चित्रपटातील आपल्या मनात राहिलेला एक प्रसंग.....!
सध्या सुट्टीचा आनंद घेणे चालू असल्याने संस्थळावर चित्रपटविषयक धागे भरपूर प्रमाणात दिसत आहेत; त्यात ही एक छोटीशी भर.
चित्रपट पाहून झाल्यानंतर बरेच दिवस त्याचे कथानक, कलाकारांचा अभिनय, चित्रीकरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातील मधुर गाणी आपल्या मनात रुंजी घालत असतात व ज्यावेळी एकमेकाबरोबर संवाद साधत असताना या बाबीशिवाय अचानक असेही आपण म्हणतो कि, "अर्रे त्याप्रसंगत अमिताभ किती हळवा दाखविला आहे रे, इतके दिवस झाले तरी सिलसिला मधील तो प्रसंग मी विसरू शकत नाही." इ. इ. ~~~ तद्वतच कुणाबरोबर न बोलताही एकांत क्षणी आपण अशा काही प्रसंगाची मनातल्या मनात उजळणी करत (विशेषता रात्रीच्या निवांत समयी....) बसतो व काही काळ का होईना त्या दुनियेत रममाण होऊन दिवसभराचा ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करतो. हीच बाब मनात ठेऊन हा धागा "चित्रपटातील आपल्या मनात राहिलेला एक प्रसंग" या शीर्षकाने गुंफीत आहे. सुरुवातीस दहा चित्रपट घेतलेले आहेत की ज्यातील त्यासमोर दर्शविलेले प्रसंग त्या त्या वेळी हृदयाला स्पर्शून गेले होते व आजही मनात तसेच टवटवीत आहेत. (हे चित्रपट महान होते की रद्दड होते हा सवाल येथे नाही, तर केवळ त्यातील "एक प्रसंग", इतकाच निवडीचा निकष आहे.)
१) स्वदेस >> शाहरुख खान आपल्या गावासाठी तेथील हट्टी तसेच काही मनमिळाऊ, काही शहाणे गावकरी आणि मित्रांच्या सक्रीय मदतीने गावात वीज आणण्याचा प्रयत्न करीत असतो व कित्येक दिवसांच्या प्रयोगानंतर त्या गावात ``वीज` अवतरते. ज्या क्षणी विद्युत प्रवाह जागृत होतो आणि संयंत्राद्वारे सर्वत्र पसरले जातो, त्यावेळी कॅमेरा एका छोट्या झोपडीत गेलेला आहे, आणि तेथील ९० वर्षाच्या आसपास असलेल्या एका म्हाता-या स्त्रीच्या डोळ्यावर केंद्रित होतो. बल्बमधून लख्ख प्रकाश तिच्या चेह-यावर उमटतो आणि ती स्त्री उदागारते ~ "बिजली -------". खरोखर एका शब्दात आशुतोष गोवारीकर यांनी त्या गावाची नस पकडली आहे. हा प्रसंग स्वदेसच्या अन्य कोणत्याही बाबीपेक्षा कायमचा घर करून राहिला आहे.
२. मशाल >> दिलीपकुमार यांची चित्रपटातील पत्नी वहिदा रेहमान रात्रीच्या वेळी जखमी अवस्थेत मुंबईच्या रस्त्यावर पडली आहे, आणि दिलीपकुमार येणा-या जाणा-या मोटारींना थांबविण्याचा प्रयत्न करीत आहे, आजूबाजूच्या इमारतीमधील लोकांना ओरडून मदतीची हाक घालीत आहे, पण सगळेजण निव्वळ दगड झाले आहेत, हा बेंबीच्या देठापासून किंकाळ्या मारीत आहे, वहिदा जखमामुळे विव्हळत आहे, आणि याची धावपळ वाया जाते. वहिदा प्राण सोडत असताना दिलीपकुमार यांनी जो अभिनय केला आहे, त्यामुळे हा प्रसंग हेलावून टाकतो. आजही याची जाणीव होते कि हे दोन कलाकार अभिनयाच्या बाबतीत शिखरे होती.
३. प्यासा >> कवी विजय ~ घरातील लोकांनी "निकम्मा" म्हणून टाकून दिलेला बेकार युवक. एक कप चहाला महाग. भुकेने कासावीस म्हणून हा पदवीधर तरुण बिग बझारच्या बाहेर उभारून एका ग्राहकाच्या पिशव्या उचलून त्याच्या मोटारीत ठेवण्याचे हमाली काम करतो. त्याबद्दल शेटजी त्याला एक रुपयाने नाणे देतो. कसाबसा हॉटेल मध्ये गेलेला विजय भात आमटी मागवून (१९५० ला रुपयाला थाळी मिळत असणार !) बकाबका घास गिळत असताना, गल्ल्यावरील मालक त्याला खोचकपणे विचारतो, "अर्रे आजतरी पैसे आणलास काय?" यावर विजय आपल्या हातातील तो बंदा रुपया त्याच्या दिशेने फेकतो. मालक रुपया झेलतो, पाहतो आणि ओरडतो, "अर्रे हा तर खोटा रुपया आहे !!" झटक्यात विजयच्या घशात घास अडकतो व हतबुद्ध होऊन तिथेच थांबतो. हा प्रसंग प्रत्येक बेकार तरुणाच्या मनावर झळझळीत ओरखडा काढणारा आहे.
४. तेरे मेरे सपने >> देव आनंद्पेक्षा विजय आनंदचे म्हणून जे काही चित्रपट गाजलेले आहेत त्यातील 'तेरे मेरे सपने' हा एक. यात शहरात नव्याने वैद्यकीय व्यवसाय सुरु केलेला व झोपडपट्टीत एक छोटाश्या टपरीवजा जागेत दवाखाना उघडलेला देव आनंद. त्याच्याकडे पेशंट नाहीत पण एके दिवशी तेथील एक स्त्री, जी studio मध्ये कलाकारांना मेक अप करण्याचे काम करीत असते, त्याच्याकडे लगबगीने येते (कारण पूर्वी एकदा तिच्या हाताचे डाग याने घालविलेले असतात) आणि गाडीतून studio मध्ये आणते. तिथे प्रसिद्ध नटी "मालतीमाला" (हेमा मालिनी) जोरजोराने रडत असते व स्तुडिओमधिल कुणालाच तिच्या रडण्याचे कारण काळात नसते. 'डॉक्टर आले डॉक्टर आले' असे म्हणत ती स्त्री देव आनंदला हेमा मालीनिजवळ नेते. हा कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो पण ती अजिबात दाद लाऊ देत नाही. निराश झालेला देव आनंद मागेपुढे बघत नाही व त्या प्रसिद्ध नटीच्या मुस्कटात फाडकन लगावतो. एका क्षणात तिचे रडणे तर थांबते पण सा-या स्तुडिओत सन्नाटा पसरतो. हा एक प्रसंग जो जालीम औषधासारखा मनावर कोरून राहिला आहे.
५. मंडी > शबाना आझमी, स्मिता पाटील, नसीर, आणि अन्य कितीतरी समांतर चित्रपट चळवळीशी संबधित असलेल्या कलाकारांनी जिवंत केलेला चित्रपट. यात गावातील एका मोठ्या व्यापाराचा मुलगा, ज्याला नुकतेच मिसरूड फुटले आहे, तो एका बैठकी दरम्यान स्मिता पाटीलचे गाणे ऐकतो आणि वयाला अनुसरून चक्क तिच्या प्रेमात पडतो. ती तर नायकीनच दाखविली असल्याने "गमतीला बरा" अशा भावनेने त्याला चिडविण्यात मजा अनुभवत असते. मात्र मंडीची मालकीण शबाना आझमी हिला हे संबध बिलकुल पसंद नसतात. एकदा तर स्मिता व तो तरुण घर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करणार असतात, मात्र शबानाला त्याचा सुगावा लागतो. ती सुरुवातीस स्मिताला चांगल्या पद्धतीने समजविण्याचा प्रयत्न करते, पण ती बाधत नाही हे पाहिल्यावर निर्वाणीचे अस्त्र म्हणून तिच्याकडे पाहत म्हणते, "तुला असे वाटत असेल की मी तुझ्या सुखाच्या आड येत आहे, पण वेडे त्याच्याबरोबर तू या जन्मात लग्न करू शकत नाहीस." स्मिता गोंधळून तिच्याकडे पाहते व विचारते, "कारण?", शबाना क्षणभर थांबते व शांतपणे उत्तरते "कारण, कारण तो मुळात तुझा भाऊ आहे, तू देखील त्याच व्यापा-याची मुलगी आहेस." बस्स, स्मिताच्या चेह-यावरील या वेळेचे भाव पुन्हा पुन्हा पाहायला हवेत.
६. बेनाम > एका मोठा कंपनीत चांगल्या पदावर असलेला अमिताभ, त्याची पत्नी मौशुमी व त्यांचा एकुलता एक मुलगा. टिपिकल शांत समाधानी कुटुंब. पण एके दिवशी पार्टीला जात असताना रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या एका शोध पत्रकाराला अमिताभ आपल्या गाडीतून दवाखान्यात काय पोहोचवितो व त्यामुळे त्याच्या आतापर्यंतच्या शांत जीवनात जे वादळ येते त्यामुळे त्याचे विश्व कसे हादरून जाते, त्यावरील हा एक सुंदर चित्रपट. याला धमक्या तर येत असतातच, पण एके दिवशी त्याच्या मुलाचे अपहरण देखील केले जाते. हा हैराण व कोलमडून पडतो, पोलीस इन्स्पेक्टर याचा मित्र बनतो तो याच्या समजूतदार स्वभामुळे. एकदा याच्या सोसायटीत एक भुरटा चोर शिरतो व पोलीस त्याला त्या टोळीशी संबधित म्हणू धरतात व ते आणि अन्य बघे त्या चोराला खूप पिटतातदेखील. पण ज्यावेळी तो अमिताभकडे मदतीच्या अपेक्षेने पाहतो, त्यावेळी याला कळून चुकते कि हा आपल्या मुलाच्या अपहरण करणा-यापैकी बिलकुल नाही व फौजदार मित्राला त्याला सोडून देण्याविषयी सांगतो. फौजदार सहज कुतूहलाने अमिताभला विचारतो, "तुझ्यावर असा प्रसंग आला असतानादेखील तुझ्या मनात त्या चोराविषयी दया कशी आली?" यावर अमिताभ हलक्या आवाजात म्हणतो, "जाऊ दे बिचा-याला, कमीत कमी मला दुवा तर देईल, कुणी सांगावे, त्याच्या दुव्यामुळे माझा मुलगा तरी परत मिळेल." हा खरा बाप !
७. कलयुग >> शशी कपूर यांचा कमालीचा चित्रपट. महाभारताच्या कथानकावर आधारित. आधुनिक "पांडव" घराण्यातील अर्जुनाचे लग्न. शशी कौरव घराण्याचा "कर्ण" असल्याने याच्यावर आधुनिक पांडवांची खप्पा मर्जी. पण ज्येष्ट लोकांचे व याचे संबध चांगले असल्याने यालाही लग्नाचे रीतसर निमंत्रण मिळाले आहे. मात्र याला लग्न समारंभात पाहून अर्जुनाचा मस्तकशूळ उततो. याच्याकडे एक "द्रौपदी" (रेखा) सोडली तर कुणी बघतही नाही. लग्नासाठी आणलेली भेट देण्यासाठी तो अर्जुनाजवळ जातो तर याच्याशी तो हस्तान्दोलन देखील न करता बेगुमानपणे नूतन पत्नीला पुढे घेऊन अन्य पाहुण्यांशी बोलत राहतो. असा अपमान होऊनदेखील याच्या चेह-यावर कोणत्याही प्रकारची कटुता आलेली दाखविली गेली नाही. मात्र असा प्रसंग कायमचा लक्षात राहिला आहे.
८. मुगले आझम > हा संपूर्ण चित्रपट कायमपणे लक्षात राहण्याच्या योग्यतेचा आहे व गेली ५० वर्षे याने रसिकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळविले आहे. यातील एक अतिशय काव्यमय प्रणय प्रसंग म्हणजे सलीम व अनारकलीची गावाबाहेरील एक वाड्यात झालेली प्रथम भेट. पडद्यावर दूर कुठूनतरी तानसेन गात असल्याची जाणीव व त्या पार्श्वभूमीवर अनारकलीच्या चेह-यावर सलीमने ते मोरपीस फिरविणे. सर्वसामान्य निरीक्षण, परीक्षक, रसिक या सर्वांच्या मते आजही हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात चांगला प्रणय प्रसंग म्हणून या चित्रपटातील या दृश्याकडे पाहिलं जाते. एका शब्दाचाही उपयोग न करता एखादा प्रसंग कसा जिवंत करावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सलीम अनारकलीची भेट, जी कायमपणे लक्षात राहिली आहे.
९. हम दिल दे चुके सनम > या त्यातल्यात्यात अलीकडील चित्रपटाबाबत बरेच काही लिहिले बोलले गेले आहे, जात आहे. हा चित्रपट ऐश्वर्यासाठी खूपच गाजला तसेच संयत हाताळणीमुळेही . पण मला आजही यातील अखेर अखेरच्या सीन मधील तिचा अजयवर एक प्रकारे सूड घेण्याचा प्रयत्न म्हणून ती खात असलेल्या हिरव्या मिरच्या आठवतात. बाप रे ! कोणत्याही भांडण तंट्याशिवाय एक स्त्री एका पुरुषाला "आपणास तू अजिबात आवडत नाही" हे कशा रीतीने सांगेल याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणून हा प्रसंग कायमचा ध्यानात राहिलेला आहे.
१०. रंग दे बसंती > आमीर आणि कंपनी यांचा गाजलेला तसेच कलात्मक म्हणूनही नावाजलेला. यात शेवटी आकाशवाणी केंद्रात आमीर व त्याचा मित्र, सैनिकांनी केलेल्या गोळीबारात मरणोन्मुख अवस्थेत फरशीवर पडलेले आहेत, आणि या सर्वांची ती इंग्लंडमधील मैत्रीण त्यांची अवस्था पाहण्यासाठी तिथे आली आहे. आमीर त्या अवस्थेतही आपल्या मित्राकडे पाहून हसतो. मित्र विचारतो, "साल्या मरायला लागल्यास, आणि तिला पाहून हसतोस काय?" यावर आमीर उदगारतो, "अर्रे आता नुकताच हिच्यावर मी प्रेम करायला लागलो होतो, व लग्नही करणार होतो, पण हासू आले ते या बाबीबाबत कि, जर माझे हिच्याशी लग्न झाले असते, तर साल्या, आमची पोरे कशी झाली असती या विचारावर ? काळी कि गोरी ?" व्वा !! किती सहजगत्या हा नट इतके सुरेखरीत्या सादरीकरण करतो.
असो. वाचून प्रतिक्रियाही द्या, आणि आपल्याही मनात घर करून राहिलेय चित्रपट प्रसंगाबाबत भरभरून लिहा. धन्यवाद.
प्रतिक्रिया
रॉय शानदार
आवडलेले प्रसंग
ब्लॅक हॉक डाउन मधला सीन
बाग़बान मध्ये अमिताभला घरी
कमल हसन ( मुळ नाव कमलाहासन )
अपनी चौखट का दिया... गिविंग
संदिप जी एलाबोरेट प्लीज
स्वदेस.
माझी थोडी भर
वोह सात दिन मधला तो प्रसंग
श्रीरंग जी पॅट्रीयट ची लिंक दिली तर आनंद होइल
श्रीरंग जी पॅट्रीयट ची लिंक दिली तर आनंद होइल
द पेट्रियट मधले दृश्य
काय रंगवला आहे बेंजामिन
अप्रतिम चित्रपट आहे
आयला...
गुलाल मधला पियुष मिश्रा चा तो प्रसंग
परस्युएट ऑफ हॅपीनेस मधला क्लायमॅक्स चा तो प्रसंग
परस्युएट ऑफ हॅपीनेस च्या प्रसंगाची लिंक
परिचय
दिलीप कुमारचा अभिनय छान
दुनियादारी
दुनियादारी
Over the top
टॉम हैंक्स
बाबाजी फिर कास्ट अवे के बारे मे क्या खयाल है ?
किंबहुना टॉम हैंक्सने भूमिका केलेला कोणताही सिनेमा मला रटाळ वाटलेला नाही.कास्ट अवे मधला तो फुटबॉल कंपॅनियन बोटीवरुन पडुन त्याच्या नजरेसमोर ह्ळुहळु वाहत जातो. तेव्हाचा त्याचा आकांत क्या बोलते बाबाजी ?तुमच आमच जमणार राव
लै वेळा सहमत..
अरे तलाश राहिलाच कि? तलाश मधे
Life Is Beautiful
पुन्हा त्रिशूल!
Pagination