सैराट आन सैराटच

लेखक: अभ्या.. जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
रात्रीचा १२ चा शो आणि भागवतटॉकीज ची फरशीबी दिसणार नाही एवढी गर्दी, पार्कींगचे पाचही थेटरचे लॉट फुल्ल भरलेले. हाउसफुल्लच्या काउंटरवरची हुज्जत. सगळी गर्दी १८ ते ३० मधलीच. जणगणमनला उभारलेल्या पब्लिकने काळ्या स्क्रीनवर रंगीबेरंगी सैराट अक्षरांनाच दिलेल्या शिट्ट्या. त्या काळ्या स्क्रीनवरच्या पाट्यातल्या नागराज पोपटराव मंजुळे नावाला झालेला डब्बल जल्लोष. लका आपला माणूस. पाट्या पडतानाच मागे टेनिसबॉलची क्रिकेटमॅचची गावठी कॉमेन्ट्री सुरु झालेली. कॉमेन्ट्रीला सोता नागराज बसलेला गच्चीवरच्या पॅवेलिनला. एकच फाइट वातावरण टाइटचे फ्लेक्स, तीनचाकी सायकलच्या बक्षीसाची अनाउंसमेन्ट, लोकल बिली बाउंडिंगला मॅचमधूनच घरी हाकलत नेणारी आजी, प्रिन्स लिहिलेली नंबरप्लेट, पितळी पिस्तुलाची चावी आणी पुढं तलवारीची नंबरप्लेट असलेली बुलेट वाजवित युवानेते आगमन केले आणि आमच्या हितलीच स्टोरी असल्याची खात्री पटली. म्याचमध्ये गरज असताना आपला हिरो पाणी हापसत हिरवीनीसमोर नजर लावून बसलेला. दिसायला देखणंय लका. पिक्चरपुरती बॉडी कमी केलीय म्हणा पण तब्येत केली तर हाय मटेरिअल हिरोचे. शेवटच्या ओव्हरीत मॅच जिकून देतय आणि बक्षीस घेतय गावचे भाग्यविधाते आणि सर्वेसर्वा पाटलांकडून. हापसताना जिच्यावर नजर लावली ती हेचीच पोरगी. अजून तर झलक नाही आली. पण स्कॉर्पिओतून उतरताना दिसलीच. मजबूत लका काम पण डोळे काय म्हणतोस. अगागागागा. पाटलाची लैच लाडकी लेक आर्ची बुलेट घेऊन कॉलेजात येतीय. हिरीत पवायलेल्या पोरांना नीट बाहेर हाकलून स्वतः पोरीना घेऊन उतरायचा थाट अंगात. तिच्याबी मनात हे कोळ्याचं परश्या भरतंय. परश्याच्या डोक्यात तर आर्ची सोडून काहीच नाही, नुसतं नाव ऐकलं तिचं तरी गडी सैराट सुटतोया. परश्याचे जिगर दोस्त म्हनावं तर दोनच. लंगडा प्रदीप आन गॅरेजवाला सल्ल्या. त्येंनी भरीस पाडून चिट्ठ्या बिठ्या प्रकरण होतंय. आता दोन्ही साइडनी ओके असतयच तवा लीड आटोम्याटीक आर्चीकडंच. शेतातल्या, फोनवरच्या गप्पातून जातीय फुलत ही स्टोरी. आर्चीच्या भावाच्या म्हणजे प्रिन्स च्या बड्डे पार्टीला हे तिघं जातेत झिंगाट नाचायला. काय राव थेटरातला जल्लोष. पोलीसानी दांडके मारुन पब्लिक पडद्यासमोरुन हाकललं तवा कुठं थांबलेला पिक्चर सुरु झाला. आर्चीच्या घरामागं एका बेसावध क्षणी दोघांना आर्चीचा बाप बघतो. कुत्र्यासारखा मार खाउन तिघे परत येतेत. प्रशांतरावांची उचलाबांगडी नीट करमाळ्याला. हिकडं रितीरिवाजापरमाणं आर्चीला बघायला पाव्हणे आलेलेच. परिस्थितीचा अंदाज घेऊन आर्ची करमाळ्याला परश्याला भेटायला येती. तिथे काय सपोर्ट मिळत नसल्याने पळ काढतेत. पाटलाची माणसं जीव खाउन मागं असतेतच. परंड्याला पोलिसांकच्या तावडीत सापडून परत आणले जातेत. पोलीस स्टेशनात परश्या आणि त्याचा मित्रांवर रेप आणि किडनॅपचा चार्ज बसतोय हे कळाताच आर्चीला बापाचा मनसुबा कळतो. स्टेटमेंट फाडून बाहेर पडताच इकडे पाटलाकडून परश्याला जबरी मारहाण होत असती. जिगरीची आर्ची तेथून परश्याला घेऊन पळ काढती. खिशात पैसे नाही. कोन ओळखीचे नाही आशा अवस्थेत हैदराबादला पोचलेल्या दोघांवर यायची ती संकटे येतेतच. एकमेकाच्या साथीने निस्तरत एका भल्या बाईची पडती गाठ. फाटका का हुईना पण आसरा मिळतो. आक्खं आयुष्य थाटात काढलेल्या आर्चीला हे असलं गरीबीचं जगणं पेलवणं तर अवघड होतय पण ती मागं हटत नाही. कष्टात वाढलेल्या परश्याला ही असली जिंदगी सवयीची असली तरी आर्चीसारखा निखारा पेलवत नाही. बिनलग्नाचा सुरु झालेला संसार भांड्याला भांडे वाजवतोच. बारक्या सारक्यावरुन वाढलेल्या भांडणात आर्ची बापाच्या घराकडे परत यायला निघती. प्रवासात जाणवती ती संसारातल्या साथीची आन विश्वासाची किंमत. हिकडे गळ्याला फास लावून घ्यायला निघालेला परश्या थांबतो आन आर्ची परत येती. एकेक दिवस सरतो आन दोघांचे दिवसबी पालटतेत. डोश्याच्या गाडीपासून चांगली नोकरी मिळवणार्‍या परश्यासोबत आर्ची पण नोकरीत प्रमोशन मिळवीत जाते. कायदेशीर लग्न बिग्न केलेल्या ह्या दोघांत पिल्लू आकाशचे बी आगमन होते. हैद्राबादेत थाटात आक्टीव्हावर नवर्‍याला आणि मुलाला घेउन फिरणारी आर्ची सगळ्यात जास्त शिट्ट्या खाउन जातीया राव. . आता म्हणताल आक्खी स्टोरीच टाकली का देवा, तर पिक्चरमध्ये भावला हाच प्रामाणिकपणा. कुठंबी आडमाप नाही की काय हातचं राखलेलं नाही. स्टोरी टेलींग म्हणत्यात नाही का या कलेला. अगदी १०० मार्काने बोर्ड फाडून पास ओ आमचा नागराज. अशी रियल्ल स्टोरी की भिडलीच पाह्यजे. आता कायजणांना नाय झेपली. नसंना का. अस्मितेचे, प्रतिष्ठेचे आन संपत्तीचे गॉगल लावून बसल्यावर काय दिसतं त्येच दिसणार त्येना. जिंदगीच्या उन्हातान्हात फिरणार्‍यांना आपली सावळी का हुईना पण जीव लावणारी आर्ची आठवती. आता नसना का ती शिरेलीतली गोग्गोड पण जिगर बघा की भौ. भाषा म्हणताल लै गावठी पण आसच बोलतो ओ आम्ही. आसच बोलतो आन राहतो पण. झिंगाटवर थिरकले पाय तर बिघडलं काय? पिच्चर संपताना थेटरमध्ये एक तर पावलाचा आवाज येतो का? मग... आन स्टोरी सांगताना जगावी तरी कीती ह्या माणसांनी? ती आर्ची, लका वर्गात परश्याला बघाया पळत येता येता थांबती तव्हा बघायचा चेहरा. काय असती हूरहूर, काय ती नजर. लाख रिटेक मारावे बॉलीवूडने पन अशी नजर आणावी. च्यालेंज है भौ. सजणाची स्वारी आली म्हणताना आलेली लाज, परत फिरती परश्याकडं तवा आलेली समज सगळं कसं आपल्या डोळ्यानं बोलती राव आर्ची. परश्या बी तसलच. कुठंच हिरोगिरी न दाखवता भिडतय मनाला. डोश्याच्या गाडीवर सराइतपणे वर हात टेकून डोसे मारणं असू दे की निर्दयी मार खाउन आलेला बावरलेपणा. सगळा कसा अस्सल. परशाच्या जानी दोस्त प्रदीप. लंगडं हाय पण दिमाग का दिमाग. आर्चीनंतर सगळ्यात जास्तीच्या शिट्ट्या घेतल्या की गड्याने. सल्ल्या बी परफेक्ट. गावागावात सापडतेत असले दिलदार जिगरयार. होतेत...... अगदी असल्या स्टोर्‍या प्रत्येक गावात होतेत. वय असतं ते. मार खाउन कुणी गप्प बसतं नायतर गाव सोडतं, कुणी जीवलगाचा हात धरुन पैलतीरी लागतं. प्रत्येक आर्ची परश्याच्या नशीबात येणारी स्टोरी हाय ओ. याड लागलेल्यांची स्टोरी सांगीतली मन लावून तवा तर कुठं समद्याना याड लागलं. ते म्हणतेत ना. जेवढं पर्सनल होतय तेवढं युनिव्हर्सल होत जातय. आता ही सैराट स्टोरी कशी होतीया दिसतीच हाय ना.

स्पा यांनी 05/05/2016 - 15:43 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

वरील भावनांशी सहमत पण पिक्चर नाय आवडला . न आवडण्याचे कारण एकच साला रोजची जिंदगी असली रडकी असताना निदान पिक्चर मध्ये तरी शेवट गोड झाला पायजे. करमणूक व्हायचे सोडून डोक्याला शॉट लागतो

अगदी अगदी मनातलच बोल्लास भो , कालच पाहीला , काय आरची न काय परशा , त्याची येन्ट्री लय आवडली आपल्याला , येक डाव तरी बघावाच असा गावरान पिच्चर :)

+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

चांदणे संदीप यांनी 05/05/2016 - 15:53 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

प्रा. डॉ. सर स्वारी बरका...मी अभ्यादादाच्या टीममध्ये! ;) दादानु...येतो भागवतला! पिच्चर झाल्यावर गार सरबत पाजणार ना? ;) एकेक परीक्षण/अनुभव वाचाव/ऐकाव तसतशी उत्कंठा वाढतच चाललीये....पण जिनगानीच सैराट सुटलेलं चकार काय केल्या थांबना! :( Sandy

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी 05/05/2016 - 18:35 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by चांदणे संदीप

Permalink

अभ्यानं भन्नाट लिहिलय. मिपा सैराटमय झालंच पाहिजे, अजुन दहा तरी समीक्षन आली पाहिजेत. :) अभ्यासेठ लय भारी ! -दिलीप बिरुटे

सोत्रि यांनी 05/05/2016 - 16:09 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

>> स्टोरी टेलींग म्हणत्यात नाही का या कलेला. अभ्या... ummhhaa... - (स्टोरी टेलर) सोकाजी

बापूसाब, सोकाजीनाना आणि हिंदकेसरी. लै लै धन्यवाद

अत्रुप्त आत्मा यांनी 05/05/2016 - 16:47 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

@अस्मितेचे, प्रतिष्ठेचे आन संपत्तीचे गॉगल लावून बसल्यावर काय दिसतं त्येच दिसणार त्येना. ››› ह्येच ! ह्येच यायलय मनात. त्या व्हाट्सपा पासून त्ये त्या फेसबुका परेंत.. जिकडं तिकडं ह्या अस्मिता, प्रतिष्ठा आनी गॉगलवाल्यांणी नाच चालवलाय. फुगवतेत फुगा, आनी घेतेत फोडून मग! बाकी लय कडू लिवलय रं बेन्या ! शिनेमा येक, आनी ह्ये श्टुरीट्येलिंग दुसरं म्हनाव वाटायलय..!

प्रचेतस यांनी 05/05/2016 - 16:47 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

एकदम धिंगाणा लिहिलंय. चित्रपट कदाचित पाहणार नाहीच, अगदी कुठल्यातरी च्यानलला आला तरी, 'झी'लाच येईल म्हणा. शेवट तर तुझ्याकडुनच विचारून घेतला.

बोका-ए-आझम यांनी 05/05/2016 - 16:53 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

पण मिपालोकनाथ खुसपटं काढून राह्यले ना बे!

विनू यांनी 05/05/2016 - 17:16 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

स्पा भावा १००% सहमत

अप्पा जोगळेकर यांनी 05/05/2016 - 17:42 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मस्त लिहिलंय भाऊ. पण एक कळल नाही. नायक-नायिका शेवटी मरतात असे ऐकले आहे. तसे दाखवल्याशिवाय नेशनल अवोर्ड मिळालेच नसते का ? नाही म्हणजे जात वास्तव, ओनर किलिंग वगैरे भारतात आहे हे खरंच. पण नातवंडांना पाहिल्यावर विरघळणारे पालकसुद्धा असतात भारतात. आणि स्वत:च्या चुका आठवून हळहळ्णारे भाऊसुद्धा असतात भारतात. अन प्रेमात पडताना केलेला आततायीपणा आठवून पालकांच्या गळ्यात पडनारी पोर-पोरीदेखील असतात भारतात. कधी कधी हिंदी पिच्चरचा गोग्गोड शेवटच लोजिकल वाटतो.

नॅशनल अवॉर्ड ज्यासाठी मिळालंय तो विशेष दखल म्हणून आर्चीची व्यक्तिरेखा ज्या ताकदीने रिंकुने निभावली त्यासाठी. बाकी, सगळ्या कहान्या गोग्गोड संपत नाहीत. त्या गोड संपतात ह्या स्वप्नातून बाहेर येणेच उत्तम. असो.

बाकी, सगळ्या कहान्या गोग्गोड संपत नाहीत. त्या गोड संपतात ह्या स्वप्नातून बाहेर येणेच उत्तम. एक अतिशय रोकड़ी पण थोड़ी अश्लीलतेकड़े झुकणारी आंग्लभाषिक म्हण आठवली बघा एकदम =))

बाकी, सगळ्या कहान्या गोग्गोड संपत नाहीत. त्या गोड संपतात ह्या स्वप्नातून बाहेर येणेच उत्तम. हं. मंजुळेचे फ़ेण्ड्री तले दिग्दर्शन आवडले होते. सैराट बद्दल पण ऐकून आहे. फक्त आणखीन एक 'विजय तेंडुलकर' व्हायला नको.

a) SPECIAL MENTION SAIRAT RINKU RAJGURU CERTIFICATE For her effective portrayal of a lively girl who defies societal norms but ultimately has to face the wrath of her family.

अप्पा जोगळेकर यांनी 05/05/2016 - 18:25 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by तर्राट जोकर

Permalink

CERTIFICATE For her effective portrayal of a lively girl who defies societal norms but ultimately has to face the wrath of her family. ==> राजगुरु यांचे अभिनंदन

अस्वस्थामा यांनी 05/05/2016 - 17:58 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

जिंदगीच्या उन्हातान्हात फिरणार्‍यांना आपली सावळी का हुईना पण जीव लावणारी आर्ची आठवती. आता नसना का ती शिरेलीतली गोग्गोड पण जिगर बघा की भौ. भाषा म्हणताल लै गावठी पण आसच बोलतो ओ आम्ही. आसच बोलतो आन राहतो पण. झिंगाटवर थिरकले पाय तर बिघडलं काय? पिच्चर संपताना थेटरमध्ये एक तर पावलाचा आवाज येतो का? मग...
आणि
जेवढं पर्सनल होतय तेवढं युनिव्हर्सल होत जातय.
एक नंबर भावा.. :)

डॉ सुहास म्हात्रे यांनी 05/05/2016 - 18:25 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

लय भारी !

बाबा योगिराज यांनी 05/05/2016 - 18:34 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मायला जिंकलस रे, पण सगळी ष्टुरी सांगीतलीस रे भावा. जैन जैन म्या बी थेटरात जैन. मायला काल एकजण सलीमाला जाऊन आला, लोक हिथ बी थेट्रात नाचत हुते सांगत हुता. मायला आमच्याच नशिबात तिकीट नै ना. भेष्ट लिवलस भावा. लगोलग इनु पिलूया.

स्पा यांनी 05/05/2016 - 18:54 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मराठी पिक्चर म्हणजे रडकथा किंवा झ दर्जाचे विनोदपट हे समीकरण फिक्स आहे काही अपवाद सोडता. ते तसेच राहणार, मंजुळे पण चाकोरीबाहेर नाही जाणार, इथल्या पब्लिक ची नस अचुक गावलिये त्यांना. अवांतर: चला उद्या सिविल वाॅर रिलीज होतोय हुश्श

अवांतर: चला उद्या सिविल वाॅर रिलीज होतोय हुश्श
(वल्लींचे इतरत्र असेच प्रतिसाद पाहून, स्पा आणि वल्ली/प्रचेतस यांना मिळूनच प्रतिसाद) पहिली गोष्ट सिविल वॉरसारखे Y-Z दर्जाचे चित्रपट येतायत म्हणून "हुश्श" करण्यासारखे काय आहे? ते पण सैराटच्या धाग्यावर ? म्हणजे कितीही टुकार असला तरी शारुखचा आहे म्हणून "रावन" चांगलाच म्हणणार्‍या लोकांसारखं झालं ते. वरुन सैराटसारख्या एका चांगल्या प्रयत्नाशी तुलना करण्याचं प्रयोजनच काय ?
मराठी पिक्चर म्हणजे रडकथा किंवा झ दर्जाचे विनोदपट हे समीकरण फिक्स आहे काही अपवाद सोडता.
हे मान्यच आहे की. कोण नाही म्हणतंय. पण जसे लोक तसे राजकारणी आणि तशाच कलाकृती. पण जरा एखादी चांगली कलाकृती बनत असेल, तसा प्रयत्न होत असेल तर थोडे तरी चांगले म्हणावे की. लगेच "ते तसेच राहणार, मंजुळे पण चाकोरीबाहेर नाही जाणार, इथल्या पब्लिक ची नस अचुक गावलिये त्यांना." हे असले प्रेडिक्शन काय दर्शवते ? किमान या दोन आयडींकडून ही अपेक्षा नव्हती. बरीच मार्वल कॉमिक्स चांगली आहेत पण हा "सिविल वॉर" तद्दन टुकार चित्रपट आहे. बघायचाय त्यांनी बघावा. धागे पण काढावेत पण 'सैराट'च्या धाग्यावर येऊन "हुश्श" करुन उगी मानभावीपणा अथवा तसलं काही करुन दाखवण्याचे काही पटले नाही.

आम्हाला टुकारच चित्रपट पाहण्यास आवडतात. - अतिटुकार (प्रचेतस)

नाही हो वल्ली, आम्हाला पण टुकार पिच्चर आवडतातच पण म्हणून इतर धाग्यांवर जाऊन त्याची अशी हिणवल्यासारखी जाहिरात केलेली पटली नाही. तुमचा तिरकस प्रतिसाद पाहून तुम्हाला मुद्दा समजूनच घ्यायचा नाही असं दिसतंय तेव्हा असो. :)

वल्लीबोवा स्पापंत हे मोठे लोक्स. त्यांची अ‍ॅटॅचमेंट डिरेक्ट न्युयोर्कला वाचवणार्‍या अ‍ॅव्हेंजर्सशी. शिवाय ते टेक्निकली हायफाय. करमाळा, सोलापूर तसे लै लांब. रिलेटच होत नै ना....यू नो..... असो. आमच्या दोस्ताला स्पावड्याला एक इनंती. डोक्याला शॉट तर तुझ्या भयकथा बी लावतेत रे. कशाला चांगल्या जिंदगीत पडके वाडे आन काळी मांजरे. तरीबी कौतुक करतोच ना. करावं तसं कधीतरी दुसर्‍याच्या बी स्टोरीचं. जबरदस्ती नाही. उगी दोस्तान्यात म्हणलो हा.

कसा चुकीचा अर्थ लावावा याचे उत्तम उदाहरण, शहर आणि गावाचा प्रश्न नाये भाऊ. असो सोलापूर दाखवलय म्हणून काहीही दाखवलं तरी चांगलच असे मत असेल तर बोलणे खुंटले. माझा शेवटचा प्रतिसाद, राहता राहिला प्रश्न माझ्या लिखाणाचा माझी कुणावरही जबरदस्ती नाही.नाही पटलं द्या सोडून,नाही आवडले लिहा बिनधास्त, उगा खोटे चान चान म्हणायला मला जमत नाही

वैभव जाधव यांनी 05/05/2016 - 19:34 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

ऐ जिगर अभ्या, पार्टी भा* तुला... बाकी पॅक अप झाल्यावर प्रिन्स, पाटील, आर्ची परशा आणि सगळे एकत्र असतेत. कॅमेरा जिवंत करतो हे सगळं मान्य पण लै मनाला लाऊन घिऊ नका कुणी!

वैभव जाधव यांनी 05/05/2016 - 19:34 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

ऐ जिगर अभ्या, पार्टी भा* तुला... बाकी पॅक अप झाल्यावर प्रिन्स, पाटील, आर्ची परशा आणि सगळे एकत्र असतेत. कॅमेरा जिवंत करतो हे सगळं मान्य पण लै मनाला लाऊन घिऊ नका कुणी!

'मेल्यावर सगळे मातीतच जातेत' ह्याची आठवण झाली बघा. पूर्णत्वास पोचलेले तुम्ही अजून एक मेंबर दिसताय =))

आपण च आमचे गुरु. आमचं अभ्या लै इमोशनल हाय ओ. आर्टिष्ट गाबडी आसलीच. तेला समजून सांगायला अस्लं कायतरी, कवातरी. बाकी आपण 'फुल्ल' नाय कटींग वाले. नंतर गायछाप.

विवेक ठाकूर यांनी 05/05/2016 - 21:14 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

पण स्पाशी सहमत. पण पिक्चर नाय आवडला . न आवडण्याचे कारण एकच साला रोजची जिंदगी असली रडकी असताना निदान पिक्चर मध्ये तरी शेवट गोड झाला पायजे. करमणूक व्हायचे सोडून डोक्याला शॉट लागतो जर वास्तवच पाहायचं तर रोजचं वर्तमानपत्र आणि टिवीवरच्या बातम्या काय कमी आहेत ? माझ्या मते Intelligence in not only to present a problem in the most effective way but to go a step further & show the solution. नागराजनं एका अत्यंत सुरेखपणे मांडलेल्या कथेचा शेवट फार विदारक केलायं. खरं तर प्रेमानं जातीभेद आणि सूडभावनेवर मात करायला हवी कारण प्रेम हा जोडणारा धागा आहे. सिनेमातून जाणारा संदेश अयोग्य आहे, तो नेमकं उलट दाखवतो. नागराज प्रेमात हृदयपरिवर्तनाची ताकद आहे हे दाखवू शकला असता, तर चित्रपटानं नक्कीच वेगळी उंची गाठली असती.

जातपात व सैराट ह्यावर संजय सोनवणींनी त्यांच्या ब्लॉगवर एक लेख लिहिला आहे. मला तरी पटला. सैराट मध्ये जाणुनबुजुन जातीयवाद घुसवला आहे असे मलाही वाटते. सैराटलेले जातीय....

चित्रपटात तर जातीयवादावर कुठेही कोणतेही भाष्य नाही. हे तर तुम्ही ज्यांची लिंक दिली आहे तेही म्हणतायत, मग तुम्हाला हा 'जाणूनबुजून घुसवलेला जातीयवाद' कुठे दिसला हे समजले नाही.

सोनवणींनीच लिहलंय ना. बापालाच जगजाहीर अपमानित करुन पळालेल्य मुलीचा आणि ज्याच्यासाठी हे घडले त्या मुलाचा मुलीच्या बापाने (तापट मुलाच्या माध्यमातुन) घेतलेला सूड

कोणतीही पोरगी बापाचं न ऐकता कुठल्या पोरासंगट पळून जाते तेव्हा बापाचा अपमानच होतो. जात-पातीचा संबंध नाही. सर, ह्या विषयात खोल अभ्यास आहे विथ कन्सिडरेबल सॅम्पलगृप. ;-).

What Mahatma Gandhi and Ambedkar could not achieve, what can a film like Sairat hope to achieve? Still, I am hopeful. As for me, I now have a space in people’s minds in India, UK and the US, it’s not a question of being poor or a Dalit. After Fandry screened in London, some Dalit families took me to their home and said, after 100 years we are seeing a Dalit film. I became their voice. It was unbelievable and made me very happy. लिंक

आपला विषय काय आहे नक्की हे फायनल करुयात का? तुम्ही वरचं कोट दिलंय त्यात 'जातीयवादाच्या हेतूने सैराट काढलाय' असं कुठं म्हटलंय? तसेच प्रश्नकर्त्याचा प्रश्नही मांडायचा ना सोबत. Your films are acclaimed worldwide. But Rohit Vemula’s suicide represents the continuing oppression of Dalits. Do you feel your cinema can influence people—and has it changed you? What Mahatma Gandhi and Ambedkar could not achieve, what can a film like Sairat hope to achieve? Still, I am hopeful. As for me, I now have a space in people’s minds in India, UK and the US, it’s not a question of being poor or a Dalit. After Fandry screened in London, some Dalit families took me to their home and said, after 100 years we are seeing a Dalit film. I became their voice. It was unbelievable and made me very happy. जे गांधी-आंबेडकर करु शकले नाहीत ती अपेक्षा माझ्या फिल्मकडून करणे शक्य आहे का? तरी मी आशावादी आहे. गांधी-आंबेडकरांनी जातीयवाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तीच अपेक्षा म्हणजे जातीयवाद मिटवण्याची आपल्या फिल्मकडून आहे असा आशावाद तो व्यक्त करत आहे. का.यो. ह्यांनी "जाणून बुजून घुसडलेला जातीयवाद" असा वाक्प्रचार वापरला. त्यावर त्यांना मी साधं विचारलंय हा जाणून बुजून घुसडलेला कुठे आहे. त्याचे उत्तर त्यांनी मार्केटींगच्या मेसेजेस बद्दल दिलंय. का.यो. ह्यांच्या उत्तरावरुन त्यांना 'फिल्ममधे जातीयवाद घुसडलेला आहे' असे म्हणायचे नव्हते असे कळते. मुद्दा आहे की मंजुळेला चित्रपटात पाटील वाईट आणि लोअरकास्टवर अन्याय करतात असे दाखवायचे होते का? तर मला तसे वाटलेले नाही. हे एकंदर सामाजिक परिस्थितीवरचे भाष्य आहे. तसे नसते तर जातीने पाटील असलेल्या मित्राशी पर्श्याचे अरेरावीचे वागणे दाखवले नसते. मुलगा पळून गेला म्हणून मुलीला स्थळं येत नाहीत असाही सीन आहे. अशा अर्थाच्या अनेक गोष्टी आहेत चित्रपटात. ही कोणा एका विशिष्ट जातीची नव्हे तर एकूण समाजाच्या मानसिकतेची शोकांतिका आहे. अजिबात संबंध नसलेल्या कोण्या दूरच्या काकाच्या मुलाने, मुलीने जातीबाहेर लग्न केलंय म्हणून (वेगवेगळ्या जातीच्या) अनेक कुटूंबातल्या मुलींच्या लग्नास अडथळे येतांना पाहिलेत. मला स्वतःला महाराच्या मुलीशी लग्न करायला घरातून खूप विरोध झाला, (ते बारगळले हा भाग वेगळा) पण ब्राह्मणाच्या मुलीशी करतांना तितका नाही झाला. प्रेमविवाहाला विरोध होणे ह्यामागे अनेक कारणं आहेत. जात हे स्पष्ट दिसनारे कारण, तर पालकांचा अहंकार डिवचला जाणे हे अदृश्य पण महाभयकारी कारण आहे. प्रेमविवाहाला विशेष खळखळ न करता मान्यता देणारे मुख्यतः मेट्रोपॉलिटन शहरात राहणारे, ज्यांचे संस्कार-राहणीमान, भोवताल खेड्यांपेक्षा वेगळे. खेड्यापाड्यांतून, तालुक्या-गावांतून प्रेमविवाहाला अशी सढळ मान्यता देणारे अजुन तरी बघितले नाहीत. अगदी मुलगा जातीतला, अनुरुप असला तरी फक्त परस्पर जुळवले किंवा प्रेमविवाह आहे म्हणून प्रकरणं फसलेली आहेत. प्रेमविवाह करणार्‍या मुली खेड्यांतून उच्छृंखल, संस्कारहिन समजल्या जातात हे वास्तव आहे. उदा: माझा ब्राह्मण मेहुणा चांगला आयटी इंजिनीअर, स्वतःचे दोन फ्लॅट असलेला, कसलीही जबाबदारी नसलेला विधवा आईचा एकुलता एक मुलगा. मराठा मुलीशी कॉलेजात अफेअर झाले. लग्नास तीच्या घरच्यांनी संमती दिली. मुलीच्या घरी हिच्यासह अजून तीन मुलीच, चौथ्या सर्वात लहान मुलावर थांबले असावेत बहुतेक. मुंबईत लग्न झाले धूमधडाक्यात. तिच्या गावी सातार्‍यात मात्र एक वर्षभर हे जोडपं जाऊ शकलं नव्हतं का तर सख्खा आजोबा वैतागला होता. शेवटी तो सगळं सुस्थितीतलं (?) आहे हे बघून निमाला. आता जावयाला दिलखुलास वागणूक, आदर मिळतो तिकडे. हेच लग्न मुलगा खालच्या जातीचा असता, श्रीमंत नसता तर झाले नसते. सॅम्पलग्रूप मोठा आहे. सैराटच्या निमित्ताने अशी प्रकरणे लिहावीत का असा विचार आलाय. ;-)

मी कमीत कमी तीस उदाहरणे देईन. सगळ्या टाइपच्या शेवटाची. अगदी अस्सल, डोळ्यासमोर घडलेली.

आणि `प्रेमविवाह' सरसकट समाजमान्य नाही असा भलताच सूर लावला आहे. इथे तुमच्या जीवनात किंवा नात्यात काय घडलं हा मुद्दा नाही तर चित्रपटात नागराज काय दाखवायचा प्रयत्न करतोयं हा प्रश्न आहे. 'जातीयवादाच्या हेतूने सैराट काढलाय' इतका ढोबळ अर्थ नाही. जातीवादामुळे प्रेमासारखी उदात्त भावना सुद्धा कशी उध्वस्त केली जाते असा सिनेमाचा (उघड) विषय आहे. तुम्हाला त्याकडे डोळेझाक करायची असेल तर जरुर करा. पण पुन्हा नागराज स्वतःच काय म्हणतो ते वाचा : In Fandry, there was not any direct mention of caste, but it was present. It is there in Sairat as well, which is the story of two people from different castes and class falling in love. लिंक

विठामाउली, नागराज काही दाखवायचा प्रयत्न करत नाही. जे आहे ते मांडलंय सरळ सरळ. ज्याला जे बघायचे ते तो उचलतोय. जातीवादामुळे प्रेमविवाह होउ शकत नाहीत हे सत्य असले तरी त्यामागे मुळात अहंकार, वर्चस्वाची भावना इत्यादी अनेक गोष्टी आहेत एवढेच माझे म्हणणे होते. मुळात ही चर्चा योगेशु ह्यांच्या "सैराट मध्ये जाणुनबुजुन जातीयवाद घुसवला आहे" ह्या टिप्पणीवरुन सुरु झाली. जातीयवादाची अदृश्य पार्ष्वभूमी असणे आणि जाणुनबुजुन जातीयवाद घुसवणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे माझे म्हणणे होते. प्रेमविवाहांच्या विरोधाला सामान्यपणे जात हेच मोठे कारण असते पण ती ढाल आहे अहंकाराची. चित्रपटात हे जाणुन बुजून घुसवणे मला दिसले नाही म्हणुन मी प्रश्न विचारला होता. तुम्ही त्यावर प्रेमिकांच्या अंत कशामुळे होतो हा प्रश्न विचारला, तर तो अंत जातीमुळे तर होतोच ते कुठेही अमान्य करत नाही, पण त्याच्या मुळाशी समाजात होणारा जाहिर अपमान बापाला सलतो हे चित्रपटात दिसतंय, आणि फक्त पोरीच्याच नाही तर पोराच्याही बापाला जातीमुळे त्रास होतो. हे सार्वजनिक सत्य आहे. जाणुन बूजून घुसडण्याची गरज नाही. पुढे त्यांनी मार्केटींगबद्दल बोलत आहेत हे स्पष्ट केल्याने विषय संपलाय.

पडी तो भी मेरीच तंगडी खडी ! तुम्ही वरती प्रतिसादात म्हटलंय : कोणतीही पोरगी बापाचं न ऐकता कुठल्या पोरासंगट पळून जाते तेव्हा बापाचा अपमानच होतो. जात-पातीचा संबंध नाही. संपूर्ण सिनेमा ही जातीवादाच्या दहशतीखाली फुलत जाणारी प्रेमकहाणी आहे.

अभ्या.. यांनी 06/05/2016 - 18:31 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by विवेक ठाकूर

Permalink

विवेकजी विवेकजी, कुठलेही प्रेमी जोडपे पळते त्यावेळी घरच्याना थोडी माहीती असतेच. त्या प्रेमप्रकरणाला पटकन स्वीकारणे शक्यच नसते. जात, पैसा, पॉवर आणि प्रतिष्ठा यातले काहीही थोडेफार जरी कमी असले (अगदी कट टू कट सेम असणे फार दुर्मिळ) विरोधाला सुरुवात होते. पोलिसात नुसती मिसिंगची तक्रार होते. पोलीस अत्यंत हुशार. त्यांच्याकडे दोन्ही पार्ट्या जोखायची तागडी असतेच. त्यानुसार व्युहरचना आखली जाते. फोन कॉल, मित्र मंडळी स्कॅन होतात, पुणे मुंबई धुंडाळले जाते, मुलगामुलगी सापडले दुर्दैवाने तर पधदत्शीर ब्रेनवॉशिंग केले जाते. कोण ढासळतेय हेच पाह्यले जाते. सगळ्या गोष्टी (आत्महत्येच्या धमक्या, दमदाट्या, मारहाण) वापरल्या जातात. पोरगी टिच्चून राह्यली तरच पोरगं सुरक्षित राहतं. त्यात सुध्दा दोन पर्याय. पहिल्यात कुणावरच काहीही गुन्हा नोंदवता केस मिटवली जाते. पोरगापोरगी आपापल्या घरी. नाहीतर दोघे सज्ञान असून खंबीर राहतात त्यावेळी पोलीसांना लग्न लावून देण्याशिवाय पर्याय नसतो. मग मुलगी मला मेली वगैरे होते. इथे एकतर पैशाने पार जमीन अस्मानाचा फरक, प्रतिष्ठेत पण, जात हा इश्शु आहेच. एवढ्या सगळ्या गोष्टी असता कुठला बाप अपमान मानणार नाही. उलट त्याने तसे पेटून घेतलेला बदला आवडला नसतानासुध्दा खरा वाटतो.

उलट त्याने तसे पेटून घेतलेला बदला आवडला नसतानासुध्दा खरा वाटतो. दुर्दैवी, पण सहमत.

जोकर भाऊ प्रेमविवाहाला विरोध होणे ह्यामागे अनेक कारणं आहेत. जात हे स्पष्ट दिसनारे कारण, तर पालकांचा अहंकार डिवचला जाणे हे अदृश्य पण महाभयकारी कारण आहे याला मात्र शतशः सहमत. सिनेमा काही बघितलेला नाही. त्याची हाइप जास्त केली जाते आहे असे वाटते. स्पा किंवा वल्लीला आवडला नाही हा त्यांचा चोईस आणि ज्यांना तो आवडला ती त्यांची अभिरुची. त्याबद्दल एकमेकांवर टीका करावी असे मला वाटत नाही.

विवेक ठाकूर यांनी 06/05/2016 - 12:36 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by सुबोध खरे

Permalink

आणि ते अत्यंत उघड आहे. तजो उगीच पेडगावला जातायंत. चित्रपट न आवडण्याचं कारण विदारक शेवट आहे. शेवट आहे तसा ज्यांना मान्य आहे त्यांना चित्रपट आवडलायं.

शेवट आहे तसा ज्यांना मान्य आहे त्यांना चित्रपट आवडलायं
म्हणजे नक्की काय म्हणायचय.. त्या परिस्थितीत तसच व्हायला पाहीजे असं वाटतंय त्याना चित्रपट आवडलाय.. की त्या परिस्थितीत तसंच होतं असं वाटणार्‍यांना चित्रपट आवडलाय.

मला वाटतं प्रश्न तर आहेतच पण त्यावर उत्तर शोधणाऱ्या अभिव्यक्ती एक दिशा देतात. ज्यांना उत्तरापेक्षा वास्तविकताच ठळकपणे मांडली जाणं सार्थ वाटतं त्यांना सिनेमा आवडेल. तसा तो सुरेख आहेच पण शेवटी दृष्टीकोनच आवड-निवड ठरवतो ही वास्तविकता आहे .

चित्रपटांतून समस्या मांडल्या जातात पण त्यावर उपाय नाहीत हे आपल्याला खटकतंय.. योग्यच आहे.. एवढं सोपं उत्तर असतं तर समाज आधीच सुधारला नसता?? गुडीगुडी शेवट हेदेखिल समस्येचे समाधान नसते.. आपल्या मनाचे समाधान असते.. शेवटी समाज सुधारणा ही एक मोठी प्रक्रीया आहे.. त्याचे परीणाम दिसायला दशकं/ शतकं जावी लागतात. पण अशा समस्या मांडणीतून विचार करायला प्रेरीत करणे हेदेखिल मला महत्वाचे वाटते. जेवढं कटू वास्तव भिडेल तेवढं जास्त विचार करायला प्रेरीत करेल अशीही एक विचारधारा असू शकते.. जर यात तसा शेवट नसता तर कुठल्या समस्येवर विचार झाला असता?? अनेक प्रेमकथांसारखी ही एक.. झिंगाटसारखी गाणी पण खूप येत असतात.

आनंददायी, तर्कपूर्ण आणि विचार करायला लावणारा सुध्दा असू शकतो. सिनेमा इतकं प्रभावी माध्यम आहे की सूडभावना आणि जातीवादापेक्षा प्रेम हा सर्वांना जोडणारा धागा होऊ शकतं अशी सोपी मांडणीही करता येते .

=)) उचित प्रश्न. असा भयंकर शेवट होऊ नये हे प्रेक्षकांच्या मनात येतंच, तोच तर त्या चित्रपटाचा उद्देश आहे. माझ्या कामवालीने परवा तिच्या कुटूंबियांसोबत सैराट पाहिला, रात्रभर झोपू शकलो नाही अशी तिची प्रतिक्रिया होती. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांच्या अशा प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत. अशांना थोडातरी धक्का देण्यात कलाकृती यशस्वी होत असेल तर हेतू सफल झाला असे वाटते.

तर्राट जोकर यांनी 06/05/2016 - 15:19 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by सुबोध खरे

Permalink

डॉक्टरसाहेब, स्पा किंवा वल्ली यांना आवडला नाही म्हणून मी कुठेच टिका केली नाही. आधीच्या एका धाग्यावरच ह्याबद्दल बोललो आहे की आवडला, आवडला, नै आवडला नै आवडला, इट्स ओके. मला फक्त कुतूहल होते की चित्रपट न बघता तीव्र विरोधी प्रतिक्रिया का येत असाव्यात ह्याबद्दल. त्यात का. यो. यांनी मार्केटींगने पेड निगेटीव रिस्पॉन्सचा फंडा वापरला आहे असे सूचित केले. दोन तीन गोष्टी मिक्स झाल्याने गैरसमज, गोंधळ होत असेल.

तजो तुमच्याशी सहमत, अशी भरपूर उदाहरण सापडतील, बाकी सोनावणी यांचा ब्लोग जातीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही

कोणतीही पोरगी बापाचं न ऐकता कुठल्या पोरासंगट पळून जाते तेव्हा बापाचा अपमानच होतो.
हे सरसकटीकरण झाले...सगळ्याच केसेस अश्या नस्तात

हे माझे मत किंवा दृष्टीकोन नाही. समाजाचे वास्तव आहे. 'पोरी पळून गेल्यावर बापाचे अभिनंदन करणार्‍या' केसेस असतील तर माहित नाही.

मला म्हणायचे होते की सरसकट पळून जाणार्या मुलांची चूक नसते...मुळात पळून जाणे हा टोकाचा निर्णय घेईपर्यंत परिस्थिती ताणली का जाते याचा विचार कोणी करतच नाही का??

टका, मुद्दा गडबड होतोय का? पळून जाणार्‍या मुलांची चूक असते वा नसते हे माझ्या प्रतिसादात मी कुठेच म्हटले नाही. पण मुलगी पळून गेली की समाज पालकांना अपमानितच करतो व पालकांनाही स्वतः अपमानित झाल्याचे वाटतेच हे वास्तव आहे असे माझे म्हणणे आहे. अनेक प्रकरणांमधे आईबापाला तर थेट मुलगी घरी परतलीच नाही हे कळल्यावर प्रेमप्रकरणाचा उलगडा होतो, मुली-मुलं घरी सांगू शकत नाहीत, आईबाप नाहीच म्हणणार हे त्यांनी गृहीत धरलेले असते.

मार्केटींग करताना मुद्दामुन जात मध्यवर्ती राहील असेच मेसेज वगैरे फॉरवर्ड केले गेले. ह्या अर्थाने जातीयवाद म्हटले मी. बाकीची कथा तर अगदी स्टीरिओटाईप वाटली.

धन्यवाद विवेकजी. अनुभव माझा. चित्रपट नागराजचा. मला भावला, दुसर्‍याला भावावा ही सक्ती नाहीच. राहता राह्यला विदारक शेवटाचा विषय. आहे ते आहे. चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर आणि पटकथेवर दुसरा शेवट मला पटला नसता कारण मी ह्या दुनियेत जगतोय. भले ती वाईट असेल, जंगलराज असेल पण एक वास्तव कथा आहे.

आपणच सुरूंग लावून उडवावं असं काहीसं वाटलं. पण तुला शेवट आवडला असेल तरी हरकत नाही . इट इज अ डन जॉब नाऊ, त्यावर काय चर्चा करणार ?

नाही विवेकजी, आवडला हा शब्द नाहीच. कधीच आवडणार नाही असा शेवट. पण कथेत जी पात्रे ज्या पार्श्वभूमीवर उभी आहेत ती त्यांच्या त्यांच्या भुमिकेला प्रामाणिक राह्यलीत. बस्स. . चर्चा हा तर माझा मोठा वीक पॉइन्ट सो.... थॅन्क्स.

खटपट्या यांनी 05/05/2016 - 21:24 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

ये बात... लय भारी लिवलंय मित्रा..अगदी मनातलं आपन तर या भाषेच्या प्रेमातच पडलो...९०% महाराष्ट्र हीच भाषा बोलतो की....