सध्या सुट्टीचा आनंद घेणे चालू असल्याने संस्थळावर चित्रपटविषयक धागे भरपूर प्रमाणात दिसत आहेत; त्यात ही एक छोटीशी भर.
चित्रपट पाहून झाल्यानंतर बरेच दिवस त्याचे कथानक, कलाकारांचा अभिनय, चित्रीकरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातील मधुर गाणी आपल्या मनात रुंजी घालत असतात व ज्यावेळी एकमेकाबरोबर संवाद साधत असताना या बाबीशिवाय अचानक असेही आपण म्हणतो कि, "अर्रे त्याप्रसंगत अमिताभ किती हळवा दाखविला आहे रे, इतके दिवस झाले तरी सिलसिला मधील तो प्रसंग मी विसरू शकत नाही." इ. इ. ~~~ तद्वतच कुणाबरोबर न बोलताही एकांत क्षणी आपण अशा काही प्रसंगाची मनातल्या मनात उजळणी करत (विशेषता रात्रीच्या निवांत समयी....) बसतो व काही काळ का होईना त्या दुनियेत रममाण होऊन दिवसभराचा ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करतो. हीच बाब मनात ठेऊन हा धागा "चित्रपटातील आपल्या मनात राहिलेला एक प्रसंग" या शीर्षकाने गुंफीत आहे. सुरुवातीस दहा चित्रपट घेतलेले आहेत की ज्यातील त्यासमोर दर्शविलेले प्रसंग त्या त्या वेळी हृदयाला स्पर्शून गेले होते व आजही मनात तसेच टवटवीत आहेत. (हे चित्रपट महान होते की रद्दड होते हा सवाल येथे नाही, तर केवळ त्यातील "एक प्रसंग", इतकाच निवडीचा निकष आहे.)
१) स्वदेस >> शाहरुख खान आपल्या गावासाठी तेथील हट्टी तसेच काही मनमिळाऊ, काही शहाणे गावकरी आणि मित्रांच्या सक्रीय मदतीने गावात वीज आणण्याचा प्रयत्न करीत असतो व कित्येक दिवसांच्या प्रयोगानंतर त्या गावात ``वीज` अवतरते. ज्या क्षणी विद्युत प्रवाह जागृत होतो आणि संयंत्राद्वारे सर्वत्र पसरले जातो, त्यावेळी कॅमेरा एका छोट्या झोपडीत गेलेला आहे, आणि तेथील ९० वर्षाच्या आसपास असलेल्या एका म्हाता-या स्त्रीच्या डोळ्यावर केंद्रित होतो. बल्बमधून लख्ख प्रकाश तिच्या चेह-यावर उमटतो आणि ती स्त्री उदागारते ~ "बिजली -------". खरोखर एका शब्दात आशुतोष गोवारीकर यांनी त्या गावाची नस पकडली आहे. हा प्रसंग स्वदेसच्या अन्य कोणत्याही बाबीपेक्षा कायमचा घर करून राहिला आहे.
२. मशाल >> दिलीपकुमार यांची चित्रपटातील पत्नी वहिदा रेहमान रात्रीच्या वेळी जखमी अवस्थेत मुंबईच्या रस्त्यावर पडली आहे, आणि दिलीपकुमार येणा-या जाणा-या मोटारींना थांबविण्याचा प्रयत्न करीत आहे, आजूबाजूच्या इमारतीमधील लोकांना ओरडून मदतीची हाक घालीत आहे, पण सगळेजण निव्वळ दगड झाले आहेत, हा बेंबीच्या देठापासून किंकाळ्या मारीत आहे, वहिदा जखमामुळे विव्हळत आहे, आणि याची धावपळ वाया जाते. वहिदा प्राण सोडत असताना दिलीपकुमार यांनी जो अभिनय केला आहे, त्यामुळे हा प्रसंग हेलावून टाकतो. आजही याची जाणीव होते कि हे दोन कलाकार अभिनयाच्या बाबतीत शिखरे होती.
३. प्यासा >> कवी विजय ~ घरातील लोकांनी "निकम्मा" म्हणून टाकून दिलेला बेकार युवक. एक कप चहाला महाग. भुकेने कासावीस म्हणून हा पदवीधर तरुण बिग बझारच्या बाहेर उभारून एका ग्राहकाच्या पिशव्या उचलून त्याच्या मोटारीत ठेवण्याचे हमाली काम करतो. त्याबद्दल शेटजी त्याला एक रुपयाने नाणे देतो. कसाबसा हॉटेल मध्ये गेलेला विजय भात आमटी मागवून (१९५० ला रुपयाला थाळी मिळत असणार !) बकाबका घास गिळत असताना, गल्ल्यावरील मालक त्याला खोचकपणे विचारतो, "अर्रे आजतरी पैसे आणलास काय?" यावर विजय आपल्या हातातील तो बंदा रुपया त्याच्या दिशेने फेकतो. मालक रुपया झेलतो, पाहतो आणि ओरडतो, "अर्रे हा तर खोटा रुपया आहे !!" झटक्यात विजयच्या घशात घास अडकतो व हतबुद्ध होऊन तिथेच थांबतो. हा प्रसंग प्रत्येक बेकार तरुणाच्या मनावर झळझळीत ओरखडा काढणारा आहे.
४. तेरे मेरे सपने >> देव आनंद्पेक्षा विजय आनंदचे म्हणून जे काही चित्रपट गाजलेले आहेत त्यातील 'तेरे मेरे सपने' हा एक. यात शहरात नव्याने वैद्यकीय व्यवसाय सुरु केलेला व झोपडपट्टीत एक छोटाश्या टपरीवजा जागेत दवाखाना उघडलेला देव आनंद. त्याच्याकडे पेशंट नाहीत पण एके दिवशी तेथील एक स्त्री, जी studio मध्ये कलाकारांना मेक अप करण्याचे काम करीत असते, त्याच्याकडे लगबगीने येते (कारण पूर्वी एकदा तिच्या हाताचे डाग याने घालविलेले असतात) आणि गाडीतून studio मध्ये आणते. तिथे प्रसिद्ध नटी "मालतीमाला" (हेमा मालिनी) जोरजोराने रडत असते व स्तुडिओमधिल कुणालाच तिच्या रडण्याचे कारण काळात नसते. 'डॉक्टर आले डॉक्टर आले' असे म्हणत ती स्त्री देव आनंदला हेमा मालीनिजवळ नेते. हा कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो पण ती अजिबात दाद लाऊ देत नाही. निराश झालेला देव आनंद मागेपुढे बघत नाही व त्या प्रसिद्ध नटीच्या मुस्कटात फाडकन लगावतो. एका क्षणात तिचे रडणे तर थांबते पण सा-या स्तुडिओत सन्नाटा पसरतो. हा एक प्रसंग जो जालीम औषधासारखा मनावर कोरून राहिला आहे.
५. मंडी > शबाना आझमी, स्मिता पाटील, नसीर, आणि अन्य कितीतरी समांतर चित्रपट चळवळीशी संबधित असलेल्या कलाकारांनी जिवंत केलेला चित्रपट. यात गावातील एका मोठ्या व्यापाराचा मुलगा, ज्याला नुकतेच मिसरूड फुटले आहे, तो एका बैठकी दरम्यान स्मिता पाटीलचे गाणे ऐकतो आणि वयाला अनुसरून चक्क तिच्या प्रेमात पडतो. ती तर नायकीनच दाखविली असल्याने "गमतीला बरा" अशा भावनेने त्याला चिडविण्यात मजा अनुभवत असते. मात्र मंडीची मालकीण शबाना आझमी हिला हे संबध बिलकुल पसंद नसतात. एकदा तर स्मिता व तो तरुण घर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करणार असतात, मात्र शबानाला त्याचा सुगावा लागतो. ती सुरुवातीस स्मिताला चांगल्या पद्धतीने समजविण्याचा प्रयत्न करते, पण ती बाधत नाही हे पाहिल्यावर निर्वाणीचे अस्त्र म्हणून तिच्याकडे पाहत म्हणते, "तुला असे वाटत असेल की मी तुझ्या सुखाच्या आड येत आहे, पण वेडे त्याच्याबरोबर तू या जन्मात लग्न करू शकत नाहीस." स्मिता गोंधळून तिच्याकडे पाहते व विचारते, "कारण?", शबाना क्षणभर थांबते व शांतपणे उत्तरते "कारण, कारण तो मुळात तुझा भाऊ आहे, तू देखील त्याच व्यापा-याची मुलगी आहेस." बस्स, स्मिताच्या चेह-यावरील या वेळेचे भाव पुन्हा पुन्हा पाहायला हवेत.
६. बेनाम > एका मोठा कंपनीत चांगल्या पदावर असलेला अमिताभ, त्याची पत्नी मौशुमी व त्यांचा एकुलता एक मुलगा. टिपिकल शांत समाधानी कुटुंब. पण एके दिवशी पार्टीला जात असताना रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या एका शोध पत्रकाराला अमिताभ आपल्या गाडीतून दवाखान्यात काय पोहोचवितो व त्यामुळे त्याच्या आतापर्यंतच्या शांत जीवनात जे वादळ येते त्यामुळे त्याचे विश्व कसे हादरून जाते, त्यावरील हा एक सुंदर चित्रपट. याला धमक्या तर येत असतातच, पण एके दिवशी त्याच्या मुलाचे अपहरण देखील केले जाते. हा हैराण व कोलमडून पडतो, पोलीस इन्स्पेक्टर याचा मित्र बनतो तो याच्या समजूतदार स्वभामुळे. एकदा याच्या सोसायटीत एक भुरटा चोर शिरतो व पोलीस त्याला त्या टोळीशी संबधित म्हणू धरतात व ते आणि अन्य बघे त्या चोराला खूप पिटतातदेखील. पण ज्यावेळी तो अमिताभकडे मदतीच्या अपेक्षेने पाहतो, त्यावेळी याला कळून चुकते कि हा आपल्या मुलाच्या अपहरण करणा-यापैकी बिलकुल नाही व फौजदार मित्राला त्याला सोडून देण्याविषयी सांगतो. फौजदार सहज कुतूहलाने अमिताभला विचारतो, "तुझ्यावर असा प्रसंग आला असतानादेखील तुझ्या मनात त्या चोराविषयी दया कशी आली?" यावर अमिताभ हलक्या आवाजात म्हणतो, "जाऊ दे बिचा-याला, कमीत कमी मला दुवा तर देईल, कुणी सांगावे, त्याच्या दुव्यामुळे माझा मुलगा तरी परत मिळेल." हा खरा बाप !
७. कलयुग >> शशी कपूर यांचा कमालीचा चित्रपट. महाभारताच्या कथानकावर आधारित. आधुनिक "पांडव" घराण्यातील अर्जुनाचे लग्न. शशी कौरव घराण्याचा "कर्ण" असल्याने याच्यावर आधुनिक पांडवांची खप्पा मर्जी. पण ज्येष्ट लोकांचे व याचे संबध चांगले असल्याने यालाही लग्नाचे रीतसर निमंत्रण मिळाले आहे. मात्र याला लग्न समारंभात पाहून अर्जुनाचा मस्तकशूळ उततो. याच्याकडे एक "द्रौपदी" (रेखा) सोडली तर कुणी बघतही नाही. लग्नासाठी आणलेली भेट देण्यासाठी तो अर्जुनाजवळ जातो तर याच्याशी तो हस्तान्दोलन देखील न करता बेगुमानपणे नूतन पत्नीला पुढे घेऊन अन्य पाहुण्यांशी बोलत राहतो. असा अपमान होऊनदेखील याच्या चेह-यावर कोणत्याही प्रकारची कटुता आलेली दाखविली गेली नाही. मात्र असा प्रसंग कायमचा लक्षात राहिला आहे.
८. मुगले आझम > हा संपूर्ण चित्रपट कायमपणे लक्षात राहण्याच्या योग्यतेचा आहे व गेली ५० वर्षे याने रसिकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळविले आहे. यातील एक अतिशय काव्यमय प्रणय प्रसंग म्हणजे सलीम व अनारकलीची गावाबाहेरील एक वाड्यात झालेली प्रथम भेट. पडद्यावर दूर कुठूनतरी तानसेन गात असल्याची जाणीव व त्या पार्श्वभूमीवर अनारकलीच्या चेह-यावर सलीमने ते मोरपीस फिरविणे. सर्वसामान्य निरीक्षण, परीक्षक, रसिक या सर्वांच्या मते आजही हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात चांगला प्रणय प्रसंग म्हणून या चित्रपटातील या दृश्याकडे पाहिलं जाते. एका शब्दाचाही उपयोग न करता एखादा प्रसंग कसा जिवंत करावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सलीम अनारकलीची भेट, जी कायमपणे लक्षात राहिली आहे.
९. हम दिल दे चुके सनम > या त्यातल्यात्यात अलीकडील चित्रपटाबाबत बरेच काही लिहिले बोलले गेले आहे, जात आहे. हा चित्रपट ऐश्वर्यासाठी खूपच गाजला तसेच संयत हाताळणीमुळेही . पण मला आजही यातील अखेर अखेरच्या सीन मधील तिचा अजयवर एक प्रकारे सूड घेण्याचा प्रयत्न म्हणून ती खात असलेल्या हिरव्या मिरच्या आठवतात. बाप रे ! कोणत्याही भांडण तंट्याशिवाय एक स्त्री एका पुरुषाला "आपणास तू अजिबात आवडत नाही" हे कशा रीतीने सांगेल याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणून हा प्रसंग कायमचा ध्यानात राहिलेला आहे.
१०. रंग दे बसंती > आमीर आणि कंपनी यांचा गाजलेला तसेच कलात्मक म्हणूनही नावाजलेला. यात शेवटी आकाशवाणी केंद्रात आमीर व त्याचा मित्र, सैनिकांनी केलेल्या गोळीबारात मरणोन्मुख अवस्थेत फरशीवर पडलेले आहेत, आणि या सर्वांची ती इंग्लंडमधील मैत्रीण त्यांची अवस्था पाहण्यासाठी तिथे आली आहे. आमीर त्या अवस्थेतही आपल्या मित्राकडे पाहून हसतो. मित्र विचारतो, "साल्या मरायला लागल्यास, आणि तिला पाहून हसतोस काय?" यावर आमीर उदगारतो, "अर्रे आता नुकताच हिच्यावर मी प्रेम करायला लागलो होतो, व लग्नही करणार होतो, पण हासू आले ते या बाबीबाबत कि, जर माझे हिच्याशी लग्न झाले असते, तर साल्या, आमची पोरे कशी झाली असती या विचारावर ? काळी कि गोरी ?" व्वा !! किती सहजगत्या हा नट इतके सुरेखरीत्या सादरीकरण करतो.
असो. वाचून प्रतिक्रियाही द्या, आणि आपल्याही मनात घर करून राहिलेय चित्रपट प्रसंगाबाबत भरभरून लिहा. धन्यवाद.
प्रतिक्रिया
28 Oct 2015 - 12:11 pm | एस.योगी
तो सीन फक्त 'कमल' साठीच लिहिला गेला होता असेच म्हणायला हवे ...
28 Oct 2015 - 8:01 pm | अभ्या..
कमल हासन तो कमल हासन. त्याचे ते मोठे डोळे. सगळंच बोलून जाणारे.
स्टेशनच्या प्लॅटफोर्मवर साठलेल्या पाण्यात आधी बरी झालेली श्रीदेवी निष्पाप घाईत थोडीशी सांभाळते. थोड्याच वेळात धडपडत आलेला कमल त्याच पाण्यात अडखळतो. सदमातला तो क्लायमॅक्स सीन शेवटपर्यंत पाहतो अन मला आजपण रडू येते.
28 Oct 2015 - 1:02 am | दिवाकर कुलकर्णी
दिलीप कुमार बद्दल बीग बी काय म्हणतो माहित आहे
हिंदी सिनेमा दो हिस्सों में बयॉ हो सकता है,
एक दिलीप कुमारके पहले आैर एक दिलीप कुमारके बाद
28 Oct 2015 - 6:25 am | बोका-ए-आझम
१. Rainman-
टाॅम क्रूझची मैत्रीण डस्टिन हाॅफमनचं चुंबन घेते आणि विचारते - How do you feel? तो autistic असतो त्यामुळे निर्विकारपणे उत्तर देतो - wet!
२. Schindler's List -
हा तर आख्खा चित्रपटच असामान्य आहे, पण तरीही हे दोन सीन्स घर करतात - Amon Goethe हा नाझी अधिकारी. त्याला गॅस चेंबरमध्ये मारल्या गेलेल्या ज्यूंची प्रेतं जाळायला सांगण्यात आलेलं असल्यामुळे तो ते करतोय. प्रचंड धूर आणि राख आणि ती राख शिंडलरच्या गाडीवर पडते. तो प्रचंड अस्वस्थ होतो आणि इकडे गाॅथ आपलं काम किती कठीण आहे, काल एवढी प्रेतं जाळली, आज इतकी जाळायची आहेत, शिंचा वैताग अशा स्वरूपाचं काहीतरी बडबडतोय.
शेवटी निघून जाताना शिंडलर बांध फुटून रडतो आणि मी अजून किती जणांना वाचवू शकलो असतो, त्याची आठवण काढत त्या सगळ्या ज्यूंचा निरोप घेतो.
३. Godfather - अमेरिगो बोनासेरा डाॅनला भेटायला आलाय. त्याच्या मुलीचा चेहरा दोन गुंडांनी विद्रूप केलाय. त्याबदल्यात डाॅनने काहीतरी करावं अशी त्याची इच्छा आहे. तो डाॅनला पैसे देऊ करतो. डाॅन त्याला व्यथित होऊन तो आपला इतका अपमान का करतोय हे विचारतो.
शिवाय असेच आठवणारे - सामना मधला मारुती कांबळेचं काय झालं? सिंहासन मधला निळू फुल्यांना चित्रपटाच्या शेवटी आलेला झटका, आत्मविश्वास मधला नीलकांती पाटेकर तिच्या मुलाला भर रस्त्यात फोडून काढते, कळत नकळत मध्ये विक्रम गोखले आपला पाय घसरल्याची कबुली देतो - असे अनेक.
28 Oct 2015 - 10:19 am | विजुभाऊ
अरे इतक्या सगळ्या गदारोळात शशी कपूर ने इजाजत चित्रपटात फक्त एकाच शॉट मधे जी मजा आणलीये तो प्रसंग बघाना. आख्ख्या पिक्चरचा हायलाईट आहे हा.
"जब वे मेट " चित्रपटात असे बरेच प्रसंग आहेत.
मला प्रत्येक वेळेस त्यातील सईन नव्यानेच उलगडत जातात. शेवटच्या प्रसंगात ( गाण्यात) शाहीद कपूर च्या आईला सासू म्हणून सन्मानाने आणलय. त्यातून बरेच काही सांगितल गेलंय.
28 Oct 2015 - 10:21 am | विजुभाऊ
सिलसिला चित्रपटातील दोन प्रसंग
१) संजीव कुमार - जया बहादुरी : हम उस नगर के राजा है
२) संजीव कुमार - रेखा : कुछ रंग उतरतेही नही.
28 Oct 2015 - 11:54 am | द-बाहुबली
तुम लोग मुझे वहां ढुंड रहे थे और मै तुम्हारा यहां इंतजार कर रहा था
28 Oct 2015 - 1:15 pm | माम्लेदारचा पन्खा
ऐसे खिलोने बाजार मे बहोत बिकते है...
28 Oct 2015 - 4:38 pm | शंतनु _०३१
सिनेमाच्या शेवटी मेहमुद रडत रडत सनई वाजवत असतो ------ पण बरेच लोक हा सीन हसण्यावारी नेतात.
28 Oct 2015 - 5:12 pm | वेल्लाभट
आ गए!
आ गए मेरी मौत का तमाशा देखने!
अख्खा पिक्चरच मनात घर केलेला
28 Oct 2015 - 6:33 pm | सागरकदम
रॉय शानदार
शेवटी येणारी the end ची पाटी
28 Oct 2015 - 7:05 pm | मित्रहो
इनग्लोरीयस बास्टर्ड या चित्रपटाने कुठली गोष्ट केली असेल तर क्रिस्टोफ वॉल्ट्ज. एकेक प्रसंग त्याने असे उभे केले की अंगावर काटा येतो, हिसेपेक्षाही हिंसा होनार ही भिती किती मोठी असते हे तो दाखवून देतो. मग तो सुरवातीचा प्रसंग असो की रेस्टॉरंट चा प्रसंग असो, की इटालियन बोलून समोरचा इटालियन नाही हे पकडने असो. अप्रतिम.
दिल चाहता है मधला सिडनीच्या रेल्वे स्टेशनचा प्रसंग भारी आवडला होता.प्रिटा झिंटा स्टेशनवर मागे राहते, एक भिकारी तिचा पाठलाग करतो. अमीर तिकडन येतो. वाटल आता नेहमीची मारामारी. तो चक्क त्याला मिठी मारतो. जबरदस्त. अमीरच्या पात्राशी पुर्णपणे सुसंगत.
एक छोटासा पण उत्तम प्रसंग कहानी या चित्रपटातला. दुसऱ्यांदा बघितला तेंव्हा लक्षात आला. विद्या बालन एका टपरीवर चहा प्यायला थांबले असतात. इन्सपेक्टर तिला काहीतरी मुलांविषयी बोलतो तुझा मुलगा खूप सुंदर असेल असले काहीतरी. ती पाण्याचा एक घूट घेते कुठेतरी शून्यात बघते. बाकी बॉब बिश्वास हे पात्र आणि त्याची खून करण्याची पद्धत अफलातून. लक्षात राहीले ते बिद्या नही विद्या.
28 Oct 2015 - 10:51 pm | कैलासवासी सोन्याबापु
ब्लॅक हॉक डाउन मधला सीन (शेवटचा)
मोगादिशु रेड्स मधे शहीद झालेल्या आपल्याच कनिष्ठ अन जवळच्या मित्राच्या मृतदेहावर हात ठेऊन बोललेला सार्जंट एवर्समन (जॉश हार्टनेट) चा अप्रतिम मोनोलॉग
त्या नंतर ग्लोबमास्टर मधे बॉडी कास्केट्स लोड होताना सल्यूट करतानाची सार्जंट ची प्रतिमा
निव्वळ अप्रतिम
29 Oct 2015 - 12:14 am | दिवाकर कुलकर्णी
बाग़बान मध्ये अमिताभला घरी जेवायला कांहीच नसतं
पण हेमा मालिनीला मी यंव खातोय त्यंव खातोय असं फोनवरन खोटंच सांगतो,
त्यावेळी हेमा मालिनी त्याला म्हणते,तुम्हें झूठा बोलना भी नहीं आता तो प्रसंग
आणि शेवटचं त्या च्या सत्काराच्या वेळंचं त्याचं भाषण
9 Nov 2015 - 12:53 pm | सिरुसेरि
कमल हसनच्याच 'हिंदुस्तानी' चित्रपटातील 'प्यारे पंछी बाहोंमे' या गाण्यामधील दोन प्रसंग लक्षात राहिले आहेत .
१. गाण्याच्या सुरुवातीला एक ज्येष्ठ संगीत शिक्षिका कमल हसनच्या ( सेनापती ) मुलीला संगीत शिकविते आहे . त्यावेळी गायलेली 'तंदनानी तानानी आनंदमे ,तंदनानी तानानी आनंदमे ' हि आलापी व तेव्हा आपल्या मुलीकडे , परिवाराकडे कौतुकाने बघणारा कमल हसन. याचे काहि श्रेय दिग्दर्शक शंकर व संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांचेहि आहे .
२. कुंभारवाड्यामध्ये असलेला ओल्या मातीचा एक मोठा ढिगारा .या ओल्या मातीमध्ये तोल सांभाळुन नाचण्याचा प्रयत्न करणारे कुंभार , तरुण कमल हासन व त्याची बहिण . पण तिघेही तोल जाउन पडतात. तेव्हा मिस्किलपणे हसत आपल्या चपला काढुन ज्येष्ठ कमल हासन त्या ओल्या मातीमध्ये शिरतो व सर्वांना खास ग्रामिण शैलीतील नाच करुन दाखवितो . त्या वेळेस त्याची पत्नी त्याच्या बाजुला उभी राहुन आपल्या नवरयाकडे कौतुकाने बघत त्याला नृत्यात साथ करते .
9 Nov 2015 - 1:24 pm | संदीप डांगे
अपनी चौखट का दिया... गिविंग लाइट टू....
9 Nov 2015 - 11:03 pm | मारवा
संदिप जी कुठला हो सीन ?
9 Nov 2015 - 11:51 pm | संदीप डांगे
स्वदेस.
11 Nov 2015 - 3:32 am | श्रीरंग_जोशी
वोह सात दिन - नायक म्हणून अनिल कपूरचा पहिला चित्रपट. गरिबीचे चित्रण कुठलाही भडकपणा न वापरता कसे करावे याचे चांगले उदाहरण म्हणता येईल असा एक चित्रपट. यातील एका प्रसंगात अनिल कपूर नदीच्या पाण्यात कापड भिजवून पोटाभोवती बांधत असतो. यावर त्याचा चेला नायिकेला (पद्मिनी कोल्हपुरे) स्पष्टीकरण देतो की, ओले कापड करकचून पोटाला बांधले की भूक लागत नाही. अपना गुरू दिन मे तीन बार ऐसेही खाना खाता है. या प्रसंगात पडद्यावरील तिघांचाही अभिनय मनाला चटका लावून जाणारा.
द पेट्रियट - युद्ध व सत्ताधाऱ्यांबरोबरचा संघर्ष यातील फोलपणा कळून चुकलेला एक थोर सेनानि (बेंजामीन फ्रँकलिन) मेल गिब्सन ने या चित्रपटात जोरदार रंगवला होता. या चित्रपटात मला सर्वाधिक भावलेला एक प्रसंग. बेंजामीन च्या ७ अपत्यांपैकी सर्वात धाकटी मुलगी जी जन्मापासून कधीच बोललेली नसते, नंतर बोलणे सुरू झाल्यानंतरही पित्याबरोबर कधीच बोलत नसते. एका प्रसंगात बेंजामीन लढाईवर निघताना सर्व कुटूंबियांचा निरोप घेत असतो. तिलाही बोलते करण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्नांना यश येत नाहीये हे पाहून खिन्न मनाने निघालेला असताना ती आयुष्यात प्रथमच त्याला बाबा म्हणून हाक मारते. हा फारच हृद्य प्रसंग आहे. आताही इथे टंकताना डोळ्याच्या कडा ओलसर झाल्या आहेत.
11 Nov 2015 - 3:28 pm | संदीप डांगे
वोह सात दिन मधला तो प्रसंग खरंच मनात घर करून बसलाय... कायमच. गरिबीच्या चित्रणाबद्दल आणि अनिल कपूरच्या अभिनयाबद्दल तर तुमच्याशी बाडीस..
12 Nov 2015 - 6:18 pm | मारवा
श्रीरंग जी
पॅट्रीयट ची लिंक दिली तर आनंद होइल.
सिनेमा बघितला नसेल तर तुटक प्रसंग नुसत्या वर्णनाने समजायला अवघड जातो.
जस डांगेनी सीन दाखवल्यावर त्यातला भाव पोहोचला तस.
12 Nov 2015 - 6:18 pm | मारवा
श्रीरंग जी
पॅट्रीयट ची लिंक दिली तर आनंद होइल.
सिनेमा बघितला नसेल तर तुटक प्रसंग नुसत्या वर्णनाने समजायला अवघड जातो.
जस डांगेनी सीन दाखवल्यावर त्यातला भाव पोहोचला तस.
12 Nov 2015 - 9:14 pm | श्रीरंग_जोशी
खरं तर द पेट्रियट हा चित्रपट संपूर्णपणेच बघायला हवा.
13 Nov 2015 - 9:54 am | कैलासवासी सोन्याबापु
काय रंगवला आहे बेंजामिन मार्टिन मेल गिब्सन ने! अत्युच्च आहे राव ! सोबत हीथ लेजर सारखा कसलेला अभिनेता दोन सीन अक्षरशः डोळ्यात पाणी आणतात माझ्या
१. शेवटच्या युद्धात उभा असताना रांगेतला एक गोरा नागरिक शिपाई एका ऑकम नावे ब्लॅक माणसाला सांगतो की त्याची सक्तिची मिलिट्री सर्विस संपली आहे व तो आता स्वतंत्र नागरिक आहे ह्यावर तो कृष्णवर्णीय माणुस त्याच्याकडे पाहुन म्हणतो की त्याला तो स्वतंत्र असल्याचे माहिती आहे पण तो आज युद्धात स्वयंस्फूर्ति ने आलाय, तेव्हा तो गोरा म्हणतो की "मला अभिमान वाटतो की आज आमच्यासोबत इथे आहेस" बॉस अमेरिका नामे रसायन कसले बनले असेल अन किती विशाल दृष्टीचे फाउंडिंग फादर्स असतील त्याचे हे लगेच स्ट्राइक होते त्या सीन मधुन
२. बेंजामिन मार्टिन युद्धात मोड़कळीला आलेली फळी सांधायला जेव्हा पळणाऱ्या एका सैनिकाच्या हातातला झेंडा घेऊन परत पुढे कूच करतो तो क्षण
13 Nov 2015 - 10:26 am | श्रीरंग_जोशी
या चित्रपटात असे अनेक प्रसंग आहेत जे खूप खोलवर परिणाम करतात. चित्रपटाच्या सुरुवातीला स्वतःच्या डोळ्यांसमोर ब्रिटिश सेनेतील अधिकार्याकडून स्वतःचा किशोरवयीन मुलगा मारला जातो तेव्हा त्याक्षणी संयम न ढळू देता बेंजामिन प्रथम इतर मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेतो. नंतर दोन लहानग्या मुलांच्या मदतीने ब्रिटिश तुकडीने अटक केलेल्या मोठ्या मुलाची सुटका करवतो.
या चित्रपटाचे कुणा ताकदीच्या माणसाने मिपावर रसग्रहण करावे.
12 Nov 2015 - 10:23 pm | चांदणे संदीप
श्रीरंगदादा... अगदी हेच्च टाईप करणार होतो.
कुणाचीही शप्पथ!
वा! अजबच प्रकार झाला हा! (तशी चित्रपटांची माझी यादी बरीच लांबलचक आहे!)
"पेट्रीयट" तर पारायणे केल्यासारखा पाहिला आहे! मेल गिब्सन याच चित्रपटामुळे आवडायला लागला. नंतर ॲपोकॅलिप्समुळे तर हात जोडले त्याला!
तर....
'वो सात दिन'बद्दल सांगायचं म्हणजे हा माझा अनिल कपूरच्या चित्रपटांपैकी सगळ्यात आवडता चित्रपट. चमेली की शादी, साहेब, मेरी जंग, नायक अशी रत्ने यानंतर!
वा! मजा आ गया!
धन्यवाद!
12 Nov 2015 - 7:19 pm | मारवा
बना चे गुंड इन्स्पेक्टरला धरुन आणतात त्याला भाटी समोर उभ करतात तो म्हणतो
ठीक है मारो लेकीन एक लास्ट ये वर्दी उतार लो ... बहोत प्यार करता हु इसक...........
दोन गोळ्या वाक्य पुरे होण्याआधीच भाटी त्याला मारतो
आणि दुसर्या सहकार्याला सांगतो
" वर्दी उतार के गाड दे इसको. "
मग आतुन बना येतो व त्याचा तो निळा साथीदार
बना म्हणतो
ये तो उड गई हम भी उडे
आणि ते दोन्ही बाहेर जाऊ लागतात तितक्यात भाटी समोर येऊन त्याला अडवतो
बना भाटीला म्हणतो " जाने दे ना यार "
"बाहर कितना कुछ चल रहा होगा "
भाटी म्हणतो "बना मना किया था ना आपको बाहर जाने के लीए "
बना = "मुझे मालुम है मै भुल गया था "
बना परत बाहेर च्या दिशेने जाऊ लागतो भाटी एक गोळी चालवुन त्याला सांगतो बाहेर नाही
"कमरा उधर है "
आत घरात जाता जाता बना पुटपुटतो
"मै अकेला नही हु इस घर मे जो रास्ता भुल गया"
आयुष्यभरासाठी घरात कोंडलेला बना (जॉन लेनन च देशी अवतारातल लॉकेट गळ्यात घालणारा ) एकदाच फ़क्त एकदाच बाहेर जाण्याचा क्षीण प्रयत्न करतो
त्याच ते बाहर कितना कुछ चल रहा होगा बोलतांना चे हावभाव हातवारे ह्रद्य चिरुन जातात ते शब्द संवाद
सिनेमा बघितला असेल तर त्या पात्रा मध्ये काय जान ओतलेली आहे ते तत्काळ कळेल आणि त्या संवादाची इन्टेसीटी पण समजेल.
नंतर ही अनेक प्रसंगात डुगी बना च्या बेबंद तथाकथित क्रांती ला त्यातल्या फ़ोलपणाला ज्या तीव्र संवादाने बना काउंटर करत असतो
ते सर्व विलक्षणच आहे हिंदी चित्रपटाने इतकी उंची क्वचितच गाठलीय.
12 Nov 2015 - 7:20 pm | मारवा
द परस्युएट ऑफ़ हॅपीनेस मधला अखेरचा प्रसंग ज्यात जीवघेण्या कठोर संघर्षानंतर अखेर विल स्मीथ ( क्रीस गार्डनर च्या सत्यकथेवर आधारीत चित्रपट ) यशस्वी होतो. जेव्हा त्याला अखेर कामं मिळत आणी बॉस त्याला गुडलक म्हणुन हात मिळवतात एक नोट देतो मग तो जेव्हा बाहेर अत्यंत आत्मविश्वासाने बाहेर पडतो व म्हणतो " धिस पार्ट ऒफ़ माय लाइफ़..... इज लिटल पार्ट.... इज कॉल्ड हॅपीनेस.. ऑफ़ीस बाहेर पडुन अत्यंत आत्मविश्वासाने ... तो गर्दीतुन चालु लागतो.... त्यावेळेस त्याच्या चेहर्यावरील ते आनंदाचे भाव ती एक्साइटमेंट त्याचं ते डोळे भरुन येणं काय अभिनय तिथुन तो पाळणाघरात जाऊन तीथे असलेल्या आपल्या मुलाला उचलुन घेतो आणि कवटाळतो. ते बॅकग्राउंड मधल संगीत ते सर्व सर्व फ़ारच सुंदर प्रसंग
12 Nov 2015 - 7:26 pm | मारवा
https://www.youtube.com/watch?v=x8-7mHT9edg
13 Nov 2015 - 9:08 am | सिरुसेरि
"परिचय" या चित्रपटातील "बिते ना बिताई रैना" या गीतातील एक प्रसंग लक्षात राहतो .
जया भादुरी "बिते ना बिताई रैना" हे गीत म्हणत असते . मध्येच तिला गाण्यातील पुढील ओळ आठवत नाही . तेव्हा पाठीमागुन तिचे आजारी वडील (संजीवकुमार) येतात . व गाण्यातील ती ओळ पुर्ण करतात .
13 Nov 2015 - 5:29 pm | हेमंत लाटकर
दिलीप कुमारचा अभिनय छान असायचा उदा. कर्मा, विधाता, शक्ती, मशाल.
13 Nov 2015 - 5:51 pm | DEADPOOL
दिग्या : SORE सॉरी
8 Dec 2015 - 12:26 pm | नया है वह
नागेश भोसलेची हॉस्पीटल मधील एन्ट्री!
त्याने २ मिनटांच्या सीनमधेपण भलताच भाव खाल्ला आहे.
13 Nov 2015 - 10:41 pm | भंकस बाबा
सिल्वेस्टर स्टेलोन कढून अभिनयाची अपेक्षा करणे चुकीचे पण तरिही त्याने Oskar व् over the top मधे केलेला अभिनय दाद घेऊन जातो.
Over the top मधे स्टेलोन आपल्या गड़गंज श्रीमंत असलेल्या सासऱ्याला भेटायला जातो. बोलणी फिसकटतात. स्टेलोन जायला निघतो. नकार ऐकन्याची सवय नसलेला स्टेलोनचा सासरा आपल्या गुंडाकरवी स्टेलोनचा रस्ता अडवतो. स्टेलोन शांतपणे सांगतो " talk is over" तरिही तो गुंड हात आडवा ठेऊन स्टेलोनला अडवतो. बस्स स्टेलोन त्याला पूर्ण ताकदिनीशि एक ठोसा ठेऊन देतो. तो गुंड तो उभी असलेली चौकट घेऊन खाली कोसळतो. एक बापच त्या ठोशाचि ताकत समझु शकतो. स्टेलोन पुढे स्पर्धेत काय करणार आहे याची कल्पना येते
13 Nov 2015 - 10:55 pm | भंकस बाबा
हॉलीवूड मधील बाप माणूस!
The terminal . एक जबरदस्त सिनेमा . ज्या अमेरिकेत जायला लोक आकाशपाताळ एक करतात त्या अमेरिकेत फक्त आपल्या बापाची इच्छा म्हणून येणारा व् प्रतिकुल परिस्थितित देखील सर्व जुळवून घेणारा माणूस टॉम ने जबरदस्त रंगवला आहे. किंबहुना टॉम हैंक्सने भूमिका केलेला कोणताही सिनेमा मला रटाळ वाटलेला नाही.
13 Nov 2015 - 11:20 pm | मारवा
किंबहुना टॉम हैंक्सने भूमिका केलेला कोणताही सिनेमा मला रटाळ वाटलेला नाही.
कास्ट अवे मधला तो फुटबॉल कंपॅनियन बोटीवरुन पडुन त्याच्या नजरेसमोर ह्ळुहळु वाहत जातो. तेव्हाचा त्याचा आकांत
क्या बोलते बाबाजी ?
14 Nov 2015 - 12:06 am | भंकस बाबा
द्या टाळी . टॉम एंड हुचेस, सेविंग प्राइवेट रायन, दा विन्ची कोड, कैच मी इफ यु कैन , यादि लांबतच जाईल
14 Nov 2015 - 12:46 am | संदीप डांगे
लै वेळा सहमत..
12 Dec 2015 - 5:39 pm | palambar
अरे तलाश राहिलाच कि? तलाश मधे सुधा बरेच चांगले सिन आहेत.
15 Dec 2015 - 6:42 pm | नया है वह
1997 इटालियन चित्रपट
बाप मुलाला सांगतो की नाझी छळछावणीत दिलेले काम(task) पुर्ण करणे आवश्यक आहे जे एक खेळ आहे.
आणि जिकंणार्याला रणगाडा बक्षिस म्हणुन देणार आहेत.
छावणीत छळ , रोगराई व मृत्यू ने वेढला असूनही मुलगा स्वत:च्या निरागसपणामुळे बापच्या कल्पनाविलासावर शंका घेत नाही.
बाप शेवट होईपर्यंत नाटक चालू ठेवतो. तो मुलाला एका कपाटात लपवतो आणि सांगतो हे शेवटचे काम(task)आहे. हे पुर्ण केल्यावर रणगाडा बक्षिस म्हणुन तुलाच मिळेल.
दरम्यान बाप त्याच्या बायकोला शोधण्यासाठी जाताना एक जर्मन सैनिकला सापडतो आणि मारला जातो.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मुलागा कपाटाबाहेर येतो,तेथे रणगाडाच्या नेतृत्वाखालील अमेरिकन सैन्य येते.
आणि तो खुष होतो, खेळ आणि बक्षिस जिंकला असल्याची त्याला खात्री पटते.
17 Dec 2015 - 1:16 pm | सन्जय गन्धे
एका दुकानात राखी व अमिताभ बच्चन भेटतात आणि बोलत असतात तेवढ्यात पूनम धिल्लन तिथे येते, राखी अमिताभची ओळख करून देते "ये है आर. के. गुप्ताजी की बेटी..." त्या क्षणी अमिताभच्या चेहर्यावरचे बदललेले भाव, एका अर्थाने ही आपली बहीण...!!! निव्वळ अप्रतिम.