✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एअरलिफ्ट

A
Anand More यांनी
Sun, 01/24/2016 - 23:23  ·  लेख
लेख
एअरलिफ्ट पाहिला. तो बघायचा हे तर ट्रेलर बघतानाच ठरवलं होतं. काल रात्री एका मैत्रिणीने आणि आज सकाळी एका मित्राने अल्पाक्षरी रिव्ह्यू दिला होता. "छान आहे. आवडला. तू नक्की बघ." म्हणून. त्यामुळे आज सकाळी तिकीट मिळणार की नाही या धाकधुकीत असताना संध्याकाळच्या शो ची तिकीट हिने काढून आणली आणि पिक्चर बघायला गेलो. पिक्चर बघत होतो. आणि अनेक गोष्टी एकामागून एक आठवू लागल्या. १९९० म्हणजे मी ९ वीत होतो. तेंव्हा रात्री बातम्यांमध्ये युद्धाचे काही प्रसंग दाखवायचे. शुक्रवारी रात्री लागणाऱ्या वर्ल्ड धिस वीक मध्ये अजून जास्त. पण ते सगळे रात्रीचे प्रसंग असायचे. अंधारात उडणारी स्कड मिसाईल्स. प्रकाशाचे गोळे वगैरे. त्या युद्धाची एकदम मोठी ठळक आठवण म्हणजे गल्लोगल्ली सुरु झालेले पी सी ओ / एस टी डी / आय एस डी चे फोन बूथ. मोबाईल अजून यायचे बाकी होते. म्हणून गल्फ मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या नातेवाईकांसाठी संवाद करण्याचा तो महत्वाचा दुवा होता. माझा प्रिय मित्र ओंकार पत्की याचे बाबा सौदी अरबला असायचे. जेंव्हा अमेरिकेने चढाई सुरु केली त्या दिवशी ते सौदीला परत गेले होते. त्यानंतर ओंकार आणि त्याची आई यांची जीवाची घालमेल जवळून पाहिली होती. युद्ध तसे दूरच होते ते जवळ आले होते केवळ ओंकारच्या बाबांमुळे. नंतर करीअर आणि अभ्यास करताना हे दूरचे युद्ध विसरलो. जवळपास १० वर्षांनी स्वतःचा क्लास चालू केला क्लासमध्ये मुलांना १९९१ च्या आर्थिक उदारीकरणामागची कारणे शिकवताना, भारतापुढील परकीय चलनाचे संकट गल्फ युद्धाने वाढले हे सांगताना युद्धाचे आर्थिक परिणाम वाचायला मिळाले. आणि दूरचे युद्ध आर्थिक अंगाने दिसू लागले. एअरलिफ्टमुळे झाले काय की या दूरच्या आणि केवळ आर्थिक बाजू दिसलेल्या युद्धाला माझ्या मनात मानवी स्पर्श मिळाला. आणि गेल्या दहा वर्षात वाचनामुळे कल्पिलेल्या आणि आंतरजालामुळे वाचू किंवा बघू शकलेल्या अनेक गोष्टी अधिक परिणामकारकपणे अनुभवता आल्या. त्यांची दाहकता अंगावर आली. आपण किती सुरक्षित जीवन जगत आहोत ते जाणवले. २०१५ च्या एप्रिल मध्ये झालेले "ऑपरेशन राहत", ज्यात येमेनमधून ४६४० भारतीयांना आणि ९६० परदेशी लोकांना बाहेर काढले गेले त्या सुटकेचे आपण सर्व साक्षीदार होतो. आता २४ तास चालणारी माध्यमे आणि त्याशिवाय सोशल मिडियाद्वारा सतत हातात मिळणाऱ्या अपडेट्स यामुळे आपण त्याचा थरार अनुभवू शकलो होतो. पण जेंव्हा संपर्काची साधने तुटपुंजी होती त्या काळात १,७०,००० लोकांना १३ दिवस दिशाहीन आणि नंतरचे ५९ दिवस त्या युद्धकाळात वाळवंटात कसे वाटले असतील त्याची जाणीव एअरलिफ्ट अगदी यथार्थपणे करून देतो. मागच्या आठवड्यात एका मैत्रिणीशी मोझेस बद्दल बोललो होतो. इजिप्तच्या राजदरबारात वाढलेला मोझेस. रामसिस राजाच्या भावासारखा वाढलेला मोझेस. ४०,००,००० लोकांना केवळ देवाच्या वचनावर विश्वास ठेवून इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर काढणारा मोझेस. मग वचनात सांगितलेल्या दुधा मधाच्या प्रदेशापर्यंतची सिनाई च्या वाळवंटातील ४० वर्षाची दिशाहीन, कंटाळवाणी आणि असुरक्षित वाटचाल करणारा मोझेस. अन्न धान्याची टंचाई. अनुयायांचा अविश्वास, त्यांच्या कटकटी सहन करणारा मोझेस. देवाकडून स्पष्ट दिशानिर्देश मिळत नाही म्हणून हतबल झालेला मोझेस. जोशुआ सारख्या मदतनीसांच्या आधारे सर्व अडचणीना पुरून उरणारा मोझेस. यातील अनेक गोष्टी मला रणजीत काट्याल मध्ये दिसल्या. इराकी सैनिक निशस्त्र कुवेती नागरिकांना जवळून डोक्यात गोळ्या घालताना पाहिले आणि दक्षिण व्हिएतनामच्या National Police चा प्रमुख असलेला लोन ग्युएन चे एडी अॅडम्स ने काढलेले जगप्रसिद्ध छायाचित्र आठवले. "टिपू सुलतान" जहाज युनोच्या बंदीनंतर वळताना बघितले. ५०० लोक भंगार जहाजात बसून कुवेत बाहेर पडताना बघितले आणि तीन रात्री जागून रडत रडत वाचलेली “लिऑन युरिस” या लेखकाची “बाळ भागवत” यांनी भाषांतरित केलेली “एक्झोडस” ही कादंबरी आठवली. त्यातला "आरी बेन कनान" हा कणखर नायक आठवला. त्यात "आलिया बेत" (homecoming) च्या योजनेंतर्गत दोन आठवड्याच्या रेशनवर ४५०० पेक्षा जास्त ज्यू लोकांना घेऊन आखाती समुद्रात अडकलेल्या “एस एस एक्झोडस” ह्या जहाजावरील प्रवाश्यांची वेदना आणि असुरक्षितता पुन्हा जाणवली. त्यावेळी ब्रिटीश रॉयल एअर फोर्स आणि इतर ब्रिटीश सरकारी संस्थाचे, अजून ज्याला देश म्हणून मान्यता मिळाली नाही पण ज्यांनी महायुद्धाची प्रचंड झळ सोसली आहे त्या व्यक्तीसमूहाशी नियम न तोडता कसे वागावे या बद्दलची घुसमट आणि हतबलता देखील जाणवली. सगळ्यात शेवटी अम्मानच्या विमानतळावर जाण्यासाठी जॉर्डनच्या वेशीवर भारतीयांच्या बसेस आणि कार्स येतात आणि सीमेवरचा जवान गेट उघडतो तेंव्हा या सुखांतामुळे डोळ्यात आनंदाश्रू आले तरी कुठेतरी याच्या विरुद्ध अत्यंत दुर्दैवी शोकांतिकेचा नायक असलेला तीन वर्षाचा आयलान कुर्दि आणि त्याचे कुटुंबीय आठवून खूप हळहळ वाटली. अम्मानच्या विमानतळावरची भकास चेहऱ्याची गर्दी बघून सिरियन रीफ्युजी क्रायसिस काय असू शकतो, ते दृश्य स्वरूपात जाणवले. चित्रपटाचे माझ्यासाठी सगळ्यात मोठे यश कुठले असेल तर त्याने सर्वांना माणसातच ठेवले आहे. कुणालाही नायक किंवा खलनायक बनविण्याचा प्रयत्न केलेला नाही. पासपोर्ट नसलेल्या लोकांना ओळखायचे कसे? ही समस्या असलेल्या भारतीय दूतावासाचा राग येत नाही. जेवणाच्या वेळी फोन न उचलणाऱ्या कोहली नामक सरकारी कर्मचाऱ्याचा, मलेशियाला जा सांगणाऱ्या सेक्रेटरीचा, कोहलीला टाळणाऱ्या मंत्र्याचा, प्रत्येक माणशी २०० डॉलर घेऊन ५०० लोकांना घेऊन जाणाऱ्या भंगार जहाजवाल्याचा, युद्ध क्षेत्रात जायला सुरवातीला नकार देणाऱ्या एअर इंडियाच्या वैमानिकांचा, अम्मानच्या विमानतळावर "गर्मी मत खाओ, मुझे भी कुछ पता नही" असे अजीजीने सांगणाऱ्या कर्मचाऱ्याचा, सतत कटकट करणाऱ्या जॉर्ज किंवा पूनावालाचा, इतकेच काय शेवटी कुवेती स्त्रीला पाहून भडकलेल्या आणि नंतर भारतीय लोकांची गर्दी पाहून वरमलेल्या इराकी सैनिकाचा; कुणाचाच राग येत नाही. सगळेच त्या परिस्थितीचे बळी वाटतात. कथेच्या नायकाला देखील पळून जाण्याची किंवा हे सगळं सोडून द्यावंसं वाटणं, त्याच्या पत्नीने आधी विरोध नंतर साथ देणं; सगळं नैसर्गिक वाटतं. कटकट्या जॉर्ज शेवटी विमानात बसल्यावरसुद्धा स्वभावानुसार हवाई सुंदरीला, "फर्स्ट क्लासमध्ये कोण बसणार हे कसे ठरवले?" असे विचारतो आणि ही सगळी आपल्या आजू बाजूला वावरणाऱ्या अनेक लोकांची गोष्ट आहे याची खात्री पटते. अक्षय कुमारचे चाहते हा पिक्चर तर बघतीलच आणि कदाचित निम्रत कौरचे देखील पण आपल्या आजूबाजूला सद्य काळात घडत असणाऱ्या घटनांची भीषणता जाणवून घेण्यासाठी आणि व्यवस्था आपले काम कसे करते, त्यात इच्छाशक्ती आणि भावना किती महत्वाचा भाग पार पाडते ते समजण्यासाठी तर हा चित्रपट सर्वांनी पहायला हवा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
मत
शिफारस
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
27878 वाचन

💬 प्रतिसाद (117)

प्रतिक्रिया

अक्कीमुळेच बघणारेय हा चित्रपट

किसन शिंदे
Sun, 01/24/2016 - 23:28 नवीन
अक्कीमुळेच बघणारेय हा चित्रपट.
  • Log in or register to post comments

कोण अक्की?

प्रचेतस
Sun, 01/24/2016 - 23:34 नवीन
कोण अक्की?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

माहितीसाठी गूगल करा. धन्यवाद!

किसन शिंदे
Sun, 01/24/2016 - 23:40 नवीन
माहितीसाठी गूगल करा. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुम्ही असताना गूगल कशाला?

प्रचेतस
Sun, 01/24/2016 - 23:41 नवीन
तुम्ही असताना गूगल कशाला? सांगा ना प्लीज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

जुने धागे वाचा आणि अभ्यास

किसन शिंदे
Sun, 01/24/2016 - 23:44 नवीन
जुने धागे वाचा आणि अभ्यास वाढवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आमचा अभ्यास तेव्हढा नाही हो

प्रचेतस
Sun, 01/24/2016 - 23:48 नवीन
आमचा अभ्यास तेव्हढा नाही हो आणि जुने धागे वाचण्यास वेळही नाही. तुम्हीच सांगा ना प्लीज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

कोण आहे अक्की? माहीत नाही का

Anand More
Sun, 01/24/2016 - 23:52 नवीन
कोण आहे अक्की? माहीत नाही का नक्की? खात्री करा पक्की? कारण सटकतायत इथली टाळकी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अक्की म्हणजे अक्शयकुमार

कट्टप्पा
Mon, 01/25/2016 - 00:32 नवीन
अक्की म्हणजे अक्शयकुमार बहुतेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

आमच्या अभ्या अगदी बरोबर बोलतो

किसन शिंदे
Mon, 01/25/2016 - 00:38 नवीन
आमच्या अभ्या अगदी बरोबर बोलतो हो कट्टप्पा सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कट्टप्पा

ते आमचे सर आहेत किसन सर.

कट्टप्पा
Mon, 01/25/2016 - 00:53 नवीन
ते आमचे सर आहेत किसन सर. बरोबरच बोलतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

ओळख आवडली

श्रीरंग_जोशी
Mon, 01/25/2016 - 00:11 नवीन
या चित्रपटाची तुम्ही लिहिलेली ओळख आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त ओळख.

बोका-ए-आझम
Mon, 01/25/2016 - 00:12 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments

तुम्ही खरंच सुंदर लिहलंय...

संदीप डांगे
Mon, 01/25/2016 - 00:21 नवीन
तुम्ही खरंच सुंदर लिहलंय...
  • Log in or register to post comments

मस्तं लेख आनंदभाऊ!

राँर्बट
Mon, 01/25/2016 - 01:05 नवीन
मस्तं लेख आनंदभाऊ!
  • Log in or register to post comments

लेख वाचून सिनेमा बघावासा

अजया
Mon, 01/25/2016 - 07:30 नवीन
लेख वाचून सिनेमा बघावासा वाटायला लागला आहे.
  • Log in or register to post comments

प्रोड्युसर बद्दल काही माहिती

Anand More
Mon, 01/25/2016 - 07:56 नवीन
प्रोड्युसर बद्दल काही माहिती असेल तर सांगा. कमिशन मागायचं म्हणतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

तुमच्याकडूनच का वसूल करु नये?

अजया
Mon, 01/25/2016 - 10:22 नवीन
तुमच्याकडूनच का वसूल करु नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

अक्षय फारसा आवडत नव्हता पण

कविता१९७८
Mon, 01/25/2016 - 09:03 नवीन
अक्षय फारसा आवडत नव्हता पण एयरलिफ्ट मधे खुपच आवडला, अतिशय ताकदीचा अभिनय केलाय त्याने आणि सर्वानीच, कुणीच कुठेही कमी पडलेले नाही.
  • Log in or register to post comments

उत्तम चित्रपट

मंदार कात्रे
Mon, 01/25/2016 - 09:20 नवीन
काल रात्रीच बघितला प्रचन्ड आवडला
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख लेखं, मोरेसर ...

पगला गजोधर
Mon, 01/25/2016 - 09:31 नवीन
काल रात्रीच बघितला
चित्रपटाचे माझ्यासाठी सगळ्यात मोठे यश कुठले असेल तर त्याने सर्वांना माणसातच ठेवले आहे. कुणालाही नायक किंवा खलनायक बनविण्याचा प्रयत्न केलेला नाही.
सेम पिंच, मलाही हेच वाटलेले. शेवटचा डायलॉग पण आवडला. 'भारतात भ्रष्टाचार गलथानपणा पाहून त्यावेळीही मला राग यायचा, आजही वाईट वाटते…. कोणी काय तर कोणी काय म्हणो, पण निदान 'या देशाने माझ्यासाठी काय केले ??' असा कृतघ्न प्रश्न तरी माझ्या मनाला स्पर्शून जात नाही, त्या घटनेनंतर … ' अश्या काहि अर्थाचा डायलॉग...
  • Log in or register to post comments

हो... त्या ओळी मला पण खूप

Anand More
Mon, 01/25/2016 - 16:08 नवीन
हो... त्या ओळी मला पण खूप आवडल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

सहमत

नया है वह
Mon, 01/25/2016 - 18:22 नवीन
मस्त परिचय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

अक्षय कुमारचे

अदि
Mon, 01/25/2016 - 10:21 नवीन
हॉलिडे, बेबी आणि आता एयरलिफ्ट तिन्ही चित्रपट खूप आवडले. सगळ्या खानावळीपेक्षा छान आहे.
  • Log in or register to post comments

स्पेशल २६ राहिलं का लिहायचं ?

उगा काहितरीच
Mon, 01/25/2016 - 16:21 नवीन
स्पेशल २६ राहिलं का लिहायचं ? रच्याकने लेख आवडला जमल्यास नक्की पाहू .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अदि

हो हो

अदि
Mon, 01/25/2016 - 18:13 नवीन
विसरलेच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

छान लिहिलेय!

एस
Mon, 01/25/2016 - 15:53 नवीन
छान लिहिलेय!
  • Log in or register to post comments

परिक्षण आवडले.

खेडूत
Mon, 01/25/2016 - 17:26 नवीन
परिक्षण आवडले. अक्षय् कुमार साठी पहाणार!
  • Log in or register to post comments

चिप (चित्रपट परीक्षण) आवडले....

मुक्त विहारि
Mon, 01/25/2016 - 17:38 नवीन
जमल्यास बघीन.... आजकाल हिंदी सिनेमे पचत नाहीत....
  • Log in or register to post comments

यात बरेच इंग्रजी आणि अरबी

Anand More
Mon, 01/25/2016 - 18:06 नवीन
यात बरेच इंग्रजी आणि अरबी शब्द आहेत.... तेव्हा बघितल्याने तुमचा नियम मोडणार नाही... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मी बॉलीवूडचे सिनेमे बघत नाही...

मुक्त विहारि
Tue, 01/26/2016 - 11:59 नवीन
मग भले ते १००% इंग्रजी भाषेत का असेना....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

हा बघाच

टवाळ कार्टा
Tue, 01/26/2016 - 18:34 नवीन
हा बघाच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

चित्रपटाच्या निमित्ताने

सतिश गावडे
Tue, 01/26/2016 - 10:23 नवीन
चित्रपटाच्या निमित्ताने तुम्ही इतिहासातील तसेच कथा कादंबर्‍यांमधील तत्सम घटनांची केलेली उजळणी आवडली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद... माझे बहुतेक लिखाण.

Anand More
Tue, 01/26/2016 - 11:03 नवीन
धन्यवाद... माझे बहुतेक लिखाण... एका गोष्टीमुळे मला आठवणाऱ्या इतर गोष्टी अश्याच स्वरूपाचे असते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

+१

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/26/2016 - 11:32 नवीन
+१ उत्तम रसदार परिक्षण. कुवेतवरच्या इराकी आक्रमणाच्या वेळी ओमानमधे होतो. त्यावेळेच्य खूप आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद, मोरेसाहेब ! चित्रपट नक्कीच पाहणार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

कालच पाहिला. चांगला आहे.

प्रभाकर पेठकर
Tue, 01/26/2016 - 11:05 नवीन
कालच पाहिला. चांगला आहे. अरबस्थानात इतकी वर्षे राहात असल्यामुळे त्यातील भयानकता जास्तच जाणवते. अशा प्रसंगाला कोणालाही (हिन्दूस्थानी किंवा कुवेती अथवा कुणाही देशी व्यक्तींना) सामोरे जावे लागू नये. त्या काळातही मी मस्कतमध्येच होतो. इथल्या अरबांना कुवेती अरबांबद्दल कांही कणव वाटत नव्हती. ह्याला कारण कुवेती लोकांचा 'माज'. तेलावर कमाविलेल्या अफाट संपत्तीच्या जोरावर ते इतर अरबांना तुच्छ समजतात. त्यामुळे कुणा इतर अरबांना त्यांच्या बद्दल वाईट वाटले नाही. माझा त्या काळात सुपरमार्केटचा व्यवसाय होता. १० वर्षांची नोकरी सोडून सर्व जमापुंजी धंद्यात घातली होती. आणि ह्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जे तणावाचे, असुरक्षिततेचे वातावरण मस्कतमध्ये निर्माण झाले होते त्यामुळे घाऊक पुरवठ्याच्या गिर्‍हाईकांकडून (लेबर कँप्स) रोखीत येणारे पैसे २-३ महिन्याने येऊ लागले. आणि एक महिना उधार देणार्‍या सप्लायर्सनी उधारी बंद करून गळचेपी सुरु केली. कॅश फ्लो बोंबलला. धंदा बसला. असो. ह्या चित्रपटात अक्षयकुमारच्या जागी नसिरुद्दीन शहा आणि निम्रत कौर च्या जागी सुष्मिता सेन किंवा मनिषा कोईराला किंवा डिंपल कपाडिया ह्या पैकी कोणी जास्त आवडले असते. ह्यचा अर्थ अक्षयकुमार आणि निम्रत कौरच्या अभियात कांही उणीवा आहेत असे नाही पण नसिरुद्दीन शहा आणि उपरोलेखित नायिकांचा अभिनय अधिक परिणामकारक (इंटेन्स) वाटला असता.
  • Log in or register to post comments

आनंद, सिनेमाच्या निमित्ताने

बिपिन कार्यकर्ते
Tue, 01/26/2016 - 11:50 नवीन
आनंद, सिनेमाच्या निमित्ताने लिहिलेले मनोगत अतिशय उत्तम आणि आवडलेही. एखाद्या ट्रिगरमुळे अनेकानेक स्मृति उसळून वर येतात त्यात त्या स्मृतींचा जोर तर असतोच पण तो ट्रिगरही अत्यंत परिणामकारक असतो हे ही आहेच. नीट मांडलं आहे सगळं. मला माझे खोबारचे-कुवेतचे दिवस आठवले. मी खोबारला गेलो तेव्हा सातेक वर्षंच झाली होती गल्फ वॉर होऊन गेल्याला. लोकांच्या मनात त्या सगळ्या आठवणी आगदी ताज्या होत्या. इराकी सैन्य सौदीत बर्‍यापैकी आत आले होते. लोक सांगायचे, इराकी सैन्य आत घुसत गेलं आणि सौदी सैन्य ढुंगणाला पाय लावून मागे हटत गेलं. कुवेती राजपरिवारातील बहुतेक लोक आणि असंख्य कुवेती सौदीत येऊन (पूर्वीच्या थाटामाटात) राहिले होते. स्थानिक सुन्नी सौदी सोडले तर कुणालाच कुवेतींबद्दल काहीही सहानुभूती नव्हती. अगदी स्थानिक शियांनादेखील. कुवेती लोक अत्यंत माजोरडे असाच लौकिक होता सर्वत्र. बरी अद्दल घडली त्यांना असंही म्हणायचे लोक. अमेरिकेच्या जीवावर इराकच्या कुरापती काढायचा उद्योग कुवेतींनी आरंभला होताच. संधी मिळताच इराकने वचपा काढला. सद्दामचे चुकले इतकेच की, त्याने अमेरिकेला विश्वासात न घेता हे सगळे केले. अमेरिकेसाठी कुवेत व सौदीचं तेल अत्यंत महत्त्वाचं होतं, तसंच पर्शियन आखातात आधीच इराणसारखा वैरी उभा होता, अजून एक शत्रू त्यांना परवडण्यासारखा नव्हता. या सगळ्याचा परिपाक म्हणजे, सद्दम हुसेनला राक्षस ठरवून त्याचा केलेला बिमोड. सौदी किंवा कुवेतपेक्षा इराक सामाजिक दृष्ट्या कितीतरी जास्त पुढारलेला होता. लष्करी राजवट होती, गुप्त पोलिसांचा सुळसुळाट होता, लोकांवर अत्याचार होत होते, शिया व कुर्द लोकांवर सैन्याकडून अत्याचर होत होते या सगळ्या बाबी अत्यंत खर्‍या आहेत. पण हे सगळे अनेक वर्षांपासून चालू होते. तेव्हा कधीच कुणाला त्यांचा पुळका आला नाही. तेल धोक्यात आल्यावर मात्र हे सगळे आठवले. कुवेतला गेलो तेव्हा दुसरे गल्फ वॉर अजून व्हायचे होते. युद्धाचे ढग दिसू लागले होते दूरवर. इराकने कुवेतवर केलेल्या आक्रमणाच्या खुणा मात्र बर्‍याच ठिकाणी अगदी जपून ठेवल्याप्रमाणे दिसत असत. विमानतळावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा सर्वत्र दिसत असत. आक्रमणाच्या वेळी अडकलेल्या भारतीयांपैकी अनेकजण ओळखीचे झाले होते. त्यांच्याकडून इराकी सैनिकांच्या वागणुकीच्या हकिकती ऐकायला मिळत. एक मात्र खरे, इराकींनी प्रचंड लुटालूट केली, पण भारतीयांना फारसा त्रास नाही दिला. भारतीय म्हणलं की, केवळ चीजवस्तू घेऊन सोडून देत, मारहाण होत नसे किंवा स्त्रियांना काहीही केले जात नसे. माझ्या माहितीतलीच काही मराठी कुटुंबं वाळवंटातून प्रवास करत अम्मानमार्फत भारतात पोचली होती. काही लोक मोटारीतून प्रवास करत इराक, इराण, पाकिस्तानमार्फत वाघा बॉर्डरपर्यंत आले आणि अमृतसरला पोचले. ते सांगत की, त्यांना सगळीकडे मदत मिळाली. कित्येकांजवळ पासपोर्ट वगैरेही नव्हते. पण बहुतेकांनी मदतच केली, अगदी पाकिस्तानातही. खाण्यापिण्याची, मुलांसाठी औषधं वगैरेची मदत झाली. मात्र वाघा बॉर्डरवर तब्बल आठेक दिवस ताटकळावे लागले. कारण काय, तर पासपोर्ट नव्हते काहींजवळ. भारतीय नोकरशाहीच्या माणुसकीशून्य वागणुकीमुळे मुलाबाळांसकट अडकून पडले लोक. असो. आखातातील इतिहासातील हे एक फार मोठे प्रकरण आहे.
  • Log in or register to post comments

बिकाशेठ, प्रतिसाद ख्हूप आवडला

तर्राट जोकर
Tue, 01/26/2016 - 17:26 नवीन
बिकाशेठ, प्रतिसाद ख्हूप आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

भारतीय नोकरशाहीच्या

यशोधरा
Tue, 01/26/2016 - 19:53 नवीन
भारतीय नोकरशाहीच्या माणुसकीशून्य
बिकादा, तुम्ही वाघा बॉर्डर पाहिलीच असेल. तिथे ठराविक खबरदारी बाळगणे लष्कर, नोकरशाही आणि देशाच्या हितासाठी श्रेयस्करच आहे. समजा खबरदारी घेतली नाही आणि केवळ माणूसकी म्हणून सरसकट प्रवेश दिले आणि त्यातून काही कांड उद्भवले तर तुमच्या आमच्यासारख्या व्यक्ती ह्याच लोकांचा निष्काळजीपणा देशाला भोवला म्हणून कळफलक बडवू! तेव्हा ह्या लोकांच्या डोक्यावर अशा बाबतीत काटेरी मुकूट असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

यशो, माझी भूमिका टिपिकल

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/27/2016 - 13:11 नवीन
यशो, माझी भूमिका टिपिकल 'सरकार ना? नालायकच असणार!' अशा प्रकारची नाहीये / नसते. तू लिहिलेल्या सर्वच मुद्द्यांची जाण मलाही आहे. आणि घडलेल्या घटना सांगणार्‍या (आणि भोगावं लागलेल्या) व्यक्तीलाही होती. कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय प्रवेश न देणे हे ठीकच. ते तसेच व्हायला हवे. पण जेव्हा, मानवीय आपत्तीत सापडलेली अनेक माणसे, बायकामुलांसकट हजारो मैल प्रवास करत, जीव मुठीत धरून तुमच्या दारात येतात तेव्हा 'मानवीय पातळीवर' मदत होणे आवश्यक असते. सरळ सरळ भारतीय आहेत असे समजून येणार्‍या, अनेकानेक भारतीय भाषा बोलणार्‍या समुदायाला बेसिक सहानुभूती तरी मिळायला हवी की नाही? त्यांना आत घेऊ नका फार तर. वेगळा कँप लावा. तिथे त्यांना खाऊपिऊ तरी घाला. मुलांना दूध द्या. गरजूंना वैद्यकीय मदत द्या. सुरूवातीला हे काहीच झाले नाही. शेवटी पाकिस्तानी अधिकार्‍यांनी सोय केली. असेच एक-दोन दिवस गेल्यावर मग मात्र कुठून तरी चक्रं फिरली आणि भारतीय अधिकार्‍यांनी मदत केली म्हणे. अर्थातच, मी हे सर्व ऐकले त्यालाही आता १४ वर्षं होऊन गेली, आणि तेव्हाही त्या घटनेला १० वर्षं झाली होती. मी मांडलेल्या तपशीलांमध्ये चुका होऊ शकतात / असतीलच. पण एकंदरीतच मला ज्या व्यक्तीकडून हे सर्व ऐकायला मिळाले होते ती अत्यंत वरिष्ठ, जबाबदार आणि मॅच्युअर व्यक्ती होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ओके. तुम्हांला मिळालेली

यशोधरा
Wed, 01/27/2016 - 13:21 नवीन
ओके. तुम्हांला मिळालेली माहिती जबाब्दार व्यक्तीकडून मिळाली हे गृहीत धरुनही मी पुन्हा हेच म्हणेन की बॉर्डरवरची गणिते सर्वसामान्यांच्या प्रथमदर्शी आकलनापेक्षा फार वेगळी असतात, तेव्हा केवळ मानवतेचा दृष्टीकोन ठेवणे भारताला आणि भारतीय अधिकार्‍यांना परवडणारे नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

थोडं अधिक स्पष्ट करतो... सर्व

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/27/2016 - 13:43 नवीन
थोडं अधिक स्पष्ट करतो... सर्व प्रकारची योग्य काळजी घेऊन / घेत असतानाही मानवतेची भूमिका घेता येते. ती घेतली गेली नाही, एवढेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

:)

यशोधरा
Wed, 01/27/2016 - 13:57 नवीन
अपेक्षा करणे सोपेच असते बिकादा, त्या प्रत्यक्षात उतरवणे हे कधी कधी अपेक्षांपेक्षा बिकट असू शकते इतकेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

दुर्दैवाने, भारतिय नोकरशाहीचे

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/27/2016 - 14:10 नवीन
दुर्दैवाने, भारतिय नोकरशाहीचे असे अनुभव विरळ नाहीत. आठदहा वर्षांपूर्वी जेद्दा (सौदी अरेबिया) मध्ये बरीच (काहीशे) छोटी दुकाने असलेला एक मोठा मॉल आगीच्या भक्षस्थानी पडला होता त्यावेळीही असेच काही ऐकले होते. त्या मॉलमधील दुकांनांत कमी पगारांची कामे करणारे व तेथेच रहणारे अनेक अशियाई देशांचे नागरीक होते. सौदी अरेबियामध्ये उच्च्पदस्थ परदेशी नागरीक सोडून इतरांचे पासपोर्ट्स त्यांचे स्पॉन्सर्स स्वतःच्या ताब्यात ठेवतात. अर्थात ऑफिसमध्ये ठेवलेले बहुतेक सर्व नोकरांचे पासपोर्ट्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. दुर्घटनेची माहिती समजताच बांगलादेश, श्रीलंका, फिलिपिन्स, इत्यादी देशाच्या वकिलातीतील अधिकारी तातडीने तेथे गेले व केवळ "मी देशाचा नागरीक आहे" इतक्या तोंडी दाव्यावर कपडे, ब्लँकेट्स, अन्नपदार्थ, पाणी, थोडे चलन अशी मदत करू लागले होते. भारतीय वकिलातीचे अधिकारी तीन दिवस "पासपोर्ट दाखवून भारतीय असल्याची खात्री करा तरच मदत मिळेल" या अटीवर अडकून बसले होते. त्या काळात ज्यांना स्वतःची व्यवस्था स्वतः करता येत नव्हती अश्या काही भारतियांना बांगलादेशी व श्रीलंकन अधिकार्‍यांनी विनाशर्त मदत केली असे समजले ! :( तिसर्‍या दिवसानंतर काही चक्रे फिरली व पासपोर्टविना मदत सुरू झाली !!! परदेशातील भारतीय वकिलातीत पासपोर्ट नवीनीकरण, इत्यादी सर्वसामान्य कामांसाठी भारतिय नागरिकांना ताटकळत ठेऊन परदेशी नागरिकांना तात्काळ सेवा देताना पाहिले आहे. अश्या सापत्न वागणूकीबाबत जबाब विचारला असता त्याचे अधिकार्‍यांना फारसे पडले आहे असे दिसले नाही. तद्दन सारवासारवीची सरकारी आणि/अथवा उद्धट उत्तरे तयार होती. हाच अनुभव एअर इंडियाने प्रवास करताना आला आहे. आतापर्यंत तीनदा देशभक्तीचा झटका येऊन एअर इंडियाने प्रवास केला आहे आणि दर वेळेस त्या निर्णयाचा पश्चाताप वाटावा असेच अनुभव आले आहेत. याविरुद्ध एकदा श्रीलंकन एअरलाईन्सने प्रवास केला तेव्हा, त्यातील हवाईसुंदर्‍या, खाडीदेशांत कनिष्ठ स्तराची कामे करणार्‍या आपल्या देशवासियांना केवळ उत्तम सुहास्य सेवा देत होत्या असेच नाही तर काहींना स्वतःहून चौकशी करून इमिग्रेशन कार्ड्सही भरून देताना दिसल्या... एअर इंडियाच्याच नव्हे तर इतर कोणत्याही एअरलाईन्सच्या तुलनेत हा एक सुखद झटकाच होता !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

जाऊ द्या डॉक्टरसाहेब, त्या

संदीप डांगे
Wed, 01/27/2016 - 14:18 नवीन
जाऊ द्या डॉक्टरसाहेब, त्या लोकांना कामाचा किती किती 'ताण' असतो ते तुम्हाला नाही माहित. ;-) 'काही चुकीचे झाल्यास माझे बखोट कुणी धरू नये' ह्यास सरकारी कामांमधे प्रथम प्राधान्य असते. ते सांभाळून होता होइल ती सर्व मदत सर्व शक्तीने ते करतच असतात. आजकाल परराष्ट्रमंत्र्यांचे ट्विट ज्यात म्हटलंय की "परदेशात कुणाही भारतीयाला काहीही समस्या असेल तर मदत केली जाईल" हे फार कौतुकाने फॉरवर्ड केल्या जाते. फॉरवर्ड करणारे हे विसरतात की हेच तर सरकारचे नॉर्मल काम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

जेद्दाचं माहीत नाही. पण मी

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/27/2016 - 15:05 नवीन
जेद्दाचं माहीत नाही. पण मी खोबारमध्ये पोचलो होतो त्याच्या एखाद दोन आठवड्यातच माझ्या घराच्या बाजूला असलेला अल शुला नावाचा मॉल आगीमुळे बेचिराख झाला होता. तीन दिवस आग धुमसत होती. त्यावेळेस हे असे पासपोर्ट वगैरे जळले होते. आग मुद्दाम लावण्यात आली होती, कारण एका प्रिन्सला तिथे नवीन मॉल बनवायचा होता असं मागाहून कळलं. फायर ब्रिगेडवाले आग विझवताना एका हातात तो पाण्याचा पाईप आणि दुसर्‍या हातात कोक/पेप्सीचे कॅन घेऊन गप्पा मारत प्रोक्षण केल्यासारखं पाणी मारताना बघितल्यामुळे त्या अफवेवर विश्वास बसला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

स्वानुभव

यशोधरा
Wed, 01/27/2016 - 16:06 नवीन
परदेशामध्ये पासपोर्ट नूतनीकरणाचे काम १० दिवसांत कोणत्याही फॉलोअपशिवाय. २ महिन्यांचे बाळ घेऊन आंतरराष्ट्रीय प्रवास करताना संपूर्ण प्रवासात एअर ईंडियाच्या कर्मचार्‍यांकडून मिळालेली अत्यंत सौहार्दपूर्ण मदत. असो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

प्रतिसादांबद्दल सर्वांचे

Anand More
Tue, 01/26/2016 - 17:11 नवीन
प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद … त्या स्थळ काळाशी संबंधित स्वतःचे अनुभव शेअर केल्याबद्दल प्रभाकर पेठकर आणि बिपीन कार्यकर्ते यांचे विशेष आभार .
  • Log in or register to post comments

आज हा चित्रपट पाहीला. चित्रपट

सतिश गावडे
Tue, 01/26/2016 - 21:35 नवीन
आज हा चित्रपट पाहीला. चित्रपट म्हणून न पाहता युद्धकाळातील एका सत्यघटनेचे नाट्यमय रुपांतर म्हणून पाहीला. नुकतेच अतुल कहाते लिखीत आयसीसवरील छोटेखानी पुस्तक वाचले होते. त्यात इराकवरील प्रकरणात इराकने कुवेतवर जो हल्ला केला त्याबद्दल सविस्तर लिहीले आहे. मात्र "एयरलिफ्ट"चा उल्लेख त्या पुस्तकात नाही. मात्र पुस्तक वाचताना जाणवत होते, आपण खुपच सुरक्षित वातावरणात आहोत. बाँबस्फोटांचे काही दुर्दैवी प्रकार वगळले तर आपल्या देशात युद्ध हे फक्त सीमेवर होते. सामान्य नागरीकांना त्याची झळ पोहचत नाही. जेव्हा परकीय आक्रमण देशांतर्गत भागात पोहचते तेव्हा सामान्य नागरीकांची गय केली जात नाही. आज हा चित्रपट पाहताना ही जाणिव ठळक झाली.
  • Log in or register to post comments

तीन वर्षापूर्वी बहारिनला

अजया
Tue, 01/26/2016 - 21:53 नवीन
तीन वर्षापूर्वी बहारिनला झालेला उठाव आठवत होता पिक्चर बघताना. उगाचच असे काही परत झाले तर ,माझ्या नवर्यावर अशी अडकायची वेळ आली तर .. असं काय काय उगाच मनात येऊन अत्यंत अस्वस्थ झाले सिनेमा बघताना आणि नंतरही.
  • Log in or register to post comments

खूप छान चित्रपट ओळख. तुमची

पद्मावति
Tue, 01/26/2016 - 22:34 नवीन
खूप छान चित्रपट ओळख. तुमची लेखनशैली नेहमीप्रमाणेच मस्तं.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा