✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

झोपडपट्टीतले दिवस: भाग एक

त
तर्राट जोकर यांनी
गुरुवार, 10/22/2015 - 00:25  ·  लेख
लेख
आम्ही तेव्हा झोपडपट्टीत राहायचो, रेल्वेच्या जागेत अतिक्रमण झालेली अठरापगड जातींच्या सरमिसळीची गोधडी. एक मोठा निळा फडका आणि बाकीचे छोटे छोटे रंगीबिरंगी ठिगळ असलेली. शहराच्या आजूबाजूच्या शेकडो गावांतून इथे दोन-चार, दोन-चार करत आलेली, मोलमजुरी, हमालीचं काम करणारी बिर्हाडं. आवसेला न चुकता डडंग-डंग...चिक...डडंड-डंग....डडंग-डंग...चिक...डडंड-डंग करत येणारा स्वच्छ कपड्यातला, अगदी वारकरी वाटणारा मांग. परिसरात मेलेली जनावर ओढायचं, त्यांचं कातडं काढून विकायचं काम करणारे महार, कुठे कोणाच्या घरी धुणी-भांडी करणार्‍या बाया, दोन-तीन बकर्‍या घेऊन चरायला जाणारी अल्पवयीन बालकं, घराच्या लिंपणासाठी कायम चुन्याची माती शोधत असणार्‍या मुली. जयंत्या-महानिर्वाणाच्या दिवशी वाजणारे भयाण आवाजातले भोंगे, कुणाच्या पाचव्या वाढदिवशी अमक्यामामाने 'चिरंजी सिद्दार्त'ला सपरेम भ्येट दिलेले २ रुपये - अमेरिकेने युगांडाला मदत केल्याच्या थाटात - कोकलून कोकलून सांगणारे अनाउंसर. कुठे कुठे वीज पोचली होती. पण बराच भाग घासलेटच्या दिव्यांवर रात्रीचा अंधार गडद करत असे. शहरात, अगदी झोपडपट्टीच्या सीमारेषेपासून पुढे सूखवस्तूंची वसाहत सुरु होत होती. तिथे सगळा झगमगाट असे. त्या सीमारेषेवरच आमचं घर होतं. रेल्वेची जागा आहे असे ठणकावून सांगणारा मोठा दगड, आमच्या घराच्या अंगणाच्या एका कोपर्‍यात रुतलेला होता. रेल्वेची अतिक्रमित जागेची, पर्यायाने त्या दोन किमी आडव्या पसरलेल्या गोधडीची किनार, व आमच्या घराच्या अंगणाची सीमा दाखवणारा तो दगड कालांतराने जमीनीखाली गेला. भक्तांना दृष्टांत द्यायला देवाचे दगड वर येतात. आम्हाला अभय द्यायला तो दगड खाली पुरला गेला. आमचं घर, कुडाचं, पक्कं नाही. पण हवेशीर. झोपडी नाही. मोठ्या बल्ल्यांनी मजबूत बांधलेले, मातीने लिपलेल्या जाड भिंती असलेलं दहा-बाय दहा च्या दोन खोल्या असलेलं... उंच व मजबूत होतं, प्रशस्त नव्हतं, गरजेपुरतं. जागा फारशी नाही एकूण हजार-बाराशे फूट. पण झोपडपट्ट्यांमधे नसलेल्या अनेक गोष्टी आमच्या घरात होत्या. काही दिवस अंधारात, व स्टोव्हवर स्वयंपाक केल्यावर अण्णांनी खटपट करून वीज कनेक्शन व गॅस सिलेंडर कनेक्शन मिळवलं. थोडे पैसे घालून दारात बोअर मारून, हातपंप वाली कमनीय बांधा असलेली हिरवी जलदेवता उभी केली. आमच्या घरासमोर कुठलीही झोपडी नव्हती, निदान सुरुवातीचे अनेक वर्षे. दूर नजर जाईल इतपर्यंत मोकळे मैदान होते. सुखवस्तूंची वसाहत डाव्या बाजूला. उजव्या बाजुला सरकारी खात्याची जमीन. एकुण ८-१० वर्षाच्या मुलासाठी तो आजच्या काळातला स्वर्गच होता. वीज, पाणी आल्याने आम्ही खूप फेमस झालो. आमच्या हापशी-हातपंपावरून लोक रोज पाणी भरायला लागले, अतिशय गोड आणि दर्जेदार पाणी होतं. तिथे आजुबाजूला दोन-तीन हापशा होत्या. त्यातली एक आमची. हिचं पाणी, आमचा स्वभाव दोन्ही गोड. सकाळ-संध्याकाळ नुसती रीघ असायची. गर्दी फार व्हायला लागली, २४ तास. मग एका कुटुंबाकडून, पाणी भरायचे, आम्ही दहा रुपये महिना प्रमाणे पैसे घ्यायला लागलो. आमच्या घरातून वीज नसलेल्या झोपड्यांमधे वीज दिली गेली. आजूबाजूच्या किमान साठ-सत्तर घरांमधे आमच्या घरातून वीज दिली जात होती. एक तर घर चांगले सात-आठशे फुटांवर होते. इतक्या लांब वीज वाहून नेणे, त्यांच्या वायरी सांभाळणे, बरेच उद्योग होते. पैसे मिळायचे पण त्यापेक्षा महत्त्वाचे आपण ज्या लोकांमधे राहतो त्यांना कशी का होईना आपल्यातर्फे थोडी मदत होत होती. असून असून लोकांकडे एखादा बल्ब, टेबल-फॅन असायचा. वीस-पंचवीस रुपये महिना. नंतर हळूहळू सरकारी निर्बंध शिथिल होऊन राजमान्यता मिळाल्यावर सगळ्यांकडे स्वतःचे वीज कनेक्शन आले. वाढत्या वॅटेजवाल्या अप्लायंसेसनी आमच्याही घरचे फ्युज नेहमी उडायला लागले होते. एकदा तर सगली वायरींग जळली. तो धंदा आम्ही बंद केला. परिस्थिती फिरते. जिथे फुले वेचली तिथे गोवर्‍याही वेचायची वेळ आमच्यावरही आलीच, पुढे आम्हालाही काही दिवस दुसर्‍यांचे कडून महिना पन्नास-शंभर रुपये देऊन वीज घेऊन राहावे लागले. सतत उपसा होऊन आमची जलदेवता रुष्ट झाली. कपडे धुण्याइतकेही चांगले पाणी तिच्यातून मिळत नव्हते. आम्हाला दुसर्‍यांच्या हापशांवर जाऊन दहा रुपये महिन्यानी पाणी भरायला लागले. आम्ही त्याठिकाणी राहिलो उणीपुरी १२ वर्षे. घर, आणि परिस्थिती मोडकळीस आली. बहिण वयात यायला लागली तेव्हा तिथे थांबणं चुकीचं वाटू लागलं. अण्णांनी ज्या परिस्थितीत हे स्वतःचं घर मिळवलं होतं ती परिस्थिती सतत आठवून त्यांना ते विकायचे नव्हते. आम्ही हट्टाला पेटलो होतो. स्वत:च्या मोठ्या घरातून टीन-पत्र्याच्या दिडशे फुटाच्या भाड्याच्या खोलीत जाणे त्यांच्या स्वाभिमानी मनाला पटत नव्हते. इथल्या आलेल्या किमतीत चांगल्या वस्तीत घर घेणे शक्यच नव्हते. आमच्या सततच्या धोशाने वडिलांना ते घर विकणे भाग पडले. ते घरही नंतर बरेच ढेपाळले होते. ती झोपडपट्टी आणि तिथल्या बारा वर्षांनी खूप अनुभव दिले. आठवले तसे लिहितो. पण फार जास्त नाही लिहिणार. काही अजूनही आठवणारे.... असेच मनावर परिणाम करून गेलेले. काही लोक, काही वस्तू, काही घटना.... झोपडपट्टीतले दिवस. क्रमशः (सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. प्रथम प्रकाशनः मिसळपाव.कॉम. दिनांकः २२ ऑक्टोबर २०१५) झोपडपट्टीतले दिवसः भाग दोन
  • झोपडपट्टीतले दिवसः भाग दोन

Book traversal links for झोपडपट्टीतले दिवस: भाग एक

  • झोपडपट्टीतले दिवसः भाग दोन ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
इतिहास
समाज
जीवनमान
राहणी
राहती जागा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
71934 वाचन

💬 प्रतिसाद (191)

प्रतिक्रिया

अजिबात नाही

आदिजोशी
Mon, 10/26/2015 - 13:21 नवीन
हजार फूट इथे मोजले काय किंवा चंद्रावर मोजले काय, सेमच येतात. बाकी जागेत बकर्‍या, कोंबड्या, गाय वा म्हैस, हातगाडी वा बैलगाडी, गोवर्‍या वाळवणे, हँडपंप किंवा विहीर, पाणी साठवायला हौद, कपडे वाळवण्याच्या दोर्‍या, उन्हाळ्यात झोपायला खाटा, जो काही काम-धंदा असेल त्यासाठी लागणारे सामान, हे असले चोचले मुंबईकर मध्यमवर्गीयांना नाही हो जमत. आम्ही आपले हॉल मधेच सोफा कम बेड, पॅसेज मधेच कपडे वाळत घालायच्या दोर्‍या, सगळ्या ॠतूंमधे तीच ती बेडरूम असं करून राहतो. माणसांनाच जागा नसल्याने प्राणी पाळणं कितीही इच्छा होऊन शक्य होत नाही. पण आमचे हे आदरणीय सरकारी जावई आकडा टाकून वीज घेणार, घरात फ्रिज पासून एलसिडी पर्यंत भारंभार वस्तू कोंबणार, ६०-७० हजारांच्या पल्सर फिरवणार, पाईपलाईन फोडून पाणी घेणार आणि आम्ही ह्यांना पोसायचं. वर, १० वर्ष सरकारची जाग बळकावल्याचे बक्षीस म्हणून सरकार ह्यांना फुकट घरं देणार. वा रे वा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

(ज्या टेबलवरचं बिल त्या

तर्राट जोकर
Wed, 10/28/2015 - 19:58 नवीन
(ज्या टेबलवरचं बिल त्या टेबलवरच पे करायची सवय असल्यामुळे व पुढच्या भागांमधे नसते घोळ घालण्यापेक्षा एकदाच उत्तर देऊन टाकतो.) या भागावर परत प्रतिसाद द्यायची बिल्कुल इच्छा नव्हती. पण काही प्रतिसादांनी व्यथित केले आहे. त्यातला हा एक. असाच आशय असलेल्या इतर प्रतिसादांसाठीही हा प्रतिसादः
हजार फूट इथे मोजले काय किंवा चंद्रावर मोजले काय, सेमच येतात.
भौतिक शास्त्रानुसार कुठलेही हजार वर्गफुट कुठेही मोजले तरी सेमच असणार. पण तुमच्या विधानामागे तो अर्थ नाहीये हे तुम्हालाही कळतंय, तरी आपलं विधान रेटण्यासाठी चंद्राचा संदर्भ? सातपुड्याच्या डोंगरांमधे, अंटार्क्टिकाच्या बर्फावर, अमेझॉनच्या जंगलांमधे, हिमालय पर्वतावर, पॅसिफिकच्या समुद्रावर, गोबीच्या वाळवंटात अशी काही ठिकाणे आहेत जिथे जी हजार-बाराशे फूट जागा आपल्याला हवी आहे ती अगदी फुकट उपलब्ध आहे. जाऊन राहणार...? नाहीना. मग कुठलेही हजार फूट सेम कसे नाहीत हे पक्कं माहिती असतांना उगाच फाटे कशाला फोडायचे? कफपरेड वरिल १००० वर्गफुटाचा संपूर्ण अधिकृत फ्लॅट आणि आसनगाव येथील तेवढाच संपूर्ण अधिकृत फ्लॅट याची किंमत सेम का नाही मग? यांच्या भावातल्या फरकासाठी झोपडपट्टी कशी जबाबदार याचे उत्तर कुणीही द्यावे. मुंबईत बर्‍याच ठिकाणी राहतांना एक फरक माझ्या निरिक्षणात आला. एक हायफाय सोसायटी वा कॉलनीतल्या घराची किंमत आणि त्याच्याच बाजुला असणार्‍या झोपडपट्टीतल्या घराची किंमत कधीच सारखी नसते. कारण लोकॅलिटी. घरांच्या किंमती जागेवर किंवा बांधकामाच्या दर्जावर, सुविधांवर ठरत नसतात. त्या ठिकाणी राहणारे ती ठरवत असतात. इन-टाइम या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे लोक आपल्या सांपत्तिक स्थितीनुसार नकळत घेट्टो बनवून राहतात. हिरानंदानीच्या संकुलांमधे राहणारे 'त्यांची किंमत देऊ शकण्याची क्षमता असलेल्या लोकांबरोबर राहण्याची' किंमत देत असतात. जागेची वा सुविधांची नाही. पोवईच्या हिरानंदानीच्या संकुलातल्या १२०० वर्गफुटाची जागा आणि त्याच्याच बाजुला असलेल्या झोपडपट्टी वा चाळींमधल्या तेवढ्याच आकाराच्या घरांची किंमत सारखी नसते. इथे झोपडपट्टीतल्या लोकांवर उखडणार्‍या वा सरकारी जावई म्हणून हेटाळणी करणार्‍या लोकांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो की जर तुमच्या कडे घर घेण्यासाठी १ कोटी रुपये आहेत, तुम्हाला त्या एक कोटीत हिरानंदानीचा १२०० वर्गफुटाचा एक फ्लॅट घेता येईल, पण त्याचवेळेस त्याच्याच शेजारची चाळीवजा घरांमधे तेवढ्याच आकाराचं एक घर जर २० लाखात मिळत असेल तर ८० लाख वाचवण्यासाठी तुम्ही ते झोपडपट्टीतलं घर विकत घ्याल व तिथे राहायला जाल का?
बाकी जागेत बकर्‍या, कोंबड्या, गाय वा म्हैस, हातगाडी वा बैलगाडी, गोवर्‍या वाळवणे, हँडपंप किंवा विहीर, पाणी साठवायला हौद, कपडे वाळवण्याच्या दोर्‍या, उन्हाळ्यात झोपायला खाटा, जो काही काम-धंदा असेल त्यासाठी लागणारे सामान, हे असले चोचले मुंबईकर मध्यमवर्गीयांना नाही हो जमत. आम्ही आपले हॉल मधेच सोफा कम बेड, पॅसेज मधेच कपडे वाळत घालायच्या दोर्‍या, सगळ्या ॠतूंमधे तीच ती बेडरूम असं करून राहतो. माणसांनाच जागा नसल्याने प्राणी पाळणं कितीही इच्छा होऊन शक्य होत नाही.
माझ्या लेखात करुणरस अजिबात वापरला नाही पण प्रतिसादांमधून तो भरभरून वाहतोय. गरिबांनी उपरोक्त गोष्टी करणे हे चोचले कसे काय? गरिबांनी बकर्‍या, कोंबड्या, गाय वा म्हैस पाळणे म्हणजे नवाबाने, राजाने जातीवंत घोडे पाळणे असे समजता काय? हातगाडी वा बैलगाडी बाळगणे म्हणजे ६०-७० महगड्या स्पोर्ट्सकारचं गॅरेज बाळगणार्‍या मल्ल्यांच्या हौशीपणाचं गरिबी वर्जन आहे का? इथे गरिबाला, कष्टकर्‍याला अपराधी, गुन्हेगार असल्यासारखे वागवायची काय खुमखुमी आहे हेच मला कळत नाही. मुंबैत लोक आपल्या कर्माचे भोग भोगतायत. त्यात कुणा गरिबाच्या झोपडीचा नक्की कसा दोष हेही मला कळत नाही. तुम्हाला तुमच्या हॉलमधेच सगळे सोपस्कार उरकायला लागतात हा कुणा गरिबामुळे तुमच्यावर झालेला अन्याय आहे असं काहीसं तीरपागडं लॉजिक आपण लावत आहात. खरं बघितलं तर ते उलटं आहे. पुढे लेखमाला वाचाल तेव्हा लक्षात येईलच.
पण आमचे हे आदरणीय सरकारी जावई आकडा टाकून वीज घेणार, घरात फ्रिज पासून एलसिडी पर्यंत भारंभार वस्तू कोंबणार, ६०-७० हजारांच्या पल्सर फिरवणार, पाईपलाईन फोडून पाणी घेणार आणि आम्ही ह्यांना पोसायचं. वर, १० वर्ष सरकारची जाग बळकावल्याचे बक्षीस म्हणून सरकार ह्यांना फुकट घरं देणार. वा रे वा.
तुमच्या आदरणीय सरकारी जावयांना विधिवत सुविधा पुरवायला तुमच्या सरकारकडे वेळ नाही, इच्छा नाही. त्याहीपेक्षा मोठा बेमुवर्तखोरपणा म्हणजे मतदारयादीशिवाय तुमच्या सरकारला यांच्या अस्तित्वाशी काहीही घेणंदेणं नाही. त्यांच्या समस्यांवर उपाययोजना सोडा, ती फार पुढची गोष्ट. त्यांचे अस्तित्व मान्य करायलाही हे सरकार आणि हे सरकार चालवण्यास पैसे देणारे तुम्ही करदाते यांना गरज वाटत नाही. स्वतंत्र भारताचे तेही नागरिक आहेत. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या ऐपतीप्रमाणे जागा उपलब्ध करून देऊन, सोयी सुविधा पुरवायला तुमच्या सरकारला कोणीही अडवले नाही. तुमचे सरकार व्यवस्थेतल्या त्यांच्या उपस्थितीलाच महत्त्व देत नाही. तुमच्या सरकार आणि कायदेपाळू समाजाला हा गरिब वर्गच नकोय. त्यांची ऐपत नाहीये तर का येता शहरात? तिकडेच गावात का राहत नाहीत? इथे घाण का करतात? आमचं शहर बकाल का करतात? असे प्रश्न विचारायला फार मोठी अक्कल लागत नाही पण त्यांची उत्तरे शोधायला आणि ती मान्य करायला फार मोठं मन लागतं जे सद्यस्थितीत तुमच्या सरकार व समाजाकडे नाही. त्यांनी जगूच नये असेच तुमच्या सरकारला व समाजाल वाटत आलेय. त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत हे समजुन न घेता हेच आमच्यासाठी प्रॉब्लेम आहेत असंच ज्यांना वाटतं त्यांच्याकडून अधिक शहाणपणाची, संवेदनशीलतेची अपेक्षा करणं फोल आहे. आणि एक, तुमचे सरकार निवडून यायला मतदान करायला लागतं. तिथे तुम्हास नको असलेले हे गरिब, वॉर्ड असो वा लोकसभा, प्रत्येक निवडणुकीत १००% मतदान करत असतात. त्यांच्या मताच्या जोरावर राज्यकर्ते निवडून येतात. त्यामुळे तुम्हाला डावलून त्यांना व्यवस्थाबाह्य सुविधा पुरवायला तुमचेच राज्यकर्ते मदत करतात. त्यामुळे तुम्ही त्यांना पोसताय हा भ्रम काढुन टाकलात तर बरेच होईल. कुणाचा पोशिंदा वैगेरे होऊन मिरवण्याआधी जरा खोलात जाऊन विचार करावा, शोध व अभ्यास करावा. खरंच तुम्ही एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या जबाबदार्‍या पार पाडत असता तर आम्ही पोसतो वैगेरे चे वृथा अहंगंड बाळगण्याची गरजच उरली नसती. दुसरी बाजू अशी की याच झोपडपट्टीतून तुमच्या सुसंस्कृत, जबाबदार नागरिकांना लागणार्‍या काही अत्यावश्यक सेवा पुरवायला लोक मिळतात. थोडा विचार करा. ज्या सेवा हे लोक पुरवतात त्याच्यासाठी जर ते तुमच्यासारखे पगार आकारायला लागले तर त्यांनाही अधिकृत व चांगल्या सोसायट्यांमधे घरे घेता येतील. मुलांचे नीट संगोपन करता येईल. त्यांचे जीवनमान उंचावेल. सर्वत्र कायद्याचे राज्य येईल. पण महागाई वाढेल हो. त्याचे काय? किंवा मग तसे नको असेल तर असे करा की ज्या सेवा-सुविधा हे लोक पुरवतात त्या वापरणे बंद करा. आपोआप हे लोक शहर सोडून जातील, आत्महत्या करतील, नष्ट होतील. सोप्पंय न..? (डिस्क्लेमरः इथे झोपडपट्ट्यांमधून होणार्‍या गुन्हेगारी, कायदेबाह्य वर्तनास ग्लोरिफाय करण्याचा, समर्थन करण्याचा अजिबात हेतू नाहीये. कारण असे वर्तन फक्त झोपडपट्यांमधूनच होते असा गोड गैरसमज मी बाळगत नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

झैरातीसह सहमती.

नगरीनिरंजन
Wed, 10/28/2015 - 20:29 नवीन
झैरातीसह सहमती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

कविता आवडली. माझ्या

तर्राट जोकर
Wed, 10/28/2015 - 20:59 नवीन
कविता आवडली. माझ्या प्रतिसादात तुमच्या कवितेतल्याच भावना आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

असंघटित असणं हाच आत्मघात

मराठी कथालेखक
Tue, 04/12/2016 - 11:46 नवीन
दुसरी बाजू अशी की याच झोपडपट्टीतून तुमच्या सुसंस्कृत, जबाबदार नागरिकांना लागणार्‍या काही अत्यावश्यक सेवा पुरवायला लोक मिळतात. थोडा विचार करा.
+१ आमची मोलकरीण महिना ५०० रु मध्ये भांडी घासण्याचं काम करते, किंवा इस्त्रीवाला रु ६ मध्ये एक कपडा या दराने कपडे इस्त्री करुन घरपोच आणून देतो तेव्हा प्रामाणिकपणे काम करुनही हे लोक फक्त पोटच भरु शकतील त्यापलिकडे त्यांचा विकास होणं कठीण आहे हे जाणवतंच. माझा खोलवर अभ्यास नाही तरी पण साधारण निरिक्षणावरुन असे वाटते की जे संघटित नाही ते स्पर्धेमुळे स्वतःचे दर कमी ठेवतात आणि स्वस्तात सेवा पुरवितात तेच संघटना करुन सेवा पुरविणारे पहा.. उदा: न्हावी - केस कापण्याचे रु ४०-५०, दाढी २० ला असेल बहुधा. पंक्चर काढणारे : ट्युबलेसचा पंक्चर (कारसाठी ) ८० ते १०० रु ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

सेवेचे दर

स्वधर्म
Tue, 04/12/2016 - 16:08 नवीन
फक्त संघटीत असल्यामुळे जास्त मोबदला मिळतो हे बरोबर नाही, कारण दोन्ही जाॅब्जमध्ये फरक अाहे. केस कापायला शिकायला किमान सहा महीने लागतात, घरगुती स्वच्छतेचे काम एक दोन दिवसात कुणीही करू शकतो. हार्ट सर्जन संघटीत नसले तरी, तीन तासाच्या सेवेचे ५०-६० हजार घेतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

केस कापायला शिकायला किमान सहा

मराठी कथालेखक
Tue, 04/12/2016 - 16:34 नवीन
केस कापायला शिकायला किमान सहा महीने लागतात
सहा महिने ? आणि टायरचे पंक्चर काढायला किती शिकावं लागतं ? बाकी मागणी-पुरवठाचे तत्व आहेच, नेहमीच असेल पण पुरवठा वाढत असेल तरी नफा खूप जास्त घटू नये म्हणून संघटित असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे शब्दशः Monopoly ग्राहकाच्या हिताची नसते तशीच टोकाची perfect competition पुरवठादारासाठी मारक ठरते. सर्जनने तीन तासासाठी ५० हजार घेणं योग्य असलं तरी झाडू-फरशी करणार्‍या स्त्रीला १५ तासांसाठी (रोजचा सुमारे अर्धा तास) फक्त ५०० रु मिळावे हे कितपत योग्य आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

1200 चौरस फुटामध्ये 10बाय10

प्यारे१
Mon, 10/26/2015 - 14:44 नवीन
1200 चौरस फुटामध्ये 10बाय10 च्या 10 खोल्या निघणं अशक्य आहे. 1200 कारपेट एरिया म्हणजे फ्लॅट किमान 1700 चा असायला हवा. वाटतंय तसं नसतंय. किमान 30% तरी लोडींग आतल्या एरिया आणि त्यावरचं 15 तरी आणखी बाहेरच्या एरिया साठी येतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

१२०० वर्गफूट

चित्रगुप्त
Mon, 10/26/2015 - 15:15 नवीन
लईच गुंता झालाय धाग्याचा.'१२०० वर्गफूट' हाच जणू या लेखाचा गाभा आहेसं झालंय. एवढ्या कार्पेट एरियात किती खोल्यांचा फ्लॅट् असतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

असं कसं असं कसं? पत्रावळी,

बॅटमॅन
Mon, 10/26/2015 - 15:18 नवीन
असं कसं असं कसं? पत्रावळी, पार्टिशन टाकून खोल्या करता येतीलच की. इतके लोक म्हणताहेत म्हणजे जागा लैच मोठी असणारच, पण तुम्ही उगीच बाजू घेताय झालं. तुम्हांला सर्कारी दोडक्यांची काळजीच नाही. फक्त लाडकेच दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

लेखन आवडले. ग्लोरिफिकेशन न

नगरीनिरंजन
Mon, 10/26/2015 - 14:07 नवीन
लेखन आवडले. ग्लोरिफिकेशन न करता किंवा अकारण बीभत्सपणा न करता लिहील्याने जास्तच. कुडाच्या भिंती, माती दाबून सपाट केलेली जमीन इत्यादी गोष्टी दुर्लक्षून फक्त १२०० स्क्वे.फू. आकडा पाहून काहींची जळ्जळ झाल्याचे पाहून माफक मनोरंजन झाले पण उद्वेगही वाटला. इतरांचे प्रतिसाद वाचायची खोड काही जात नाही माझी.
  • Log in or register to post comments

ह्म्म्म

आदिजोशी
Mon, 10/26/2015 - 15:54 नवीन
१२०० स्क्वे.फू. आकडा पाहून काहींची जळ्जळ झाल्याचे पाहून माफक मनोरंजन झाले पण उद्वेगही वाटला ह्याचा अर्थ तुम्हाला आमचे प्रतिसाद कळलेच नाहीत. १२०० स्क्वे फू काय कुणी अगदी १२००००००००० स्क्वे मै ची घरं बांधलीत तरी आम्हाला जळजळ व्हायचा संबंधच काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

या धाग्याचा गाडा बाराशे

चित्रगुप्त
Mon, 10/26/2015 - 17:41 नवीन
या धाग्याचा गाडा बाराशे वर्गफुटात रुतलाय जणू. ....आमचं घर, कुडाचं, पक्कं नाही. पण हवेशीर. झोपडी नाही. मोठ्या बल्ल्यांनी मजबूत बांधलेले, मातीने लिपलेल्या जाड भिंती असलेलं दहा-बाय दहा च्या दोन खोल्या असलेलं... उंच व मजबूत होतं, प्रशस्त नव्हतं, गरजेपुरतं. जागा फारशी नाही एकूण हजार-बाराशे फूट.... म्हणजे प्रत्यक्ष घरात १० बाय १० च्या दोन खोल्या होत्या, बाकीचं अंगण होतं, त्यात कदाचित मी लिहिल्याप्रमाणे असावं. लेखकाने त्याच्या लहानपणीच्या आठवणी लिहीत आहे, त्या काळच्या विशिष्ट परिस्थितीबद्दल आपण वाचकांनी भले बुरे अभिप्राय देण्याची खरेतर गरज नाही. परंतु '१२०० वर्गफुट म्हणजे कमी की जास्त' याचा निकाल लेखकानेच लावावा. तो असा, की "जागा फारशी नाही एकूण हजार-बाराशे फूट" असे लेखकाच्या वडिलांना काय कारणाने वाटत होते? आसपासची इतर घरे त्यापेक्षा जास्त मोठ्या जागेवर होती का ? की वडील या जागेत येण्यापूर्वी त्यापेक्षा खूप मोठ्या जागेत रहात होते ? (किती वर्गफुटात ?? पुणेरी प्रश्न) वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

फक्त १२०० स्क्वे.फू. आकडा पाहून काहींची जळ्जळ झाल्याचे पाहून माफ

सुबोध खरे
Mon, 10/26/2015 - 15:16 नवीन
फक्त १२०० स्क्वे.फू. आकडा पाहून काहींची जळ्जळ झाल्याचे पाहून माफक मनोरंजन झाले पण उद्वेगही वाटला. न नि साहेब मागे एका दुसर्या धाग्यावर लिहिलेला प्रतिसाद परत लिहित आहे. हिरानंदानी रुग्णालयातील आमच्या विभागातील( मी विभाग प्रमुख होतो) एक अत्यंत कष्टाळू स्वागत सहायिका, हिचा पगार तेंव्हा ८ हजार होता. तिने डोंबिवली स्थानकापासून २० मिनिटांच्या अंतरावर घर घेतले ३३० चौ फुट. ज्यासाठी तिचा हप्ता होता ८०००/- रुपये २० वर्षासाठी. तिचे यजमान कुठे तरी दुसरीकडे नोकरीला होते. हिचा पूर्ण पगार ( पुढची २० वर्षे) तो हप्ता फेडण्यात जाणार होता. त्यांच्या शिल्केतील रक्कम पहिले २० % भरण्यात गेली होती. स्थानकापासून २० मिनिटे ती चालत येउन मुलीला आईकडे( डोम्बिवलीतच) ठेवून ती कामावर येत असे. त्याच वेळेस चेंबूर च्या झोपडपट्टी तील लोकांनी मोर्चा काढला होता. त्यांना झोपू योजनेत फुकट मिळालेली घरे २५० चौ फुट होती त्यांना ती नको होती तर घरे ३५० चौ फुट हवी होती. चोर तो चोर वर शिरजोर याचे दुसरे उदाहरण दिसणार नाही. एकीकडे प्रामाणिकपणे कष्ट करणारी निम्न मध्यमवर्गातील महिला मी रोज पाहत होतो आणि इकडे फुकट सरकारी जागेत राहून मुंबईत फुकट मिळणारे घर यांना वाढवून हवे होते आणि त्यासाठी एक पैसाही द्यायची त्यांची तयारी नव्हती. असे पाहून आमचे मधमवर्गीय इमान जळते याला तुम्ही जळजळ म्हणा किंवा काहीही. थोडक्यात काय प्रामाणिक पणाला किंमत नाही असे खेदाने म्हणावे लागते. आणि हे पाहून आपले मनोरंजन झाले हे पाहून खेद वाटतो.
  • Log in or register to post comments

काय त्रास आहे भेंडी,

बॅटमॅन
Mon, 10/26/2015 - 15:21 नवीन
काय त्रास आहे भेंडी, दोन्हीकडचे प्रतिसाद पटताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बरोबर आहे. पण म्हणून

नगरीनिरंजन
Mon, 10/26/2015 - 20:46 नवीन
बरोबर आहे. पण म्हणून झोपडपट्टीतल्या ३५० चौ फुटाची तुलना मध्यमवर्गीय ३५० चौ फुटांशी होऊ शकत नाही. नाहीतर सगळेच झोपडपट्टीत राहायला गेले असते. पत्र्याच्या खोलीत *गले असते आणि रेल्वे लाईनवर *गले असते. मुळात एकाच ठिकाणी केंद्रित होणारी ही ट्रिकल डाऊन व्यवस्था बदलायची ज्यांना त्या व्यवस्थेचा थोडासाही फायदा असेल त्यांची तयारी नाही. त्यामुळे आहे ते स्विकारण्यावाचून गत्यंतर नाही. झोपडपट्टीत राहणारे अगदी सुखात नसतात एवढं लक्षात ठेवलं म्हणजे पुरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खरेसाहेब, तुमच्या समजूतीतच

तर्राट जोकर
Wed, 10/28/2015 - 21:37 नवीन
खरेसाहेब, तुमच्या समजूतीतच ढीगभर चुका आहेत. सांगण्याचा पद्धतीमुळे कहानीच्या परिणामावर प्रभाव पडतोच. स्वागत साहय्यिकेने घर घेतले. म्हणजे नोकरी मिळवण्याइतपत तिचे नीट शिक्षण झाले होते. हिरानंदानीसारख्या उच्च-भ्रू इस्पितळात आहे म्हणजे स्मार्ट, नीटनेटकी, चांगलं संवादकौशल्य, प्रेझेंटेबल व्यक्तिमत्व असणारी असेल. घराची किंमत अंदाजे १० ते १२ लाख असेल. तीला ८ लाख रुपये कर्ज मंजूर झाले म्हणजे बँकेला तिच्याकडे तेवढे कर्ज मिळवण्याची पात्रता आहे हे दिसले. डीपी भरायला तिच्या नवर्‍याकडे २-३ लाख असतील. म्हणजे तोही सुशिक्षित व नोकरीवर असेल. शिवाय त्याच्या पगारातून घर चालेल याची हमी आहे. आता पगार ८ हजार आहे म्हणजे किमान दहा वर्षांनीही तो आठच असेल असेही नाही. नवर्‍याचाही आता आहे तोच असेल असेही नाही. दहाच वर्षांनी तिचा पगार किमान १३-१५ हजार झालेला असेल. नवर्‍याचाही वाढलेला असेल. मग ते आता विकत घेतलेले घर चढ्या किंमतीत विकून दुसरीकडे दुसरं घर विकत घेतील. ह्यात तिच्या पगाराचा इएमाय म्हणून विचार केला तर किमान ३०-३५ लाखाचं घर ते घेऊ शकतील. किंवा हे उपद्व्याप केलेच नाहीत तरी सेविंग्स वाढतील. कारण घराचा हफ्ता तर कॉन्स्टंट आहे ना? यात अगदी दु:खाने कळवळून जाण्यासारखं काय आहे. यापेक्षा अधिक कष्टप्रद कहान्या तुमच्या-आमच्या परिघाबाहेर घडत असतात. स्वागत-सहाय्यिकेची ही परिस्थिती बेकायदा वस्ती करावी लागणार्‍यांकडे नसते. अंगावरच्या कपड्यानिशी शहरात येणार्‍यांना आयुष्याची सुरुवात करायला फक्त झोपडपट्टी हाच एक आसरा असतो. त्यांच्याकडे तुमच्या मालमत्तेवर धाड घालायला टपलेले रामोशी-दरवडेखोर म्हणून बघू नका. जे मोर्चा काढतायेत त्यांच्या मागण्या आपण बघितल्या, समस्या व परिस्थिती आपण बघितली का? झोपडपट्टी निर्माण होणे हे सरकारचे अपयश आहे. त्यामुळे सरकारलाच त्यांना जागा देणे भाग आहे. असे नको असेल तर मध्यमवर्गीय इमानदारांनी सरकारवर अंकुश ठेवून आधीपासूनच झोपडपट्टी निर्माण होण्यास प्रतिबंध करावा. बहुमत असून, क्षमता असून व्यवस्थेत सक्रिय सहभाग न घेता, त्याचमुळे होणार्‍या दुष्परिणामांवर कढ काढण्याशिवाय मध्यमवर्गीय इमानदार लोकांनी आजवर वेगळे काय केले आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

उदाहरण

चित्रगुप्त
Mon, 10/26/2015 - 15:41 नवीन
बॅटमनपंत, आपल्या जुन्या साहित्यात एका शब्दाभोवती सारे काव्य फिरत असल्याचे उदाहरण आहे का एकादे ? मोरोपंत, वामनपंडित वगैरेंचे ?
  • Log in or register to post comments

ठंठं ठ ठंठं ठठ ठं ठठंठः

बिपिन कार्यकर्ते
Mon, 10/26/2015 - 15:51 नवीन
रामाभिषेके जलमाहरन्त्या: हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्या:। सोपानमार्गेण करोति शब्दं ठंठं ठ ठंठं ठठ ठं ठठंठः॥ http://www.misalpav.com/node/12242 खुद के साथ बातां : हा लेकाचा मेव्या कुठे आणि का गायबलाय कोण जाणे! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

पाहून सांगतो. एकच शब्द

बॅटमॅन
Mon, 10/26/2015 - 15:55 नवीन
पाहून सांगतो. एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरल्याची उदाहरणे आहेत, पण एकाच शब्दाभोवती फिरणारे....पाहिले पाहिजे. मोरोपंतांची काही उदाहरणे आहेत आय गेस. पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

भारवीची उदाहरणे आहेत पण त्यात

बॅटमॅन
Mon, 10/26/2015 - 15:59 नवीन
भारवीची उदाहरणे आहेत पण त्यात एकच अक्षर किंवा दोनच अक्षरे अशी आहेत, उदा. "यायायायायायायाया" किंवा "तित्तिरी रतति तीरे, तीरे तीरे तरौ तरौ" वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

उदाहरणे

चित्रगुप्त
Mon, 10/26/2015 - 16:41 नवीन
जेवढी उदाहरणे असतील, ती सर्व द्यावा द्येवा. तेवढाच पंत-संत कवींचा अभ्यास होईल या निमित्ताने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

माझं आवडतं आणि एकंदरीत प्रतिसाद तित्तिरी रौति असल्याने ....

सूड
Wed, 10/28/2015 - 20:47 नवीन
तारतारतरैरेतैरुत्तरोत्तरतोरुतै: रतार्ता तित्तिरी रौति तीरे तीरे तरौ तरौ ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कवितेच्या नशेत तर्राट होऊन

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/28/2015 - 22:37 नवीन
कवितेच्या नशेत तर्राट होऊन असं कायबाय तरातरा लिव्हलं की त्याचा नशापानी न करणार्‍यांसाठी काय अर्थ असतो ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

लोकशाही मधे प्रमाणिकपणा वगैरे

नाना स्कॉच
Mon, 10/26/2015 - 16:07 नवीन
लोकशाही मधे प्रमाणिकपणा वगैरे नुसत्या गफ्फा असतात असे वाटते अन सार्वत्रिक अनुभव ही तोच आहे,मध्यमवर्गीय इमान वगैरे काही नसते , जे काही असते ते फ़क्त "lack of opportunity" असते, जगणे हा एक धंदा मानल्यास ज्याला आपण मध्यमवर्गीय इमान वगैरे थोरली नावे देतो ते म्हणजे थोडक्यात आपण जगण्याच्या धंद्यात काही इन्वेस्टमेंट लावतो अन रिटर्न्स घेतो तसेच काही लोक इन्वेस्टमेंट न करता रिटर्न्स घेतात तश्यातला प्रकार आहे! उद्या मध्यमवर्गात काहीतरी बेकायदेशीर करणे fashionable झाले तर लोक सर्रास करतीलच ते सगळे बाकी मनुष्यस्वभाव कोणाला चुकत नाही, जरा या आमच्या सातार्यात एक से एक अधिकारी अन जेसीओ दाखवतो रिटायर्ड, पोस्ट रिटायरमेंट सगळे माळकरी पण महिन्याच्या एक तारखेला कोणीच कोट्याची बाटली/ल्या सोडत नाही, घरापुढे एक भुसारमालाचे बारके दुकान अन मागच्या पत्रा शेड मधे "₹५/ग्लास" आर्मी रम ची विक्री! हीच ती संधी अन इन्वेस्टमेंट असते असे मनःपूर्वक वाटते (आर्मी बद्दल आदर असलेला तरी डोळसपणे सगळे पाहणारा ) नाना
  • Log in or register to post comments

प्रमाणिकपणा वगैरे नुसत्या गफ्फा असतात असे वाटते

सुबोध खरे
Mon, 10/26/2015 - 17:09 नवीन
प्रामाणिकपणावर विश्वासच नसेल तर प्रश्नच मिटला. कालच्याच बातमीत रिक्षा वाल्याने काळ १ लाख रुपये आणि लैप टॉप परत केला ते काय त्याला संधी नव्हती म्हणून. अण्णा हजारे, बाबा आमटे, प्रकाश आमटे इ माणसे सुदैवाने आजच्याच काळातील आहेत. पण लोकांच्या चांगुलपणावर आपला विश्वासच नाही हा आपला प्रश्न आहे. आपण ज्या रंगाचा चष्मा लावाल जग तसे दिसेल.असेच नव्हे तर तसेच जग तुमच्या वाट्याला येईल. तुमच्या वाट्यालाच नेहमी लुटणारा डॉक्टर, वकील, सरकारी नोकर, दुकानदार येईल. काही लोक इन्वेस्टमेंट न करता रिटर्न्स घेतात अशांच्या बाबतीत आपल्याला आदर वाटतो म्हणताय मग बोलणेच खुंटले. माझे मत असे आहे कि ६६ % लोक भ्रष्ट नाहीत कारण त्यांना संधी मिळत नाही ३३% लोक भ्रष्ट आहेत. पण १% लोक असे आहेत कि "संधी मिळूनही" ते प्रामाणिक असतात.शिवाय भ्रष्ट माणसे सुद्धा बर्याच वेळेस अतिशय चांगले काम करताना दिसतात. आपले म्हणणे ३४ % लोक भ्रष्ट आहेत आणि ६६ टक्क्यांना संधी मिळत नाही असे आहे तर तसे ठीक. जे मला वाटले त्याला मी मध्यमवर्गीय इमान म्हणालो. त्याला इमान म्हणा. संस्कार म्हणा. ते नाहीच आपण म्हणता तर तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात आणि मी माझ्या जागी. बाकी तुम्हाला आर्मी बद्दल आदर असो किंवा नसो काय फरक पडतो. बढीया है. आपल्याला काही पटवून द्यावे असे मला मुळीच वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

कालच्याच बातमीत रिक्षा

नाना स्कॉच
Mon, 10/26/2015 - 17:24 नवीन
कालच्याच बातमीत रिक्षा वाल्याने काळ १ लाख रुपये आणि लैप टॉप परत केला ते काय त्याला संधी नव्हती म्हणून. अण्णा हजारे, बाबा आमटे, प्रकाश आमटे इ माणसे सुदैवाने आजच्याच काळातील आहेत. Exceptions are not examples, अपवाद हे उदहारण नसते, उद्या ७५% रिक्षावाले लाख रूपयाच्या गड्या परत करू दे मग पाहता येईल, थोरामोठ्यांची तुम्ही घेतलेली नावे हे सुद्धा असेच अपवाद आहेत असे नसते तर ट्रेन मधे एकमेकांस टाळ्या देत "बीसी अण्णा के आंदोलन में जाना था टिकट कन्फर्म नहीं था, टीटीई को २०० रुपया दिया तो कन्फर्म बर्थ मिला मेरेको" म्हणणारी तरुणाई दिसली नसती साहेब, शिवाय काही लोक इन्वेस्टमेंट न करता रिटर्न्स घेतात अशांच्या बाबतीत आपल्याला आदर वाटतो म्हणताय मग बोलणेच खुंटले. मी मला "आदर" वाटतो असे कुठे म्हणले आहे इन्वेस्टमेंट न करणाऱ्याबद्दल? काहीही उगीच! मी फ़क्त इतके म्हणतो आहे की काही विशिष्ट परिस्थिती (circumstrances) असे असतात की एक गट आपली सामाजिक उतरंडीमधली जागा अबाधित ठेवायला इन्वेस्टमेंट करतो अन एक गट त्याच सामाजिक-आर्थिक उतरंडी मधे वर चढायला विधिनिषेध गुंडाळून इन्वेस्टमेंट न करता ते फायदे घेतो , ह्यात तुमच्याच परिभाषेनुसार "आदर" कुठला चष्मा घातल्यामुळे तुम्हाला दिसतो आहे हा तुमचा प्रश्न आहे. शिवाय, मला काही समजावणे हे आपले काम नाहीच तरीही ते स्पष्ट केल्याबद्दल आपले आभार
  • Log in or register to post comments

प्रश्न ९९ टक्क्यांबद्दल नसून

सुबोध खरे
Mon, 10/26/2015 - 17:45 नवीन
प्रश्न ९९ टक्क्यांबद्दल नसून उरलेले १ टक्का आहेत कि ० टक्के आहेत एवढाच आहे. इति लेखनसीमा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

डॉक, उरलेले कीतीही ट्क्के

खटपट्या
Mon, 10/26/2015 - 20:50 नवीन
डॉक, उरलेले कीतीही ट्क्के असुदेत पण ते आहेत. आणि त्यांच्यामुळेच जो काही चांगुलपणा दीसतोय तो आहे. त्यामुळे जाउदे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

जरा धिराने घ्या , लेख पुर्ण

palambar
Mon, 10/26/2015 - 19:47 नवीन
जरा धिराने घ्या , लेख पुर्ण तर होउ द्या . मग आहेच प्रतिक्रिया लिहिणे आणि वाचणे,
  • Log in or register to post comments

लेखन मनाला भिडले.

विवेकपटाईत
Mon, 10/26/2015 - 20:35 नवीन
लेखन मनाला भिडले. बाकी आदिजोशी ताई, गरिबांना दोष नका देऊ, मजबुरी आहे त्यांची. दिल्लीत कुठे हि नवी कालोनी (अनधिकृत) तिथे सुरवातीला काहीच नसते. मी उत्तम नगर येथे राहायला आलो, तेंव्हा, वीज पाणी काहीच नव्हते. ४-५ वर्षांनी वीज पाणी इत्यादी आले. तो पर्यंत ५० रुपये महिना देऊन वीज घ्यावी लागत होती. कुणा कडून ते सांगण्यात अर्थ नाही. 'मजबुरी का नाम महात्मा गांधी' हेच लक्ष्यात ठेवावे. पाणी टेंकरचे. उत्तम नगर येथे किंवा संपूर्ण बाह्य दिल्ली येथे. १५ ६० चा प्लॉट मध्ये प्रत्येक माल्यावर १०x१० पाच खोल्या आणि ३ x ३ चा कॉमन संडास आणि ३x५ चा बाथरूम. शिवाय १० रुपये unit विजेचे आणि एक केनी २० लिटर पिण्याचे पाणी. बाकी वापरायला sabmarsible चे खारे पाणी. ३ माल्याचा घरात १५ भाडेकरू राहतात. घरमालक खालच्या माल्यावर राहतो अर्थातच १५ x ६० ची संपूर्ण जागा. दिल्लीत १ कोटीहून अधिक लोक असेच राहतात.
  • Log in or register to post comments

@विवेकपटाईत -

सुबोध खरे
Mon, 10/26/2015 - 21:10 नवीन
@विवेकपटाईत - पटाईत साहेब झोपडीत कुणी पंचतारांकित सुविधा आहेत हे कुणीच म्हणत नाहीये किंवा तेथे प्रश्न नाही असेही नाही. सरकारी जमिनीवर फुकट राहायचे. सर्व सरकारी साधन सामुग्रीचा वापर करायचा इथपर्यंतहि एकवेळ ठीक आहे. पण तीच साधन सामुग्री दुसर्याला विकायची आणि त्यातून पैसा मिळवायचा हे मान्य होऊ शकत नाही. मग रेल्वे चे स्लीपर, कोळसा किंवा विजेच्या तारा विकणारे आणि या लोकांत काय फरक आहे? ती पण सरकारीच संपत्ती आहे ना? मी उदाहरण दिले आहे कि एक निम्न मध्यमवर्गीय स्त्री प्रामाणिक कष्टाने एक जागा घेते ज्यासाठी तिला आपला २० वर्षाचा पगार द्यावा लागतो. तिच्या यजमानांची सर्व संचित पुंजी द्यावी लागते आणि तरीही झोपडपट्टी सुधार योजने पेक्षा कमी जागा मिळते.इथे सरकारी जमीन बळकावून एकहि पैसा न मोजता यांना मुंबईत जास्त जागा पाहिजे आणि त्यासाठी ते मोर्चा काढतात हे पटत नाही. झोपू मध्ये घर दिल्यावर त्याचा पूर्ण नाही तरी काही अंशी काहीतरी मोबदला त्यांनी भरावा एवढी माफक अपेक्षा आहे अन्यथा प्रामाणिक माणसाना फसवले गेल्याची भावना आहे. अधिक काय लिहिणे. मी माझे स्वतःचे उदाहरण देण्याचे एकच कारण सरकारी नोकरीत सर्वात जास्त पगारावर( आय ए एस पेक्षा जास्त सुरुवातीचा आणि पुढे १२ वर्षे पगार असूनही) लागलेल्या माझ्या सारख्या माणसाला १८ वर्षे नोकरी करून एक ५६० चौ फुट घर मुंबईच्या "टोकाला" घेताना तोंडाला फेस येतो आणि येथे सरकारी जमीन "फारशी नाही हजार बाराशे फुट"म्हटलेले चालते? असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

>>>>> आदिजोशी ताई

प्यारे१
Mon, 10/26/2015 - 20:43 नवीन
>>>>> आदिजोशी ताई मेलोच्च्च्च्च!
  • Log in or register to post comments

लोळ

खटपट्या
Mon, 10/26/2015 - 20:50 नवीन
लोळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अगागगगगगग!!! ह्या नविन तै कोण

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 10/26/2015 - 21:43 नवीन
अगागगगगगग!!! ह्या नविन तै कोण ओ प्यारे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अख्ख्या

नाखु
Tue, 10/27/2015 - 10:26 नवीन
धाग्यावर एक्च ती काय ती झुळुक !!!!!! चला हावा येऊ द्या फेम नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

खरंच, 1200 वर्गफुटाच्या टीचभर

चित्रगुप्त
Wed, 10/28/2015 - 01:45 नवीन
खरंच, 1200 वर्गफुटाच्या टीचभर जागेत दम घुटत होता , या झुळुकेमुळे जरा टवटवी आली पंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

पुन्हा तेच.1200 वर्गफुट

प्यारे१
Wed, 10/28/2015 - 11:30 नवीन
पुन्हा तेच.1200 वर्गफुट म्हणजे टीचभर पण नै ओ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

तर्राट जोकर ह्यांनी सर्व

अभिजीत अवलिया
Tue, 10/27/2015 - 22:11 नवीन
तर्राट जोकर ह्यांनी सर्व गोष्टी स्पष्टपणे लिहिल्यात त्याबद्दल थोडे कौतुक आहे. पण असे सरकारी जमिनीत अतिक्रमण करून राहणे, पाणी, वीज दुसर्याला विकणे ह्या गोष्टी मुळीच आवडलेल्या नाहीत. खरे साहेब आणी आदी जोशी ह्यांच्याशी पूर्णपणे सहमत. तर्राट जोकर साहेब ह्या गोष्टी (सरकारी जमिनीत अतिक्रमण करून राहणे, पाणी, वीज दुसर्याला विकणे) आता करत नसतील अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

लेखकाच्या बालपणीच्या

बोका-ए-आझम
Wed, 10/28/2015 - 09:16 नवीन
काळातला लेख आहे. अशा वेळी तजोंना काही choice होता का? आणि एवढ्या प्रांजळपणे लिहिल्याबद्दल तरी त्यांचं अभिनंदन हे करायलाच पाहिजे. पण डाॅक्टर खरे आणि आदिजोशी यांचे मुद्देही बरोबर आहेत.
  • Log in or register to post comments

पुढील भाग केंव्हा ?

चित्रगुप्त
Wed, 10/28/2015 - 09:31 नवीन
पुढील भाग लवकर येऊ द्या तजो. आणि पहिल्या भागासारखाच एकदम प्रांजळ आणि बिनधास्त . आणि हो, तुमच्या नंतरच्या जीवन प्रवासात किती किती वर्ग फुटाच्या जागेत राहिलात हे सांगणे हा कळीचा मुद्दा .
  • Log in or register to post comments

ओ काका! इथेच इतकी शाळा झाली

बिपिन कार्यकर्ते
Wed, 10/28/2015 - 10:04 नवीन
ओ काका! इथेच इतकी शाळा झाली बिचार्‍याची... आता कोणी नुसतं वर्ग असं म्हणलं तरी ते फुट म्हणतील त्याला. ;) (तुम्हाला अजून थंड हवेची झुळुक मिळावी यासाठी हा एक क्षीण प्रयत्न होता असे समजून ह. घ्या. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

लेखक महाशय सध्या

मार्मिक गोडसे
Wed, 10/28/2015 - 13:05 नवीन
लेखक महाशय सध्या ५ दिवसाच्या रजेवर आहेत. उद्या रजेचा शेवटचा दिवस आहे. ते 'तर्राट' कधीच नव्हते, हे त्यांनी आतापर्यंत 'तर्राट जोकर' ह्या आयडीने दिलेल्या प्रतिसादांमधून दिसून आले. काळजी घेवूनही त्यांच्या प्रतिसादात त्यांच्या जुन्या आयडीची सही डोकवायची. ह्या लेखाचे पुढील भाग लिहिताना काही गडबड नको म्ह्णून ते ह्या ५ दिवसात आपल्या जुन्या आयडीने दिलेले प्रतिसाद अभ्यासत आहे.
  • Log in or register to post comments

गोडसे साहेब, सीआयडी साठी

तर्राट जोकर
Wed, 10/28/2015 - 21:01 नवीन
गोडसे साहेब, सीआयडी साठी मालिकेचे भाग अगदी उत्तम लिहू शकाल. बाकी कुछ हो न हो, तुम में ये बात तो जरूर हैं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

इति शेकट्री की श्यायडी ?! ;)

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/28/2015 - 22:11 नवीन
इति शेकट्री की श्यायडी ?! ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

लिहीत रहा..

चिगो
Wed, 10/28/2015 - 16:04 नवीन
वाचतोय..
  • Log in or register to post comments

तुम्ही त्या काळच्या

सूड
Wed, 10/28/2015 - 20:54 नवीन
तुम्ही त्या काळच्या परिस्थितीचं वर्णन करताय, पण त्याचं उदात्तिकरण केलेलं मला तरी दिसलं नाही. इथून पुढेही दिसणार नाही अशी अपेक्षा करतो. लिहीत राहा. तुमचं लिखाण मुक्तपीठीय नक्कीच नाही. लोकांच्या प्रतिसादांबद्दल म्हणाल तर जुने मिपाकर म्हणायचे ते म्हणतो. "बोर्डावर आलं की लोक शिट्ट्या मारणारच" त्यामुळे ते चालू द्यावं. स्वतःच्या धाग्यावर मोजून दोन डोक्यावरुन पाणी तीन प्रतिसाद द्यावेत. लोकांना तुम्ही कितीही घसा फोडून सांगितलंत तरी ते त्यांना ऐकायचं असतं तेवढंच ऐकणार. पुढील भागाच्या प्रतिक्षेत!! अर्थात अपप्रवृत्तींचं उदात्तीकरण होणार नाही अशी अपेक्षा ठेवून.
  • Log in or register to post comments

सूडभाऊंच्या प्रतिसादाशी सहमत.

तर्राट जोकर
Wed, 10/28/2015 - 22:05 नवीन
सूडभाऊंच्या प्रतिसादाशी सहमत. तुमचा सल्ला मनापासून पटल्याने इथेच थांबतो. हा काथ्याकूटाचा धागा नाही हे लक्षात आहेच. पण म्हणतात ना आधीं होता वाघ्या। मग झाला पाग्या।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।।, :-) ह्या पद्धतीचे लेखन हा माझ्यासाठी एक प्रयोग होता. काही कलाकृतींमधे स्वत:चं असं (नवरसांपैकी) काही नसतं, काही मेसेज, तत्त्वज्ञान, तात्पर्य असं काही नसतं. पण वाचक, दर्शक व रसिकांमधे काय आहे ते त्या बाहेर काढतात. उपरोक्त लिखाण हा एक नमुना समजलात तरी हरकत नाही. प्रत्येक वाचकाची स्वतःची पार्श्वभूमी, आकलन, संस्कृती, शिक्षण, विचारसरणी, अनुभव-संपन्नता ही प्रतिसादातून डोकावली. प्रतिसाद वाचले की ते लेखाबद्दल नसून लेखातल्या मुख्य विषयाबद्दल त्यांच्या व्यक्तिगत भूमिकेला मांडणारेच वाटतील. त्या भूमिका लेखामुळे, त्यातल्या प्रसंगांमुळे तयार झाल्या असे नाही. मी हे तिन्ही बाजूंच्या प्रतिसादांचे निरिक्षण करून लिहितोय, काहींनी झोपडपट्टीरहिवाशांची बाजू समजून घेतली, काहिंनी कट्टर विरोध केला, काही तटस्थ राहीले. इथे प्रतिसादांमधे सदस्यांचे स्वतःचेच प्रतिबिंब दिसत आहे. हा प्रयोग यशस्वी झाला यातच आनंद आहे. असो. काही बाबतीत मतभेद व सहमती राहणारच. माझ्या प्रतिसादांमधून कुणास वैयक्तिक झाल्यासारखे वाटत असेल तर क्षमस्व. तिन्ही बाजूंच्या सर्वच नव्या-जुन्या प्रतिसादकांना अनेक धन्यवाद! असाच लोभ असु द्या. अधिक अभ्यासासाठी कालच त्या वस्तीला भेट देऊन आलोय. पुढचा भाग शनिवारी. तबतक के लिये धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

चर्चा तर होणारच....... लेख

लालगरूड
Wed, 10/28/2015 - 23:25 नवीन
चर्चा तर होणारच....... लेख आवडला.... लेखकाचे संयमित प्रतिसाद आवडले
  • Log in or register to post comments

झोपडपट्टी ही मानसिकता आहे

आदिजोशी
गुरुवार, 10/29/2015 - 11:54 नवीन
झोपडपट्टीत राहणे ही मजबूरी असण्यापेक्षा मानसिकता आहे. वैयक्तिक आयुष्य डिस्कस करायचे नाही, पण आत्यंतीक गरिबी काय असते हे केवळ २ पिढ्यांआधीच अनुभवले आहे. त्यामुळे झोपडपट्टीत राहण्यासाठी दिलेले कुठलेही कारण ही निव्वळ सबब असते असे माझे ठाम मत आहे. त्यात झोपडपट्टीतल्या लोकांचं राहणीमान बघता (त्यांनी कसं रहावं हा माझा विषय नाही आणि त्याविषयी मतही नाही) अनेक जण बळकावलेली जमीन सोडून दुसरीकडे राहणे शक्य असूनही मोक्याच्या ठिकाणची जागा, फुकट घर, फुकट पाणी, फुकट वीज इत्यादी अनेक कारणांमुळे झोपडी सोडायला तयार नसतात हे वास्तव आहे. माझ्या प्रतिसादातून तुम्ही तुम्हाला खुशाल हवे ते अर्थ काढून भला मोठा प्रतिसाद दिला आहे. पण त्यात मला काय म्हणायचे आहे ह्याचा तुमच्या सोयीनुसार पूर्णपणे विपर्यास केलेला आहे. असो. जे माझे नाही ते बळकावायचे आणि वरून त्याचे समर्थन करायचे ही मानसिकता हा मूळ मुद्दा आहे. त्या भोवती बाकिचा फाफटपसारा (राजकारणी, निवडणूका, अत्यावश्यक सेवा, इ.) लावल्याने ते सत्य बदलत नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा