याने चित्रण पाहताना रोचक वाटते हे खरे.

ज्यांचा गाण्यांशी आकस आहे त्यांनी ती दोन गाणी लागली कि एखादी डुलकी(झोप) काढुन घ्या. पण शिनमा बघाच, (दोन-तीन दिवसातच 'दिलवाले'ला ओवरटेक करेल बघा.)

अनेक पूर्वग्रह मनात असतांना हा चित्रपट पाहिला आणि तरीही त्यात फारसे* काही खटकले नाही, किंबहुना आवडला. एका बैठकीत संपूर्ण चित्रपट पाहिला. प्रियांकाचे मराठी उच्चार छानच! * - एकच खटकलेली गोष्ट म्हणजे, बाजीरावाच्या तोंडचे संवाद हे बाजीराव बल्लाळचे न वाटता बाजीराव सिंघमचे जास्त वाटले. पेशवे बाजीराव कितीही रांगडे असले तरी कायम काहितरी यमकं जुळवून आणि पंचलाईन टाईप 'डायलॉक' फेकत असतील असं वाटत नाही. रांगड्या बोलण्यातही अदब तर असेलच. बाकीचे सर्व पात्र नॉर्मल बोलताना अचानक बाजीराव अश्या पद्धतीने बोलायला लागला की घासात खडा आल्यासारखं वाटलं प्रत्येक वेळी!

---मराठी कादंबरीवर आधारित असलेला हिंदी सिनेमा मला तरी दुसरा आठवत नाही.-- "चक्र","महानंदा" हे हिंदी चित्रपट जयवंत दळवी यांच्या "चक्र" , "महानंदा" या कादंबरयांवर आधारीत आहेत. इतर उदाहरण म्हणजे "रावसाहेब" हा हिंदी चित्रपट जयवंत दळवी यांच्या "बॅरिस्टर" या नाटकावर आधारीत आहे .