मराठी शाळांतील घटती पटसंख्या
मराठी शाळांतील घटती पटसंख्या हा कोण्या चर्चेचा विषय होऊ शकतो असे आम्हास बिलकुल वाटत नाही. किंबहुना त्यात चर्चा करण्यासारखे काय आहे असाच विचार आमच्या मनात येतो.
तसे पाहता मराठी ही फार प्राचीन भाषा आहे. कित्येक मराठी भाषाकोविदांप्रमाणे संस्कृत पश्चात जी भाषा जन्मास आली ती मराठीच. यापेक्षा पुढे जाऊन काही (अतिरेकी) मराठी प्रेमी मराठी ही अश्मयुगीन कालखंडापासून असल्याचे पुरावे देखील सादर करू शकतील. (सध्या तर या अशाच अतिरेक्यांचे पेव फुटलेले दिसते. कालांतराने ही मंडळी मंडळांतून फुटतात किंवा यांना कोणीतरी हातापायाने फोडते ती गोष्ट वेगळी). असो....
तर मुद्दा आहे मराठी शाळांतील घटती पटसंख्या. मराठ्यांवर इंग्रजांचे आक्रमण झाले, नंतर ते संपूर्ण भारतावर राज्य करत टिच्चून उभे राहिले. अशाच प्रकारे मावशी मायबोलीवर आक्रमण करत्येय. त्याने घाबरून जावयाचे काय कारण? उभ्या भारतावर राज्य करून इंग्रज शेवटी कंटाळून निघून गेले कारण त्यांना आपल्यामधील त्याच त्याच भांडणांचा कंटाळा आलेला, इतकी साधी गोष्ट. ते काही महात्माजींनी "चले जाव" म्हटले आणि अगदी आज्ञाधारकपणे ते निघून गेले, किंवा त्या हिटलराने चर्चिल च्या पुढ्यात असंख्य बॉम्ब फोडुन त्यास जेरीस आणले आणि त्यांची भारतावरची पकड ढिल्ली झाली, हा अगदीच चुकीचा इतिहास आहे. (इतके बॉम्ब फोडल्यावरही चर्चिल फुटला नाही म्हणून हिटलर ने स्वतःच्या पिस्तूलाने त्याचे डोके फोडून घेतले हे मात्र निर्विवाद सत्य).
अंतिम सत्य हेच की इंग्रजांना आपल्या घरातले तंटे मिटवता आले नाहीत तेव्हा ते नैराश्याच्या शिकारीस बळी पडून हिंदोस्तां सोडून गेले. हिंदू मुसलमान भांडणे, ब्राह्मण दलित भांडणे, पोलीस गुंड भांडणे, प्रांताप्रांतात भांडणे, घराघरांत भांडणे, गावागावांत भांडणे, भावाभावांत भांडणे, बांधाबांधाची भांडणे त्यांना शेवटपर्यंत मिटवता आली नाहीत. ईंग्रज त्यांनाच कंटाळून गेलेत. आमची ही भांडणे ते गेल्यावरही चालूच आहेत आणि ती आहेत म्हणून आमच्या दैनंदिन जीवनात मजा आहे. ती त्या बावळट आंग्लन्ना समजलीच नाहीत. असे आपण सगळे.
त्यातही मराठी माणसाचं वैशिष्टय म्हणजे त्याचा ताठ कणा, न वाकणारा. एका ऐकीव घटनेनुसार दोन मल्याळी कुटुंबे महाराष्ट्रात मराठी शिकले पण त्यांच्या शेजारच्या मराठी गड्यांना शेवटपर्यंत अम्मा, निरु, आणि आँ या (सर्वप्रांतीय) प्रश्नार्थक अव्ययापलिकडे कणभर प्रगती झाली नाही. आता ईतकी कठोर व मायबोलीवर प्रेम असणारी, कधीही कोणत्याही भाषेचा प्रभाव स्वतःवर पडू न देणारी माणसे असताना मराठी वर परिणाम होईलच कसा? मायबोलीवर इंग्रजीच होणारं आक्रमण आणि मराठीचा कमी होणारा टक्का या केवळ वल्गनाच ठरतात. ही इतरत्र फिरणारी पाखरे फिरून फिरून आपल्याच घरट्यात येणार याबद्दल आम्हांस पूर्ण छप्पन्न इंच छातीठोक खात्री आहे.
इंग्रजी शाळांत होणारी अपत्याची फरपट सोबतीला आईबापाची फरपट म्हणजे गाड्याबरोबर नळ्याची यात्रा याच्या अगदी उलटा प्रकार पाहिल्याचा अतीव आनंद तुम्हास शब्दांत सांगता यावयाचा नाही. येथे नळ्यामुळे पुरा गाडा बिघडला जातो. बरे, पुढच्यास ठेच मागचा शहाणा व्हावा असेही दिसत नाही. येथे सर्वांनाच मारुतीच्या बेंबीत बोट घालून पहावयाचे आहे. बरे इतुके शिकून दिवे लावून हे दिवे पुढे गेल्यावर इतके दिवे लावतात की मायबापाचे डोळे दिपून जातात.
A फॉर apple शिकणाऱ्या पोरांबद्दल मात्र माझ्या मनात फार कळवळा आहे. ते लहान असताना ज्याच्या फोडी चघळत यांस Apple म्हणतात असे ज्ञान घेते, त्यास त्याचे आजी आजोबा सफरचंद म्हणतात, त्याची आई भाव करतांना बाजारात " भैय्या, आधा किलो सेब के साठ देगी, उपर कुछ भी नही।" अशी कचा कचा भांडते तेव्हा त्याचं मन हे निराशेत बुडतं. नक्की बरोबर काय? Apple सफरचंद की सेब! त्याला आता सगळंच unsafe वाटायला लागतं आणि मग शेवटी तो दिवा लावून दाखवतो, याचं कारण त्याला मागच्या १०-१२ वर्षांच्या असल्या अभूतपूर्व ज्ञान प्राप्तीचा बदला घ्यायचा असतो.
त्या तुलनेने मराठी शाळा पहा. त्यातही सरकारी मराठी शाळा तर फार सुंदर! तिथे शक्य झाले तरच दर इयत्तेस नवीन शिक्षक मिळतो. त्यामुळे गुरू शिष्य संवाद सलग चार इयत्ता तरी असतोच असतो. महान गुरुकुल परंपरांच्या या शाखा पाहून ऊर भरून येतो. यात गुरुवर्यांच्या मुखातून बाहेर पडनारे शब्द शिष्य अगदी जसेच्या तसे मुखोद्गत करतात. या मौलिक ज्ञान प्राप्तीवर आक्षेप घ्यायला ना त्यांच्या आईला वेळ असतो ना त्यांच्या बापाला. (वेळ असता तर ती कार्टी सरकारी शाळांत कशाला शिकली असती?)
आजही कित्येक सरकारी शाळांत बसायला भूमातेवरच आसने असतात. भविष्यातील गुढगेदुखी त्यामुळे कमी होते हा त्यामागचा निष्कर्ष आम्हास कोणीतरी ऐकवलेला. बरेचदा वर्गात न राहणारे, न शिकवणारे किंवा निद्रादेवीच्या आराधनेत मग्न गुरुवर्यांमुळे स्वयंभू शिक्षणाचा पाया पक्का होतो याबद्दल आम्हास पूर्ण खात्री आहे.
छपरांशीवाय शाळांत आकाशस्थ तारे दिवसा पाहता येतांत. सोबतच कित्येक गावांतल्या शाळभिंतींशीवाय आहेत, तिथे शांतिनिकेतनचे वर्ग भरतात.
खाजगी शाळांत एका आचार्यकडून सांभाळता न येऊ शकणारी पट्टशिष्यांची संख्या असते तर सरकारी शाळांत हर गुरूंस हर शिष्याबद्दल अचूक आणि खोलवर माहिती असते. कोणाचा बाप गवंडी आहे आणि कोणाचा प्लंबर, आणि त्याचा आपल्या घरातल्या फुटक्या मोरीच्या डागडुजीत कसा वापर करता येईल याची गणिते मनात तयार करत दिवस आरामात निघून जातो.
परंतु तरीही सरकारी शाळांतली मुले शिकतातच, यच्चयावत शिवीगाळ करत पुस्तकांच्या ढीगभर पसाऱ्यात न गुंतता आणि आपल्या गरीब मायबापाबद्दल वाईट वाटून जीवापाड मेहनत करणारे शिष्यगण सरकारी शाळांत असतातच असतात. सातासमुद्रापार देशाचे गुणगान गात जाण्याची धमक ठेवणारे सर्व आंग्ल शाळांतील शेंडेफळे नसतात.
आमच्या सरकारी शाळांतील मुले सर्वांगीण विकसित होतात कारण त्यांच्या शाळेत मैदान असते आणि ते त्यांच्या एकट्याच्या हक्काचे २४ तास उघडे असते. संध्याकाळी शाळा सुटल्याच्या घंटेबरोबर ते बंदही होत नाही आणि कोण्या खाजगी शिकवणीला जावे लागेल असा बोजाही त्यांच्या मनावर नसतो.
मावशीच्या शाळेत ज्या प्राण्याला Bitch म्हणतात, त्याला सरकारी शाळांत कुत्री म्हणतात एवढाच काय तो फरक. आणि लोकलच्या प्रवासात bitch म्हणणाऱ्या (?)सदगृहिणीस कुत्री म्हणणारी कोळीण भारीच पडते हे गमक ज्याला कळेलना तोही माझ्यासारखाच निर्धास्त होईल, मराठी शाळांच्या घटत्या पटसंख्येबाबतीत......
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चांगलं लिहिलं आहे पण या
इंग्रजी माध्यमाच्या शाळा ही
माझे शिक्षण दहावीपर्यंत मराठी
....
आपल्याच वयाची किंवा लहान
आपल्याच वयाची किंवा लहान
बहुतांश मराठी शाळांमध्ये
माझी बुद्धि कमी पडली.. दोन
.
सारकॅजम चा टॅग पण टाकायला हवा