Skip to main content

महाभारताच्या राजकारणातली २ प्यादी

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 01/04/2016 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच साहना यांचा अर्जुन आणि कर्ण हा धागा वाचला. या धाग्यात वर्णलेली कथा मूळ मानल्या गेलेल्या महाभारतात सापडत नाही. पण त्यानिमित्ताने महाभारतातल्या या २ पात्रांच्या आडुन झालेले राजकारण तुमच्यासमोर आणण्याची एक संधी नक्कीच मिळाली. साधारण महाभारताच्या कथेतल्या या २ नायकांच्या सूडाच्या प्रवासातील मुख्य टप्पे सगळ्यांनाच ज्ञात आहेत. कर्ण आणी अर्जुन एकाच आईची दोन मुले दैवगतीने वेगवेगळ्या ठिकाणी वाढले. त्यापैकी अर्जुन उच्च्कुलीन राजपुत्र म्हणून वाढल्याने त्याला साक्षात गुरु द्रोणांकडुन सर्व दैवी अस्त्रांचे आणि शस्त्रांचे ज्ञान मिळाले तर कर्ण एक सूतपुत्र म्हणुन वाढल्याने त्या ज्ञानापासून वंचित राहिला मात्र द्रोणाचार्यांच्या आश्रमातच राहुन त्याने शस्त्रास्त्रांचे उत्तम ज्ञान मिळवले आणि धनुर्विद्येत प्राविण्य मिळवले पण सर्व प्रकारे लायक असुनही केवळ प्रचलित जातिव्यवस्थेमुळे एका ठराविक मर्यादेपलीकडे ज्ञान न मिळवु शकल्याने त्याला दैवी अस्त्रांपासून वंछित रहावे लागले जी त्याने नंतर परशरामांकडुन फसवणुकीने मिळवले आणी त्याच्मुळे त्याचा घात झाला. पण या सर्व घटनाक्रमामागचे जबरदस्त राजकारण कधी कोणी समजुन घ्यायचा प्रयत्न करताना दिसत नाही. कर्ण आणि अर्जुन या दोन व्यक्तिरेखांच्या आडुन दुर्योधन आणि कृष्ण या दोन राजकारण्यांनी जे अप्रतिम राजकारण खेळले त्याच्या विवेचनासाठी हा खटाटोप. महाभारत आपण नेहमीच एका साचेबद्ध रितीने पाहतो आणि ते बरोबरही आहे कारण तसे न केल्यास ते मूळ कथाबीजाला आव्हान देण्यासारखे होइल. पण थोडा वेळ त्यातील सर्व दैवी घटना आणि संगती बाजूला करुन बघितल्यास मानवी भावभावनांचे अगणित कंगोरे सामोरे येतील. दैवी अस्त्रे, कृष्णाचे देवत्व, देवांचे अस्तित्व आणि दैवी चमत्कार या संदर्भाकडे दुर्लक्ष केल्यास कृष्ण आणि दुर्योधन यांच्या राजकारणाचे द्वंद्व दिसुन येइल. त्यामुळे फक्त या लेखापुरत्या या सगळ्या गोष्टींना मी फाटा दिला आहे आणी हे लक्षात ठेउनच कृपया हा लेख वाचावा. जर दैवी अस्त्रांचे अस्तित्वच अमान्य केले तर हे लक्षात येइल की द्रोणाचार्यांनी त्यांच्या सर्वच शिष्यांना केवळ युद्धकलेत आणि युद्धशास्त्रात प्रवीण केले होते. यात कदाचित रासायनिक शास्त्रावर आधारित अस्त्रे असु शकतील जी त्यांनी काही ठराविक लोकांना शिकवली ज्यांचा उपयोग कदाचित " सर्वसंहारक अस्त्रे " म्हणुन होउ शकत होता पण एकास एक युद्धात कदाचित ही अस्त्रे निरुपयोगी होती. हे गृहीतक मान्य केल्यास एकल्व्याची कथा देखील अजुन जास्त समजुन घेता येइल. जर अर्जुनाकडे इतकी सगळी संहारक अस्त्रे होती की जी एकास एक युद्धात देखील वापरता येत होती तर द्रोणाचार्यांच्या मनात तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होइल की नाहीए याबाबत शंका असण्याचे कारण नव्हते. पण धनुर्विद्येतली एकलव्याची प्रगती आणी कौशल्य बघता त्यांना त्याबद्दल भय उत्पन्न झाले याचाच दुसरा अर्थ असा होतो की कदाचित दैवी अस्त्रे असा काही प्रकार नव्हताच. होत्या त्या सगळ्या अफवा. त्यामुळेच कर्णाकडे दैवी अस्त्रे नाहित हे माहिती असुनही दुर्योधनाला त्याच्यात अर्जुनाचा प्रतिस्पर्धी दिसला. युद्धकलेत आणि धनुर्विद्येत अर्जुनाचा उतारा कौरवांकडे नव्हता आणि त्यामुळॅच पहिली संधी मिळताच दुर्योधनाने कर्णाला आपल्या जाळ्यात ओढले. दुर्योधनाच्या गुणाग्राहकतेचा आणी राजकीय दूरदृष्टीची ही पहिली चुणूक होती. या वेळी तरी युधिष्ठिराकडे त्या राजकीय कुवतीवर उतारा नव्हता आणी सर्वंकष राजकीय पटलावर कृष्णाचा उगम होइस्तोवर युधिष्ठिर विदुराच्या राजकारणीय कौशल्यावर विसंबुन तरलेला दिसतो. अर्जुनाकडे दैवी अस्त्रे आहेत आणी कर्णाकडे ती नाहित हे जेव्हा कंठशोष करुन सांगितले जात होते त्याच्याच आसपास कधीतरी दुर्योधनाने कर्णाकडे दैवी अस्त्रे नसली तरी जन्मजात दैवी कवच आणी कुंडले आहेत अशी आवई उठवुन दिली असावी आणि ही नि:संशयपणे एक आवईच होती असे म्हणण्यास वाव आहे. कर्णाचे जन्मजात दैवी कवच भेदुन कुठलेही अस्त्र किंवा शस्त्र त्याला इजा पोचवु शकत नाही हे सत्य असल्यास द्रौपदी स्वयंवरामध्ये, गंधर्व युद्धात आणि विराट युद्धात त्याला इजा कश्या झाल्या याचे काही स्पष्टीकरण मिळु शकत नाही. शिवाय जर कर्णाकडे दैवी कवच कुंडले होती तर ती एक असामान्य घटना होती आणि अश्या असामान्य माणसाबद्दल परशुरामांना काही माहिती नव्हती हे संभवत नाही. त्यामुळे कर्णाचे अभेद्य कवच आणि कुंडले अस्तित्वातच नव्हती हे मानायला वाव आहे. अशी आवई उठवल्याने कर्ण अर्जुनापेक्षा सरस, प्रबळ आणि अजेय आहे अशी भावना सैन्यात पसरवण्यात दुर्योधन यशस्वी झाला आणि त्यामुळे सैन्याचे आणी कौरवपक्षाचे मनोधैर्य वाढले असावे. दुर्योधनाने राजकारणाच्या पटावरचे अजुन एक घर या खेळीमुळे सर केले. दुसरीकडे द्रोणाचार्यांनी न शिकवलेली विद्या आणी कौशल्य कर्णाने परशुरामांकडुन हस्तगत केली असावी परंतु हे करताना त्याने यच्चयावत सर्व दैवी अस्त्रे परशुरामांकडुन शिकुन घेतली आहेत अशी आवई उठवण्यात दुर्योधन यशस्वी झालेला दिसतो. द्रोणाचार्यांना दैवी अस्त्रे परशुरामांनी शिकवली होती त्यामुळे अर्जुनाच्या गुरुंच्या गुरुंकडुन दैवी अस्त्रे शिकलेला महान धनुर्धर म्हणुन कर्णाची जाहिरात करण्याची संधी दुर्योधन दवडेल असे वाटत नाही. दुर्योधनाने अजुन एक पॉईंट सर केलेला दिसतो. त्यानंतर त्याच्या या तंत्राला त्याच्यावरच उलटवण्याचा यशस्वी प्रयत्न कृष्णाने केलेला दिसतो. त्याने दुर्योधनावर कडी करत अशी आवई उठवलेली असावी की अर्जुनाने तर सर्वच देवांकडुन दैवी अस्त्रे मिळवली (परशुराम काय चीज आहे) आणी भरीस भर म्हणुन त्याने देवाधिदेव शंकराचा कृपाप्रसाद ग्रहण करुन त्यांच्याकडुन अस्त्रांमध्ये सर्वोच्च स्थानी असलेले पाशुपत अस्त्र थेट शिवाकडुन मिळवले. अजुन एक ब्राउनी पॉइंट सर करताना या सग्ळ्या कथेला कर्णाला (न) मिळालेल्या शापांची फोडणी दिली गेली आणी अशी अफवा पसरवली गेली की कर्ण ऐनवेळी त्याचे ब्रह्मास्त्र विसरेल असा शाप परशुरामांनी दिला आहे तर कर्णाचे रथचक्र युद्धाच्या ऐन ध्मश्चक्रीत चिखलात घुसेल असा शाप त्याला ब्राह्मणाने दिलेला आहे. यानंतर कर्णाला पुरते निष्प्रभ करण्यासाठी पुढची चाल खेळली गेली असावी आणि कुठल्याश्या ब्राह्मणाला पुढे करुन कर्णाकडे कधी नसलेले कवच आणी कुंडल त्याने त्या ब्राह्मणाला म्हणजे इंद्राला दान केली अशी आवई उठवली गेलेली दिसते. लोकांना दाखवण्यापुरता हा बनाव कदाचित खरेच घडवुन आणला गेला असाबा आणि घेणार्‍याला आणी देणार्‍याला दोघांनाही त्यातला फोलपणा जाणवला असावा पण त्यामुळे सैन्यावर मोठा दुष्प्रभाव पडु शकतो. झालेल्या या नुकसानीची भरपाई करण्यासाठी कौरवांनी अजुन एक आवई उठवुन दिली की कर्णाच्या दानशूर पणावर प्रसन्न होउन इंद्राने त्याला अशी एक अमोघ शक्ती दिली आहे की ज्या योगे तो कुठल्याह्ही यौद्ध्याला मारु शकेल. या शेवटच्या अफवेवरचा उतारा कॄष्णाला घटोत्कचाच्या मृत्युत दिसला आणि एवढी दु:खद घटना घडलेली असतानाही त्या घटनेचे देखील सवतःच्या राजकीय फायद्यासाठी भांडवल करण्यात कृष्ण यशस्वी झाला. घटोत्कचाच्या मृत्युसरशी त्याने कर्णाची शक्ती वापरुन संपली आणी इंद्राकडे परत गेली अशी आवई उठवुन दिली. सर्व पांडव दु:खी असताना कृष्णाने मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने रथावर उड्या मारुन आपला आनंद व्यक्त करताना कर्णाने त्याची शक्ता गमावल्याची बातमी पसरवली. त्यामुळे घटोत्कचाच्या मृत्युने मनोबल गमावलेल्या पांडव सैन्याला उलट आता अर्जुनाचा मार्ग निर्धोक झाला असे मानुन मनातली सर्व मरगळ झटकुन युद्ध करण्यास आधारच मिळाला. यामुळेच कदाचित अर्जुनाचे देखील मनोबल वाढले असावे. सैन्याचे तर नि:संशय वाढतेच. युद्धाच्या सतराव्या दिवशी कर्णाने शल्याला रथाचे सारथ्य करण्याची विनंती केली याचा कृष्णाने या सगळ्या घडामोडीत अचूक उपयोग करुन घेतला आणि शल्याने मोठ्या कौशल्याने कर्णाचा रथ वेगळा काढुन युद्धाभूमीवर चिखल साठला असेल अश्या ठिकाणी नेउन उभा केला. आणि मग "चिखलातुन चाक निघाले की सांग, मी येतो परत सारथ्य करायला" असे सांगुन शक्य चक्क निघुन गेला. त्या चिखलात चाक रुतलेले असताना सारथी सोडुन गेलेला असताना आणि रथ हलत नसताना केलेल्या त्या एकतर्फी युद्धात कर्णाला नि:शस्त्र असताना मारताना 'अखेरच्या युद्धात रथचक्र जमिनीत रुतण्याचा ' त्याला शापच होता असे सांगण्याचे नैतिक पाठबळ देखील कृष्णार्जुनाला त्या शापाच्या अफवेतुनच मिळाले. महाभारत युद्धात बहुतेक सगळ्या प्रमुख यौद्ध्यांचा अंत साध्या बाणांनीच झाला आहे. दैवी अस्त्राने सदगती प्राप्त झालेले फार थोडे. भीष्म साध्या बाणांनी शरपंजरी पडले. द्रोणांचा तलवारीने शिरच्छेद झाला, भूरिश्रवाचेही तेच, कर्ण साध्या अंजलिक बाणाने मारला गेला, दुर्योधन गदायुद्धात गेला, वृषसेन साध्या बाणाने मारला गेला, दृष्ट्यद्युम्न आणि युधामन्यु यांना तर अश्वत्थाम्याने हातानेच मारले. असे असताना अवास्तव महत्व दिल्या गेलेल्या दैवी अस्त्रांना आणि शक्तींना राजकारणाच्या पटावर मोहर्‍यांसारखे वापरुन कृष्ण आणि दुर्योधनाने राजकीय चातुर्याचे असीम प्रदर्शन केले असे मानण्यास वाव आहे. या सगळ्या खेळ्यांमध्ये कर्ण आणि अर्जुन या दोघांचा प्याद्यांसारखा मोठ्या खुबीने वापर केला गेला. ****************** तळटीपा: १. वरचे विवेचन हे माझे मत झाले. महाभारताच्या मुख्य कथेत सगळ्या दैवी घटना, व्यक्ती आणी शक्तींचा उल्लेख केला गेला आहे. जर या सर्व गोष्टींचे दैवी आवरण अथवा अस्तित्व अमान्य करायचे झाले तर या सगळ्या घटनांचे स्पष्टीकरण क्से करता येइल याचे विवेचन करण्याचा हा माझ्या दृष्टीकोनातुन छोटा प्रयत्न. २. महाभारतातले राजकारण मुख्यत्वे लढले गेले चार पात्रांमध्ये दुर्योधन आणि शकुनी एका बाजुला आणि कृष्ण आणि युधिष्टिर दुसर्‍या बाजुला. त्यातही मुख्य खेळाडु दुर्योधन आणी कृष्ण त्यामुळे या दोघांचाच प्रामुख्याने उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात या संपुर्ण राजकारणामागे अजुनही व्यक्ती असु शकतात. " वर नमूद केल्याप्रमाणे हे माझे "रीडिंग बिटवीन द लाइन्स" किंवा "इंटरप्रिटेशन आहे त्यामुळे अमुक गोष्ट कृष्णाने केली याचा पुरावा मूळ महाभारतातुन काढुन द्यायला सांगितल्यास तसा काही देता येणार नाही. ३. हा लेख लिहिताना मुळात महाभारत घडले का? महाभरत खरे की केवळ एक कथा? या दृष्टीकोनातुन?विचार केलेला नाही. एका खर्‍या कथेचे दैवी आवरण बाजुला सारुन त्यातील काही घटनांचे विवेचन इतक्या ढोबळ अर्थाने कृपया या लेखाकडे बघावे.

वाचने 33654
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

म्हणजे जयद्रथ ला रात आंधळे होते(तरिही तो युद्धात उतरला) असं म्हणायचे आहे का आपल्याला भाऊ((भाभा)) आणि कृश्नाने त्याला दिवसाच(कट रचुण --अर्थात सुर्य ग्रहणाने) अंधळे केले....असेच म्हणावे लागेल

In reply to by भाऊंचे भाऊ

जादु मंत्रे अस्त्रे यांचा विचार न करता महाभारत कसे असेल असा मुळ मुद्दा असतना आपन म्हटले कि सर्वांकडे supper natural skill होते. असो((आनि त्याही क्रुष्णाने काढुण घेतल्या )) म्हंजे विषयच आप्ल्या डोक्यावरुन गेलेला दिस्तो..म्हनुं हे उपहासात्मक उदाहरन... कदचित ते ही खरे असु शकेल कारण आजची हुशार मंडळी अनि संगनक ही हेच संगतात कि तेरा दिवसात दोन ग्रहने झाली.. 1..पहिले सुर्य ग्रहं युद्धाच्या 14 व्या दिवशी --यावेळी जयद्रथ मेला. 2.तेथुन पूढे 13 दिवसने जे ग्रहण झाले त्यावेळी क्रुश्न गेल..((पण इथे ग्रहण कारण नसुन कालदर्शक आहे..)) अनि महाभारतामधेहि हि दोन ग्रहणे उल्लेखिलि आहेत. may be days will Chang

मुळात कौरवाकडील भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांचा आेढा पांडवाकडेच होता. भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण यांना कपटाने मारले. कृष्ण निती

मृत्युंजय साहेब तुमचा लेख एकदम पटला. महाभारतातील या महत्वाच्या २ पात्रांकडे पूर्ण लक्ष असताना मागून सूत्र हलवणारे दुर्योधन आणि कृष्ण होते हे तुमच्या विवेचनातून पटत. खूप छान लेख.

आभ्यासपूर्ण लेख , मला एकदा ह्या विषयावर बोलायचे आहे :) आपल्याही आजूबाजूला असे बरेच कृष्ण आणि दुर्योधन आहेत त्यांच काय करायाच

माझा मूळ लेख (ज्याचा उल्लेख पहिल्या परीश्चेदांत केला आहे) आधिकारिक महाभारताच्या प्रती मध्ये नव्हता. त्याचा मुल स्रोत एका गुजराती मासिक आहे. सध्या आठवत नाही. आपले म्हणणे १००% पटते. महाभारतातील अनेक गोष्टी कवी कल्पना असल्या तरी सूत्रधार कृष्ण आणि दुर्योधन होते ह्यांत शंका नाही. महाभारताची कथा सांगत असताना दुर्योधनचा उल्लेख जास्त केला जात नाही तरी सुद्धा मूळ महाभारतांत दुर्योधन चाणाक्ष राजकारणी म्हणूनच दिसून येतो. द्यूत असो वा अज्ञातवास, दुर्योधन प्रत्येक ठिकाणी कायद्याचा आसरा घेत असतो. अगदी द्रौपदी वस्त्र हरणात सुद्धा दुर्योधन धर्म आणि कायदा ह्याचीच भाषा वापरतो. आम्हा भारतीयांना सगळ्याच गोष्टी अतिरंजित करून किंवा ब्लेक आणि व्हयिट स्वरूपांत पहायची खोड असल्याने या युद्धांतील दुर्योधनाचा ग्रांड प्लान कधी पुढे येताच नाही.

मृत्युंजय सर... आपल्या लेखाचा रोख हा कृष्ण आणि दुर्योधन यांनी आपापल्या प्याद्यांचा (पक्षी:कर्णार्जुन) वापर करून हे महाभारत घडविले असा दिसतो. इथे आशयाशी जरा सहमती नोंदवतो पण त्याचबरोबर 'त्या' दोघांना प्यादे म्हणण्याबाबत माझा आक्षेप! कारण एक लगेच सांगता येईल की, दोघेही महाभारताची अतिमहत्वाची पात्रे आहेत. तसेच त्यांच्याकडे अस्त्रे वगैरे असणे ह्या अफवा असण्याच्या शक्यतेला तर मी आजिबात सहमत होऊ शकत नाही. आता, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अस्त्रांचा दैवीपणा काढला तर दोघेही सर्वसामान्य योद्धेच कदाचित ठरले असते. यासाठी तुम्ही द्रोणांनी एकलव्याचा अंगठा कापून घेतल्याचे उदाहरण दिले आहे. ओके! आता, माझ्या मते, अस्त्र वगैरेंचा वापर करण्यासाठी धनुष्य चालवता येणे ही बेसिक गरज होती. गदेवर अस्त्र लावून फेकल्याचे कुठेही उदाहरण नाही. मग त्याहीपुढे जाऊन जर कोणीतरी त्या धनुर्विद्येत अतिशय प्राविण्य मिळवत असेल तर अस्त्रांचा वापर करायला तो एक ॲडेड ॲडव्हांटेज आहे! कारण, समजा एखाद्या नवशिक्याला किंवा कामचलाऊ धनुर्धाराला सांगितले की बाबारे इथून सोलापूरवर अस्त्र चालव आणि त्याने कोल्हापूरवरच सोडले तर! "आर्र्र स्वारी बर्का सर...." म्हणण्यावाचून त्याला नो इलाज! आपण ऑलिंपीक वगैरेमध्ये तीरंदाजीची अटीतटीची स्पर्धा पाहतो. एक-अर्ध्या गुणाच्या फरकानेही मेडल हातातून निसटू शकते. मग अस्त्र चालविणे हे मेडल मिळवण्यापेक्षा नक्कीच महत्वाचे ठरते, नाही का? शिवाय एकलव्याच्या गोष्टीतून वाचल्या/समजल्याप्रमाणे एकलव्याने ज्या पद्धतीने कुत्र्याच्या तोंडात बाण मारून त्याला इजा न होऊ देता त्याचे तोंड बंद केलेले ते पाहता नुसत्या अचूक नेम मिळवण्यापुरते त्याचे कौशल्य मर्यादित राहिले नव्हते तर त्याहीपेक्षा पुढे गेलेले. एक चांगले उदाहरण आत्ता सुचते ते म्हणजे, धोनीसारखे उत्तम फिनीशर व स्ट्रॉंग हिटर असणे केव्हाही चांगलेच पण त्याचवेळी उत्तम फिनीशर, तंत्रशुद्ध हिटर, गॅप काढण्याची अनोखी कला, दबावात आपल्यातले सर्वोत्तम बाहेर काढणे व सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या सगळ्यात सातत्य राखणे ह्या गुणांमुळे कोहली आताचा सर्वश्रेष्ठ फलंदाज गणला जाणे यात नो नवल. म्हणून द्रोणांनी एकलव्याला आताचा कोहली होण्याची संधीच मिळू दिली नाही! ;) दुसरे म्हणजे वर "उका" भाऊंना म्हणायचे आहे की अस्त्रे वगैरे सगळ होतं पण काळाने ते सगळ चट्टम करून टाकलं. याचा अर्थ त्यांना महाभारत खरेच घडले असावे असे म्हणायचे आहे. त्यांनी स्वत:च म्हटल्याप्रमाणे प्रतिसाद विस्कळीत आहे खरा, बट लेट मी हेल्प हिम. इथेही मी त्यांच्याशी अंशत:च सहमत आहे. म्हणजे, त्यांच्या अस्त्रांच्या अस्तिवाबद्दल असणाऱ्या समजुतीला माझे अनुमोदन पण महाभारत खरेच घडले का नाही याबद्दल मी नॉट दॅट खात्रीशीर! :) आता तुम्ही म्हणाल जिथं आडातच नाही तिथं पोहऱ्यात कुठून? थांबा... दोन्ही शक्यतांचा विचार करू... १) महाभारत खरेच घडले होते नि अस्त्रांचे ज्ञान कालौघात नष्ट झाले.... ऊका खुश! ;) २)महाभारत ही त्या काळची साय-फाय/फिक्शन कॅटेगरीतली उत्कृष्ट कादंबरी होती, त्यामुळे अस्त्र वगैरे त्यात असणं हा एक कल्पनाशक्तीचा जबरद्स्त आणि लोकप्रिय आविष्कार होता! इथे, पहिल्याविषयी मी काय बोलणार? तो प्रत्येकाच्या वैयक्तिक मानण्याचा/श्रद्धेचा भाग आहे. मानो तो गंगा मा है ना मानो तो बहता पानी वगैरेसारखं! आणि दुसरी शक्यता विचारात घेतली तर काय, प्रश्नच मिटला! कारण ते काल्पनिक आहे म्हटल्यावर इथे लिहीण्यात तुम्हांला कल्पनेच्या बाबतीत सर्वच स्वातंत्र्य आहे. तुमच्या कल्पनांच्या सीमा तुम्ही ताणून किती दूरवर नेऊ शकता हे केवळ तुमच्याच कल्पना'शक्ती'वर अवलंबून आहे. इथे त्या महाकवीने त्या कल्पनेच्या लगोरीला परिणामकारक ताणून सर्वसामान्यांना त्यात बसवून दूर भिरकावून दिले आहे, जे की त्या हवेतल्या प्रवासातच सर्वजण आहेत अजून, खाली पडलेच नाहीत! त्याबद्दल व्यासांना एक कडक सलाम! आता आपण ह्या दोन्ही शक्यतांमधला संयुक्त दुवा म्हणाजेच "अस्त्राचे असणे" केवळ याचाच विचार करू. अस समजा महाभारत काळात विज्ञानाच्या बाबतीत लोक चरमसीमेवर होते म्हणजे आतापेक्षाही कित्येक पटीने पुढे. पर्जन्यास्त्राकडे पाहिले असता आताच्या काळात ज्या पद्धतीने कृत्रीम पाऊस पाडला जातो, आठवा २००८ च्या ऑलिम्पीक्समध्ये चीनने या तंत्राने ऑलीम्पीक निर्विघ्नपणे पार पाडून जगाची वाहवा मिळवली होती, हेच तंत्रज्ञान पर्जन्यास्त्रात काहीच्या काही पटीने विकसीत करून वापरले असणार. आता हेलिकॉप्टरने पावसाच्या ढगात रसायनांची फवारणी करतात , तेव्हा नॅनो टेक्नोलॉजीने 'बाणावरच' काम भागत असेल. इथे या कामी आतासारख मिसाईलच का वापरलं गेल नसेल याचा विचार करता, आता जसं इंधनाच्या उपलब्धतेची मर्यादा लक्षात येऊन उशीरा का होईना आपण सौर व वायु उर्जेकडे वळलोय तसं त्या काळातल्या लोकांनी आधीच ते ओळखून उर्जेचे नेमके हेच स्त्रोत निवडले असणार. शिवाय हाताने बाण मारायचा म्हणजे हाताला, डोळ्याला, मेंदूला काम! जे आपण हळूहळू कमी करत जाऊन रोबोट वगैरे आणून एके दिवशी हॉलिवूडच्या वॉल ई ॲनिमेशनपटात कल्पना केल्याप्रमाणे हात-पाय यांच्या जेनेटिक्समध्ये अमूलाग्र बदल घडवू व त्यांना कसलेही काम कराण्यासाठी निरूपयोगी बनवू. शिवाय कुणीही उठावे आणि अस्त्र चालवावे असे न होऊ देण्यासाठी त्यांना मंत्र नामक व्हॉईस कमांड फिचरचे समर्पक, सुयोग्य असे कोंदण दिले. व्हॉईस कमांड आज किती प्रगत झाले आहे ते आपण बघतोच आहोत. स्मार्टफोनवर नंबर डायल करण्यापासून ते गुगलला कामाला लावण्यापर्यंत याचा वापर सहजपणे करता येतो. मी स्वत:विंडोज ७ या ऑपरेटींग सिस्टीमवर स्पीच रेकग्निशन फिचर वापरत होतो. सध्या विंडोज १० वर अजून वापरायला सुरू केलेले नाही. एकदम जबरदस्त उपयोगी असे फिचर आहे. मग यालाच त्या काळात पुन्हा काही पटीने विकसीत केले गेले असेच मानूयात. (फिक्शनमध्येही!) तसेच आजच्या काळातले टार्गेट सर्चिंग/हिट सर्चींग मिसाईल्स ही त्या काळातल्या अस्त्रांचीच बालके आहेत असे त्यांच्या संहारक क्षमतेच्या वर्णनांवरून वाचून वाटते. "हकु" यांच्या भीमाच्या नंबर एक नायकपात्र असण्याच्या प्रतिसादाला बहुतेक धनुष्यविद्याच व धनुर्धरच का श्रेष्ठ गणला गेलाय याचे उत्तर माझ्या आतापर्यंतच्या प्रतिसादात मिळू शकेल. तरीही धनुर्धाऱ्यांच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडतो. १) वर यकु यांनी भीमपराक्रमाचे जे दाखले दिलेत यावरून तो महावीर, महापराक्रमी होता याबाबत यत्किंचीतही संशय मनात येत नाही पण नीट पाहून विचार केला असता दिसते की ह्या सर्व पराक्रमगाथांत तो फक्त हॅन्ड टू हॅन्ड कॉम्बॅट लढला आहे असे दिसते. जिथे त्याने कर्णाला लढाईत ३१ वेळा हरविले आहे असेही म्हटले गेले आहे ती शुद्ध अतिशयोक्तीच वाटते मला. ३१ वेळा कर्णाबरोबर लढत बिजी होण्यापेक्षा शंभरच्या शंभर कौरव मारणे ही आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यातच त्याचा बहुतांश वेळ खर्ची गेला असावा. कारण तासाला एक कौरव या गतीने जरी सपाटा लावला तरी बराच वेळ गेला की हो! गणित मला जमत नाही, नाहीतर आकडेमोडही मोडून इथे ठेवली असती. तसेच जिथे बाकी महारथींनी अस्त्रे ठराविक वेळी वापरल्याचा उल्लेख आहे तिथे भीमाने कधी काही वापरल्याचा उल्लेख नाही. भीमाला स्वत:च्या मुलाकडूनही एकदा पराभव पत्करावा लागल्याचे वाचलेय. परत माझ्या कर्णार्जुनांना प्यादे म्हटल्याच्या आक्षेपाकडे वळतो. माझ्यामते हे दोघेच सोडून इतर सारे चाकरी करत होते किंवा व्हिजनलेस होते. कर्णाला मित्रप्रेम ही भावना प्रोटीनसारखी होती तर पांडवांमध्ये आपणच सर्वश्रेष्ठ असल्याचे अर्जुन जाणत असल्याने आपला पराभव म्हणजेच आपल्या घराण्याचा सर्वनाश या दडपणातून म्हणा किंवा आपला आधिकार आपल्याला मिळाला पाहिजे या भावनेतून नेहमी आपले सर्वोत्तम प्रदर्शन करीत राहायचे याचा जणू निश्चय अर्जुनाने केलेला व आयुष्यभर त्यात तो सुदैवीही ठरला! म्हणजेच दोघांनाही आपले ध्येय/उद्दिष्ट माहीत होते होते व त्यावरून ते आजीवन हटले नाहीत. शेवटी जशी प्रत्येकाची वेळ असते तशी कर्णाची दुर्दैवाने रथाचे चाक चिखलात फसल्यावर आली तशीच यादवी काळात अर्जुनालाही मानहानीकारक पराभवाची चव चाखावी लागली. म्हणजेच माझ्या मतानुसार दोघेही श्रेष्ठ धनुर्धर व अस्त्रांचे दोघांनाही ज्ञान असल्याने(वरचं अस्त्रांबद्दलच माझं लॉजिक!) तसेच दोघांपुढे आपापल्या बाजूंचे योग्य उद्दिष्ट असल्याने कुणी त्यांना चालवावे अशातले ते नव्हते. हे माझे वैयक्तिक मत/लॉजिक आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो! लेखनसीमा! Sandy

In reply to by चांदणे संदीप

आयला एवढं काय काय लिहून पण अजून बरंच लिहायच राहिलच! :/ शेप्रेट लेख तरी लिहून झाला अस्ता! श्या...

In reply to by चांदणे संदीप

खरंच शेपरेट लेखच हवा होता की! जसा "अर्जुन आणि कर्ण" ह्या लेखावरच हा वर लिहिलेला लेख, तसा तुमच्या ह्याच्यावरचा उपर एक!!! :D

In reply to by चांदणे संदीप

प्रतिसाद आवडला... कसं आहे ना , महाभारत म्हणजे महासागर आहे . कुणी शंखशिंपले गोळा करतो, कुणी मासेमारी करतो, कुणी सागरतळाशी जाऊन अनमोल मोती काढतो तर कुणी काठावर बसुन त्याच्या भव्यतेने दिपून जातो. मी सगळ्यात शेवटच्या प्रकारातील आहे. महाभारत झालेच नाही असे कसे मानता येईल हो ? शेकड्यानी पुरावे आहेत ना साहेब . त्यावेळच्या जागा , वगैरे आजही आहेत . क्रुष्णासारख्या काही व्यक्तींची आजही पूजा वगैरे होते . ( लोक कितीही भाबडे असले ना तरीही कादंबरीतल्या व्यक्तिरेखांची पूजा नाही करणार असे मला वाटते.) हं आता काळानुसार काही भाग कमी जास्त झाला असेल नाही असे नाही . पण म्हणुन सगळे महाभारतच काल्पनीक आहे असे म्हणने बरोबर नाही असे मला वाटते. मला वाटते कोणता भाग प्रक्षिप्त आहे कोणता नाही याचा अभ्यास धागा लेखकाचा व इतरही काही मिपाकरांचा आहे. बाकी चर्चेतुन बरीच माहीती होत आहे.

In reply to by उगा काहितरीच

तुमच्या प्रतिसादातून तुम्ही मला जाब विचारल्यासारखा फील का येतोय? मी स्पष्ट वर लिहिले आहे ते माझे वैयक्तिक मत आहे आणि ते मी कुणालाही मान्य करा अशा आग्रही सुरातही लिहीले नाही. शिवाय, हेही म्हटले आहे की, महाभारत घडले का नाही हे मी ठामपणे सांगू शकत नाही पण मी दोन्ही शक्यता गृहीत धरून त्यावर कायम मनन, चिंतन करत असतो कारण एकूणच महाभारत ही रचना माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अजून एक, जेव्हा मी महाभारत खरेच घडले असाही विचार करतो ना तेव्हाही मी दैवी शक्ती, देव वगैरे मानत नाही. एकूणच मी नास्तिक आहे. श्रद्धा ही सुद्धा माझ्यापासून खूप लांब राहते! ;) :D बोला, काय म्हणण आहे तुमच यावर? Sandy

In reply to by चांदणे संदीप

तुमच्या प्रतिसादातून तुम्ही मला जाब विचारल्यासारखा फील का येतोय?
बिलकुल नाही. तसं वाटत असेल तर ते माझी शब्दनिवड चुकली असावी.
मी दोन्ही शक्यता गृहीत धरून त्यावर कायम मनन, चिंतन करत असतो कारण एकूणच महाभारत ही रचना माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
सेम हिअर , माझ्याही अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे हा.
अजून एक, जेव्हा मी महाभारत खरेच घडले असाही विचार करतो ना तेव्हाही मी दैवी शक्ती, देव वगैरे मानत नाही. एकूणच मी नास्तिक आहे. श्रद्धा ही सुद्धा माझ्यापासून खूप लांब राहते! ;) :D बोला, काय म्हणण आहे तुमच यावर?
तर मग तुम्ही महाभारताचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे असे नम्रपणे सुचवू इच्छितो .

In reply to by उगा काहितरीच

महाभारताचा ऐतीहासिक दृष्टीकोनातूनही अभ्यास जमेल तसा करत असतो. थोडंफार ऐकलेलं : ऐतिहासिक दृष्टीकोनातून जरा इंटरेस्टींग सांगतो, जळगावच्या जवळ कुठेतरी "कटापूर" नावाचे गाव आहे. सांगतात की भीमाने, बकासुराला मारून त्याचे हात धडापासून उखडून जेव्हा दूर फेकले तेव्हा ते इथेच येऊन पडलेले म्हणून त्या गावाचे नाव कटापूर असे पडले. सेम स्टोरी कोल्हापूरच्या पुढे कर्नाटक सीमेलगतच्या एका गावाबद्दलही (नक्की नाव आठवत नाही) ऐकली आहे. सोलापूर जिल्ह्यात, करमाळा तालुक्यात, एक गाव आहे "अंजनडोह" नावाचे. या गावाच्या नावाची कहाणी अशी सांगतात, की पांडव वनवासात असताना एकदा त्यांना खूप तहान लागली होती. तेव्हा अर्जुनाने याच ठिकाणी जमिनीत बाण मारून(बोअरवेल??) पाण्याचा झरा बाहेर काढला होता!! :) अशा बऱ्याच कथा/दंतकथा ठाऊक आहेत. भेटलो की निवांत गप्पा मारू! Sandy

In reply to by उगा काहितरीच

महाभारत झालेच नाही असे कसे मानता येईल हो ? शेकड्यानी पुरावे आहेत ना साहेब . त्यावेळच्या जागा , वगैरे आजही आहेत . क्रुष्णासारख्या काही व्यक्तींची आजही पूजा वगैरे होते . (लोक कितीही भाबडे असले ना तरीही कादंबरीतल्या व्यक्तिरेखांची पूजा नाही करणार असे मला वाटते.) >> संतोषीमाता बद्दल ऐकले नाही तुम्ही?? स्वारी हां. अगदीच राहवले नाही म्हणुन अवांतर.

In reply to by तर्राट जोकर

काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. पुढील वाक्ये कदाचित हा गैरसमज दूर करतील. १. संतोषी मातेची देवळे अगोदरपासून अस्तित्वात होती २. संतोषी माता ही देवी आहे असेच मानतात... अवतार मानत नाहीत. विशेषतः राम, कृष्ण आणि परशुराम यांना भारतीय साहित्यात एक ऐतिहासिक पुरुष म्हणून स्थान दिले आहे. तसे इतर कोणत्याही देवांचे नाही.

In reply to by आनन्दा

१. अगोदरपासून म्हणजे कधीपासून? २. दुसर्‍या मुद्द्यात खूप गोंधळ आहे. संदर्भ बघितले तर गोंधळ लक्षात येईल. पण हे अवांतर इथे करायचे आहे काय?

In reply to by चांदणे संदीप

प्रतिसाद आवडला. महाभारत खरेच झाले की नाही तो एका वेगळ्या चर्चेचा विषय होउ शकेल म्हणुन त्या मुद्द्याला या लेखात हातच लावला नाही. पण लेख लिहिताना असेच गृहीत धरले आहे की ते घडलेच. फक्त त्या महाभारताला दैवी कोंदणातुन मोकळे करुन मानवी सीमेवर बद्ध केले आहे इतकेच. त्यामुळेच दैवी अस्त्रांचे अस्तित्व या लेखापुरते अमान्य केले आही इतकेच. भीमाने कर्णाला ३१ वेळा हरवले असे जे म्हटले आहे त्याबद्दल बोलायचे झाल्यास ती अतिशयोक्तीच आहे पण भीम काही वेळेला कर्णाला वरचढ ठरला हे देखील सत्य आहे. पण भीम कर्णाला वरचढ ठरणे आणि कर्ण त्याला वरचढ ठरणे यात एक फरक होता तो असा की जेव्हा कर्णाने सर्वशक्तीन भीमाशी युद्ध केले तेव्हा भीमाला पुर्ण परास्त्र करुन त्याची पुरती मानखंडना करुन, त्याचा जीव घेणे शक्य असुनही तो न घेता त्याला अपमानित करुन सोडुन दिले. भीमाने कर्णावर असा निर्णायक विजय मिळवलेला दिसत नाही. अर्थात कर्णासमोर भीमाने दुर्योधनाच्या ३१ भावांना परलोकी धाडले हे ३१ पराभवांपेक्षा कमी देखील नाही.

In reply to by चांदणे संदीप

कर्ण आणि अर्जुनांना प्यादे म्हणण्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांना प्यादे मी फक्त राजकारणाच्या खेळापुरते बोललो आहे. महाभारताचे युद्ध या दोन यौद्ध्यांचे जीवावरच लढले गेले. युधिष्टिराच्या दृष्टीने अर्जुन सर्वात मुख्य यौद्धा होता तर दुर्योधनाच्या दृष्टीने कर्ण. त्यामुळे बुद्धीबळाचा पट समोर मांडल्यास त्या दोघांना वजीर म्हणता येइल पण त्या दोघांच्या खांद्यावर बंदुक ठेउन कृष्ण दुर्योधनादी प्रभुतींनी राजकारणाचा जो पट मांडला होता त्या दृष्टीकोनातुन बघता या दोघांचा प्याद्यासारखाच उपयोग झाला असे दिसुन येइल. म्हणुन ही २ प्यादी. त्यांचे मुख्य युद्धातले आणि एकुणच महाभारतातले योगदान नक्कीच स्प्रूहणीय आहे आणी त्या पटावर त्यांना प्यादी नाही म्हणता येणार. राजकारण या विषयात मात्र दोघे थोडे कच्चे विद्यार्थी होते :)

In reply to by दिग्विजय भोसले

कृष्ण आणि शकुनी हे दोन राजकारणी होते ना?
हे तुमच्या मते,त्यांच्यामते कृष्ण आणि दुर्योधन.

In reply to by दिग्विजय भोसले

नाही हो. शकुनीमामांना विसरलो नाही. तळटीपेत त्याचा खुलासा केला आहे ना. मला तर युधिष्ठिर देखील मोठा राजकारणी वाटतो.

दाजी पणशीकरांच्या वर्णनात - भीष्म, अंबा, द्रोणाचार्य, द्रौपदी, कर्ण या प्रमुख पत्रांतील सूडाचा संघर्ष, या सूडचक्रात अडकला नाही असा कृष्ण आणि बाकी सगळी प्यादी असा दृष्टीकोन. पर्व मधील "माणसांची" कथा आणि त्यात कर्णाला जवळपास काहीच नसलेले महत्त्व. मृत्युंजय मध्ये असलेला उदात्त आणि महान कर्ण युगांत मध्ये अजूनच वेगळे विवेचन. दृष्टीकोन वाचावेत आणि सहज पटावेत, तसाच हा अजून एक. महाभारत इज ओस्सम - इतिहास असो वा कथा. [नाव मृत्यंजय घेऊन कर्णाला प्यादे म्हणणे हादेखील एक सही प्रकार, परत एकदा वाचणार]

सर्व वाचक प्रतिसादकांना अनेक धन्यवाद. शंभर प्रतिसाद आले. धागा सार्थकी लागला.:) (मला तर २५ जेन्युइन प्रतिसाद आले तरी धागा सार्थकी लागल्याचा आनंद होतो) :)

In reply to by मृत्युन्जय

(मला तर २५ जेन्युइन प्रतिसाद आले तरी धागा सार्थकी लागल्याचा आनंद होतो)
मृत्योंजया प्लीज मी हे वाक्य स्वाक्षरीसाठी घेऊ? प्लीज ;)