मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झोपडपट्टीतले दिवस: भाग एक

तर्राट जोकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आम्ही तेव्हा झोपडपट्टीत राहायचो, रेल्वेच्या जागेत अतिक्रमण झालेली अठरापगड जातींच्या सरमिसळीची गोधडी. एक मोठा निळा फडका आणि बाकीचे छोटे छोटे रंगीबिरंगी ठिगळ असलेली. शहराच्या आजूबाजूच्या शेकडो गावांतून इथे दोन-चार, दोन-चार करत आलेली, मोलमजुरी, हमालीचं काम करणारी बिर्हाडं. आवसेला न चुकता डडंग-डंग...चिक...डडंड-डंग....डडंग-डंग...चिक...डडंड-डंग करत येणारा स्वच्छ कपड्यातला, अगदी वारकरी वाटणारा मांग. परिसरात मेलेली जनावर ओढायचं, त्यांचं कातडं काढून विकायचं काम करणारे महार, कुठे कोणाच्या घरी धुणी-भांडी करणार्‍या बाया, दोन-तीन बकर्‍या घेऊन चरायला जाणारी अल्पवयीन बालकं, घराच्या लिंपणासाठी कायम चुन्याची माती शोधत असणार्‍या मुली. जयंत्या-महानिर्वाणाच्या दिवशी वाजणारे भयाण आवाजातले भोंगे, कुणाच्या पाचव्या वाढदिवशी अमक्यामामाने 'चिरंजी सिद्दार्त'ला सपरेम भ्येट दिलेले २ रुपये - अमेरिकेने युगांडाला मदत केल्याच्या थाटात - कोकलून कोकलून सांगणारे अनाउंसर. कुठे कुठे वीज पोचली होती. पण बराच भाग घासलेटच्या दिव्यांवर रात्रीचा अंधार गडद करत असे. शहरात, अगदी झोपडपट्टीच्या सीमारेषेपासून पुढे सूखवस्तूंची वसाहत सुरु होत होती. तिथे सगळा झगमगाट असे. त्या सीमारेषेवरच आमचं घर होतं. रेल्वेची जागा आहे असे ठणकावून सांगणारा मोठा दगड, आमच्या घराच्या अंगणाच्या एका कोपर्‍यात रुतलेला होता. रेल्वेची अतिक्रमित जागेची, पर्यायाने त्या दोन किमी आडव्या पसरलेल्या गोधडीची किनार, व आमच्या घराच्या अंगणाची सीमा दाखवणारा तो दगड कालांतराने जमीनीखाली गेला. भक्तांना दृष्टांत द्यायला देवाचे दगड वर येतात. आम्हाला अभय द्यायला तो दगड खाली पुरला गेला. आमचं घर, कुडाचं, पक्कं नाही. पण हवेशीर. झोपडी नाही. मोठ्या बल्ल्यांनी मजबूत बांधलेले, मातीने लिपलेल्या जाड भिंती असलेलं दहा-बाय दहा च्या दोन खोल्या असलेलं... उंच व मजबूत होतं, प्रशस्त नव्हतं, गरजेपुरतं. जागा फारशी नाही एकूण हजार-बाराशे फूट. पण झोपडपट्ट्यांमधे नसलेल्या अनेक गोष्टी आमच्या घरात होत्या. काही दिवस अंधारात, व स्टोव्हवर स्वयंपाक केल्यावर अण्णांनी खटपट करून वीज कनेक्शन व गॅस सिलेंडर कनेक्शन मिळवलं. थोडे पैसे घालून दारात बोअर मारून, हातपंप वाली कमनीय बांधा असलेली हिरवी जलदेवता उभी केली. आमच्या घरासमोर कुठलीही झोपडी नव्हती, निदान सुरुवातीचे अनेक वर्षे. दूर नजर जाईल इतपर्यंत मोकळे मैदान होते. सुखवस्तूंची वसाहत डाव्या बाजूला. उजव्या बाजुला सरकारी खात्याची जमीन. एकुण ८-१० वर्षाच्या मुलासाठी तो आजच्या काळातला स्वर्गच होता. वीज, पाणी आल्याने आम्ही खूप फेमस झालो. आमच्या हापशी-हातपंपावरून लोक रोज पाणी भरायला लागले, अतिशय गोड आणि दर्जेदार पाणी होतं. तिथे आजुबाजूला दोन-तीन हापशा होत्या. त्यातली एक आमची. हिचं पाणी, आमचा स्वभाव दोन्ही गोड. सकाळ-संध्याकाळ नुसती रीघ असायची. गर्दी फार व्हायला लागली, २४ तास. मग एका कुटुंबाकडून, पाणी भरायचे, आम्ही दहा रुपये महिना प्रमाणे पैसे घ्यायला लागलो. आमच्या घरातून वीज नसलेल्या झोपड्यांमधे वीज दिली गेली. आजूबाजूच्या किमान साठ-सत्तर घरांमधे आमच्या घरातून वीज दिली जात होती. एक तर घर चांगले सात-आठशे फुटांवर होते. इतक्या लांब वीज वाहून नेणे, त्यांच्या वायरी सांभाळणे, बरेच उद्योग होते. पैसे मिळायचे पण त्यापेक्षा महत्त्वाचे आपण ज्या लोकांमधे राहतो त्यांना कशी का होईना आपल्यातर्फे थोडी मदत होत होती. असून असून लोकांकडे एखादा बल्ब, टेबल-फॅन असायचा. वीस-पंचवीस रुपये महिना. नंतर हळूहळू सरकारी निर्बंध शिथिल होऊन राजमान्यता मिळाल्यावर सगळ्यांकडे स्वतःचे वीज कनेक्शन आले. वाढत्या वॅटेजवाल्या अप्लायंसेसनी आमच्याही घरचे फ्युज नेहमी उडायला लागले होते. एकदा तर सगली वायरींग जळली. तो धंदा आम्ही बंद केला. परिस्थिती फिरते. जिथे फुले वेचली तिथे गोवर्‍याही वेचायची वेळ आमच्यावरही आलीच, पुढे आम्हालाही काही दिवस दुसर्‍यांचे कडून महिना पन्नास-शंभर रुपये देऊन वीज घेऊन राहावे लागले. सतत उपसा होऊन आमची जलदेवता रुष्ट झाली. कपडे धुण्याइतकेही चांगले पाणी तिच्यातून मिळत नव्हते. आम्हाला दुसर्‍यांच्या हापशांवर जाऊन दहा रुपये महिन्यानी पाणी भरायला लागले. आम्ही त्याठिकाणी राहिलो उणीपुरी १२ वर्षे. घर, आणि परिस्थिती मोडकळीस आली. बहिण वयात यायला लागली तेव्हा तिथे थांबणं चुकीचं वाटू लागलं. अण्णांनी ज्या परिस्थितीत हे स्वतःचं घर मिळवलं होतं ती परिस्थिती सतत आठवून त्यांना ते विकायचे नव्हते. आम्ही हट्टाला पेटलो होतो. स्वत:च्या मोठ्या घरातून टीन-पत्र्याच्या दिडशे फुटाच्या भाड्याच्या खोलीत जाणे त्यांच्या स्वाभिमानी मनाला पटत नव्हते. इथल्या आलेल्या किमतीत चांगल्या वस्तीत घर घेणे शक्यच नव्हते. आमच्या सततच्या धोशाने वडिलांना ते घर विकणे भाग पडले. ते घरही नंतर बरेच ढेपाळले होते. ती झोपडपट्टी आणि तिथल्या बारा वर्षांनी खूप अनुभव दिले. आठवले तसे लिहितो. पण फार जास्त नाही लिहिणार. काही अजूनही आठवणारे.... असेच मनावर परिणाम करून गेलेले. काही लोक, काही वस्तू, काही घटना.... झोपडपट्टीतले दिवस. क्रमशः (सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. प्रथम प्रकाशनः मिसळपाव.कॉम. दिनांकः २२ ऑक्टोबर २०१५) झोपडपट्टीतले दिवसः भाग दोन

वाचने 72110 वाचनखूण प्रतिक्रिया 191

भिंगरी गुरुवार, 10/22/2015 - 01:13
परिस्थिती फिरते. जिथे फुले वेचली तिथे गोवर्‍याही वेचायची वेळ आमच्यावरही आलीच,
वाचून वाईट वाटले.पण पुढे सगळं चांगलं झालं असणार. सुरवात छान झालीये .पुलेशु.

अंतु बर्वा गुरुवार, 10/22/2015 - 01:13
जुन्या आठवणी जाग्या केल्यात जोकरसाहेबानु... वयाची बावीस वर्षे. तिथली विहिर, नंतर प्यायच्या पाण्याचे नळ आल्यावर तिथे तासनतास रांग लावल्यावर मिळणारं एक हंडा आणी कळशीभर पाणी... गल्लीबोळातुन क्रिकेट आणी गोट्या खेळणारा मी. आता तिथे राहत नसलो तरी घर अजुनही आहे तिथेच. नगरसेवक क्रुपेने गल्ल्या काँक्रीट्च्या झाल्यात आता. गटारांवर झाकणं आलीयेत... :-) पुढील लेखनास शुभेच्छा!!

चित्रगुप्त गुरुवार, 10/22/2015 - 02:52
वा. सुरेख प्रंजळ लेखन. पुढील जीवनाचा सर्व प्रवास लिहावा, ही विनंती. फार वर्षांपूर्वी भाऊ पाध्यांचा 'वासूनाका' फार फेमस झाला होता. तसले काही प्रसंग/लोक ?

In reply to by चित्रगुप्त

संपत गुरुवार, 10/22/2015 - 09:40
वासुनाका हे झोपडपट्टी वरचे नव्हे तर कनिष्ठ वर्गातील चाळीतील जगण्यावर आधारित होते. ज्या पुस्तकाशी मी पूर्ण रिलेट झालो असे बहुधा एकमेव पुस्तक. लहानपणी पाहिलेल्या अनेक व्यक्तींबद्दल पुन्हा विचार करायला लावला त्या पुस्तकाने. चक्र ही झोपडपट्टी वरील कादंबरी होती. झोपडपट्टी मध्ये देखील अनेक स्तर असतात. शिवाय काही लोक जुन्या वाड्या वस्त्यानाही (उदा. कोळीवाडे) झोपडपट्टीत टाकतात. पण प्रत्येक ठिकाणाचे जगणे बर्यापैकी वेगळे असते असे वाटत. जोकर हे चक्र सारख्या नव्हेत तर कनिष्ठ मध्यम वर्गीय झोपडपट्टीत राहत असावेत असे एकूण वर्णनावरून वाटते. लेख जमलाय. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

एस गुरुवार, 10/22/2015 - 06:57
अशा परिस्थितीवरचं लेखन बहुधा अंगावर येणारं असतं. तशा शैलीचा मोह टाळल्याबद्दल धन्यवाद. अधेमध्ये एक-दोन प्रसंग व संवाद टाकल्यास लेखन अधिक उठावदार होईल असे सुचवतो. बाकी सुरुवात मस्त.

पैसा गुरुवार, 10/22/2015 - 10:35
छान सुरुवात. आमच्यासाठी हे जग वेगळे आहे, की जिथे रहायची आम्ही कल्पनाही करू शकत नाही. लिहा आरामात!

रामदास गुरुवार, 10/22/2015 - 10:52
भक्तांना दृष्टांत द्यायला देवाचे दगड वर येतात. आम्हाला अभय द्यायला तो दगड खाली पुरला गेला. हे आवडले. अशी वस्ती बघीतलेली आहे. मित्रांसोबत राहीलेलो आहे. एक शंका आहे.पहील्या दोन परीच्छेदा नंतर लिखाण आवरते घेतल्यासारखे वाटले.

In reply to by रामदास

चतुरंग गुरुवार, 10/22/2015 - 16:44
"भक्तांना दृष्टांत द्यायला देवाचे दगड वर येतात. आम्हाला अभय द्यायला तो दगड खाली पुरला गेला." मोकळेपणाने लिहिते व्हा! -रंगा

In reply to by रामदास

विलासराव Fri, 10/30/2015 - 13:28
मी स्वत: बधवार पार्कच्या समोर असलेल्या कोळिवाड्यात २००४ आणि २००५ साली राहिलो आहे.ज्या ठिकानाहुण कसाब आला तिथेच पहिली खोली माझी होती.१० बाय ९ ची सिंगल रूम. पण बाहेर मोठी मोकळी जागा आणि समोर समुद्र. मालक खाली रहायचा. बाहेरच्या जागेत पत्त्याचा क्लब चालायचा. मी त्याकाळात कधीच घराला कुलुप लावलें नाही. ते लोक घरातून पानी न्यायचे ,कुणी आराम करायचे. सणवार अगदी जोरदार साजरे व्हायचे. भांडण तंटेही अफ़लातून असायचे. पण मानुसकीला जागणारे असे लोक मला नाही सापडले. मी नंतर लालबाग, गिरगावला बरीच वर्षे काढली पण तिथेही अनेक पांढरपेशे स्वार्थी आणि अप्पलपोटे पाहिले. मी माझ्या जीवनातील ती २ वर्षे सुवर्णकाळ मानतो. मी आजही त्याबाजुला कधी गेलो तर कोळिवाड्यात जातोच जातो. तुम्ही बिनधास्त लिहा जे आणि जसे घडले तसे.

सत्याचे प्रयोग गुरुवार, 10/22/2015 - 13:44
खुप छान लिहिलय. माझे बालपण खेड्यात गेले पण रेल्वे च्या अतिक्रमण केलेल्या जागेत काका मावशी कडे जायचो कधी कधी. हे सर्व वाचून सर्व आठवणी जाग्या झाल्या. कुणी काहीही म्हणा पण खरी माणुसकी ही झोपडपट्टीतच अनुभवायला मिळाली.

मार्मिक गोडसे गुरुवार, 10/22/2015 - 14:54
नंतर हळूहळू सरकारी निर्बंध शिथिल होऊन राजमान्यता मिळाल्यावर सगळ्यांकडे स्वतःचे वीज कनेक्शन आले. वाढत्या वॅटेजवाल्या अप्लायंसेसनी आमच्याही घरचे फ्युज नेहमी उडायला लागले होते. एकदा तर सगली वायरींग जळली. तो धंदा आम्ही बंद केला.
सगळ्यांकडे स्वतःचे विज कनेक्शन आले, तर वाढत्या वॅटेजवाल्या अप्लायंसेसनी तुमच्या घरचे फ्युज कसे उडायला लागले,, तुम्ही धंदा बंद केला. नक्की कशामुळे? घटना नेमकी कोणत्या शहरातील व कीती वर्षापुर्वीची आहे?

In reply to by मार्मिक गोडसे

राही गुरुवार, 10/22/2015 - 16:02
मला वाटते की ते असे असणार: नंतर हळूहळू सरकारी निर्बंध शिथिल होऊन राजमान्यता मिळाल्यावर सगळ्यांकडे स्वतःचे वीज कनेक्शन आले. नाहीतरी वाढत्या वॅटेजवाल्या अप्लायंसेसनी आमच्याही घरचे फ्युज नेहमी उडायला लागले होते. एकदा तर सगली वायरींग जळली. म्हणून शेवटी तो धंदा आम्ही बंद केला. लेख छान आहे. पण शेवटी शेवटी गुंडाळल्यासारखा वाटला. काही काळ झोपडपट्ट्यांत फिरावे लागले होते. त्यामुळे जवळीक वाटली. आणखी सविस्तर येऊं दे.

In reply to by राही

तर्राट जोकर Wed, 10/28/2015 - 20:01
राही, आपण बरोबर बोललात. इथे धंदा हा शब्द 'नसते उपद्व्याप' ह्या अर्थी घेतला आहे. हे पुढील भागांमधे कळून येइलच.

वेल्लाभट Fri, 10/23/2015 - 12:31
तितक्याश्या छान न वाटणा-या भूतकाळाबद्दल खूपच छान लिहिताय.. शेवटी आवरतं घेतलंत; पण क्रमश: वाचून बरं वाटलं. येऊद्यात अजून. राहिला भाग अनुभवांचा, तर चांगले वाईट कसेही असले तरी अनुभव हेच आपल्याला समृद्ध करतात. वर पैलवान, भिंगरी यांनी म्हटल्याप्रमाने वेचलेल्या गोव-यांतून नंदनवन फुललेलंच असेल, अजून फुलेल. शुभेच्छा.

नाखु Fri, 10/23/2015 - 12:36
खणखणीत आणि दणदणीत... पुढील भागाच्या प्रतीक्षेत

आदिजोशी Fri, 10/23/2015 - 12:43
पण ह्या अशाच लोकांमुळे आमची मुंबई आणि इतर शहरं घाण झाली. उच्चभॄ सोडा, पण मध्यमवर्गीय माणसांनाही रहायची मारामारी झाली. फुकट सरकारच्या जमीनी लाटून आणि रिसोर्सेसवर अशक्य ताण आणल्यामुळे बकालपणात अजूनच भर पडली. प्रशस्त नाही पण हजार बाराशे फूट????? इतक्या जागेत मुंबईत महाल बांधतात लोक. सुरुवातीस जमत नसताना झोपडी बांधली पण नंतरही ती सोडू नये ह्यातच मानसिकतेच अंदाज येतो. बळकावलेल्या जागेत बोरवेल मारून पाणी विकणे, एक कनेक्षन वरून ५०-६० घरांत वीज विकणे हे असले प्रकार चालतात म्हणून झोपडपट्टीत राहणार्‍यांबद्दल अजिबात कणव वाटत नाही. आम्ही घास घास घासून कायद्याने रहायचे आणि हे सरकारी जावई सगळं फुकट ओरपतात.

In reply to by आदिजोशी

मार्मिक गोडसे Fri, 10/23/2015 - 16:34
बळकावलेल्या जागेत बोरवेल मारून पाणी विकणे, एक कनेक्षन वरून ५०-६० घरांत वीज विकणे हे असले प्रकार चालतात म्हणून झोपडपट्टीत राहणार्‍यांबद्दल अजिबात कणव वाटत नाही. आम्ही घास घास घासून कायद्याने रहायचे आणि हे सरकारी जावई सगळं फुकट ओरपतात
. +१११११११११११११११११११११११११११११

In reply to by आदिजोशी

लेख आणि प्रांजळ निवेदन आवडलं असलं तरी त्यामधल्या अवैध गोष्टी आवडलेल्या नाहित. आदिजोशींशी ह्याबाबतीत सहमत.

मृत्युन्जय Fri, 10/23/2015 - 16:30
तजो त्या वेळच्या गरिबीतुन आज तुम्ही वर आलात याबद्दल तुमचे अभिनंदन. वर लिहिल्याप्रमाणे अ‍ॅड्याचा प्रतिसाद सुद्धा पटतो आहेच. यात काही अपरिहार्यता असेलही पण एरवी याच गोष्टीवरुन लोक साधारणपणे बोंबाबोंब करतात ना? पण तुमच्या दृष्टीकोनातुन सगळी परिस्थिती बघितल्यावर कदाचित मतपरिवर्तन होइलही. त्यामुळे तुम्ही लिहाच. एकतर तुम्ही लिहिता प्रवाही भाषेत शिवाय तुमचे अनुभव आमचेही विश्व समृद्ध करुन जाइल. पुलेशु.

In reply to by shvinayakruti

खटपट्या Fri, 10/23/2015 - 16:51
तुम्हाला असहमत होण्याचा पुर्ण अधिकार आहे, पण का ते सांगा की. आदी जोशी यांनी मांडलेल्या गोष्टीमधे कोणतीही आतिशयोक्ती नाही.

अद्द्या Fri, 10/23/2015 - 16:49
गरिबीतून दिवस काढून वर आलात हि चांगलीच गोष्ट आहे . अजुनी वर चढत राहा . पण अवैध झोपडपट्टीतून वीज चोरी आणि पाणी विक्री इत्यादी गोष्टींसाठी सहानुभूती नाहीच कधी वाटली . असो . पुढल्या लेखाला शुभेच्छा

नाना स्कॉच Fri, 10/23/2015 - 17:00
वरील काही झोपड़पट्टी म्हणजे सांगतो वगैरे प्रतिसाद एक वेगळा दृष्टिकोण सांगतात अन लेखन हे वेगळ्या दृष्टिकोणातुन केलेले आहे दोन्ही आपापल्या जागी जस्टीफ़ाइड वाटतात तरीही डेविड बेले हा प्रसिद्ध परकॉर आर्टिस्ट असलेल्या बॅरीयर १३ ह्या फ्रेंच सिनेमातले एक वाक्य फार भारी आवडते "द सोसाइटी वांट्स अस एक्सलुडेड एंड सेक्लूडेड, फाइन!! वे हॅव आवर ओन, टफ एंड स्ट्रांग, इट्स गुड फॉर अस" (गावच्या बॅरियर १३ मधला बार मालक) नाना स्कॉच

मला वाटते आपण तजो ह्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आपल्या बाजुने वाकणे कमी करून ते लिहितायत तितका लेखनाचा आनंद घेऊ, तो अनुभव त्यांचा आहे/नाहीये त्यांची पूर्वीची मते अन लेखन ह्याच्याबद्दल इथे बोलण्यात काही पॉइंट दिसत नाही, प्रत्येक लेखन जर वेगवेगळ्या विषयावर असेल तर बरेच वेळी लेखक असला तरी माइंडसेट ऑफ़ रेफेरेंस वेगळा असतो

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

प्रसाद१९७१ Fri, 10/23/2015 - 17:28
बाप्पु- लोक वीज चोरुन विकणे अश्या गोष्टींवर कॉमेंट करत आहेत , आणि त्या कॉमेंट थेट तजोंना लागू होत आहेत असे वाटल्या मुळे मी ते लिहीले. मला तर तो लेख वाचल्यावर थोडासा उपहासात्मक व्यंग पद्धतीचा लेख आहे अशी मनापासुन समजुत झाली होती. जणु तजोंना झोपड्या कश्या उभ्या रहातात आणि तिथे कसे गैरप्रकार चालतात हे लिहायचे होते.

shvinayakruti Fri, 10/23/2015 - 17:23
दी जोशी तुम्ही म्हणताय ते पण काही अंशी बरोबर आहे की या झोपडयांमुळे शहरांची सुंदरता खराब होते. पण या लोकांना पण मजा वाटत नाही तस राहयला. हे सगळे खेड्यापाड्यात कामधंदा नसल्यामुळे पोटापाण्यासाठी शहरात आलेली लोक आहेत. त्यांना नाइलाजाने तिथे राहावे लागते. पण विज चोरी करून विकणे चुकीचे आहे.

In reply to by shvinayakruti

चित्रगुप्त Fri, 05/06/2016 - 16:43
वीजचोरी फक्त झोपडपट्टीतले लोकच करत नसून चोरीच्या विजेवर मोठमोठे कारखाने चालवले जात असतात, खेरीज ही मंडळी प्राप्तिकर वगैरे भरत नाहीत ते वेगळेच. माझ्या माहितीतील एकाचा दिल्लीत मोठा ऑफसेट छापखाना आहे. अलिशान बंगला, मोठमोठ्या गाड्या, नोकर-चाकर असलेला हा माणूस रात्री विजेच्या मीटरवर खास बनवून घेतलेले लोहचुंबक ठेवतो, त्यामुळे रात्रभर चालणारे एसी, कारखान्यातील यंत्रे वगैरे सर्व फुकट विजेवर. बंगल्याच्या दर्शनी भागात देवादिकांचे, साईबाबादिकांचे मोठमोठे फोटो, साईसंध्या व तत्सम तथाकथित धार्मिक कार्यक्रम दणक्यात लाऊडस्पीकर लावून करणे... यातून आपण किती सज्जन, धार्मिक आहोत, याची जाहिरात करणे... असे कितिएक लोक आपल्या बघण्यात असतात.

In reply to by चित्रगुप्त

सुबोध खरे Fri, 05/06/2016 - 18:18
"त्याने गाय मारली म्हणून मी वासरू मारले" अशा तर्हेचे हे समर्थन आहे आणी अर्थातच ते लंगडं आहे. जो कोणी वीज चोरी करतो ते चूक आणी बेकायदेशीरच आहे. जगरहाटी अशी आहे कि छोट्या चोराला फाशी दिली जाते आणी मोठ्या चोराला सलाम केला जातो. पण म्हणून चोरीचे समर्थन करणे चूकच आहे.

shvinayakruti Fri, 10/23/2015 - 17:32
ो. जोकर भाऊंचे आधीचे प्रतिसाद पाहुन हे लेखन म्हणजे त्यांचा अनुभव आहे अस वाटल नव्हत. पण जर हा तयांचा खरा अनुभव असेल तर तयांच्या बद्दल मनात नितांत आदर निर्माण होईल.

तर्राट जोकर Fri, 10/23/2015 - 17:48
सर्व दिग्गज सदस्यांनी माझ्या लेखावर आवर्जून प्रतिक्रिया दिलेल्या पाहून फार छान वाटलं. मिपावर चांगल्याला चांगलंच म्हटलं जातं ह्याचा प्रत्यय आला. या भरभरूद दिलेल्या प्रेमाबद्दल सर्व रसिक वाचकांना मन:पुर्वक धन्यवाद! दोन मुद्दे इथे स्पष्ट करतो म्हणजे पुढे वाचतांना समस्या येणार नाही. लेख आवरता घेतला: झालं काय की तर्री यांची दगड्या आणि जव्हेरगंज यांच्या दोन-तीन कथा वाचून, तसेच रामदासकाकांचे लिखाण वाचून आपणही काहीतरी लिहावे असे मनात आले. एक छोटी हजार शब्दांची कथा लिहायची होती. पहिला परिच्छेद लिहितांना असे झाले की त्या घटनेमागची पार्श्वभूमी व्यवस्थित मांडणे घटनेच्या परिणामकतेसाठी अतिशय आवश्यक होते. पार्श्वभूमी मांडायची तर चांगले तीन परिच्छेद झाले. मग वाटले की अरे, ह्यानंतर असे अचानक घटनेवर येणे सुसंगत होत नाहीये. कारण ती घटना आम्ही इथे राहायला आल्यानंतर दहा वर्षांनी घडलेली आहे. आमचा तिथून मुक्काम हलण्याला कारणीभूत असणार्‍या अनेक कारणांपैकी ती घटना होती. त्या घटनेपर्यंत येण्यासाठी आधी खूप काही सांगावं लागणार हे जाणवलं म्हणुन झोपडपट्टीचे, आमच्या राहणीमानाचे अगदी जुजबी वर्णन केले. झोपडपट्ट्यांचे विविध प्रकार असतात. पण झोपडपट्टी म्हटली की सामान्य मध्यमवर्गीय वाचकांपुढे 'चक्र' ह्या कादंबरीत वर्णन केल्याप्रमाणे, किंवा एस यांनी म्हटल्याप्रमाणे अंगावर येणारे तपशील, किळस वाटणारी वर्णने असलेली झोपडपट्टी येते. लिखाणात विभत्स-रसाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे इथे अशी पाचशे शब्दांमधे सांगितलेल्या कथेला निराळेच परिमाण लाभले असते. जे मला नको होते. त्यासाठी ह्या झोपडपट्टी-राहणीमान वर्णनाचा घाट घातला. "आहे ते असे आहे" हा भाव जपतांना कुठेही जाणून-बूजून करुण-रस, विभत्स-रस, अद्भुत-रस यांची संयोजने टाळली. लेख सरधोपट, दोस्ती-यारीत सांगितल्यासारखा केला. पुढे अजून विस्ताराने, खुलवून सांगणार आहेच, त्यामुळे इथे थोडा आवरता घेतला. प्रस्तावना समजा हवं तर.... :-) बेकायदेशीर वास्तव्यः काही सदस्यांनी झोपडपट्टीतल्या बेकायदेशीर वास्तव्य व बेकायदेशीर कृत्यांना विरोध दर्शवला आहे. त्यांची मते स्वागतार्ह आहेत. मुळात हे सगळे होणार हे मी गृहीत धरले होतेच. त्यामुळेच लिखाणात वर सांगितल्याप्रमाणे "आहे ते असे आहे" हा भाव जपला आहे. नियम, कायदे, नागरी हक्क, इत्यादी बाबींवर आपण भरपूर चर्चा करतो. पण बेकायदेशीर वस्त्यांमागचे सत्य कधी बघण्याचे कष्ट घेत नाही. घेतले तरी त्यावर कृती करण्याचे कष्ट घेत नाही. कष्ट घेतले तरी ज्यांच्यासाठी हे आपण करू ते लोकच बदलण्यास तयार नसतात. हे एक खूप वेगळे, चक्रावून टाकणारे जग आहे. इथे सर्व बेकायदेशीर बेफिकिरपणे चालते असा 'सुजाण व सुसंस्कृत' समाजाचा समज असतो. पण प्रत्येक जनसमुहाच्या आपल्या अशा समस्या असतात, त्या समस्यांच्या रेट्याने, उपलब्ध संधींचा वापर करून उपाय अंगिकारले जातात. त्यात चूक, बरोबर असे ठरवणे शक्य होत नाही. कोणी प्रयत्नही करु नये, नवे प्रश्न उभे राहतात, त्यांचीही उत्तरे मिळत नाहीत. 'झोपडपट्ट्या का तयार होतात?' ह्या प्रश्नाचे उत्तर एक वाक्यात शक्य नाही. बहुसंख्यांना ते एका वाक्यात हवे असते आणि तेही त्यांनी ठरवलेल्या एकतर्फी भुमिकेला साजेसे. माझी एकच विनंती की पुढचे भाग वाचूया आणि मग सावकाश चर्चा करता येईल. गरिबीला ग्लोरीफाय करणे, किळसवाणे आयुष्य दाखवून कारूण्यमय प्रतिसाद मिळवणे हे माझे उद्देश नाहीत. ही लेखमाला माझ्या आयुष्यातल्या त्या बारा वर्षांचे संचित प्रामाणिकपणे मांडण्यासाठी लिहितोय. काय झाले, कसे झाले, का झाले याची उत्तरे आपसूक मिळत जातील. एक वेगळं जग, फारसं पुढे न आलेलं, माझ्या अनुभवातून जगलेलं, मांडण्याचा प्रयत्न आहे. तुमच्या सगळ्यांच्या मनमोकळ्या प्रतिक्रियांमुळे हुरूप आला आहे. अजून थोडंस इतिहास-उत्खनन करतो. जमेल तसं, अधिकाधिक चांगलं लिहायचा प्रयत्न करतो. थोडा धीरज राखो.... और आनंद उठाओ.

In reply to by तर्राट जोकर

नया है वह Fri, 10/23/2015 - 18:22
प्रत्येक जनसमुहाच्या आपल्या अशा समस्या असतात, त्या समस्यांच्या रेट्याने, उपलब्ध संधींचा वापर करून उपाय अंगिकारले जातात. त्यात चूक, बरोबर असे ठरवणे शक्य होत नाही. कोणी प्रयत्नही करु नये, नवे प्रश्न उभे राहतात, त्यांचीही उत्तरे मिळत नाहीत
+१११११

शिव कन्या Fri, 10/23/2015 - 19:28
कुणी काही म्हणो, तुम्ही लिहित रहा. 'झोपडपट्ट्या का तयार होतात?' ह्या प्रश्नाचे उत्तर एक वाक्यात शक्य नाही. बहुसंख्यांना ते एका वाक्यात हवे असते आणि तेही त्यांनी ठरवलेल्या एकतर्फी भुमिकेला साजेसे. माझी एकच विनंती की पुढचे भाग वाचूया आणि मग सावकाश चर्चा करता येईल.>>> सहमत.

सुबोध खरे Sat, 10/24/2015 - 18:49
जागा फारशी नाही एकूण हजार-बाराशे फूट. हजार बाराशे फुट आणि फारशी नाही? २३ वर्षे प्रथम वर्ग राजपत्रित लष्करी अधिकारी असून ५६० चौ फुट जागा घेताना तोंडाला फेस आलेला. सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून राजेशाही थाटात राहता येते. शिवाय पाणी फुकट उपसून वापरलेच असे नव्हे तर विकले सुद्धा. वीज सुद्धा दुसर्याला विकून त्यातूनही पैसे मिळवले. इथे प्रामाणिकपणे जर स्वतःचे जनित्र आणि डीझेल वापरून स्वतःच्या उद्योगासाठी वीज निर्मिती करायची तर सरकारला पैसे भरावे लागतात. असेच आहे दैव किती अविचारी-- मूर्ख भोगितो राजवैभवा पंडित फिरत भिकारी.

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Wed, 10/28/2015 - 20:58
हजार बाराशे फुट आणि फारशी नाही?
चित्रगुप्त यांनी म्हटल्याप्रमाणेच जशी ज्याची संस्कृती-राहणीमान तसा त्याच्या शब्दांचा अर्थ.
२३ वर्षे प्रथम वर्ग राजपत्रित लष्करी अधिकारी असून ५६० चौ फुट जागा घेताना तोंडाला फेस आलेला.
अनेक प्रथमवर्गीयराजपत्रित अधिकारी सामान्य जनतेच्या तोंडाला रोजच्या रोज फेस आणून बेकायदेशीर मालमत्तेचे डोंगर उभे करतांना बघितले आहेत. त्यामुळे वैयक्तिकरित्या तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल, नीतीमुल्यांबद्दल नितांत आदर असला तरी तुमच्या राजपत्रित असण्याचे कौतुक नाही. कारण हे विधान लिहितांना तुम्ही 'राजपत्रित असल्याने भ्रष्टाचार करणे हे स्वाभाविक आहे' हे अप्रत्यक्ष मान्य करत आहात. पण 'असे' असूनही आपण 'तसे' नाही असे म्हणून विशिष्ट दर्जा मिळवू पाहत आहात. जर तुम्ही एक सामान्य व्यक्ती म्हणून प्रामाणिक आहात तर तुमच्या 'राजपत्रित असूनही प्रामाणिक' असण्याचे व 'प्रामाणिकपणामुळे ५६० फुटाची जागा घेतांना तोंडास आलेल्या फेसाचे कौतुक' का असावे? माझ्या वडीलांनाही ती बाराशे चौफूची जागा मिळवतांना तोंडास फेस आला होताच. त्यामुळे 'कोणत्याही कारणाने तोंडास येणार्‍या फेसा'चेही अप्रुप नाही.
सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून राजेशाही थाटात राहता येते.
वरील विधान प्रचंड गैरसमजुत व पुर्वग्रहातून उत्पन्न झालेले दिसते. राजेशाही थाट? एकतर लष्करात असून तुम्हाला मी राजेशाही थाट सांगावा आणि तो तुम्ही ऐकावा हे एक नवलच होईल. तुमच्या नेव्हीमधेच एका उच्चपदस्थ अधिकारी आणि त्याच्या पत्नीच्या दोन तासाच्या इवनिंग प्लेजर साठी दीड कोटीचं बील निघालेलं पाहिलंय. रेल्वे फर्स्ट क्लासमधे सर्व नागरिकांना समान मान्यता देणार्‍या स्वतंत्र भारताच्या एका लष्करी अधिकार्‍याला लष्करी नोकरीतला त्याचा अटेंडंट, वैयक्तिक गुलामाप्रमाणे, पुढ्यातच ठेवलेली केळी सोलून देतांना, संत्री, मोसंबी सोलून देतांना, फळांचे तुकडे करून देतांना प्रत्यक्ष पाहिलंय. अजूनही बरेच काही आहे. त्यामुळे सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण करून कायदेशीर राजेशाही थाट उपभोगणे काय असते हे तुम्हास माझ्यापेक्षा जास्त माहिती असावे.
शिवाय पाणी फुकट उपसून वापरलेच असे नव्हे तर विकले सुद्धा.
पाणी फुकट उपसून...? बोअरवेल व पाणी-उपसावर सरकारी नियमन येण्याआधीचा काळ असल्याने यात बेकायदेशीर काय हे कळले नाही. जाणकारांनी प्रकाश टाकावा. अगदी कालच्या प्रत्यक्ष अनुभवावरून एका उच्च-भ्रू सोसायटीत राहणारे गृहस्थ आपल्या घरच्या बोअरच्या पाण्यावर आर-ओ-प्लांट लावून पाणी व्यावसायिकरित्या विकत आहेत. त्यांच्या प्लांटची सरकारी अधिकार्‍यांमार्फत शुद्धता व स्वच्छतेच्या निकषांसाठी नियमित तपासणी होते असे ते सांगत होते. म्हणजेच ते हा अनधिकृते व्यवसाय अधिकृतपणे चालवत असावेत असे निदर्शनास येते. यावर आपले काय म्हणणे आहे?
वीज सुद्धा दुसर्याला विकून त्यातूनही पैसे मिळवले. इथे प्रामाणिकपणे जर स्वतःचे जनित्र आणि डीझेल वापरून स्वतःच्या उद्योगासाठी वीज निर्मिती करायची तर सरकारला पैसे भरावे लागतात.
दोन्ही परिस्थिती सरकारी निष्क्रियेतेचे उत्पादन आहे. कसे ते पुढे कळेलच. आताच सगळे सांगीतले तर मजा राहणार नाही.
असेच आहे दैव किती अविचारी-- मूर्ख भोगितो राजवैभवा पंडित फिरत भिकारी.
चालेल की. चांगलेच आहे. मग आजपासून, जे भिकारी फिरतात ते पंडित आहेत आणि जे राजवैभव भोगत आहेत ते सर्व मूर्ख आहेत असे समजुयात. प्रतिसादासाठी धन्यवाद!

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Wed, 10/28/2015 - 21:17
२३ वर्षे प्रथम वर्ग राजपत्रित लष्करी अधिकारी असून ५६० चौ फुट जागा घेताना तोंडाला फेस आलेला. याचा अर्थ एवढाच आहे कि एवढी वर्षे इमाने इतबारे नोकरी केलेल्या माणसाला (ज्याचा पगार सरकारी खात्यात सर्वात जास्त पगारापैकी आहे अशा माणसाला) सुद्धा ५६० चौ फुट जागा घेणे अतिशय अवघड आहे.यात राजपत्रित वर्ग २ आणि इतर वर्ग ३ किंवा चार याना हे अशक्य आहे असे मला म्हणायचे आहे. त्यात माझ्या प्रामाणिक पणाचा तुम्हाला कुठे डांगोरा दिसला. हे तुमच्या मनाचे खेळ आहेत कि सर्वच्या सर्व राजपत्रित अधिकारी भ्रष्ट असतात. शाळांचे मुख्याध्यापक अधिकारी वर्ग २ मध्ये येतात. शिक्षक वर्ग ३ मध्ये येतात. उच्चभ्रू माणूस आपल्या विकत घेतलेल्या सोसायटीतील पाणी विकत आहेत. सोसायटीतील पाणी किंवा शेतातील विहिरीचे पाणी यावर मालकाचा हक्क कायद्यात मान्य केलेला आहे. सरकारी बळकावलेल्या जमिनीतील नव्हे. आपल्याला अशा गोष्टींचे समर्थन करावेसे वाटले यातच सर्व आले बाकी गोष्टीना पास.

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Wed, 10/28/2015 - 22:23
खरेसाहेब, मला तुमच्या विधानाचा योग्य आशय कळला त्यामुळे आता पुढे निरर्थक वाद नको. तुम्हाला फक्त प्रामाणिक-विरूद्ध-अप्रामाणिक अशी तुलना मांडायची होती असे कळते. असे असेल तर हा मुद्दा प्रामाणिक अधिकारी विरूद्ध सरकारी जमीन बळकावणारे असा राहत नसून सरसकट कायदेशीर-विरूद्ध-बेकायदेशीर असा होतो आहे. मग मी आधीच म्हटल्याप्रमाणे बेकायदेशीर प्रकार फक्त झोपडपट्टीतच होतात असे नाही. त्यामुळे आपल्या दोघांच्याही मतांमधे तसा फरक दिसत नाहीये. मी कशाचे समर्थन करत नाही, विरोधही करत नाही. 'आहे ते असे आहे' हेच नेहमी मांडतो. त्यात तुम्हाला समर्थन दिसले हा माझ्या मांडणीचा दोष असू शकतो. धन्यवाद!

चित्रगुप्त Sat, 10/24/2015 - 19:22
लेखक त्याच्या लहानपणाची वस्तुस्थिती कशाचे समर्थन वा धिक्कार न करता मांडतो आहे. वाचकाने मूल्यमापन-तुलना न करता, समीक्षकी चष्मा न चढवता निव्वळ आस्वादकाच्या भूमिकेतून कोणत्याही साहित्य्/कलाकृतीचा आस्वाद घेणे केंव्हाही श्रेयस्कर. खेडेगावात, शेतात वा माळरानावर ज्यांचे जीवन व्यतीत झाले असेल, त्यांना हजार-बाराशे वर्गफूट (३० x ४० = १२००) जमीन लहान वाटणे स्वाभाविक आहे. मोठ्या शहरात जागांच्या, फ्लॅटच्या किंमती एवढ्या जास्त का, हा अगदी वेगळा विषय अहे. त्याला झोपडपट्टीत राहणारे जबाबदार नाहीत. पुण्या-मुंबईतला एक फ्लॅट विकून त्या पैशात अमेरिकेत (जिथे भारताच्या कितितरी पट पगार मिळतो) कित्येक एकर जमीन आज विकत घेता येते, ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by चित्रगुप्त

चतुरंग Sat, 10/24/2015 - 19:32
कितीतरीपट पगार मिळतो" हे वाक्य खूप फसवे आहे. खर्चही सगळेच डॉलरामध्येच असतात, कितीतरीपट! कित्येक एकर जमीन घेता येते हे ही सापेक्षच. वेस्ट किंवा ईस्ट कोस्टावरच्या चांगल्या स्कूलडिस्ट्रिक्ट टाउन्समधून ते अजिबातच शक्य नाहीये परंतु मिडवेस्टात मिसुरी, आयोवा, डाकोटा किंवा साऊथकडे लुईझिआना तत्सम भागात कदाचित शक्य असेल. लोकांचे गैरसमज होऊ नयेत म्हणून हा प्रतिसाद! धन्यवाद.

In reply to by चित्रगुप्त

सुबोध खरे Sat, 10/24/2015 - 20:21
समीक्षकी चष्मा न चढवता निव्वळ आस्वादकाच्या भूमिकेतून कोणत्याही साहित्य्/कलाकृतीचा आस्वाद घेणे केंव्हाही श्रेयस्कर. चित्रगुप्त साहेब, कोणी आपले उत्कृष्ट चित्र ढापून मिपा वर स्वतः चे म्हणून खपवले तर केवळ आस्वादकाच्या भूमिकेतून त्याचा आस्वाद घेणे तुम्हाला / सर्वाना जमेल काय? चित्र कुणाचे का असेना कलाकृती म्हणून उत्कृष्ट आहे ना? राहिली गोष्ट जोकर साहेबांची--त्यांनी मांडलेल्या वस्तुस्थिती बद्दल मी म्हणतो आहे. त्यांच्या लेखन किंवा शैली बद्दल यात कोणता वावगा शब्द आहे कि टीका आहे? त्यांची लेखांची पद्धत उत्तमच आहे. आणि बाकी तटस्थपणे कलेचा आस्वाद घ्या म्हणाल तर मी तेवढा स्थितप्रज्ञ नाही कि तेवढा मोठा नाही कि भावना बाजूला ठेवून आस्वाद घेता येईल. हि आमच्या संस्काराची सीमा समजा किंवा बुद्धीची मर्यादा समजा.

प्यारे१ Sat, 10/24/2015 - 19:40
च्यायला! एकाच कॅनव्हास वर आक्खं चित्र आलं की. वाईट गरीबी ते मजबूत श्रीमंती, कायदेशीर-बेकायदेशीर, निळे झेण्डे-इतर झेण्डे, देवाचा दगड वर येणं-पुरला जाणं, ब्राह्मण अब्राह्मण, पांढरपेशे मराठी साहित्यिक ते विद्रोही चळवळ, सरकारी, निमसरकारी ते खाजगी, १५० स्क्वेफुट ते १२०० स्क्वेफुट जागांचे चढे भाव कुणामुळे, गोट्या आणि बल्ल्या . . . . . तर्राट जोकर आगे बढो!