✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मनातल्या मनात !!

अ
अर्धवटराव यांनी
Sun, 04/02/2017 - 15:17  ·  लेख
लेख
बरेच दिवस मनाविषयी चार ओळी टंकायची इच्छा होती. पण मन मानत नव्हतं :) आता थोडं मनावर घेतोय. आजवर मनावर जितका विचार झालाय तेव्हढा कदाचीत कुठल्याच विषयावर झाला नसावा. तत्वज्ञ, कवि, साहित्यीक, वैज्ञानीक, दार्शनीक... किंबहुना अवघी मानवजात या एका विषयाचं गेली कित्येक शतकं चिंतन करतेय. पण मन बालकृष्णासारखं समस्त वैचारीक ब्रह्मांड व्यापुन दशांगुळे उरतच. मनच ते. साधारणपणे 'भावना' या विषयाला धरुन मनाचा अभ्यास सुरु होतो. 'विचार' आणि/किंवा भावना या दोन घटकांची संगती लावणं हा फार मजेदार विषय आहे. प्रचंड मोठं शास्त्र उभं आहे याचा अभ्यास करायला. अलीबाबाची गुहाच ति. यच्चयावर मानवी व्यवहारांचे धागेदोरे अत्यंत क्लीष्ट, पण तेव्हढेच नेमकेपणाने गुंफलेले आढळतात मनाच्या महावस्त्रात. आता प्रश्न येतो कि हि भावना म्हणजे नेमकं काय. सोप्या शब्दात सांगायचं तर एक विशिष्ट क्रिया करायला शरीराला सज्ज करण्याची यंत्रणा म्हणजे भावना. जीवशास्त्रं म्हणतं कि प्रेरणेला प्रतिसाद देणं हे सजीवाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. शुद्ध मराठीत आपण त्याला रिस्पॉन्स टु स्टिम्युलस म्हणतो. आहार-निद्रा-भय-मैथुन या प्रेरणा प्रकारांबरहुकूम शरीराने प्रतिक्रीया द्यावी म्हणुन शरीराला एका विशिष्ट अवस्थेत घेऊन जाण्यासाठी जे काहि रासायनीक उपद्व्याव शरीरात होतात त्याला आपण भावना म्हणतो. साधारणपणे हि क्रिया क्षणार्धात होते. संकटाची चाहुल लागली कि हरीण कान टवकारतो, नाग फणा काढतो, सरडा रंग बदलतो, भीमाचे स्नायु फुरफुरतात, धर्मेंद्रच्या जिभेवर कमिने-कुत्ते वगैरे शब्द आपापली पोझीशन घेतात. प्रेरणेची दाहकता, शरीराची घडण व इतर परिस्थितीनुसार या क्रियेची लांबि-रुंदी बदलते. उद्देश मात्रं एकच. रिस्पॉन्स टु स्टिम्युलस. मनाचा दुसरा घटक म्हणजे विचार. इतर प्राण्यांच्या मानाने मानवाला हे वैचारीक दान अगदी भरभरून देण्यामागे निसर्गाची काय इच्छा असेल कोण जाणे. पण माकडसदृश एका प्राण्याचा मेंदु एका विशिष्ट प्रकारे डेव्हलप झाला. त्या प्राण्याला आपण मानव असं नाव दिलं. शरीराचे इतर उपद्व्याप सांभाळण्यापलिकडे या मानवी मेंदुचं काम तसं बघितलं तर इतर प्राण्यांसारखच आहे. ते काम म्हणजे गणितीय समिकरणं. चित्त्याचा मेंदु भक्षावर फायनल झेप कधि घ्यायची याचं समीकरण मांडतो. एकदा झेप झाली कि भक्ष्य मिळो अथवा न मिळो त्याचे सरकारी बाबुसारखे संध्याकाळचे पाच वाजतात. धृवीय प्राणी याच न्यायाने पोटाचे पेटारे भरुन आपल्या शीतकालीन निद्रेची सोय करते. मोराचे नृत्य असो वा गोगलगाईचा विजेच्या चपळाईने केलेला प्रवास, सर्वांची समीकरणं काहि ठरावीक उद्दीष्टाच्या भोवती अगदी गच्च आवळलेले असतात. मानवाच्या बाबतीत मात्र या समीकरणांच्या जंत्रीचा परिघ फार म्हणजे फारच मोठा असतो. इतका मोठा, कि नेमका कुठल्या उद्दीष्टासाठी हि समीकरणं चालली आहेत हे कळेनासं व्हावं. हा परिघ इतका मोठा व्हायचं कारण म्हणजे मानवी मेंदुला इतर प्राण्यांच्या मानाने काळाचं अफाट भान असणे होय. चित्ता मागच्या-पुढच्या काहि क्षणांचा विचार करुन स्वस्थ बसतो. मानवी मेंदुसाठी अशा मागच्या-पुढच्या संदर्भाला काहिच मर्यादा नाहि. या परिघीय संदर्भांनाच आपण म्हणतो "विचार". या विचारांचं जंजाळ किती खोल असावं याचा काहि थांगपत्ता नाहि. हा डोलारा सांभाळायला स्मृतीची सोबत असतेच. असं हे भावना आणि विचारांचं कॉकटेल घेऊन मानवी मेंदु आपली करामात दाखवत असतं. त्याची अनेक प्रतलं असतात. कुठली भावना विचारांच्या आश्रयाने समुद्रात बुडालेल्या एखाद्या जहाजाप्रमाणे मेंदुत कुठेतरी पडुन असेल व कधि उफाळुन वर येईल याचा नेम नाहि. विचारांच्या पृष्ठभागावर मेंदु एखादं समीकरण मांडत असेल. ते तसच खालच्या प्रतलांमधे गडप होऊन आपलं उत्तर शोधत बसेल. उत्तर सापडलं कि सरसरुन परत पृष्ठभागावर येऊन "सरप्राइझ" म्हणुन कधि बोंब ठोकेल सांगता येत नाहि. ब्रेनवेव्ह वगैरे प्रकरणं याच सदरात मोडतात. हे सगळं मनुष्यप्राणी जंगलात रहायचा तोपर्यंत ठीक होतं. निसर्गाने मानवाला पक्षांप्रमाणे पंख दिले नाहि. हत्तीची शक्ती दिली नाहि. सापाचं विष दिलं नाहि. मासोळीची पोहोण्याची क्षमता दिली नाहि. हे सर्व कंपन्सेट करायला म्हणुन कि काय, एक प्रगत मेंदु देऊन टाकला... आणि लोचा झाला ना राव. माणुस झाडामाडांच्या जंगलातुन बाहेर पडला व त्याच्या मेंदुने आपलं स्वतःचं जंगल निर्माण केलं. आता शरीर टिकवायला भावना नामक सिस्टीम जुनीच, पण प्रेरणा निर्माण करणारे घटक मात्रं वैचारीक असं नवीन नाटक सुरु झालं. जंगलात असताना वाघाची डरकाळी ऐकुन भिती नामक भावना धावायची प्रेरणा उत्पन्न करायची. आता ऑफीसात बॉस ओरडला कि हिच भिती धावायला सांगते, पण प्रॉब्लेम असा कि त्याची गरजच नसते. मग आणखी नाटकं सुरु होतात. भावनांचा कंट्रोल काय, विचारांना आवरणं काय, सुख-दु:खांवर रामबाण उपाय काय, मनाला शटडाऊन करणं काय... बरच काय काय. आपलं जगणं हि अशी मनाशी केलेल्या व्यवहारांची गाथा असते. खरं तर "मनाशी व्यवहार" वगैरे काहि भानगड नसते. कारण आपण आणि मन अशी काहि विभागणीच नसते. मनाची कवाडं आपापसात कुजबुजतात फक्त. पण मनाचा व्यवहार वगैरे म्हटलं कि कसं एकदम फिलॉसॉफीकल वाटतं :) कोळ्याने स्वतःच जाळं विणाव व आपणच त्रयस्थासारखं त्यात भटकत राहावं असं काहिसं मनाचं होतं. कल्पकता, बुद्धी, भावनांचा कल्लोळ, समीकरणं सोडवताना सतत बदलणार्‍या भुमीका, त्यातनं निर्माण होणार्‍या स्व-आयडेण्टिटी, सुख-दु:खांचे प्रसंग. मग त्यावर उपाय शोधताना इतर प्रश्न निर्माण होणं. असं सगळं मस्तपैकी चाललं असतं. त्यावर खात्रीशीर उपाय काहि सांगता येत नाहि. एक मात्रं नक्की. मनाशी व्यवहार करताना त्याला उगाच चिडवु नये. उदा. प्रसंग जर दु:खाचा असेल तर उगाच मुद्दाम त्याला कुठल्या अवडंबराखाली दाबु नये, कि नकारु नये, किंवा त्याला खोटा ठरवु नये. मनाला त्याचा स्वतःचा मार्ग काढण्याची मोकळीक दिली कि ते बरोबर आपलं आनंदनिदान शोधतच. आळस, अहंकार, भिती, नैराश्य... समस्या काहिही असली तरी शेवटी आहे तो मनाचा स्वतःचा केमीकल लोचा असतो.. त्याचा त्याला निस्तरु द्यावा. तर सांगायचा मुद्दा असा... मुद्दा वगैरे काहि नाहि. झोप येत नव्हती म्हणुन कळफलक बडवायला घेतला :) . झोपतो आता.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
30732 वाचन

💬 प्रतिसाद (128)

प्रतिक्रिया

मनाची प्रतले

गामा पैलवान
Fri, 04/07/2017 - 12:15 नवीन
अर्धवटराव,
त्यापैकी एका विशिष्ट क्षणी कुठला स्टिम्युलस एक्झिक्युट होतोय याचं निदान करणं कठिण आहे. मनाची प्रतलं इतकी खोल असतात कि त्यांचा पूर्ण ट्रेस काढता येत नाहि.
एकंदरीत मनाची प्रतले असतात हे तुम्हाला मान्य आहे तर. :-) मग अशाच एका प्रतलाआड आत्म उभा आहे. जो मनाला मनपण देतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

???

अर्धवटराव
Fri, 04/07/2017 - 12:39 नवीन
एकंदरीत मनाची प्रतले असतात हे तुम्हाला मान्य आहे तर
मनाची प्रतलं असतात हे तर मी मूळ लेखातच म्हटलय. त्यात मी नवीन काहितरी मान्य केल्याचं तुम्हाला का वाटतय ?
मग अशाच एका प्रतलाआड आत्म उभा आहे. जो मनाला मनपण देतो.
तसं म्हणा हवं तर. आत्मभाव मनात असतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

तुमच्याकडे शब्दांशिवाय काही नाही !

संजय क्षीरसागर
Fri, 04/07/2017 - 19:54 नवीन
आत्मभाव मनात असतोच एक झाला की दुसरा शब्द ! `आत्मभाव म्हणजे नक्की काय?' हे जरा तपशिलात सांगाल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

असं म्हणताय...

अर्धवटराव
Fri, 04/07/2017 - 21:17 नवीन
तुमच्याकडे शब्दांशिवाय काही नाही !
या प्लेटफॉर्मवर शब्दांशिवाय तसंही फारसं काहि देण्यासारखं नाहि. आपण इथे काय खिरापती वाटल्या सांगता का?
एक झाला की दुसरा शब्द ! `आत्मभाव म्हणजे नक्की काय?' हे जरा तपशिलात सांगाल काय ?
कितीही शब्द मांडले तरी परिणाम शुण्य होतोय त्याचं काय. असो. मनाची तशी तयारी करुनच हा लेखन प्रपंच मांडला आहे. आत्मभाव म्हणजे मनाची स्वतःला आयडेण्टीफाय करायची वृत्ती. हॅलो..... एकदम उसळु नका. प्रथम थोडा शांतपणे विचार करा. तुमचा नेक्स्ट प्रतिसाद "मी नेहेमीच शांत असतो. मला शांतपणे विचार करायची गरज नसते. स्व-गवसलेला कॉस्मीक इट्लिजन्सशी अनुसंधान साधुन उत्स्फूर्तपणे बोलतो".. अशा काहिश्या सुरुवातीने होईल ते गृहीत धरलय. शिवाय तुमचं मन दुसर्‍याला कसं काहिच कळत नाहि, आकलन होण्याची शक्यता शुण्य आहे वगैरे रिअ‍ॅक्शन द्यायला उद्युक्त होईल. त्याला थोडं इग्नोर करा. थोडा मुद्द्याचा विचार करा. मग वाटल्यास प्रतिक्रीया द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बाकीच्या प्रतिसादांना नंतर उत्तर देईन

संजय क्षीरसागर
Fri, 04/07/2017 - 21:42 नवीन
पण आता हा लफडा सोडवा ! आत्मभाव म्हणजे मनाची स्वतःला आयडेण्टीफाय करायची वृत्ती. जर तुमच्या धारणेत मनाबाहेर काही नाही तर मग मन कुणाशी आणि काय घंटा आयडेंटीफाय करणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

त्यात काय लफडा जाणवतोय तुम्हाला ?

अर्धवटराव
Sat, 04/08/2017 - 00:23 नवीन
मनात सब्जेक्ट-ऑब्जेक्ट, ऑब्झर्व्हर-ऑब्झर्व्हड, असे थेड्स चालले असतात. तद्नुसार मन भुमीका घेतं. या भुमीका वठवण्याच्या प्रोसेसला टॅगींग लागतं. या टॅगींगकरता एक मूळ स्व-टॅग मनात असतो. तिच स्वतःला आयडेण्टेफाय करायची वृत्ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अध्यात्म मुळातच कळत नव्हतं.

सुबोध खरे
Fri, 04/07/2017 - 18:51 नवीन
अध्यात्म मुळातच कळत नव्हतं. आता नैराश्य( डिप्रेशन) काय आहे या बद्दलही गोंधळ व्हायला लागला आहे. परत मुळापासूनच वाचायला घेतो.--/\--
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Fri, 04/07/2017 - 20:57 नवीन
मिपावर जास्त वेळ राहिलात तर तुम्ही डॉक्टर आहात हे सुद्धा विसराल! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आज "जागतिक आरोग्य दिन २०१७

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/07/2017 - 21:09 नवीन
आज ७ एप्रिल म्हणजे "जागतिक आरोग्य दिन २०१७ (World Health Day 2017)" आहे आणि या वर्षाचा विषय (थीम) आहे "Depression, let's talk" हा आहे... Image removed.
  • Log in or register to post comments

मन आणि आत्मा

गामा पैलवान
Sat, 04/08/2017 - 13:29 नवीन
अर्धवटराव, १.
मनाची प्रतलं असतात हे तर मी मूळ लेखातच म्हटलय
असा काही उल्लेख मला दिसला नाही. २.
तसं म्हणा हवं तर. आत्मभाव मनात असतोच.
अगदी बरोबर बोललात पहा. जागेपणी असो वा स्वप्नात आत्मभाव कधीच लोप पावंत नाही. मन मात्र घटकेत इथे तर घटकेत तिथे असं माकडासारखं उड्या मारीत असतं. म्हणूनंच पारंपरिक योगशास्त्रांत आत्मा मनाचा कारक मानला गेला आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

माझ्या मना बन दगड

पैसा
Sat, 04/08/2017 - 13:31 नवीन
माझ्या मना बन दगड
  • Log in or register to post comments

आता झाला सगळा गोंधळ उघड !

संजय क्षीरसागर
Sat, 04/08/2017 - 17:37 नवीन
१) मूळ समस्या मी-आहे किंवा मी-नाहि अशी नसुन "मी मनाला कंट्रोल करणारा कुणीतरी" अशी मनाची दुभंग अवस्था आहे. आता शांतपणे वाचा : तुमच्या मी ची कल्पनाच फोल आहे ! मी ही अनादी शांतता आहे ! ती `मनाला कंट्रोल करत नाही' तर ती मनापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून मन तिच्या काह्यात आहे. मनाचा उद्भव, चलन आणि निरसन, अथांग आणि अमर्याद शांततेच्या अंतर्गतच आहे. शांतता हाच मनाचा स्त्रोत आहे. शांततेचा आधार नसेल तर मनाचा उद्भव, चलन आणि निर्गमन असंभव आहे. ही शांतताच आपलं मूळ स्वरुप आहे. ती कायम अव्यक्त आहे आणि मन कायम व्यक्त आहे. व्यक्त अव्यक्ताला कधीही गवसणी घालू शकत नाही. त्या शांततेशी (आपली मूळातच असलेली) एकरुपता, जी जीवनाच्या कोलाहलात हरवली आहे, ती पुनश्च प्रस्थापित करणं हेच सर्व अध्यात्मिक प्रयासाचं इप्सित आहे. त्यामुळेच ग्रंथांची सांगता : ॐ शांती: शांती: शांती: अशी करण्याचा प्रघात आहे. २) मी मनाबाहेरचा कुणीतरी आहे हे एकमेव सत्य असेल तर स्वःचा विसर पडणं अशक्य आहे. तुम्हाला स्वतःचा विसर पडलेला आहे हीच गोष्ट सर्व सिद्ध करते त्यामुळे तुमच्या पुढच्या चर्वितचर्वणाला काहीही अर्थ नाही. ३) जी गोष्ट मनाबाहेरची आहे त्यावर मन प्रभाव टाकु शकत नाहि. आणि जर मन त्यावर प्रभाव टाकु शकत असेल तर ति गोष्ट मनाच्याच इको-सिस्टीमचा भाग आहे, मनाच्याच परिघातली आहे. हे एकमेव वाक्य आख्ख्या प्रतिसादात बरोबरे ! मन शांततेवर प्रभाव टाकू शकत नाही आणि शांततेतंच मनाचा खेळ चालू असला तरी ती मनापासून कधीही लिप्त होत नाही. थोडक्यात, आपण मनापासून कायम वेगळे आणि अलिप्त आहोत. पण (तुम्ही समजतायं त्याप्रमाणे) स्वतःलाच मन समजल्यामुळे शरीरात कोंडल्यासारखं वाटून फुल घुसमट चालू आहे. ४) उदा. संगीतात रस आहे, राजकारणात नाहि हे छंद लक्षण 'स्व'च्या नव्हे तर मनाच्या कक्षेत येतं. त्याला उगाच मनाबाहेर काढण्यात काहि अर्थ नाहि. असो. अर्थात ! आवड-निवड कायम मनाच्या कक्षेत आहे पण छंद पुरवणारा कायम स्वच्छंद आहे ! आता तुम्हाला स्वच समजलेला नाही तर स्वच्छंद काय कप्पाळ समजणार ? ५) मी एक मनोगत म्हणुन हि चर्चा करतोय आणि तुमच्यासाठी ति एक नॉक आऊट स्पर्धा आहे. असो. सतत मनाला कंट्रोल करायच्या वृत्तीमुळे मनोगत वगैरे तसंही शक्य नाहि. चर्चेचं फलित नसेल तर तो कालापव्यय आहे, फारतर करमणूक म्हणूया आणि नॉक-आऊटचा अर्थ फलित आहे. तर चर्चेचं फलित असं आहे : तुमची स्वची कल्पनाच वृथा आहे. कारण शांतता (म्हणजे आपलं स्वरुप) मनाला `कंट्रोल' करत नाही. शांतता सार्वभौम आहे तिला तसं करण्याची गरजच नाही. आता हेच तुम्हाला समजेल असं सांगतो : आकाशाच्या अमर्याद पोकळीत सर्व अस्तित्वाचा उदय आणि अस्त आहे. मग तो मिपाचा सदस्य असो, सूर्य असो, चंद्र असो, सर्वच्या सर्व आकाशस्थ ग्रहमालीका असोत, अवाढव्य जलधी असोत, की मुंगीच्या मेंदूत प्रकट झालेला विचार असो....आकाशाच्या बाहेर काहीही नाही कारण आकाशाला अंतच नाही ! आकाश कायम मजेत आहे, त्याला अस्तित्वाला कंट्रोल करायची गरजच नाही कारण ट्रेड टॉवर कोसळू दे की महायुद्ध होऊ दे...आकाशाला काहीही होत नाही. तद्वत शांतता सुद्धा आकाशासारखीच आहे आणि ते आपलं स्वरुप आहे. त्यामुळे मूळात ध्वनीरुप असलेलं मन कायम शांततेच्याच परिघात आहे. ती मनाला कंट्रोल वगैरे काही करत नाही पण मन कायम तिच्या अखत्यारित आहे. तुम्हाला याचा काही पत्ताच नाही त्यामुळे नको असेल तेव्हा मन शट डाऊन होणं अशक्य आहे. थोडक्यात, तुमचा बायोकंप्युटर झोपेत स्टँड-बाय आणि जागेपणी फुल्ल ऑन मोड मधे आहे. तो प्रॉपर शट डाऊन होतंच नाही. याचा आणखी एक पैलू आहे. तुम्ही मनाला घाबरलेले आहात म्हणून मनशरण झालेले आहात. मनाच्या धसक्यामुळे `मनाला कंट्रोल करणार कुणी तरी मी' ही तुमची स्वची फोल कल्पना आहे. आणि मनाचं नियंत्रण असंभव वाटल्यानं `असा कुणी मी नाहीच' या निर्णयाप्रत येऊन, होतील त्या मनोलीला बघणं एवढं एकच काम चालू आहे. कारण मनंच भीती घालतं. म्हणून तर सर्व ज्ञानी म्हणतात : "जागो ! मनके भयसे जागो !" एकदा तुमचा स्व-जागृत झाला की मन काही घंटा वाकडं करु शकत नाही.
  • Log in or register to post comments

वाचलं शांतपणे. एक नजर इधर भी...

अर्धवटराव
Sun, 04/09/2017 - 01:32 नवीन
मी ही अनादी शांतता आहे !... शांततेचा आधार नसेल तर मनाचा उद्भव, चलन आणि निर्गमन असंभव आहे.
सर्वप्रथम हे लक्षात घ्या कि ती शांतता नसुन शांती आहे. त्यात मूलभूत फरक आहे. शांतीच्या कॉण्टेक्ट्सने बघितलं 'मनाला आधार देणारी शांतता' हा कन्सेप्ट्च फोल आहे. या शांत अवस्थेत "मी" देखील नाहि. मी, मी-तू, आपण, तो (सोहं वगैरे चार महावाक्यांच्या संदर्भात) हे सर्व जिथे एक झालेत तिथे कोणि कोणाला आधार देऊ शकत नाहि. तिथे सर्व भिन्न देखील आहेत, एक देखील आहे. तिथे फक्तच शरीर आहे, तिथे फक्तच मन आहे, तिथे फक्तच जाणीव आहे, तिथे हे सर्व आहेत, तिथे यापैकी कुणीही नाहि... इट्स ऑल ट्रु. मनाने आपला स्व विश्वाकार केल्याची हि मनाचीच एक अवस्था आहे हे त्या अवस्थेततलं सत्य आहे. स्व ने मनाचं भिन्नत्व संपवुन टाकलं हे देखील त्या अवस्थेततलं सत्य आहे. तिथे सर्वच एकमेकांचे घटक आहेत, सर्वच सर्वव्यापी आहे, आणि त्यापैकी कुणीही नाहि हे सत्य देखील आहे.
छंद पुरवणारा कायम स्वच्छंद आहे !
हा 'छंदाचा' कॉण्टेक्स्ट मनाच्याच डोमेनमधे आहे. अन्यथा 'छंदा'ची शक्यताच शुण्य आहे. 'छंद पुरवणारा' अ‍ॅस सच कुणी नाहि. जे दिलं जातय ते छंद म्हणुन नाहि. किंबहुना 'दिलं जाणं' हि प्रेरणा देखील नाहि. जे आहे त्यालाच छंद, आवड-नावड, कंटाळा, सुख-दु:ख असे कॉण्टेक्स्ट लावण्याचं काम मनाचं आहे.
एकदा तुमचा स्व-जागृत झाला की मन काही घंटा वाकडं करु शकत नाही.
हाच तुमचा सर्वात मोठा गोंधळ आहे. स्व-जागृती म्हणजे मन जिंकणं नाहि. मन जिंकल्याची भावना हि देखील मनाचाच परिपाक आहे. आपल्या सुख-दु:खांना आपणच कारण आहोत हे मनाला उमगणं हे स्व-जागृतीचं लक्षण आहे. अशा परिपक्व स्व-जागृत अवस्थेत कुणी कुणाचं काहि अहित करेल हि शक्यता समूळ संपते. 'घंटा वाकडं करु शकेल' अशा चॅलेंजची तिथे आवष्यकताच नसते. जाता जाता, आणि कदाचीत सर्वात महत्वाचं... तुम्ही जे काहि टंकलय ते तुमच्या मनातले विचार आहेत, मनाबाहेरुन मनाचा वापर करत कुणी हे प्रसवलेलं नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही काय लिहीलंय ते तुम्हाला तरी कळतंय का पाहा !

संजय क्षीरसागर
Sun, 04/09/2017 - 02:26 नवीन
१) ती शांतता नसुन शांती आहे. काही घंटा फरक नाही. तुम्ही फक्त शब्दांशी खेळतायं. त्यापुढे तुम्ही काय लिहीलंय ते तुम्हालाच नीट कळल्यावर सांगा. २) 'छंद पुरवणारा' अ‍ॅस सच कुणी नाहि. हा कोणता भ्रम आहे ? गाणं जरी मनाच्या डोमेनमधे असलं तरी गायक गाण्यापेक्षा वेगळा आहे आणि तो स्वतःचा छंद पुरवतो आहे. ३) स्व-जागृती म्हणजे मन जिंकणं नाहि. तुम्हाला इतकं सविस्तर लिहून स्वच कळत नाही त्याला आता नाईलाज आहे. मन स्वच्या काह्यात आहे. तुम्ही मनाच्या भयात आहात म्हणून कंट्रोल, जिंकणं वगैरे शब्द टंकतायं. ४) मनाबाहेरुन मनाचा वापर करत कुणी हे प्रसवलेलं नाहि. तुम्हाला मनापलिकडचं जगच माहिती नाही. मनाचा वापर केल्याशिवाय संवाद, लेखन, अभिव्यक्ती अशक्य आहे हे किमान बुद्धीच्या व्यक्तीच्याही लक्षात येईल. पण मनाचा वापर करणं आणि आपण मनाच्या काह्यात असणं हा मनोरुग्ण आणि जागृत-स्व यातला फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

हाईट झाली.

अर्धवटराव
Sun, 04/09/2017 - 03:32 नवीन
तुम्ही काय लिहीलंय ते तुम्हाला तरी कळतंय का पाहा !
आपण काय टंकतोय हे कळल्याशिवाय उगाच कळफलक बडवायला कुणी घेत नाहि. हा कॉमनसेन्स आहे. तुमच्याकडुन आता ति ही अपेक्षा नाहि. तुम्हाला त्यातलं काहि कळलं नाहि तर परत विचारणे, इलॅबोरेट करण्याची विनंती करणे या सामान्य औपचारिकता आहेत. त्याचाहि अभाव आहे तुमच्या ठिकाणी. मनाची कवाडं घट्ट बंद झाल्याचा हा परिणाम आहे.
काही घंटा फरक नाही. तुम्ही फक्त शब्दांशी खेळतायं.
शुद्ध मराठीत त्याला सायलेन्स आणि पीस यातला फरक म्हणतात. तुम्हाला तो कळत नाहि हे उघड आहे. बहिरेपणालाच शांती समजणं हे देखील कोंडमारा झालेल्या मनाचं लक्षण आहे.
हा कोणता भ्रम आहे ? गाणं जरी मनाच्या डोमेनमधे असलं तरी गायक गाण्यापेक्षा वेगळा आहे आणि तो स्वतःचा छंद पुरवतो आहे.
गायक आवाज पुरवतो, गाण्याचा छंद नाहि. ते गाण आहे कि गोंगाट हा मनाचा प्रांत आहे. तुम्हाला ते नाहि कळणार.
तुम्हाला इतकं सविस्तर लिहून स्वच कळत नाही त्याला आता नाईलाज आहे. मन स्वच्या काह्यात आहे. तुम्ही मनाच्या भयात आहात म्हणून कंट्रोल, जिंकणं वगैरे शब्द टंकतायं.
तुमचं सगळं लक्ष दुसरा कोण कशाच्या कह्यात आहे याकडे आहे. कह्यात असणं हेच तुमचं मनाविषयी धोरण आहे. कंट्रोल ऐवजी हार्मोनी, सिंक्रोनायझेन वगैरे पैलु तुम्हाला अज्ञात आहेत. इट्स अ व्हेरी बीग प्रॉब्लेम.
तुम्हाला मनापलिकडचं जगच माहिती नाही. मनाचा वापर केल्याशिवाय संवाद, लेखन, अभिव्यक्ती अशक्य आहे हे किमान बुद्धीच्या व्यक्तीच्याही लक्षात येईल. पण मनाचा वापर करणं आणि आपण मनाच्या काह्यात असणं हा मनोरुग्ण आणि जागृत-स्व यातला फरक आहे.
कावलेल्या मनाचे तसेच कावलेले विचार. जाने दे मामु, तेरे बस कि बात नहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

भाषाशास्त्राचंही ज्ञानही अपुरं आहे !

संजय क्षीरसागर
Sun, 04/09/2017 - 23:50 नवीन
तुम्हाला एकदम बेसिकपासनं सुरुवात करायला लागणार आहे. आता नीट वाचा : १) शब्द हा केवळ निर्देश आहे. चंद्र हा शब्द म्हणजे खरा चंद्र नाही. पण ज्यानं कधी चंद्रच पाहिला नाही त्याला केवळ शब्द हाच आधार आहे. आणि ते अनुभव शून्यतेचं प्राथमिक लक्षण आहे. चंद्राला चंद्र म्हटलं काय की चंद्रमा म्हटलं काय, दोन्ही एकच आहे हे सामान्यातल्या सामान्याला कळू शकतं. थोडक्यात, पीस, सायलेंस, शांती, शांतता सगळ्या निर्देशांचा अर्थ एकच आहे `निर्मन अवस्था' ! पण ज्याला शांततेचा अनुभवच नाही आणि ज्याचं मन हेच सर्वस्व आहे, त्याला केवळ शब्दच्छल करण्यावाचून गत्यंतर नाही. २) बहिरेपणालाच शांती समजणं हे देखील कोंडमारा झालेल्या मनाचं लक्षण आहे. माझी भाषा वापरुन ज्ञानाचा देखावा केला की फक्त अज्ञान उघड होईल ! आणि तुम्ही आणखी गोत्यात याल. आपल्याला ऐकू येत नाही हे कळायला कळणारा `ऐकण्याच्या फॅकल्टीपेक्षा' वेगळा हवा ! पण इतकी उघड गोष्ट सुद्धा तुमच्या आकलनापलिकडे आहे. ३) गायक आवाज पुरवतो, गाण्याचा छंद नाहि. आता तुमची फारच तारांबळ होतेयं ! गायक आवाज पुरवतो म्हणजे तो गाण्यापेक्षा वेगळा आहे ! स्वतःच्या विधानानं तुम्ही स्वतःलाच डिफिट केलं आहे ! कारण गाणं आहे की गोंगाट हे जरी मन ठरवत असलं तरी तो मुद्दाच नव्हता ! ४) कह्यात असणं हेच तुमचं मनाविषयी धोरण आहे. कंट्रोल ऐवजी हार्मोनी, सिंक्रोनायझेन वगैरे पैलु तुम्हाला अज्ञात आहेत. इट्स अ व्हेरी बीग प्रॉब्लेम. आता हे शांतपणे वाचा, एकदम लख्खं प्रकाश पडेल : कंप्युटर चालवता येतो याचा अर्थ कंप्युटरचा उपयोग करता येतो. केवळ अज्ञानीच `मी कंप्युटरवर विजय मिळवला' अशी भाषा करु शकतो. तुमचा सगळा गोंधळ `मनाला कंट्रोल करणारा मी' भोवती आहे. मन ही फॅकल्टी मी बायोकंप्युटर म्हणून वापरतो कारण स्वतःला मी कंप्युटरपेक्षा वेगळा समजतो आणि त्याची कार्यप्रणाली जाणतो. तुम्ही मनाला घाबरलेले आहात त्यामुळे स्व-विस्मरण झालंय. हे कंप्युटरमधे वायरस शिरल्यासारखं आहे. कोणताही विचार कधीही आणि कसाही येतो आणि मनंच त्याला रिस्पाँन्स देतं, त्यामुळे मनावेगळा कुणी नाही अशी तुमची ठाम गैरसमजूत झाली आहे. .....आता मनाच्या मर्कटलीला केवळ बघत राहाण्यावाचून गत्यंतर नाही. ५) कावलेल्या मनाचे तसेच कावलेले विचार. जाने दे मामु, तेरे बस कि बात नहि. परत एकदा वरचा प्रतिसाद दोन-तीनदा शांतपणे, मनाच्या गोंधळातून बाहेर येऊन वाचा कदाचित मनाचा वायरस अफेक्टेड कंप्युटर किती `बसके बाहर' गेलायं ते कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

कसं कळणार...

अर्धवटराव
Mon, 04/10/2017 - 12:56 नवीन
भाषाशास्त्राचंही ज्ञानही अपुरं आहे !
सगळ्या ज्ञानाचा मक्ता तुमच्याकडे आला म्हटल्यावर इतरांकडे काहि पर्याय उरतो का ? तुम्हाला सायलेन्स आणि पीस हे दोन्हि एकच वाटत असेल तर तसंही बोलण्यासारखं काहि उरत नाहि. मुख्याध्यापकाच्या ऑफीसमधे असते ति शांतता, शाळेच्या मैदानात असते ति पीस. ऑपरेशन थिएटरमधे असते ति शांतता, नाटकाच्या थेटरात असते ति पीस. मनाल कह्यात ठेवणे व मनाला परिपक्व करणे हा तो फरक आहे. असो. तुम्हाला कळावं अशी अपेक्षा देखील नाहि.
पण ज्याला शांततेचा अनुभवच नाही आणि ज्याचं मन हेच सर्वस्व आहे, त्याला केवळ शब्दच्छल करण्यावाचून गत्यंतर नाही.
आपलं काय चुकतय हे बघण्याची ज्याची इच्छाच नाहि त्याला इतरांच्या चुका काढण्याशिवाय गत्यंतर नाहि. बेसीकली आपलं काहि चुकु शकतं हेच जिथे मान्य नाहि तिथे मनाची कवाडं खुली कशी असणार...
माझी भाषा वापरुन ज्ञानाचा देखावा केला की फक्त अज्ञान उघड होईल ! आणि तुम्ही आणखी गोत्यात याल.
स्व-आरती ओवाळायला इतकं खालच्या पातळीवर उतरणं तुम्हीच करु जाणे. तुमची भाषा ??? जाऊ दे.
आता तुमची फारच तारांबळ होतेयं !
बरं.
गायक आवाज पुरवतो म्हणजे तो गाण्यापेक्षा वेगळा आहे !
ते दोन्हि मनातले वेगवेगळे थ्रेड्स आहेत.
आता हे शांतपणे वाचा, एकदम लख्खं प्रकाश पडेल :
काळजी नसावी. कसंहि करुन अविचाराने प्रतिक्रीया द्यायला माझं मन कावलेलं नाहि.
स्वतःच्या विधानानं तुम्ही स्वतःलाच डिफिट केलं आहे ! कारण गाणं आहे की गोंगाट हे जरी मन ठरवत असलं तरी तो मुद्दाच नव्हता !
'गाणं' जर मन ठरवत असेल आणि गाणारा 'गाणं' पुरवत असेत तर ते दोन्हि एकाच परिघातले हवे. अर्थात, तुम्ही तुमच्या भुमीकेला डिफीट वगैरे केल्याचं मान्य करणार नाहिच.
कंप्युटर चालवता येतो याचा अर्थ कंप्युटरचा उपयोग करता येतो. केवळ अज्ञानीच `मी कंप्युटरवर विजय मिळवला' अशी भाषा करु शकतो.
अच्छा. म्हणजे कंप्युटरला कह्यात ठेवण्याची भाषा करणार्‍याला अज्ञानी म्हणावं काय? सॉरी सॉरी. हा शब्दच्छल झाला म्हणायचा. कुणाला कह्यात ठेवायला त्याच्यावर विजय मिळवणं आवष्यक नसतं, नाहि का. आणि हो.. विजय म्हणजे सुद्धा अगदी भारत-पाक युद्धासारखाच असायला हवा. एकानी दुसर्‍यावर कुठल्याही प्रकारे वर्चस्व मिळवण्याला विजय म्हणु नये. आणि वर्चस्वाशिवाय कह्यात ठेवणे देखील शक्य असायलाच हवं... शेवटी शब्दच्छलातुन पळवाट मिळायला तेव्हढा स्कोप तर दिलाच पाहिजे.
मन ही फॅकल्टी मी बायोकंप्युटर म्हणून वापरतो कारण स्वतःला मी कंप्युटरपेक्षा वेगळा समजतो आणि त्याची कार्यप्रणाली जाणतो.
तुमची कॉपीराईट स्टाईल वापरुन एक प्रतिसाद देतोय.. क्षमा असावी. या संपूर्ण चर्चेत (तुमच्या दृष्टीने नॉकआऊट मॅचमधे) हा एकमेव सार्थ प्रतिसाद दिलात तुम्ही. "स्वतःला मी कंप्युटरपेक्षा वेगळा समजतो." तुम्ही तसं "समजता". तशी वस्तुस्थिती नाहिए. होप आय अ‍ॅम नॉट डुइंग शब्दच्छल अगेन. बाकी ते तोंडघाशी पडणं वगैरे शब्द वापरणं आपल्याला काहि जमत नाहि बुआ. तेंव्हा ति स्टाईल नाहि वापरत मी. राहिला मुद्दा मनाच्या कार्यप्रणाली जाणण्याचा, तर ते जाणायचे दावे काहि नवीन नाहित. मनाचं थोडंफार आकलन सर्वांनाच होतं. तुम्ही मनाचं संपूर्ण आकलन झाल्याचा दावा करु शकता, शिवाय मला किंवा इतर कोणाला तसं आकलन व्हायची शक्यता शुण्य आहे वगैरे दावे सुद्धा करु शकता. तसं गृहीतच धरलय मी.
तुम्ही मनाला घाबरलेले आहात त्यामुळे स्व-विस्मरण झालंय.
बरोबर आहे. मी मनाला घाबरलो आहे. आणि तुम्ही मनाला कह्यात ठेवायला बघता... सॉरी.. कह्यात ठेवता... हे फार शुरपणाचं लक्षण आहे. लगे रहो.
हे कंप्युटरमधे वायरस शिरल्यासारखं आहे. कोणताही विचार कधीही आणि कसाही येतो आणि मनंच त्याला रिस्पाँन्स देतं, त्यामुळे मनावेगळा कुणी नाही अशी तुमची ठाम गैरसमजूत झाली आहे. .....आता मनाच्या मर्कटलीला केवळ बघत राहाण्यावाचून गत्यंतर नाही.
गुड. म्हणजे काँप्युटरचा वापर करणार्‍या व्यतिरीक्त व्हायरस घुसवणारा आणखी कुणीतरी आला म्हणायचा. कि कॉम्प्युटरने स्वतःच तो घुसवला? पण कॉम्प्युटर तर कुणी वापरकर्त्याशिवाय काहि करु शकत नाहि ना ? कि करु शकतो ? म्हणजे कॉम्प्युटरला त्याच्या वापरकर्त्याशिवाय स्वतःची मर्जी असते? म्हणजे तो पॅसीव्ह ऑब्जेक्ट नाहि? याचा अर्थ कॉम्प्युटर स्वतःच वापरकर्ता देखील आहे? नाहि नाहि.. ते तर शक्य नाहि. मग निश्चीतच वापरकर्त्याने घुसवला व्हायरस. पण वापरकर्त्याने असं का केलं? अनावधानाने? म्हणजे वापरकर्ता "पूर्ण" नाहि ? त्याच्यात अभाव आहेत? तो स्वतःच स्वतःला फसवु शकतो? म्हणजे स्वतः वापरकर्तादेखील व्हायरस अफेक्ट होऊ शकतो? पण व्हायरस अफेक्ट होण्याची शक्यता तर केवळ काँप्युटरमधे आहे. म्हणजे वापरकर्तादेखील कॉम्प्युटरच आहे? या दोन प्रश्नांचा निकाल कसा लागायचा? वापरकर्ता स्व्तःच कॉम्प्युटर आहे - कि कॉम्प्युटर स्वतःच वापरकर्ता आहे? कि हा देखील केवळ शब्दच्छल आहे? दोन-तीनदा शांतपणे वाचल्यावर कळण्याची शक्यता आहे का? नको नको. शब्दच्छल म्हणुन मोकळं होऊ या. झालं काय कि व्हायरस तर शिरला आहेच. कॉम्युटरमधे युटीलिटीचे प्रोग्राम आणि कुणा बाह्य एण्टीटीमधे युटीलाझरचे प्रोग्राम असे भिन्न कॉम्प्युटरचे भास निर्माण केलेत त्याने. हे युटीलिटी आणि युटीलाझर प्रॉग्राम एकाच छताखाली चालतात हे विस्मरण घडवलय त्याने. बीग प्रॉब्मेल. बाय द वे... युटीलाझरचे सुद्धा प्रोग्रामच असतात याचं तरी भान आहे का? कि हा देखील केवळ शब्दच्छल होतोय ?
परत एकदा वरचा प्रतिसाद दोन-तीनदा शांतपणे, मनाच्या गोंधळातून बाहेर येऊन वाचा कदाचित मनाचा वायरस अफेक्टेड कंप्युटर किती `बसके बाहर' गेलायं ते कळेल.
तुमचे प्रतिसाद शांतपणे वाचतोच मी... अगदी दोन-तीनदा देखील वाचतो. पण तुम्ही मात्र माझ्या प्रतिसादांना एकतर तुमचे कॉपीकॅट तरी म्हणाता किंवा गोंधळ वगैरे तरी. प्रतिसाद देण्याची घाई न करता तुम्ही आमचे प्रतिसाद शांतपणे कधि वाचणार ? ओके. तुम्ही नेहेमी शांतच असता, तुम्हाला एका झटक्यात सर्व आकलन वगैरे होतं हे विसरलो होतो. सॉरी. जाता जाता, आणि तेच.. सर्वात महत्वाचं.. तुम्ही जे काहि वर टंकलय ते तुमच्या "मनातले विचार" आहेत... कुणी बाहेरुन "वापर करुन" मनात इंड्युस केलेले नाहित हे लक्षात घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

प्रतिसाद पुन्हा मनाचं शून्य आकलन दर्शवतो !

संजय क्षीरसागर
Mon, 04/10/2017 - 15:52 नवीन
१) मुख्याध्यापकाच्या ऑफीसमधे असते ति शांतता, शाळेच्या मैदानात असते ति पीस. ऑपरेशन थिएटरमधे असते ति शांतता, नाटकाच्या थेटरात असते ति पीस. मनाल कह्यात ठेवणे व मनाला परिपक्व करणे हा तो फरक आहे. आता तरी नीट वाचा : शांतता एकच आणि अविभाज्य आहे. तुमचं मन कशाचीही आणि कशीही विभागणी करुन त्याला काहीही नांवं देत सुटलंय ! २) 'गाणं' जर मन ठरवत असेल आणि गाणारा 'गाणं' पुरवत असेत तर ते दोन्हि एकाच परिघातले हवे. पुन्हा तीच चूक ! गाणं मनानं सुचवलं असेल तरी गाणं म्हणणारा गाण्यापेक्षा कायम वेगळा आहे. स्वतःच्या उजव्या हातानं तुम्ही तोच हात पकडायचा निष्फळ प्रयत्न करतायं. ३) वर्चस्वाशिवाय कह्यात ठेवणे देखील शक्य असायलाच हवं. तुमचा फंडाच गंडलायं ! आपण ठरवू तेव्हा पायानं चालतो याचा अर्थ पायांवर विजय मिळवला असं होत नाही. तरीही पाय आपल्या काह्यात आहेत म्हणजे ते आपल्या मर्जीशिवाय चालू शकत नाहीत. तुमचं मन हेच सर्वस्व आहे त्यामुळे ते संभ्रमित पायांसारखं झालंय. तुमची मर्जी असो वा नसो ते केव्हाही आणि कसंही चालू होतं आणि परिस्थितीला स्वतःला हवा तसा प्रतिसाद देतं. यालाच मन काह्यात नसणं म्हणतात. ४) "स्वतःला मी कंप्युटरपेक्षा वेगळा समजतो." तुम्ही तसं "समजता". तशी वस्तुस्थिती नाहिए. ज्याप्रमाणे कार चालवायला चालक कारपेक्षा वेगळा हवा त्याप्रमाणे स्वतःच्या मर्जीनं मनाचा वापर करायला आपण मनापेक्षा वेगळे हवे. इतकी उघड वस्तुस्थिती तुम्हाला कळू नये हे आश्चर्य आहे. ५) काँप्युटरचा वापर करणार्‍या व्यतिरीक्त व्हायरस घुसवणारा आणखी कुणीतरी आला म्हणायचा. आयला, अनाकलानाची हद्द झाली ! शरीराला रोग झाला म्हणजे आपण त्यात वायरस घुसवला का ? तुमची परिस्थिती `आपणच वायरस' आणि `आपणच वायरस होऊन मनात घुसतो' आणि वर `मनालाच त्याचा लफडा निस्तरु दे' म्हणतो.... अशी झाली आहे. तुमचा मनाचा कंप्युटर सॉलीड गंडलायं, बाकी काही नाही. ६) सर्वात महत्वाचं.. तुम्ही जे काहि वर टंकलय ते तुमच्या "मनातले विचार" आहेत... कुणी बाहेरुन "वापर करुन" मनात इंड्युस केलेले नाहित हे लक्षात घ्या. हे `सर्वात महत्त्वाचं' तर पुन्हा हाईट आहे ! आहो, भाषा मनाच्या परिघातच आहे, मी स्वतःचं आकलन मनाचा वापर करुन व्यक्तं करतोयं ! `मामू ये तेरे बस की बात नही' वगैरे तुम्ही मागच्या प्रतिसादात म्हटलं होतं. पण वास्तविकात, सर्कीट, तुम तो पूरेही मनमें उलझ गये हो ! खुदकी पोस्टनेही तुम्हारी वाट लगा दी है |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अच्छा.

अर्धवटराव
Tue, 04/11/2017 - 09:44 नवीन
प्रतिसाद पुन्हा मनाचं शून्य आकलन दर्शवतो !
नो कमेण्ट्स. मनाला विचार आणि भावनांचा गुंता समजणार्‍याकडुन आणखी काय अपेक्षा करणार.
तुमचं मन कशाचीही आणि कशीही विभागणी करुन त्याला काहीही नांवं देत सुटलंय !
वॉव. सायलेन्स आणि पीस हे कशालाही काहिही नाव देणं झालं काय? छान. तुमच्या बाबतीत काहिही शक्य आहे म्हणा.
पुन्हा तीच चूक ! गाणं मनानं सुचवलं असेल तरी गाणं म्हणणारा गाण्यापेक्षा कायम वेगळा आहे.
गाणं म्हणणार्‍याला आपण 'गाणं' म्हणतोय हे कळत असेल, व तेच गाणं मनाने सुचवलं असेल तर "गाणं" हा कन्सेप्ट मन आणि गाणारा, या दोघांनाही कळायला हवा. त्या करता ते सर्व भरताड एकाच मांडवखाली नांदायला हवेत. नाहि कळणार. सोडुन द्या. सॉरी.. तुम्ही तसंही सोडुनच देताय म्हणा.
तुमचा फंडाच गंडलायं ! आपण ठरवू तेव्हा पायानं चालतो याचा अर्थ पायांवर विजय मिळवला असं होत नाही. तरीही पाय आपल्या काह्यात आहेत म्हणजे ते आपल्या मर्जीशिवाय चालू शकत नाहीत.
ते आपण म्हणजे मन आहोत. पायांना चालवायची मर्जी मनाव्यतीरीक्त कुणाला होणं संभवत नाहि. इतर कुणाला तशी मर्जी व्हायची संभावनाच नाहि. असो.
ज्याप्रमाणे कार चालवायला चालक कारपेक्षा वेगळा हवा त्याप्रमाणे स्वतःच्या मर्जीनं मनाचा वापर करायला आपण मनापेक्षा वेगळे हवे. इतकी उघड वस्तुस्थिती तुम्हाला कळू नये हे आश्चर्य आहे.
कार चालवणारा कार चालवुन झाल्यावर ति बंद करतो, गॅरेजमधे पार्क करतो, आणि स्वतः कार सोडुन बेडरूममधे जाऊन झोपतो, हॉटेलरूममधे जेवतो. प्रवासाव्यतिरीक्त त्याला कारची काहिच गरज नसते. कार बाहेर कारचालक खपला तरी कार कायम राहाते. कारचालक बाहेर असताना कार खपली तरी कारचालक कायम राहातो. तुमची कार आणि कारचालक, असे दोघेही इंडीपेण्डट, स्वयंभू, संपूर्ण वेगळी लाइफसायकल जगणारे आहेत काय ? नसल्यास ते एकाच संस्थेचे घटक आहेत हि उघड बाब तुम्हाला कळणार आहे का? चान्सेस कमि आहेत. ज्याला तुम्ही कार आणि कारचालक म्हणताय ते दोन्हि एकाच मनाचे थ्रेड्स आहेत. असो.
आयला, अनाकलानाची हद्द झाली ! शरीराला रोग झाला म्हणजे आपण त्यात वायरस घुसवला का ? तुमची परिस्थिती `आपणच वायरस' आणि `आपणच वायरस होऊन मनात घुसतो' आणि वर `मनालाच त्याचा लफडा निस्तरु दे' म्हणतो.... अशी झाली आहे. तुमचा मनाचा कंप्युटर सॉलीड गंडलायं, बाकी काही नाही.
व्हायरस घुसायच्या काय काय शक्यता आहेत याचे काहि आराखडे अगोदरच मांडले आहेत. त्याव्यतिरीक्त तुम्ही काहि उपपत्ती मांडु शकता का? आणि त्याअनुषंगाने कॉम्प्युटर, व्हायरस आणि ऑपरेटर यांच्या भुमीका विषद करु शकता का? अपेक्षा तिच होती. पण चुका काढण्याच्या नादात मुद्द्याला सॉलीड बगल दिलीत. असो. ते हि तुम्ही स्वभावाला अनुसरुनच केलं म्हणा.
हे `सर्वात महत्त्वाचं' तर पुन्हा हाईट आहे ! आहो, भाषा मनाच्या परिघातच आहे, मी स्वतःचं आकलन मनाचा वापर करुन व्यक्तं करतोयं !
पण एकाद्या गोष्टीचं आकलन, त्याबद्दलचे विचार हे मनात उत्पन्न होतात ना ? कि आकलन, विचार, लॉजीक, उपपत्ती, हे सर्व देखील मनाबाहेर होतं ? तुम्ही अज्जीब्बात स्वतःच्या विधानांना काँट्रॅडीक्ट करत नाहि.. आधिच कबुल केलेलें बरं.. नाहितर परत तुम्हाला स्व-आरतीत वेळ वाया घालवावा लागायचा.
`मामू ये तेरे बस की बात नही' वगैरे तुम्ही मागच्या प्रतिसादात म्हटलं होतं. पण वास्तविकात, सर्कीट, तुम तो पूरेही मनमें उलझ गये हो ! खुदकी पोस्टनेही तुम्हारी वाट लगा दी है |
सतत जजमेण्टल बनायची मनाची हौस. बाकि काहि नाहि. जाने दे रे मामु.. तेरे बस कि बात नहि ये. सर्वात महत्वाचं, परत तेच, हे जे काहि आकलन वगैरे तुम्ही मांडताय ते मनातुन प्रकटलय. मनाचा वापर करुन वगैरे नाहि. जाऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

एनी वे, माझ्याबाजूनं चर्चा संपन्न करतो

संजय क्षीरसागर
Tue, 04/11/2017 - 13:32 नवीन
प्रत्त्युत्तरासाठी मनाच्या बाहेर ! हा लेखच लिहीला आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

ओके.

अर्धवटराव
Tue, 04/11/2017 - 13:57 नवीन
इट वॉज नाईस टॉकींग टु यु. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

एनी वे, माझ्याबाजूनं चर्चा संपन्न करतो

संजय क्षीरसागर
Tue, 04/11/2017 - 13:34 नवीन
प्रत्त्युत्तरासाठी मनाच्या बाहेर ! हा लेखच लिहीला आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

'जागना' मतलब 'अंदर' की तरफ

संदीप डांगे
Sun, 04/09/2017 - 02:34 नवीन
'जागना' मतलब 'अंदर' की तरफ भागना!
  • Log in or register to post comments

नो !

संजय क्षीरसागर
Sun, 04/09/2017 - 23:52 नवीन
'जागना' मतलब मनकी तंद्रासे जागना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

सो नाऊ इट्स क्रिस्टल क्लिअर:

संदीप डांगे
Mon, 04/10/2017 - 12:48 नवीन
सो नाऊ इट्स क्रिस्टल क्लिअर: तुम्हाला काय ढेकळं कळत नाही अध्यात्मातले, आवरा आता 'मी'पणाचे गाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अर्धवटरावांना सॅल्यूट!!

पुंबा
Mon, 04/10/2017 - 18:48 नवीन
अर्धवटरावांना सॅल्यूट!!
  • Log in or register to post comments

आज वाचला लेख ! रोचक असेच

मितान
Wed, 04/12/2017 - 23:59 नवीन
आज वाचला लेख ! रोचक असेच म्हणेन. अनेक मुद्दे पटले. त्यावर कधीतरी तुमच्याशी बोलेन. सध्या धाग्यावरचे काही प्रतिसाद वाचून पुन्हा वैचारिक स्वमग्नता हा शब्द सुचला.
  • Log in or register to post comments

अवश्य !!

अर्धवटराव
गुरुवार, 04/13/2017 - 00:33 नवीन
आपल्या मनातले चार शब्द मांडावे, दुसर्‍याचे मनातले विचार ऐकावे, मनोगतं व्यक्त व्हावी, हेच लेखाचं प्रयोजन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा