✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट
ट्रेड मार्क यांनी
Tue, 11/08/2016 - 21:38  ·  लेख
लेख
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/ कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत

प्रतिक्रिया द्या
307030 वाचन

💬 प्रतिसाद (1112)

प्रतिक्रिया

आपला एक तर्क..

चौकटराजा
Fri, 11/11/2016 - 13:10 नवीन
नवी २००० ची नोट पाहिली व तिची गुणवत्ता ही पाहिली. ती व्यापार डावातील खोट्या नोटेसाठी वाटते आहे. अर्थतज्ञ मुणगेकर याना प्रश्न पडलेला आहे की काळा पैसा साठविण्यासाठी अधिक सोयिस्कर २००० ची नोट का छापली ? त्याचे समाधानकारक उत्तर भाजपाचे प्रवक्ते देउ शकले नाही. ते मुणगेकरानी त्यांच्याकडे तरी का मागावे. कॉग्रेस सारखी भंपक लोकशाही मोदीना नको आहे. काही फायदे अनेकांचा सल्ला न घेतल्यानेच होतात. सर्जिकल स्ट्राईक व आताचा हा बॉम्ब्गोळा यात गुप्ततेची जोड मिळाली आहे. तरीही अनेक शक्यता बाजूला राहिलेल्या आहेत त्यातील रेल्वेचे प्रथम वर्गाचे तिकिट रद्द करून काळ्याचा पांढरा करण्याची युक्ती पुढे आली. याचाच अर्थ आर बी आय पेक्षाही जिनियस माणसे या देशात आहेत .मी तर मोदीना एनकाउन्टर स्पेशालिस्ट अशी मानाची पदवी देईन. लगोलग सरकारने या संबंधातील जनहित याचिकेवर दाखल होउ पहाणार्या सुनावणीवर कॅव्हेट दाखल केले आहे. आता मी जर मोदी असतो तर तीन हजाराची नोट काढली असती. ती जी फारसा मुद्रण खर्च न येणारी. पिंजर्यात ज्याप्रमाणे उंदीर यावा म्हणून भजी लावून ठेवतात तशी ही नोट वापरली असती. अशीच दोनेक वर्षानंतर एक संध्याकाळ निवडून ही ३००० ची नोट इतिहास जमा केली असती. पण पुस्तकी अर्थशास्त्र शिकलेल्या मुणगेकाराना ही शक्यता कशी सुचावी ? आर बी आय चा गव्हर्नर हा देशातील सर्वात उत्तम अर्थशास्त्री असेलच असे नाही असे विधान कालच एका ने टीव्हीवर केले होते.

त्यातील रेल्वेचे प्रथम

सुबोध खरे
Fri, 11/11/2016 - 19:39 नवीन
त्यातील रेल्वेचे प्रथम वर्गाचे तिकिट रद्द करून काळ्याचा पांढरा करण्याची युक्ती पुढे आली. याचाच अर्थ आर बी आय पेक्षाही जिनियस माणसे या देशात आहेत जिनियस माणसांचा एक प्रश्न असतो त्यांना वाटतं कि आपल्या पेक्षा हुशार कोणीच नाही. सरकार मध्ये असणारी माणसं भ्रष्ट असतील पण ती ढ किंवा बावळट नसतात. आता रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे सरकार रोखीने देणार नाही तर चेकने मिळतील म्हणजेच या जिनियस माणसांच्या उत्पन्नात भर घालतील की त्यावर त्यांना कर भरावा लागेल. मग बेनामी माणसांच्या नावावर विकत घेतलेली तिकिटे रद्द कशी करणार? http://www.newindianexpress.com/business/2016/nov/10/no-cash-refunds-for-cancelled-tickets-above-rs-10000-1537114.html
↩ प्रतिसाद: चौकटराजा

सरकार मध्ये असणारी माणसं

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 21:38 नवीन
सरकार मध्ये असणारी माणसं भ्रष्ट असतील पण ती ढ किंवा बावळट नसतात. +१०० :) किंबहुना, भ्रष्टाचार करून तो गुप्त ठेवायला सर्वसामान्यापेक्षा जास्त हुशारी लागते... मात्र ती हुशारी चुकीच्या दिशेने वापरली जाते, इतकेच. उदा : उत्तम संगणकीय प्रणाली बनवणार्‍या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या तरबेज प्रोग्रॅमर्सवर वरताण करून हॅकर्स त्या छेदतात. हा एक प्रकारचा दरोडाच असतो... आणि त्यांनी तसे करू नये यासाठी कंपन्या तरबेज (नीतिमान किंवा एथिकल) हॅकर्सची मदत घेतात.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

काळा पैसा साठविण्यासाठी अधिक

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 11/11/2016 - 23:50 नवीन
काळा पैसा साठविण्यासाठी अधिक सोयिस्कर २००० ची नोट का छापली ? माझ्या मते याची दोन मुख्य कारणे असावित : १. लॉजिस्टिकल काँप्रोमाईज : ५०० व १००० च्या नोटांच्या बदल्यात काही प्रमाणात तरी २००० च्या नोटा दिल्याने एकंदर नव्या नोटांची संख्या कमी ठेवता येईल. अर्थातच त्यांची छपाई, वाहतूक व गुप्तता ठेवणे तेवढेच सोपे होईल. असे होणे या सर्जिकल स्ट्राईकसाठी कळीचा मुद्दा होता. २. खोट्या नोटा छापणार्‍या आयएसआयवर सर्जिकल स्ट्राईक : (अ) जुन्या नोटा चलनातून गेल्यामुळे छापलेल्या अनेक दश/लाख कोटीच्या नोटा नाकामी झाल्या आहेत. शिवाय (आ) अगोदर चलनात नसणार्‍या रकमेच्या, वेगळा कागद* वापरलेल्या, वेगळ्या आकाराच्या नोटांमुळे आयएसआयची आताची नोटा छापणारी सर्व यंत्रणा नाकाम झाली आहे आणि बराच काळ तशीच राहणार आहे. * : काही बातम्यात वाचले की पाकिस्तानला नोटांचा कागद पुरविणार्‍या कंपनीकडूनच भारत आपल्या नोटांचा कागद विकत घेत होता. हे खरे असले तर ते संशयास्पदरित्या आश्चर्यकारक आहे !
↩ प्रतिसाद: चौकटराजा

पाकिस्तान त्याच्या वार्षिक

एस
Sat, 11/12/2016 - 07:12 नवीन
पाकिस्तान त्याच्या वार्षिक गरजेच्या तिप्पट कागद दरवर्षी विकत घेतो. तेव्हा उरलेला कागद कुठे जातो यात आश्चर्य करण्यासारखं काही नाही. उलट भारताने परदेशी कंपन्यांकडून कागद घेणे बंद केले पाहिजे. (हळूहळू यातही स्वदेशी कागद वापरण्यास सुरुवात झाली आहे ही स्वागतार्ह बाब आहे.)
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

काही बातम्यात वाचले की

मार्मिक गोडसे
Sat, 11/12/2016 - 11:49 नवीन
काही बातम्यात वाचले की पाकिस्तानला नोटांचा कागद पुरविणार्‍या कंपनीकडूनच भारत आपल्या नोटांचा कागद विकत घेत होता. हे खरे असले तर ते संशयास्पदरित्या आश्चर्यकारक आहे !
हे जर खरे असेल तर बनावट नोटा व खर्‍या नोटांच्या कागदाच्या जाडीत फरक पडायला नको. वर एका प्रतिसादात पैसाताई म्हणतात, "५०० आणि हजारच्या नोटा जेव्हा खोट्या सापडतात तेव्हा बहुतेक वेळा त्यांचा कागद नेहमीपेक्षा हाताला जाड लागतो. आम्ही बँकातले लोक नोट मशीनमधे न टाकता मोजता मोजता केवळ कागदाच्या स्पर्शावरून खोटी नोट ओळखू शकतो". ह्याचा अर्थ बनावट नोटा दुसरंच कोणी छापतं का?
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

फक्त पाकिस्तान नाही

पैसा
Sat, 11/12/2016 - 14:00 नवीन
बरेच लोक हे उद्योग करतात. कागद तसाच जाड समजा असला तरी प्रींटिंगमधे काही फीचर्स असतात त्यामुळे खोट्या नोटेचा स्पर्श हाताला लगेच कळतो. आताची काउंटिंग मशीन्स खोट्या नोटा ओळखतात, पण पूर्वी नोटेच्या आकाराचा कागद टाकला तरी मट्ठ मशीन तो मोजत असे. दुसरा एक मुद्दा आहे. दिवसभरात प्रचंड कॅश हातातून जाते त्यामुळे जेव्हा कोणी सुट्या नोटा घेऊन येतो त्याच मोजायची वेळ येते. बंडल असेल तर ते फक्त एक ते शंभर मोजून तसेच लोकाना पेमेंटला वापरायचा कल असतो. कारण प्रत्येक नोट डिटेक्टरखाली टाकून बघणे प्रॅक्टिकली शक्य नसते. कस्टमरकडून आलेल्या अशा बंडलातून काही खोट्या नोटा सर्क्युलेट होऊ शकतात. याला काही इलाज नाही.
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

आज वाचलेल्या बातमीप्रमाणे

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 11/12/2016 - 18:26 नवीन
आज वाचलेल्या बातमीप्रमाणे नवीन रु२००० च्या नोटांसाठी मैसुरु टांकसाळीच्या आवारात असलेल्या कारखान्यात बनवलेला कागद वापरलेला आहे. आता हा कागद आयएसआयला मिळवता येणार नसल्याने खोट्या नोटा छापण्यात अजून एक अडथळा निर्माण केला गेला आहे.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अर्थतज्ञ मुणगेकर याना प्रश्न

श्रीगुरुजी
Fri, 11/11/2016 - 13:52 नवीन
अर्थतज्ञ मुणगेकर याना प्रश्न पडलेला आहे की काळा पैसा साठविण्यासाठी अधिक सोयिस्कर २००० ची नोट का छापली ?
आता मी जर मोदी असतो तर तीन हजाराची नोट काढली असती. ती जी फारसा मुद्रण खर्च न येणारी. पिंजर्यात ज्याप्रमाणे उंदीर यावा म्हणून भजी लावून ठेवतात तशी ही नोट वापरली असती. अशीच दोनेक वर्षानंतर एक संध्याकाळ निवडून ही ३००० ची नोट इतिहास जमा केली असती. पण पुस्तकी अर्थशास्त्र शिकलेल्या मुणगेकाराना ही शक्यता कशी सुचावी ?
काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि गांधी घराण्याची भक्ती सुरू केली की भल्याभल्या अर्थतज्ज्ञांच्या बुद्धीला गंज चढतो. युपीए सरकारमधील हॉर्वड मधून पदव्या प्राप्त केलेले अनेक अर्थतज्ज्ञ याची साक्ष देतील. त्यांच्यापुढे मुणगेकर म्हणजे किस झाड की पत्ती.

पुन्हा एकदा नव्याने १००० ची व

श्रीगुरुजी
Fri, 11/11/2016 - 13:56 नवीन
पुन्हा एकदा नव्याने १००० ची व २००० ची नोट काढली की कालांतराने या नोटांचा उपयोग काळे उत्पन्न रोखीत साठविण्यासाठी होईल हे जर सामान्य व्यक्तीला कळू शकते तर ते जेटली व मोदींना समजत नसेल असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. माझ्या मते १००० व २००० च्या नवीन नोटा हा एक सापळा आहे. १-२ वर्षांनी या नोटा अशाच अचानक रद्द करण्याचा निर्णय घेऊन मोदी पुन्हा एकदा नव्याने स्ट्राईक करतील असा माझा अंदाज आहे.

आधीच्या सरकारांच्या वेळी

सतिश गावडे
Fri, 11/11/2016 - 16:38 नवीन
आधीच्या सरकारांच्या वेळी जनतेला अंदाज व्यक्त करण्याची सोय नव्हती. :)
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

माझ्या मते १००० व २००० च्या

मार्मिक गोडसे
Fri, 11/11/2016 - 14:36 नवीन
माझ्या मते १००० व २००० च्या नवीन नोटा हा एक सापळा आहे.
आणि हा सापळा न कळण्याइतके काळा पैसा बाळगणारे मुर्ख आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे का? सरकारने गुप्तता न पाळता पुर्वसूचना देउन ह्या नोटा चलनातून बाद केल्या असत्या तर काय फरक पडला असता?

मूर्ख दोघेही नाहीत. हा

श्रीगुरुजी
Fri, 11/11/2016 - 14:50 नवीन
मूर्ख दोघेही नाहीत. हा बुद्धीबळाचा खेळ आहे. सरकार एक चाल करते, त्याला प्रत्त्युत्तर म्हणून काळाबाजारवाले दुसरी खेळी करतात. सरकारने कितीही नाड्या आवळल्या तरी काळा पैसा निर्माण होणे संपूर्णपणे थांबणे अशक्य आहे, तसेच आता अस्तित्वात असलेला १००% काळा पैसा बाहेर काढणे अशक्य आहे. तसेच काळा पैसेवाल्यांनी पैसा लपविण्याचे कितीही वेगवेगळे मार्ग शोधले तरी ते १००% मार्ग लपवून काळा पैसा वापरणे अशक्य आहे. त्यातला काही पैसा तरी सापडणारच. भारतासारख्या देशात सर्व काळे उत्पन्न जमीन, सोने इ. मध्ये सर्वकाळ ठेवणे शक्य नसते. निवडणुका, परदेशवार्‍या, लाच देणे इ. साठी रोख रक्कमेची गरज वेळोवेळी लागतेच. त्यामुळे काळ्या पैशाचा काही भाग हा नोटांच्या स्वरूपात ठेवला जाईलच. अशा वेळी काळे उत्पन्न वाल्यांना काळा पैसा ५०/१०० च्या नोटात ठेवण्यापेक्षा १०००/२००० च्या नोटात ठेवणे जास्त सुटसुटीत ठरेल. सरकारने गुप्तता न पाळता पूर्वसूचना देऊन या नोटा चलनातून बाद केल्या असत्या तर काळा पैसावाल्यांनी तातडीने या नोटा ५०/१०० मध्ये बदलून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला असता. त्यातून या नोटांची चणचण निर्माण झाली असती व बाजारातून ५०/१०० च्या नोटा गायब झाल्याने सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला असता. काही वर्षांपूर्वी सुट्या नाण्यांची चणचण निर्माण होऊन सुट्या नाण्यांचा काळाबाजार सुरू झाला होता. ५०/१०० च्या नोटांचा असाच काळाबाजार सुरू झाला असता व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असते.
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

सरकारने गुप्तता न पाळता

मार्मिक गोडसे
Fri, 11/11/2016 - 17:23 नवीन
सरकारने गुप्तता न पाळता पूर्वसूचना देऊन या नोटा चलनातून बाद केल्या असत्या तर काळा पैसावाल्यांनी तातडीने या नोटा ५०/१०० मध्ये बदलून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला असता.
इतकी मोठी रक्कम बाजारातून काढून घेणे अशक्य आहे, आणि सांभाळणे हे त्याहूनही अवघड. अडीअडचणीला सोनेच कामाला येते. अती गुप्ततेच्या मागे लागून सरकारने सोने खरेदीचा पर्याय खुला ठेवल्यामुळे सरकारच्या प्रामाणिक हेतूची शंका येते किंवा अतिउत्साहात निर्णय घेतला गेला असावा असे वाटते.
५०/१०० च्या नोटांचा असाच काळाबाजार सुरू झाला असता व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असते.
मग आता काय वेगळी स्थिती आहे?
काही वर्षांपूर्वी सुट्या नाण्यांची चणचण निर्माण होऊन सुट्या नाण्यांचा काळाबाजार सुरू झाला होता
त्याचे कारण वेगळे होते. ते 'धूर्त' व्यापार्‍यांचे षडयंत्र होते.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पूर्वसूचना देवून पूर्वी दोनदा

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 21:40 नवीन
पूर्वसूचना देवून पूर्वी दोनदा असे केले गेले आहे आणि त्यामुळे काय फरक पडला हे नजरेसमोर आहे. कल्पना करायची गरज नाही ;) :)
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

पूर्वसूचना देवून पूर्वी दोनदा

मार्मिक गोडसे
Sun, 11/13/2016 - 21:50 नवीन
पूर्वसूचना देवून पूर्वी दोनदा असे केले गेले आहे आणि त्यामुळे काय फरक पडला हे नजरेसमोर आहे.
नेमके काय केले होते तेव्हा काळापैसाधारकांनी? मला माहीत नाही म्हणून विचारतोय.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

नेमके काय केले होते तेव्हा

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 23:04 नवीन
नेमके काय केले होते तेव्हा काळापैसाधारकांनी? मला माहीत नाही म्हणून विचारतोय. चोराला फोन करून सांगितले की "पंधरा दिवसांनी धाड घालणार आहे", तर चोर चोरीच्या मालाचे काय करेल ? तेच ! काळा पैसा जमवणारे हे न करण्याइतके निर्बुद्ध असतील असा समज असला तर मग काय बोलणार ! :)
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

काळा पैसा जमवणारे हे न

मार्मिक गोडसे
Fri, 11/18/2016 - 21:16 नवीन
काळा पैसा जमवणारे हे न करण्याइतके निर्बुद्ध असतील असा समज असला तर मग काय बोलणार ! :)
हेच मी विचारतोय, की त्यावेळी काळा पैसेवाल्यांनी नेमके काय केले होते ?
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

दूरदर्शनवरील आणि येथील

जयंत कुलकर्णी
Fri, 11/11/2016 - 14:50 नवीन
दूरदर्शनवरील आणि येथील अनेकांची मते वाचून मला खालील गोष्टी कळल्या. १ जेवढा पांढरा पैसा आहे जवळजवळ तेवढाच काळा पैसा आपल्या अर्थव्यवस्थेत आहे. २ जर हा निम्मा पैसा काढून घेतल्यावरसुद्धा काही विशेष फरक पडणार नसेल तर काळा पैसा तेवढा नसावा किंवा त्यातील बराचसा परदेशी असावा. ३ काही जणांचे म्हणणे आहे की एकंदरीत सगळ्या काळ्यापैशाच्या फक्त १५ % पर्यंत काळापैसा भारतात आहे. उरलेला परदेशी आहे. ४ परदेशी असलेला पैसा दुसर्‍या चलनात असल्यामुळे त्याला आपले सरकार हातही लावू शकत नाही. ५ कलकत्यातील स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युटच्या म्हणण्यानुसार भारतीय अर्थव्यवस्थेत फक्त ४०० कोटी रुपयेच बनावट चलनाच्या स्वरुपात अहेत. ६ या सगळ्याचा विचार केल्यास हा सगळा उद्योग आतबट्याचा ठरेल की काय अशी रास्त भिती वाटणे चुकीचे आहे का ?. ७ हा काळा पैसा काही गेल्या दोन वर्षात तयार झालेला नाही. यातील जो पैसा जमिनीच्या व्यवहारात मुरलेला आहे तो सरकार सहजच खणून काढू शकते. बाहेरचा पैसा हे सरकार आणू शकेल यावरचा आता जनतेचा विश्र्वास उडालेला आहे असे मला वाटते. ८ काळ पैसा तयार होण्याचे मार्ग व ते तयार करणारे मोकाटच फिरणार असल्यामुळे तो परत तयार होणार याची लोकांना खात्री वाटत आहे. नाहीतर आज हजारो बाबू, पोलिस, राजकारणी, त्यांचे चेले, जमिनीचे मालक, उद्योगपती तुरुंगाआड असायला हवे होते. ९ उत्तरप्रदेश व बिहार येथील जनतेचे निवडणूकीत हक्काचे उत्पन्न बुडाल्यामुळे हे तेथे भाजपच्या विरुद्ध बुमरँग होईल अशी भिती, मला वाटते, खुद्द भाजपातील पुढार्‍यांना वाटत असावी. १०) ५०० व १००० रुपयांच्या नोटा आज खरोखरीच उच्चमुल्याचे चलन आहे का ? ७८ साली जी किंमत ५० च्या नोटेची होती ती आता ५०० रु. नोटेची आहे. तर १०० रुपायाच्या नोटेची किंमत १००० र. नोटेची आहे. कदाचित जास्तच असेल पण कमी नाही. ११ माझ्या असे लक्षात येते आहे की भारतीय जनतेकडे वेळेला उपयोगी पडावा म्हणून नेहमीच थोडातरी काळा पैसा तयार असतो. अर्थात आपल्या व्यवस्थेमुळेच त्यांना ती सवय लागली असल्यास त्यांना दोष द्यावा की नाही हा समाजशास्त्रज्ञांचा विषय आहे. हे जर खरे असेल तर गेल्या ७० वर्षात पांढर्‍या पैशाएवढा जो काळा पैसा तयार झालाय तो एकदम कमी करावा की नाही यात बरेच मतभेद आहेत. १२ हे पाऊल उचलण्यासाठी काही वेगळे कारण आहे का ? १३ हे पाऊल सारखे उचलता येणार नाही. जनता डॉलरमधे पैसे ठेवेल. डॉलर चक्क देशात स्मगल होतील. पूर्वी जशा वस्तू व्हायच्या तशा. तज्ञांनी प्रकाश टाकावा. भारावून जाऊन विचार करण्यापेक्षा जरा जमिनीवर येऊन सगळ्यांनी विचार करावा हे बरे. मी भाजपाचा खंदा समर्थक आहे पण मला हे पाऊल आत्ता उचलणे हे अनाकलनीय वाटते. अर्थात माझा विचार चुकीचाही असेल. काळा पैसा आणि भ्रष्टाचार या मुळातच दोन वेगळ्या बाबी आहेत हे कृपया ध्यानात घ्यावे. पांढर्‍या पैशातही कायद्यात बसवून भ्रष्टाचार करता येतो. जसा उद्योगपती सर्रास करतात.

प्रतिसादाशी सहमत.

संदीप डांगे
Fri, 11/11/2016 - 15:03 नवीन
प्रतिसादाशी सहमत. जसजसे पुढे जात आहोत, तसतसे अनेक प्रश्न उभे राहत आहेत. सामान्य लोकांना प्रचंड त्रास होत आहे, काळापैसा असणारे शांत आहेत. बॅण्केच्या लाईनमधे कोण उभे आहेत? बडे उद्योजक, नेते, क्लासवन अधिकारी, उच्चपदस्थ की सामान्य गरिब/मध्यमवर्गिय नागरिक?
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

++१००००

अन्नू
Fri, 11/11/2016 - 15:08 नवीन
सहमत
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आण्णा ...

चौकटराजा
Fri, 11/11/2016 - 15:24 नवीन
आमचा पिढीने १९६२, १९६५, १९७१ तीन युद्धे पाहिली त्यावेळी काही वेळा ब्लॅक आउट मुळे सामान्यांचे हाल झाले पण्॑ कुणी तक्रारी केल्याचे आठवत नाही. आपल्या देशातील स्वतंततेनंतर निर्माण झालेल्या जनाना त्यागाची फारशी सवय नाही. आठवड्यातून एकदा उपवास करा अशी सूचना करणारे प्रधानमंत्री आज त्याना आवडणार नाहीत. हे ही एक युद्धच आहे. व त्यात गुप्ततेची अत्यंत पराकोटीची आवश्यकता असल्याने त्यात नोटांच्या बाबतीत कुणालाही सामील केले नव्हते. भारत देशात गुन्हेगारांचे हात हातात घेणारे गरीबही भरपूर आहेत.याचा प्रत्यय निवडणुकात येत असतोच. मला तर गरीब श्रीमंत सवर्ण दलित असा कोणताही फरक न करणारी ही मोदींची चाल शिरोधार्य वाटते. सामान्य लोकानी चार दिवस अडचण सहन करायला काहीच हरकत नाही. आमच्या मोलकरणीला विचारले तर ती म्हणाली माझ्याकडे पाचशेची एकही नोट नाही. यात सारे आले. अगदी गरीबांचा हा छळ नाही.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हा प्रकार म्हणजे कोणाची म्हैस

संदीप डांगे
Fri, 11/11/2016 - 15:29 नवीन
हा प्रकार म्हणजे कोणाची म्हैस आणि कोणाला उठबैस असा झालेला आहे, चार दिवसात व्यवहार ठप्प राहून किती नुकसान झालंय व हे नुकसान काळ्या पैशाच्या प्रमाणात किती आहे याची आकडेवारी येईल तेव्हा बोलता येईल. सविस्तर प्रतिसाद किंवा लेख चारपाच दिवसांनी लिहितो, बघूया!
↩ प्रतिसाद: चौकटराजा

५०० व १००० ची नोट

हरकाम्या
Fri, 11/11/2016 - 17:23 नवीन
अगदी बरोबर
↩ प्रतिसाद: चौकटराजा

नाही पटत

अन्नू
Fri, 11/11/2016 - 17:38 नवीन
काळे धंदे करणारे असे नाही तसे ते पांढरे करतातच. सोन्याचा वाढलेला दर यापेक्षा वेगळी काही कहाणी सांगत नाही. काही ठिकाणी एजंटही पैसे बदलून देत आहेत. पण हे झाले छोट्या प्रमाणातले साठवणुकदार. ब्लॅक मनी वाले (बडी धेंडं) वेगळेच आहेत. अगदी गरीबांचा हा छळ नाही >>>>>>>> यासाठी तुंम्हाला ही बातमी बघावी लागेल- https://www.youtube.com/watch?v=D57XIQehMl8
↩ प्रतिसाद: चौकटराजा

बॅण्केच्या लाईनमधे कोण उभे

मोदक
Fri, 11/11/2016 - 19:02 नवीन
बॅण्केच्या लाईनमधे कोण उभे आहेत? बडे उद्योजक, नेते, क्लासवन अधिकारी, उच्चपदस्थ की सामान्य गरिब/मध्यमवर्गिय नागरिक? तुमच्या मते, सामान्य गरिब/मध्यमवर्गिय नागरिक आत्ता बँकेच्या लाईनीमध्ये का उभे आहेत..?
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

सामान्य लोकांना प्रचंड त्रास

मोदक
Fri, 11/11/2016 - 19:03 नवीन
सामान्य लोकांना प्रचंड त्रास होत आहे, काळापैसा असणारे शांत आहेत. हे कशावरून ठरवलेत..?
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

लोक २४ तास लालबागच्या

सुबोध खरे
Fri, 11/11/2016 - 20:31 नवीन
लोक २४ तास लालबागच्या राजाच्या, शिर्डीच्या, अजमेर शरीफ दर्ग्याच्या रांगेत २४ -२४ तास उभे राहताना आरडाओरडा करत नाहीत. सिनेमाच्या पहिल्या खेळाच्या रांगेत किंवा क्रिकेट च्या तिकिटाच्या रांगेत तासन तास उभे राहताना कटकट करत नाहीत. फार काय अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट याना पाहायला किंवा सलमान खान, अमीर खान, ऐश्वर्या बच्चन यांच्या एका झलकेसाठी तासन तास रांगेत उभे राहतात. मग एकदा ४००० रुपये काढण्यासाठी बँकेच्या रांगेत दोन तास उभे रहायला लागले तर एवढी कावकाव कशासाठी? रिक्षावाले, मोल मजुरी करणारे किंवा हातावर पोट असणारे अशी ८३% जनता आहे त्यांना या नोटा रद्द केल्याने काहीही फरक पडला नाही. आमच्या मोलकरणीला तिच्या दोन गुजराती घरमालकिणींनी पाचशे रुपये ( नोट) दिवाळी म्हणून काल दिली. तिच्या मुलाच्या खात्यात ती ते पैसे पुढच्या आठवड्यात भरेल. हा "प्रचंड त्रास" करूनघेणारे लोक उद्या जगबुडी येणार आहे अशा अविर्भावात बँकेच्या रांगेत उभे राहून पैसे काढताना दिसले. एवढेच कशाला पेट्रोल पंपाच्या रांगेत उभे राहण्याचे तर्कशास्त्र काय आहे ते तर समजण्याच्या पलीकडचे आहे. ५०० ची नोट खपवण्यासाठी असेल तर तुमचे वैध उत्पन्न असेल तर ती तुम्ही ३० डिसेंबर पर्यंत बँकेत भरू शकता आणि अवैध असेल तर हि सामान्य नसून "असामान्य" जनता आहे एवढेच मी म्हणेन
↩ प्रतिसाद: मोदक

तुम्ही ज्या तुलना करताय त्या

संदीप डांगे
Fri, 11/11/2016 - 21:16 नवीन
तुम्ही ज्या तुलना करताय त्या चुकीच्या आहेत एवढे नमूद करतो, 'एवढी कावकाव' हा शब्द वापरून आपण चर्चेची पातळी घालवत आहात ती कोणत्या हतबलतेतून...? बाकी उर्वरित प्रतिसादासाठी स्टे ट्युन्ड!
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

डांगेजी, नक्की आणि लवकर

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 11/12/2016 - 18:41 नवीन
डांगेजी, नक्की आणि लवकर प्रतिसाद द्या! या निर्णयात चुकीचं काय हे जाणून घ्यायला उत्सुक आहे. लोकांना रांगेत उभे राहण्याचा किंवा दैनिक व्यवहारात त्रास होतोय यापेक्षा काहीतरी वेगळं सांगाल अशी अपेक्षा आहे. "कोणाची म्हैस आणि कोणाला उठबैस" यात म्हैस म्हणजे काळा पैसा याऐवजी म्हैस म्हणजे आपला देश असं जोडून बघा आणि आपलं तेच मत आहे का सांगा. रांगेत उभे राहणाऱ्यांमध्ये मीही आहे आणि हा त्रास एका चांगल्या अर्थव्यवस्थेकडे जाणारं पाहिलं पाऊल आहे असं माझं आणि माझ्यासोबत रांगेमध्ये असणाऱ्या बहुतेक जणांचं मत आहे.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

काळापैसा असणारे शांत आहेत.

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 21:46 नवीन
काळापैसा असणारे शांत आहेत. कोटींमध्ये नकद काळापैसा घरून बसलेल्यांनी "शांत राहण्याऐवजी बँकेसमोर रांगेत उभे राहून आमचे हे xxxकोटी जमा करा असे म्हटल्यास" त्यांचे काय होईल, हे जाणण्याइतके ते नक्कीच हुशार आहेत =)) पाकिस्तानही "आमच्यावर सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही" असे म्हणत होता, त्याची आठवण आली ;)
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

माझ्या मते ..

चौकटराजा
Fri, 11/11/2016 - 15:12 नवीन
माझ्या मते काळा पैसा म्हणजे आयकर न भरलेला पैसा अशी व्याख्या असेल तर सामान्य माणसे म्हणजे आपण सगळेच काळा पैसा थोड्या फार प्रमाणात निर्माण करायला मदत करतो. उदा. डॉक्टरांकडून ,मेडिकल दुकानातून, किराणामाल दुकानातून , रिक्षावाल्याकडून, होटलाकडून पावती घेत नाही.तसेच आपला आयकर रिटर्न म्हणजे फॉर्म १६ ची कॉपी नव्हे हे लक्षात घेत नाही.नोकरीवाल्याना सुद्धा इतर उत्पन्न असते ते फोर्म १६ मधे येत नाही. तेंव्हा काळा पैसा म्हणजे बड्या पैसेवाल्यांचे पाप असे समजण्याचे कारण नाही. ज्यावेळी आयकर खाते आपले सर्व व्यवहार खास करून ज्याचा माग काढता येत नाही असे उदा. पेट्रोलवरील खर्च, खाण्यावरील खर्च पारट्या, फटाके ई. पॅनकार्ड शिवाय करू देणार नाही त्यावेळी आश्चर्यकारक रित्या लोक आयकर खात्याच्या मुठीत सापडतील असा माझा कयास आहे. कारण आयकर खाते आय वरून जर माग काढता येत नसेल तर तो खर्चावरून काढतात अशीही त्यांची कार्यपद्धति आहे.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

बरोबर ! मी सुरुवातीला तेच

जयंत कुलकर्णी
Fri, 11/11/2016 - 15:24 नवीन
बरोबर ! मी सुरुवातीला तेच म्हटले आहे. :-)
↩ प्रतिसाद: चौकटराजा

यासाठी "हाऊ मच अ‍ॅक्शन इज गुड

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 22:35 नवीन
यासाठी "हाऊ मच अ‍ॅक्शन इज गुड अ‍ॅक्शन" हे तत्व वापरले जाते. उदा. पैशाच्या (किंवा इतर कोणत्याही) व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी बनवलेल्या कायदा/नियम/प्रणाली किती किचकटपणा (हेअर स्प्लिटिंग या अर्थाने) असाव्या याला व्यवहारात सीमा असावी लागते. नाहीतर त्या व्यवहाराबद्दलचा कायदा पाळणारा होणारा खर्च (उदा: रु१००-२०० च्या प्रत्येक खर्चाची पावती देणे/धेणे आणि त्याचा हिशेब करविवरणात भरणे) त्या व्यवहारात हस्तांतरीत होणार्‍या रकमेच्या (पावती छापण्याचा, देण्याचा, हिशेबात धरण्याचा, विवरणात असा दर व्यवहार भरण्याचा, करविभागाने ते सर्व तपासण्यासाठी करण्याचा, हा सर्व डेटा वर्षानुवर्षे-सद्याच्या नियमांप्रमाणे २० वर्षेपर्यंत साठवून ठेवण्याचा, इ खर्च) तुलनेने असह्य होईल. यात हे सर्व करायला लागणार्‍या (विक्री करणारा आणि खरेदी करणारा) लोकांना होणारा त्रास व मनस्ताप पकडा. कोणताही कायदा/नियम्/प्रणाली बनवताना; त्यामुळे "(लोकांना होणारा फायदा + मानसिक समाधान) / (त्यांचे पालन करताना करावा लागणारा वेळ-श्रम-पैसा यांचा खर्च + मानसिक असमाधान)" हे गुणोत्तर व्यस्त होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असते. ते व्यस्त असले तर लोक तो कायदा पाळण्यापेक्षा चुकविण्याकडे जास्त लक्ष देतात... किंबहुना, प्रत्यक्षात सरकारनेच त्यांना कायदा तोडण्यास विवश केले आहे असेच होते आणि मग, त्याचे निरिक्षण करणार्‍या अधिकार्‍यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण तयार होते... यालाच "इन्स्पेक्टर राज" म्हणतात. त्यामुळे, पाळले जावे असे कायदे करण्याची इच्छा असल्यास, त्यांतील व्यस्त गुणोत्तर असणारा भाग लोकांच्या सुबुद्धीवर विश्वास ठेवून मोकळा ठेवावा लागतो. किंबहुना, ज्या तरतूदींचे योग्य तर्‍हेने निरिक्षण (सुपरविजन) करणे शक्य नाही, त्या कायद्याच्या परिघात आणण्याने त्याची परिणती कायदा केवळ कागदावर ठेवण्यात होते. त्यासाठी वेगळी चांगले गुणोत्तर असणारी व्यवस्था करणे योग्य होईल. (नाहीतर, एखाद्या सरकारी विभागाने १-२००० रुपये वसूल करण्यासाठी कोर्टात दहा वर्षे खटला चालवून सरकारचे दहा लाख रुपये खर्च केले अश्या बातम्या आपल्याला ऐकव्या लागतात.) त्याचबरोबर, नागरिकाने कायदा तोडल्यास किंवा अधिकार्‍याने कायद्याचा गैरवापरकरून नागरिकाला त्रास दिला तर कडक कायदेशीर तरतूदी ठेवायच्या असतात. यामुळे कायद्याचा भंग करण्याचे प्रमाण नगण्य होते, कायदा अंमलात आणण्याचा खर्च कमीत कमी राहतो व नागरिकांचे समाधानही योग्य स्तरावर राहते. रोजच्या व्यवहारातले जीवन पूर्ण आदर्श आहे (फक्त फायदा आहे, अजिबात तोटा नाही आणि प्रत्येकजण पूर्ण समाधानी आहे) असे कधीच होऊ शकत नाही... ते आदर्शाच्या जवळात जवळ ठेवणे म्हणजेच "गुड गव्हर्नन्स" होय.
↩ प्रतिसाद: चौकटराजा

आयकर खाते आय वरून जर माग

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 22:41 नवीन
आयकर खाते आय वरून जर माग काढता येत नसेल तर तो खर्चावरून काढतात अशीही त्यांची कार्यपद्धति आहे. "खर्च माहीत असलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे (लिव्हिंग बियाँड मिन्स)"... म्हणजेच, "त्यांच्यातल्या फरकाइतके उत्पन्न लपविले आहे" याचा सबळ पुरावा मिळाला. ते योग्यच आहे, शिवाय वरच्या प्रतिसादात स्पष्ट केल्याप्रमाणे मान्य (अक्सेप्टेबल) गुणोत्तरात बसणारे आहे.
↩ प्रतिसाद: चौकटराजा

सहमत.

राही
Fri, 11/11/2016 - 16:36 नवीन
मला तर हा डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा प्रकार वाटला. अर्थात अगदी हत्ती नाही निघाला, उंदिर निघाला तरी थोडेसे यश मिळाले असे म्हणता येईल म्हणा. पाचशे रुपयांच्या नोटा आज सगळ्यांकडे असतात. इन फॅक्ट दोन तीन कामवाल्या बायांनी त्यांच्याकडचे काही थोडे पैसे (रोकड पाचशे, हजारांच्या नोटांमध्ये) सुरक्षित ठेवण्यासाठी मजजवळ दिले होते. नेहमी देतात. अडीअडचणीला, सणासुदिनाला मागून घेतात. हे त्यांना बँकेपेक्षा अधिक सोयीचे वाटते. 'तिकडचा' एक प्रतिसाद इथे कॉपी-पेस्ट करायचा मोह होतो आहे. http://zeenews.india.com/hindi/news/india/decided-to-change-the-currency... भाजपा ने आरोप लगाया कि सरकार ने कालेधन पर काबू पाने के नाम पर वर्ष 2005 से पहले के सभी करेंसी नोट वापस लेने का जो निर्णय किया है वह आम आदमी को परेशान करने और उन ‘चहेतों’ को बचाने के लिए है जिनका भारत के कुल सकल घरेलू उत्पाद के बराबर का कालाधन विदेशी बैंकों में जमा है। पार्टी ने कहा कि यह निर्णय बैंक सुविधाओं से वंचित दूर दूराज के इलाकों में रहने वाले उन गरीब लोगों की खून पसीने की गाढ़ी कमाई को मुश्किल में डाल देगा जिसे उन्होंने वक्त जरूरत के लिए जमा किया है। भाजपा प्रवक्ता मीनाक्षी लेखी ने यहां कहा, अवसरों को गंवाने वाले संप्रग के 10 साल के शासन में पी चिदंबरम 7 साल वित्त मंत्री रहे हैं और अब सरकारी की चली चलाई की बेला में वह लोगों द्वारा पूछे जा रहे सवालों से भागने के लिए कालेधन के विषय से जनता के असली मु्द्दों को भ्रमित करना चाहते हैं।
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

अगदी अगदी

अन्नू
Fri, 11/11/2016 - 17:03 नवीन
हेच सांगणार होतो :)
↩ प्रतिसाद: राही

सहमत.

राही
Fri, 11/11/2016 - 16:42 नवीन
मला तर हा डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा प्रकार वाटला. अर्थात अगदी हत्ती नाही निघाला, उंदिर निघाला तरी थोडेसे यश मिळाले असे म्हणता येईल म्हणा. पाचशे रुपयांच्या नोटा आज सगळ्यांकडे असतात. इन फॅक्ट दोन तीन कामवाल्या बायांनी त्यांच्याकडचे काही थोडे पैसे (रोकड पाचशे, हजारांच्या नोटांमध्ये) सुरक्षित ठेवण्यासाठी मजजवळ दिले होते. नेहमी देतात. अडीअडचणीला, सणासुदिनाला मागून घेतात. हे त्यांना बँकेपेक्षा अधिक सोयीचे वाटते. 'तिकडचा' एक प्रतिसाद इथे कॉपी-पेस्ट करायचा मोह होतो आहे. http://zeenews.india.com/hindi/news/india/decided-to-change-the-currency... भाजपा ने आरोप लगाया कि सरकार ने कालेधन पर काबू पाने के नाम पर वर्ष 2005 से पहले के सभी करेंसी नोट वापस लेने का जो निर्णय किया है वह आम आदमी को परेशान करने और उन ‘चहेतों’ को बचाने के लिए है जिनका भारत के कुल सकल घरेलू उत्पाद के बराबर का कालाधन विदेशी बैंकों में जमा है। पार्टी ने कहा कि यह निर्णय बैंक सुविधाओं से वंचित दूर दूराज के इलाकों में रहने वाले उन गरीब लोगों की खून पसीने की गाढ़ी कमाई को मुश्किल में डाल देगा जिसे उन्होंने वक्त जरूरत के लिए जमा किया है। भाजपा प्रवक्ता मीनाक्षी लेखी ने यहां कहा, अवसरों को गंवाने वाले संप्रग के 10 साल के शासन में पी चिदंबरम 7 साल वित्त मंत्री रहे हैं और अब सरकारी की चली चलाई की बेला में वह लोगों द्वारा पूछे जा रहे सवालों से भागने के लिए कालेधन के विषय से जनता के असली मु्द्दों को भ्रमित करना चाहते हैं।
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

७ हा काळा पैसा काही गेल्या

श्रीगुरुजी
Fri, 11/11/2016 - 15:06 नवीन
७ हा काळा पैसा काही गेल्या दोन वर्षात तयार झालेला नाही. यातील जो पैसा जमिनीच्या व्यवहारात मुरलेला आहे तो सरकार सहजच खणून काढू शकते. बाहेरचा पैसा हे सरकार आणू शकेल यावरचा आता जनतेचा विश्र्वास उडालेला आहे असे मला वाटते.
कितीही उपाय केले तरी काळा पैसा तयार होणे थांबणे अशक्य आहे. परंतु सरकार जास्तीत जास्त सापळे लावून शक्य आहे तेवढा काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार. १९९१ पूर्वी उद्गम कर कपात नावाचा प्रकारच नव्हता. जनता बँकेत ठेवी ठेवायच्या व त्यावरील संपूर्ण व्याज जनतेला मिळायचे. ते व्याज उत्पन्नात दाखविणे हे करदात्याच्या मनावर असायचे. त्याची सरकारकडे नोंदच नसायची. १९९२ मध्ये मनमोहन सिंगांनी उद्गम कर कपात सुरू करून २५०० रूपयांपेक्षा जास्त व्याज असल्यास १०% कर कपात करण्यास सुरूवात केली. लगेचच लोकांनी २५०० पेक्षा जास्त व्याज येणार नाही अशा तर्‍हेने कमी रक्कमेच्या अनेक ठेवी ठेवण्यास सुरूवात केली. नंतर सरकारने नाकेबंदी करून सर्व ठेवींचे एकत्रित व्याज (सध्या वार्षिक १०००० पेक्षा जास्त असल्यास) बघून उद्गम कर कपात करण्यास सुरूवात केली. लगेच काही लोकांनी युक्ती करून एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखेत ठेवी ठेवून उद्गम कर कपात टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु आता संगणकीकरणामुळे सर्व शाखांमधून मिळणारे एकत्रित व्याज दिसू लागल्याने उद्गम कर कपात टाळणे अशक्य झाले. यात शेवटी सरकारने बाजी मारली. त्यावर उपाय म्हणून करमुक्त बाँड्स, पीपीएक इ. मार्गाने लोक कर टाळण्याचा प्रयत्न करतात. कितीही उपाय केले तरी सर्व उत्पन्न दडविणे शक्य नाही व सरकारने कितीही प्रयत्न केला तरी जनता काही प्रमाणात उत्पन्न दडवू शकते.
८ काळ पैसा तयार होण्याचे मार्ग व ते तयार करणारे मोकाटच फिरणार असल्यामुळे तो परत तयार होणार याची लोकांना खात्री वाटत आहे. नाहीतर आज हजारो बाबू, पोलिस, राजकारणी, त्यांचे चेले, जमिनीचे मालक, उद्योगपती तुरुंगाआड असायला हवे होते.
राजकारणी, उद्योगपती, बिल्डर, नोकरशहा यांचे साटेलोटे पूर्वीपासूनच आहे. ते तोडण्यासाठी खूप काळ जावा लागेल व त्यासाठी सत्ताधार्‍यांची इच्छाशक्ती असावी लागेल. सध्या मोदींकडे इच्छाशक्ती दिसत आहे, परंतु हे जाळे तोडायला फार मोठा काळ लागणार आहे.
९ उत्तरप्रदेश व बिहार येथील जनतेचे निवडणूकीत हक्काचे उत्पन्न बुडाल्यामुळे हे तेथे भाजपच्या विरुद्ध बुमरँग होईल अशी भिती, मला वाटते, खुद्द भाजपातील पुढार्‍यांना वाटत असावी.
मला तसे वाटत नाही. ज्या पक्षांना पैसे वाटायचे ते पक्ष पैसे वाटणारच. त्यासाठी ते वेगळ्या मार्गाने व्यवस्था करतील. कदाचित परदेशात दडविलेला काही पैसा आणतील. पण जनतेचे उत्पन्न अजिबात बुडणार नाही.
१३ हे पाऊल सारखे उचलता येणार नाही. जनता डॉलरमधे पैसे ठेवेल. डॉलर चक्क देशात स्मगल होतील. पूर्वी जशा वस्तू व्हायच्या तशा.
सर्वसामान्य जनतेला डॉलर्स मिळविणे तितकेसे सुलभ नाही. ते ठेवणे जोखमीचे काम आहे.

७) मुद्दा हा आहे की जेथे

जयंत कुलकर्णी
Fri, 11/11/2016 - 15:20 नवीन
७) मुद्दा हा आहे की जेथे कारवाईची गरज आहे तेथे कारवाई होत नाही. आजही काका पुतणे बाहेर आहेत. त्यांच्या घरी मेजवान्या झोडल्या जात आहेत. हे सगळे पाहिल्यावर कर का भरावा हा प्रश्र्न जनतेच्या मनात उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. ८) हे सगळ्यांना माहीत आहे पण त्यासाठी काय उपाय योजना आहे हे कळत नाही. भाजपाचे वरीष्ह्ठ नेते सोडल्यास त्यांच्यातही काहे कमी भ्रष्टाचारी नग नाहीत. पंजाब/हरियाना पहा. ९) तुम्ही म्हणता त्याचीव शक्यता कमी आहे. १३) जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत जेथे देशाचे चलन एक आहे पण सर्व व्यवहार डॉलरमधे चालतात. अर्थात आपला अभ्यास या बाबतीत जास्तच आहे...

खालील दुव्यावरची बातमी वाचनीय

संदीप डांगे
Fri, 11/11/2016 - 16:21 नवीन
खालील दुव्यावरची बातमी वाचनीय आहे. http://zeenews.india.com/hindi/news/india/decided-to-change-the-currency-is-going-to-destroy-poor/200664

...

अन्नू
Fri, 11/11/2016 - 17:06 नवीन
कहानी में ट्वीस्ट =)) =))
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

लोकांनी समांतर

जयंत कुलकर्णी
Fri, 11/11/2016 - 18:43 नवीन
लोकांनी समांतर अर्थव्यवस्थेसारखी समांतर चलन व्यवस्था याच नोटा वापरुन राबविली तर खरी मजा ये़ईल..... :-) दुर्गम भागात हे सहज शक्य आहे.... सिरियसली हघेहेवेसांन.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आजची स्थिती

धर्मराजमुटके
Fri, 11/11/2016 - 18:47 नवीन
एटीएम आजपासून चालू होणार होती ती चालू झालीच नाही बहुधा ! ठाणे ते भांडूप मधील एलबीएस मार्गावरील यच्चयावत एटीएम बंद होती. बँकांमधे प्रचंड गर्दी होती. एसबीआय, सिंडीकेट, बरोडा, पीएनबी, आयसीआय आणी एचडीएफसी सारख्या बँकांमधे प्रचंड गर्दी होती. तुलनेने कमी प्रसिद्ध असलेल्या बँकांमधे कमी गर्दी होती. कुणाला अर्जंट पैसे बदलून हवे असतील आणी गर्दी टाळायची असेल तर कमी प्रसिद्ध बँकेत जावे असा सल्ला देत आहे. काही बँकामधे ४००० हजार ऐवजी फक्त ५०० रुपयेच बदलून देत होते. एनकेजीएसबी, महाराष्ट्र ग्रामिण (मुंबई शाखा), शरद बँक, बसीन कॅथीलिक सारख्या नावे न ऐकलेल्या बँकांमधे तुलनेने कमी गर्दी होती. त्यात सरकारी बँकांतील कर्मचार्‍यांचा एकंदरीत अंग चोरुन काम करण्याच्या क्षमतेमुळे / सवयीमुळे (अपवाद क्षमस्व) तिथली गर्दी लवकर हटत नव्हती. उद्या पोस्टाची काय स्थिती आहे ते बघीतले पाहिजे. झेरॉक्स सेंटरवर चांगली गर्दी होती आणि त्यांचा धंदा एकदम तेजीत आला आहे. उद्या २ रुपयाची कॉपी ३ रुपयाला मिळायला लागली तर नवल नाही. आज ऑफीस साफ करायला येणार्‍या बाईंनी चक्क पाचशेची नोट स्वीकारुन उरलेले सुटे रुपये परत दिले. किराणा दुकानदाराने देखील ५०० रुपये स्वीकारुन १५० रुपयाचे सामान दिले आणि ३५० रुपये परत केले. एकंदरीत आज ५५० रुपयाचे सुटे पैसे बघून मिपाच्या भाषेत काय म्हणतात ते ड्वाळे पाणावले. उद्या / परवा पर्यंत एटीएम्स चालू झाली नाही किंवा बँकांतील गर्दी हटली नाही तर मग मुलाच्या पिग्गी बँकेवर दरोडा घालतो.

खबरदार हां त्याच्या पिग्गीला

जयंत कुलकर्णी
Fri, 11/11/2016 - 18:52 नवीन
खबरदार हां त्याच्या पिग्गीला हात लावलात तर..... (रागवण्याची स्मायली.) मी असे म्हटले हे सांगा हं त्याला.... :-)
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

मग मुलाच्या पिग्गी बँकेवर

यशोधरा
Fri, 11/11/2016 - 19:47 नवीन
मग मुलाच्या पिग्गी बँकेवर दरोडा घालतो.
किती दुत्तपणा!
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

मी २ दिवस विना पैशाचे काढले.

पिशी अबोली
Fri, 11/11/2016 - 20:02 नवीन
मी २ दिवस विना पैशाचे काढले. काल २० रुपये होते तेही संपून गेले होते. मग आज घरातलं दूध संपलं तेव्हा जाऊन बँकेत रांग लावली. ३ तास रांगेत एक जर्नल पेपर आणि एका पुस्तकाची काही प्रकरणं वाचून काढली. माझ्यासमोर एक भाऊ-बहीण उभे होते त्यांनी एकूण ६० हजार व ८० हजार कॅश २ अकाऊंट्स मधे भरली व ३५०० रुपये बदलून घेतले. मी एटीएम विसरून गेले होते आणि नेमकं एटीएम चालू होतं चक्क. आज बर्‍याच लोकांना त्या गुलाबी नोटा मिळाल्या आणि मी बदलण्यासाठी खूप कमी कॅश नेल्याचं मलाच समाधान वाटलं. ती २००० रुपयाची नोट काय कामाची? पुढच्या आठवड्यात पुण्यातले सर्व दुकानदार सुट्ट्या पैशांना घट्ट कवटाळून बसतील असं वाटतंय. बँकेचे अन्य व्यवहार चालू आहेत का? मला एका दूरच्या शाखेत काही अर्जंट कामानिमित्त जायचं आहे. पण इतर कामं सुरू असल्याचं आज या बँकेत तरी दिसलं नाही.
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

तुमच्याकडे ATM कार्ड आहे

मोदक
Sat, 11/12/2016 - 00:32 नवीन
तुमच्याकडे ATM कार्ड आहे म्हणजे तेच डेबीट कार्ड म्हणूनही एखाद्या बझारमध्ये चालले असते. टोन्ड मिल्क किंवा नेहमीचे दूध मिळाले असते. अगदीच शेवटचा व थोडा अनधिकृत मार्ग म्हणजे अनेक दुकानदार डेबीट कार्ड स्वाईप करून आपल्याला रोख रक्कम परत देतात. यात ते बहुदा ५% पैसे कापून घेतात. (फक्त ATM आहे आणि डेबीट कार्ड नाही असे कार्ड अस्तित्वात असेल तर माझा प्रतिसाद गैरलागू समजावा)
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

डेबिट कार्डच्या आणि ऑनलाइन

पिशी अबोली
Sat, 11/12/2016 - 07:32 नवीन
डेबिट कार्डच्या आणि ऑनलाइन व्यवहारांच्या भरवश्यावरच मी निवांत होते. पण इथे आसपास डेबिट कार्ड कुणी घेत नाही. आता वापरायचं झालंच तर उबरवरून दूर जाऊन पेटीएमने पेमेंट करून डेबिट कार्ड वापरून आणता आलं असतं. पण त्यापेक्षा रांगेत उभं राहणं सोयीचं आहे. :P असो, माझा मुद्दा हा होता की पैसे नसल्यामुळे अगदी काही आकांत येतो असं वाटलं नाही मला. कुठून ना कुठून कशाचीतरी सोय प्रत्येकजण करतोच. आणि रांगांबद्दल कुणी तशी तक्रार करत नव्हतं. रांगा लागतच आहेत. पण ते गृहीत धरलंय सर्वांनीच.
↩ प्रतिसाद: मोदक

बँक चालू म्हणजे सगळी कामे चालू

पैसा
Sat, 11/12/2016 - 11:35 नवीन
चेक क्लिअरिंग वगैरे चालू आहे. फक्त एवढेच की हजर असलेले सगळे कर्मचारी नोटा बदलून देणे, डिपॉझिट विथड्रावल या कामात अडकले आहेत त्यामुळे दुसर्‍या कामाना वेळ देऊ शकत नाहीत.
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
  • «
  • ‹
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा