✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ५)

A
Anand More यांनी
Fri, 02/26/2016 - 00:20  ·  लेख
लेख
भाग १ | भाग २ | भाग ३ |भाग ४ ----------------------------- कोणी देश अखंड रहावा म्हणून झटत होते. तर कोणी आपले संस्थान टिकावे म्हणून. कोणी स्वार्थाने अंध झाले होते तर कोणी परमार्थाने धुंद झाले होते. कोणी हक्क टिकवून ठेवण्याची पराकाष्ठा करत होते तर कोणी कर्तव्यपूर्तीसाठी झटत होते. कोणी उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नाने प्रेरित झाले होते तर कोणी गतकालीन संस्कृतीच्या महापुरुषांतून आणि पुराणपुरूषांतून आपली प्रेरणा घेऊन उभे रहात होते. खंडित राज्यांची परंपरा असलेला देश अखंड होत चालला होता. भारतमाता जन्म घेत होती, आपल्या अनेक लेकरांचे बळी घेऊन. परकीय शासकाशी अहिंसक लढा देणारी तिची लेकरं स्वकीयांशी मात्र हिंसक होऊन लढत होती. ज्याला सगळे स्वातंत्र्य म्हणतात आणि ज्याला मी स्वराज्य म्हणतो, ते आपण अहिंसेने मिळवू शकलो, तरी स्वदेश मिळवताना मात्र आपण प्रचंड हिंसेचा वापर केला. कुणी मारत होते तर कुणी मारले जात होते. प्रत्येकाला आपले वागणे योग्य वाटत होते. वैभवशाली प्राचीन संस्कृती आणि तितकेच उज्ज्वल भविष्य एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. त्या काळच्या घटनाक्रमांकडे बघताना, मला तर कायम भगवद्गीतेतल्या ११ व्या अध्यायातील वर्णन केलेले विश्वरूपदर्शनच आठवते. देश निर्माण करायची प्रक्रिया अशी मोठ्या धुमश्चक्रीतून चालली होती. आणि घटनानिर्मीतीची प्रक्रिया देखील अशीच अनेक चढउतारांमधून चालली होती. खंडित राज्यांची मानसिकता असलेल्या प्राचीन समाजाचे असूनही पाश्चात्य विद्येत पारंगत असलेले अनेक लोक एका अखंड देशाची घटना लिहिण्यास सज्ज होत होते. आपल्या नव्या हार्डवेअरचे नवे सॉफ्टवेअर. आपल्या देशाची घटना निर्माण करण्यासाठी एक संविधान सभा तयार केली जावी अशी कल्पना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्री मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९३४ मध्ये मांडली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ही मागणी लावून धरली. सप्टेंबर १९३९ ला दुसरे महायुद्ध सुरु झाले . मे १९४० ला चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान झाले. २२ जुन १९४० ला फ्रांस पडले. आणि महायुद्धात ब्रिटनची स्थिती नाजूक झाली. भारतीय काँग्रेसने ब्रिटन बाबतीत आपले धोरण लवचिक केले. आणि मग ८ ऑगस्ट १९४० ला भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी भारतीय गव्हर्नर जनरल आणि त्याच्या कार्यकारी मंडळाचे अधिकार वाढवण्याचे जाहीर केले. त्यात भारतीयांना स्वतःची घटना लिहिण्याचा हक्क मान्य करण्यात आला. त्याबाबत काम करण्यासाठी ब्रिटीश सरकारचे कॅबीनेट मिशन १९४६ ला भारतात आले. १६ मे १९४६ ला संपूर्ण अखंड भारताला स्वातंत्र्य देण्याची, मुस्लिम / हिंदू बहुल वेगळे प्रदेश तयार करून त्यांना प्रांताधिकार देऊन दिल्ली मध्ये कमी अधिकार असलेले आणि हिंदू मुस्लिमांचे सम समान वजन असलेले केंद्र सरकार बनावे अश्या धर्तीची योजना मांडली गेली. त्यानुसार संविधान सभेची निवडणूक झाली. त्यात काँग्रेसकडे प्रचंड बहुमत होते. ९ डिसेंबर १९४६ ला संपूर्ण, अखंड भारताच्या संविधान सभेची पहिली बैठक झाली. १६ डिसेंबर १९४६ ला नेहरूंनी संविधान सभेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला. तो सार्वमताने पास झाला. काँग्रेसला कॅबिनेट मिशन प्लॅन मधील, केंद्र सरकारमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणाऐवजी धर्माधारीत समान वजन ठेवण्याचा मुद्दा मान्य नव्हता आणि या संविधान सभेमध्ये बेबनाव सुरु झाला. देशात हिंदू मुस्लिम दंगे सुरु झाले. फाळणी अटळ होऊ लागली. अखेरीस भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटनने पाकिस्तानसाठी वेगळी संविधान सभा अस्तित्वात आणण्याचे मान्य केले. ३ जून १९४७ ला पाकिस्तान साठी वेगळी संविधान सभा अस्तित्वात आली. मूळच्या ३८९ सभासद संख्येपैकी ९० सभासद पाकिस्तानी सभेत गेले. आणि उरलेल्या २९९ सभासदांची संविधान सभा १४ ऑगस्ट १९४७ पुन्हा कामाला लागली. ब्रिटीश सरकारची भारतातील अधिकृत वारसदार म्हणून. या संविधान सभेने २९ ऑगस्ट १९४७ रोजी घटना समिती बनवली. तिचे अध्यक्ष होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या अध्यक्षतेखाली भारताची घटना बनवण्यात आली. दोन वर्षे, अकरा महिने आणि अठरा दिवसात आपल्या देशाच्या घटनेचा मसुदा (राष्ट्र निर्मितीच्या सॉफ्टवेअरचा मसुदा) बनविण्यात आला. जगातील सर्वात मोठी लिखित स्वरूपाची घटना बनविण्यात आली. २९ नोव्हेंबर १९४९ ला तिला संविधान सभेची मान्यता मिळाली. आणि २६ जानेवारी १९५० ला ती पूर्ण स्वरूपात लागू झाली. आपल्या संविधान सभेत जरी काँग्रेस चे बहुमत असले तरी त्यात अनेक प्रकारचे लोक होते. मार्क्सवादी, कट्टर हिंदुत्ववादी, समाजवादी अश्या सर्व विचारसरणीच्या लोकांनी आपली संविधान सभा भरलेली होती. प्रत्येक विचारसरणीच्या सभासदाने घटनेच्या मसुद्यावर आपापला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. घटनाकारांसमोर मोठे आव्हान होते ते नव्या भारताला घडवण्याचे. जेंव्हा मी घटनेच्या रचनेवर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी बघतो तेंव्हा मला उगाच वाटते की वसंत बापटांनी फार नंतर एका कवितेत लिहिलेले "पुराण तुमचे तुमच्या हाती ये उदयाला नवी पिढी' हे वाक्य घटनाकारांचे ब्रीद वाक्य म्हणून शोभते. आपली घटना काही संपूर्णपणे नव्याने बनवली गेलेली नाही. ती बनवताना, ब्रिटीशांनी बनवलेल्या अनेक जुन्या कायद्यातील तरतुदींचा वापर केला गेला होता. Government of India Act, 1858 Indian Councils Act, 1909 Government of India Act, 1919 Government of India Act, 1935 Indian Independence Act, 1947 या सर्व कायद्यातील योग्य तरतुदी वापरून आणि ७६३५ दुरुस्त्यामधून २४७३ नाकारून, आपल्या घटनेचा मसुदा तयार झाला. त्याशिवाय, इतर देशांच्या घटनांमधील उपयुक्त संकल्पना देखील आपल्या घटना समितीने वापरल्या. ब्रिटिशांकडून: संसदीय लोकशाही, एक नागरिकत्व, कायद्याचे राज्य, संसदेमधील स्पीकरचे पद, कायदा बनवण्याची पद्धत आणि कायद्याने बनवलेल्या पद्धती; या गोष्टी घेतल्या. अमेरिकेकडून: मूलभूत हक्क, संघराज्याची रचना, मतदारसंघ, न्यायालयांचे स्वातंत्र्य आणि सरकारच्या कामांची घटनेने अस्तित्वात आणलेल्या तीन संस्थामध्ये वाटणी, न्यायालयीन पुनरावलोकन, राष्ट्रपती हा सैन्याचा प्रमुख, कायद्यापुढे सगळे समान, या संकल्पना घेतल्या. आयर्लंडकडून : घटनेच्या मार्गदर्शक तत्वांची कल्पना घेतली. ऑस्ट्रेलियाकडून : देशांतर्गत मुक्त व्यापार, केंद्र सरकारला कायदे करण्यासाठी जास्तीचे हक्क, केंद्र आणि राज्य यामधील सामायिक मुद्द्यांची वेगळी यादी, आणि उपोद्घाता (प्रीअम्बल) मधील शब्द रचना, या गोष्टी घेतल्या. फ्रान्सकडून: स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या कल्पना घेतल्या. कॅनडाकडून : प्रबळ केद्र असलेली संघराज्य रचना, केंद्र आणि राज्य यामधील सत्तेचे वाटप, अवशिष्ट (residuary) सत्ता केंद्राकडे असणे, या कल्पना घेतल्या. सोव्हिअत युनिअन कडून: नागरिकांची कर्तव्ये, नियोजन मंडळ या कल्पना घेतल्या. (नियोजन मंडळाची ही कल्पना घटनेत सामावली गेली नसली आणि तिच्यासाठी विशेष कायदा केला गेला नसला तरी १५ मार्च १९५० ला सरकारच्या एका आदेशाने ती प्रत्यक्षात आणली गेली.) जर्मनीच्या वायमार प्रजासत्ताकाकडून आणीबाणी संबंधी तरतुदी; दक्षिण आफ्रिकेकडून घटनेत करावयाच्या बदलांची / सुधारणांची कल्पना आणि जपान कडून कायदा राबवण्याची पद्धत घेतली. म्हणजे घटनाकारांनी प्राचीन ऋषी मुनींनी मांडलेली "सर्वेपि सुखिन: सन्तु" ची कल्पना स्वीकारली पण ती प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी प्राचीन भारतीय संस्कृतीने वापरलेले जाती आणि वर्णव्यवस्थेचे प्रारूप न वापरता, आधुनिक जगातल्या अनेक संकल्पना वापरून आपल्या द्रष्ट्या प्राचीन ऋषींचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न केला. याशिवाय बाकी कुठल्याही प्रगत देशात न दिसलेली पण भारतासारख्या जातीव्यवस्थेने पोखरलेल्या देशात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या संकल्पनांच्या प्रत्यक्ष अस्तित्वासाठी आवश्यक अशी एक नवीन संकल्पना देखील भारतीय घटनेने आणली. ती म्हणजे आरक्षण. ज्या प्रगत देशांत आरक्षण नाही आहे तिथे राजकीय सत्ता शेवटी मूठभर लोकांची बटिक होऊन बसते हे सत्य आपण सभोवार पाहू शकतो. मग ज्या देशात, अनेक शतके माणसाने माणसाला माणसासारखे वागविले नाही, तिथे तर आरक्षणाशिवाय स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटीश सरकार जाऊन दुसऱ्या मूठभरांची सत्ता, असे केवळ सत्तांतर घडले असते, हा प्रचंड मोठा धोका आपल्या संविधान समितीने आणि घटना समितीने ओळखला होता. त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी आरक्षण या संकल्पनेचा वापर आपल्या घटनेत झाला. आज जरी आरक्षणावरून गदारोळ उठत असले आणि सत्तासुंदरीच्या मागे लागलेले सर्वपक्षीय धूर्त पुढारी आरक्षण संकल्पनेचा धुव्वा उडवण्यास पुढे येत असले तरी, आरक्षणाचा मूळ मुद्दा 'सत्ता संपादनाचा/ नोकरी मिळवण्याचा / शिक्षणाचा', सोपा मार्ग असा नसून शतकानुशतकांचा ढासळलेला समतोल सावरणे, आणि पुढील पिढ्यांतील काही मुजोरांकडून उरलेल्या इतर अज्ञ, अशिक्षित, भोळ्या, मूर्ख किंवा अदूरदर्शी भारतीय नागरिकांचे शोषण होऊ न देणे हाच होता असे मला वाटते. घटना म्हणजे आपल्या देशाचे सॉफ्टवेअर आहे. ती प्रवाही किंवा जिवंत आहे. ती लवचिक आहे. तिच्यात बदल घडवता येऊ शकतो. ती एक मुक्त व्यवस्था आहे. या देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती सर्व हक्क विनाअट देते. त्याचे वर्तन देशविरोधी असेल तर त्याच्या या मूलभूत किंवा घटनादत्त हक्कांवर तात्पुरती किंवा कायम स्वरूपी बंदी आणून, त्याला सुधारायची संधी देखील देते. आपण ज्या कार्यालयात काम करतो तेथील व्यवस्था बंदिस्त असतात, तेथील मूळ अवस्था (default state) 'तुम्हाला कुठलेही अधिकार नाहीत' अशीच असते. आणि मग पदोन्नती बरोबर तुमचे अधिकार वाढू लागतात. अधिकार आणि हक्क वाढवण्यासाठी आपल्याला आपली योग्यता सिद्ध करावी लागते. पण अशी व्यवस्था देशासाठी लागू करता येणार नाही, अन्यथा या देशातील बहुसंख्य जनता मूठभरांची गुलाम बनून राहील, हे ओळखून घटनाकारांनी काही अधिकार आणि हक्क जन्मसिद्ध तर काही घटनादत्त करून भारताच्या प्रत्येक नागरिकाला ते मिळतील याची काळजी घेतली आहे. आपली घटना आपल्याकडून फक्त एकच अपेक्षा करते. ती म्हणजे घटनादत्त कर्तव्यांचे पालन करायची. जोपर्यंत आपण ते करणार नाही तोपर्यंत आपण मागील पिढीतील उत्तुंग व्यक्तिमत्वांची खुरटलेली मुले म्हणून आपल्या नवीन राष्ट्राला पांगळे करीत राहू. जेएनयु मधील विद्यार्थ्यांवर sedition चा आरोप लावला असे वाचले आणि ऐकले. तेंव्हा एक जाणवले, की भारतात sedition हा शब्द वापरला जाऊ शकत नाही. कारण त्याचा अर्थ होतो राजद्रोह. आणि भारतात राजा ही संकल्पना नाही. त्यामुळे sedition चा भारतीय कायद्यात कुठे उल्लेख आला असेल तर तो treason म्हणजे देशद्रोह अश्याच अर्थाने वापरला आहे असे गृहीतक धरून आपल्याला पुढे सरकत येईल. क्रमश

Book traversal links for भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ५)

  • ‹ भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ४)
  • Up
  • भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ६) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
समाज
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख
मत

प्रतिक्रिया द्या
13973 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

गुड!

तर्राट जोकर
Fri, 02/26/2016 - 00:31 नवीन
गुड!
  • Log in or register to post comments

वाचतो आहे. गेल्या भागात

राजेश घासकडवी
Fri, 02/26/2016 - 03:35 नवीन
वाचतो आहे. गेल्या भागात भारताचं स्वातंत्र्य, तत्कालीन संस्थानांचं विलिनीकरण आणि राज्यघटना लिहिणं ही सगळी आवश्यक पार्श्वभूमीची बैठक चांगली जमलेली आहे. लिहीत राहा.
  • Log in or register to post comments

लेख छान.

बोका-ए-आझम
Fri, 02/26/2016 - 09:24 नवीन
एकच सुधारणा सुचवू इच्छितो - नियोजन मंडळ किंवा Planning Commission हे राज्यघटनेने बनवलेलं नाही. वित्तमंडळ किंवा Finance Commission हे बनवलेलं आहे. नियोजन मंडळ जर घटनेने बनवलं असतं तर नीती आयोगाची स्थापनाच होऊ शकली नसती.
  • Log in or register to post comments

हो.... तुम्ही दाखवल्यावर

Anand More
Fri, 02/26/2016 - 09:44 नवीन
हो.... तुम्ही दाखवल्यावर आत्ता वाचताना चूक दिसली... थोड्या वेळात दुरूस्त करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

हेच म्हणायला आलो होतो. १५

एस
Fri, 02/26/2016 - 10:12 नवीन
हेच म्हणायला आलो होतो. १५ मार्च १९५० रोजी नियोजन मंडळाची स्थापना झाली. त्यामागे पं. नेहरूंवर सोविएत महासंघातील संबंधित प्रणालीचा पडलेला प्रभाव कारणीभूत होता. अर्थात, अशा नियोजन मंडळाची वा आयोगाची कल्पना सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष असताना डॉ. साहांच्या पुढाकारातून अस्तित्त्वात आली होती. अगदी तत्कालीन ब्रिटिश सरकारनेही दोनवेळा नियोजन मंडळ स्थापन केले होते. या सर्व स्वातंत्र्यपूर्व घटनांचीही पार्श्वभूमी याला होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मोरेसर अतिशय सुंदर लेखमाला आहे….

पगला गजोधर
Fri, 02/26/2016 - 09:36 नवीन
मोरेसर अतिशय सुंदर लेखमाला आहे…. तुमची ही लेखमाला, 'मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?', याचं मिसळपाववरील उत्कृष्ठ उदाहरण आहे. तुमच्या लक्षात, एक गोष्ट आलीय का, आत्तापर्यंत ? तुमच्या लेखावर प्रतिक्रिया हळू हळू कमी होत चालल्यात … जसे जसे तुम्ही, साध्या शब्दात, मुद्देसूदपणे, तत्कालीन पंतप्रधान नेहरू, राष्ट्रपिता महात्मा गांधी, यांच्या निर्णय व कामगिरीचा तार्किक उहापोह केला, त्यामुळे कितीतरी कंपूबाज भक्तांची निराशा झाली असावी, कारण तुमच्या लेखातून त्यांच्यावर कुजबुज आरोप करण्याची संधी काही त्याना फारशी मिळाली नसावी. सरदार पटेल विरुद्ध नेहरू, महात्मा गांधी विरुद्ध डॉ आंबेडकर, अशी झुंज लावण्यासाठी मसाला सुद्धा , तुमच्या या लेखमालिकेतून त्यांना मिळत नसावा… असो, मला मात्र तुमची ही लेखमाला खरंच आवडली. असेच लिहित रहा.
  • Log in or register to post comments

प्रत्येक ठिकाणी भक्त आणि

मम्बाजी सर्वज्ञ
Mon, 02/29/2016 - 20:50 नवीन
प्रत्येक ठिकाणी भक्त आणि बाकीचे असे वर्गीकरण करायची कावीळ झाली कि काय होते त्याचे उदाहरण म्हणजे तुमची प्रतिक्रिया! लेखमाला चांगली आहेच आणि म्हणूनच सगळे नीट वाचून प्रतिक्रिया देतायत. नको तिथे चिखलात दगड मारायची तुम्हाला हौस आहे का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

पग भाऊ

बोका-ए-आझम
Fri, 02/26/2016 - 10:15 नवीन
लेख कधी टाकलाय ते बघा. किती वाचनं झाली आहेत ते बघा. प्रतिक्रिया जास्त म्हणजे लेखाचा दर्जा जास्त असं होत नाही हे चुकीचं गृहीतक आहे हे मी तुम्हाला एवढी छान ' खुशबू ' नावाची कादंबरी लिहिल्यानंतर सांगावं म्हणजे जरा जास्तच होतंय असं नाही तुम्हाला वाटत? अभिव्यक्तीस्वातंत्र्यात प्रतिक्रिया न देण्याचंही स्वातंत्र्य आहे. ते काही लोक उपभोगताहेत. काय फरक पडतो?
  • Log in or register to post comments

बोकाभाऊ

पगला गजोधर
Fri, 02/26/2016 - 10:51 नवीन
तुमच्यासारखे प्रतिक्रीया देवून, लेखामधे वँल्युअँड करणारे, फार कमी लोकं आहेत. तुम्हाला वा तुमच्यासारख्या चांगल्या वाचकांना गृहीत ठेवून, माझी वरची प्रतिक्रिया नव्हती. असो, अभिव्यक्तीस्वातंत्र्यात प्रतिक्रिया न देण्याचंही स्वातंत्र्य आहे. हे मला मान्य आहे. उदा. नेहरुजींची प्रतिमा लेखातून उजळ होतीये, असा संशय, काहींना आला, की लगेच नेहरू व लेडी माउंटबँटन, याविषयी कुजबुजी पिंका टाकून त्यांचे प्रतिक्रिया देण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य काहींनी लगेच व्यक्तही केले… सदर लेखं भारताविषयी आहे, याची जाणीव करून दिल्यावर, आपला तेव्हडा अभ्यास नाही, याविषयीचा साक्षात्कार पण त्यांना झाला. अश्या लोकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याआड, मौन धारण केले आहे काय ? अशी शंका मनाला स्पर्शून गेली. प्रतिक्रियांची संख्या व लेखाचा दर्जा, याचा परस्पर संबंध, प्रत्येक वेळी असतोच, असा काही नियम नाही, हेही मान्य. मी फक्त मोरेसरांच्या लेख क्र १ ते आता, प्रतिक्रिया संख्या कमी जास्त असतील, पण त्यांचा एकंदरीत ट्रेंड उतरता मला भासला, म्हणून मी प्रतिक्रिया व तिच्यामागील माझे गटफिलिंग दिले. मी चूकही असू शकतो, याची मला कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

जाऊद्या हो. ते त्यांच्या

आनन्दा
Fri, 02/26/2016 - 11:00 नवीन
जाऊद्या हो. ते त्यांच्या चश्म्यातून बघतायत.. तटस्थता म्हणजे काय हे त्यांना देखील माहीत नाही.. किंवा अनेक दिवस विरोधी मते मांडून ते पूर्ण पणे विरोधी पक्षात गेलेत. त्यांना बहुधा हे माहीत नसावे की मिपावर तटस्थ लेखनाचा नेहमीच पुरस्कार होतो. हे म्हणजे आपण वादग्रस्त विधाने करायची आणि लोक अंगावर आले की हे बघा कसे अंगावर येतात असे ओरडायचे. असो. त्यांच्यामुळे लेखाचे गांभीर्य उगीच कमी होत जाते. मोरे सर - लेखमाला वाचत आहे. आता हे सगळे जनेयु ला कसे अ‍ॅप्लाय होते हे पाहण्याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मस्तच

प्रदीप साळुंखे
Fri, 02/26/2016 - 11:41 नवीन
[अवांतर : देशासाठी झटलेली तेव्हाची काँग्रेस ही कधीच विसर्जित झाली आहे,त्या काँग्रेसमध्ये डावे-उजवे-कम्युनिस्ट सगळ्या प्रकारचे लोक होते. आताच्या काँग्रेसचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.(हे माझे मत अवांतर आहे,तरीही मांडावेसे वाटले)] बाकि लेख छान आहे.
  • Log in or register to post comments

अत्यंत मुद्देसुद व

मोहन
Sun, 02/28/2016 - 12:22 नवीन
अत्यंत मुद्देसुद व माहितीपूर्ण लेखमाला . वाचत आहे. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

आनंदजी,

सतीश कुडतरकर
Mon, 02/29/2016 - 15:12 नवीन
आनंदजी, सहज-सोप्या भाषेत लिहिले आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

१६ डिसेंबर १९४७ ला नेहरूंनी संविधान सभेच्या उद्दिष्टांचा ठराव मा

सुधीर१३७
Mon, 02/29/2016 - 19:27 नवीन
१६ डिसेंबर १९४७ ला नेहरूंनी संविधान सभेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला. १६ डिसेंबर १९४६ असे हवे.
  • Log in or register to post comments

टंकताना चुकलेले कळले नाही.

Anand More
Mon, 02/29/2016 - 21:55 नवीन
टंकताना चुकलेले कळले नाही. दुरूस्तीसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर१३७

नजिकचा इतिहास - ८००० देशद्रोही!जंगल मे मोर नाचा किसिने ना देखा..

विकास
Mon, 02/29/2016 - 21:51 नवीन
सर्व प्रथम माझे मत - देशाचे तुकडे करण्याची भाषा आक्षेपार्ह आहे आणि त्याला विरोध करण्यात काही गैर नाही, जर प्रकरण गंभीर आहे हे सिद्ध होऊ शकले (उदा अतिरेकी संबंध, घातपाताचे प्लॅन्स वगैरे) तर कायद्याने योग्य नियंत्रण आणण्यात पण काही गैर नाही ... मात्र याचा अर्थ भाषण स्वातंत्र्याला मर्यादा आणणे मला व्यक्तीगतरीत्या मान्य नाही. मात्र आत्ता जे काही चालले आहे त्यातला उद्देश साधा आहे, प्रस्थापित सरकारला नावे ठेवणे आणि सातत्याने बदनामी करणे. मंथरा जशी सतत कैकयीचे ब्रेनवॉशिंग करत होती तसे सध्या सामान्यांचे ब्रेनवॉशिंग करणे चालू आहे. यात सामान्यांना कैकयी म्हणण्याचा उद्देश नाही कारण ते ब्रेन वॉशिंग करून घेण्यास तयार नाहीत ;) पण माध्यमे आणि तथाकथीत विचारवंतांना मात्र मंथरा म्हणावेसे वाटत आहे. याचे अजून एक कारण म्हणजे ९ डिसेंबर २०१२ चा तेहलका मधील वृत्तांत...

Democratic protest. 8,000 Sedition cases. Is this a free country?

ऑ? तेहलकाचे आभार की त्यांनी यावर लेख लिहीला पण कोणत्याच माध्यमांनी आणि विचारवंतांनी आवाज उठवल्याचे आठवत नाही... आवार्ड वापसी झाली का या बिचार्‍या ८००० साठी? त्यांच्यावरील केस चे काय झाले? हे असे क्से? का फक्त जे एन यु मधे झाले तरच टॉलरन्स खतरेमे अशी बोंब ठोकायची?
  • Log in or register to post comments

ह्या व्हाटअबाउटरीच्या रोगाचं

तर्राट जोकर
Mon, 02/29/2016 - 22:23 नवीन
ह्या व्हाटअबाउटरीच्या रोगाचं लौकर काहीतरी करा ब्वा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

?

विकास
Tue, 03/01/2016 - 02:32 नवीन
बोली भाषेत लिवा की जरा... जे एन यु च्या विद्यार्थांच्या संदर्भात कोर्टात केस आहे. मला खात्री आहे की उद्यापर्यंत कन्हैया बाहेर येईल. तेच ऑलमोस्ट पण नक्की किती वेळात ते माहीत नाही पण उमर आदी च्या बाबतीत देखील होईल. ते जाउंदेत पण त्यासाठी तमाशा करत तमाम भारतीय जनतेची संसद ओलीस धरली आहे. ती देखील अशांनी की जे सत्तेत असताना ८००० सामान्यांवर देशद्रोहाचा आरोप केला होता. कोणी बोलले नाही कारण ते बिचारे त्यांच्या मागण्यासाठी लढत होते, देश फोडायची अथवा दहशतवाद्याच्या हैतात्म्याबद्दल लढत नव्हते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

तेच म्हणतोय, ते त्यांच्या

तर्राट जोकर
Tue, 03/01/2016 - 10:57 नवीन
तेच म्हणतोय, ते त्यांच्या मागण्यांसाठी लढत असतांना आजचे सत्ताधारी काय करत होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

ते

विकास
Tue, 03/01/2016 - 17:55 नवीन
आजचे सत्ताधारी काय करत होते? असं कसं म्हणता साहेब? कानफाट्या तो कानफाट्या! अहो ते तर असहीष्णुतावादी आहेत म्हणून ठरले आहे ना? ते तर स्वातंत्र्याची गळचेपीच करायला बसले आहेत ना! त्या व्यक्तीस्वातंत्र्याचा लोप झाल्याबद्दलच तर स्वातंत्र्याचे रखवाले त्यांच्यानावाने जाहीर निषेध करत आणि वाण वाटत हिंडत आहेत ना! पण आज जे सहीष्णू आणि स्वातंत्र्याचे रखवाले आहेत, ते त्यावेळेस मुग गिळून का बसले होते हा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

असं कसं असं कसं? म्हणजे

तर्राट जोकर
Tue, 03/01/2016 - 20:10 नवीन
असं कसं असं कसं? म्हणजे सत्ताधार्‍यांना कुठलाच प्रश्न विचारु नये असेच सुचवत आहात ना वेगळ्या शब्दात? तेही तर्कहिन शब्दबंबाळ वाक्य लिहून. आपल्यावर आले की कोपर्‍यात दडायचे. दुसरीकडे बोट दाखवायची सवय कधी जाईल एवढेच विचारले, त्यालाच व्हाटअबाउटरी म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अज्जिबात नाही!

विकास
Wed, 03/02/2016 - 00:23 नवीन
कोपर्‍यात दडलो नाही, तुम्हाला कॉर्नर करत आहे... :) सत्ताधार्‍यांना प्रश्न विचाराना! सरकार आपलंच तर आहे! आपला पहीला हक्क! पण आत्तापर्यंत विचारले नाहीत असे म्हणायचे आहे का? बरं माझा मुद्दा परत सांगतो. या सरकारला १२४अ कलम वापरणे योग्य वाटले, ते योग्य न वाटल्याने त्यांच्यावर टिका झाली. आता आधीच्या सरकारने पण १२४ अ वापरले. जे आत्ता वापरतात त्यांना त्यात काय अयोग्य वाटणार? पण जे आत्ता त्याला विरोध करतात त्यांचा त्यावेळेस देखील विरोध असायलाच हवा ना? मग मुग गिळून का बसलात? ते सरकार देखील चूक होते इतके तरी किमान म्हणायची तयारी आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

आता आधीच्या सरकारने पण १२४ अ

तर्राट जोकर
Wed, 03/02/2016 - 00:34 नवीन
आता आधीच्या सरकारने पण १२४ अ वापरले. जे आत्ता वापरतात त्यांना त्यात काय अयोग्य वाटणार? >> हे जनतेची काळजी करणारे भाजपाचे लोक यांना तेव्हा का वाटले नाही हा प्रश्न विचारायचा नाही? फक्त त्यांनीच प्रश्न विचारायचे? साठ वर्षात काय केले, साठ वर्षात काय केले म्हणून कंठशोष करण्यात पाच वर्ष घालवणार काय? आपली जबाबदारी दुसर्‍यावर ढकलून येत नसते. पण जे आत्ता त्याला विरोध करतात त्यांचा त्यावेळेस देखील विरोध असायलाच हवा ना? मग मुग गिळून का बसलात? ते सरकार देखील चूक होते इतके तरी किमान म्हणायची तयारी आहे का? >> त्या वेळेस का मूग गिळुन बसलात हा प्रश्न विचारणे म्हणजेच मुळ मुद्द्यावरुन शिताफीने लक्ष वळवुन भलतीकडे संभ्रम निर्माण करणे. दोन बाबींमधे फक्त १२४अचा मुद्दा समान आहे म्हणुन तुम्ही कॉर्नर करु जाताय. फसाल बरं स्वतःच. तुम्ही मला कॉर्नर करु शकत नाही. विसरा. सरकारची बाजू तुम्ही इथे ती अधिकृतपणे मांडत आहात काय? तसे असेल तर माझा पेटारा मी उघडेन. मग कुठलाच कॉर्नर तुम्हालाच सापडायचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

:)

विकास
Wed, 03/02/2016 - 01:44 नवीन
तुम्ही मला कॉर्नर करु शकत नाही. गोलगोल फिरता आहात म्हणून कॉर्नर नाही असे वाटते आहे.... मुळ मुद्द्यावरुन शिताफीने लक्ष वळवुन मुळ मुद्याबद्दल बोललोय की अभ्यास करा म्हणजे समजेल. तरी देखील नवनीत मार्गदर्शकासारखे थोडक्यात समजवायचा प्रयत्न करतो. आता हे ज्ञानरुपी जल आपल्याला लाभेल अशी आशा आहे. निराशा झाल्यास वेडी आशा होती असे म्हणेन... :)
  1. मला व्यक्तीस्वातंत्र्यावर मर्यादा आणलेल्या आवडत नाहीत
  2. पण स्वातंत्याबरोबर जबाबदारी देखील येते. त्यामुळे या संदर्भात जर देशाचे तुकडे करण्याची भाषा ज्याने कोणी केली असेल त्याला समज मिळेल इतकी शिक्षा झाल्यास आश्चर्य वाटायला नको की अन्याय्य वाटायला नको.
  3. मला असे वाटते आहे की कन्हैय्याच्या बाबतीत पोलीस सिद्ध करू शकणार नाहीत आणि कोर्ट त्याला बाइज्जत मोकळे करेल. (बघुयात, घोडा-मैदान जवळ आहे)
  4. उमर आणि इतरांच्या बाबतीत मात्र कदाचीत किमान समज देण्यापर्यंत कोर्ट जाऊ शकेल. मात्र त्याबाबतीत स्वयंघोषित विचारवंत आणि तथाकथीत निधर्मी हे ह्या न्यायाकडे धर्माच्या चष्म्यातून पाहू लागतील.
  5. आता १२४ अ हे दिल्ली पोलीसांनी पक्षि गृहमंत्रालयाच्या प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अनुमतीने ज्या काही घोषणा दिसल्या त्यामुळे लावले. पण मला वाटते तसे हैदराबाद विद्यापिठातील विद्यार्थ्यांना अफझलवरून गळा काढला तरी लावले गेले नव्हते.
  6. जर सरकारने हे कलम उठसुठ लावले अथवा इतर कुठल्याही पद्धतीने व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच केला तर त्याचा निषेधच आहे आणि तसा तो करेन देखील. पण या सरकारच्या बाबतीत जितके बोलले गेले आहे त्यावरून भारतात व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, असे केवळ एखादा द्वेषाच्या नशेतलाच म्हणू शकेल.
सरकारची बाजू तुम्ही इथे ती अधिकृतपणे मांडत आहात काय? अधिकृत शब्दाचा अर्थ मला वाटते विंग्रजीत Official असा आहे अर्थात जो (या संदर्भात) सरकारचे घटनेनुसार प्रतिनिधित्व करतो अशांसाठी आहे. मी त्या वर्गात मोडत नाही...मै तो एक आम आदमी हूं! (पण "त्यातला' नाही!) :) तसे असेल तर माझा पेटारा मी उघडेन. मग कुठलाच कॉर्नर तुम्हालाच सापडायचा नाही. अहो नि:संकोच उघडा! असे लाजायचे कारण ते काय? तेव्हढे मिपाच्या अधिकृत धोरणात बसते आहे ना तितके बघा, म्हणजे झालं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

गोलगोल फिरता आहात म्हणून

तर्राट जोकर
Wed, 03/02/2016 - 09:52 नवीन
गोलगोल फिरता आहात म्हणून कॉर्नर नाही असे वाटते आहे.... >> गोल गोल तर तुम्हीच फिरत आहात. मी सरळ विचारले आता सत्तेत असणार्‍यांना हा आठ हजारांवर झालेला अन्याय अन्याय वाटत नाही का? तेव्हा ते काय करत होते? ह्या प्रश्नाचा आताच्या कन्हया प्रश्नाशी न जोडता स्वतंत्र उत्तर द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

उत्तर दिले आहे

विकास
Wed, 03/02/2016 - 17:14 नवीन
उत्तर दिले आहे. आता पेटारा उघडा ना प्लिज! मला खूप उत्सुकता आहे हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

तेव्हा ते काय करत होते?

तर्राट जोकर
Wed, 03/02/2016 - 17:35 नवीन
तेव्हा ते काय करत होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

आता कितीवेळा सांगायचे

विकास
Wed, 03/02/2016 - 21:39 नवीन
अहो मला वाटले तुम्ही विचारवंत आहात. इथे काय आपले उगाच सर्कसच्या रिंगणात फिरल्यासारखे चालले आहे? ;) तुम्ही विचारत आहातः तेव्हा ते काय करत होते?. त्याला उत्तर म्हणून, आधी लिहीलेले परत चिकटवतो:
अहो ते तर असहीष्णुतावादी आहेत म्हणून ठरले आहे ना? ते तर स्वातंत्र्याची गळचेपीच करायला बसले आहेत ना!
म्हणजे तेंव्हा देखील त्यांना (म्हणजे आत्ताच्या सरकारपक्षाला) गळचेपी मान्यच होती असे मी समजतो. ;) पण तुम्हाला आणि तुमच्यासारख्या विचारवंतांना ती गळचेपी मान्य होती का ह प्रश्न आहे. आता निरुत्तर झाल्याने उत्तर देता येत नसेल तर राहूंदेत. भोंदूपणा हा केवळ धार्मिकतेचे बुरखे पांघरणारे बुवाबाबाच करतात असे नाही तर निधर्मतेचे बुरखे घालणारे विचारवंत देखील करतात झालं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अहो ते तर असहीष्णुतावादी आहेत

तर्राट जोकर
Wed, 03/02/2016 - 21:45 नवीन
अहो ते तर असहीष्णुतावादी आहेत म्हणून ठरले आहे ना? ते तर स्वातंत्र्याची गळचेपीच करायला बसले आहेत ना! >> हे तुम्ही कबूल केले आहे काय? कबूल केले असेल तर मग दुसर्‍याला प्रश्न विचारण्याचा अधिकार उरत नाही. दॅट्स इट. उगा निरुत्तर केल्याचे इमले कशापाई बांधायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अहं

विकास
Wed, 03/02/2016 - 22:13 नवीन
उगा निरुत्तर केल्याचे इमले कशापाई बांधायचे? त्याला इमले नाही वास्तव म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

चालायचेच. भ्रमाला वास्तव

तर्राट जोकर
Wed, 03/02/2016 - 22:30 नवीन
चालायचेच. भ्रमाला वास्तव मानणे काही नवीन नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

ही अशी लेखमाला आहे होय...

अर्धवटराव
Wed, 03/02/2016 - 04:43 नवीन
टायटलमधले ते जे.एन.यु., राष्ट्रवाद वगैरे शब्द वाचुन हा धागा उघडलाच नव्हता. छान माहिती मिळते आहे. अवांतरः इथेही खरुज काढलीच पब्लीकने. चालायचच.
  • Log in or register to post comments

मागचे भाग पटापटा आले ,,पुढचा

जेपी
Wed, 03/02/2016 - 18:35 नवीन
मागचे भाग पटापटा आले ,,पुढचा भाग पण पटकन येऊद्या..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा